मोगरा फुलला

Submitted by अस्मिता. on 3 May, 2022 - 18:58

   रूक्मिणीचे अंगण , काय नव्हते तिथे... वेगवेगळी झाडं, वेलींच्या महिरपी, फुलांची गर्द राई. सतत निरनिराळे प्रयोग करायची रूक्मिणी, गावभरच्या लेकीबाळी हक्कानं फुलं, पानं न्यायच्या. श्रावणातल्या मंगळागौरीला तर स्वतःच्या हाताने वेण्या माळून कौतुकाने द्यायची. अंगण आणि तिच हसू कायम फुललेले असायचं. पण घरामागच्या फुलांमधे तिचा विशेष जीव,किती पसरल्यात वेली.... घरभर सुवास दरवळत असतो.
   
   रूक्मिणी काळीसावळी जरा बुटकी म्हणावी अशी, तेल लावून एक वेणी व चापूनचोपून बसवलेली साधीशी फिक्कट रंगाची सुती साडी नेसलेली. पण कधीही गावातल्या कोणी तिला निराश व दूर्मुखलेलं बघितलं नाही. सतत हसतमुख, मदतीला तत्पर व पानाफुलांत, मळ्याच्या कामात गुंतलेली....  तिचं लहानपण हालाखीच्या म्हणता येईल इतक्या गरीबीत गेलं.. ती झाली तेव्हा आईबाबाला कोण आनंद झालेला. साध्याशा भाड्याच्या दोन खोल्यांच्या घरात हे तिघं आनंदाने रहायचे, पण रूक्मिणी आठ वर्षांची असताना, आई जिथं कामाला जायची तिथल्या गच्चीवरून पाय घसरून पडली आणि..... जिथे दोन वेळंच्या पोटाच्या भरतीची मारामार तिथे महागड्या उपचारासाठी पैसे कुठून आणणार.
  
     रूकू सावरली, ती लहान व बाबाची माया अपार होती...... दुःख मागे टाकायला शिकली. बाबासोबत मोठ्याघरांच्या बागांची कामं करायला लागली. बाबा एका मोठ्या घरी जायचे, तेथील काका कित्येक वर्ष शेतकी कॉलेजात प्राचार्य होते, रूकू त्यांना 'झाडांचे काका' म्हणायची , ते रूकूला नवीननवीन रोपांबद्दल, ऋतूबद्दल, खतांबद्दल, मातीबद्दल गप्पा मारत बरीच माहिती द्यायचे. रुकूही काकांकडून अधाशी शिष्येसारखं सगळं शिकत गेली. कृतज्ञता म्हणून रुकू रोज वेगवेगळे पुष्पगुच्छं त्यांच्या खोलीत ठेवायची. काकांनाही तिचं कौतुक होतं, शेतकी कॉलेजच्या इतक्या वर्षांच्या सेवेतही कधी असा होतकरु विद्यार्थी मिळाला नाही असे ते म्हणायचे.
    
 
  रुकू मोठी होत गेली, कॉलेज जरा दूरवरच्या शहरात असल्याने व बाबांची तब्येत खालावण्याने तिचं शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहीलं. एके दिवशी साध्याशा तापाचं निमित्तं होऊन तिचा बाबा तिला सोडून गेला. यावेळी तर दैवाने सावरायलाही वेळ मिळू दिला नाही. काकाकाकूंना त्यांचे भाड्याचे खोपट हवे होते व रुकू नको होती. भावाचे भाड्याचे घर कूळ करून बळकवावे असा काकाचा विचार होता. रुकूच्या सुखदुःखाशी कुणाला देणंघेणं नव्हतं. त्यात काकूच्या बहिणीने तिच्या गावातील एका सधन, वयस्क बिजवराचे... महेशरावांचे स्थळ सुचवले. रुकूला न सांगता सवरता तिचे लग्न ठरवून काकूने गावात मिरवून घतले. गरीबाला असते ती फक्त निकड, ती इतकी मोठी असते की नीतिमत्ता व प्रेम यांना जागाच रहात नाही. रुकूने ह्यालाही नियतीची इच्छा समजून स्विकारले.
   
