ऑपरेशन गंगा

Submitted by पराग१२२६३ on 12 March, 2022 - 00:10

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती. भारताकडे परत येत असताना भारताच्या विमानांमधून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश अशा शेजारी देशांच्या नागरिकांनाही संकटग्रस्त भागातून परत आणले गेले.

भारतीयांना युद्धग्रस्त युक्रेनमधून परत आणण्याची प्रक्रिया 22 फेब्रुवारीला सुरू करण्यात आली. त्यानंतर भारतातून धाडलेली विमानं रोमानियाची राजधानी बुखारेस्ट, हंगेरीची राजधानी बुडापेस्ट, स्लोव्हाकियातील कोशित्सा (Košice), रोमानियातील सुचावा (Suceava) आणि पोलंडमधील झेझो (Rzeszów) इथून भारतीयांना घेऊन मुंबई आणि दिल्लीला परतू लागली. दरम्यानच्या काळात युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र होत गेला होता. त्यामुळे संकटग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न आणखी वाढवून 2 मार्चपासून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) ही मोहीम हाती घेतली गेली.

ऑपरेशन गंगामध्ये भारतीय हवाईदलालाही सहभागी करून घेतलं गेलं. त्यामुळं 2 मार्चपासून भारतीय हवाईदलाची सी-17 ग्लोबमास्टर-3 विमानंही भारतीयांना परत आणण्यासाठी पूर्व युरोपातील विमानतळांकडे झेपावण्यास सुरुवात झाली. भारतीय हवाईदलाने या मोहिमेत भाग घेतल्यावर सी-17 विमानांनी भारतातून जाताना संबंधित देशांना देण्यात येणारे मानवीय मदतसाहित्य नेण्यास सुरुवात केली. भारत आणि या देशांदरम्यानचे हवाई अंतर सुमारे 4,800 किलोमीटर आहे. पण हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सी-17 विमानांना जाताना-येताना जास्त अंतर कापावे लागले.

संकटग्रस्त प्रदेशातून आपल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्याची ऑपरेशन गंगा ही भारताने राबवलेली काही पहिलीच मोहीम नव्हती. त्याआधीही कित्येक वर्षांपासून भारत अशा मोहिमा यशस्वीपणे राबवत आला आहे. ऑपरेशन गंगाच्या निमित्ताने त्यापैकी भारतीय हवाईदलाचा सहभाग असलेल्या मोहिमांचाच या लेखात उल्लेख केला आहे. भारतीय हवाईदलाने यापूर्वी 2015 आणि 2016 मध्ये अनुक्रमे येमेनसाठी (ऑपरेशन राहत) आणि दक्षिण सुदानसाठी (ऑपरेशन संकट मोचन) राबवली होती. ‘ऑपरेशन राहत’च्यावेळी भारताने आपल्या नागरिकांबरोबरच अमेरिका आणि कॅनडासह 23 देशांच्या नागरिकांचीही सुटका केली होती. त्याआधी 1990 मध्ये पहिल्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या विमानांच्या मदतीने कुवेतमधून 1 लाख 70 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मायदेशी परत आणले होते. त्यामध्ये भारतीय हवाईदलाचे वैमानिकही सहभागी झालेले होते. कमीतकमी कालावधीत परदेशातून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणत्याही देशाकडून राबवली गेलेली ती जगातील आजपर्यंतची सर्वात मोठी हवाई मानवीय बचाव मोहीम ठरली आहे. त्यानंतर 2011 मध्ये लिबियात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सेफ होमकमिंग (Operation Safe Homecoming) राबवले गेले होते.

‘लाल सेने’च्या माघारीनंतर 1992 मध्ये अफगाणिस्तानातील राजकीय परिस्थिती अतिशय बिघडली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाईदलाने आपत्कालीन मोहीम राबवून ‘एएन-32’ विमानाने काबूलमधील भारतीय राजदूत आणि त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुरक्षित सुटका केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये नाटोने (NATO) अफगाणिस्तानची सूत्रं तालिबानकडे देण्याची घोषणा केल्यावर तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाईदलाने ऑपरेशन देवी शक्ती राबवले होते.

