२१ सप्टेंबर २००१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांचा मिग - २१ हे विमान चालवत असताना मृत्यू झाला. कॅप्टन अनिल आणि कविता गाडगीळ यांच्यासाठी हा मोठा आघात होता. सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली. पुत्रवियोगाच्या दु:खात असूनही गाडगीळ दांपत्यानं तीन वर्षं सरकारशी लढा दिला. सरकारनं शेवटी मान्य केलं की चूक अभिजीत गाडगीळ यांची नसून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ’रंग दे बसंती’ या चित्रपटाची ही प्रेरणा होती.
गाडगीळ दांपत्याचा लढा केवळ त्यांच्या मुलासाठी नसून मिग - २१ विमानांच्या अपघातात बळी गेलेल्या दोनशेहून अधिक वैमानिकांसाठी होता.
यापुढे अधिक बळी जाऊ नयेत, म्हणून गाडगीळ पतीपत्नी सरकारदरबारी खेटे घालत राहिले.
२००६ साली त्यांनी भारतातलं पहिलं एव्हिएशन सिम्यूलेटर खडकवासल्याजवळ सुरू केलं. त्या काळी या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च आला. हा बहुतेक सगळा खर्च गाडगीळ कुटुंबानं केला. अभिजीत यांचे बंधू केदार यांनी पंचवीस लाख रुपये दिले.
पण आत्ता मुद्दा हा नाही.
कॅप्टन अनिल भारतीय वायुसेनेत वीस वर्षं कार्यरत होते. त्यांनी बांगलादेशाच्या युद्धात भाग घेतला होता.
काही दिवसांपूर्वी पहलगाम इथे अतिरेक्यांनी केलेल्या नृशंस हत्याकांडानंतर देशभर पाकिस्तानाशी युद्ध करावं, ही मागणी जोर धरू लागली. मुसलमानांवर आर्थिक बहिष्काराची भाषा तर हल्ल्यानंतर पाचेक मिनिटांत सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं. तुमच्यापैकी अनेकांनी ते आतापावेतो इतरत्र वाचलंही असेल.
कविता यांनी सांगितल्यानुसार केदार यांनी ते इंग्रजीत लिहिलं. त्या पत्राचा अनुवाद भक्ती बिसुरे यांनी केला आहे.
हे पत्र मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करायला परवानगी दिल्याबद्दल भक्ती बिसुरे यांचे मन:पूर्वक आभार.
***
माझ्या प्रिय भारतीय बंधुभगिनींना,
सप्रेम नमस्कार!
आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. माझा मुलगा म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ! अभिजित आज असता तर ५१ वर्षांचा झाला असता… पण माझ्यासाठी मात्र तो २७ वर्षांचाच आहे अजूनही.
कुठल्याही आईसाठी तिचं मूल कितीही मोठं झालं तरी ते कायम लहानच असतं म्हणून नाही… पण अभिजित २७ वर्षांचा असताना घडलेल्या घटनेने जणू काळ गोठला आणि सगळं जिथल्या तिथे थांबलं.
२००१ मध्ये सप्टेंबरच्या त्या रात्री अभिजितने त्याच्या ‘मिग -21’ मधून टेकऑफ केलं. त्यानंतर अवघ्या ३३ सेकंदांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. अभिजितचं ‘मिग-21’ क्रॅश झालं. काही म्हणजे काही हाती लागलं नाही. फक्त रिकामं भकास आकाश आणि जीवघेणी शांतता तेवढी मागे राहिली…
त्या तसल्या जीवघेण्या शांततेचं ओझं अनेक वर्षं मनावर आहे, म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांशी बोलायचं ठरवलंय.
एखाद्या हिंसक प्रसंगानंतर येणारी शांतता मोठी भीषण असते. भूतकाळातली सुखदुःखं, श्वास, जगणं हे सगळं नाहीसं झाल्यामुळे निर्माण झालेली ती एक पोकळी असते. ही पोकळी उरावर घेऊन जगण्याच्या यातनांची कल्पनाच न केलेली बरी…
ती तसली भीषण पोकळी आता मला परत जाणवू लागली आहे… आणि त्यातच युद्ध हवं म्हणणाऱ्या आवाजांचे सूरही टिपेला पोहोचले आहेत.
मी १२ वर्षांची होते तेव्हा १९६२चं युद्ध झालं. आमच्या जगण्यातलं सगळं निरागसपण त्या युद्धानं हिरावून घेतलं.
आपली तरणीताठी मुलं गमावलेल्या, मोडून पडलेल्या आयांना बघत मी लहानाची मोठी झाले. नुकतंच लग्न झालेल्या आणि नवरा युद्धात कामी आल्यावर सर्वस्व गमावलेल्या कितीतरी तरुण मुली पाहिल्या आहेत मी. पुढे माझंच लग्न हवाईदलातल्या एका धडाडीच्या अधिकाऱ्याशी झालं. त्यानंतरची किती तरी युद्धं आम्ही दोघांनी एकत्र पाहिली.
१९७१चा तो कडाक्याचा हिवाळा मी फक्त हेडलाईन्समधून बघितलेला नाही, तर प्रत्यक्ष अनुभवलाय. माझा नवरा तेव्हा जोरहाटवरुन सतत मोहिमांवर जात असे. कधी युद्धभूमीवर लढणाऱ्यांसाठी राशन पोहोचवायचं म्हणून, तर कधी पूर्व पाकिस्तानातून जखमी किंवा मृत सैनिकांना परत आणायचं म्हणून त्याच्या अविश्रांत फेऱ्या सुरु असत. जीव धोक्यात घालणाऱ्या मोहिमांसाठी तो टेकऑफ करायचा तेव्हा मागे एकाकी धावपट्टीवर उभी राहून कित्येकदा मी त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केलीये. युद्धासारखी वाटणारी शांतता आणि शांतता ढवळून टाकणारी युद्ध हे सगळं मी जवळून पाहिलंय.