 
   लग्नं अगदी साधेपणाने पार पडलं, तिकडे हौस नव्हती इकडे पैसा! त्यात महेशरावांचे हे दुसरे लग्न म्हणून त्यांच्यासाठी ही फक्त एक औपचारिकता होती. घराला घरपण आणण्यासाठी त्यांच्या एका आत्याने हा खटाटोप घातला होता. महेशरावांना जवळचे कोणी नव्हते व जवळीक करण्यात रूचीही नव्हती. त्यांची पहिली पत्नी हेच त्यांचं खरं प्रेम होती, ती गेल्यानंतर त्यांनी माणसं तोडून दारूशी मैत्री केली. अर्थात हे सगळे तपशील रूकू सोडून बाकीच्यांना माहितीही असतील पण तिला सांगण्याची तसदी कोणी घेतली नाही, एवढंच काय तिला माणूस समजण्याची देखील कुणी तसदी घेतली नाही. तिचे नवीन घरात, नवीन आयुष्यात अगदी यांत्रिकपणे स्वागत झाले. थंडपणे तिही नियतीला सामोरं गेली.
     
    दुसऱ्या दिवशी घरच्या मोलकरणीने तिला घर दाखवले. नव्या सुनबाई आल्यामुळे आज तिचा शेवटचा दिवस होता. घरामागे पुष्कळ जागा होती, वेडीवाकडी वाढलेली काटेरी झाडं, सुकलेले गवत, मुंग्यांची वारुळं, फरश्यांचे तुकडे व अर्धवट टाकलेल्या बांधकामाचे सामान होते. रूकूने नवीन आयुष्याची सुरुवात बागकामापासून करण्याचे योजिले. साफसफाई करण्यात तिचा बराच वेळ जायचा , पण घरी ती आणि महेशराव दोघंच असायची, महेशराव कामानिमित्ताने दिवसभर बाहेर असायचे, कधीकधी परगावीही जावे लागायचे. आल्यावरही दोन घास खाऊन, झोपी जायचे, बरेचदा ते नशेत असायचे. अशा अवस्थेत तिच्या कमी उंचीवरून, काळ्या रंगावरून ते तिचा पानउतारा करायचे, पहिल्या बायकोच्या आठवणीने मोठमोठ्याने रडायचे. हा तमाशा बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून रुकूची तारेवरची कसरत व्हायची. सकाळी महेशराव तयार होऊन तडक बाहेर निघून जायचे, जणू रात्री काही झालंच नाही. हळूहळू हे रोजचेच झाले, रुकू शांत शांत होत गेली.

     
पावसाळा आला तसा तिच्या बागेला बहार आली, तिचे कष्ट फळाला आले. 'झाडांच्या काकां'कडून तिने पुष्कळ फुलांची रोपटी आणून लावलेली होती. सुरेख फुलांनी तिच्या गडद आयुष्यात काही रंग शिंपडले. काही फळंही होती, काही रंगीत पानांची छोटी झुडपं होती.  रुकूच्या बऱ्याच ओळखीही होत गेल्या, सगळ्या गावातली लोक फुलंपानं वेचायला , रोपांची चौकशी करायला रुकूकडे यायला लागली. बघताबघता पाच वर्षे उलटली, तिच्या बागेत कित्येक बहर येऊन गेले पण आयुष्यातला एकटेपणा गेला नाहीच. महेशरावांच्या रोजरोजच्या अपमानास्पद वागणूकीने तिचे काय चुकतेय हेच तिला कळायचे नाही.

