ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही

Submitted by कुमार१ on 19 February, 2018 - 00:30

आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत:
ग्लुकोज
मेदाम्ले

ग्लिसेरॉल
किटोन बॉडीज
अमिनो आम्ले
यांपैकी कशाचा वापर उर्जानिर्मितीसाठी करायचा हे पेशीचा प्रकार आणि त्यातली परिस्थिती यानुसार ठरते.
बहुसंख्य पेशींच्या बाबतीत ग्लुकोज हे महत्वाचे इंधन आहे. काही पेशी त्याव्यतिरीक्त इतर इंधनेही वापरू शकतात. पण, रक्तातील लालपेशी मात्र फक्त ग्लुकोजच वापरतात. म्हणजे त्या ‘खाईन तर तुपाशी’ या प्रकारच्या पेशी आहेत. मेंदू सुद्धा शक्यतो ग्लुकोजचीच मागणी करतो पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो इतर इंधन वापरू शकतो.

आहार आणि ग्लुकोजचा पुरवठा

आता एक नजर टाकूया आपल्या रोजच्या आहारावर. आहाराचा ६०-७०% भाग हा कर्बोदकांच्या रुपात असतो. पोळी, भाकरी आणि भात हे आपले पोट भरायचे मुख्य पदार्थ. त्या सगळ्यांत असतो ‘स्टार्च’. तर मांसाहारातून ‘ग्लायकोजेन’ हे कर्बोदक मिळते. मुळात स्टार्च आणि ग्लायकोजेन हे ग्लुकोजचे polymers आहेत. त्यांचे पचनसंस्थेत पूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला भरपूर ग्लुकोज मिळते. तसेच आपण आहारात अनेक गोड पदार्थ, दूध व फळेही घेतो. त्यातून आपल्याला ग्लुकोजची भाईबंद असलेली अन्य काही कर्बोदके मिळतात. ती पचनसंस्थेतून शोषून जेव्हा पेशींत पोचतात तेव्हा त्यांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात कुठलेही कर्बोदक आहारात घेतले तरी पेशींमध्ये शेवटी त्याचे ग्लुकोज बनवले जाते. त्यामुळे ग्लुकोज हेच आपल्या शरीराचे मुख्य इंधन ठरते.
कर्बोदकांच्या पचनातून निर्माण झालेला ग्लुकोज नंतर रक्तात शोषला जातो. रक्तप्रवाहातून तो शरीराच्या सर्व अवयवांना पोचवला जातो. आता तो प्रत्यक्ष पेशीत शिरणे ही एक महत्वाची पायरी असते. यकृताच्या पेशींमध्ये तो अगदी सहज शिरतो पण स्नायू आणि मेदपेशींमध्ये मात्र तसे होत नाही. या दोन्हीकडे शिरण्यास त्याला इन्सुलिनची मदत लागतेच.

पेशींमध्ये ग्लुकोजचा वापर तीन प्रकारे होतो:
१. ५०% लगेचच ऊर्जानिर्मितीसाठी वापर. उरलेला ५०% हा पेशींना लगेच लागणार नसतो. म्हणून त्याचा ‘साठा’ खालील रूपांमध्ये होतो
२. १०% ग्लुकोजचे ‘ग्लायकोजेन’ मध्ये रुपांतर होते आणि
३. ४०% चे रुपांतर मेदात होते.

ग्लुकोजचा साठा करण्याचे मार्ग

आता ग्लुकोजचे जे दोन साठे होतात त्यांचा हेतू समजून घेऊ. इथे मला बँकेत पैसे ठेवण्याच्या ज्या नेहमीच्या पद्धती आहेत त्यांची उपमा द्यावी वाटते. समजा, मला रोज १०० रु. मिळतात. त्यातले ५० मला रोजच्या खर्चासाठी लागतात, म्हणून मी ते घरीच ठेवतो. उरलेल्या ५० मधले १० रु. मला त्या आठवड्यात कधीही लागू शकतात. पण, मला ते घरी ठेवायचे नाहीत कारण ते लगेच खर्च होण्याची भीती वाटते. मग मी ते माझ्या बचत खात्यात ठेवतो. शेवटी जे ४० उरले आहेत ते मला कधीतरी अडीअडचणीतच लागतात. म्हणून मी त्यांची मुदत ठेव बनवतो.

आता वळूया ग्लुकोजकडे. त्याचा १०% साठा हा ग्लायकोजेनच्या रुपात केला जातो. हे संयुग मुख्यतः यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.यापैकी यकृतातील ग्लायकोजेनचे गरजेच्या वेळी अत्यंत वेगाने ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात हे झाले ग्लुकोजचे बचत खाते! आता त्याचा उपयोग बघा. रोज रात्रीचे जेवणानंतर ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या न्याहारीपर्यंत आपण ‘उपाशी’ असतो. तेव्हा मध्यरात्र ते सकाळ या काळात यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. मग सर्व पेशी ते वापरू लागतात. म्हणजेच, रोज दिवसभरात आपण आहारातला ग्लुकोज थेट वापरतो तर रात्रीत हा ‘बचत’ केलेला ग्लुकोज वापरात आणतो.