ज्यांनी कधी ना कधी युद्धावर गेलेल्या कुणाच्या तरी वाटेकडे डोळे लावून बसणं काय असतं हे अनुभवलंय, त्यांनाच युद्ध हे कुठल्याही समस्येवरचं उत्तर नाही याची जाणीव असते, याची मला पुरेपूर कल्पना आहे.
युद्ध म्हणजे विनाश. युद्ध म्हणजे नांदत्या कुटुंबांचे लचके तोडणं. युद्ध हा त्याग आहे, आणि त्या त्यागाची अपेक्षाही सहसा अशाच लोकांकडून केली जाते, ज्यांच्याकडे मुळातच फार काही नसतंच…
युद्धात बहुतेकवेळा सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, नोकरदारांची आणि शिक्षकांची मुलंच कामी येतात. श्रीमंतांची मुलं तिथपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. त्यामुळेच कर्त्यासवरत्या मुलाच्या बदल्यात मिळणारा तिरंगाही सर्वसामान्य आयांच्याच वाट्याला येतो.
युद्धाची खरी किंमत नेहमी बायकांनाच मोजावी लागते. ती किंमत काय असते? आपली तरुण मुलं गमावल्यावर त्यांच्या मागे कुढत जगत राहणं, नवरा गमावल्यावर आपलं दुःख बाजूला ठेवून एकटीने मुलांना वाढवणं, युद्धात भाऊ गेल्यानंतर उरलेलं आयुष्य भावाची उणीव घेऊन सैरभर जगत राहणं…
परवा पहलगाममध्ये जे झालं त्यानंतर देशात उफाळून आलेला संताप मला दिसतो आहे. मला तो कळतोही आहे. पण म्हणूनच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, आपल्या तरुण तडफदार मुलांना वृथा अभिमान आणि सूडाच्या तोंडी देण्यापूर्वी थांबा आणि सारासार विचार करा. मोठमोठ्या व्यासपीठांवर, न्यूज चॅनल्सच्या चर्चांमध्ये किंवा अगदी सोशल मीडियावरच्या चर्चेत ‘युद्ध हाच उपाय’ म्हणून कंठशोष करणाऱ्यांना युद्धाची किंमत मोजायची नाहीये, नसते. वेळ आलीच तर तुमचीआमची मुलं, विद्यार्थी, शेजारी, प्रियजन - पर्यायाने तुम्हीआम्ही त्या युद्धाची किंमत मोजतो. आणि किंमत म्हणजे फक्त तिरंग्यात लपेटून आलेले आपल्या माणसांचे मृतदेह नव्हे… युद्धात झालेली सर्व प्रकारची हानी भरुन यायला कितीतरी वर्ष जावी लागतात. कितीतरी पिढ्या मातीमोल होतात तरी युद्धाच्या जखमा भरत नाहीत आणि भविष्य म्हणजे फक्त अंधकार असतो!
अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमधल्या युद्धाचा अर्थ, त्याची भीषणता, गांभीर्य आपल्यापैकी किती लोकांना कळतं मला माहिती नाही. पाकिस्तान अत्यंत अस्थिर आणि आततायी देश आहे. ‘नो फर्स्ट यूझ’ हे धोरण त्या देशाला मान्य नाही. अण्वस्त्राचा वापर झाला तर अवघ्या काही तासांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय (आणि पाकिस्तानीही!) नागरिक मरतील. आपल्या जमिनी आणि नद्या तहहयात विषारी होतील. साडेतीन कोटी लोक आयुष्यभर ‘मरण आलं असतं तर बरं’ अशा वेदना घेऊन जगतील आणि त्या वेदनांवर कुठलीही औषधं कधीही पुरे पडणार नाहीत.
तुम्हाला माहितीये, ८० कोटी भारतीय रेशनच्या धान्यावर जगतात. तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. भारतीय सैन्यदलांच्या धाडसाबद्दल दुमत नाही, पण आपल्याकडे एक लाख सैनिक आणि १२,००० अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आपल्या हवाईदलाला ४२ स्क्वाड्रन्सची गरज आहे, पण आपल्याकडे आहेत कशाबशा ३१, त्यातलीही बहुतेक विमानं आता खूप जुनी आहेत. नौदलाकडे १५ पेक्षा कमी पाणबुड्या काम करण्याच्या अवस्थेत आहेत आणि चीनकडे मात्र सुमारे ७० पाणबुड्यांचा ताफा आहे… उद्या खरंच युद्ध सुरु झालं तर आपण कसेबसे दोन आठवडे लढू शकू, याची कल्पना आहे आपल्याला?
सैनिकांचे बूट, जॅकेट्स, रेडिओ, रायफल्स, टेंट्स, औषधं… आणि माफ करा, मला हा शब्द लिहिणंही जड जातंय, पण अगदी शवपेट्यांसाठीही आपण इतरांवर अवलंबून आहोत हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? आणि आपण युद्धाचे मनोरथ रचत असताना तिकडे चीन मात्र अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम आणि आपल्या हातून निसटू शकेल असं सगळं सगळं गिळंकृत करायला बसलाय, हे दिसतंय का कुणाला? अमेरिका आपल्याला सहानुभूती देईल, भाषणं देईल, महागडा शस्त्रसाठा देईल, पण त्यांची मुलंबाळं आपल्याला देणार नाही, हे लक्षात असुदे ‘युद्ध हवं’ म्हणणाऱ्या सगळ्यांच्याच.