    
  आता त्यांचे पिणे व दिवसदिवस बेपत्ता रहाणे गावातल्या लोकांपर्यंत पोचले होतेच. लोकांना चर्चेला विषय मिळाला होता, काही बरी लोकही होती पण ती रुकूच्या दुर्दैवापुढे हतबल होती, चार अश्रू ढाळायची, तिची विचारपूस करायची पण तिची मदत कशी करावी हे कुणालाही कळायचे नाही. एके सकाळी बागेतली काही फुलं गोळा करून तिने महेशरावांच्या खोलीत छोट्या परडीत ठेवली. ती परडी बघून महेशरावांचा संतापसंताप झाला, त्यांनी परडी उचलून बाहेर फेकून दिली व अद्वातद्वा बोलायला सुरुवात केली. आज ते पूर्ण शुद्धीवर होते, तिच्यासारख्या गरीब व रंगरूपाने ओबडधोबड मुलीने स्वतःची लायकी विसरून असे वागणे शोभत नाही. . त्यांच्यामुळे एका गरीब अनाथ मुलीला एक आसरा मिळाला आहे. त्यांनी हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध केले आहे व ते तिला मनात कधीही पत्नीचे स्थान व मान देणार नाहीत, हेही त्यांनी बोलताबोलता स्पष्ट केले. आता मात्र रुकूची सुखी भविष्याची आशा संपली होती.  रुकू दिवसभर रडली , देवाला तिची नेमकी चूक काय हे विचारत राहीली ! असेच दिवस जात राहिले.

:
:
:
:
:
:
  

     आज आठ महिने झाले महेशराव बेपत्ता आहेत, कोणी म्हणतं ट्रकने उडवलं, कुणी म्हणतं पळून गेले, कुणी म्हणतं नशेत रेल्वेखाली आले, कुणी म्हणतं येतील नेहमीप्रमाणेच, यावेळेस थोडे जास्त दिवस घेतील, कुठं जाणारेत.... पण रुकूला माहिती आहे ते कधीही येणार नाहीत, कधीही नाही. कारण तिनेच तिची नियती व्हायचं ठरवलं होतं. त्या दिवशी 'झाडांच्या काकां'कडे नेहमीप्रमाणे ती गेली असताना, गप्पांमधे तिला ज्याच्या एका घोटानेही माणसाचा जीव जाऊ शकतो अशा एका किटकनाशकाबद्दल कळलं, 'पॅराक्वाट डायक्लोराईड' हे नाव घोकत घोकत ती घरी परतली. काही दिवसांनी हिंमत करून तिने ते आणले व घरामागच्या बागेतल्या कोनाड्यात लपवून ठेवले. ती योग्य वेळेची वाट बघत राहीली, नियतीनेही योग्य वेळ आणायला फार काळ घेतला नाही. नित्याप्रमाणे अपरात्री महेशराव झोकांड्या खात घरी आले, तिने गारगोट्या शिजवून वाढल्या असत्या तरी वरणभात वाटावा अशा बेधुंद अवस्थेत ते होते . त्यामुळे स्वयंपाकातला हा 'रूचीपालट' त्यांच्या लक्षातही आला नाही. त्यांच्या भक्कम आहाराचे तिला आज प्रथमच समाधान वाटले. आज त्यांच्या आवडीचा स्वयंपाक होता. ते पोटभर जेवले, हात धुवायला उठताना शेवटचे वाक्ताडन करायला सुरू करताच ते कोसळले. वर्षानुवर्षाच्या व्यसनाने शरीर दुर्बळ झालेले होतेच. दारू आणि किटकनाशक एकत्र येण्याने त्यांचा जीव रक्ताच्या उल्ट्या होऊन ताबडतोब गेला. मागच्या बागेत रोज रात्री थोडंथोडं खंदून रुकूने बराच खोल खड्डा केला होता. तिच्यामते हे सर्व करताना जो बुटकेपणा आणि काळा रंग महेशरावांना आवडायचा नाही , त्या बुटकेपणाने ती सहज लपल्या गेली व काळ्यारंगाने अंधारात ती त्यांच्या दृष्टीसही पडली नाही. महेशरावांचे प्रेत तिने ओढतओढत आणून खड्ड्यात टाकून दिले व वर भरपूर काळी माती टाकून खड्डा बुजवून पहाटे त्यावर मोगऱ्याचे मोठे रोप लावले. तिला फार आवडायचा मोगरा!!

