भाग ०१ - https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...
अफगाणिस्तान.
भारताच्या नैऋत्येला पाकिस्तानच्या पुढे स्थित एक देश. चहूबाजूंनी जमिनीने वेढलेला. सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाकिस्तान, चीन, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान,ताजिकीस्तान आणि इराण या देशांना अफगाणिस्तानची सीमा लागून आहे. भारताच्या पाकव्याप्त काश्मिरची सीमाही अफगाणिस्तानला लागून आहे आणि त्या अर्थाने हा देश आपलाही शेजारी आहे.
या देशाचा इतिहास अतिशय समृद्ध. इथे सापडलेल्या अवशेषांच्या कार्बन डेटिंगवरून या भागात पालिओलिथिक काळात मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हा काळ थेट अश्मयुगीन, म्हणजे तीन लाख ते तीस हजार वर्षं जुना. इथे इतकी जुनी मनुष्यवस्ती होतीच, पण या प्रांताचा पुढे भारताशीही घनिष्ठ संबंध आलेला होता. महाभारताच्या काळात या प्रांताचा - ज्याला गांधार म्हणून ओळखलं जाई - व्यापार भारतात तेव्हा अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या साम्राज्यांशी होत असे. त्यातल्या बलशाली साम्राज्याशी - हस्तीनापुराशी - रोटीबेटी संबंध जुळेपर्यंत तत्कालीन गांधार राज्याची मजल पोचलेली होती. धृतराष्ट्र पत्नी गांधारी ही याच देशाची राजकन्या. भीष्माने तिच्या पित्याशी - सुबल राजाशी - उभा दावा मांडून आपल्या सामर्थ्याने कुरु वंशीय राजपुत्र धृतराष्ट्र याचा विवाह गांधारी हिच्याशी लावून दिला होता. असं म्हणतात, की तिचे भाऊ तुरुंगात डांबले गेले तेव्हा त्यांना अन्नपाणी न देता भीष्माने त्यांना मृत्यूच्या वाटेवर सोडून दिलं होतं, पण त्यांनी आपल्या एका भावाला - शकुनी याला आपल्या या अपमानाचा बदला घेण्याची शपथ देऊन त्याला भीष्माशी तोंडदेखला सलोखा करायचा सल्ला दिला होता. पुढे कुरु वंशाचा पूर्ण विनाश होण्यामागे शकुनीचा मोठा वाटा होता.
अफगाणिस्तानमध्ये अनेक साम्राज्य जन्माला आली आणि लयास गेली. आजच्या माहितीनुसार या भागात राहणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करून सुसूत्र असं पहिलं साम्राज्य इथे ग्रीक लोकांनी आणलं. ग्रीको - बाक्त्रियन म्हणून ओळखलं जाणारं हे साम्राज्य हेलेनिस्टिक काळात प्रस्थापित झालेलं. हा काळ अलेक्झांडर द ग्रेट याच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्य स्थापन होईपर्यंतचा, म्हणजे ३२३ बीसी ते ३१ बीसी हा. पहिला दिओदोतस हा ग्रीक बक्त्रिया प्रांताचा राजा. हा बाक्त्रिया प्रांत म्हणजेच आजच्या हिंदुकुश पर्वतरांगांच्या आसपासचा म्हणजेच आजचा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान देशांचा प्रदेश. दिओदोतस याने ज्या राजाचा पराभव केला, तो होता अर्सासेस. हा तत्कालीन इराणच्या पर्थियन साम्राज्याचा सर्वेसर्वा होता. हिंदुकुश भागातल्या याच्या वर्चस्वाला चाप लावून दिओदोतस याने इथे ग्रीक वर्चस्व निर्माण केलं.
अलेक्झांडर याने स्थापन केलेल्या प्रचंड मॅसिडोनियन साम्राज्याचा एके काळच्या भाग असलेलं सेल्युसिड उपसम्राज्य पुढे वेगळं झालं ते सेलेऊकस पहिला याच्या नेतृत्वाखाली. ३२१ बीसी या काळात मेसोपोटेमिया ( आजचा इराक ) भागातून त्याने आपला वारू उधळला थेट पश्चिमेला आणि आजच्या इराण, इराक, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विस्तीर्ण भागावर आपला अंमल बसवला. अर्सासेस याने याच सेल्युसिड साम्राज्यातून आपली वेगळी चूल मांडली होती, आणि पुढे दिओदोतस याने त्याचा पराभव करून पुन्हा तिथे ग्रीक वर्चस्व आणल होतं.
पुढे ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या काळात इथे इंडो - स्कायथियन साम्राज्याचा उदय झाला. मोगा नावाच्या शूर योध्याने साका वंशाच्या लोकांना हाताशी धरून गांधार प्रांतापासून ते इंडस खोऱ्यापर्यंत आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यांना पुढे कुशाण साम्राज्याने नेस्तनाबूत केलं आणि बराच काळ अफगाणिस्तानच्या भागात त्यांचं वर्चस्व राहिलं. या काळात वेदिक धर्माचा खोलवर प्रभाव पडून अफगाणिस्तानमध्ये वेदिक चालीरीती आचरणात आल्या होत्या.
पुढे चौथ्या आणि पाचव्या शतकात हूण सम्राटांनी या भागात हातपाय पसरले. तक्षशिला स्थापन करणारे हे लोक अल्ताई डोंगरांच्या भागातले शूर योद्धे होते. त्यांच्यात युरोप, मोंगोल आणि इराणी संस्कृती आणि शारीरिक रचनांचा संगम झालेला होता. त्यांच्या काळातल्या नाण्यांवर त्यांच्या प्रतिमा साफ दाढी कोरलेल्या, गोल चेहऱ्याच्या आणि मोठ्या डोळ्यांच्या अशा आहेत. त्यांच्यानंतर ' गोरे हूण ' म्हणून ओळखले जाणारे मध्या आशियाई ' हेफथलाईट ' इथे अवतरले आणि राज्य करू लागले. त्यांच्यातल्या अल्कोन, नेझाक या उपपंथियांनी आळीपाळीने अफगाणिस्तानच्या भागावर राज्य केलं...पण पुढे सहाव्या शतकाच्या शेवटी इथे थेट तुर्कीक झुनबिल लोक आले.
ऋतबिल नावाच्या शूर योद्ध्याने ' तुर्कीक खागानेत ' साम्राज्यातून आपली चूल मांडली अफगाणिस्तानच्या भागात. हे साम्राज्य मोंगोल भागातल्या अशीना टोळ्यांच्या लोकांनी स्थापन केलेलं. मध्य आशिया भागात तुर्किक भाषा बोलणाऱ्या अनेक टोळ्या होत्या, त्यातली ही एक बलाढ्य टोळी. ऋतबिल याने आत्ताच्या कबूल ते कंदहार भागात आपलं झुनबिल राज्य स्थापन केलं ' झबुलिस्तान ' या नावाने. त्याने स्वतःला ' खोरासान तेगिन शाह ' हे बिरूद चिकटवून घेतलं. गझनी हे आजच्या अफगाणिस्तानच्या मध्य भागातलं शहर ही त्याची राजधानी.
या काळापर्यंत अफगाणिस्तानात इस्लाम धर्म विशेष प्रस्थापित झालेला नव्हता. इथे बऱ्या प्रमाणात वेगवेगळे धर्म आणि पंथ एकत्र नांदत होते. या भागात शांतता अशी नव्हती, पण त्याचं कारण होतं वेगवेगळ्या साम्राज्याच्या आपापसात चाललेल्या लढाया. अफगाणिस्तानचा भाग नेमका भारत, अरबस्तान, चीन आणि इराण यांच्या मधोमध असल्यामुळे हा भाग या प्रांतांच्या महसत्तांची रणभूमी झालेला होता. सिल्क रूट या नावाने प्रसिद्ध असलेला व्यापारी मार्ग अफगाणिस्तानमधून जात असल्यामुळे या व्यापार मार्गावर वर्चस्व प्रस्थापित करणं प्रत्येकाला आवश्यक वाटत होतं....पण आठव्या शतकात या भागात ' हिंदूशाही ' अवतरली आणि या भागात पुढे बरेच धार्मिक बदल घडले.