आपल्यावर झालेल्या अन्यायाला पोटात घ्या, असं मी अजिबात म्हणत नाही. पहलगामचा बदला घ्यायला हवाच. या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळायलाच हवा. आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा. संरक्षण अधिक काटेकोर हवं. अपयश समोर यायला हवं आणि त्याची दुरुस्तीही व्हायला हवी. वरपासून खालपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांची गच्छंतीही व्हायलाच हवी.
पण सुडाच्या वारुवर उधळताना आपल्यातलं शहाणपण हरवतां नये. त्यातून आपला प्रवास विनाशाकडे होता नये. ते होऊ नये म्हणून, या देशावर जीवापाड प्रेम करणारी एक नागरिक म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हे कळकळीचं आवाहन करते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या रक्षणार्थ मी माझा मुलगा दिला आणि तो मला परत मिळाला नाही. एक वीरमाता म्हणून माझं तुम्हाला हे आवाहन आहे. भारताला आत्ता नेमक्या कशा नेतृत्वाची गरज आहे ते ओळखून तुम्ही वागावं, अशी माझी अपेक्षा आहे. क्रोधाचे ढग गडद होतात तेव्हा आरडाओरडा करणं म्हणजे ताकद नव्हे, तर स्थिर राहाणं ही ताकद आहे हे, तुम्ही सगळ्यांना दाखवून द्यावं, असं मला वाटतं. मृतांना न्याय मिळवून द्यायचा आहे, पण त्यासाठी हयात असलेल्यांच्या भविष्याशी खेळायचं नाही, हे तुम्ही जमवायला हवं. ‘स्टेट्समनशिप’ चा अर्थ तुम्ही इतरांना दाखवून देण्याची गरज आहे. या परिस्थितीत तुम्ही क्रोधाने नाही, तर सहानुभूतीने नेतृत्व कराल, अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे असलेल्या सैन्यदलांमधल्या माणसांची मोजदाद करताना ती फक्त एक माणसांची संख्या नाही तेवढ्या कुटुंबांची, स्वप्नांची आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जगाची संख्या आहे, हे विसरु नका. या देशाचे प्रमुख म्हणून तुम्ही हे सगळं कसं जमवणार, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातली मुलंही मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे पहातायेत, हे लक्षात असू द्या. खरा नेता कसा असतो, कसा असायला हवा, हे त्यांना दाखवून द्या, प्लीज!
आणि आता पुन्हा जरा भारतीयांकडे वळते.
बंधूभगिनींनो, तुम्ही म्हणताय तसं, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना काही मूठभर स्थानिक काश्मिरींकडून मदत मिळते, आसरा दिला जातो, हे खरंच.
पण काश्मीरकडे पाठ फिरवणं, हा त्यावरचा उपाय नाही. उलट हीच वेळ आहे त्या मूठभर काश्मिरींकडे दुर्लक्ष करुन मोठ्या संख्येने शांतता हवी असलेल्या काश्मिरींसाठी आपला हात पुढे करण्याची. दहशतवाद हा तिरस्काराला खतपाणी घालतो. इतरांपासून तुटलेले, दुरावलेले, एकटे पडलेले किंवा पाडलेले यांना गाठून त्यांचे कान भरणं, त्यांना आपल्या बाजूला वळवणं दहशतवादाला सहज जमतं. काश्मीरच्या ट्रिप्स कॅन्सल करुन, तिथल्या व्यवसायांवर बहिष्कार घालून किंवा तिथल्या लोकांकडे पाठ फिरवून तुम्ही दहशतवाद्यांना अद्दल घडवत नसता, तर त्यांना बळ देत असता, हे लक्षात असूदे. एरवी ज्या तरुण मुलांनी शेती केली असती, लहानमोठा नोकरीधंदा केला असता, ते तरुण आपण काश्मीरकडे पाठ फिरवल्यामुळे हाताला काम नसलेले, अस्वस्थ, रिकामे बसणार आहेत. त्यामुळे त्यांची माथी भडकवून त्यांना आपल्याकडे खेचून घेणं दहशतवाद्यांना सोपं जाणार आहे.
काश्मीरबद्दल खरंच तुमच्या मनात प्रेम असेल, तो भारताचा अविभाज्य भाग आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काश्मिरी लोकांना परकं करुन चालणार नाही. तुम्हाला काश्मीरची जमीन हवी, निसर्ग हवा, पण तिथली माणसं नकोत हे कसं काय जमेल?
अर्थातच, काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणायला हवं. त्यांना न्याय मिळायला हवा. भूतकाळातल्या चुका सुधारायला हव्यात. लोकसंख्येचा समतोल साधायला हवा. पण हे सगळं स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या साथीने व्हायला हवं, त्यांना डावलून नाही! कारण सर्वसामान्य काश्मिरी लोक तुमच्याबरोबर असतील तर दहशतवादी काहीच करु शकणार नाहीत. कुठेही जरा खुट्ट झालं तरी स्थानिक काश्मिरींना त्याची जाणीव सगळ्यात आधी होते, हा इतिहास आहे. १९४७ला घुसखोरी झाली तेव्हा, नंतर कारगिल घडलं तेव्हाही काश्मिरी मेंढपाळ, गुज्जर, बकरवालांनीच त्याबद्दल सैन्यदलांना पहिली माहिती देत सावध केलं होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?