हवामान बदलामुळे पूर, चक्रीवादळं, हिमस्खलन, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा जगातील सर्व देशांना वारंवार फटका बसू लागला आहे. अशा आपत्तीच्या काळात भारत परदेशांना तातडीने मदत पोहचवत आला आहे. अशा प्रकारच्या मदतीचा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपयोग होत आहे. म्हणूनच देशाबाहेर येणाऱ्या आपत्तींच्या काळात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय एकमेकांशी समन्वय राखत योजना आखत असतात.

परदेशी भूमीवर आलेली संकटे नैसर्गिक आणि मानवी अशा दोन्ही प्रकारची असू शकतात. यापैकी कोणत्याही संकटाच्यावेळी एखाद्या देशात तातडीने मदत पोहचवणे, त्या प्रदेशातून आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका करणे यांसारख्या बाबी प्रत्येक देशासाठी आपल्या हितसंबंधांचे प्रभावक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असतात. त्यातून आपल्या राष्ट्रशक्तीचेही प्रदर्शन होत राहते. भारताने डिसेंबर 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीच्या काळात इंडोनेशिया, श्रीलंका, मालदिवज् या देशांना तातडीने मदत पोहचवली होती.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_12.html?m=1

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! आताच नेपाळच्या पंतप्रधानांनी त्यांच्या चार विद्यार्थ्यांना परत आणल्याबद्दल भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानले.

हायला,
मला "ऑपरेशन गंगा " वाचून परदेस पिक्चर चा रिव्ह्यू असेल असे वाटले होते ....

मुकुंद जी, बुखारेस्टचा उल्लेख चुकून बल्गेरियाची राजधानी असा झाला होता. त्याकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.

. पण हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सी-17 विमानांना जाताना-येताना जास्त अंतर कापावे लागले. >>>>>>>>
परवानगी मागितली असती तर कदाचित मानवीय दृष्टिकोणातून पाकिस्तान ने भारतीय हवाई दलाच्या विमाने त्यांच्या हद्दीतून जाऊ दिली असती !
पण भारतीय हवाई दल पाकिस्तानातील कडव्या धर्मांध अतेरिक्यांच्या संघटनांवर विश्वास नसावा .

पराग१२२६३ , भारताचं एक क्षेपणास्त्र चुकून उडालं आणि पाकिस्तानात जाऊन पडलं. हे जरा विचित्र वाटलं. चुकून उडणार्‍या पिस्तुलाच्या गोळीपेक्षा क्षेपणास्त्रावर नक्कीच अधिक नियंत्रण असायला हवं. हे कसं झालं आणि याचे काय परिणाम होऊ श कतात याबद्दल माहिती देणारा लेख लिहाल का?

मिसाईल चुकीच्या दिशेने उडण्याची केस दिसते तितके सोपी वाटतं नाही !
भारताने दोन दिवसानंतर सॉरी बोलले , आणि पाकिस्तानला ही त्या मिसाईल ची घटना दोन दिवस कळलीच नव्हती .
पाकिस्तान च्या बाजूने जास्त आक्षेप घेतला गेला नाही याचे आश्चर्य वाटते .
तो लाल टोपी झैद म्हणतोय भारताकडे अण्वस्रे वाली मिसाईल पाठवून द्या आणि चुकून आली म्हणा !
भारतीय टेक्नॉलॉजी चे फेलुअर म्हणावे तर आपण ती म एक्स्पोर्ट देखील करतोय .
मग इथून पुढील मिसाईल मार्केट च काय होणार ?

खतरनाक रेस्क्यु-. या विद्यार्थ्यांकडून तिकिटाचे पैसे वसूल केले का? कि भारताच्या टॅक्स पेयरचा पैसा वापरलाय?