चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे ती सुद्धा कबूल करतेच>>> कुठे?... उलट 'इनको फूल के लिये इतना परेशान देखा, तो सोचा इन्की मदद करनी चाहिए', असं अगदी good samaritan आविर्भावात म्हणते. शेवटी फूल 'आप नही होती तो हम मिल नही पाते', म्हणते तेव्हापण भाव खाऊन घेते. खरंतर ती नसती तर ते बिछडलेच नसते.
म्हणजे आपण कसे आपणच लिहिलेल्या प्रोग्राममधली बग फिक्स करून कस्टमरकडून शाबासकी मिळवतो तसं Proud
बाकी पिक्चर छान आहे.
छाया कदमचा रोल मस्त आहे.
मुसलमान दुकानदार - फेस आदमी की पेहचान होती है. फेस ढका याने पेहचान ढकी Lol

ललिता-प्रीती, लिहिताना शब्द चोरले की असा घोटाळा होतो. मला लिहायचे होते, शेवटी स्टेशनवर जया गावाला जाताना दरवाजात उभी असते तेव्हा तो खास मित्र दीपकच्या ‘कानात’ तिला निरोप देऊ लागतो तेव्हा वैतागुन दीपक म्हणतो की ‘तूच जा बरोबर’. तो सीन.

मी इथल्या कमेंट वाचून नेटफ्लिक्सवर बघितला 'लापता लेडीज', आवडला. नाव आणि ट्रेलरवरून मला ग्रामीण भागातील मानवी तस्करीवर वगैरे वाटला होता आणि म्हणून मी टाळला होता. कैच्याकै कल्पना केली मी! सर्वांना धन्यवाद. Happy

फूल गरीब कमी-बावळट जास्त वाटली. छोट्याशा गावातील मुलीही बावळट नसतात. हिला अजिबात व्यवहार येत नाही. दागिन्यांशिवाय थोडीही कॅश तिच्याकडे नसते, एक अक्षतेचा छोटा बटवा सोडून काही नसते. सासरच्या गावाचं नाव सुद्धा आठवत नाही... थोडं जास्त झालं.

मला जयामुळे कथा जास्त आवडली. प्राप्त परिस्थितीत तिने जी संधी मिळाली ती घेतली, तिला व्हिलन म्हणता येणार नाही. तिच्याजागी दुसरी फूल इतकीच बावळट मुलगी बदलली असती तर दोघीही जन्मभर लापता राहून स्टेशनवर कलाकंद करत बसल्या असत्या. ही फूल चार दिवस कपडेही बदलत नाही कारण नवरा ओळखणार नाही, लाल-जोडा हा सिंडरेलाचा शूजच जणू.

तिचा नवरा सोडला तर व्हिलन फक्त पुरुषप्रधान व्यवस्था आहे. मंजूमौसी खूप आवडली, बाऊंडरीज स्पष्ट आखलेली स्त्री वाटली. ती जे म्हणते 'सर्व नातीगोती सोडून एकटं राहणं अवघड पण एकदा जमलं त्याच्या इतकं सुखाचं दुसरं काही नाही' ते अगदी खरं आहे. ती शांत आपापली स्पेस जगत रहाणारी तशी प्रेमळच पण परिस्थितीचं भान-जबाबदारीची जाणीव असलेली फेमिनिझम माहिती असलेली- एक chill वयस्क स्त्री वाटली.

जयाचं पात्र फारच छान लिहिलेले आहे, संधीसाधू नाही पण संधीचं सोनं करायची तडफड आहे. तिथल्या जावेशी बोलताना ती किती खुलते, तिला चित्रकलेचं सामान आणून देते. शेतीवर पडलेल्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी युक्ती सांगताना तिची शेतीबद्दलची पॅशन कळते. ती जाऊही म्हणते 'ज्ञान की भूक है तुममें'. जी फार कमी मुलींमध्ये असते त्याचा शिक्षणाशी किंवा पार्श्वभूमीशी फारसा संबंध नसतो. असे लोक फार पुढे जातात. कमळाची भाजीवरून सुद्धा ती नवऱ्या-मुलाला नसेल आवडत तरी खावं आपआपलं करून म्हणते. छोट्याछोट्या आनंदांची जाणीव आहे तिला.

