वाड्यात काय झालं असेल ? काल बांधलेला सदा सुटून खाली आला कसा ? शीः ... तिने मग देवीचे दर्शन घेतले. आणि ती जत्रेत नैनाला घेऊन मिसळून गेली. थोडं फार खाणं झालं होतं. अडीच तीनच्या सुमारास ती वाड्याच्या गेटजवळ परत आली. आतून मामांच्या बोलण्याचा आवाज येत होता. ते कोणाशी तरी बोलत होते. तिला वाटलं खडपा. नैनाच्या हातात दोन तीन जत्रेतल्या शिट्ट्या आणि गॅसचे एक दोन फुगे होते. तिचा मूड खेळण्याचा होता. पहिल्या पायरीवर आल्या वर तिला दिसलं की एक गव्हाळ वर्णाचा तरूण मुलगा मामांशी बोलत होता. मामांशी बोलता बोलता तो थांबला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. साधारण साडीतही ती आकर्षक दिसत होती. लाल गोऱ्या रंगावर हलक्या गुलाबी रंगाची साडी चांगलीच शोभून दिसत होती. मूळच्याच आखीव भुवयांखाली असलेले चंचलतेने हालणारे तेजस्वी डोळे , तरतरीत नाकाखाली असलेली छोटीशी जिवणी , आणि एकूणच कमनीय बांधा असल्याने सुहास तिच्याकडे पाहातच राहिला. मामांच्या सराईत नजरेतून हे सुटले नाही . ते म्हणाले, " अरे हो, सुहास तू हिला ओळखली नसशीलच. " थोड्या तुच्छतेनेच ते म्हणाले, " आपली चंद्रा माहित असेलच तुला, तिची ही मुलगी. नवरा गेला शिवाय पदरात एक मुलगी , त्यातून घरमालकानी जागा ताब्यात घेतली, मग म्हंटलं , राहा इथेच. तिलाही आधार . " सुहास अंदाजानेच खरं आहे म्हणाला. मामानी मग रेखाला सुहासची ओळख करून दिली. "रेखा हा सुहास . माझा सख्खा भाचा . (म्हणजे ती सख्खी नव्हती असं दाखवायचं होतं की काय ? ) इंजिनियर आहे , आता दुबईला जायचाय , नोकरीसाठी. " ती खालच्या मानेने आत शिरली. आधी तिने "त्या" खोली कडे पाहिले, तिला बाहेरून अडसर होता. तेव्हा कुठे तिला बरं वाटलं. मग ती स्वैपाकघरात शिरली. तासाभरात स्वैपाक करून ती पानं वाढली असल्याचं सांगाय्ला दिवाणखान्यात गेली, तर सुहास चक्क तिला नैनाबरोबर खेळताना दिसला. नैनाला पण त्याच्याशी खेळताना आनंद वाटत होता. मुलाचं बरं असतं. त्यांना पटकन कोणाशीही मैत्री करता येते. मोठ्या माणसांना का करता येत नाही ? तिच्या मनात आलं. जेवणं होईपर्यंत संधाकाळचे पाच वाजत आले. मग सगळेच थोडे लवंडले.
तिला वाटलं, कोण हा सुहास ? हा का इथे आलाय ? तिला आता पुरुषांची भीतीच वाटायला लागली. दोन चार दिवस् चांगले गेले. आता सुहासशी ती थोडंफार बोलू लागली. ती त्याला 'अहो' म्हणायची. त्यावर तो तिला म्हणाला , " अहो म्हणू नकोस . उगाचच मोठं झाल्यासारखं वाटतं. तो मात्र तिला एकेरी नावानेच हाक मारी. तिच्या आस्ते आस्ते लक्षात आलं , की ती नकळत त्याच्या आवडी निवडी सांभाळू लागली होती. अधून मधून तोही नैनाला घेऊन बाहेर फिरायला जायचा. येताना अर्थातच तिच्या हातात काही ना काही वस्तू असायची. मग एक दिवस त्याला तसं न करण्याविषयी सांगितलं. कारण सुहास निघून गेल्यावर ननाला या सगळ्या गोष्टींची सवय लागेल. मामा कधी कधी सुहासला घेऊन बाहेर जात. मोठमोठ्या लोकांशी त्याच्या ओळखी करून देत. त्यात ते भाव खात की सुहास हा आपला भाचा आहे. त्या त्यांना मोठेपणा वाटे. असाच एक दिवस संध्याकाळी सुहास नैनाला घेऊन बाहेर जायला निघाला होता. त्याने सहजच रेखाला विचारले, "तू पण येतेस का ?घरी बसून काय करणार आहेस. मलाही गावाची फारशी माहिती नाही. आपण नदीचा भाग पाहून येऊ. " त्यावर ती नाही म्हणाली. मग मामा पण तिने बाहेस जाऊन यावे असं म्हणाले. मग ती तयार झाली. ते तिघेही निघाले. बाड्याच्या पुढे काही अंतर गेल्यावर एक उतरता कच्चा रस्ता लागला जो नदीकडे जात होता. संध्याकाळचे सहा वाजत होते. ते तिघेही नदी काठावर पोचले. नदीला पाणी बेताचच होतं. पाण्याचा फार वापर होत होता असं नाही. पात्राच्या काही भागातून ती खळखळ आवाज करीत वाहात होती. तर काठाजवळ पाणी संथ होते. काही ठिकाणी हिरवट काळसर शेवाळही माजले होते. काठावरच्या वाळूत त्यांना बसण्याची जागा मिळाल्यावर नैना त्यांच्या आजूबाजूला खेळू लागली. बसल्या जागेवरून सुहास नैनाला पाण्यात दगड फेकून दाखवीत होता. तीही खूष होऊन दगड फेकीत होती. अधून मधून रेखालाही मौज वाटू लागली. सुहास रेखाला म्हणाला, " तू ही टाक ना दगड . बघ मी टाकतोय तो दगड कसा उड्या मारीत जातो ते. " थोडावेळ ते तिघेही दगड टाकीत राहिले.
काही तरी विचारायचं म्हणून रेखाने विचारले, " तुम्ही दुबईला कधी जाणार आहात ? " तो म्हणाला ,बहुतेक पुढच्याच महिन्यात जावं लागेल. पण इथल्याही काही ऑफर्स आहेत . मी अजून काही ठरवलं नाही. कां ग ? " त्यावर तिने सहज विचारल्याचे सांगितले. तिच्या मनात आलं हा आताइथे किती दिवस राहणार आहे ?. पण आपण असं कसं विचारणार ? जणू काही तिचे विचार वाचल्यासारखा सुहास म्हणाला, " बहुतेक मी येत्या रविवारी जाईन. लहान पणी केव्हा तरी मी वाड्यावर राह्यलोय् पण आता काहीच आठवत नाही. आठवतात ते फक्त कंदील आणि त्यांच्यामुळे वाढणारा काळोख. तशी मला वाड्याची भीतीच वाटायची. तव्हा एक बाई असायच्या , दोन नोकर असायचे. त्या बाई म्हणजे "मामी " होत्या. मी पाचसहा वर्षाचा असताना आलो होतो. नंतर इथे यायला मला जमलं नाही. मग वडील गेले. आईनी फार कष्ट केले आणि माझं शिक्षण पूर्ण केलं. प्रभा मामा सारखा बोलवायचा पण कधी जमलच नाही. मग त्याने रेखाला तिच्या विषयी विचारलं. समोर गडद होणारा काळोख पाहून ती म्हणाली, " आपल्याला निघायला पाहिजे. " आणि ती उभी राहिली. तिने त्याच्या प्रश्नाला अशा रितीने बगल दिली. त्याला ते जाणवलं , हे तिलाही जाणवलं. परत जाताना त्याची नजर वाड्याकडे गेली.ती वाड्याची मागची बाजू होती. नदीजवळून तिकडे जाणारा रस्ता दलदलीने भरलेला होता. त्याला लागून वरच्या बाजूला माळरान होते. त्यावर एक वापरात नसलेले "कब्रस्तान " होते. त्यावरील अंधूक दिसणारे काँग्रेस गवत पाहून ती अस्वस्थ झाली. ते लवकरच घरी पोचले. मामा म्हणाले, "फार उशीर झालाय, स्वैपाकाचं बघ.. ती आत् शिरली. तिचं लक्ष परत "त्या " खोलीकडे गेलं. आता अडसर दर झाला होता. म्हणजे खोली उघडी होती तर. ती दबकतच स्वैपाकघरात गेली. ती कामात गुंतली होती . सुहास सहज म्हणून स्वैपाकघरात आला. ती भाकरीचं पीठ मळत होती. समोर चूल पेटली होती. चुलीच्या लाल पिवळ्या ज्वाळांचा रंग तिच्या चेहेऱ्यावर पडला होता. सुहास तिथेच काही अंतरावर बसला. तिला ते फारसं आवडलं नाही. पण त्याने तिच्या नापसंतीकडे लक्ष दिले नाही. चुलीच्या प्रकाशात ती त्याला अधिकच आकर्षक वाटली. काहीही असलं तरी ती त्याला आवडली होती. प्रथम तिला पाहिली त्यापेक्षा ती आता त्याला किती तरी पट जास्त आकर्षक भासली. तो आपल्याकडे पाहतोय हे पाहून तिने पदर सारखा केला. ती थोडी अस्वस्थ झाली. तिच्या चेहऱ्यावर नापसंतीची सूक्ष्म छटा आली. तिने त्याला काही पाहिजे का असे विचारले. त्यावर त्याने वेळ जात नाही म्हणू न आपण आलो असं तिला सांगितले. खरं तर त्याला तिला परत परत बघावसं वाटत होतं. येत्या रविवारी त्याला जायचं होतं. जेमतेम चार पाच दिवस राहिले होते. मग तो धीर करून म्हणाला, " तू मघाशी तुझ्याबद्दल बोलण्याचं सोडूनच दिलस. बोल ना, तुझं आधीचं आयूष्य कसं होतं ? पुढे तू काय करणार आहेस ? "
ती जरा कडवटपणे म्हणाली, " ज्या आयुष्यात अपयशाशिवाय काही हाती आलं नाही , त्या बद्दल काय सांगायचं ? तुमच्या मनात जर काही वेगळं असेल ना तर ते काढून टाका. "
त्यावर तो म्हणाला, " तुला काहीतरी सिद्धी प्राप्त झाली असावी असं वाटतं. माझ्या मनात जगावेगळं काही नाही. पण रेखा खरं सांगू ? सांग ना, तू परवांगी देशील तरच सांगतो. ...
ती म्हणाली, " एवढं बोललात , आता बोलून तरी टाका. मला कसली आल्ये सिद्धी ? एकच सांगते , माझ्या सारख्या सामान्य आणि कमनशीबी मुलीचा तुम्ही फार विचार करू नका. .... जरा वेळ विचार करून तो धाडसाने म्हणाला, " हे बघ रेखा , तू मला फार आवडलीस. यू आर ए पर्फेक्ट वाईफ फॉर मी. ....... तिची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी त्याने तिच्या चेहेऱ्याकडे पाहिले. तवा तापला होता. त्यावर नवीन भाकरी टाकीत ती म्हणाली, "सगळ्याच गोष्टी दिसतात तशा नसतात. तुम्हाला माझ्यासारख्या एका मुलीची आई असलेल्या बाईशी लग्न करण्याची काय गरज आहे ? तुम्हाला चांगली शिकलेली नोकरी करणारी मुलगी सहज मिळेल. माणसानी नेहेमी आपली पातळी पाहावी, त्यच्या खालच्या पातळीवर उतरू नये. " ...... थोडा वेळ शांततेत गेला. मग तो काही न बोलता मामांच्या हाका ऐकून निराशेने उठून बाहेर गेला.
जेवणं उरकली. त्याने दिवाणखान्यातच मामांच्या जवळच आपले अंथरूण घातले. जवळच पिण्याचे पाणी त्याने भरून ठेवले. रेखा पण आपल्या खोलीत जाऊन अंथरूणावर लवंडली. नैना आज दमल्यामुळे लवकरच झोपली होती. तिच्या निरागस चेहेऱ्यावर आनंदाचे भाव होते. आणलेल्या शिट्ट्यांपैकी एक शिट्टी तिने हातात घट्ट धरून ठेवली होती. नैनाचा चेहरा तिला आता अगदी अविनाश सारखा दिसू लागला . तिने पटकन नैनाला आपल्या जवळ ओढली आणि कितीतरी वेळ ती तिचे मुके घेत राहिली. लवकरच तिलही झोप लागली. मामांच्याही घोरण्याचा आवाज येत राहिला. आज वरचा आवाज क्वचितच येत होता. पण बोलणं ऐकू येत नव्हतं. नाही म्हंटलं तरी तिल सुहासचा आधार वाटू लागला. काही झालच तर तो नक्कीच काहीतरी मदत करील असं तिच्या मनात आलं.... सुहासला मात्र झोप लागत नव्हती. रेखानी अगदीच आपल्याला उडवून लावलं. आपल्यात काय कमी आहे ? सगळ्याच गोष्टी दिसतात तशा नसतात असं ती का म्हणाली असावी? ती कमनशिबी आहे अस ती का म्हणाली ? तिचा पूर्वेतिहास बाईट आहे का? बोलण्याचं एवढं धारिष्ट्य असलेल्या स्त्रीचा पूर्वेतिहास वाईट कसा असेल ? तशी ती जेमतेम एकोणीस वीस वर्षाची असावी. पुन्हा पुन्हा त्याला तिचा चुलीच्या लाल पिवळ्या ज्वालांच्या प्रकाशात चमकणारा चेहरा आठवू लागला. जणू काही नाटकात पात्रांच्या तोंडांवर वेगवेगळ्या रंगांचे प्रकाश टाकतात तसं त्याला वाटू लागलं. आता ती झोपली असेल का ?..... आपण एवढा तिचा विचार करतो, ती आपला करीत असेल का ? रात्रीचे दोन वाजायला आले. दूर कुठेतरी दोनाचे टोले पडले. त्याने आपल्या हातावरील घड्याळात पाहिले. रेडियमच्या काटे दोन वाजल्याचे दाखवीत होते. झोप येत नव्हती. खिशात हात घालून त्याने सिगारेट पेटवली. . दो न तीन झुरके घेतले. त्याला जरा बरं वाटलं. पण झोप काही येईना. तरीही त्याला पंधरावीस मिनिटांनी डुलकी आली ........ मग त्याला मध्येच " खड .. खट ..... " असा आवाज आला. आणि तो अंथरूणावर उठून बसला. दिवाणखान्याच्या दुसऱ्या दाराचा अडसर बाजूला करून त्याने आत पाहिले. रेखा "त्या" खोलीचा दरवाजा उघडून आत पाय टाकीत होती. त्याला तिचं आश्चर्य वाटलं. त्याने एकदा घोरणाऱ्या मामावर नजर टाकली आणि पायात स्लीपर चढवून तो निघाला. लाईटरच्या प्रकाशात तोही 'त्या' खोलीत शिरला. खोलीचे दार सताड उघडे होते. रेखा त्या खोलीचे समोरचे दार ढकलीत होती. ते लवकरच मान टाकल्यासारखे उघडले. .....
तोही तिच्यामागून चालू लागला. आता रेखा वाड्याच्या मागच्या भागात आली. हा भाग थोडा ढासळलेला होता. काही ठिकाणी चिरेही पडले ह्नोते. तर काही ठिकाणी प्लास्टरही पडले होते. बऱ्याच ठिकाणी जुनाट कचरा पडला होता . सुकलेले गवतही माजले होते. पौर्णिमेचा चंद्र आकाशात थिजल्यासारखा तरंगत होता. रस्ता अधिकच खडबडीत होता. तो रस्ता नव्हताच , ती एक चढण होती, आपोआप तयार झालेली आणि माळरानावर जाणारी. चंद्राच्या गूढ प्रकाशात रेखाची पाठमोरी आकृती चालत जाताना दिसत होती. ही चालली तरी कुठे ? ... नदीमुळे वातावरणात थोडी थंडी होती. रेखा चालता चालता माळरानावर चढली. माजलेले काँग्रेस गवत, वड पिंपळाची लहान लहान झुडपे याशिवाय तिथे काही ही नव्हतं. धावत जाऊन त्याने तिला गांठले. असं करताना तो एकदोन वेळा ठेचाळलाही होता . पण रेखा मात्र पायाखालचा रस्ता असल्यासारखी चालली होती. आता तो तिच्या बरोबर चालत होता. त्याने पुढे वाकून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे डोळे शून्यवत होते. तिच्या चालण्यात सहजता होती. जणू काही तिला कुठे जायचय हे तिने ठरवले असावे. ती स्वतःशी काहीतरी पुटपुटत होती. .... असंबद्ध की सुसंबद्ध ? शब्द ऐकू येत नव्हते. नुसताच आवाज.... चाचरल्यासारखा... अंऽ अं. ऽ अं.. हुं हुं ... मी .... मी ..... ये..... ये... ते...... असलं काहीतरी. त्याने तिला हाक मारली... 'रेखा ' .. पण छे. तिला तोजवळ असूनही ऐकू येत नव्हते. आता झोपेत चालत असल्याची त्याला जाणीव होउ लागली. ती जागी होईल तेव्हाच खरं, त्याच्या मनात आलं. तो परत तिच्या सोवत चालू लागला. प्रथम ती माळरानावर फिरत निघाली. त्याचं लक्ष हळू हळू आजूबाजूला गेलं. सगळीकडेच फुटकी थडगी आणि त्यातून उगवलेले वड पिंपळ होते. आता त्याला जाणवलं की हे स्मशान आहे. तोही थोडा घाबरला. पण रेखा इथे का आली ? असा विचार करता करताच त्याचं लक्ष रेखाकडे गेलं. ती एका थडग्याजवळ उभी होती. तो तिथे गेला. त्याने थडग्याकडे वाकून पाहिले. वरचा दगड अर्धवट सरकलेला होता. त्याने आत वाकून पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याचीच सावली खाली पडल्याने त्याला काही दिसले नाही. लाईटर पेटवून पाहिलं , पण काहीच दिसले नाही. मग त्याचं लक्ष रेखाकडे गेलं. ती आता जाण्यासाठी वळली होती. त्याने रेखाला न राहवून विचारले, " तू इथे कशाला आलीस ? .. त्याची पाठ परतीच्या रस्त्याकडे होती. मागून मामांचा आवाज आला . "अरे, ती काय बोलणार ? तिला खेचून घरी घेऊन चल. " तो गर्रकन वळला. तो उत्तेजित स्वरात म्हणाला, " अरे मामा काय बोलतोयस काय? ती झोपेत चालत आलेली आहे. " त्यावर मामा म्हणाला, "अरे झोपेत वगैरे चालण्याची नाटकं आहेत नाटकं. हिला मांत्रिकाकडे घेऊन गेलं पाहिजे. " आता त्याला मामाची चीड आली . "वाटेल ते बोलू नकोस मामा . हिला काय भूत झोंबलय का झोपेत चालणं हा फार मोठा रोग आहे ? तिच्या मनात कसलीतरी भीती असली पाहिजे. " त्यावर मामा तिरसटला , " तुच कर असला वेडगळ विचार. शिलेले लोक ना तुम्ही . " एवढं बोलणं होतय तोवर रेखाने अर्धा रस्ता ओलांडलाही. ती वाड्याच्या दाराशी पोचली आणि आपल्या खोलीत गेली. मग ते दोघे वाड्यात परतले. सुहास मामांशी एक अक्षरही बोलला नाही. त्याने मग एक दोन दिवस मुक्काम वाढवण्याचे ठरवले. पण या सगळ्याचा छडा लावूनच जायचे. या मागे असलेलं कारण म्हणजे त्याला असणारं तिचं आकर्षण.
दुसऱ्या दिवशी सगळेच आठ साडे आठला उठले, फक्त मामा सोडून. ते मात्र रोजच्या प्रमाणे उठले. त्यांची अन्हिकं नक्की काय होती कोण जाणे. कारण ते कधी देवांची पुजा करताना दिसले नाहित. किंबहुना त्या घरात देवच दिसले नाहीत. रेखाला त्याचं आश्चर्य वाटलं होतं . पण तिने विचारले नाही. मामा आज जास्त बोलत नव्हते. ते तालुक्याला जातो म्हणून निघाले. जाताना त्यांनी सुहासला बरोबर यायला सांगितलं पण त्याने घरी राहणेच पसंत केले. त्यामुळे मामा दहा साडेदहालाच बाहेर पडले. आता घरात फक्त ते तिघेच होते. या संधीचा फायदा घेऊन सुहास रेखाशी बोलायला म्हणून स्वैपाकघरात गेला. ती भाजी वगैरे चिरण्यात गुंतली होती. नैना बाहेर खेळत होती. अचानक त्याला आलेला पाहून ती थोडी घाबरली. पण स्वतःला सावरून म्हणाली, " काही पाहिजे का ? तो म्हणाला , "हो पाहिजे ना . पण तू दिलस तर. " ती जराशी त्रासून म्हणाली, " असं कोड्यात बोलू नका. मला नाही आवडत कोडी घातलेली. " .. विचार करून तो म्हणाला, " मग मला तुझी सगळी माहिती दे. मामा आता नाहीत. सांगशील ? तू इथे कशी आलीस ? " तिने थोडे आढेवेढे घेतले पण नंतर तो ऐकायला तयार नाही असं पाहून तिने थोडक्यात तिचे जीवन त्याच्यापुढे उलगडले. अर्थातच, काही गोष्टी राखून. मग त्याने तिला कालच्या रात्रीबद्दल विचारले, " तू काल झोपेत चालत कुठे गेली होतीस माहित आहे तुला ? तिकडे मागे, वापरात नसलेल्या स्मशानात. तिकडे तुझं काय काम होतं ? " ..... ती जरा वेळ विचारात पडली. अविश्वासाने म्हणाली, " काय ? काही तरीच बोलता. झोपेत चालण्याची सवय होती मला , पण फार मागे. आणि मी कुठे गेले ते मला कसं माहित असणार ? मग तिने "त्या" स्वप्नाबद्दल सांगितले. त्यावर तो म्हणाला "आपण जेवण करून घेऊ. मामा काही एवढ्यात येत नाही. दुपारी झोपण्या ऐवजी आपण दिवसा उजेडी तिघे जाऊन पाहू. चालेल ना ? " तिने फक्त होकारार्थी मान डोलावली. तिच्या मनातली चलबिचल ओळखून तो म्हणाला, " आणखीन काही सांगायचय ? " मग तिने त्याला वरच्या खोलीतील सदा बद्दल आणि सगळ्या खोल्या आतून भिंतीतील जिन्याने जोडल्या असल्याच्या तिच्या संशयाबद्दलही सांगितले. त्यावर तो म्हणाला, " आपण एखाद दिवशी सबंध वाडा पिंजून काढू. . पण मला एक कळत नाही तू इथे राहतेसच का ? " त्यावर निराशेने हात झटकीत ती म्हणाली , " कुठे जाऊ मी ? " ....
त्यांची जेवणं झाली. नैना अभ्यास करता करता झोपली. गेले दोन दिवस तो नैनाचा अभ्यास ही तो घेत होता. तिला तो वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे म्हणून ती खूष होती. दुपारी दोन अडीचच्या सुमाराला ते दोघेही 'त्या ' खोलीतल्या दरवाजातून मागे आले. बाहेर ऊन तापलं होतं, पण नदीकडून वारा येत होता . वारा थोडा गरमही होता. दोघेही चढण चढून माळरानावर आले. चढता चढता तिला त्याचा एकदोन वेळा आधारही घ्यावा लागला. त्याला फार चमत्कारिक वाटलं. हाच रस्ता काल रात्री ती सरावलेल्या माणसासारखी चढून आली होती. मग त्याने काही अंतरावरचे एक थडगे दुरून दाखवले. ती काल रात्री त्या थडग्या जवळ उभी होती ते ऐकून तिला भीती बाटली. एकुण बातावरणच दुपार असूनही तिला भीतीदायक वाटलं. मग तो म्हणाला, " याच थडग्यात कोणी बाई आहे असं तुला स्व प्नात दिसलं होतं ना ? " ती हो म्हणाली. पण तिच्या कपाळावर घाम ओघळू लागला. ती घाबरत म्हणाली, " जऊ द्या ना. कशाला आपण या गोष्टीची चिकित्सा करायची ? मला भीती वाटते , आपण घरी जाऊ. " समजावणीच्या सुरात तो म्हणाला, " अगं, आत्ता दिवस आहे. आपण पाहू ना , त्या थडग्यात काही आहे का? म्हणजे तुला स्वप्न पडण्याचं बंद तरी होईल. आणि कदाचित तू झोपेतही चालणार नाहीस. " त्यावर ती घाम टिपीत म्हणाली, "नको हो, मला नाही वाटत ते बघावं. त्यात काही निघालं तर .......? " थडग्यावर वाकत तो म्हणाला, " निघालं तर निघू दे ना. " असं न्हणून त्याने दगडाच्या फटीतून आत हात घातला. मग दोन्ही हातांनी त्याने तो दगड कसातरी सरकवला आणि बाजूला टाकला. वातावरणात एकदाम विक्षिप्त शांतता पसरली. वाहणारा वारा थांवला. वातावरण एकदम ढगाळ झाले.... जणू काही तरी अमानवी घडणार होतं. अमानवी राज्यात खबर पसरली की काय ? ....... आतून एक दोन उंदीर, झुरळं आणि इतर किडे बाहेर आले. मग वातावरण एकदम स्वच्छ झालं. दुपारच्या उन्हात त्या दोघांना मातीच माती दिसली. आत तर काहीच नव्हतं. सुहास ने रेखाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले जणू काही त्याला म्हणायचे होते , बघ आत तर काहीच नाही , उगाच घाबरतेस..."...............
थडग्याच्या दोन्ही कडांवर पाय ठेऊन तो खाली वाकून त्यातील माती , पालापाचोळा बाजूला करू लागला. तशी ती म्हणाली, " चला , तिथे काहीच नाही, उगाच हात लावू नका. तरीही त्याने पंधरावीस मिनिटे माती काढून वर टाकली . ...... मग मात्र त्या दोघांना त्यात एक मळकट मातकट रंगाचा विनाश पावत असलेला देह त्यांना दिसला. देह कसला , सांगाडाच होता. अंगावरची कातडी खरवडून काढल्यासारखी सांध्यांजवळ जमा झाली होती. बाकी सगळी हाडच होती. सगळं साफ केल्यावर सुहासला जे दिसलं त्याने तो झटकन मागे सरकला. देहाच्या डोळ्यांच्या ठिकाणी माती भरलेली दिसलि. आणि हसणारे , एकमेकांवर घट्ट बसलेले दात दिसले. ते भयानक हास्य पाहून सुहास आणि रेखा चांगलेच घाबरले. पण त्याने धीर करून देहाच्या डोक्यावरची माती बाजूला केली तेव्हा मातकट रंगाची कवटी उघडी पडली त्यात दोन्ही हात डोक्यावर आडवे झाले होते. त्या हातात बांगड्या (त्या सोन्याच्या होत्या) असल्याने ती स्त्री असल्याचे समजले. पुढे काय करायचं या विचारात असताना त्याने रेखाकडे पाहिले. तिला भोवळ येत होती. म्हणून तो पटकन उडी मारून वर आला आणि तोल जात असलेल्या रेखाला त्याने सावरले. ती बारिक दिसत होती , तरी तिचं वजन एकदम पेलता येईना, म्हणून त्याने तिला घट्ट धरून ठेवली. जवळ पास पाणी नसल्याने तिला त्याने कसंतरी खांद्यावर उचललं , आणि पायाने तो आजू बाजूची माती थडग्यात टाकू लागला. मग त्याने तिला हलकेच खाली ठेवले. आणि वर काढलेला दगड सरकवीत कसातरी थडग्यावर बसवला . पण तो अर्धवटच बसला. आता तिथे पूर्वी पेक्षा जास्त फट निर्माण झाली होती. त्याने परत रेखाकडे परत पाहिले. तिला कसतरी उचलणार तोच ती हळू हळू शुद्धीवर आली. तरीही तिला धरून त्याने कशीतरी घरात आणली. स्वैपाक्घरतून पाणी घेऊन तिच्या तोंडावर मारलं. तिला भानावर आणीत तो म्हणाला, "तू सध्या विश्रांती घे. " तो दिवाणखान्यात गेला. घड्याळात चार वाजत होते. म्हणजे आपण दीडतास तरी तिथे होतो तर. नशीब मामा अजून आलेले नव्हते.
संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. मामांचा पत्ता नव्हता. सुहास नैनाला घेऊन बाहेर निघाला होता. रेखाला आज घरात एकटं राहावसं वाटत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोरून तो डोळे नसलेला पण हासणारा चेहेरा हलत नव्हता. कशीतरी तिला अर्घा पाऊण तास झोप लागली होती. त्यामुळे डोळ्यावर एकप्रकारची पेंग होती. ती सुहासला म्हणाली, " जायलाच पाहिजे का बाहेर?, मामा आल्यावर जा ना. " तो काळजीच्या सुरात म्हणाला, " खरं तरं तूही ये. घरी बसून तुझी भीती आणखीन वाढेल. येतेस ? " मान हालवून ती म्हणाली, छे छे, असं घर बंद करून कसं चालेल? मामांनाही आवडणार नाही आणि गेले दोन तीन महिने मी इथे आहे वाड्याला कुलुप लागलेलं कधी पाहिलं नाही. त्यापेक्षा तुम्ही आज जाऊच नका ना. " तिच्या बोलण्यात भीती असली तरी नैना ऐकणार नाही म्हणून तो नैनाला घेऊन बाहेर गेला. त्यानि लवकरच येण्याचं ठरवलं. तिनी दोन्ही तिन्ही कंदिल साफ करून लावले.' ती 'खोली बाहेरून बंदच होती. तरीही तिला आज एवढी भीती वाटली नाही. दुपारचा प्रकार फारच भयानक होता. तिला पडणाऱ्या स्वप्नाची आठवण झाली. खरं तर तिनी आईच्या तोंडून पण वाड्याबद्दल फारसं कधी ऐकलं नव्हतं. मग तिलाच हे स्वप्न का पडलं ? .... आणि ते खरं सुद्धा झालं. आता काय करायचं ? वाडा सोडून जायचं तरी कुठे ? आपण सुहास बरोबर गेलो तर ? पण तिनी तो विचार झटकून टाकला. आपण काहितरीच विचार करतोय . मग आपण काय करायचं. हा सुहास मध्ये आला आणि हे असं काही झालं की काय ? पडत होतं स्वप्न तर काय बिघडत होतं ? सुहासला येऊन एक आठवडा झाला . तिनी स्वतःच्या नोकरीचा विचार केलाच नाही. विचारांच्या भोवऱ्यात ती स्वैपाकघरत आली. यांत्रिक पणे तिनी चूल पेटवली. कणीक मळायला घेतली. पण तिला जरा अस्वस्थच वाटत होतं. आज तिचं कामात मन अजिबात नव्हतं. थोड्याच वेळात सुहास आला . मग आठ वाजेपर्यंत त्यांची जेवणं झाली. सुहास तिच्याबरोबर गप्पा मारीत होता. ती त्याला जेमतेमच प्रतिसाद देत होती.
करमणुकीचं कोणतही साधन त्यांच्याकडे नव्हतं. साडेनऊ च्या सुमारास तिनी खोलीत जाऊन अंथरूण तयार केलं . नैना सुहास बरोबर बाहेर खेळत होती. बिछान्यावर ती बसली. दहा वाजून गेले. सुहासनी पण त्याचं आणि मामांचं अंथरूण तयार केल . ती नैनाला घेऊन खोलीत आली. मनात नसतानाही तिनी नैनाला एक दोन गोष्टी सांगितल्या. अकराच्या सुमारास मामा आले. त्यांचा चेहेरा उद्विग्न दिसत होता. बाहेर काहीतरी झालं असावं. त्यांचं जेवण झालं . ते दिवाणखान्यात आल्या आल्याच त्यांना विचारलं., " मामा काही प्रॉब्लेम आहे का ?. त्यावर ते म्हणाले, " नाही रे. हे खेडवळ लोक साले, कोणीतरी त्यांना भडकवतो आणि तहसीलदाराकडे ते तक्रारी करतात. वाड्यामागची जागा म्हणे त्या जाधवाची आहे. इतकी वर्ष हा लेकाचा झोपला होता की काय ? " . "कोण हा जाधव ? " सुहासनि सहज विचारलं. " जाउ दे , आहे एक, तुला माहित नाही . " असं म्हणून मामा अंथरूणावर पडले. झोपायला बारा वाजले.............
