यह दिल है कन्फ्युज्ड ! (Ae Dil Hain Mushkil - Movie Review)

Submitted by रसप on 29 October, 2016 - 03:27

'मला काय हवं आहे' ह्याचा थांग बहुतेकांना मर्यादित स्वरुपातच लागत असतो. ह्या 'बहुतेकां'पैकीही बहुतेकांची मजल व्यावसायिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या काय हवं आहे, अश्या विशिष्ट क्षेत्रांपुरतीच मर्यादित असते. स्वत:ची भावनिक गरज नेमकी काय आहे, हे समजून येण्यात उभं आयुष्य निघून जातं. अनेकदा अगदी शेवटपर्यंतसुद्धा हे समजून नाही तर नाहीच येत.
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
असा हा जटील प्रश्न फार कमी लोकांना सुटत असतो. त्यामुळे साहजिकच आपण सगळेच कमी अधिक प्रमाणात एक गोंधळलेले - कन्फ्युज्ड - आयुष्य जगत असतो. भारतीय चित्रपट वास्तववादाकडे जसजसा अधिकाधिक सरकत चालला आहे, तसतश्या चित्रपटाच्या कथानकात अश्या 'गोंधळलेल्या' व्यक्तिरेखा वारंवार येत आहेत. इम्तियाझ अली तर अजूनही हा एकच विषय स्वत:चं पूर्णपणे समाधान होईल इतपत मांडून मोकळा होऊ शकलेला नाहीय बहुतेक. 'जब वी मेट', 'रॉकस्टार', 'तमाशा' असे त्याने विविध प्रयोग ह्या एका शोधाला सादर करण्यासाठी केलेले आहेत. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरनीही अश्याच व्यक्तिरेखांना सादर केलं आहे आणि तनू वेड्स मनू, कट्टी-बट्टीसुद्धा ह्याच पंगतीत बसवता येतील.
सुरुवातीला बाष्कळ प्रेम कहाण्या दाखवणाऱ्या करण जोहरने नंतर हळूहळू जरासे परिपक्व भावनिक द्वंद्व 'कभी अलविदा ना कहना' आणि 'बॉम्बे टॉकीज' मधून दाखवले होते, पैकी 'बॉम्बे टॉकीज' तर खूपच धाडसी आणि चांगला प्रयोग होता. 'ऐ दिल हैं मुश्कील' द्वारे जोहरने 'आपली भावनिक गरज काय आहे', हे समजण्या, न समजण्यामधल्या द्वंद्वात गुंतलेल्या काही मनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न जमला की फसला, हा पुढचा भाग. तो प्रामाणिक होता का, हा पहिला. तर हो. प्रयत्न प्रामाणिक आहे. पण 'मुल्ला की दौड मस्जिद तक़' ह्याचाही प्रत्यय दिला आहेच !

ह्या कथानकातल्या सपशेल कन्फ्युज्ड व्यक्तिरेखा आहेत, अयान (रणबीर कपूर) आणि सबा (ऐश्वर्या राय बच्चन). पैकी बच्चनसूनेला सहाय्यक विभागात मोडेल अशी, दुय्यम किंवा तिय्यम भूमिका असल्याने ती काही महत्वाची नाही. मुख्य भूमिका रणबीर आणि अनुष्का शर्माच्याच आहेत. अनुष्काने साकारलेली 'अलीझेह' त्यातल्या त्यात 'सुज्ञ' वगैरे म्हणता येईल अशी आणि अयान मात्र अगदीच सुदूरबुदूर ! ह्या सगळ्या ओढाताणीच्या धाग्याचं एक टोक 'अली' (फवाद खान) च्या हातीही आहे. मात्र त्याला जराही पकड वगैरे घेण्यासाठी वावच ठेवलेला नाहीय.