अन्यायाला दुःख/ नशीब समजून रडत रहाणाऱ्या नायिकांचा कंटाळा आला आहे आणि नायिकांना उठसूठ घर सोडून 'गगन सदन तेजोमय' वगैरेही करता येत नाही. यांच्या बरोबर जो मधे येणारा भरपूर ग्रे एरिया आहे, त्यातील नायिकांची वाणवा आहे. त्यामुळे ही पर्फेक्ट- रिलेटेबल चुका करणारी, पण मार्ग काढणारी व जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी आहे.

रवीकिशनचं कामही आवडलं त्याला अनग्रूमड्- युपीबिहारी बाबू जमतो एकदम. भ्रष्ट असला तरी मूलभूत तत्त्वं जपणारा आहे. सगळी पोलिस गॅन्ग मस्त आहे, उगाच पॉलिश्ड नाही का एकदम नीच नाही. छोट्याशा गावातली अशीच असावी.

वैद्यबुवा, अगदी.‌ फार पर्फेक्ट नोंदी. Happy

लापता लेडीज बघायचा आहे. नेफ्लि सबस्क्रीप्शन रिन्यू करायचंय.
चमकीला भावाने बघायला सांगितला होता. हा ही नेफ्लिवरच आहे का ?

आत्म पॅम्प्लेट बघितला आज. सुरुवात आवडण्या पासून झाली आणि शेवट चिकाटीने बघुन संपवायचा यात झाला. ओव्हरऑल ओके ओके type वाटला

हा ही नेफ्लिवरच आहे का ? >>> हो

लाले मधे ग्रामीण बोलीभाषेतील संवाद व म्हणी मस्त आहेत. ती पुलिस थाना बद्दलची आहेच पण नंतर ती स्टॉलवाली फूल ला काहीतरी असे म्हणते - की "बुडबख" (अडाणी?) असण्यात शरम नाही पण शरम ते मिरवण्यात आहे Happy

>>म्हणजे टेक्निकली फूल लापता होण्यातली व्हिलन असते ती जयाच
संपूर्ण पोस्टशी सहमत मोरोबा.
चारच दिवस असली तरी मुळात काय संबंध तिचा या घराशी? एरवी येणार्‍या सुनेकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याची वृत्ती असलेया त्या ग्रामीण लोकांच्यादृष्टीने ती अगदीच तिर्‍हाईत असताना तिला अगदी त्या घरातल्या तिजोरीपर्यंत अ‍ॅक्सेस असणं किंवा ती जाऊ (?), सासू वगैरे तिला अगदी नात्यातल्या व्यक्तीप्रमाणे आवडती भाजी किंवा आवडीनिवडी, छंद वगैरे सांगतात ते जरा काहीही टाईप वाटलं. पण एकंदरीत स्टोरी चांगलीय त्यामुळे हे इग्नोर करण्यासारखे आहे.

चमकिला बद्दल लिहायचे होते मला पण. मी पूर्वी त्याचे एक गाणे , चित्रपटात पण आहे ते, " पहिले ललकरे पे मै डर गयी" ऐकलं होते. कुठे ते माहित नाही.
गेल्या वर्षी सिद्धु मुस्सेवाला च्या मृत्यू नंतर घरी झालेल्या चर्चेत मी चमकिला चे नाव पहिल्यांदा ऐकलं. त्या दिवशी नवरा, दिर, जाऊ चमकिला ची गाणी आणि किस्से किमान ३-४ तास तरी ऐकवत होते. गेल्या वर्षी सोनी वर एक चमक नावाची सिरीज आली होती. ती बघताना परत त्याची आठवण झाली.
मला चित्रपट खूप आवडला. तो काळ अगदी परफेक्ट दाखवला आहे. दिलजीत आणि परिणिती दोघं चमकीला आणि अमराज्योत वाटतात पूर्ण चित्रपटात. मी नवऱ्याबरोबर बघितला चित्रपट, तो मधून मधून माहिती सांगत होता. छत कोसळण्याचा किस्सा, ते आखाडे. त्याने लहानपणी असे आखाडे ऐकले आहेत. चित्रपटात अधून मधून नावे ऐकू आलेल्या गायकांच्या बद्दल तो सांगत होता. चमकिला ची गाणी गावाकडच्या थेट पंजाबी मध्ये आहेत. ती भाषा थोडी समजते, कधी कधी कळत नाहीत गाणी. मला परत एकदा बघायचा आहे चित्रपट, गाण्याचे शब्द ऐकण्यासाठी.