अगदी परवा पहलगाम झालं तेव्हाही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत न जाऊ देणारे, त्यांना खाऊपिऊ घालणारे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव देणारे तेच स्थानिक काश्मिरी होते हे आपण विसरुन चालणार नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांचा आदर करायला हवा. आपल्याला जर खरंच दहशतवादाचा बिमोड करायचा असेल, पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, संपूर्ण काश्मीर आपलं असावं-ते आपल्याला परत मिळावं असं वाटत असेल तर माझ्याकडे एक योजना आहे. त्या योजनेत बळाचा वापर करण्याची गरज नाही.
काश्मीरला जा. तिथल्या लोकांच्यात मिसळा. त्यांची हॉटेल्स, बागा, बाजार हे तुमच्या अस्तित्वाने भरून टाका. त्यांची सफरचंदं, त्यांचे जर्दाळू, केशर, गालिचे, शाली विकत घ्या. तिथे व्यवसाय सुरु करा. दुकानं उघडा. तिथे रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येऊ देत. धरणं, पूल उभे राहूदेत. त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या!
ही योजना राबवताना कुणाचे जीव जाणार नाहीत. विनाशही होणार नाही. युद्धापेक्षा हे बरंच नाही का?
काश्मीर हे भारताचं अविभाज्य, तेजस्वी अंग व्हावं पण ते तेज विश्वासाचं हवं… रणधुमाळीच्या आगीचं नाही. त्यासाठी आधी काश्मिरी लोक आपला अविभाज्य भाग असायला हवेत मात्र…
काश्मीरच्या गोष्टीचा उत्तरार्ध तिरस्काराने नाही, तर प्रेमाने लिहिला जाऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याची ही वेळ आहे. हे घडलं तर पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरलाही फरक दिसेल, जाणवेल आणि तिथले लोक स्वतःच पाकिस्तानचं वर्चस्व नाकारतील!
बंदुकीची एक गोळीही न झाडता आपण काश्मीर राखू… पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीरही परत मिळेल. हे सगळं फक्त काश्मीर आणि काश्मिरींना आपलंसं केल्यामुळे साध्य होईल.
काश्मिरी लोकांनी आम्हाला वाचवलं, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत हे पहलगाममधला दहशतवादी हल्ला अनुभवलेले पर्यटक आपल्याला जीव तोडून सांगतायेत.. सर्वसामान्य काश्मिरी माणूस कष्टाळू आहे. कुटुंबवत्सल आहे. त्यांनाही वाटतं आपल्या मुलाबाळांनी शिकूनसवरुन, सर्वसामान्य भारतीयांसारखं शांत स्थिर आयुष्य जगावं…
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला नृशंस हिंसाचार पाहिलेली, अनुभवलेली, त्यातून स्वतःचं सर्वस्व गमावलेली माणसं मानवतेवर विश्वास ठेवू शकतात तर आपणही तो ठेवायला हवा.
लक्षात ठेवा, युद्ध सुरू करणं सोपं, पण ते संपवणं अशक्य असतं. तिरस्काराची आग शत्रुला भस्मसात करेलच, पण ती लावणाऱ्याला तरी ती कुठे मोकळं सोडणार आहे? फक्त सैन्यदलं ही भारताचं एकमेव बलस्थान नाहीत, न संपणारी स्वप्न, दुर्दम्य आशावाद आणि प्रेम या आपल्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. त्यांचा विसर पडू देऊ नका.
निवडण्याची वेळ येईल तेव्हा प्रेम निवडा. धैर्य निवडा. बुद्धीमत्ता निवडा. भारतमातेला निवडा.
माझ्या बोलण्याचा विचार करा.
दुःखात असले तरी आशा न सोडलेली आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी,
अभिजितची आई
आणि अनेक ‘मिग-21’ पायलट्सची माँ!
————
मूळ इंग्रजी पत्र - कविता गाडगीळ
अनुवाद - भक्ती बिसुरे.
<<<<अर्थातच, काश्मिरी
<<<<अर्थातच, काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणायला हवं. ...........काश्मिरी लोक तुमच्याबरोबर असतील तर दहशतवादी काहीच करु शकणार नाहीत.>>>>
अनुमोदन.
उगाच युद्ध केले नि पाकीस्तानवाले म्हणाले आम्ही हरलो, आता आम्ही पाकीस्तान तुमच्या हवाली करतो, आमची शस्त्रे, आमचे कर्ज, आमची माणसे हे आता सर्व तुमचे! तर ते कर्ज नि ती माणसे घेणार का आपण भारतात?
त्या सर्वांना बालपणापासून भारताचा द्वेष, हिंदूंचा द्वेष याचे बाळकडू पाजले आहे.
आहेत ते मुस्लिम संभाळता येत नाहीत, पाकीस्तानात घुसलेले मुस्लिम सांभाळता येत नाहीत, नि आता एव्हढे सगळे मुस्लिम भारतात आल्यावर झालेच की! मग कसला सर्वांना समान कायदा करणार? का सर्वांना शारिया चा कायदा करणार?
काश्मीरमधे काँग्रेसचे सरकार आहे ना? मग राहुल गांधी ला ताष्कंदला पाठवा वाटाघाटी, शांतता करार करण्यासाठी.
>>पुलवामा कोणी घडवला?
>>पुलवामा कोणी घडवला? पुलवामामध्ये काय त्रुटी होत्या? काही चौकशी अहवाल आहे का?<<
उदयशेठ, एनआयएच्या रिपोर्टची बातमी बहुतेक तुमच्या कानावर आलेली दिसत नाहि. हि बातमी संपुर्ण वाचा, आणि जमल्यास त्यातुनहि काहितरी खुसपट काढा...
