रेसिस्ट..?
मानस बोलायला तोंड उघडतच होता, तर मयूरीचा चा फोन वाजला.
“तो फोन बंद ठेव बरं तू. चार आठ दिवसांनी भेटायचं, तर ती फोन ची टिंग टिंग नको..”
“अरे, चेक तर करू दे.. महत्त्वाचा नसेल, तर नाहीच घेत मी..” मयूरी पर्स मधून फोन काढता काढता म्हणाली.
दोघांच्या कामाच्या वेळा सांभाळून रोज भेटणं तसं शक्यच नसायचं त्यांना. वीकएंड ला कधी मानस त्याच्या गावी जायचा.. तर कधी मयूरी तिच्या घरी जायची... तेही ऑफिस मधे जास्तीचं काम नाही निघालं दोघांनाही…., त्यांच्या त्यांच्या ऑफिस मध्ये तर...... मग कधीतरी असं ठरवून, आठवड्याच्या मधल्या वारीच भेटायची ती दोघं. चांगली तीन चार वर्षे त्यांची मैत्री होती, पण ‘अजून एक दोन वर्षे तरी लग्न नको..’ असं दोघांनीही ठरवलं होतं. जरा आधी एकमेकांना आणखी समजून घेऊया.. घर बिर घेऊया स्वत:च .. मग बघू लग्नाचं असं म्हणत..
“आईचा फोन आहे.. घ्यायलाच पाहिजे.. नाही तर मग ती उगाच काळजी करत बसते.. आटपते लवकर.. ” आन्सर ला स्वॅप करत मयूरी म्हणाली.
“हॅलो आई.. बोल.. काय म्हणतेस..?”
“काही नाही.. बाहेर आहेस का तू..? कामात असशील तर नंतर..”
“बोल गं तू.. आता केलाच आहेस फोन, तर सांग.. काय झालं..?”
“अगं.., जरा महत्वाचं सांगायच होतं.. म्हणजे तशी तू काळजी नको करूस.. पण..”
“आता सांगणार आहेस का पटकन..? काय झालं ते..?”
“अगं.., अभीचं लग्न मोडलं..”
“अरे..! असं अचानक.. काय झालं.. नीट सांगशील का..?” तिने मानस ला कॉफी ची ऑर्डर द्यायची खूण केली. ‘जरा वेळ लागेल..’ खुणेनेच तिने त्याला सांगितलं.
“तसं म्हणशील तर, अचानक नाही झालं काही.. गेले काही दिवस सगळं धुमसतच होतं.. पण आम्हाला वाटलं.., आधी अभि लाच नक्की काय वाटतं, ते ठरवू दे.. म्हणून मग मी पण काही बोलले नाही..”
“जे होतं ते चांगल्या करताच होतं.. पण का ठरवलं त्याने असं..?”
अभी, मयूरीचा भाऊ. तिच्यापेक्षा चांगला पाच वर्षांनी मोठा. मयूरीने इतक्यात लग्न नाहीच करणार असं घरी जाहीर केल्यावर, मग अभी करता स्थळ बघायला सुरवात झाली घरी. तसंही त्याचं लग्नाचं वय उलटून चाललं होतं. त्याने आपली आपली शोधली असती, तर सगळ्यांना आवडणारच होतं. पण नाही मिळाली त्याला कुणी. मग अगदी शिस्तीत वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवलं, आणी स्थळ बघायला सुरवात केली. चार महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न ठरलं होतं. अगदी चहा पोह्याचा कार्यक्रम करून. घाई नव्हती.. पण नोकरीत चांगला सेटल होता.. वय वाढत होतं.. तर आता मात्र करायला हवं लग्न.. बघूया.. कसं होतंय ते .. जमलं तर.. म्हणत मुली बघायला सुरवात झाली होती.