चित्रपट बघितल्यावर एक विचार आला. पंजाब बाहेर पंजाबी संगीत बहूतेक ९० च्या दशकात पॉप अल्बम्स मधून प्रसिद्ध झाले. ते अल्बम करणारे काही गायक ( गुरदास मान वगैरे )चमकिला च्या काळातलेच होते. जर चमकिला ला मारले नसते तर नंतर च्या काळात कदाचित आपल्याला वेगळे पंजाबी गाणी ऐकायला मिळाली असती किंवा त्याने वेगळी गाणी गायली असती का?
त्याची बहूतेक प्रसिद्ध गाणी चावट अर्थांची आहेत. पण त्याचा आवाज, तुंबी वाजवणे जुन्या पंजाबी लोकगीत गाणाऱ्या गायकांची आठवण करून देणारे आहे.

गाण्यांच्या अर्थावरून इतका गोंधळ का झाला असावा हे कळत नाही. तश्या अर्थाची गाणी मी लेडी संगीत मध्ये बायकांना गाताना ऐकलेय नेहेमी. कित्येक पारंपरिक बायकांची गाणी अशीच असतात. लग्नामध्ये बायका ही गाणी म्हणतात, त्यावर नाचतात. मी आमच्या घरातल्या लग्नांमध्ये शेजार पाजार च्या बायकांकडून ऐकली आहेत अशी गाणी, अगदी घरातल्या बायका/ पुरुषांची नावे त्यात गुंफून गाताना पण ऐकले आहे.

छान पोस्ट अल्पना
चमकीला बघावा की नाही विचार करत होतो.
कपिल शो मध्ये त्यांना पाहिले होते. पण ट्रेलर बघून अंदाज येत नव्हता नक्की कसा असावा..

आम्ही पहिल्याच दिवशी पहिला. नवऱ्याने लागोपाठ दोन वेळा बघितला. आधी एकट्याने दुपारी बघितला. मग मला बघायचा होता म्हणून परत संध्याकाळी माझ्यासोबत बघितला. मला चित्रपट बघताना तो इम्तियाज अलीचा आहे हे मला माहित नव्हते. चमकील्याचे नाव आणि दिलजीत मूळे बघितला मी. आवडला म्हणून नंतर दिग्दर्शक आणि संगीत कुणाचे हे बघितले.

ओके, सुनिधी Lol तो सीन मस्तच आहे.
बस सुटते तेव्हा दीपक आणि फूलचा मागून शॉट आहे, त्यात दीपकने तिचा हात मागे धरून ठेवलेला असतो, ते पण आवडलं मला.

जया हीच ला ले ची प्रोटॅगनिस्ट आहे. तिचा चेहरा पहिल्यांदा स्क्रीनवर दिसतो तेव्हा मला ती जामतारामधली ट्यूशन्स घेणारीचं काम करणारी अ‍ॅक्ट्रेस वाटली होती. (राधिका पनवर). पण ही वेगळीच आहे.

या ओटीटीमुळे पुढे आलेल्या मुली छान आहेत, अ‍ॅक्टिंग एस, कॅमेरा फ्रेन्डली, कोणत्याही पॅकेजचं ओझं नसलेल्या. 'गन्स अ‍ॅन्ड गुलाब्ज'मधली शाळा मास्तरीणही अशीच मला खूप आवडली होती. तिच्या डोळ्यांत एक स्पार्क आहे.