झालं असं, की खलिफा अल मामून याच्या नेतृत्वाखाली अब्बासिद आठव्या शतकाच्या सुरुवातीला इथे आले आणि त्यांनी तुर्कशाही संपवली. तुर्कीक शाह अब्बासीदांचे मांडलिक झाले आणि त्यांना बळजबरीने इस्लाम स्विकारावा लागला. सन ८२१ या वर्षी काबूल शाह लगतूर्मान याला त्याच्याच एका मंत्र्याने - कल्लार याने पदच्युत केलं आणि सत्ता बळकावली. त्याच्या या काबूलशाहीला अरब ' हिंदूशाही ' म्हणून संबोधू लागले.
पुढे याचेही सुन्नी पर्शियन लोकांशी खटके उडायला लागल्यावर त्याने आपल्या हिंदूशाहीचे केंद्र काबूलहून थेट उदभांदपुरा ( सध्याच्या पेशावर शहराच्या पूर्वेला ८० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे ) येथे नेलं. या काळात भारताच्या हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडून या भागात हिंदू धर्माचा प्रसार व्हायला लागलेला होता. तेव्हाच्या इराणी संशोधकाने - अल बिरूनी याने - या भागात ब्राह्मण विपुल संख्येने होते आणि इथे वेदिक विचारांचा खोलवर प्रसार झालेला होता असं नमूद करून ठेवलं आहे. काबूल, मझार - ए - शरीफ, पेशावर, इस्लामाबाद, तक्षशीला या आजच्या भागात तेव्हा हिंदू संस्कृती ही अशी रुजलेली होती.
पुढे लाविक, सफारीड, समानिड अशा सुन्नी ईराणी साम्राज्यान्नी अफगाणिस्तान आळीपाळीने आपल्या अंमलाखाली आणला, पण या सगळ्यांवर वरचढ ठरले दूर पूर्वेकडून आलेले मामलुक तुर्की. एके काळचे गुलाम असलेले हे मामलुक अतिशय लढाऊ आणि शूर. अबू मन्सूर नासीर अल् दिन सबुक्तिगिन हा तुर्की मामलुक ' गझनवी ' साम्राज्याचा पहिला सम्राट. याचाच मुलगा म्हणजे ' गझनीचा महमूद ' म्हणून प्रसिद्ध असलेला महमूद गझनवी, ज्याने आपल्या तुर्की गझनवी साम्राज्याचे एका प्रबळ आणि विस्तीर्ण साम्राज्यात रूपांतर केलं. गुजराथच्या सोमनाथ मंदिराचा विध्वंस करणारा आणि उत्तर भारतावर सतत स्वाऱ्या करून अपरिमित रक्तपात करणारा हा महमूद भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा खलनायक ठरतो. याने आत्ताच्या लाहोर शहरात आपली राजधानी थाटली होती.
११८६ साल उजाडलं ते या गझनवी साम्राज्याच्या मुळावर आलं. मोहम्मद घोरी या गझनीचा महमूद संत वाटावा अशा क्रूर स्वभावाच्या सम्राटाने आपल्या घोर साम्राज्याला गझनवी साम्राज्य जोडून घेतलं. आजच्या पश्तून लोकांमध्ये तेव्हा बुद्धिस्ट विचारांचा प्रचंड प्रभाव होता.( पाचव्या शतकात गांधार साम्राज्याच्या काळात मध्य अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतात ' बामियान बुद्ध ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाप्रचंड बुद्धाच्या मूर्त्या अखंड डोंगराच्या उभ्या भागावर कोरून तयार केलेल्या होत्या.... बौद्ध धर्म तेव्हापासूनच इथे रुजलेला होता ) घोरी साम्राज्य सुरुवातीला बौद्ध विचार मानणारं, पण गझनीच्या महमूदने १०११ साली घोरी साम्राज्यावर आक्रमण करून त्यांना सुन्नी मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला.....इतिहासाने पुढे जरी गझनवी साम्राज्याचा अंत याच घोरी साम्राज्याकडून करवून आणला असला तरी घोरी पुढे सुन्नी इस्लामधर्मीयच राहिले.