मुलगी अन तिचे आई बाबा असे तिघेही आले होते त्यांच्या घरी. तशी ती होती कल्याण ला राहणारी .. पण एका लग्ना करता म्हणून ती लोकं अनायसे नाशिकला आलीच होती, तर मग मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ या… म्हणून मग आले होते घरी. घरच्या मोठ्या माणसांच आधी फोन वर अगदी बेसिक बोलणं.. कौटुंबिक माहितीची देवाण घेवाण झालीच होत. मयूरीही गेली होती तेव्हा घरी.
“अगं आता काय काय सांगायचं..? बघण्याचा कार्यक्रम तुझ्यासमोर झाला, तेव्हाच ह्या दोघांचाही होकार झाला होताच...” आई सांगत होती..
“हो ना.. खरं सांगायचं तर मला तेव्हाही वाटलं होतं, किती घाई होतेय ह्या सगळ्याची..” मयूरी म्हणाली.
“अभी ला मुलगी शिक्षण अन् रंगरुपानी आवडली होती.. तो म्हणाला होता, घरदार.. कुटुंब.. मुलगी.. सगळं बरं वाटतंय.. लग्नाला वेळ आहे तोवर अजून भेटणं बोलणं होईलच.... तो तिला करायचा खूपदा फोन..”
“मग..?”
“अगं, ती बरेचदा फोन उचलायचीच नाही... मग तिला वेळ सोईची नसेल, असं वाटून तो आधी मेसेज करायचा तर ती रीप्लाय पण नाही द्यायची त्याला फारसा.. त्याने तिला खूपदा विचारलं, तिला केव्हा वेळ असतो ते.. पण ती क्वचितच उत्तर द्यायची.. मग अभी कडून मला हे कळल, तेव्हा वाटलं, हे लग्न कदाचित तिच्या मनाविरुद्ध असेल.. म्हणून मग मी तिच्या आईशी बोलले.. तर त्यांनी नाकारलंच सरळ, तिचं असं वागण वैगेरे.. .. सगळं तर ठीक ठाक आहे म्हणाल्या.. ”
“बरं.. मग काय झालं..? पुढे कुठे माशी शिंकली..?”
“तिचं तसंच वागणं कायम राहिलं.. अभी भेटायला येतो म्हणाला, तर ती सरळ वेळ नाही म्हणाली.. तो खूपच अस्वस्थ होता.. मग मीच तिला काल फोन केला.. विचारलं नीट.. तर वसकन ओरडलीच.. म्हणाली, तुम्हाला नको असेल तर मोडा लग्न मग..”
“बापरे.. डेंजरच म्हणायची..”
“हो ना.. मग आम्ही बोललो तिच्या आई वडिलांशी परत आज सकाळी.. ते खूप उडवाउडवी चं बोलत होते.. मग सरळ मोडलंच आम्ही .. काय करणार नं ..?”
“अगदी बरं झालं आई. लग्न झाल्यानंतर काही होण्यापेक्षा आधीच ते मोडलेलं बर.. उलट अभीचं पुढंच दु:ख्ख वाचलं म्हणायच. खरं सांगू का आई..? एकतर खूपच घाई झाली होती हे सगळं ठरवायची.. आणी मला तर तेव्हाही ती मुलगी खूप आवडली नव्हती. पण अभी ला आवडली म्हंटल्यावर.. मी काही बोलले नाही.. उगाच मध्ये खोडा नको म्हणून.. कसला मुस्लिम लुक होता नं तिचा..”
“हल्ली कठीण झालय गं... मुली शोधणं.. पूर्वी सारखं लग्नात लग्न जमत नाहीत आता... तरुण मुलं मुली येतातच कुठे आता नात्यातल्या लग्नाला.. ? सगळे आपले, आपापल्या करिअर मध्ये गुंतलेले.. कुणालाच वेळ नसतो असे नात्यातले कार्यक्रम अटेंड करायला.. ”
“तू नको काळजी करूस आई.. होईल सगळं ठीक.. मी रात्री करते परत फोन.. चालेल..?” मयूरीने विचारलं.
“ठीक आहे.. बोलू सावकाश.. तुला ही बातमी द्यायची होती.. अगदीच राहवेना.. म्हणून आता फोन केला.. बोलू मग.. ” आईने फोन कट केला.