     

तिच्या बाबांनी दिलेला रेडिओ , जो महेशरावांनी फेकून द्यायला सांगितला होता तरी तिने माळ्यावरील फडताळात गुंडाळून ठेवला होता, तो रेडिओ आता ती रोज संध्याकाळी लावते,  'मोगरा फुलला' गाणं लागलंय , तीही गुणगुणतेयं, नवीन लग्न झालेल्या पोरीबाळी मंगळागौरीसाठी फुलं वेचायला जेव्हा येतात तेव्हा रुकू त्यांना आवर्जून मोगरा न्यायला सांगते, मोगऱ्याची टपोरी फुलं न्यायला त्यांनाही आवडते . लोक तिच्या नशीबावर हळहळतात पण आता रुकूला तिचे रंगरूपही आवडते , तिचा आत्मविश्वासही परत आलाय. रुकूने शेतकी कॉलेजात प्रवेशही घेतलाय, तिच्या स्वप्नांसारखाच मोगऱ्याचा वेलही वरवर जातोय, बहरतोय !!!!

©अस्मिता
फोटो#साभार#मीचकी

  

  

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश रावांनी दारूची समजून ती बाटली नशेतच प्यायली असती तर जास्त बरं झालं असतं. बिचाऱ्या रुकूचे हात महेश रावांच्या खुनाचे कशाला रंगवले?( तसंही दारुड्या माणूस कधीतरी पडून मरणारच) आणि मग प्रेताची विल्हेवाट पण. हा ट्विस्ट अनपेक्षित होता, मोगरा फुलला तर खरा पण मुळाशी एवढं गिळून?
मलाही आवडली गं गोष्ट, पण रुकूला एकदम डेंजरच करून टाकलीस.

आवडली.
'चटनी " short film आठवली.

मस्त. आवडली कथा.
रुकू ने लग्न का केले त्याची कारणे पटणारी आहेत. तिने जे पाऊल उचलले त्याबद्दल तिचे कौतुक करावेसे वाटते. गुन्हा करण्याशिवाय काय पर्याय होता तिच्याकडे?

सर्वांचे आभार. Happy
राभु, धनुडी आणि धनवन्ती, Happy
अशा अवस्थेतही महेशराव कित्येक वर्षं जगू शकले असते, तिने उमेदीची किती वर्षं अशी मानसिक पारतंत्र्यात व खच्चीकरणात घालवावीत असे तिला वाटले, नियतीच्या हातात आयुष्याचे नियंत्रण देऊन वाट बघायचा तिला कंटाळा आला, परिणामी तिच्या परिस्थितीत मुक्त होण्यासाठी तिला जे योग्य वाटले ते तिने केले.

स्वस्ति, समान धागा आहे खरं Happy

खतरनाक!!!
>>>>>>तिचा आत्मविश्वासही परत आलाय.
नॅह नॉट पॉसिबल. खूनानंतर 'मानसिक असे'काहीच चांगले घडू शकणार नाही. जस्ट नॉट पॉसिबल.

एखाद्यामुळे जगणं नरक होत असेल तर आपण ते इमॅजिन पण करू शकत नाही. त्यातून सुटका होण्याचा आणखी काय मार्ग असणार ?
(शारूक सरांनी पण बाजीगर मधे असेच खून पाडले होते. पण मानसिक दृष्ट्या टण्णक राहिले ते).