शेवटी जो ४०% ग्लुकोज उरलाय त्याचे मेदात रुपांतर केले जाते आणि ते मेद (fat) शरीराच्या मेदसाठ्यांमध्ये( adipose tissue) साठवले जाते. हे साठे खर्या अर्थाने ‘fixed deposits’ असतात! जेव्हा काही कारणाने दीर्घकाळ उपोषण घडते, त्या काळात त्यांचे विघटन करून त्यातून काही प्रमाणात ग्लुकोज मिळवला जातो. तसेच त्यातून मिळालेली मेदाम्लेही इंधन म्हणून वापरली जातात.
आपण साठवलेला मेद ही एका अर्थी आपली ‘संपत्ती’च असते. ज्याप्रमाणे व्यवहारातील कुठलीही संपत्ती निर्माण करण्यास मुळात आपल्याकडे भरपूर ‘चलन’ असावे लागते, तद्वत शरीरात जेव्हा ग्लुकोजचा पुरवठा भरपूर असतो तेव्हाच आपण मेदरुपी संपत्ती निर्माण करतो. ज्याप्रमाणे गरजेहून अधिक संपत्ती आयुष्यात कटकटी निर्माण करू शकते त्याप्रमाणे मेदाचे साठेही नको इतके झाल्यास काही व्याधी उत्पन्न होतात.

शरीरातील ग्लुकोजचे कार्य
१. सर्व पेशींमध्ये इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीत वापर
२. ग्लुकोजपासून ribose तयार होते, जे DNA व RNA यांच्या उत्पादनासाठी लागते.
३. पुरुषाच्या जननेंद्रियात ग्लुकोजपासून fructose तयार होते, जे शुक्राणूंना उर्जा पुरवते.
४. स्तनांमध्ये स्तनपानाच्या काळात जे Lactose तयार होते त्यासाठी ग्लुकोज आवश्यक असते
५. ग्लुकोज हा अन्य मेद व प्रथिनांशी संयोग पावतो आणि त्यातून काही महत्वाची संयुगे तयार होतात, जी पेशींच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.
या विवेचनातून लक्षात येईल की ग्लुकोज हा शरीरातील अनेक रासायनिक घटनांचा मूलाधार आहे.

ग्लुकोजचा चयापचय आणि हॉर्मोन्सचे कार्य

जेव्हा आपण नियमित पुरेसा आहार घेतो तेव्हा ग्लुकोजचा ग्लायकोजेन व मेदांच्या रुपात साठा केला जातो. या दोन्ही कामांत इन्सुलिनचा वाटा मोठा आहे. हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. जेवणानंतर जेव्हा आपली ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते तेव्हा इन्सुलिनही अधिक प्रमाणात रक्तात सोडले जाते. ते पेशींमध्ये ग्लुकोजचा व्यवस्थित वापर आणि साठा करण्यात मोलाची मदत करते. त्याच्या या महत्वाच्या क्रियेमुळेच ग्लुकोजची वाढलेली रक्तपातळी अल्पावधीत पूर्ववत केली जाते. तेव्हा पुरेसा आहार आणि इन्सुलिनचे कार्य यांचा मिलाफ होऊनच ग्लुकोजपासून मेदनिर्मिती होते.

जेव्हा बऱ्याच तासांसाठी आपण आहार घेत नाही तेव्हा शरीरातील घडामोडी बघू. सुरवातीस रक्तातील ग्लुकोज पेशींकडून वापरले जाते. ते बऱ्यापैकी वापरल्यावर त्याची रक्तपातळी कमी होऊ लागते. आता हा ‘संदेश’ अन्य काही हॉर्मोन्सकडून टिपला जातो आणि ती अधिक प्रमाणात स्त्रवू लागतात. या हॉर्मोन्समध्ये प्रामुख्याने ‘ग्लुकॅगॉन’ व ‘एपिनेफ्रीन’ चा समावेश आहे. मुळात ही दोन्ही ‘इन्सुलिन-विरोधी’ गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती या बरोबर इन्सुलिनच्या विरुद्ध असतात. आता ती कार्यरत झाल्यावर यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. जोपर्यंत पुढील अन्नग्रहण होत नाही तोपर्यंत हे ग्लायकोजेन ग्लुकोजची रक्तपातळी टिकवते. जास्तीतजास्त १६ तासांच्या उपासापर्यंत हा ग्लायकोजेनचा साठा टिकतो.

समजा, आता एखाद्याने त्याहीपुढे उपोषण करायचे ठरवले तर काय होते ते पाहू. आपण वर पाहिले आहे की लालपेशी आणि मेंदू यांना सतत ग्लुकोज लागतेच.त्यामुळे आता ती पातळी टिकवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया यकृतात होते. तिला ‘नव-ग्लुकोज निर्मिती’ असे म्हणतात. ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीरातील प्रथिने आणि मेद यांच्या विघटनातून ग्लुकोज तयार होतो आणि मग रक्तात सोडला जातो. किंबहुना या अनोख्या क्रियेमुळेच माणूस( मर्यादित काळाचे) उपोषण करूनही जिवंत राहतो. या प्रक्रियेस गती देण्याचे काम
ग्लुकॅगॉन व एपिनेफ्रीन ही हॉर्मोन्स करतात.

