चाळीतील गमती-जमती (७)

Submitted by राजेश्री on 8 May, 2018 - 21:09

चाळीतल्या गमती-जमती(७)

आमच्या चाळीजवळ आणखी एक लक्षात राहणारी व्यक्ती म्हणजे राणीच्या आई .तर त्यांच्या घरात टीव्ही होती त्यामुळे चाळीतली झाडून सारी बाळ गोपाळ मंडळी रामायण,महाभारत,चंद्रकांता बघायला त्यांच्या घरात ती मालिका सुरू व्हायच्या आधी तासभर तरी दारात घुटमळणार.प्रत्येकाची अमक्या ठिकाणीच बसणार म्हणून तुंबळ युद्ध होऊन मग काही वाटाघाटी,तह होऊन निश्चित जागा ठरल्या होत्या.महाभारतात ,रामायणात होणाऱ्या युद्धाला साक्षी ठेऊन ही युद्ध झाली आहेत.शिवाय मी बाहेर गेल्यावर म्हणजे मालिका संपल्यावर पुन्हा युद्धाचा प्रसंग उद्भवला तर हत्यांरानिशी सज्ज असावं म्हणून बांबूच्या चोयत्याचे धनुष्य,गणगाठीचे बाण अशी युद्धाची पूर्वतयारी करायला कित्येक दिवस त्यात घातले आहेत.जागा निश्चित झाली तरीही आळस देताना हात लागला,उठताना पाय लागला तरी मुद्दाम पाय लावला या कारणास्तव भांडण ठरलेली असायची.राणीच्या आई आमची भांडण असह्य झाली की कधी कधी अचानक येऊन टीव्ही बंद करायच्या .मग काय तुझ्यामूळ तुझ्यामुळं झालं म्हणत तिथंच आमचं धुमसत शीतयुद्ध चालू असायचं.
त्यातल्यात्यात एक नंबरची भांडखोर म्हणून मला नामाधिमान प्राप्त झाले होते.एक तर मी स्वतःहून कुणाची खोडी काढायला जात नव्हते आणि माझी खोडी काढली तर त्याला धडा शिकवल्याशिवाय रहात नव्हते.माझा स्वतःचा असा एक वट होता.माझ्या नादाला फारस कोणी लागायचं नाही.राणीच्या आईना माझ्याबद्दल तीव्र राग आणि संताप असायचा त्यांच्याच घरात जाऊन मी त्यांच्याच मुलीला जागेच्या कारणावरून दोन वेळा तरी बडवून काढलं होत.आणि ही माझी रोजची जागा आहे मी इथंच बसणार म्हणून मी राणीला त्या जागेवरून ढकलून दिल होत.राणी रडत आईकडे गेली पण मायडे आस करायचं असत का सांग...या पलीकडे त्या माझ्यावर काही कारवाई करू शकल्या नव्हत्या.राणीच्या आईची मला टीव्ही बघायला येऊ नको असं म्हणायचीही सोय नव्हती त्याला कारण आमची मम्मी त्या दोघी चांगल्या मैत्रिणी म्हणजे सकख्या शेजारणी होत्या.म्हणजे राणीच्या आईची गरज काय तर एक फुलपात्र भरून गरम गरम धारोष्ण दुधाचा फक्कड चहा आणि त्याबरोबर किमान तासभर तरी गप्पा(किमान बर का!...कमाल ला काही मोजमापच नाही ते त्या त्या मीटिंग मध्ये येणाऱ्या विषयाच्या तीव्रतेवर ठरायचे )आमची मम्मी उत्तम यजमान होती.पण तरीही मी कशी मुलांसारखी वागते,मुलींसारखी शालीनता कशी माझ्याकडे नावालाही नाही,,नाजूकपणा, सहनशीलता या गुणांचा माझ्यात कसा अभाव आहे आणि मी कशी वाया जाण्याच्या मार्गावर आहे हे त्या प्रत्येक गप्पांच्या समारोपात मम्मीला सांगून मग माझ्याकडे एक रागीट कटाक्ष टाकून आमच्या घरातून निघताना,चप्पल घालत बिटुच्या आई, पुन्हा येतो निवांत(दोन तास गप्पा मारून झाल्या तरीगप्पा मारायला म्हणत निघून जायच्या.
त्यांची बसायची एक विशिष्ट पद्धत होती.निवांत भिंतीला टेकून पाय पसरून त्याची तिट्टी घालून दोन्ही हात जुळवून ते गुडघ्याखाली ठेवायच्या त्या.बोलायची पण एक विशिष्ट अशी लकब होती.बोलताना काही तिखट लागल्यासारखा त्या विषयाच्या तीव्रतेनुसार कमी जास्त सुस्कारा सोडत राहणार.कोणता विषय कधी काढायचा आणि काढलेला विषय आपल्याला हवा तितका फिरवून मग तिसऱ्या भलत्याच विषयाला हात घालून समोरच्याला त्यात गुंतवून ठेवण्याची त्यांची विशिष्ट अशी हातोटी होती.तुम्हाला म्हणून सांगते बिटुच्या आई(म्हणजे आमची मम्मी)बोलू नका काय कुठं पासून सुरू होऊन शेवटी मायडी कशी बिघडत चाललीय,मुलांसारख शर्ट पॅन्ट कशाला देता तिला घालायला,स्वयंपाकाच्या नावाने बोंब आमच्या राणीला, तूमच्या तायडीला कसा सारा स्वयंपाक यायला लागला चौथीपासून आणि ही सहावीत असून कशी बघल तवा पोरांच्यात खेळत असते असा त्या माझा उद्धार का करत राहायच्या मला हे आजतागायत कळलेलं नाहीये आज जिथे जाते तिथला बॉस कारण नसताना माझ्याशी खुन्नस घेऊन वागतो तश्याच राणीच्या आई माझ्याशी खुन्नस घेऊन का वागायच्या हा माझा कधीच उत्तर न मिळणारा प्रश्न आहे...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांच्याच घरात जाऊन मी त्यांच्याच मुलीला जागेच्या कारणावरून दोन वेळा तरी बडवून काढलं होत.
>>> Lol... जबरीच...हाहा