बेफिकीर यांचा मुद्दा थोडासा
.
अभिजीत गाडगीळ त्यांच्या हौसे
अभिजीत गाडगीळ त्यांच्या हौसे साठी मिग विमानातुन उड्डाण करत होते का? काय होणार ह्याची पुर्ण कल्पना असताना, त्या २७ वर्षे वयाच्या मुलाने आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. त्याला वीरमरण आले होते.
इथे त्याचा मृत्यु अपघाताने झाला, शत्रुच्या हल्ल्यात नाही (खरेतर हे आणखीनच संतापजनक आहे), म्हणून त्याच्या बलिदानाला कमी लेखणे अतीशय असंवेदनशील आहे. स्वतः च्या प्राणांचे मोल देऊन आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवणे हा सैन्य दलातही सर्वोच्च त्याग समजला जातो. वीरमरण आलेल्या सैनिकांचे आई - वडील, पत्नी इ. कुटुंबीयांना राष्ट्रपतींच्या वरचा दर्जा असतो. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींनीही (जे देशाचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात,) त्यांना उभे राहुन मानवंदना द्यावी असा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे कविता गाडगीळ ह्यांचा उल्लेख आदराने करा, एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा ही विनंती.
युद्ध हा अंतिम पर्याय असावा कारण युद्धात सैनिकांचा जीव जातो, त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यावर परिणाम होतो. हे मत मांडण्याचा अधिकार एका सैनिकाच्या पत्नीला आणि वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईला नसेल तर तो नक्की कुणाला आहे हा प्रश्न पडला.
अति अवांतर, सरकारच्या धोरणावर बोलणाऱ्या ह्या एकट्या नक्कीच नाहीत. स्क्वॅड्रन लीडर अजय आहुजा ( कारगील युध्दात फ्लाईट लेफ्टनंट नचिकेता, पाकिस्तानी हद्दीत अडकल्या वर त्यांच्या सुटकेसाठी गेले होते ते. ज्यांचा पाकिस्तानने अनन्वित छळ केला आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला) ह्यांच्या पत्नी अलका आहुजा यांनी माध्यमांसमोर येऊन, कंदहार हाय जॅक प्रकरणात सरकारने पकडलेल्या अतिरेक्यांची ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात सुटका करू नये असे निवेदन दिले होते. सरकारने अर्थात त्याकडे दुर्लक्ष केले. सैनिकांचे कुटुंबीय हे भारतीय नागरिक आहेत. सरकारने ठरवलेल्या धोरणाचा विरोध करणे त्यासाठी जनमत जागृत करणे हा इतर कुठल्याही नागरिकाप्रमाणे त्यांचा हक्क आहे. त्याला 'हिडन अजेंडा' म्हणण्याची अपेक्षा तुमच्या कडून नव्हती राज. तुम्ही एरवी संयत भाषेत लिहिता, तुमच्याशी चर्चा होऊ शकते असे वाटते म्हणून तुम्हाला हे सांगावेसे वाटले.
गाडगीळांवर तुटून पडलेल्या
गाडगीळांवर तुटून पडलेल्या इथल्या एकाही व्यक्तीने, मुस्लिम देशाचा दौरा सोडून परत आलेल्या पण काश्मिरात पाऊलही न ठेवता बिहार मधे प्रचारात सहभागी होणाऱ्या 56 इंची छाती असलेल्या पंतप्रधानांचा , केंद्रीय गृहमंत्री, सरंक्षण मंत्री, काश्मीरचे नायब राज्यपाल ह्यांचा एका शब्दानेही निषेध केलेला नाहीये. सगळीच गंमत!
गोबेल्स च्या प्रचार यंत्रणेत
गोबेल्स च्या प्रचार यंत्रणेत सहभागी झालेल्या फुट्सोल्जर्स चे पुढे काय झाले?
उदय. तुम्ही लिहिलेल्या
उदय. तुम्ही लिहिलेल्या "पुलवामा आणि पहेलगाम एकाच मानसिकतेने घडवले गेले". या वाक्यातील पहलगाम बद्दल पुरावा द्या किंवा वाक्य मागे घ्या. मायबोली ॲडमिन..लक्ष द्या.
फक्त पत्र वाचून थांबायला हवं
फक्त पत्र वाचून थांबायला हवं होतं मी. प्रतिसाद उगाच वाचले.
काही प्रतिसाद वाचून धन्य झाले.
घरी वाचून दाखवले तर "सोडून दे. विचार करू नकोस." असं उत्तर मिळेल हे माहिती आहे. पण राहवले नाही.
निदान ज्या लोकांसाठी संरक्षण दलातील लोक जीव पणाला लावतात, ते त्यांच्या बद्दल काय विचार करतात हे तरी कळाले. पण शेवटी 'नोकर' माणसाने हा विचार करू नयेच.
नाही का?
मरायचाच पगार घेतात हे पूर्वी वाचलं होतं त्यामुळे आश्चर्य वाटले नाही.
असो. मिडिया मध्ये बातम्या येतात तेव्हाच युद्ध सुरू असते असे नाही. गेली कित्येक वर्षे रोज चकमकी सुरू आहेत आणि रोज सैनिक शहीद होत आहेत.... पण शेवटी त्यासाठीच तर सैन्यात जातात ते.
