रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग

Submitted by पशुपत on 9 March, 2020 - 06:20

एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.

आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.

तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृताक्षर, सिंहगडच्या प्रसंगात, ती मासेवाली नक्की कोण होती असे वाटले?
इतक्या रात्री ती ना बसमध्ये कुठल्या चढली आणि इतक्या रात्रीची चालत कुठे गेली. तुम्हाला प्रश्ण नाही पडले? खरेच एक अध्भुत शक्ती होती का?

बाकी, सिंहगडाचे प्रसंग बरेच एकले आहेत. आमचाही मुर्खपणा नडलेला, मळवली वरून येताना.. चार तरुण मुलीच होतो.
पण पावसात, चकवा झालेला... खाली येइपर्यंत रात्र झालेली आणि भयानक गोठलेलो भितीने.

ही घटना मी माझ्या आईकडून ऐकलेली आहे. मी तेव्हा एक वर्षाच्या आसपास असेल. तेंव्हा आम्ही चाळवजा भोगल्याच्या वाड्यात, रंगारगल्ली गुलमंडी परिसरात राहत होतो. त्याकाळी घरमालक रात्री वीजेचा पुरवठा खंडित करत. पावसाळ्याचे दिवस होते, एका रात्री आईला बाथरूमला जायचे होते, तिने आजीला माझ्याकडे लक्ष द्यायला सांगितले. आई परत आल्यावर अस्मादिक जागेवर नव्हते. आईने "बाळ कुठे आहे?" म्हणून आजीला विचारले, "इथेच आहे" असे आजी म्हणाली, परंतु दिव्याच्या उजेडात बघितल्यावर सगळे मला शोधायला लागले. माझ्या पायात असलेल्या वाळ्यांच्या आवाजावरून वरच्या मजल्यावर माझा शोध लागला. आजूबाजूला चिखल आणि रिमझिम पाऊस असतानाही माझ्या पायांना अजिबात माती लागलेली नव्हती.
त्याच वाड्यात असताना एकदा आई मला खांद्यावर घेऊन वाड्यातील एका आजीसोबत बोलत होती, त्या आजी भांडे घासत होत्या. रस्त्याने जाण्याऱ्या एका सरदार व्यक्तीने मला मागच्यामागे आईच्या खांद्यावरून घेतले, आईला वाटले कि तो व्यक्ती आजीच्या ओळखीचा असेल आणि त्या आजींना वाटले कि तो व्यक्ती आईच्या ओळखीचा आहे. आईने त्या आजीला ती व्यक्ती कोण आहे म्हणून विचारले, तर त्यांनी माहित नाही म्हणून सांगितले. तितक्यात माझी एक आत्या आली आणि तिने मी कुठे आहे असे आईला विचारले, आईने रडवेल्या आवाजात झालेली घटना सांगितली. लगेचच त्या आत्याने पळत जाऊन त्या सरदार व्यक्तीला पकडले आणि "बाळाला कुठे घेऊन चालला?" असा जाब विचारला. "मैं तो बच्चे को चॉकलेट दे रहा था" असा त्याने म्हणल्यावर आत्या भडकली आणि म्हणाली "तुला काही कळत का? एवढं लहान लेकरू कधी चॉकलेट खाईल का?" आणि ती मला परत घेऊन आली.

या घटना इथे सांगण्याचा उद्देश फक्त त्यांचा अनुभव सादर करणे ईतकाच आहे.

"मी हरवलो तेंव्हा"
असा प्रकारचा प्रसंग काही जणांच्या आयुष्यात आलेला असू शकतो, जेव्हा आपण लहान असताना काही काळापुरते आपल्या कुटुंबियांपासून हरवलो असुत.
तर हि घटना घडली तेव्हा मी ३-४ थी असेन. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी, लहान भाऊ आणि आई, मावशीच्या गावी गेलोलो, तिथे आमचे आजी-आजोबाही आलेले होते. काही दिवसानंतर आम्ही सगळे म्हणजे मी, लहान भाऊ, आई, मावशी, आजी-आजोबा, आणि मावस बहिणी असे सर्व आजोळी जाण्यासाठी निघालो आम्ही रेल्वेने गंगाखेडहून जालन्याला आलो, दुपारी दशम्या खाल्ल्यावर जालन्याच्या बस स्थानकावर पोहचलो. साधारणपणे ४-५ वाजता गावाला जाणारी बस फलाटावर लागली, लग्नसराईमुळे तूफान गर्दी होती. जागा पकडण्यासाठी मी आणि लहान भाऊ गर्दीतून पुढे आलो, जागा काही भेटली नाही त्यामुळे मी ड्रायव्हरच्या बाजूने उतरण्याचा निर्णय घेतला. खाली उतरून पाठीमागे दरवाज्याजवळ आलो तर बाकीचे सर्व बसमध्ये चढलेले होते आणि दरवाजा बंद झाला होता. ज्यांना कोणाला जुन्या लाल बसेस माहीत असतील त्यांना आठवेल कि त्या बसेसचा दरवाजा हा पाठीमागे असायचा, ड्रायव्हरची केबिन स्वतंत्र विषय असून प्रवासी कधीकधी केबिनमधेही बसायचे. तसाच मी परत फिरलो आणि गाडीच्या समोर आलो. ड्राईव्हर गाडीत बसायच्या तयारीतच होता. त्याला विनंती करून सांगितले की घरातील सगळे बसमधे चढले आहेत आणि केबिनमध्ये बसायची जागा मिळाली. गाडीने शहर सोडले, तितक्यात बस थांबली, मुलगा हरवला अशी कुजबुज कानावर आली, मला वाटले कोणी दुसरं असावं कारण मी तर बसमधे आहे. जेव्हा आईने उतरून माझ्याकडे येऊन मला बघितले तेव्हा माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. गावातील आजोबांच्या आणि आईच्या ओळखीच्या कोणीतरी सांगितले असणार कि मी पुढे ड्राईव्हरशेजारी बसलेला आहे. नंतरचा प्रवास आरामात झाला.

