आरोळ्या फेरीवाल्यांच्या
पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्या वस्तूंसाठी दारावर येणार्या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची.