भुकेले आणि माजलेले

Submitted by कुमार१ on 18 April, 2017 - 07:47

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.

प्रसंग तिसरा
:

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

तात्पर्य
: भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण?
फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.

( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
*************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे बरंय, उद्या शंपेन ची नासाडी होते म्हणून ती उडवू नका म्हणाल

जोक्स अपार्ट, आम्ही याला पर्याय म्हणून आता क्रीम वाला केक आणत नाही, त्याऐवजी ग्रीन बेकरी किंवा पूना बेकरी च ताजा मस्त फ्रुट, स्पंज केक आणतो, स्वस्त पडतो, खाल्ला जातो, अनाठायी क्रीम आणि बाकी वाया जात नाही आणि पोटभरीचा

हल्ली माजाची एक नविनच किळसवाणी पद्धत अंमलात आणली जाते
ती म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशी केक कापल्यावर तो तोंडाला फासणे
>>> अरेरे!!! कीव येते असा प्रकार करणाऱ्यांची.

हल्ली माजाची एक नविनच किळसवाणी पद्धत अंमलात आणली जाते
ती म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशी केक कापल्यावर तो तोंडाला फासणे>>> >+१
अगदी काहीही प्रकार आहे हा.

>>> हे बरंय, उद्या शंपेन ची नासाडी होते म्हणून ती उडवू नका म्हणाल <<<
हे पा, अट्टल मद्यपी तसेच म्हणेल... तस तर प्यायला सुरुवात करताना ग्लासात दोन बोटे बुडवुन दोन ठिपके बाहेर बाजुला उडवून वाया घालविणे देखिल त्याच्या जीवावर येते Proud
फक्त त्यास कोणी अन्निसवाले भेटलेले नसल्याने/भेटणारही नसल्याने, तो ते दोन ठिपके "बाजुला उडविण्याची" (अंध)श्रद्धा सुखनैव पण दोन ठिपके वाया जातात म्हणून नाखुषीने पाळतो.

>>फक्त त्यास कोणी अन्निसवाले भेटलेले नसल्याने/भेटणारही नसल्याने, तो ते दोन ठिपके "बाजुला उडविण्याची" (अंध)श्रद्धा सुखनैव पण दोन ठिपके वाया जातात म्हणून नाखुषीने पाळतो.<<
अहो लेमनटेमनजी अतृप्त आत्मे शांत करण्यासाठी 'शास्त्रापुरत' कराव लागत तसं मला पण. बहुतांशी अतृप्त आत्मे हे आपलेच मित्र असतात. Happy

"हल्ली माजाची एक नविनच किळसवाणी पद्धत अंमलात आणली जाते ती म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशी केक कापल्यावर तो तोंडाला फासणे" - लिंबु जी, जरा काटा दक्षिणेकडे सरकावून बघा. मी काही दक्षिणात्य मुलांच्या अपार्ट्मेंट मधे केक च्या बरोबरीनं फ्रीझ मधले बरेचसे अन्नपदार्थ असे वाढदिवसाला फासायला काढलेले बघितले आहेत. अत्यंत किळसवाणा प्रकार असतो तो. अन्नाची नासाडी एका वेगळ्याच लेव्हल ला नेऊन ठेवतात.

फ्रीझ मधले बरेचसे अन्नपदार्थ असे वाढदिवसाला फासायला काढलेले बघितले आहेत. अत्यंत किळसवाणा प्रकार असतो तो. अन्नाची नासाडी एका वेगळ्याच लेव्हल ला नेऊन ठेवतात. >>>

फिरून या सर्व प्रकारच्या वागणुकीतून एकच निष्कर्ष निघतो ही हा सगळा सुबत्तेतून आलेला माज आहे.
हा माज इतका असतो की तो लहानपणी झालेल्या चांगल्या संस्कारांना गाडून टाकतो. काहींच्या बाबतीत तर चांगले संस्कार झालेलेही नसतात.

"सुबत्तेतून आलेला माज आहे.' - कुमार, सुबत्तेतुन माणसं humble ही होतात. ही कुठेतरी अतृप्त राहिलेली खदखद असू शकेल. हे वाक्य तुमच्या गर्दीच्या धाग्यावर सुद्धा लागू होईल.