लापत लेडीस छानच आहे. पण हे लक्षात ठेवायचे की ही बिहार युपीची सॅनिटाइज्ड वर्जन दाखवली आहे. मला पूर्ण पिक्चर आव ड ला. पतीला स्टेशन वरची ब्रेड पकोडा वाली परफेक्ट आहे. तिला जीवनाचे मर्म समजले आहे.

फेस नही तो माने की पहचान ही नही. ... चाय ... > हा महान होता ! परत रीवाईंड करून ऐकला. असे पंचेस जबरदस्त आहेत सिनेमात.

तिचा चेहरा पहिल्यांदा स्क्रीनवर दिसतो तेव्हा मला ती जामतारामधली ट्यूशन्स घेणारीचं काम करणारी अ‍ॅक्ट्रेस वाटली होती. (राधिका पनवर). >> +१ तू एकटीच नाहीस ते वाटलेली.

गाण्यांच्या अर्थावरून इतका गोंधळ का झाला असावा हे कळत नाही. >> माझ्या मते तशी गाणी पब्लिकली गाण्याबद्दल गोंधळ घडवला होता . इतरही तशीच गाणी गात होतेच पण चमकिलाच्या मेजर यशामूळे ईश्यू बनवला गेला होता.

लापता लेडीज आणि चमकीला दोन्हीही मलाही फार आवडले.
चमकीला या खर्‍या गायकाबद्दल मलाही अजिबातच माहिती नव्हती. थोडं गूगल केलं तर केवळ वाह्यातच नाही, पण राजकीय भाष्य करणारी गाणीही त्याने सादर केली होती असं दिसलं. कदाचित त्याचा, आणि असामी म्हणाला तसं त्याला मिळालेल्या अभूतपूर्व (अजूनही त्याचे हायेस्ट सेलिंग रेकॉर्ड्स कोणी मोडलेले नाहीत म्हणे!) यशाचा भाग असावा त्याच्या हत्येमागे.
इम्तियाज अलीने त्याच्या निमित्ताने पब्लिक सेन्सॉरशिपच्या अजूनही (दुर्दैवाने) रिलेव्हन्ट असलेल्या मुद्द्याला वाचा फोडली आहे.
दिलजीतचं कास्टिंग परफेक्ट आहे, त्याने फार मस्त काम केलं आहे.

मला आणखी एक गोष्ट नोंदवावीशी वाटते ती म्हणजे फीमेल सेक्शुआलिटीची परफॉर्मिंग आर्ट्समधून दिसून येणारी अभिव्यक्ती. बायकांच्याही शारीरिक गरजा, आवडीनिवडी, डिमान्ड्स, अगदी हट्टसुद्धा असू शकतात हे नाकारण्याकडे किंवा झाकून ठेवण्याकडे सहसा गाण्या/चित्रपटांचा कल असतो. अशा बाबींचा स्पष्ट उच्चार करणार्‍या स्त्री व्यक्तिरेखा एकदम तवायफ/तमासगीर नाहीतर व्हॅम्प्सच असतात, बाकी सगळा 'हृदयी अमृत नयनी पाणी' मामला असतो. (पटकन आठवलेले सणसणीत अपवाद - मालवून टाक दीप, तरुण आहे रात्र इ.)
त्याने शरीरसुखाची मागणी करायची आणि तिने निदान वरकरणी नको नको म्हणत मग कसंबसं तयार व्हायचं! ('पास आओ ना, जाने दो ना' इ.)
अगदी शास्त्रीय-उपशास्त्रीय चिजांमध्येसुद्धा 'पिया गये परदेस' हीच रड असते, आणि मग त्याला तिथे कोणी सौतन भेटेल का ही भीती! का बुवा, मागे घरी राहिलेली बाई तिच्या गरजा भागवायचे मार्ग शोधू शकत नाही का?!
तर 'चमकीला'मधल्या 'नरम कालिजा'ने या वृत्तीला 'दरअसल मेरे लिये तू ऐश का सामान है' म्हणत एक भारी मिश्किल पण खणखणीत शह दिला आहे ते मला फार आवडलं!