रेखाला धड झोप लागली नाही. ती पाणी प्यायला म्हणून उठली. तिने कंदिल मोठा केला. कंदिलाच्या प्रकाशात तिला आपलं प्रतिबिंब दिसलं. चेहेरा गोरा असूनही आता काळसर चॉकलेटी रंगाचा झाला होता. चेहेऱ्यावर लहान लहान सुरकुत्या पडत होत्या. पाहता पाहता त्या गडद झाल्या. आता तिचा चेहेरा म्हाताऱ्या स्त्री सारखा दिसू लागला. तिला कळेना हे काय होतय ?.... हळूहळू तिच्या नाकावरचं मास , ओठ , पापण्या, सगळच आक्रसू लागलं. तिने हाताने स्वतःच्या चेहेऱ्यास चाचपून पाहिले. सुरकुत्या पडल्यामुळे कातडी आता वाळू लागली. गाल आत शिरले. वाळलेल्या ओठातून दात पुढे येऊ लागले. डोळे खोल गेले. तिचं लक्ष सहज हातांकडे गेलं. तिथेही तसच होतं. हातांवरची कातडी आक्रसून कोपऱ्याजवळच्या सांध्याजवळ जमा होऊ लागली. बोटांची हाडं दिसू लागली. नखं लहान होती तरी आता ती डाकिणीच्या नखांसारखी ती बाहेर येऊ लागली. छाती बसकट झाली. गळ्याजवळची कातडी इतकी सुकली की तिची श्वास नलिका तेवढी शिल्लक राहिली. . सबंध अंगावर एक प्रकारची मरगळ आली. ती घाबरली . आता कोणाला बोलावणार ...? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं जवळ जवळ सांगाड्यातच रुपांतर झालं. ती स्वतःशीच म्हणाली , " काय करू मी ? " पण उत्तर सुचलं नाही. भीत भीतच तिनी प्रतिबिंबाकडे पाहिलं. तिचे दात आता पूर्णपणे बाहेर आले आणि एकमेकांवर घट्ट बसले. ....." अगदी, दा त खि ळ ब स ल्या सा र खे. आणि तिच्या दातांच्या फटीतून रक्तवर्णी लस गळू लागली. तिने "शी " म्हणून ओरडायचा प्रयत्न केला. पण जबड्याची हालचाल बंद झाली. डोळ्यात पाणी आलं. ........ मग तिला तिच्या मागे हालचाल जाणवली. कुणाची तरी सावली तिथे होती. .... मागे "क म ळी " उभी होती. जशी थडग्यात होती अगदी तशीच. ती हासत हासत फणकारून म्हणाली, " कार्टे. , मला परत तिथेच दडवून ठेवलीस काय ? वाड्यावर का नाही आणलस ? तुझा तो मामा हलकट मेला, जबरदस्ती केलीन मुडद्यानी आणि गळा आवळला. अर्धवट जिवंत असतानाच म्हशानी थडग्यात पुरलीन. तू पण पुन्हा पुरलीस मला. तुला आता रोज रात्री मी अशीच झोंबणार . लक्षात ठेव. मी आता या खोलीतच राहणार आहे. तुला सोडणार नाही. आता कितीही बोंब मार , काही उपयोग नाही. तुझी मुलगी लवकर उठणार नाही. " हिः हीः हिः हीः ... ती दुष्टपणाने हसली.
तेवढ्यात मामा उठले. त्यांना तशी झोप लागलीच नव्हती. त्यांनी सुहासकडे पाहिलं. तो झोपला होता. त्यांच्या मनात आलं. कितीतरी दिवस झाले रेखाला हात लावण्याची संधी मिळत नव्हती. आज पाहू. ते मांजराच्या पावलाने हातातला कंदिल सांभाळत रेखाच्या खोली कडे गेले. दरवाजा ढकलला. पण तो आतून बंद होता. रेखाचे कमळी मध्ये पूर्ण रुपांतर झाले होते. कमळी म्हणाली, " ऊठ , दार उघड, तो नीच आलाय बघ." रेखा जोरात एखाद्या जनावरासारखा हुंकार देऊन उठली. दरवाजाकडे पाय घाशीत , म्हणजे पायांची हाडं घाशीत गेली. तिने अडसर दूर केला. दरवाजाबाहेर कंदिल घेऊन मामा उभे होते. ते आत आले. त्यांचं लक्ष अजून रेखाच्या चेहेऱ्याकडे गेलेलं नव्हतं. ते लंपटपणे म्हणाले, " फार दिवस झाले , आज एकांत मिळालाय, ये. " त्यांनी कोपऱ्यात कंदिल ठेवला आणि हात पुढे केला. रेखातली कमळी उसळली. तिला मामांना घोळसून मारायचं होतं. तिने रेखाचा हडकुळा हात पुढे करून मामांच्या हातात ठेवला. मामांची नजर रेखाच्या चेहेऱ्याकडे गेली. त्यांनी चेहेरा पाहिला मात्र , आणि ते सर्रकन मागे सरले. घाबरून ओरडले, " ए.. ऽ कोण आहेस तू? "पटकन खोलीतून बाहेर पडण्याच्या धडपडीत उंबऱ्याला अडखळून पडले. त्यांचा पाय कंदिलाला लागला आणि तो आडवा झाला. त्यांनी पळता पळता मागे वळून पाहिलं , रेखा कमळीच्या आवाजात विचित्र हसत म्हणाली, " अरे , काय घाबरतोस , ये की मुडद्या.... " आणि तिनी दरवाजा बंद केला. मामा दिवाणखान्यातल्या त्यांच्या अंथरूणाशी आले. हसण्याच्या आवाजाने सुहास पण जागा झाला. त्याने विचारलं , " काय झालं मामा .....? ते म्हणाले , " काही नाही रे, स्वप्न ... दुसरं काय ? " अर्थातच त्याचं समाधान झालं नाही. पण उठण्याचा त्रास कशाला घ्यायचा , म्हणून तो परत झोपला. मामांना कळेना , कमळी घरी कशी आली ? त्या विचारातच त्यांना झोप लागली .