अचानक आलेल्या सुबत्तेतून माणसे नम्र ही होतात आणि माजतात ही, दोन्ही प्रकारची माणसे बघण्यात आहेत. सत्व, रज, तम हा भाव स्वभाव असतो... सारख्या स्वभावाची माणसे लगेच एकत्र जमतात, त्यातून ग्रुप तयार होतो आणि मग असे पदार्थ फासण्याची 'संस्कृती' उदयाला येते

शेवटचे तीन प्रतिसाद.

पहिला का आला ते तर समजतंच आहे. पण दुसरा अन तिसरा असे मस्त स्टेडियमबाहेर मारलेले षट्कार आहेत!

हल्ली माजाची एक नविनच किळसवाणी पद्धत अंमलात आणली जाते
ती म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशी केक कापल्यावर तो तोंडाला फासणे/>>>>> अगदीच. किळसच येते मला ते बघून . वेड्यासारखं आपलं तोंडाला /केसांना फासायचं Angry

आमच्या मित्रांच्या ग्रूपमध्ये होतो बर्थडे तोंडाला केक फासून सेलिब्रेट. पण शक्यतो नासाडी टाळतो. तो केक वाया न घालवता खातो.
मला पर्सनली दारू पिऊन बर्थडे सेलिब्रेट करण्याच्या प्रकाराची फार चीड आहे. वर कोणीतरी दारू उडवून सेलिब्रेट करण्याला नासाडी म्हटले आहे, मी तर म्हणतो बरेच आहे. ते घाणेरडे मद्य एखाद्याच्या तोंडात पडण्यापेक्षा गटारात वाहिलेलेच चांगले. शेवटी आपला आपला दृष्टीकोण.

ईथे तोंडाला केक फासण्यावरून आठवले,
केसाला अंडे लावणे, अंगाला बेसनाचे पीठ लावणे, डोळ्यावर काकड्यांचे थर रचणे, किंबहुना गोरे व्हायला अंगाला हळद लावणे (कि ही वेगळी असते आणि खायची वेगळी असते?), वगैरे बाह्य सौंदर्य वाढवायच्या प्रकारात होणारी अन्नाची नासाडी या तोंडाला केक सेलिब्रेशनमध्येच मोजायची का?

लॉजिकली पाहता रंगपंचमीला होणारी पाण्याची नासाडी आणि तोंडाला केक फासणे हे एकच प्रकार झाले. एक पूर्वापार चालत आल्याने आपण त्याला सण म्हणतो तर एक प्रकार नवीन उदयास आल्याने फॅड बोलतो.

ते काही देशात टोमेटो की संत्री पायाखाली तुडवायची आणि नाचायचे, त्यांचा चिखल करून त्यात लोळायचे असाही एक उत्सव असतो ना?
जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटात बहुतेक तसे केले होते.

चित्रपटावरून आठवले, कित्येक अ‍ॅक्शन दृश्यात फेरीवाल्यांच्या अन्नपदार्थांनी भरलेल्या गाड्या उधळून टाकतात. हिरोने एक फाईट मारली, गेला व्हिलन गाडीवर आदळला ती अन्नपदार्थांसह पलटली. असे चित्रपट बघितल्यावर आपणही अप्रत्यक्षपणे त्या नासाडीत सहभागी होतो का?

फा Proud
तेच ते काप. .
नेमके कश्याला करतात कल्पना नाही. दिवसभर मोबाईलमध्ये डोळे जाळायचे आणि संध्याकाळी त्यांना आराम द्यायला काकडीची नासाडी करायची.
परत ते चेहर्‍याला साय लावणारे लोकंही पाहिले आहेत. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक म्हणत बरेच खाण्यापिण्याचे पदार्थ सौंदर्यप्रसाधने म्हणून वापरली जातात.

समजा बर्थडेला कुणी तोंडाला केके फासत असतील तर भुभु लोकांना तो चाटायला सांगायचा. आनंदाने चाटतील.