रक्तातील ग्लुकोजची योग्य पातळी
आपले खाणे आणि ही पातळी यांचा थेट संबंध आहे. सकाळी उपाशी पोटी ही सर्वात कमी असते( ७० – १०० mg/dL ). जेवणानंतर ती वाढू लागते आणि एक तासाने ती सर्वोच्च असते. दरम्यान जे वाढीव इन्सुलिन स्त्रवलेले असते त्याच्या प्रभावाने ती पुढील तासाभरात बऱ्यापैकी खाली येते. निरोगी अवस्थेत जेवणानंतर दोन तासाने ती १४० mg /dL चे आत असते. ज्या लोकांचा जेवणानंतरचा ‘इन्सुलिन-प्रतिसाद’ अत्युत्तम असतो, त्यांचे बाबतीत तर ती उपाशी-पातळी इतकी खाली येते.
आपण आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जेवढे वाढवू त्याच प्रमाणात स्वादुपिंड अधिक इन्सुलिन सोडते. ग्लुकोजची पातळी खाण्यानंतर बेफाम वाढू नये यासाठीच इन्सुलिनचा लगाम आपल्याला निसर्गाने दिला आहे. इन्सुलिन आणि इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वयाने संपूर्ण २४ तासांत ग्लुकोज-पातळी नियंत्रित राहते.

बिघडलेल्या ग्लुकोज-पातळीचे परिणाम

जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन आणि त्याविरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वय बिघडतो तेव्हा अर्थातच ग्लुकोजची रक्तपातळी जास्त वा कमी होते. या दोन स्थिती अशा:
१. ग्लुकोज अधिक्य(hyperglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) इन्सुलिनची कमतरता
आ) इन्सुलिनचा पेशींवर प्रभाव न पडणे (resistance)
इ) इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्सचे अधिक्य
यापैकी (अ) आणि (आ) मिळून जो आजार होतो तोच ‘मधुमेह’. मधुमेह हे अवाढव्य प्रकरण असून तो एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही.

मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे! निरोगी अवस्थेत या दोघांचा कसा सुंदर मिलाफ होतो ते आपण पाहिले आहे. किंबहुना ही पूर्वपीठीका समजून घेणे हे मधुमेहाबद्दल वाचण्यापूर्वी आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कार्याअभावी गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात साठून राहतो कारण तो पेशींमध्ये शिरू शकत नाही. मग हा साठून राहिलेला ग्लुकोज ‘बिनकामाचा’ ठरतो आणि तो कटकटीही निर्माण करतो.

२. ग्लुकोज-कमतरता (hypoglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) जे मधुमेही इन्सुलिनचे उपचार घेत असतात त्यांच्यात कधीकधी त्याचा ‘ओव्हरडोस’ होतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज जास्त प्रमाणात पेशींत शिरते आणि त्याची रक्तपातळी नको इतकी कमी होते.
आ) अतिरिक्त मद्यपान : जर एका बैठकीत फाजील मद्यपान केले आणि त्यानंतर अन्न खायची शुद्धी राहिली नाही तर हा बाका प्रसंग ओढवतो. अल्कोहोलच्या प्रभावाने पेशींमधील नव-ग्लुकोजनिर्मितीस मोठा अडथळा होतो.

जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होत होत ४० mg/dL इतकी उतरते तेव्हा रुग्णात लक्षणे (चक्कर, आकलन न होणे) दिसू लागतात. याहीपुढे जर पातळी २० mg/dL चे खाली उतरली तर मात्र रुग्ण बेशुद्ध पडतो. ही स्थिती धोकादायक असते आणि तेव्हा रुग्णास तातडीने ग्लुकोज पुरवावे लागते.

.....तर असे हे ग्लुकोज – आपले महत्वाचे इंधन. आपल्याला क्षणोक्षणी लागणारे. तसेच आपल्या पेशींचा रासायनिक मूलाधार. मात्र त्याची रक्तपातळी योग्य प्रमाणातच हवी. ती फार जास्त झाल्यास कटकटीची तर फार कमी झाल्यास धोकादायक ठरणार. आपणा सर्वांची ती कायम आटोक्यात राहो या सदिच्छेसह लेख संपवतो.
**************************************************************************************************
टीप: आरोग्य लेखमालेतील या १०व्या लेखाबरोबरच ही माला आता थांबवत आहे. यादरम्यान वाचकांनी जे अजून काही विषय सुचवले आहेत त्यावर आता चिंतन व मनन करेन. कालांतराने त्यावर स्वतंत्र लेख लिहीता येतील. आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे. जेवढे तज्ञ तेवढे सल्ले आणि सामान्य माणसाचा गोंधळ !

आहाराचे सर्वसाधारण सूत्र असे असावे :
1. दिवसभराचे उष्मांक स्थिर व आटोक्यात ठेवणे महत्वाचे. त्यासाठी आहारतज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
2. पारंपरिक कौटुंबिक आहाराचे जे दैनंदिन घटक आहेत ते बदलायची गरज नाही (पोळी/भाकरी, इत्यादी).

3. मात्र एका जेवणातले मुख्य धान्य एकच ठेवणे उपयुक्त व अनुभवसिद्ध आहे. म्हणजे फक्त पोळी किंवा फक्त भाकरी, इ. एका जेवणात पोळी आणि भात एकत्र घेणे टाळल्यास फायदा होतो.

4. गोड पदार्थांवर बहिष्कार टाकायची काही गरज नाही पण एखाद्या दिवशी ते आवडीने खाल्ल्यास त्या दिवशी पोळी/ भात यांचे प्रमाण कमी करून टाकायचे.
5. हे महत्त्वाचे : सगळे खावे पण माफक प्रमाणात (मुद्दा 1). शरीराच्या वजनावर नियंत्रण पाहिजे.

गोड तर खायचे आहे पण साखर नाही खायची.

अशा लोकांनी गोड पदार्थ खाण्यासाठी शुगर फ्री टॅब वापरा आणि बिन्धास्त गोड खा.
असा समज समाजात प्रसार माध्यम नी पसरवला आहे.

चहा ची सवय आहे पण मधुमेह आहे गोड च चहा आवडतो.
वापरा शुगर फ्री ( रासायनिक साखर).
मिठाई आवडते पण मधुमेह आहे.
वापरा sugar फ्री वाली मिठाई.
हसावे की रडावे तेच कळतं नाही.
अगदी सुशिक्षित लोक पण ह्या प्रचाराला बळी पडतात.

आता नवीन च फॅड आले आहे .
ग्लूटेन शरीराला धोकादायक ( कोणी ठरवले भगवान जाणे))
मग.
ग्लूटेन फ्री आटा.
ग्लूटेन फ्री अनेक खाण्याचे पदार्थ डब्बल भावा मध्ये विकले जातात.
आणि शिक्षित लोक पण त्याला बळी पडतात.
ग्लूटेन मुक्त आहार घेतल्या मुळे अतिशय गंभीर शारीरिक समस्या निर्माण होतात.
शुगर फ्री ही रासायनिक गोड पण देणारी साखर शरीरावर खूप गंभीर परिणाम करते.
ह्याचा मात्र प्रचार होत नाही
दुर्दैव आहे

भारतातील मधुमेह आणि संबंधित आजारांचे प्रमाण (prevalence ) या संदर्भात आयसीएमआरने जुलै 2023 मध्ये अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यातील ठळक विदा :
हे सर्वेक्षण सन 2008 - 2020 या दीर्घ कालावधीत केलेले आहे. ३१ राज्ये (केंद्रशासित प्रदेशासह) यात घेतली होती
. शहरी व ग्रामीण दोन्ही विभाग समाविष्ट

. त्यात २० वर्षावरील सुमारे 1.13 लाख प्रौढ सहभागी झाले. त्यांच्यात आजाराचे प्रमाण असे दिसून आले :
1. मधुमेह ११.४%
2. मधुमेहपूर्व अवस्था १५%
3. लठ्ठपणा २८%
4. उच्च रक्तदाब ३५%
5. मेदबिघाड ८१%

मधुमेहपूर्व अवस्था वगळता वरील यादीतील सर्व आजार शहरी भागात अधिक प्रमाणावर दिसून आले.

https://www.thelancet.com/journals/landia/article/PIIS2213-8587(23)00119-5/fulltext

(ARTICLES| VOLUME 11, ISSUE 7, P474-489, JULY 2023)

शहरी आणि ग्रामीण मध्ये जास्त फरक नसावा.
आहार शैली लोकांची ह्या काही दशकात पूर्ण बदलेली आहे.
आणि व्यायाम ,शारीरिक मेहनत कमी झाली आहे.

स्ट्रेस खूप वाढला आहे.
Kg पासून मार्क जास्त मिळवण्याचे टेंशन मुलाना असते.
एक च पालक असल्या मुळे आणि ते पण कामात बिझी असल्या मुळे मुलांची मानसिक,शारीरिक स्पर्श ची गरज पूर्ण होत नाही त्यांना एकटे वाटते.
पहिले एकत्र कुटुंब होती त्या मुळे पालक खूप होते( पालक म्हणजे मुलाना सांभाळणारे biological आई वडील नव्हे.
स्पष्ट करू ध्या बाबा इथे हुशार लोक पण आहेत.)
ह्या सर्व घटकांचा परिणाम आज च्या तरुण पिढी वर झाला आहे.
चार दशके पहिले आम्ही शालेय शिक्षण घेत होतो आणि दहावी त च थोडे अभ्यास ,शिक्षण ह्याचे दडपण होते .
दहावी पर्यंत शाळा म्हणजे हसत खेळत शिक्षण.
कोणी गंभीर नव्हते.
ना पालक ना मुल.

आहार मात्र खूप बदलला आहे मुलांचा.

आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी कडे कोणी लक्ष देत नाही त्या वर बिलकुल चर्चा होत नाही.
हायब्रीड जाती.
माझ्या आयुष्यात मी बघितले ते.
पहिला.
पसरा भुईमूग त्याला जपानी म्हणायचे तो पसरायचा तो उपटून उपटला जायचं नाही.
कारण वेली सारखा तो जमिनीत पसरायचा.
पण कार्यकाळ चार ते साडे चार महिने
पण कार्यकाळ चार पाच महिन्यांचा होता.
. उपट्या .
हा लाल शेंगदाणे असणारा भुईमूग ह्या मध्ये तेल जास्त होते.
पहिले ज्वारी पेक्षा अरगड जास्त असायची ७ ये ९ फूट उंच .
भाकरी एकदम सफेद .
नंतर हायब्रीड आली.
आंब्याची झाडे पहिले खूप मोठं मोठी एका झाडाला दहा हजार पर्यंत आंबे असायचे.
पण हे झाड हळू हळू वाढते पण त्याचे आयुष्य पण जास्त असते.
आता कलमी झाडे आयुष्य कमी ,आणि लवकर फळ देणारी.
दुधी किंवा तत्स्तंम फळ भाज्यांना सरळ हार्मोन्स ची इंजेक्शन दिली जातात.
आकाराने खूप मोठी आणि दिसायला देखणी फळ भाजी देणारे.
दूध .
एक गाय ३० ते ४५ ltr दूध देते नैसरिक capacity चार ते पाच ltr चीच आहे.
.ही काही उदाहरणे दिली.
रासायनिक खते,औषध ,कीटक नाशक इत्यादी खूप मोठा विषय आहे.

एकंदरीत एकच अर्थ आहे अन्न चा दर्जा खूप घसरला आहे.
पण हे कोणी मान्य करत नाही ना ह्या वर चर्चा होत.
तुम्ही बदाम खा आताचे ते तुम्हाला पोष्टिक सत्व देतील च ह्याची काही खात्री नाही.
देशी कोंबड्या महिन्यातून फक्त १५ दिवस च अंडी देतात.
बॉयलर रोज अंडी देतात.
पावटा ज्याला शहरी भाषेत वाल म्हणतात .
पहिले हे पीक जून मध्ये पेरले की डिसेंबर मध्ये त्याला शेंगा यायच्या हल्ली दोन तीन महिन्यात च शेंगा येतात हायब्रीड बियाणे
काय दर्जा असणार आहे.

ह्या सर्वात एक गोष्ट कॉमन आहे कमी काळात धान्य, फळ,भाज्या परिपक्व करणे.

हाच नियम माणसाला लावला आणि जे ९ महिने लागतात मुलाची पूर्ण वाढ होण्यासाठी तेच मुल ३ महिन्यात तयार केले
विविध हार्मोन्स बाहेरून देवून.तर .
त्याचा काय दर्जा असेल.
तीन महिन्यात मुल तयार करून मानवी गर्भ धारणेचा काळ आज पर्यंत दोन तीन महिने का केला नाही..
तूर खरिब हंगामात पेरली जायची आणि रब्बी हंगामात तयार व्हायची.
तुरी वर रब्बी पीक घेता येत नव्हते.
किती मोठं कार्यकाळ होता

मानवावर लवकर मुल जन्म घालण्याचे प्रयोग करणार च नाहीत.
नाही तर

धोके लगेच दिसतील आणि सर्व पितळ उघडे पडेल.

रासायनिक खते,औषध ,कीटक नाशक इत्यादी खूप मोठा विषय आहे.
>>> अगदी महत्त्वाचे आहे हे बरोबर.
यातल्या बऱ्याच गोष्टीबाबत सामान्य माणूस काही करू शकत नाही.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये 16 ते 18 या वयोगटातील तब्बल 39% मुली मधुमेहपूर्वस्थितीत आहेत हे एका सर्वेक्षणात दिसून आले.
सदर माहिती मुंबईत भरलेल्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेत देण्यात आली.

( बातमी : छापील मटा, 9 जानेवारी 2024)

हो, ही बातमी काल टीव्ही वर ऐकली. 39% हे प्रमाण ऐकून धक्का बसला. ग्रामीण भागातील मुली म्हणजे बैठी व आरामदायी जीवनशैली असणाऱ्या नसतील. शिवाय त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये सुद्धा स्थानिक आणि पारंपारिक अन्नाचा समावेश जास्त असतो. असे असतानाही 39% किशोरवयीन मुली मधुमेह पूर्वस्थितीमध्ये कशा आल्या असतील .

हा सर्वे काही विशिष्ट बदल, लक्षणे आढळून आली म्हणून केला गेला की एखाद्या संशोधनाचा भाग होता?

ग्रामीण भागात पण आता जीवन शैली बदलली आहे.आई वडील गरिबी असली तरी मुलाना काम लावत नाहीत.
शिक्षणकडे च फक्त लक्ष द्यायला सांगतात.
टीवी वरील मालिका आणि जाहिराती ह्या मुळे आहार पण चुकीचा झाला आहे.
पोहे जावून सँडविच आले आहे.
दूध दही जावून कॉल्ड ड्रिंक आले आहे.
फास्टफुडवर जास्त जोर असतो.