मयूरीने पर्स मध्ये फोन ठेवत कॉफी चा कप हातात घेतला. मानस च्या चेहऱ्यावर प्रचंड संताप दिसत होता.
“अरे, अभी चं लग्न मोडलं, म्हणून आईचा फोन होता.. म्हणून बोलले जराशी..” मयूरी समजुतीच्या सुरात म्हणाली.
“काय म्हणालीस तू फोनवर..?” त्याने रागानेच विचारलं.
“मी..? काय म्हणणार..? हेच.. झालं ते बरंच झालं.. आता आणखी काय बोलायचं नं..? एकदा नुसतं बघून बिघून, अशी कुठे ओळख होते का कुणाची..?”
“ते नाही.. आणखी काय म्हणालीस तू..? तुला ती आवडली नव्हती..?”
“अरे, हो ना. खरंच. मला समहाऊ.... ती मुलगी खरंच आवडली नव्हती. पण ज्याला लग्न करायचं त्याला आवडल्यावर आपण काय बोलायचं नं मध्ये.. अरे तुला सांगते.. कसला ड्रेस घातला होता..”
“तिच्या लूकस बद्दल काय बोललीस तू..?” मानस अजूनही रागातच बोलत होता.
“तेच सांगते.. एका लग्नाहुन आली होती ती मंडळी.. तिच्या ड्रेस वरची ती जर.. ई.....ई.. आणी माहीत आहे..? ते टिपिकल झुमके घातले होते तिने.. डोळ्यात काजळ.. हल्ली टिकल्या बिकल्या तर तसंही कुणी लावत नाही.. पण खरंच टिपिकल मुस्लिम वाटत होती..”
“हेच.. हेच.. असं बोलू कसं शकतेस तू..?”
“म्हणजे..? मला नाही कळलं.. तिचा अॅपिअरन्स तसा होता.. म्हणून बोलले मी..”
“तुला असं बोलतांना काहीच वाटत नाही? यू आर रेसिस्ट..” मानस चिडून म्हणाला.
“अरे, रेसिस्ट कसली..? मी तिच्या लूकस बद्दल बोलले.. तिचा ड्रेस सेन्स तसा.... आय डिडन्ट मीन मोअर दॅन दॅट...”
“तुला कळतय का..? तू एका कम्युनिटी बद्दल रिमार्क देते आहेस..” मानसचा आवाज चढला होता.
“कुठून कुठे जातोयस तू.. माझ्या डोक्यात असं.... कम्युनिटी वगैरे काही नव्हतं.. जस्ट जसं आपण गुजराती पद्धत म्हणतो.. बंगाली साडी म्हणतो.. तसाच मी तो शब्द वापरला..”
“ते वेगळं.. आणी हे वेगळं.. तुझा रिमार्क एका जमाती बद्दल आहे.. यू आर रेसिस्ट.. तुझ्या मनात होतं ते बाहेर आलं ..”
“तू उगाच काहीही आरोप करत सुटू नकोस.... माझ्या मनात तसलं काहीही नव्हतं बोलतांना.. किती सहजपणे आपण ब्राह्मणी स्वयंपाक.. मराठा पद्धतीचा तिखट रस्सा मटण.. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट.. पंजाबी ड्रेस .. असे शब्द वापरतो.. त्याच सहजतेने मी.. तिच्या फक्त दिसण्याबद्दल हा शब्द वापरला.. तू पराचा कावळा करतो आहेस..” आता मानसीही चिडली होती..
“जे आपल्या डोक्यात असतं.. मनात असतं.. तेच असं बाहेर पडतं कधी तरी.. मला नाही वाटत तुझे विचार पूर्ण बॅलेन्स्ड आहेत.. मी इतके दिवस तुला ओळखलंच नाही, असं वाटतंय मला..” मानसच्या संतापाचा आवेग अजून तसाच होता.
“मी तरी कुठे ओळखलं होतं तुला.. माझ्या इतक्या साध्या.. निरूपद्रवी वाक्याचा, तू एवढी टोकाचा विचार करशील.. असं मला तरी कधी कुठे वाटलं होतं..” मयूरी कडवटपणे म्हणाली.
“तुला हे सगळं क्षुल्लक आणी निरुपद्रवी वाटणं.. हे तर माझ्या दृष्टीने आणखीच भयानक आहे.... म्हणजे तुला सिरियसली विचारच करायचा नाही कशाचा..”
“नाही करायचा. कारण माझ्या मनात काही वाईट नव्हतच.. माझं बोलण सहज होतं...” मयूरीही आता हट्टाला पेटली होती.
“मला वाटतं, आपण यापुढे भेटणं थांबवू या.. माझ्या आयुष्यात रेसीझम ला जागा नाही.. आणी ह्या बाबत कॅज्यूअल अॅटीटयूड मला मान्य नाही.. ” मानस उभा राहिला.
“मलाही तसच वाटतंय.. माझ्या मनात नसलेले विचार.. माझ्यावर लादणं.. माझं सहज बोलणं एवढं अवघड करून घेणं.. तुझं एवढं टोकाचं वागणं.. मलाही सहन नाही करता येणार..” कडवटपणे मयूरीने त्याच्याकडे पाठ फिरवली..
पारंपरिक चहा पोह्याच्या कार्यक्रमात एकमेकांना नीट जाणून घेतलं नाही म्हणून अभिचा.. तर इतकी वर्षे बरोबर राहूनही एकमेकांना नीट ओळखलं नाही म्हणून, मानस मयूरीचा ब्रेकअप झाला होता..
********
समजा अन्य देशातून तिथे जाणार्
समजा अन्य देशातून तिथे जाणार्या व्यक्तीने ते वापरली आणि माझ्या मनात तसं काहीच नव्हतं , असं म्हटलं तर चालेल का?
>>>>
नाही चालणार
पण तेच भारतामध्ये एक मित्र आपल्या मित्राला काळ्या हाक मारत असेल तर ते रेसिजम म्हणाल का? ते व्यंगावरून चिडवणे होईल. ते ही चूकच. पण त्याला रेसिजम म्हणता येणार नाही.
मला तर प्रश्न पडलाय मानसला
मला तर प्रश्न पडलाय मानसला रेपिस्ट का म्हणू नये?
लग्नाचे वचन दिले. सोबत फिरला. शारीरीक जवळीक साधली (हे गृहीत धरूया) आणि मग मन भरल्यावर खुसपट काढून लग्न मोडले.
पचायला जड आहे, पण आपण जेवढी
पचायला जड आहे, पण आपण जेवढी दुनिया बघितली असते त्यावरूनच आपले विचार तयार झाले असतात. आपण तेच निकष पकडून समोरच्याला जोखत असतो>>>>
सत्य. माय्बोलीवर हे जोखणे पदोपदी दिसते.
मानसला रेपिस्ट का म्हणू नये?>
मानसला रेपिस्ट का म्हणू नये?>>> नाही म्हणु शकत.तिची मर्जी कंसेंट असणार.
कथा नेहमीप्रमाणे छान..!
कथा नेहमीप्रमाणे छान..!
मानसने एवढ्या आततायीपणे आपलं म्हणणं न मांडता संयतपणे मयुरीला सांगायला हवं होतं. असं वाटलं. कदाचित तिने ते पटवून घेतलंही असतं.. तिने स्पष्टीकरण देऊनही त्याने नातं तोडलं म्हणजे त्याच्याकडे समंजसपणाचा अभाव असावा हे जाणवतं.
मला तर प्रश्न पडलाय मानसला
मला तर प्रश्न पडलाय मानसला रेपिस्ट का म्हणू नये?
लग्नाचे वचन दिले. सोबत फिरला. शारीरीक जवळीक साधली (हे गृहीत धरूया) आणि मग मन भरल्यावर खुसपट काढून लग्न मोडले>>>>
कथेत जितके आलेय तितकेच गृहीत धरुन बोललेले बरे ना? मयुरीला लग्नाची घाई नाहीय म्हणुन भावासाठी स्थळे बघुन त्याचे लग्न ठरवले हे आलेय कथेत.
मागे माझ्या समदानी धाग्यावरही
मागे माझ्या समदानी धाग्यावरही कोण्यातरी महाशयांनी हिरीरीने वाद घालून धागा भरकटवलेला. ते नंतर कधीही दिसले नाहीत. काय झालं माहीत नाही, ना करुन घ्यायची गरज वाटते.
बाकी धेडगुजरी हा शब्दही रेसिस्ट आहे. पूर्वी मी सर्रास वापरे पण कळल्यानंतर वापरणे कटाक्षाने बंद केले.
ब्लॅक आणि व्हाईट रेसिस्ट शब्द
ब्लॅक आणि व्हाईट रेसिस्ट शब्द आहेत? इकडे सर्रास बोलतात ब्लॅक, ब्राऊन किंवा व्हाईट...
>>>>>>>>ब्लॅक आणि व्हाईट
>>>>>>>>ब्लॅक आणि व्हाईट रेसिस्ट शब्द आहेत? इकडे सर्रास बोलतात ब्लॅक, ब्राऊन किंवा व्हाईट...
अगदी!
ती चांभार चौकशा करते.
ती चांभार चौकशा करते.
तो कसला चिक्कु मारवाडी आहे.
हे पुर्वी होते बोलण्यात. आता नाहीत.
https://youtu.be/mUvdXxhLPa8
https://youtu.be/mUvdXxhLPa8
ब्लॅक आणि व्हाईट रेसिस्ट शब्द
ब्लॅक आणि व्हाईट रेसिस्ट शब्द आहेत? इकडे सर्रास बोलतात ब्लॅक, ब्राऊन किंवा व्हाईट...
>>>नाही. ब्लॅक व्हाईट आणि ब्राऊन रेसिस्ट समजले जातात असे आजिबात वाटत नाही.
>>>>>ती चांभार चौकशा करते. तो
>>>>>ती चांभार चौकशा करते. तो कसला चिक्कु मारवाडी आहे. हे पुर्वी होते बोलण्यात. आता नाहीत.
होय!! अगदी खरे आहे.
'सिंधी मे क अप' म्हणजे आंघोळ न करता वर वर लितापोती, रंगरंगोटी - हे मी आता बोलत नाही पूर्वी बोललेले पण तेव्हा ते अन्यायकारक आहे हे कळत नव्हते.
सावळा गोंधळ - देशस्थी कारभार. - चूकीचे आहे हे.
खरंच किती सवयीने बोलून जातो
खरंच किती सवयीने बोलून जातो आपण... मनात तेव्हा रेसिझम वैगेरे असतोच असं नाही....
पण बोलतांना शब्द जपून वापरायला हवेत हे खरं...
ऐकणाऱ्यानेही स्वतःच्या मनातलं लादू नये दुसऱ्यांवर.
नाही म्हणु शकत.तिची मर्जी
नाही म्हणु शकत.तिची मर्जी कंसेंट असणार.
>>>
तो लग्न करणार हे गृहीत धरून असू शकते.
मागे मायबोलीवरच बहुधा असे वाचलेले की लग्नाचे वचन देऊन फसवले तर तो कायद्याने गुन्हा ठरणार.
कथेत जितके आलेय तितकेच गृहीत धरुन बोललेले बरे ना?
>>>>>
ते ही खरेय. आजच्या काळात थोडीफार जवळीक होतेच सहसा म्हणून गृहीत धरले. पण शारीरीक जवळीक असो वा नसो तरी भावनिक गुंतवणूक असणार. लग्न असे अचानक तुटले तर चार लोकांना ऊत्तर द्यावे लागते. काय देणार? सीतेला अग्नीपरीक्षा द्यावी लागते असा आपला समाज आहे. भले आजची सीता समाजाला फाट्यावर मारणारी का असेना, पण त्याने समोरच्याची तडकाफडकी नाते तोडायची चूक कमी होत नाही.
असो,
शीर्षक रेसिस्ट आहे म्हणून एखाद्याला हा मुद्दा अवांतर वाटू शकेल. पण कथेत मला तरी हेच जास्त प्रकर्षाने ऊठून दिसले की आतातायी विचार करत नाते संपवायचा एकतर्फी निर्णय घेतला.
ती चांभार चौकशा करते >>> ओह,
ती चांभार चौकशा करते >>> ओह, यातला चांभार म्हणजे तो समाज हे आता ईथे लिहिले गेले म्हणून लक्षात आले. असे किती शब्द असतील एकदा स्वत:शीच चेक करायला हवे..
असे सर्वच शब्दात जात शोधली तर
असे सर्वच शब्दात जात शोधली तर अनेक म्हणी रद्द कराव्या लागतील.
सौ सोनार की एक लोहार की..
जर चांभार नको तर बाकी जाती/समाज/पोटजाती सुद्धा नकोतच.
रिकामा न्हावी मोरीला तुंबड्या
रिकामा न्हावी मोरीला तुंबड्या लावी
जा राजू / गोट्या / पिंटू त्या
जा राजू / गोट्या / पिंटू त्या वाण्याकडून साखर पाव किलो आणून दे पटकन असेच वस्तीत बोलले जाते की ,
त्या अमुक अमुक किराणा मालाच्या दुकानातून साखर आणायचे फर्मान निघते ?
अभिचे लग्न मयुरीने किंवा
अभिचे लग्न मयुरीने किंवा तिच्या कॉमेंट मुळे नाही मोडले, ते अभिनेच तोडले. मुलगी पाहण्यापासून लग्न ठरणे व मोडणे हे सर्व होईपर्यंत मयुरीने असे मत कोणापाशीही व्यक्त केले नव्हते .
आईबरोबर फोन वर बोलताना तिने हे मत व्यक्त केले म्हणजे ते तिच्या मनात खोलवर दडलेल्या चुकीच्या विचारसरणीतून आले? आपल्यापैकी किती जण फोनवर बोलताना इतका खोल विचार करून बोलतो? असे बोलावयाचे असलं तर प्रत्येक संभाषणात अटलजींएव्हढे पॉज येतील. (अटलजी म्हणाल्यामुळे आता मला भक्त ठरवू नका, नाहीतर मानस आणि तुम्ही सारखेच )
मानसची कृती आततायीपणाचीच आहे.
रेसिझम म्हणजे काय फक्त उच्चवर्णीयांनीच / उच्चधर्मीयांनीच इतरांच्या जाती / धर्म / व्यंग यावर बोचरे शब्द बोलणे असेच आहे का? कुणीही कुणाच्याही जात / धर्म / व्यंग (तथाकथित उच्चवर्णीयांबद्दल पण) बोचरे बोलणे हा रेसिझम असावा,
अभिचे लग्न मयुरीने किंवा
अभिचे लग्न मयुरीने किंवा तिच्या कॉमेंट मुळे नाही मोडले, ते अभिनेच तोडले. मुलगी पाहण्यापासून लग्न ठरणे व मोडणे हे सर्व होईपर्यंत मयुरीने असे मत कोणापाशीही व्यक्त केले नव्हते .
आईबरोबर फोन वर बोलताना तिने हे मत व्यक्त केले म्हणजे ते तिच्या मनात खोलवर दडलेल्या चुकीच्या विचारसरणीतून आले? >>
अभिचे लग्न मोडलं ते त्या मुलीच्या कोरड्या वागण्यामुळे.. मयूरी कदाचित तिच्या आईला समजावण्याकरता म्हणून काहीतरी बोलत सुटली असेल..
रेसिझम सारखेच एक एजिझम आहे.
रेसिझम सारखेच एक एजिझम आहे. वय वाढले की बेपर्वा तरुण लोकांच्या वृत्तीमधुन, एकंदर बोलण्यातून जाणवते.