शाळेत असतानाच, एकदा नवरात्रीत कर्णपुऱ्यातील जत्रेत सर्वांसोबत गेलो होतो. त्यावेळीही मंदिराच्या गाभाऱ्यात गर्दीमुळे दुरावलो. समयसुकता राखून मी पादत्राणे सेवा केंद्रावर जेथे ठेवली होती तिथे गेलो आणि घरच्या चप्पलांवर लक्ष ठेवले. काही वेळानी घरचेही मला शोधत तिथेच आले.

झंपी पडले होते भरपूर प्रश्न..अजून पण वाटत की ती कुणी साधारण पोरगी नसेलच..दैवी शक्ती असेल जी आपल्याला मदत करायला धाऊन आली..खूप दिवस तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता..तिने कपाळाला लावलेलं मोठं गोल लाल कुंकू तर सारखं आठवत राहायचं खूप दिवस..

आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती पूर्ण वेळ आमच्या सोबतच होती..
त्या पायथ्याच्या बस स्टॉप ला सगळे निघून गेले तरी ती थांबली होती..नंतर ती 5 km चालत येऊन आम्हाला रहदारीच्या बस स्टॉप पर्यंत सोडायला सुद्धा आली..फोन सुद्धा तिनेच मागून आणलेला..
आणि रस्त्यात त्या गाडी वाल्याला तिनेच पलवून सुद्धा लावले..
इतकं कोण करत बर अनोळखी माणसासाठी..? ते पण इतक्या रात्री इतक्या पावसात आणि अंधारात..

मी एकदा चुकून माझ्या फेसबुकचा पासवर्ड बायकोला सांगितला होता. खूपच भयानक अनुभव होता तो. >> Lol खरंच खूपच भयानक!

खतरा अनुभव आहेत एक एक!

मी जेव्हा दहावीला होतो .
गावीच शाळेत होतो.
दहावीचे वर्ष म्हणून क्लास लावला होता .
. गावा पासून ४ किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी क्लास होता
वेळ रात्री ७ ते ,९. आम्ही आठ दहा जण सायकल वरून क्लास का जात असू .
Àamchy मधील एक मुलगा जास्त च आगावू होता.
आम्ही ओढ्यातून जाताना भुताची भीती बाळगून असतो हे त्याला माहीत होत रोज आमच्या बरोबर असल्यामुळे.
एक दिवस तो क्लास ला आलाच नाही .
रस्ता वरील एका झाडावर चढून लपून बसला .
आम्ही class सुटल्यावर आरामात घरी चाललो होतो.मध्यम वेगात.
सीट वर बसून सायकल चालवत होतो.
तो जिथे लपला होता ते झाडं खाली आल्यावर त्यांनी मोठ मोठ्यांनी हसायला suravat केली आणि झाडाची फांदी जोरजोरात हलवायला suravat केली आम्ही एवढ्ये घाबरलो की सीट वरून उतरून सायकल च्य नळीवर येवून सायकल चे pandle जोरात मारू. लागलो आणि गाव आल्यावरच थांबलो.
भीती नी गाळण उडाली होती.
दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व कहाणी सांगितली मग चोप चोप चोपला त्याला

मी एकदा चुकून माझ्या फेसबुकचा पासवर्ड बायकोला सांगितला होता. खूपच भयानक अनुभव होता तो.

तुमच्या असल्या अविचारी वागण्याचा त्रास तुमच्या ८/१० मित्रांना सुधा झाला ते सर्व सांगत होते.
त्यांच्या बायका पण पाठी लागल्या बोकलत bhavuji त्यांच्या एफबी चा पासवर्ड त्यांच्या बायकोला देतात तुम्ही का नाही देत काही तरी गडबड असणार
बिचाऱ्या ना आढवडा भर उपाशी राहवे लागले.

हा धागा वाचनीय आहे. रोचक पद्धतीनं पुढे जात आहे. काही आयडी/डु.आयडी/त्रिक आयडी/चोक आयडी जे काही आहेत ते, त्यांनी आपांपसांतल्या गप्पा/वाभाडे/कुचाळक्या इथे करू नयेत.

होय ललिता जी. बोकलतला काही काम नाही. नुसता विनोद करत असतो. मायबोलीचा विनोदवीर आहे तो. दुसरा राजेश १८८.

थरारक पण म्हणता येईल आणि हसू पण येईल असा प्रसंग आहे.
घरी शेतीवाडी आल्यामुळे गाई,म्हैस ,बैल सर्व होते. आणि आता पण आहे.
त्या मध्ये म्हैसीच रेडकू होत पूर्ण वाढ झालेलं.
भोरे भिरे केस होते त्याच आणि चांगलं धष्टपुष्ट होते.
जेव्हा त्यांना रानात चरायला घेवून जायचो तेव्हा त्याच्या पाठीवर बसायचो जास्त अवखळपणा करायचे नाही.
पण एकदा त्या काय डोक फिरल माहीत नाही .
एकदा पुढचे पाय नंतर पाठीमाग चे दोन्ही पाय उचलून त्यांनी दोन चार उड्या मारल्या आणि नी त्याच्या पाठी वरून खाली फेकलो गेलो.
नेमका दोन्ही हातांवर पडलो दोन्ही हात मोडले होते.
पण वय लहान असल्या मुळे परत ठीक झाले.

संजय , गुरांच्यापासून नेहेमी सावाधच रहावे लागते. एक तर त्याना पोटाच्या मोठ्या आकारामुळे मागचे दिसू शकत नाही आणि त्यानी प्रेमाने जरी शेपटी फिरवली तरी ती जिव्हारी लागू शकते.

मुंबई-हाँगकाँग-ऑकलंड प्रवासादरम्यानची ही थरारक मजा.
मुंबईहून हाँगकाँगला उतरलो. पुढचं विमान चार-एक तासांनंतर होतं. हाँगकाँग एअरपोर्ट अवाढव्य आहे. ऑनवर्ड जर्नीच्या सगळ्या पाट्या, बाण फॉलो करत करत पुढच्या चेकपॉइंटपाशी पोचलो. तिथल्या काऊंटरवर एक चिनी होता. त्याला पुढचा बोर्डिंग पास दाखवला. बोर्डिंग गेट्स कोणत्या दिशेला आहेत हे तिथे काहीच दिसत नव्हतं. म्हणून त्यालाच विचारलं. त्यानं लगतच्या एका दाराकडे हात करून 'हे काय इथेच आहे' अशा सुरात काहीतरी सांगितलं.

त्या दारातून आत पाहिलं तर तिथे सिक्युरिटी चेकचे २-४ चिमुकले काऊंटर्स आणि पुढे परत एक लहान दार. ती जागा अगदी लहानशी बंदिस्त होती. त्यापलिकडचं काहीच त्या दारातून दिसत नव्हतं. परत त्या काऊंटरपाशी गेलो आणि त्याला बोर्डिंग पासवरच्या गेट नंबरवर बोट ठेवून खाणाखुणा करून 'इथे जायचंय, हे कुठल्या दिशेला येईल?' असं विचारलं. त्यानं परत तसंच 'हे काय, इथेच तर आहे ना, सांगतोय काय मगापासून तुम्हाला' अशा सुरात काहीतरी सांगितलं. आमचं इंग्रजी त्याला नीटसं कळत नव्हतं आणि त्याचे उच्चार समजून घेण्यात २-४ सेकंद जात होते.

मनात म्हटलं, वाटलं होतं तितका एअरपोर्ट काही अवाढव्य दिसत नाही. ती आमची चूक होती!! Lol आम्ही उभे होतो ते वेटिंग लाऊंज मात्र ऐसपैस होतं. मोठाले डिस्प्ले बोर्ड्स होते, खाणंपिणं, आरामखुर्च्या वगैरे. म्हटलं बोर्डिंग गेट्स लगेच पुढेच आहेत, तर इथेच जरा आराम करू. ही पण आमची चूक होती!! Lol
एक डोळा डिस्प्लेकडे, एक डोळा सिक्युरिटी क्यूकडे ठेवून आम्ही दोघांनी तिथे आळीपाळीने मस्त डुलक्या काढल्या. डिस्प्लेला आमच्या विमानाच्या समोर 'नाऊ बोर्डिंग' दिसल्यावर आम्ही उठलो, निवांतपणे सिक्युरिटी चेकमधून पलिकडे त्या दारातून बाहेर पडलो आणि पुढे अचानक उरलेला अवाढव्य विमानतळ समोर उमलला!! आधीच्या त्या लाऊंजमधून पुढे हे एवढं उरलं असेल याचा जराही अंदाज येत नव्हता.
जरा चपापलो, पण परत पाट्या फॉलो करत चालायला लागलो. हळूहळू लक्षात आलं हे काही खरं दिसत नाही. रस्ता काही संपत नाही. चालण्याचा वेग वाढवला. सरकत्या जिन्यांवर तर पळत चढायला सुरूवात केली.
पुढे ३ सरकते जिने पळत चढून, मग २ तसेच पळत उतरून, एका प्लॅटफॉर्मवर काही सेकंद ट्रेनसाठी थांबून, ट्रेनमध्ये चढून, चिनी-इंग्रजी अनाऊंसमेन्ट्स कानात प्राण आणत ऐकून, मधलं एक स्टेशन सोडून, त्यावरून एकमेकांशी वाद घालून, पुढच्या स्टेशनला परत ४ सरकते जिने पळत चढून, त्या डिपार्चर लेव्हलच्या पार लांबच्या टोकाशी आमचं बोर्डिंग गेट आम्ही पळत कसं गाठलं हे आजही आम्हाला नीटसं सांगता येणार नाही Biggrin ती दहा-एक मिनिटं आम्ही फक्त धपापत पळतोय इतकीच आज आठवण आहे. आजही त्यावरून आम्ही जाम हसतो. आता मजा वगैरे वाटते, पण तेव्हा वाट लागली होती.
मात्र या वयातही आपण इतकं अंतर, जिने वगैरे पळत विमान गाठू शकलो याचा मात्र जाम आनंद झाला होता Lol

एकसे बढकर एक प्रसंग आहेत.

>> इतक्यात आणखी एक जण आला. म्हणाला, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही नेहमी त्या अमुकतमुक दुकानात बाईक घेऊन येता. ते माझ्या मित्राचं दुकान आहे.
>> Submitted by ललिता-प्रीति on 12 March, 2020 - 11:33

बापरे! ज्या व्यक्तीला तुम्ही स्वत:हून ओळखत नाही त्यावर रात्री बेरात्री विश्वास ठेवला नाहीत हे चांगलेच झाले.

>> सिंगापुरच्या त्या पार्क मध्ये मला पण सेम अनुभव आलेला. मला आठवतं त्यानुसार तिथे पाण्याची पातळी लिहिलेली आहे, आणि lifeगार्ड सुद्धा फार आत जाऊ देत नाहीत...
>> Submitted by अजिंक्यराव पाटील on 12 March, 2020 - 13:24

निदान तेंव्हा तरी मला लाईफगार्डनी अडवले वगैरे नाही. कदाचित फार गर्दी असल्याने त्यांचे लक्ष नसेल किंवा त्यांना वाटले असावं कि मला पोहायला येतेय. मी आपला स्विम रिंग मध्ये बसून निवांतपणे तरंगत आत गेलो.

>>@अतुलपाटील - बुडण्याचा स्लाईट अनुभव आहे मला. फार शांतपणे पाणी आत ओढतं. हिंदी सिनेमासारखे बचाव-बचाव तर अज्जिबातच होत नाही. काहीही बोलता येत नाही की हलता येत नाही. इट्स काल्मनेस इज शिट स्केअरी.
>> Submitted by सामो on 11 March, 2020 - 19:49

सहमत आहे. केवळ काहीच महिन्यांपूर्वी साताऱ्याजवळ कण्हेर धरणात पाण्यात उतरून मामा-भाची केवळ चार पावले आत चालत गेले आणि बुडाले आणि संपले. आरडाओरडा नाही काही नाही. पोहायल येत नसेल अथवा जुजबी येत असेल तर कुठेही असो (धरण/नदी/तलाव/समुद्र/जलतरण तलाव) पाण्यात न जाणे उत्तम. कमरेहून कमी उंची असलेल्या कठड्यावरून वाकू नये, कमरेहून जास्त पाणी असेल तिथे आत जाऊ नये.

>>जर चुकून माझा उडी मारल्यावर तोल गेला असता तर मी सरळ लिफ्टच्या खाली, शाफ्टमधे पडले असते.
>> Submitted by वावे on 12 March, 2020 - 13:30

हे हॉरिबल आहे. अपघात असेच होतात. क्षणार्धात गोष्टी घडतात. केवळ नशीब चांगले तुमचे म्हणायचे.

>>माझी गरोदर असलेली पत्नी जवळ होती तिने मला पकडून ढकलण्याचा प्रयत्न केले पण ती फेकली गेली परत ती उठली आणि मला जोरदार पकडून ओढली मग माझी सुटका झाली.
>> Submitted by उदयगिरी on 12 March, 2020 - 14:13

थरार पेक्षा, हे वाचताना डोळ्यातून पाणी आले ! त्या मातेने तुम्हाला दुसरा जन्मच दिला असे म्हणावे लागेल.

>> गाडीतून खाली उतरून पाहीलं, गाडीचा एका बाजूचा टेल लॅंप फुटला होता. माझं अंगं थरथरत होतं.
>> Submitted by चिमण on 12 March, 2020 - 17:24

खत्त्तरनाक अनुभव आहे हा. फारसे नियंत्रण करू शकत नसलेली बर्फावरून स्किड होणारी कार तब्बल पंधरा वीस किलोमीटर चालवत घरी पोहोचणे ! जोक नाही.

>> स्फोट झाल्यावर बाबांचे कपडे पेटले आणि त्या स्फोटाचे सर्व केरोसीन वर उभ्या असल्येल्या माझ्या अंगावर आले आणि माझ्या कपड्यांची पेट घेतला.
>> Submitted by मित्रा on 13 March, 2020 - 01:22

हा अनुभव केवळ आणि केवळ भीषण आहे.

"भाजलेलं रुग्ण घ्यायला बऱ्याच इस्पितळांनी नकार देऊन पुढे पुण्याला जाण्याचा सल्ला दिला"
"आई एकटीच बाबांच्या नोकरीच्या गावी आमची वाट पाहत बसली होती. तेंव्हा फोन नसल्यामुळे तिला यातील काहीच माहित न्हवते"

अशासारख्या वाक्यांमुळे एकंदर तो काळ व तेंव्हाची परिस्थिती कशी होती त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. खरेच भीषण आणि तितकाच थरारक अनुभव आहे हा.