Aedilhaimushkilsynopsis.jpg

हे कथानक लंडन, पॅरीस, व्हिएन्ना अश्या परदेशी लोकेशन्सना घडतं. का, ते विचारायचं नसतं, कारण चोप्रा, जोहर वगैरेंकडे अमाप पैसा आहे. हा पैसा सिनेमात ओतताना त्याचा विनियोग तांत्रिक बाजू सुधारणे, पटकथेला धार आणणे, चांगलं संगीत बनवणे वगैरे फुटकळ गोष्टींसाठी खर्च करणे, अजून तरी पूर्णपणे आपल्या मुख्य धारेतल्या सिनेमाकर्त्यांना पटत नसावेच. नाही म्हणायला, काही काळासाठी कथानक थोडंसं लखनऊमध्ये सांडतं. पण पुन्हा एकदा 'तिथेच का' ह्या प्रश्नाला काहीही उत्तर नाही. म्हणजे अमुक कथानक अमुक शहरातच का घडावे किंवा कथानकाचा विशिष्ट भाग तमुक ठिकाणीच का घडावा, ह्याचा तर्कसंगत विचार करणे हा वेळेचा अपव्यय आहे, हे समजून घ्यायला हवं !

'अयान'च्या भूमिकेत रणबीरने पुन्हा एकदा जबरदस्त काम केलं आहे. पण गोंधळलेल्या प्रेमिकाची व्यक्तिरेखा साकारून आता त्याला कंटाळा येण्यास हरकत नसावी. ऋषी कपूर स्वत:च्या एका विशिष्ट छबीत अडकल्याने त्याच्यातल्या सक्षम अभिनेत्याला फार क्वचित बाहेर येता आलं आहे. बापासारखं पोराचं होऊ नये. यह जवानी है दिवानी, तमाशा, रॉकस्टार, बचना ऐ हसीनो ह्या सगळ्यातून रणबीरने आधीच कन्फ्युज्ड तरुण साकार केला आहे. 'ऐदिहैंमु' त्याच सगळ्याला उजाळा मिळत जातो.
एकेका सिनेमागणिक अनुष्का शर्मा मला अधिकाधिक आवडायला लागली आहे. तिची 'अलीझेह' इतकी मस्त झाली आहे की तिच्या प्रेमात का पडू नये', हाच प्रश्न पडावा ! अगदी सहज वावर, बोलके डोळे व चेहरा आणि जबरदस्त आत्मविश्वास, ह्याचं एक परफेक्ट मिश्रण मला अनुष्कात जाणवतं. 'आत्मविश्वासाने वावरणारी स्त्री' ही सौंदर्याची सर्वश्रेष्ठ मूर्ती असावी. ती झलक अनुष्कात ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन नेहमीच दिसत असते. तिची 'अलीझेह' इतकी सुंदर दिसते की एका प्रसंगात जेव्हा ती 'सबा'च्या (ऐश्वर्याच्या) सौंदर्याची भरभरून स्तुती करत असते, तेव्हा 'हा उपरोध आहे की काय' असा संशय येतो !
ऐश्वर्या आजपर्यंत जितकी चांगली दिसत आली आहे, तशीच दिसते. ना जास्त, ना कमी. खरं तर, तिच्या भूमिकेच्या दृष्टीने पाहिलं, तर तिने मध्यमवयीन दिसणं अपेक्षित होतं, पण ती पुरेशी वयस्कर दिसत नाही. तिची एन्ट्री झाल्यावर सिनेमाच्या गाडीचा ट्रॅक काही वेळासाठी बदलतोच. तेव्हाचे बोजड डायलॉग्स तिच्यासोबतच्या अयानला करतात, त्यापेक्षा जास्त आपल्याला बोअर करतात. 'सबा' कवयित्री का दाखवली आहे, ह्यालाही काही सबळ कारणमीमांसा नाहीय. किंबहुना, ती कवयित्री नसती दाखवली, तर जे कमाल पकाऊ डायलॉग इच्छा नसतानाही पाहाव्या लागणाऱ्या जाहिरातींप्रमाणे आपल्यावर आदळत राहतात, ते तरी टळले असते.