कैच्या काय ! अ आणि अ !
कैच्या काय ! अ आणि अ !
part 2 लिहून सोडा की स्टोरी
part 2 लिहून सोडा की स्टोरी चा आणि मयु-स चं पॅच अप घडवून टाका.
part 2 लिहून सोडा की स्टोरी
part 2 लिहून सोडा की स्टोरी चा आणि मयु-स चं पॅच अप घडवून टाका.>>
कल्पना चांगली आहे. पण सध्या तरी.. मयूरी तिच्या मनात ‘तसं’ काही नव्हतं ह्यावर ठाम आहे, आणी मानस ला त्याचं काही चुकतय हे मान्यच नाही नं.. कदाचित त्याने थोडं शांतपणे घेतलं तर तो त्याची बाजू नीट समजावून सांगू शकेल तिला.. कदाचित तीही समजू शकेल....
अहो तेच तर,
अहो तेच तर,
हिंदी पिक्चर मध्ये असते तशी मयुरीची डान्स ची दीदी किंवा मानस चा जिम ब्रो /आजी त्यांची कान उघडणी करतो दाखवा
एक वेळ मानस मयुरी मनवाल तुम्ही , पण माबो वर पेटलेल्या id ना convince करायला तुम्हाला फार विचार करायला लागेल
भंगी फॅशन हे आपण जातीवाचक
भंगी फॅशन हे आपण जातीवाचक कन्सिडर करतोय. मुंबईत २५-३० मुलांच्या वयोगटात हा शब्द प्रेमभंग झालेला म्हणून भंगी या अर्थाने वापरतात. पहिल्यांदा ऐकला तेव्हा मी दचकले होते.
जातीवाचक, रेसिस्ट शब्द वापरायला(अगदी पर्सनल संवादातही) माझा विरोध आहे हे नमुद करते आहे.
माझा अनुभव सांगते. माझा एक
माझा अनुभव सांगते. माझा एक मित्र होता. 'विशिष्ट विचारधारा' असणारा. मित्र म्हणून छानच. नेहमी मदतीला तय्यार. तो सिंगल, मीपण सिंगल. तेव्हा ग्रुप मध्ये खूप चिडवाचिडवी व्हायची. पुढे तो सिरीयसच झाला
आता सगळ्यांकडून मला peer pressure त्याला हो म्हणण्यासाठी. पण मनात खटकत होतं ते. शेवटी नकार दिला. आता कधीकधी त्याचे फेबु पोस्ट बघून आणि कंमेंट्स बघून स्वतःचा अभिमान वाटतो. त्यावेळी पोलिटिकल विचारधारा जुळत नाही म्हणून नकार देणे सगळ्यांनाच फार हास्यास्पद वाटत होतं. पण माझ्यासाठी महत्वाचं होतं. मित्र म्हणून ठीके, पण नवरा नक्कोच असा, हे माझं ठाम होतं.
आस्वाद, अतिशय उत्तम निर्णय,
आस्वाद, अतिशय उत्तम निर्णय, आयुष्य सोबत काढायचं तर काय फक्त पगार, स्थैर्य अन इतर भौतिक गोष्टीच पाहणार का काय ? ! भावी इच्छूक वधुवर मंडळींनी एकमेकांचे राजकीय विचार पण नक्कीच जोखून निर्णय घ्यावा असे लॉजीकली वाटते अन तुम्ही केले ते बरोबरच होते म्हणावे वाटते आहेच मला तरी.
समहाऊ मला कथा फारच फिक्शनल
समहाऊ मला कथा फारच फिक्शनल वळणाची वाटली, दोघे बालिश वाटतात, एकीला बोलायची अक्कल नाही अन एकाला व्यक्त होण्याची नाही, अंगपिंड भरलं म्हणून लग्नाच्या वयाला आलेली बालके म्हणावी का काय ही असा प्रश्न पडला एकदम. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आणि प्रामाणिक विचार आहेत ह्या कथेवर.
Pages