एकच सांगते, आज संरक्षण दलातील कोणालाही विचारलेत तर ते युद्धापासून मागे हटणार नाहीत. पण एक आई, एक बायको म्हणून युद्ध होऊ नये अशी प्रार्थना लाखो बायका रोज करत असतात. पण मग त्यांनी नवऱ्याला/मुलाला सैन्यात पाठवायचेच कशाला मुळात? वेड्या आहेत झालं.
माझ्या मते युद्ध कोणत्याही
माझ्या मते युद्ध कोणत्याही देशाला ( त्या देशाच्या भुमीवर लढले गेल्यास ) लाभदायक नसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण त्यात एक कंगोरा तितकाच खरा आहे की प्रत्येक युद्ध दोन्ही युद्धकार पक्षांतील एका ठराविक गटाला सर्वस्वी लाभदायक असते आणि त्यांना युद्धात भरडल्या जाणाऱ्या सामान्य जनतेच्या होणाऱ्या जिवीत-मालमत्ता हानीचे काहीही सोयरसुतक नसते.
लेख पोस्ट झाला तेव्हा लगेच
लेख पोस्ट झाला तेव्हा लगेच वाचला होता.
लेखिकेची कळकळ पोचली याउपर दुसरा काही विचार आला नव्हता. तीन चार प्रतिसाद तेव्हा होते त्याचेही काही वाटले नव्हते.
आता बाकी प्रतिसाद उगाच वाचले खरं असे मलाही वाटले प्राचींना वाटले तसे.
त्यात मला पटलेल्या प्रतिसादांपैकी पर्णीका यांचे उल्लेखनीय वाटले.
<< उदय. तुम्ही लिहिलेल्या
<< उदय. तुम्ही लिहिलेल्या "पुलवामा आणि पहेलगाम एकाच मानसिकतेने घडवले गेले". या वाक्यातील पहलगाम बद्दल पुरावा द्या किंवा वाक्य मागे घ्या. मायबोली ॲडमिन..लक्ष द्या.
Submitted by punekarp on 28 April, 2025 - 22:25 >>
------ पुरावा नक्की कशाबद्दल हवा आहे ?
पहलगाम मधे २६ निरपराधी व्यक्ती मारल्या जाणे याचे मला वाईटच वाटत आहे. तेव्हढेच वाईट पुलवामाच्या वेळी पण वाटले होते. आणि मणिपूरमधे ४०० निरपराधी लोक मारल्या गेल्यावरही वाईट वाटते.
प्रत्येक मानवी जिव अनैसर्गिकपणे संपविला जाणे फार क्लेशदायक आहे.
पुलवामा १०० % टाळता आले असते. दोन हजार जवानांची ने-आण करण्यासाठी पाच विमानांची मागणी गृहखात्याकडे केली होती. नाकारल्या गेली. एव्हढा मोठा ताफा रस्त्याने जातांना काही काळजी घेणे अपेक्षित आहे. मागितलेली विमाने मिळाली असती तर या जवानांचे लाखमोलाचे प्राण वाचले असते. आजही या ४० जवानांच्या कुटुंबाला माहित नाही हा स्फोट नक्की कुणी घडविला होता. बालाकोट झाले पण ते ४० जवान तर परत येणार नाही.
(तो भाग वेगळा पण ) पुलवामा येथे मानवी हत्याकांड करणारे मानवतेचे शत्रू होते.
आता पहलगाम... अनेक प्रश्नाची उत्तरे अजून मिळालीही नाही ( लष्करी गणवेश चोरीला जाणे, सुरक्षा कमी असणे , मुख्य म्हणजे सगळे आलबेल आहे अशी बाहेर खोटी जाहिरात करणे ). सर्व प्रथम सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
२६ निरपराधी लोकांची हत्या करणारे मानवतेचे शत्रू आहेत.
दोन्ही घटनांत निरपराध्यांची हत्या करणारे मानवतेचे शत्रू आहेत आणि म्हणून एकाच मानसिकतेने हे हत्याकांड घडविले आहे. या व अशा हत्याकांडाचा फायदा कुणाला झाला / होतो हे पुढे कधी.
प्राची, I am sorry, you had
प्राची, I am sorry, you had to go through this.
<< पण एक आई, एक बायको म्हणून
<< पण एक आई, एक बायको म्हणून युद्ध होऊ नये अशी प्रार्थना लाखो बायका रोज करत असतात. >>
----- पण युद्धज्वर चढलेल्या समाजाला , ज्यांना युद्धाची झळही बसणार नाही , त्यांना या भावना कळतील का?
प्राची, I am sorry.
प्राची,
I am sorry.
पहलगाम घडवले गेले म्हणजे
पहलगाम घडवले गेले म्हणजे कोणाकडून घडवले गेले असे तुम्ही म्हणत आहात उदय? जरा उलगडून सांगा. गोल गोल नको. तुमचा पुलवामा बद्दलचा स्टँड माहीत आहे.
>>> एकच सांगते, आज संरक्षण
>>> एकच सांगते, आज संरक्षण दलातील कोणालाही विचारलेत तर ते युद्धापासून मागे हटणार नाहीत. पण एक आई, एक बायको म्हणून युद्ध होऊ नये अशी प्रार्थना लाखो बायका रोज करत असतात. पण मग त्यांनी नवऱ्याला/मुलाला सैन्यात पाठवायचेच कशाला मुळात? वेड्या आहेत झालं.
निरपराध नागरिक मारले गेले. आया पत्नी निर्णय घेतात का मुलाला , पतीला सैन्यात पाठवायचा? आई किंवा पत्नीची इच्छा विचारून माणसाला सैन्यात घेतात? त्याची स्वतःची इच्छाच नसते? कधीही काहीही होऊ शकते हे त्याला माहित नसते?