इकडे रेखातल्या कमळीने दार लावून घेतलं. रेखाची झोप तर केव्हाच उडली होती. ती भिंतीला टेकून बसली होती. तोंडातून गळणारी घाण अजून थांवत नव्हती. रात्र सरता सरता चार वाजायला आले. चारचा कोंबडा दूर कुठेतरी आरवला. कमळी म्हणाली, " आता मी जाते माझ्या जागी. पण परत येईन रोज रात्री, लक्षात ठेव. केव्हापासून मी तुझ्या स्वप्नात येत्ये , पण तू काहीच केलं नाहीस. " मग रेखाला कसला तरी झटका बसल्यासारखं झालं आणि ती बसल्याजागी कोलमडली. तासाभरात ती पूर्ववत झाली. तिला झोप लागली होती. ज्या अवस्थेत ती पडली होती , त्याच अवस्थेत ती झोपली होती. सकाळचे आठ वाजले तरी रेखा उठेना. म्हणून सुहास अस्वस्थ झाला. मामाही झोपले होते. पण ते उशिरा आले हे त्याला माहित होतं. मग त्याने प्रथम मामांना उठवले आणि रेखाबद्दल विचारले, पण एक शब्दही बोलले नाहीत. मग सुहासने रेखाच्या खोलीचे दार वाजवले. पण आतून कोणताच आवाज आला नाही , म्हणून त्याने जोरजोरात वाजवला. रेखा जणूकाही जमिनी त पुरली गेली असल्याच्या भावनेत झोपली होती. अंगावरचे पांघरूण तिला जड दगडासारखे वाटत होते. मग ती अर्धवट जागी झाली. कोणीतरी अंगावरच्या दगडावर ठक ... ठक .. करीत असल्यासारखे तिला वाटलं. पण कोण असावं ? असं तिच्या मनात आलं. मग मध्येच तिला डुलकी लागत होती. तिच्या लक्षात आलं कोणीतरी दार वाजवीत होतं. कोण असेल ...? तिला कळत नव्हतं. ती जागी झाली. तिचं अंग आणि डोकं अगदी जड झालं होतं. तिने मग नैनाला उठवलं. साडी सारखी करीत तिने दार उघडलं. दारात सुहास उभा होता. "रेखा , अगं आठ वाजून गेल्येत , तुला आज एवढी झोप कशी लागली ? " उत्तरादाखल तिने "काय माहित " अशा अर्थी खांदे उडवले. नैनाला उचलून तिने स्वैपाक घर गाठले. सकाळची सगळी कामं तिने जड मनाने उरकली. मग ती स्वैपाकघरात स्वस्थ वसली. तिला रात्रीचा प्रसंग आठवला. ती परत शहारली. मामांचं तिला आश्चर्य वाटलं आणि रागही आला. आजही तेच होणार या कल्पनेने तिची छाती धडधडली् ही कमळी कोण आहे ?..... नैनाची चिंता तिचा अभ्यास वगैरेंची तिला आता फिकिर वाटेनाशी झाली. स्वतःचं आयुष्य जणू पणाला लावल्यासारखी ती वागत होती. बराच विचार करून तिने स्वतःवर ताबा मिळवला. निदान तिला तरी तसं वाटलं. ... रात्र व्हायला अजून बराच अवधी आहे. तिने मनाला बजावले. तिला झोप नसल्याने फेकल्यासारखं वाटत होतं. मामा तिच्या नजरेला नजर देत नव्हते. आज प्रत्येक जण अगदी स्वतंत्रपणे वागत होता. जणू दुसरा अस्तित्वातच नव्हता. सुहासने विचार केला . आठवड्यावर दोन दिवस झाले. आणखी दोन दिवसानी मी जाणार. काय वाटेल ते होवो. तरी त्याचं मन सारखं रेखाचाच विचार करीत होतं. लग्नाबद्दल रेखाने अजिबातच पुष्टी न दिल्याने त्याची निराशा झाली होती. पण आता तिला त्याने संधी साधून परत विचारण्याचे ठरवले होते. ती नाही म्हणाली तरी आणि हो म्हणाली तरी आपण परवा जायचच. ती हो म्हणाली तर एक प्रकारच्या उत्साहात जाता येईल. ...... जेवणं झाली. ...... मामा बैठकीवर कसलेसे कागद पाहात बसले होते. रेखाला ऐकू यावं या हेतूने त्याने मामांना जरा मोठ्या आवाजात सांगितलं, " मी परवा निघतोय. दहा बारा दिवस झाले मला येऊन. यापेक्षा जास्त थांबणं मला कठीण आहे. .........
रात्री परत सगळा तमाशा कमळीने केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणं झाल्यावर तो रेखाच्या खोलीत तिला भेटायला गेला. दरवाजातून आत पाहिलं, रेखा सतरंजीवर सैरटासारखी मुद्रा करून बसली होती. नैना तिच्या समोर बसून त्यानेच शिकवलेली चित्रं काढीत होती आणि रेखाला दाखवीत होती. रेखा तटस्थ दिसलि, म्हणून सुहासने आत येत विचारले, " अशी कोणत्या विचारात गढली आहेस ? " त्यावर ती घाईघाईने म्हणाली, " छे, छे, कुठे काय ? " याचा अर्थ तिला काहीच सांगायचे नव्हते. तिला आपल्याबद्दल विश्वास वाटत नसावा. तिला पुढच्या आयुष्याचा विचार करायचाच नाही का ? त्याच्या मनात आलं . मग त्याने तिला पटकन विचारल, "मी तुला लग्नाबद्दल विचारलं ते तुला आवडलं नाही का ?निदान नाही तरी म्हण. मी परवा जाणार आहे. " थोडा वेळ थांबून ती म्हणाली, " मला माहित आहे तुम्ही जाणार आहात ते. पण मला सांगा, माझ्यासारख्या कमजोर स्त्री शी लग्न करून तुम्ही काय साधणार आहात ? " तो पुन्हा अजिजीने म्हणाला, "रेखा नीट विचार कर. तू मला आवडतेस आणि नैनाला पण मी सांभाळायला तयार आहे. ...... तुला .... मी आवडत नाही का ? " हे ऐकल्यावर रेखाच्या चेहेऱ्यात असा काही बदल झाला की सुहास दचकला. येणारा आवाज तिचा नसावा असं त्याला वाटलं. ती म्हणाली, " आज रात्री ये, मी तुला याच उत्तर देईन ". तरीही तो धीर करून म्हणाला, "रात्री ? असल्या शुभ प्रश्नाला रात्रीचा मुहूर्त कशाला ? तू निशाचर आहेस का? " असं म्हंटल्यावर तिला कालची रात्र आठवली. तिचे डोळे लालसर झाले. रागाने ती फुत्कारली, " मला निशाचर म्हणतोस काय ? मग येच रात्री. जा आता. " एकदम