>> रात्री 1 च्या दरम्यान कधीतरी हॉस्टेल ला पोचलो..परत कधीच असं वेळ काळ न पाहता फिरायला जायचं नाही हा मोठा धडा आम्ही त्या दिवशी घेतला.. आणि कधी नव्हे ते आज मी देवाला हात जोडून रात्री झोपी गेली..

>> Submitted by अमृताक्षर on 13 March, 2020 - 00:57

स्वत:ची गाडी असेल तरीही पावसाळ्यात दुपारी तीन वाजता सिंहगडसाठी पुण्यातून निघण्याचे प्लानिंग निदान मी तरी करणार नाही. पण एक वय असते वेडेपणाचे तेंव्हा मात्र आपण सर्वच अशी प्लानिंग करतो. हेच तर आयुष्य आहे.

सिंहगडचा हा किस्सा खरेच या धाग्यातली माझ्या मते सर्वात बेस्ट थरारकथा आहे. मी त्या रस्त्यावरून अनेकदा उतरलो आहे त्यामुळे त्याची भयानकता मी समजू शकतो. ते अंतरसुद्धा काही थोडे नाही. जवळजवळ तास दीडतासाची अखंड तीव्र उतार असलेली असलेली जंगली पायवाट आहे. आजूबाजूला दाट झाडी आणि मोठमोठे खाचखळगे आहेत. घसरून पडणे पाय लचकणे हे तर तिथे नित्याचेच.

दिवसा सुद्धा उतरताना जिथे प्रचंड कसरत करावी लागते तिथे पावसाळ्याच्या रात्री अवेळी या मुलींची काय अवस्था झाली असेल हि कल्पनाच करवत नाही. बापरे! पुढे सुद्धा एकीचा पाय भयानक सुजला होता एकीला चक्कर येत होती अशा अवस्थेत रात्रीच्या वेळी तब्बल चार किलोमीटर त्या कशा चालल्या असतील? त्यातही ती दारुडी माणसे, काच खाली करून बघणारा तो गाडीवाला वगैरे. केवळ ती स्थानिक मुलगी भेटली जिला तिथले माहित होते म्हणून निभावले. पण एक आहे. या प्रसंगानंतर तुम्हा मैत्रीणींमधले बॉंडिंग मात्र खूप चांगले झाले असेल. संकटकाळात एकत्र येणारे एकमेकाला नंतर कधीच विसरत नसतात.

खरेतर यावर एक चांगली पटकथा व चित्रपट होऊ शकतो इतके पोटेन्शियल आहे या एकूण प्रसंगात. तुम्ही खरेच या दृष्टीने विचार करा.

>> बस फलाटावर लागली, लग्नसराईमुळे तूफान गर्दी होती. जागा पकडण्यासाठी मी आणि लहान भाऊ गर्दीतून पुढे आलो, जागा काही भेटली नाही त्यामुळे मी ड्रायव्हरच्या बाजूने उतरण्याचा निर्णय घेतला. खाली उतरून पाठीमागे दरवाज्याजवळ आलो तर बाकीचे सर्व बसमध्ये चढलेले होते आणि दरवाजा बंद झाला होता. ज्यांना कोणाला जुन्या लाल बसेस माहीत असतील त्यांना आठवेल कि त्या बसेसचा दरवाजा हा पाठीमागे असायचा, ड्रायव्हरची केबिन स्वतंत्र विषय असून प्रवासी कधीकधी केबिनमधेही बसायचे.
>> Submitted by सच्चा on 13 March, 2020 - 16:05

हा हा हा.. अगदी अगदी झाले वाचताना. जुन्या आठवणी! काय दिवस होते राव Happy

ललिता - , मझ्या मित्राच्या बाबतीत अगदी असेच घडले होते , चेक रिपब्लिक मधे. टॅक्सी ड्राइवरच्या हलगर्जीपणामुळे (तो पिक अपसाठी आलाच उशीरा) आणि ट्राफिकमुळे पोहोचायला उशीर झाला .. पळत पळत फ्लाइट गाठली २३:५० ची... फ्लाइट चुकती तर त्यांचा विसा ही संपणार होता १० मिनिटात !

परदेशात गुंडांचा अनुभव कुणाला आला आहे का? मला एक छोटासा अनुभव आला आहे. आता वाचायला फार थरारक वाटणार नाही पण तेंव्हा तंतरली होती.

तेंव्हा इंग्लंडमध्ये जाऊन काहीच दिवस झाले होते. इंग्लंडची फार ओळख पण झाली नव्हती. मी राहत होतो तिथून ट्यूब ट्रेन स्टेशन चालत जाण्याच्या अंतरावर होते. एका शनिवारी ऑफिसला सुट्टी असताना पास काढायला कि त्याची माहिती विचारायला म्हणून मी स्टेशनवर जायचे ठरवले. तेंव्हा आतासारखे ऑनलाईन वगैरे काही सुरु पण झाले नव्हते. विकडेज मधले इंग्लंड आणि विकांतमधले इंग्लड यात खूप फरक असतो. पण तेंव्हा मला हे माहित नव्हते. स्टेशनवर पोहोचलो तेंव्हा सगळ्या खिडक्या बंद. सर्वत्र शुकशुकाट. माणूसकाणूस नाही का कसली चाहूल नाही. मला कमालीचे आश्चर्य वाटले. आपण नेहमी ऑफिसला जातो हेच का ते स्टेशन असे वाटून गेले. वीकेंडला अनेक ठिकाणी अशीच सर्वत्र सामसूम असते हे मला नंतर काही दिवसांनी कळले. पण निदान तिकिटाच्या खिडक्या तरी उघड्या असायला हव्या होत्या असा विचार करत मी तिथे थोडा वेळ रेंगाळलो.

तितक्यात तिथल्या जिन्याच्या बाजूने काही सोमालियन पोरं आली. टोळकेच होते ते. बडबड करत आले. मला पाहताच थांबले. मी जरा चरकलोच. कारण तिथे आजूबाजूला सर्वत्र निर्मनुष्य होते. त्यातल्या एकाने मला काय हवे म्हणून विचारले. मी सुद्धा शांतपणे सांगितले तिकीट विंडो बंद आहे मला चौकशी करायची होती. तर प्रत्युत्तरादाखल त्याने एक हात डावीकडे करून काहीतरी बडबड करत मला "जा इथून खाली असेच फलाटाकडे. काही होत नाही" अशी 'प्रेमळ' सूचना केली. तिकीट काढण्याची गरज नाही 'जस्ट गो' असा त्याचा आग्रह होता. बाकीचे 'स्मितहास्य' करत होते. मला थोडे विचित्र वाटले. मी म्हणालो 'इट्स ओके' आणि जाऊ लागलो. तर मला आडवा येत तो पुन्हा जिन्याने खाली जा चा आग्रह करू लागला. खाली गेल्यावर प्लाटफॉर्म वर कोणीही असण्याची शक्यता नव्हती हे मला माहित होते. इंग्लंडमध्ये सोमालियन पब्लिकचे चांगले रेप्युटेशन नव्हते. गर्दुल्ले असतात. पैशासाठी हाणामाऱ्या व लुटालूट करण्याची त्यांची गुन्हेगारी कृत्ये तिथे नेहमीचीच. तो जास्तच आग्रह करू लागला आणि बाकीचे पण त्याला साथ देत होते ते बघून मी मनातून थोडा घाबरलोच. काहीही करून स्टेशन मधून बाहेर येणे इतकेच मला करायचे होते. त्याला थातूरमातूर उत्तर देऊन मी बाहेर पडू लागलो. त्याने पुन्हा आडवे येण्याचा प्रयत्न केला पण मी लक्ष न देता बाजूने सटकलो व स्टेशन बाहेर येऊन पायऱ्या उतरू लागलो. तसे पाठीमागून कुत्सित मिमिक्री व पाठोपाठ फिदीफिदी हसण्याचे आवाज आले.

एक मोठा सुस्कारा टाकून मी घर गाठले. अवघा पाच ते दहा मिनिटाचा मिनी-थरार प्रसंग. पण अजून विसरलो नाही.

काय एकेक अनुभव आहेत!!