=====
>>> निदान ज्या लोकांसाठी संरक्षण दलातील लोक जीव पणाला लावतात, ते त्यांच्या बद्दल काय विचार करतात हे तरी कळाले. पण शेवटी 'नोकर' माणसाने हा विचार करू नयेच.
नाही का?
येथील संताप, आक्रोश हे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांबाबत आहेत. आपल्याच सैन्याला दोष देणे हे येथे कोणी करत नाहीये व एखाद दुसरा प्रतिसाद कोणी दिला असेल तर तो अपवाद!
आपली दोन सदस्यांकडून माफी मागितली गेली म्हणून भावनांचा उचित आदर ठेवून मीही क्षमस्व म्हणतो.
मात्र, जे झाले आहे ते वेगळे आहे. धाग्यावरील चर्चा काही सदस्यांच्या साहाय्याने निराळ्या दिशेला जाऊ नये ही विनंती
punekarp - दोन्ही घटनेत
punekarp - दोन्ही घटनेत निरपराधी लोक/ जवानांच्या हत्या झाल्या आहेत
.
माझे स्पष्टीकरण वर दिले आहे. गोल गोल कशासाठी?
वीरमातेच्या पत्रातल्या मजकुराबद्दल आणि लाखमोलाच्या विचाराबद्दल तुमचे मत वाचायला आवडेल.
आता एव्हाना ज्यांना आपली
आता एव्हाना ज्यांना आपली पुरोगामित्वियत दाखवायची होती ती दाखवून झाली असेल तर स्वाती आंबोळेनं लिहीलेलं सत्य वाचा आणि आता काहीतरी सकारात्मक कामास लागा. कसें?
बेफिकीर ्, मी कोणाकडूनही
कधीही काहीही होऊ शकते हे त्याला माहित नसते?>>> येस. माहिती असते. म्हणूनच लिहिले की वेळ आल्यास कोणीही मागे हटणार नाहीत. पण म्हणून होता होईतो ती वेळ टाळावी असं वाटणं चूक कसं?
असो. हेमाशेपो या धाग्यावर.
>>> असो. हेमाशेपो या धाग्यावर
>>> असो. हेमाशेपो या धाग्यावर.
धन्यवाद, मॅडम!
@प्राची >>>>
@प्राची >>>>
कविता गाडगीळ यांच्या मताशी मी सहमत नसले तरी मी भारतीय लष्करी किंवा निमलष्करी दलातील कुठल्याही माणसाचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा उपमर्द करू इच्छित नाही. तसा इरादाही नव्हता. माझ्या कुठल्याही प्रतिसादातून तसे ध्वनित होत असेल तर त्याबद्दल मी माफी मागते.
<<<सर्व काश्मिरी नागरिकात
<<<सर्व काश्मिरी नागरिकात ४७च्या सुमारास पंजाबातून आणलेले दलित समाजाचे लोकांचाही समावेश होतो. त्यांच्या अधिकारांचे काय?>>>
हा संदर्भ समजला नाही. माझे मन, ह्या बद्दल जरा तपशीलवार लिहाल का?
>> मला माहित आहे म्हणून मीच लिहितो. माझे मन पाहिजे तर भर घाला.
"Article ३५ A was added to the Constitution through a presidential order, i.e., The Constitution (Application to Jammu and Kashmir) Order, 1954 – issued by the President of India under Article 370."
म्हणजे हे काही संसदेने लोकशाही पद्धतीने बहुमताने मंजूर केलेले वगैरे नव्हते. presidential order ने काढलेला हा हुकूम होता. काय होते ह्यात?
"It empowered the Jammu and Kashmir state's legislature to define "permanent residents" of the state and provide special rights and privileges to them which were not available to Indian citizens in general."
आता झालं काय, की १९५७ मध्ये जम्मू काश्मीर मधल्या सफाई कर्मचाऱ्यांनी संप केला. संप मोडून काढण्यासाठी शेख अब्दुल्लांनी पंजाबमधून ८००० सफाई कामगारांना़ जम्मू काश्मीरमध्ये बोलावलं. त्या काळच्या सामाजिक स्थितीनुसार हे लोक दलित समाजातले होते. त्यांना equal status कबूल केलं होतं तरी राज्य सरकारने त्यांना काश्मीरची permanent residency कधीच दिली नाही. त्यानंतर त्यांच्या काश्मीरमध्ये जन्मलेल्या मुलांनासुद्धा "permanent residents" असं status दिलं नाही. त्यामुळे कितीही शिकली (अगदी डॉक्टर झाली) तरी त्यांची मुले, आणि मुलांची मुलेसुद्धा राज्य सरकारमध्ये सफाई कामगाराव्यतिरिक्त कुठला जॉब करू शकत नव्हती. article ३७० रद्द झाल्याने त्यांची ह्या गुलामगिरीतून मुक्तता झाली.
https://swarajyamag.com/insta/watch-today-i-am-so-happy-emotional-jk-san...
ही पहा आणखी एक गम्मत. ह्याबद्दल माहिती होती का?
The state government officials of Jammu and Kashmir have issued "permanent resident certificates". However, these certificates differ by gender.[79][80] The certificates issued to females are marked "valid only till marriage", while certificates for males have no such markings. If a woman married to an Indian outside of Kashmir, she was denied a new certificate. These certificates are required by the Jammu and Kashmir state officials from anyone seeking to acquire immovable property, education or employment within the state.[79] Under the state laws, the Jammu and Kashmir High Court quashed the appointment of Susheela Sawhney in 1979 – a Kashmiri-born woman, as assistant professor in the Government Medical College because she was married to a man outside of Kashmir.