मी सिनेमा पाहण्याची दोन प्रमुख कारणं होती. ट्रेलरमध्ये ऐकवलेला 'एकतर्फा प्यार..' वाला डायलॉग आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं. तो डायलॉग कुठल्या प्रसंगी आहे आणि ते गाणं कसं चित्रित केलं आहे, ह्या दोन गोष्टींची मला खूप उत्सुकता होती. दोन्हींनी मला निराश केलं. धक्कादायक गोष्ट अशी की, 'एकतर्फा प्यार..' वाला तो डायलॉग मुख्य व्यक्तिरेखेच्या तोंडी नाहीच ! (कुणाच्या तोंडी आहे, हे सांगणार नाही. स्वत:च जाणून घ्यावे !) आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं 'क्युटीपाय' ह्या भिकार धांगडधिंग्याला लागूनच सुरु होतं. दोन्ही गाण्यांच्या मेलडीचा, पट्टीचा एकमेकांशी दुरान्वयानेही संबंध नसल्याने हा बिनडोकपणा सहनच होत नाही. मुळात, ती 'क्युटीपाय' नामक टुकारकी अकारणच घुसडलेली आहे. एकंदरीत संगीताबद्दल बोलायचं झालं तर 'चन्ना मेरेया' आवडलंच आहे. शीर्षकगीतही चांगलं जमलं आहे. पण बाकी सगळा आनंदीआनंद आहे. पार्श्वसंगीत तर निरर्थक कल्लोळ माजवतं, बाकी काहीच नाही.

व्यक्तिरेखांच्या मनांतले भावनिक गोंधळ मांडण्यात करण जोहर दोन-तीन भाग वगळले, तर बऱ्यापैकी प्रभावी ठरला आहे. सगळ्यात जास्त माती खाल्ली आहे शेवटाकडे. शेवटचा मेलोड्रामॅटिक ट्विस्ट 'सगळं मुसळ केरात'वाला आहे. त्या सगळ्या फिल्मीगिरीनंतर शेवटी सिनेमा त्याच वळणावर संपतो, जिथे तो साधारण अर्ध्या तासापूर्वी पोहोचलेला असतो. 'बॉम्बे टॉकीज'मधल्या कहाणीच्या हाताळणीतली परिपक्वता इथे असती, तर सिनेमा 'जोहरचा सर्वोत्तम' म्हणता आला असता. शेवट वगळता, इतर सादरीकरणातही 'तेच ते'पण जाणवत राहतं.
जोहरच्या सिनेमांत श्रीमंतीचं प्रदर्शन असतं. ते झोया अख्तरच्याही सिनेमांत दिसतं, पण दोन्हींत फरक आहे. जोहरच्या प्रदर्शनात क्रिएटिव्हिटी जरा कमीच वाटते. मोजकीच पात्रं असलेलं कथानक असल्याने, ते आटोपशीर असायला हवं होतं. 'तेच ते'पण आल्यामुळे ते जरासं लांबलंच आहे. बट अगेन, अडीच, पावणे तीन तासाचा पसारा मांडल्याशिवाय चोप्रा, जोहर प्रभूतींना पोटभरीचं झाल्यासारखं वाटत नसावंच बहुतेक !

कुणी काहीही म्हणो, करण जोहरचंही एक फॅन फॉलोईंग आहे. त्यांना 'ऐदिहैंमु' नक्कीच आवडेल.
रणबीरच्या चाहत्यांनाही 'ऐदिहैंमु' आनंद देईल. अनुष्कासाठी पाहायचा असेल, तर नक्कीच पाहावा.
रणबीर-अनुष्कामध्ये ती 'सिझलिंग केमिस्ट्री' का काय म्हणतात, ती पुरेपूर जाणवते.
ऐश्वर्यासाठी जर कुणी पाहणार असेल किंवा तिच्या व रणबीरच्या तथाकथित गरम दृश्यांबद्दल उत्कंठा असेल, तर नक्की निराशा होईल.
आणि सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा विरोध म्हणून जर कुणी मुद्दाम पाहणार असेल, तर त्यांनाही अगदीच वेठीस धरल्यासारखं वाटणार नाही, असं मला वाटतंय. त्यांनी फक्त 'ऐ दिल, यह हैं बॉलीवूड' इतकं लक्षात ठेवावं म्हणजे झालं !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/10/ae-dil-hain-mushkil-movie-review....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> याच नायिका त्यांच्या करीअरबद्दलही तितक्याच ठाम दाखवल्यात

नंदिनी, कुठल्या नायिका करीअर बद्दल ठाम दाखवल्या आहेत? Happy

दिपीका - लव्ह आज कल. पार अगदी छताला लटकावे लागते तरी करियर सोडणार नाय!
- बचना ए मध्ये तर रणबीरला सोडते पण टॅक्सी चालवणे सोडणार नाय!
- राम लीला मध्ये रणवीरला सोडते पण 'अस्ला स्मगलिंग' सोडणार नाय!
हल्लीच्या हिरवीणी हो काय ते 'देखो कसमसे' जमेना त्यांना Wink