असा शेवट करायला फक्त विषांचे नाव सापडणे आणि ते इम्प्लिमेंट करणे हे जरा कन्विनिअंट वाटलं. या निर्णयाला कशी आले हे पटवायला.. म्हणजे संत्रं सोलुन नको, पण धक्का बसल्यावर हाईंडसाईट मध्ये जिगसॉ जुळवता येईल असे काही लहानपणचे धागेदोरे घातले असते तर?

अशा प्रकारच्या गोष्टीत साधारण अन्याय होणारी व्यक्ती लपुनछपुन (शेतकी कॉलेजचं) शिक्षण घेते, किंवा स्वतःच्या पायावर उभी रहाते आणि मग एक जोरका झटका देते (ग्रेट इंडिअन किचन: चहा म्हणून सांडपाणी देणे, आणि कोंडून सोडून जाणे इ.)
किंवा अपघाताने व्यक्ती मरत असेल तर वाचवायचा प्रयत्न करत नाही. (ब्रेबॅ मध्ये जेसीच्या गफ्रेला नशेत उलटी होताना वॉव्हा काहीही करत नाही. हे चपखल उदा नाही पण असूदे)
इथे मोराल कंपास उलटा पालटा करायचा असेल तर तितकं सबळ कारण, थॉट प्रोसेस अशी नाही दिसली. अजुन फुलवुन हा शेवट चपखल होईल मला वाटतं. हे ब्रेकिंग बॅड नाही (नाही ना?), तिला जे योग्य वाटेल ते केलं असेल तर ठीकच आहे. पण शेवटी मला थोडा रोमॅटिसिझम वाटला (मोगर्‍याचं कनोटेशन), आणि ते जरा पचलं नाही.
सॉरी, जे वाटलं ते फ्रँकली लिहिलंय.

अलिकडे हिचकॉकच्या स्टोरिज बघती आहे त्यामुळ फार धक्का बसला नाही. पण मोगर्‍याचा संबध जरा ओढून ताणुन लावल्या सारखा वाटला.

मला आवडली कथा. प्रचंड कडेलोट झाला असला पाहीजे रूकूचा.

या अनुषंगाने दोन गोष्टी आठवल्या. एक नारायण धारपांची आहे. नाव आठवत नाही. त्यात असाच एक नवरा बायकोशी वाईट वागत असतो, मग त्याचं अफेअर होतं आणि तो बायकोला मारून टाकायचं ठरवतो. पण बायकोला शंका येते आणि तीच त्याला कोंडून घालून मारून टाकते. या गोष्टीत तिने स्वतःच्या मनाची समजूत घातलेली असते की खोलीत कोंडलेली व्यक्ती वाईट आहे. ती स्वतःचा नवराच आहे ही माहिती तिच्या मनाने सप्रेस केलेली असते.
दुसरी गोष्ट आठवली ती 'द सिक्रेट विंडो'. Stephen King ची. अर्थोअर्थी या कथेशी त्याचा काही संबंध नाही. पण माणसाला पुरून वर झाड लावण्याशी आहे. म्हणून आठवली.

>>>>>>या अनुषंगाने दोन गोष्टी आठवल्या. एक नारायण धारपांची आहे. नाव आठवत नाही. त्यात असाच एक नवरा बायकोशी वाईट वागत असतो, मग त्याचं अफेअर होतं आणि तो बायकोला मारून टाकायचं ठरवतो. पण बायकोला शंका येते आणि तीच त्याला कोंडून घालून मारून टाकते. या गोष्टीत तिने स्वतःच्या मनाची समजूत घातलेली असते की खोलीत कोंडलेली व्यक्ती वाईट आहे. ती स्वतःचा नवराच आहे ही माहिती तिच्या मनाने सप्रेस केलेली असते.

एकदम सुरेख कथा आहे ती. माझ्याकडे पुस्तक आहे बहुतेक खेकडा.