>>> केसाला अंडे लावणे, अंगाला बेसनाचे पीठ लावणे, डोळ्यावर काकड्यांचे थर रचणे, किंबहुना गोरे व्हायला अंगाला हळद लावणे (कि ही वेगळी असते आणि खायची वेगळी असते?), वगैरे बाह्य सौंदर्य वाढवायच्या प्रकारात होणारी अन्नाची नासाडी या तोंडाला केक सेलिब्रेशनमध्येच मोजायची का? <<<<< नाही
कारण, तुम्ही दिलेल्या उदाहरणांमध्ये, ती ती वस्तु वापरुन आरोग्यविषयक निश्चित उद्देश साध्य होतो आहे. पण केक फासुन फक्त अन फक्त नासाडीच होते आहे. शिवाय, अंडे/बेसन्/काकडी खायला/जेवायला वाढलय अन तोंडाला फासुन घेतले असे होत नाहीये, केक मात्र कापुन खायला घेतलाय अन अत्यंत किळसवाण्या पद्धतीने घामट शेंबड्या नाकातोंडावर तेलकट केसांवर फासणे ही "विकृती" आहे. Happy असो.
तुम्हाला कदाचित हे पटणार नाही.

आता फक्त "देवांच्या पुजेत वापरल्या जाणार्‍या पंचामृता" बाबत "ती नासाडीच" असा उल्लेख झाला/कुणी केला की मग धाग्याची इतिश्री झाली/सुप वाजले असे समजावे लागेल.
अर्थात, पंचामृतातील पदार्थ खरोखरच अंगाला लावुन बघा, ती नासाडी नाही, लहान मुलांनाही दुधाची
साय लावतात, तेल तुप लावतात, असे आरोग्यवर्धनासाठी केलेले उपाय ही नासाडी होऊ शकत नाहि.

बाकी फक्त केकच कशाला ऋन्मेषराव? आमच्या आयुर्वेदात्/योगशास्त्रात मृत्तिका स्नान म्हणजे चिखल फासुन घेणे,
सर्वांगाला गाईचे शेण फासुन घेणे वगैरे उपायही आहेत, हे केक फासुन घेणारे, गाईचे शेण फासुन घेतिल का? Wink

मुळात वाढदिवस साजरा करायला कोणतीही पोषणमूल्ये नसलेला महागडा केक आणणे हाच एक माज आहे. तो तोंडाला फासणे किंवा पोटात जाणे हे त्याला फुटलेले फाटे.

आता मुळात जन्माला येण्यात स्वतःचं काही कर्तुत्व नसताना वाढदिवस साजरा करणेच चुक आहे अशाही पोस्टी येतील तेव्हा वादि केक विषय थांबवा. आणि अन्ननासाडी बद्दल बोला लोक्स.

ऋ, काकड्यांचे थर काय?? साय, बेसन, काकडी, हळद ह्यात काही विशिष्ट गुणधर्म आहेत ज्याचा त्वचेसाठी उप्योग आहे.
केक थोबाडाला फासुन काय फायदा होतो?

मला ऋन्मेष चा मुद्दा एका मर्यादित अर्थाने पटतो,
अन्नाची नासाडी हि खूप ब्रॉड टर्म आहे, आणि प्रत्येकाच्या सामाजिक, आर्थिक बॅकग्राउंड प्रमाणे त्याची व्याख्या बदलले,

चहाच्या शेवटच्या घोटात , तोंडात पत्ती येते म्हणून एक घोट उरवणे कोणाला नासाडी वाटू शकतो,
फेस काढून उडवलेली शॅम्पेन दारु पिणाऱ्या पण न मिळणाऱ्या माणसाला नासाडी वाटू शकते,
मला 9 डिग थंडीत हात धुवायला ला कोमट पाणी मिळणे गुड to have गोष्ट आहे.
कोणासाठी ती necessity असेल, तर कोणासाठी उधळपट्टी आणि सर्पणाची नासाडी, पाणीच न मिळणाऱ्या कोणासाठी ती पाणी आणि सरपण दोन्हीची नासाडी असेल.

तसेच काकडी, पीठ, इतर खायच्या वस्तू मिळावण्यासाठी ज्यांना ढोर मेहेनत करावी लागते त्यांच्या साठी सौंदर्य प्रसाधनासाठी या जीवनावश्यक गोष्टींचा वापर करणे नासाडीच आहे.