सूलू_८२ | 29 October, 2016 - 17:29 नवीन
हे कथानक लंडन, पॅरीस, व्हिएन्ना अश्या परदेशी लोकेशन्सना घडतं. का, ते विचारायचं नसतं, कारण चोप्रा, जोहर वगैरेंकडे अमाप पैसा आहे. हा पैसा सिनेमात ओतताना त्याचा विनियोग तांत्रिक बाजू सुधारणे, पटकथेला धार आणणे, चांगलं संगीत बनवणे वगैरे फुटकळ गोष्टींसाठी खर्च करणे, >>> चोप्रा, जोहर च्या चित्रपटान्चे संगीत चांगलंच असत की.

>> मला ह्या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचं होतं. नको तिथे खर्च करण्यापेक्षा त्या प्रीतमला महिनाभर खोलीत डांबून ठेवून रोजचं त्याचं जे काही मीटर असेल त्याप्रमाणे पैसे त्याला दिले असते आणि सगळं कथानक मुंबई, दिल्ली, बंगलोर वगैरेला घडलेलं दाखवलं असतं, तर जरा चांगलं संगीत बनून पैश्याचा योग्य जागी वापर झाला असता.
मुख्य म्हणजे, जोहरकडे प्रीतमसारखा ढापूचंद पोहोचणं हेच त्याच्या सिनेमात संगीताला असलेल्या दर्जात्मक उंचीला धक्का देणारं आहे. रहमान झेपत नाही काय ? शंकर-एहसान-लॉय परवडत नाहीत काय ? गेला बाजार ते विशाल-शेखर वगैरे तरी ? प्रीतम काय.... अगदीच डाऊन मार्केट ! ते 'चन्ना मेरेया' मला इतकं आवडलंय, पण कौतुक करावं तर कुणाचं करावं, हा प्रश्न पडलाय !

दिनेश. | 1 November, 2016 - 19:09 नवीन
सहज एक निरिक्षण.. मी फारसे हिंदी चित्रपट बघू शकत नाही तरीही...
करण जोहरच्याच नव्हे तर आताश्या बहुतेक चित्रपटात गोंधळलेले नायक नायिका का दिसतात ? लग्न ठरवून मग आपल्याच निर्णयाबाबत शंका घेणे, आयत्यावेळेस लग्न करण्यास नकार देणे, असेच सतत दिसते( दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, जब वी मेट, बचना ए हसीनो, जवानी दीवानी.... )

त्यामानाने ठाम निर्णय घेणार्‍या नायिका जून्या चित्रपटात खुपदा असत ( बंदीनी, गाईड, मदर इंडीया... )

हा ट्रेंड नेमका कधीपासून सुरु झालाय आणि तो लोकप्रिय का होत आहे ? आजचे तरुण तरुणी काही इतके गोंधळलेले
मला वाटत नाहीत. मग चित्रपटात असे सातत्यने का दाखवतात ?

>>

दिनेशदा,
लेखाच्या सुरुवातीलाच मी ह्याविषयी मत मांडलं आहे.
आजचे तरुण तरुणी स्वत:च्या करिअर व इतर व्यावसायिक व आर्थिक बाबतींत कमी गोंधळलेले असतात. मात्र नाती, लग्न वगैरे बाबतींत मात्र भरपूर गोंधळ असतो मनात. मुळात 'तडजोड' हा शब्द आजकाल लोकांना आवडेनासा झाला आहे. लग्न करणे आणि ते टिकवणे, हे म्हणूनच आव्हानात्मक झालेलं आहे. ही पिढी गोंधळलेली नाही, असं वाटतं कारण ती सोशली गोंधळलेली नसेल, मात्र खाजगी आयुष्यात खूप गोंधळलेली आहे. डिप्रेस्डही आहे. ह्या सगळ्यासाठी मी काही आकडेवारी नाही देऊ शकत. पण जे काही आजूबाजूला पाहतो, त्यावरुन सांगितलं.