आम्ही आसामला होतो तेव्हाचा प्रसंग.
आम्ही राहत होतो ते गाव खूप छोटं होतं, गरजेपुरते सामान मिळून जायचे पण बाकीच्या वस्तुंसाठी शेजारच्या छोट्या शहरात जावे लागायचे. साधारण दीड दोन तासांचा प्रवास असायचा. रस्ता खूप खराब होता. पण आजूबाजूला भातशेती, छोटी खेडी, बांबूची घरं बघत प्रवास पार पडायचा.
आम्हांला सुरक्षिततेच्या कारणासाठी ऑफिसच्या गाडीनेच जायची परवानगी होती. ती गाडीपण सिविल नंबरप्लेट ची होती. शिवाय सोबत एक बंदूकधारी घेऊन जावे लागायचे.
तर एकदा मी आणि लेक शहरात जायला निघालो. नवरा काही कारणांमुळे येऊ शकत नव्हता. पण ड्रायवर आणि एक शिपाई होते बरोबर. तर रस्त्यातच एक बकरीचे पिलू अचानक गाडीसमोर आले. खरे तर ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होते, पण तिकडून एक बाईकवाला आला आणि त्याने एकदम हॉर्न वाजवला त्यामुळे घाबरून पिलू पळाले ते आमच्या गाडीसमोर आले.
ड्रायवरने गाडी थांबवली. इतक्यात पूर्ण निर्मनुष्य रस्त्यावर अचानक कूठून कुठून लोक गोळा झाले, त्यांनी आमच्या गाडीला घेराव घातला. ड्रायवर नी मला अजिबात न उतरण्याचे बजावले आणि तो एकटाच उतरला. लोक आसामी भाषेत बडबडत होते. ड्रायवर साउथ इंडियन होता. त्यांच्यातला एकजण पुढे झाला आणि पैसे मागू लागला. ड्रायवर म्हणाला,"माझी चूक नाही. मी पैसे नाही देणार." खरे तर पिलाला काही जास्त लागले नव्हते, पण ते जरा लंगडत होते. त्याच्या उपचारासाठी पैसे मागत होते. हळूहळू त्यांचा आवाज वाढला. आणि ते गाडी जवळ येऊ लागले. मी हादरलेच. काय काय विचार येऊ लागले. यांनी मुलीला काही केले तर??? गाडीला आग लावली तर??? आम्हांला पळवून नेले तर??? बाप रे!! मी ड्रायवरला म्हणाले ," भैय्या, मेरे पास तीन हजार है, उन्हें पैसे दे दो. लेकिन यहां से चलो". तो ऐकायला तयार नाही. वाद घालू लागला. मी दुसऱ्या शिपायाला म्हणाले तर तो म्हणाला ," मी तुम्हांला गाडीत एकटं सोडून उतरणार नाही. सर काय ते हॅंडल करतील. तुम्ही काळजी करू नका". मला रडू फुटलं अगदी.
तेवढ्यात अगदी देवासारखा एक म्हातारा बाजूच्या शेतातून आला. त्याने टोळक्याला बाजूला केले. आणि दम भरला. माझ्या जवळ येऊन माफी मागितली, ड्रायवर ला गाडी घेऊन जायला सांगितले. मी त्याला म्हणाले ," पिलाच्या उपचारासाठी मी पैसे देते." तर म्हणाला," कसले उपचार, ते पिलू गेलेपण पळून. तुम्ही निघा लवकर"
आम्ही लगेच निघालो. पण जाम हादरले होते मी. मग डोक्यात आले, आमच्या बरोबर बंदूकधारी होता, त्या लोकांना आम्हांला हात लावू दिला नसता त्या दोघांनी. पण भीतीने डोकं चालत नाही म्हणतात हेच खरं. संध्याकाळी परत येताना पण मी त्या भागातून येताना जरा घाबरलेतच होते.
ते आजोबा अगदी देवासारखे धावून आले होते.

खूप छान अनुभव आहेत एकेकाचे. आणि शब्दांकन ही प्रभावी आहे प्रत्येकाचे.

असे कसोटीचे प्रसंग अचानक पणे येतच असतात समोर. त्या त्या वेळेला जे योग्य वाटत तसे निर्णय घेतो आपण. सगळेच अनुभव प्रसंगावधान राखून action घेतल्यामुळे आणि देवाच्या कृपेमुळे सुखांत झालेत .( अपवाद एक च सस्मित ने लिहिलेला ) त्यामुळे चांगलं वाटतय वाचताना .

पाणी ,समुद्र मला नेहमीच फार रिस्की वाटतो त्यामुळे पाण्यापासू चार हात लांब रहावे. नवीन अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरताना नीट विचार करावा

थरारक अनुभव वाचायला मस्त वाटतंय .
कठीण प्रसंगी माणूस कसा निर्णय घेईल हे प्रत्येक व्यक्ती वर अवलंबून आहे.
खरे तर अशा वेळेस भीती च्या भावनेने पूर्ण ताबा घेतलेला असतो मेंदू खूप फास्ट काम करत असतो कमी वेळात योग्य निर्णय घेणे आणि ते पण भीती च्या छाये खाली खूप खूप अवघड असते ते.
इथे जे अनुभव शेअर झाले आहेत त्या मध्ये एक तर कोण्ही तरी मदत केली आहे किंवा स्व निर्णयाने ते संकट मधून सुखरूप बाहेर पडले आहेत.

एकदा यष्टीने गावी परतत असताना चालकाच्या रॅश ड्रायव्हिंगने गाडी पुढच्या एस्टीवर धडकली.मला वाटले आपल्याला फारसे लागले नाही.सगळे प्रवासी खाली उतरले,मी ही उतरलो. थोड्यावेळाने मला माझ्या शर्टचा वरचा भाग रक्ताने माखलेला आहे हे लक्षात आले व प्रचंड घाबरलो.नाक फुटुन रक्त ओघळत होते..
बरेचदा अपघात झाल्यान्ंतर मोडतोडीचा अंदाज येतो.

महिनाभरापूर्वी एका दुसऱ्या साईट वर टाकलेला किस्सा आहे हा . कदाचित वाचला असेल काही जणांनी
ऑस्ट्रिया मधला अनुभव . रात्री उशिरा चेक इन केलं . रात्री उशिरा उशिरा पर्यंत भरपूर उजेड . रात्री नऊ वाजता चेक इन केल रूममधला सज्जा ( बाल्कनी ) उघडला आणि ईतका उजेड बघून आश्चर्यचकित होऊन बरेच फोटो पण काढले पण लगेचच अगदी थोड्याच वेळात अंधार पण झाला . त्या हॉटेल मध्ये फक्त एका रात्रीपुरताच मुक्काम होता . तिथलीच गोष्ट . खर तर हॉटेल कसलं ते खूप वर्षांपूर्वीच जून घर असावं ( किव्वा भरपूर वर -खाली खोल्या असलेला तिकडचा जुना वाडा असेल कारण जुनाट पणा जाणवत होता ) फक्त त्याच हॉटेल मध्ये रूपांतर केलं होत. तळघरात बऱ्याच पायऱ्या उतरून सात आठ खोल्या आणि वरती दोन मजल्यांवर प्रत्येकी सात आठ खोल्या असा प्रकार होता. रूम मध्ये जायचं म्हटलं तरी खूप भूलभुलैया होता . जिन्यावर कुठेही व्यवस्थित बाण दाखवलेले नव्हते. कुठून खाली जायचं आणि कुठल्या जिन्यावरून वर जायचं ते नीट समजतच नव्हतं . काही वरती गेलेले खाली येत होते. खालचे वरती जात होते . सगळाच गोंधळ