आता हा मुद्दा वेगळा कि हि नासाडी, तुलनेने कमी प्रमाणात होते ,
मात्र म्हणून हा मुद्दा नोंदवूच नये असे नव्हे

साय लावतात, तेल तुप लावतात, असे आरोग्यवर्धनासाठी केलेले उपाय ही नासाडी होऊ शकत नाहि.>>>>>>
आरोग्य वर्धनासाठी बाकीची प्रोडक्टस मिळत असताना खाण्याच्या गोष्टी लावणे (कारण त्या माझ्या साठी स्वस्त आहेत, आणि त्या लावणे मला परवडते) हे कसे justified असू शकेल?

नाही.
आता फक्त "देवांच्या पुजेत वापरल्या जाणार्‍या पंचामृता" बाबत "ती नासाडीच" असा उल्लेख झाला/कुणी केला की मग धाग्याची इतिश्री झाली/सुप वाजले असे समजावे लागेल>>>>>>

सरकारी पातळीवर केलेले यज्ञ आणि त्यात जाळून टाकलेले तूप , गोमटेश्वरावर , शंकरावरओतलेले दूध, शनी मारुतीला घातलेले तेल, कुठल्याश्या dewiqr ओतले तूप आणि त्यांनी भरलेले रस्ते, वगैरे नासाडीवर येउ आपण हळू हळू घाई काय आहे?

सिम्बा, हळद, काकडी, साय, बेसन वैगेरेंचा त्यांच्या गुण्धर्मामुळे खाण्याव्यतिरिक्तही ह्या स्किनकेअर औषधं वैगेरेसाठी उपयोग केला जातो. त्यांअधे तसे गुण्धर्मच आहेत.
पण केक हा फक्त खाण्यासाठीच आणलेला असतो. तो का तोंडाला फासायचा?

सस्मित,
मी केक फासणे या प्रकारावर काहीच बोललो नाहीये,
वर मांडलेले मुद्यें मला ok वाटतात , आणि त्यातवर काही ऍड करण्यासारखे माझ्या कडे नाही.

मी खाण्याच्या गोष्टी सौन्दर्यप्रसाधन म्हणून वापरणे याला जो काही लोकांनी विरोध केला त्या बाबत माझे लॉजिकं देत आहे

दुसरी गोष्ट,
स्किन मऊ करण्यासाठी क्रिम बाजारात मिळतात, त्या न लावता मी साय लाविन असे म्हणणे चूक का नाही का?
(अंडरलायईंग लॉजिकं, माझ्या घरातील साय मी नाही लावली तरी ती गरीब लोकांना थोडीच मिळणार आहे? मग मी ती तोंडाला लावली काय, आणि खाल्लं8 काय सारखंच,)
मग ऋन्मेष त्याच्या रुर्वतीच्या पोस्ट मध्ये असेच तर म्हणत होता.

>>>> आता हा मुद्दा वेगळा कि हि नासाडी, तुलनेने कमी प्रमाणात होते , मात्र म्हणून हा मुद्दा नोंदवूच नये असे नव्हे <<<<
त्या आख्ख्या पोस्टचा तर्क पुढे ताणायचाच झाला, तर "माणसाचे जगणे" हेच मुळी निसर्गाचा अपव्यय आहे अशा नि:ष्कर्षापर्यंत पोहोचावे लागेल.... आहे तयारी? Proud हिंदू धर्मात त्याचीही प्रोव्हिजन आहे, अकालि वयात सन्यास घेऊन सर्वसंगपरित्याग करुन "नासाडी" वाचविण्याची ! Lol
अहो इतकेच काय, माणसाचे मरणे देखिल हिंदू पद्धतीमध्ये मृतदेह जाळून म्हणजे सरपणाची नासाडी असे म्हणतातच की हो लोक..... असो.
विषय, खाद्य पदार्थांची "माजोरीपणे" नासाडी हा आहे, तत्कालिक भौगोलिक/नैसर्गिक/दैहिक गरज म्हणुन "पदार्थ खाणे/वस्तु वापरणे" हे नासाडीमध्ये मोजणे अपेक्षित नाही. तर, ज्या उद्देशाकरता केक बनवला आहे, तो नीट "म्यानर्स" पाळीत खाण्याचा उद्देश सोडून तो थोबाडाला फासणे अन वाया घालवणे यास माजोरी नासाडी म्हणायचे नसेल, तर त्याला नाईलाज आहे.. !

Pages