बऱ्याच लोकांना ही कहाणी तर्कशून्य वाटली.
'पार्टीत भेट झाल्यावर एक मुलगी एका मुलाबरोबर शारीरिक संबंधांसाठी तयार होते आणि नंतर त्याला मित्र म्हणत राहून, त्याच्या प्रेमाला नकार देत राहते', ही बाब मला अविश्वसनीय नाही वाटली. 'वन नाईट स्टॅण्ड' पुरते जवळ येणारे भरपूर असतात. शहरातलं नाईट लाईफ हे असंच आहे. त्यातून काही जण एकमेकांच्या जास्त जवळ येतही असतील, पण बहुतेक करून ही ओळख एका रात्रीपुरतीच असते आणि नंतर टिकली, तरी त्यात मैत्रीच असते.
जे सिनेमात दाखवलं आहे, ते जरी पटायला (पचायला) जड असलं, तरी अगदीच असत्य नाहीय.

ऐसा भी होता हैं !

राम लीला मध्ये रणवीरला सोडते पण 'अस्ला स्मगलिंग' सोडणार नाय!>>> दिपिका रामलीला मध्ये स्मगलिंग करायची?:अओ:

हल्लीच्या हिरवीणी हो काय ते 'देखो कसमसे' जमेना त्यांना>>> म्हणजे?

शंकर-एहसान-लॉय परवडत नाहीत काय ?>>> हे त्रिकूट कल हो ना हो आणि कभी अलविदा ना कहना साठी होत.

जतिन ललित आणि हे त्रिकूट तर माय फेवरीट. विशाल-शेखर सुद्धा.:स्मित:

दिपिका रामलीला मध्ये स्मगलिंग करायची?<<<< अर्थात. ते रझामुरादबरोबर धंद्याची वाटणी करायला बसतात तेव्हाचा तिचा चेहरा आणि रणवीरच डायलॉग दोन्ही माझे अतीव फेवरेट आहेत.

दिपिका रामलीला मध्ये स्मगलिंग करायची?<<<< अर्थात. ते रझामुरादबरोबर धंद्याची वाटणी करायला बसतात तेव्हाचा तिचा चेहरा आणि रणवीरच डायलॉग दोन्ही माझे अतीव फेवरेट आहेत.
<<
+ १
यस, मस्तं काम केलय दीपिकानी त्या सीन मधे आणि ओव्हरऑल त्या सिनेमात .

अ॑जिबात नाही आवड्ला. सिनेमा आहे की मस्करी? बुलेया आणि टायट्ल च गाणं सोडून काहीही आव्डलं नाही. अतिशय बकवास मूवी.
फक्त अ‍ॅश बद्द्ल वाईट वाटतयं..का केला असेल तिने हा सिनेमा? का? का? का?

काल पाहिला. अनुष्काचे कपडे फारच सुंदर आहेत. रणबीर नेहमीप्रमाणेच वाटतो. अभिनय चांगला करतो. अ‍ॅश अमिताभची श्टाईल मारते असे वाटले (फार संयमित अभिनय). रणबीरची पहिली गर्लफ्रेंड लिझा सॉलिड एंटरटेनिंग वाटली. अनुष्का लाउड! (डोक्यात जाते). स्टोरी अचाट आहे. ईथे ईंटरवल नसल्याने लवकर सम्पला मुवी. पुन्हा बघणार नाही (पैसे मिळाले बघण्याचे तरिही)

आधीच फार काही अपेक्षा नव्हत्या पण इतका टुकार असेल अस वाटल नव्हते.>>> अगदी अगदी अगदी

फक्त २ सीन्स आवडले मला Happy
१. ब्लॅक ड्रेस पे कोइ रेड वाईन फेकता है ?
२.अयान आणि अलिझेह "तेरे मेरे होठोपे मीठे मीठे गीत मितवा " वर नाचतात ते.

अच्छा चलता हू दुवाओ मे याद रखना ..................... चन्ना मेरेया.

या आधी एकदोनदाच ऐकलेले.
पण आता नुकतेच सतरा-अठरा वेळा सलग वा थोड्या थोड्या वेळाने ऐकून झालेय.
शब्द्द मुद्दामच पाठ नाही केले अन्यथा पुन्हा ऐकायची मजा जाते.