आम्हाला नेमकी तळमजल्यावरची रूम मिळाली होती . कसे बसे जड जड बॅगा खेचत ( नो लिफ़्ट ) इकडचे तिकडचे बाण फॉलो करत खोलीत आलो एकदाचे आणि बाहेरचा उजेड बघून रूम मधली बाल्कनी उघडून पहिल्यांदी पटापट फोटो काढले आणि बाल्कनी लगेच बंद पण केली .बाहेर गारवा होता . प्रत्यक्ष बाल्कनीला कुठलीही जाळी नव्हती किव्वा लोखंड कुंपण पण नव्हतं . बाल्कनी आणि रूम मध्ये संपूर्ण काचेचीच तावदाने असल्याने बाहेरची झाड /झाडी व्यवस्थित दिसत होती . थोडास भीतीदायक वाटत होत खर. नंतर लगेचच बाथरूम चेक केलं . आपण नेहमी दिव्याचं बटण लावतो पण तिथे तो प्रकारचं नाही बटणाच्या जागी गोल चक्र होत ते फिरवायच कि बाथरूम मधला दिवा लागणार .ते पण खटपट केल्या नंतर बऱ्याच वेळानी समजलं . चक्र फिरवून दिवा लागला तर तो सुद्धा लाल लाल . सगळंच धूसर आणि सगळ्या गोष्टी लाल लाल दिसत होत्या . काहीतरी विचित्र वाटत होत. बाथरूम मध्ये जाऊन तोंड नाही धुतलं तर दिवेच गेले "अरे राम" हे काय झालं ?. बाथरूमच्या बाहेर दिव्याचं चक्र . बाहेर येऊन परत ते चक्र फिरवलं आणि दिवे लावले . परत आत गेले तर एक मिनिटात परत दिवे बंद. काय वैताग आहे . चडफडत परत बाहेर येऊन आता मात्र फक्त एक वळसा न देता चांगले सात आठ वळसे दिले . तेव्हा कुठे पाच दहा मिनिट लाईट टिकला . हा काय नवीन प्रकार ? जाऊदे एकाच रात्रीचा तर मुक्काम आहे

ट्रिप मध्ये बरं असत इतके दमलेले असतो कि पटकन झोप लागते . तशीच फटकन झोपही लागली पण रात्री इतकी प्रचंड थंडी होती ( एसी पण खूप असतो काही हॉटेल मध्ये ) कि बाथरूमला जाण्याची वेळ आली. अगदी खर सांगायचं तर काल रात्रीचा तो दिव्याचा प्रकार बघून उठायचं जीवावर येत होत . पण उठले इलाजच नव्हता आणि आता माहिती पण झालं होत चक्राला बरेच वळसे दिले कि दिवा टिकतो . जाऊन आले आणि अंथरुणावर पडले . परत झोपायचा प्रयत्न केला पण काहीतरी विचित्र आवाजाने झोप येईनाशी झाली. तो आवाज कुठला होता ? तर कोणाच्या तरी श्वासोश्वासाचा . अरेच्या असा कसला हा आवाज? मी डोक्यावरून पांघरून घेतलं तर जाणवत होत आपल्या उजव्या साईडला कोणीतरी बसलाय तरी किव्वा झोपलाय आणि श्वासाचा आवाज येतोय . डोक्यावरून पांघरून काढून डोळे फाडफाडून उजव्या साईडला बघतेय तर आवाज गायब परत डोक्यावरून पांघरूण घेतलं तर परत आवाज सुरु . पाच मिनिट पांघरून तोंडावरून काढणे डोळे फाडून बघणे असा प्रॉग्रॅम झाल्यानंतर कधीतरी बंद झाला तो आवाज आणि मगच शांत झोप पण लागली .

सकाळी सहा वाजता हॉटेल सोडायचं होत त्यानुसार लौकर उठून सगळी आवराआवरी झाली. एकदम तयार झालो आणि थोड्याच वेळात रूम च्या बाहेर पडणार अशा स्टेजला आल्यावर मी माझ्या रूम पार्टनरला कालची गोष्ट सांगितली. अग काल काय झाल माहिती आहे का ? आणि काय विचारता ती इतकी घाबरली - इतकी घाबरली कि ती तडक बॅगा घेऊन एका मिनिटात रूमच्या बाहेर . अग अग रूम मध्ये चेक तर करूया काही राहिल नाही ना ? पण तिची ऐकायची तयारी कुठाय ? मी नाही बघत . तूच बघ आणि तूच रूम बंद करून ये. हि मी निघाले .विचार आला बरं झालं काल रात्रीच तिला उठवलं नाही ते Happy

Pages