पुढे अनुष्टेगिन घरचाई नावाचा सेलजुक तुर्की सम्राटांच्या पदरी नोकरीला असलेला आणि त्यांच्यासाठी आजच्या इराणमधल्या अमु दर्या नदीच्या भागावर देखरेख करणारा मामलुक गुलाम आपल्या मालकांपासून वेगळा झाला. त्याच्या वंशजांनी बाराव्या शतकात मध्या आशियात ' अनुष्टेगिन साम्राज्य ' प्रस्थापित केलं...पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्यावर चालून आले मंगोल. आग्यावेताळ बरा वाटावा अशी ख्याती असलेला गेंघिस खान आपल्या क्रूर मंगोल सैन्यासह मध्य आशियात आला तो प्रस्थापित साम्राज्याची धूळधाण उडवून स्थिरावला. त्याचा नातू हुलागू खान यानेही आपल्या आजोबांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या काळात मध्या आशिया, इराण ते थेट कॅस्पियन समुद्राचा पूर्वेकडच्या भाग अशा सगळ्या भागावर मोंगोल साम्राज्य प्रस्थापित झालं. याच काळात इथे इस्लाम घट्ट पाय रोवून प्रस्थापित झाला.
साल १२९०.
या वर्षी खिलजी साम्राज्याने अफगाणिस्तान ते भारत अशा सगळ्या भागावर आपला अंमल आणला आणि थेट दिल्लीला आपली गादी स्थापन केली. जलाल उद् दिन फिरुझ खिलजी हा या साम्राज्याचा संस्थापक. त्याचा वारसदार होता अल्लाउद्दीन खिलजी. अर्थात त्याने हा वारसा मिळवलेला होता बंड करून. भिलसा, अवध, देवगिरी अशा अनेक समृद्ध आणि संपन्न प्रांतांवर वरवंटा फिरवून या अल्लाउद्दिनने या भागात अपरिमित रक्तपात केला. या भागातून लुटलेल्या संपत्तीच्या जोरावर त्याने महत्त्वाच्या लोकांना आपल्या बाजूला वळवून घातपाताने जलालुद्दिनचा काटा काढला आणि खिलजी साम्राज्याचा तो अनभिषिक्त सम्राट झाला. पद्मावतीच्या गोष्टीतला अल्लाउद्दीन खिलजी हाच.
या खिलजी साम्राज्याला अफगाणिस्तानात शह दिला मूळच्या अफगाणी असलेल्या बहलोल खान लोदी याने. हा सरहिंद प्रांताचा प्रमुख मलिक सुलतान शाह लोदी याचा जावई. त्याने दिल्लीच्या गादीवरही आपला हक्क प्रस्थापित केला आणि खिलजी साम्राज्याचा भूभाग आपल्या अंमलाखाली आणला. त्याचे पुढचे वंशज सिकंदर लोदी आणि इब्राहिम लोदी यांनी लोदी साम्राज्य सांभाळलं, पण इब्राहिम लोदी याचा पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने पराभव करून सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोदी साम्राज्याचा अस्त घडवून आणला.