आधुनिक असणे म्हणजे fastfood खाणे,cold drink pine असे विचित्र विचार आज ची पिढी करते

त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये सुद्धा स्थानिक आणि पारंपारिक अन्नाचा समावेश जास्त
>>> मला याबाबत शंका वाटते.
एकंदरीत सर्वत्र खाद्य संस्कृतीचे सपाटीकरण झालय. त्यामुळे पावभाजी व पिझ्झा तिथेही पोहोचले असावेत असा माझा अंदाज आहे !
त्यांचे HDL- कोलेस्टेरॉल सुद्धा कमी असल्याचे दिसले आहे. >>>>> यावरून त्यांच्या व्यायामाबाबत काय अंदाज बांधावा ? समजत नाही.

हे सर्वेक्षण prediabetes to diabetes : the trajectory of concern या उपक्रमांतर्गत केले गेले. त्याचा वैज्ञानिक संदर्भ मात्र जालावर सापडला नाही.

अजून एक :
मधुमेहाची कारणमीमांसा तशी गुंतागुंतीची आहे. नेहमीच्या माहीत असलेल्या घटकांव्यतिरिक्त खालील गोष्टींमुळे सुद्धा तो होण्याचा धोका वाढतो :
1. दीर्घकालीन कुपोषण : यामुळे स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींवर विपरीत परिणाम होतात.
2. पर्यावरणातील प्रदूषके

वरील माहिती संदर्भात या दोन घटकांचाही आपल्याला विचार करावा लागेल. मधुमेह होण्यास ( इतर घटकांच्या जोडीने) अतिपोषण आणि कुपोषण हे दोन्हीही जबाबदार आहेत.

आपण ज्याला ग्रामीण भाग म्हणतो तिथे आपल्याकडे असणार्‍या बहुतांश गोष्टी पोचल्यात. माझ्या पुतण्याच्या वाढदिवसाला इथे मिळतात तसे केक असतात. एका लांबच्या शाळकरी भाचीला व्हेज मंचुरियन आवडतं.
माझ्या पुतण्याचं पोट सुटलं आहे. त्याला डबल चिन आहे. शाळा शेजारच्या गावात होती. आता ज्यु कॉलेज शेजारच्या दुसर्‍या गावात. दोन्हीकडे तो वाहनानेच जायचा. मैदानी खेळ नाहीत. मोबाईल हा सोबती.

मला गावी जाऊन दशकं लोटली. तेव्हा गावी एस टी जात नसे. रिक्षाही फार कमी होत्या. रात्री बारा वाजता आम्ही शेजारच्या गावाहून सामान घेऊन मैलभर चालत गेलो होतो. घरात फक्त ओसरीवर एक बल्ब असे. आता घरात वॉशिंग मशीन आहे.

बरोबर.

धाग्याच्या पान २ वर मी एका जागतिक अहवाला संबंधी लिहिले आहे. त्यातली दोन वाक्य पुन्हा घेतो :

१. एकूण मधुमेहींच्या तीनचतुर्थांश लोक अल्प व मध्यम आर्थिक उत्पन्न असलेल्या देशांमधले आहेत
२. भविष्यकाळात या आजारात जागतिक वाढ होणार असून ती प्रामुख्याने आफ्रिका, जागतिक मध्यपूर्व आणि दक्षिणपूर्व आशियात होणार आहे.

एकंदरीत पाहता या आजाराने श्रीमंत /गरीब, शहरी/ ग्रामीण, मध्यमवयीन/ तरुण असे सर्व भेद मिटवून टाकलेले आहेत.
मधुमेहपूर्व अवस्था ही तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बऱ्याच देशांमध्ये तिचे निदानही होत नाही.

लठ्ठपणाची जागतिक समस्या
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवलानुसार जगभरात मिळून एक अब्जाहून अधिक व्यक्ती लठ्ठ आहेत; त्यामध्ये मुले, किशोर आणि प्रौढ या सर्वांचा समावेश होतो.

1990 ते 2022 या दीर्घ कालावधीत मुलांमधला लठ्ठपणा चौपट वाढलेला आहे

https://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(23)02750-2/fulltext

https://www.loksatta.com/sampadkiya/features/ncpcr-bans-sale-of-horlicks...
एनसीपीसीआर म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स या आस्थापनेने नुकतीच सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्राहक व्यवहार विभागांना नोटीस पाठवून बोर्नव्हिटासह तत्सम कोणतीही पेये आरोग्यदायी पेये म्हणून विकली जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे.

..... बालरोगतज्ज्ञांनी मात्र या कंपन्यांचे दावे खोडून काढले होते. त्यांच्या मते आरोग्यदायी पेये म्हणून मुलांना दिल्या जाणाऱ्या पेयांमध्ये असलेली साखर मुलांच्या रोजच्या हालचालींसाठी अतिरिक्त ठरते. या साखरेचे सेवन केल्याने मुलांमध्ये तृष्णा, चिडचिड, थकवा इत्यादी गोष्टी वाढू शकतात. आरोग्यदायी पेय म्हणवल्या जाणाऱ्या पेयांमुळे प्रत्यक्षात मुलाचे आरोग्य सुधारत नाही.

ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे! मी जेव्हा "माऊ (माझी लेक) दूध नाही प्यायली तरी चालेल, पण मी हॉर्लिक्स बिर्लिक्स वगैरे देणार नाही.. " असं म्हटलं तर मला लोकांनी मूर्खात काढलं होतं! Uhoh
कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे, पण रोज नाही. मे महिन्यात किंवा सुट्टीत सगळी भावंडं जमल्यावर धिंगाणा घालायच्या आधी एक डंपरभरून बोंटा (बोर्नविटा) पितात आणि मग थेट जेवायला उगवतात पोरं. तेवढाच बदल ठीक आहे. रोज नाही यावर आम्ही ठाम आहोत.
मला/ कुटुंबाला नाही इतक्या उठाठेवी आजूबाजूच्यांना माझ्या लेकीसाठी होत्या. ती अपुर्‍या वजनाची होती पण काटक होती आणि आहे. आता तर वजन आणि उंची वयाच्या प्रमाणात योग्य आहे. तरी "बारीकच दिसते किती! काहीतरी एनर्जी ड्रिंक दे तिला.. " असं म्हणायला तयार असतात लोक :कपाळावर हात:

मी जेव्हा "माऊ (माझी लेक) दूध नाही प्यायली तरी चालेल, पण मी हॉर्लिक्स बिर्लिक्स वगैरे देणार नाही.. " असं म्हटलं तर मला लोकांनी मूर्खात काढलं होतं!..कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे..रोज नाही यावर आम्ही (मी) ठाम आहोत.
same with me..
यात हॉर्लिक्स bournvita बरोबर मला अ‍ॅमवेची प्रोटीन पावडर देण्यासाठीही एकाने इतकं पिडलं होतं की शेवटी संबंध बिघडले आमचे..!!

मधुमेहाच्या रुग्णांना जी औषधं सांगितली जातात, त्यांमध्ये ‘रसायनं’ असतात आणि म्हणून ही औषधं ‘घातक’ आहेत, असा प्रचार करणाऱ्या जाहिरातींचा सध्या सुळसुळाट आहे. मधुमेहापासून रुग्णांची “सुटका” करू पाहाणाऱ्या कितीतरी ‘डायबेटिस रिव्हर्सल प्रोग्राम’च्या जाहिरातींचा भडिमार इंटरनेटवरून सुरू असतो.

या संदर्भात शास्त्रीय विश्लेषण करून गैरसमज दूर करणारा डॉ. उपेंद्र कौल ( हृदयरोगतज्ञ) यांचा हा लेख चांगला व उपयुक्त आहे :
https://indianexpress.com/article/opinion/columns/diabetes-reversal-prog...

हाच लेख लोकसत्तामध्ये (इ-मेल नोंदणी करून) मराठीत वाचता येईल :
https://www.loksatta.com/sampadkiya/features/before-blaming-diabetes-dru...

लेख वाचला, पटला.धन्यवाद डॉ कुमार.
घरात क्रॉनिक डायबिटीस वाले काही जण असल्याने यावर अभ्यास आणि वाचन आहे.त्यावरून हे विस्कळीत स्वगत:

रिव्हर्सल वाले (मला सध्या चालू आणि फेसबुकवर भरपूर पब्लिसिटी करणारे 2 माहीत आहेत) यापैकी 1 कंपनी पूर्णपणे व्यायाम, जवळजवळ व्हेगन कडे जाणारी आणि पालेभाज्या, डाळ आहार पद्धती, शरीराचा अल्कलाईन समतोल वाढवायला सांगते.हे 3 किंवा 6 महिने केल्यावर, इन्सुलिन रेझिस्टन्स आटोक्यात आणल्यावर बक्षीस म्हणून अगदी थोडे स्वीट किंवा आवडते कार्ब या व्यक्ती खाऊ शकतात.

दुसरी कंपनी स्टेट ऑफ आर्ट सेन्सर कायम शरीरावर ठेवून ए आय आणि डाटा अनालिसिस ने कोणाच्या शरीरावर कोणता पिष्टमय पदार्थ साखर किती वाढवतो, कोणता फार परिणाम न होता खाता येतो याचा अभ्यास करून प्लॅन्स सुचवतात.म्हणजे सेन्सर ने श्रीखंडाला क्लीन चिट दिली तर कंपनी 2 वाले लिमिटेड प्रमाणात श्रीखंड खाऊ शकतात.

'गोळी बंद होणे' म्हणजे 'गोळीशिवाय शुगर योग्य अपेक्षित आकड्यात, रिव्हर्सल/रिमिशन' ही सुद्धा तात्पुरती अवस्था आहे असे कंपनी नंबर 1 वाले त्यांच्या प्राथमिक 250रु वाल्या ओळख सेशनमध्ये स्पष्ट सांगतात.'रिव्हर्सल इज अलसो रिव्हर्सिबल' असे.

मला कंपनी नंबर 2 थोडी जास्त 'नॉन-डॉक्टर' वाटली.ते ऍप आणि सेन्सर्स वर खूप जास्त भर देत होते.