माझ्याकडे पुस्तक आहे बहुतेक खेकडा. >>> खेकडा मतकरींची आहे. पण मला हे पुस्तकही आवडतं Happy
मी म्हणते आहे ती गोष्ट धारपांची आहे. पण काही केल्या नाव आठवेना. आता माझंच कन्फ्युजन होतंय की काय असं वाटायला लागलं Proud

मस्तच कथा

नाही धारपांची बरोबर आहे.>>नाही मतकरींची च आहे खेकडा,त्यात एक अधू मुलगी असते,आई नसते बाबाच एका बाईवर प्रेम असतं आणि ती बाई या मुलीला खेकडा म्हणत असते,एके दिवशी बाईने हट्ट केल्यामुळे बाबा आपल्याच मुलीला मारून टाकतो,शेजारच्या मुलाच्या लक्षात येतं सगळं आणि तो घरभर खेकडे सोडतो यांच्या आणि ती बाई घाबरून मरते अशा अर्थाची आहे ती कथा

आदू आरेमडी, बंद दार कथेबद्दल बोलतायत. इथे अवांतर होतय म्हणुन गप्प बसते. पण त्यांना जी कथा म्हणायची आहे ती मला माहीत आहे. ती आहे नारायण धारप यांची 'बंद दार' कथा.
>>>>>>>असाच एक नवरा बायकोशी वाईट वागत असतो, मग त्याचं अफेअर होतं आणि तो बायकोला मारून टाकायचं ठरवतो. पण बायकोला शंका येते आणि तीच त्याला कोंडून घालून मारून टाकते.
या कथेबद्दल विषय चालला होता.
-------------------------
तुम्ही जी खेकडा कथा म्हणताय तीही मी वाचलेली आहे.
मी तुम्हाला ती कथा (= बंद दार) पाठवणार होते ईमेलने पण तुम्ही ती सुविधा बंद केलेली आहे.

जरुर.
---------
पाठवली आहे.

छान कथा आहे. आवडली Happy
अमितव यांचा प्रतिसाद वाचल्यावर तो ही पटला. लेखकात/लेखिकेत पोटेंशिअल असेल तरच असे प्रतिसाद मिळतात.

>>>>>>>लेखकात/लेखिकेत पोटेंशिअल असेल तरच असे प्रतिसाद मिळतात.
अस्मिता, रुपाली, बिपिन सांगळे, सांज अन्यही बरेच आवडते लेखक आहेत माझे. कथाप्रकार सबळ रीतीने, उत्तम रीतीने हाताळणारे.

सर्वांचे आभार, सगळे प्रतिसाद आवडले. Happy
सामो, रमड आणि आदु, प्रतिसादांतली चर्चा आवडली, यांपैकी कुठलीही कथा मी वाचलेली नाही पण उत्सुकता निर्माण झालीये. Happy
अमित,
मला ते सगळं बिल्ड अप-स्लो बॉईल वगैरे लिहायला कादंबरी लिहावी लागली असती पण मला रिपीटेशन नको होते, शिवाय कधी एकदा मुडदा पाडू असेही झाले होते Proud , ते विष कुठलेही विष नसून हर्बिसाईड होते, तिच्या तुटपुंज्या रिसोर्सेसमधे तिला तेच उपलब्ध होत होते. ब्रेकींग बॅड नाही, मोराल कंपासही हललेला नाही, ती तीच आहे, ती फक्त मुक्त झाली आहे, एका घटनेने ती सिरिअल किलर होणार नाहीये . ब्रेबॅ चे उदाहरण आवडले पुढच्या वेळी हालहाल करून मारेन !
मोगऱ्याबाबत म्हणायचे तर ते फक्त रूपक/ प्रतिकात्मक आहे , रोमँटीसिजम किंवा जाणूनबुजून जोडलेले नाही, तिला बागकामाची आवड आहे हे लिहिलेले आहेच, त्यामुळे मोगऱ्याऐवजी निशिगंध, प्राजक्त, झेंडू, धोतरा काहीही चाललं असतं!

Pages