बाकी ते "अच्छा चलता हू," हे गाण्याच्या सुरुवातीलाच काय मस्त उचललेय. एक दोन ओळ ऐकून मी परत ते रीपीट करतो Happy

पाहू पाहू म्हणत राहिला होता, काल पाहिला. साधारण २/३ पिक्चर मस्त आहे त्यामुळे शेवट जरी कंटाळवाणा असला तरी एकूण आवडला. मात्र सुरूवातीपासून 'बुलेया' पर्यंत फुल्टू आवडला. विशेषतः चन्ना मेरेया पर्यंत तर total riot आहे. ते सगळे रणबीर-अनुष्का चे बॅण्टर, बॉलीवूड मधल्या संवादांचे संदर्भ सगळे धमाल आहे. खूप हसलो. क्यूटी पाय अगदी आवडले बिवडले नाही पण ओके आहे. मात्र ब्रेक अप, टायटल साँग, बुलेया आणि चन्ना मेरेया या चढत्या क्रमाने ही यातली गाणी आवडतात. कालच्या कॉपी मधे चन्ना मेरेया मधले 'मेहफिल मे तेरी...' कडवे नव्हतेच. ते गाणे मी गेल्या काही महिन्यांत असंख्य वेळा ऐकले/पाहिले आहे, अजूनही गोडी कमी होत नाही.

रणबीर व अनुष्का ने कामे मस्त केली आहेत. अनुष्का चांगली दिसते पण डोनाल्ड डक ओठांकडे दुर्लक्ष करता येत नाही. ऐश्वर्या प्लास्टिक दिसते. जितक्या ताकदीने जनरल टाइमपास संवाद लिहीले आहेत तितक्या ताकदीने ते शायराना उर्दू संवाद मुळात लिहील्यासारखे वाटत नाहीत, आणि ऐश्वर्याला तेही म्हणताना ते पेलवत नाहीत. तो भाग बोअर झाला. फवाद खान ला मी पहिल्यांदा पाहिला. तो चांगला दिसतो पण इतका हाइप का आहे माहीत नाही. शाहरूख अगदीच चार्मलेस दिसतो त्याच्या त्या एकमेव सीन मधे. तो सीनही एकूणच जमलेला नाही. रणबीर मात्र नेहमीप्रमाणे मस्त!

फवाद खान ला मी पहिल्यांदा पाहिला. तो चांगला दिसतो पण इतका हाइप का आहे माहीत नाही
<,
फा, त्यासाठी पकिस्तानी टीव्ही शो, ‘जिंदगी गुलजार है‘ चे एखाददोन एपिसोड्स बघ :).

रजनीकांत ईतका का हाईप आहे? सलमानला लोकं ईतके भाई भाई बोलत का डोक्यावर चढवतात? या पठडीतील प्रश्नांची उत्तरे शोधल्यास त्या फवाद खानचेही उत्तर मिळेल. त्यात काहीतरी असे असेल जे काही लोकांना अफाट आवडत असावे.

वरील तिघेही माझ्या फार आवडीचे नाहीत पण मी अश्या व्यक्तीमत्वांचा आदर करतो.

फवाद खान बाबत एक गोष्ट मला आवडते, तो थोडा थोडा विराट कोहलीसारखा दिसतो.
पण विराट कोहलीवर जेव्हा धोनीसारखा पिक्चर बनेल तेव्हा दुर्दैवाने तो त्यात काम करू शकणार नाही. कारण ते कोहली स्वत:च करण्यास समर्थ आहे Happy

मी पिक्चर पाहिला नाही, मात्र यूट्यूब सीन बघत असतो त्यात शाहरूखचा सीन पाहिला मध्यण्तरी. शाहरूख म्हटले तर त्यात चार्मलेस वाटतो. पण संवाद कडक मारलेत. ते पाहता त्याचे चार्मलेस असणे कथेची, भुमिकेची गरज वाटते. आणि माझा अण्दाज खरा असेल तर यासाठी त्याचे अभिनण्दन करायला हवे.

फवाद खान ला मी पहिल्यांदा पाहिला. तो चांगला दिसतो पण इतका हाइप का आहे माहीत नाही
<,
फा, त्यासाठी पकिस्तानी टीव्ही शो, ‘जिंदगी गुलजार है‘ चे एखाददोन एपिसोड्स बघ :).
नवीन Submitted by दीपांजली on 17 October, 2017 - 22:57

>>
+१.

पण हे जर कठीण असेल तर अधिक सहज उपलब्ध पर्याय - 'कपूर अ‍ॅण्ड सन्स'. सहजाभिनय करतो तो. चांगला आहे.

Pages