स्वाती, साधारण अशीच भूमिका 'देढ इश्किया' मधे हूमा कुरेशीची पण आहे. अगदी नॉटी, नो स्ट्रिंग्स अटॅचड् टाईप.

चमकिला, अजून बघायचा आहे.

हृदयी अमृत नयनी पाणी >>> Lol सगळी पोस्ट भारी आहे. चमकीला पिक्चर अजून पूर्ण पाहिला नाही पण बाकी पोस्टला +१००

हुमा कुरेशी मला देढ इश्किया मधली आठवत नाही. समहाऊ गँग्ज ऑफ वासेपूर मधलीच लक्षात आहे. नवाज बरोबर त्रिशूल बघायला जाणारी.

'पिया गये परदेस' हीच रड असते, आणि मग त्याला तिथे कोणी सौतन भेटेल का >>> यावरून ते "नदी नारे ना जाओ श्याम" गाणे आठवले जुने. नदी जवळ जाउ नको वरून ती एकदम येताना सौतन आणू नको पर्यंत पोहोचते Happy

मी इथे की कोठेतरी लिहीले होते - स्त्रिया स्वतःच घराबाहेर पडू लागल्या त्याने एक तो सगळा सैय्या गये परदेस्/सावन आया वो नही आये प्रकार गाण्यांतून बंद झाला. आता ती गाणारी स्वतःच परदेस जाउ लागली. (ही सामाजिक कॉमेण्टरी नव्हे - अर्ध्याहून अधिक भारतात किंवा त्या लाले मधल्या भागांत अजूनही बायका तेथेच आहेत वगैरे माहीत आहे Happy )

तरूण आहे रात्र अजूनही मधे निदान रोमॅण्टिक फॅक्टर आहे. पण मालवून टाक दीप इतके सात्विक आहे की अमिताभ मोठा होण्याआधी त्याचे पालक विग लागून तरूणपणा फोर्सफिट केलेली रोमॅण्टिक गाणी गातात तसे ते आधीच्या पिढीचे वाटते Happy

नवरा जे सांगतो त्यावरून खलिस्तानी लोकांनी त्याला विरोध केला. त्याकाळी पंजाब मधलं वातावरण खूपच विचित्र होते. खलिस्तानी अतिरेक्यांनी मारणं किंवा पोलिसांनी उचलून नेणं हे दोन्ही खूप कॉमन होते.
थोडी राजकिय भाष्य करणारी गाणी पण गायली होती त्याने. त्या काळात असे राजकीय भाष्य करणारे कलाकार कमीच होते तिथे.

>>> नदी जवळ जाउ नको वरून ती एकदम येताना सौतन आणू नको पर्यंत पोहोचते
हो ना!

>>> तरूण आहे रात्र अजूनही मधे निदान रोमॅण्टिक फॅक्टर आहे. पण मालवून टाक दीप इतके सात्विक आहे
त्या फॅक्टरचं नाव आशा भोसले आहे! Lol
कारण शब्द बघशील तर 'मालवून टाक दीप'चे जास्त एक्स्प्लिसिट आहेत!

>>> अमिताभचे फोर्सफिट पालक Biggrin

कसं काय केलं मी ? Lol
युवराजच्या सहा सिक्स बसल्यावर त्यालाही असंच वाटलं असेल का ?

Lol ते जास्त फॅसिनेटिंग आहे! Wink
'क्ल्पि' अशी वेलांटी न देता 'क्स्प्लि ' अशी त्या जोडाक्षराच्या शेवटच्या दांड्यावरुन पहिली वेलांटी देण्याचा अल्गोरिदम काय असेल यात ती सेक्शुअ‍ॅलिटी पडली बाजुला. Biggrin

Lol यावरून तो शब्द मी इतक्या वेळा निरखून पाहिला की तितक्या वेळा मी प्रत्यक्षात एक्स्प्लिसिट कंटेंटही पाहिला नसेल Wink

Pages