डायबिटीस हा चांगल्या डायबेटोलॉजिस्ट कडे नियमित भेट, स्ट्रेस आटोक्यात ठेवणे,जीवन पद्धती आणि आहाराचे सतत निरीक्षण, स्वतःचा संयम आणि घरच्यांची साथ असा असिधाराव्रत आजार आहे. कंपनी नंबर 1 काय, 2 काय, हे 'डॅमेज कंट्रोल' करतात.औषधे बंद करा, कायमची बंद होतील हे कोणी सांगत नाही आणि सांगू नयेही.

मधुमेही लोकांचे केअर गिव्हर, कुक,जिवलग यांच्या मुलाखती घेतल्या तर ते बरेच इंटरेस्टिंग अनुभव आणि माहीत असलेलं पण अप्लाय का होत नाही यातले रोडब्लॉक सांगतात.

अनु, धन्यवाद !
औषधे बंद करा, कायमची बंद होतील हे कोणी सांगत नाही आणि सांगू नयेही.
>>>> +१
...
मधुमेहपूर्व अवस्थेत ( निरोगी आणि मधुमेही यांच्या दरम्यानची संक्रमण अवस्था) परावर्तन शक्य होऊ शकते आणि तितकेच सांगणारे डॉक्टर्स प्रामाणिक वाटतात. बाकी जाहिरातबाजी भरपूर चालू आहे...

… डायबिटीस हा चांगल्या डायबेटोलॉजिस्ट कडे नियमित भेट, स्ट्रेस आटोक्यात ठेवणे,जीवन पद्धती आणि आहाराचे सतत निरीक्षण, स्वतःचा संयम आणि घरच्यांची साथ असा असिधाराव्रत आजार …..

सहमती, अनुमोदन !

जागतिक आरोग्य दिनानिमित्त (७ एप्रिल) सर्वांना उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा !

सद्यस्थितीत भारतातील प्रमुख आजारसमस्या अशा आहेत :
१. सर्वच राज्यांमध्ये बिगर-संसर्गजन्य रोग आणि अपघाती इजा यांचे प्राबल्य आहे. या दोन समस्यानी मिळून, संसर्गजन्य रोग आणि बालरोग यांना मागे टाकले आहे.
२. परंतु उत्तरेकडील गरीब राज्यांमध्ये मात्र हगवण, श्वसनविकार, लोहन्यूनता, क्षयरोग आणि नवजात बालकांचे आजार या प्रमुख समस्या आहेत.

३. बिगर-संसर्गजन्य रोगांमध्ये, हृदयविकार, मधुमेह, श्वसन अडथळ्याचे विकार, मनोविकार, मेंदूविकार, कर्करोग, हाडांचे विकार आणि दीर्घकालीन मूत्रपिंड विकारांचा प्रामुख्याने समावेश आहे.

४. विविध आजारांचे धोके वाढवणारे घटक असे दिसले आहेत :
*कुपोषण आणि अतिपोषण
*उच्च रक्तदाब
*उपाशीपोटीची वाढलेली ग्लुकोज पातळी
*वाढलेली कोलेस्टेरॉल पातळी
या घटकांचा वाटा एकूण आरोग्यसमस्यांच्या एक चतुर्थांश आहे.

असे हे सर्वसाधारण चित्र.

बोर्नविटा आणि नेसलेचे सेरेलॅक या पूरक आहार उत्पादनांना भारतात चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. या उत्पादनांमध्ये मुलांच्या आरोग्याला घातक ठरेल इतक्या मोठ्या प्रमाणात साखर आढळली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/t10-april-20-2024/6-why-a-popular-ba...

प्रथिन समृद्ध बटाटे ! : नवे संशोधन
बटाटा हा अनेकांना खाण्यास अत्यंत प्रिय असतो. परंतु त्यातील गच्च भरलेल्या स्टार्चमुळे तो ग्लुकोज निर्देशांकाच्या बाबतीत काळजी उत्पन्न करतो. यावर उपाय म्हणून इसराइलमधील संशोधकांनी जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या मदतीने PoLoPo या प्रकारचे नवे बटाटे तयार केले असून ते प्रथिनसमृद्ध आहेत.

सन 2026 मध्ये ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकतील.
https://potatoes.news/polopo-superaa-platform-demonstrates-protein-produ...
..

या संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे, गरीब देशांमधील कुपोषित बालकांसाठी या नव्या बटाट्याच्या रूपाने एक चांगला (बऱ्यापैकी) स्वस्त आणि मस्त प्रथिनयुक्त आहार उपलब्ध होईल.

वा! वा!
नुकतंच मधुमेहरुपी वेताळानं मानगूट पकडली असल्याचं ध्यानी आलं आहे. त्याच वेळी हा उपयुक्त माहितीने ठासून भरलेला लेख आपसूक पुढे येणे हा एक शुभसंकेतच मानला पाहिजे. डॉ कुमार१ यांचे विशेषेकरून आणि सर्व माबोकर प्रतिसादकांचे आभार..

मधुमेहरुपी वेताळानं मानगूट पकडली
>>> हरकत नाही,
परंतु योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि गरजेनुसार औषधांच्या मदतीने त्याच्याशी सामना करू शकाल अशा शुभेच्छा देतो !

Pages