बाबराने मुघल साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापासून थेट पूर्वेकडे बिहार भागापर्यंत केला. वायव्येकडे अफगाणिस्तानात त्याने शेरशाह सुरी या शूर अफगाणी सेनापतीला आपल्या साम्राज्याचा त्या भागातला प्रशासक म्हणून नेमला. या सुरी घराण्याच्या पुढच्या कुलदीपकांनी पुढे मुघलांशी गद्दारी करून वेगळी चूल मांडली, पण १५५६ साली मुघलांनी त्यांचा निर्णायक पराभव केला. मुघलांनी त्यानंतर अफगाणिस्तानवर आपलं राज्य आणलं.
पुढे अफगाणिस्तानच्याच होटाक जमातीच्या मिरवैज होटाक याने सतराव्या शतकात अफगाणिस्तानात आपल्या कबील्याची सत्ता आणली. हे होटाक लोक अतिशय शूर आणि टणक होते. मुल्ला ओमर या कुप्रसिद्ध दहशतवादी तालिबानी नेत्याची जमात होटाक हीच आहे. पुढे १७२२ साली अहमद शाह दुर्राणी याने दुर्राणी साम्राज्याची स्थापना करून अफगाणिस्तानची धुरा आपल्या हाती घेतली. आज जे अफगाणिस्तान आपल्याला माहीत आहे, त्याची स्थापना करणारा हाच तो अहमद शाह दुर्राणी. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा साम्राज्याला भिडलेला अहमद शाह अब्दाली हाच. याने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यावर आपल्या मूळच्या अब्दाली नावाऐवजी ' दुर्राणी ' हे नाव लावायला सुरुवात केली. ( दुर - ई - दुर्रान म्हणजे मोत्यांच्या राशीतला सर्वश्रेष्ठ मोती...स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवण्याचा हेतूने त्याने हे विशेषण चिकटवून घेतलं होतं.) खरं तर हा होटाक राज्याच्या तुरुंगातच सडत पडला असता, कारण त्याच्या तीर्थरूपांची बंडखोर लक्षणं बघून त्यांना या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या मुलासह तुरुंगात डांबलं गेलं होतं...पण इराणच्या नादर शाहने होटाक राज्यावर चाल करून त्यांना पराभूत केलं आणि अहमद शाहला मुक्तता मिळाली.
याचा १७७२ साली मृत्यू झाल्यावर त्याच्या मुलाने - तीमुर शाह याने सत्ता सांभाळली. त्यानेच कंदहार येथून आपली राजधानी काबूल येथे आणली आणि पेशावर ही हिवाळी राजधानी म्हणून घोषित केली. त्याची मुलं पुढे दोन दशकं अफगाणिस्तानवर राज्य करत होती.
आधुनिक काळातल्या अफगाणिस्तानच्या इतिहासावर नजर टाकू, पण ते पुढच्या भागात. तोवर अलविदा!
कुंभार मडकी घेउन गेला. तुम्ही
कुंभार मडकी घेउन गेला. तुम्ही फुंका उकिरडे.......
अब्दाली , राघोबा, बाजीराव,
चौथा भाग टाका....
नाव घेऊन स्पष्ट बोलतो -
नाव घेऊन स्पष्ट बोलतो -
गांधीजी अस्पृश्यांसाठी काम करायचे, त्यांनी त्या लोकांना हरिजन म्हणून आपल्या आश्रमात जागा दिली, म्हणून ते महान ठरत असतील तर पतीत पावन मंदिरात दलित माणूस बरोबर घेऊन शेकडो सवर्ण लोकांमधून थेट मंदिरात प्रवेश करणारे सावरकर कोण? पाकिस्तान जर मुस्लिम राष्ट्र म्हणून जन्माला घालायची जिन्ना यांची आगळीक काँग्रेस मान्य करत असेल तर उर्वरित भारत फक्त हिंदू राष्ट्र का ओळखलं न जावं या सावरकरांच्या सडेतोड प्रश्नाला कोणत्या नेत्याने आजवर उत्तर दिलंय? उत्तर नाही म्हणून सावरकर हिंदू जातीयवादी आणि फाळणीचा खेळखंडोबा होऊ देऊनही नेहरू - गांधी उदारमतवादी सेक्युलर ?
-----सहमत
Pages