ह्या अमानुष गोष्टींविरुद्ध कुठल्याही पुरोगामी, सेक्युलर वगैरे पक्षाने आवाज उठवला नाही, की हे रद्द करण्याचे आश्वासन सुद्धा आपल्या जाहीरनाम्यात दिले नव्हते. ३७० रद्द व्हायच्या आधी उठल्या सुटल्या पुरस्कार परत करणाऱ्या, पुरोगामी, social justice warrior असलेल्या पत्रकार, विचारवंतांनी सुद्धा ह्या बाबतीत radio silence बाळगला होता.
पर्णिका, हे तुमच्याबद्दल वैयक्तिक नाही, पण बरेच सामान्य लोक जे प्रामाणिकपणे पुरोगामी, धार्मिक भेदभावाविरुद्ध आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने असतात त्यांचे माहितीचे sources हे तथाकथित mainstream मीडिया असतात हे sources बहुतांशी left leaning असतात. त्यातही फारसे चुकीचे नाही. पण ह्यातले बहुतेक सर्व अत्यंत चलाखीने माहितीचा अपलाप करून एक नॅरेटिव्ह सेट करत असतात. आपल्या नॅरेटिव्हला गैरसोयीच्या गोष्टी अनुल्लेखाने मारणे हे त्यांचे एक महत्त्वाचे तंत्र आहे. तथाकथित balanced मीडिया ने काश्मीरमधील इंटरनेट स्थगित निर्णयाविरुद्ध बराच आरडाओरडा केला पण article ३७० मधल्या वाईट गोष्टींबद्दल प्रामाणिकपणे माहिती दिली नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती नव्हती ह्यात नवल वाटत नाही.
अप्रामाणिक मीडियाने shape केलेली प्रामाणिक व्यक्तीची मते सुद्धा वस्तुस्थितीपासून दूर असू शकतात. मी थोडे लेफ्ट थोडे राईट करतो. BBC, CNN शिवाय swarajyamag , opindia सुद्धा वाचतो - त्यांचा दर्जा amateur पातळीचा आहे. पण दुसरी बाजूसुद्धा कळते.कित्येकदा ते mainstream मीडियाचा बुरखा फाडतात. त्यातून जेवणात कमी केलेलं मीठ बातम्यांच्याबरोबर भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे हे कळतं
या धाग्यावर लिहिणे बंद केले
या धाग्यावर लिहिणे बंद केले आहे. फक्त प्राची यांची माफी मागण्यासाठी परत आले.
>>> प्राची यांची माफी
>>> प्राची यांची माफी मागण्यासाठी परत आले.
माझी व त्यांची ओळख नाही
तरीही दोन जबाबदार सदस्य माफी मागत आहेत व तसेच काही कारण असणार याचा अंदाज आल्याने मीही क्षमा मागीतलीच आहे
बाकी, त्यांच्या मुद्यांचा प्रतिवाद करणे हे नियमबाह्य नाही
प्राची, so sorry you had to
प्राची, so sorry you had to read all this!
"May the world never again
पत्रातील भावनांशी सहमत आहे.
नुकतेच बास्टोन बेल्जियम येथील war museum पाहीले. तिथे दुसर्या महायुद्धातली battle of the bulge घडली. त्या संग्रहालयात एका अनाम जर्मन सैनिकाने एका शाळेत फळ्यावर एक संदेश लिहून ठेवला होता त्या विषयी माहिती मिळाली.
तो संदेश खाली देत आहे. आपण युद्ध काय असते हे अनुभवलेले नाही. दहशतवादाशी लढण्याचे युद्ध सोडून अनेक मार्ग आहेत जे कमी विनाशकारी आहेत. याची जाणीव करून देणे यात मला काही चुकीचे वाटत नाही.
"May the world never again live through such a Christmas night. Nothing is more horrible than meeting one's fate, far from mother, wife and children. Is it worthy of man's destiny to bereave a mother of her son, a wife of her husband, or children of their father? Life was bequeathed to us in order that we might love and be considerate to one another. From the ruins, out of blood and death shall come forth a brotherly world. [signed] a German officer."
दहशतवादाशी लढण्याचे युद्ध
दहशतवादाशी लढण्याचे युद्ध सोडून अनेक मार्ग आहेत जे कमी विनाशकारी आहेत.>>>
अरे वा! मग ते मार्ग कुठले आहेत ते पण सांगुन टाका. आमच्याही ज्ञानात भर पडेल.
आता काहीतरी सकारात्मक कामास
आता काहीतरी सकारात्मक कामास लागा. कसें?
उपरोध बाजूला ठेवला तर तीन सकारात्मक कामे सुचतात,
१ 'अमूक शहरातील त्यांच्या दुकानांची यादी' वगैरे फॉरवर्ड्स आले तर निदान पुढे पाठवू नयेत.
२ 'आपल्या सैनिकानी पाकड्या सैनिकांची केलेली अवस्था' असे काही फोटो आले तर पुढे पाठवू नयेत
३ 'आय एन एस विक्रांत पाकिस्तान च्या दिशेने निघाले' असे फॉरवर्ड्स पुढे पाठवू नयेत.
माबो वरील वाद विवादपटूं साठी
माबो वरील वाद विवादपटूं साठी खास मार्गदर्शन
Andh Bhakt Banerjee Debates with Dhruv Rathee | Logical Fallacies Explained!
https://www.youtube.com/watch?v=ZZOeyLiBKtc
जिज्ञासा >>>अगदी पटलं.
जिज्ञासा >>>अगदी पटलं.
Pages