संचारल्यासारखा तिचा चेहेरा झालेला पाहून सुहास काही न बोलता निघून गेला. त्याला काही सुचेना. तो काही न सांगता बाहेर निघून गेला. मामांना काय वाटेल याची त्याला पर्वा नव्हती. तो बाहेर गेला खरा, पण बाहेर ऊन चांगलच तापलं होतं. दुपारचे तीन वाजत होते. कुठे जाऊन बसायचं. असा विचार करीत तो नकळत नदीकाठाकडे जाऊ लागल. वळणावर राहणाऱ्या एका गावकऱ्याने ते पाहिलं. तो ओरडला. " ओ पावणं नदीवर उन्हाच्या टायमाला कशापायी चालला ? " सुहासने मागे पाहिले. गावकरी वाहणा वाजवीत त्याच्याकडेच येत होता. सुहास त्याला पाहून थांबला. त्यावर तो गावकरी म्हणाला, " या गावातलं दिसत न्हाई तुमी. इकडं कुनीकडं आला ? " सुहासने त्याला मामांकडे आलेला असून तो त्यांचा भाचा आहे असे सांगितले. त्यावर गावकरी सावध होत म्हणाला, "असं . माझं नाव जाधव. माझं घर ह्ये सामने हाय बगा. या की राव वाईच चा बी घेऊ आनि गप्पा मारू. नदीकाठाकडं कुठं जाता. या या ... " सुहासलाही ते पटलं. तो त्याच्यामागे गेला. घरात गेल्यावर त्याने एक सतरंजी अंथरली आणि सुहासला बसायला सांगितलं. आतून पाणी आणलं. मग दोघेही स्वस्थ झाल्यावर तो म्हणाला, " पावणं असं आहे बगा, गैरसमज करून घेऊ नका. पण हे तुमचे मामा हाय ना , लई चांबट मानूस. अवो वाड्यावर मी नोकर व्हतो. आता काय सांगणार हा मामा बायामानसाच्या बाबत एकदम असा बगा (असं म्हणून त्याने आपले बोट नाकाकडे नेलं. ) अवो , सवताच्या दोन बायका ह्यानं खाल्ल्या. पन समाधान न्हाई. अजून बाईच्या मागं हायेच. काय म्हनावं याला ? " "तुम्हाला काही अनुभव आहे ? का आपल्या गाव गप्पा आहेत ह्या ? सुहासने मधेच विचारलं. त्याला थोडा राग आला होता. " अ न भ व ? जाउ द्या , तुमाला इस्वास वाटत न्हाई. " जाधव थोडा चिडून म्हणाला. मग तो म्हणाला, " तुमी कोनत्या गावी ऱ्हाता ? काय करता ? " सुहास मग म्हणाला, " अहो विषय बदलू नका. मामांचा तुम्हाला वाईट अनुभव आला ना ? मग सांगाच. त्यावर तो म्हातारा खाली मान घालून म्हणाला, " जाऊ द्या. कशाला विचारता. झाली लुसकानी भरून थोडीच निघनार ? " नाही नाही, आता तुम्हाला सांगावच लागेल. "सुहासने जोर दिला .
तो ऐकत नाही असं पाहून जाधव म्हणाला, " ठीक हाय. बघा मी वाड्यावर धा पंधरावर्ष नोकर व्हतो. ह्या मामाचा काका व्हता तवापासून. काका मामाना हिडीस फिडिस करायचा. फार वाईट वागवायचा. मामाना आई आनी एक बहीन बी व्हती. काका याना पैसा बी द्यायचा न्हाई.बहीन इधवा. गाव सोडून गेली. तिला येक मुलगा व्हता(म्हणजे सुहास) मामांची बायको व्हती . ती गेली. पोटी पोर झालं न्हाई म्हनून दुसरी बायको आनली. ती बी गेली , तिला बी पोर झालं न्हाई. आनी मामा वांझोटा तो वांझोटाच ऱ्हायला बगा. वंशाला दिवा न्हाय. मंग काका बी गेला. काकाला आनखी येक पोर हुती , ती गावातच हुती(म्हणजे रेखाची आई) . काका गेल्यावर मामा झाले मालक. सर्वच ताब्यात घेतलन. सावकारीचा धंदा करून लोकांना फशिवलं. बक्कळ पैसा कमावला. एक चुलत भाऊ बि व्हता. त्याचं नाव सदा(म्हणजे रेखाचा खरा मामा). त्याला वेड लावलं मामानी. दिस दिस खायाला घालीना मामा. बिचारा कंटाळला. पयले पयले त्यांची मारामारी व्हायचि. मंग मामा त्याला खोलीत कोंडून ठेवायचे आणि ट्वायचे̱. घाण घाण शिव्या घालायचे. का तर तो काकाचा मुलगा. मिळकतीचा वारस. त्याची गावात ऱ्हानारी बहीन कधी आली नाही. येक दीड वर्षा पूर्वी माझी मुलगी , कमळी नाव तिचं, तिला पोर व्हत न्हाई म्हनून नवऱ्यानं सोडलीन. ती घरीच असायची. या मामाला कसं कळलं , काय माहित ? मला म्हनाला, " कमळीला वाड्यावर आन. झालं तर पोर हुईल बी. वाड्याला वंशाचा दिवा मिळंल. तुलाबी मिळकतीत वाटा देईन. मला मिळकतीचा लोभ सुटला. मी इचार केला , नंतर वाटा कशाला ? आत्ताच वाटा घ्यावा. हा मामा फिरला तर ? मग मामा म्हनाला, चल ठीक आहे, कमळीला आनशील तवापासून वाड्याच्या मागची नदीपर्यंतची जमीन तुझी. पाह्यजे तर लिहून देतो. भडव्यानी मग कागदावर लिहून दिलं. आणि आता फिरला लेकाचाम्हनून तर तहशीलदार कडे कंप्ल्रेटी केलि. . मी कमळीला मग समजावली. बघ रानी सारखी ऱ्हाशील. ती न्हाईच म्हनत व्हती. पन मी तिला भरीस पाडलं. तसंही तिच्याशी आता कोण लग्न करनार व्हतं. ? जिंदगीभर तिला सांभाळणार तरी कशी ? मी तिला एका रात्री वाड्यावर आनली. नंतर मात्र तिला आज तागायत पाह्यली न्हाई. ति ना कधी वाड्यावर दिसली , ना माझ्या घरी वापस आलि. माझी कमळी .... (त्याच्या डोळ्यात पाणी आलं) " डोळे पुसून तो म्हणला, " मी रोज मामांना इचारायचो, कमळी कुठं हाय ? तशी म्हनायचा कशाला फिकिर करतोस , इथे आहे ति वाईट आहे का ?. मग त्यानी मला एक दिवस वाड्यावरून हाकलून दिलं. हराम खोर साला, मारला पायजेल साल्याला. , माझी मुलगी मिळाली की काय वाटेल ते कर. मला तुजी जमीन नको अन कायबी नको. " तो मुसमुसून रडू लागला.
(क्र म शः)
हम्म.. रंगत चाललीये गोष्ट.
हम्म.. रंगत चाललीये गोष्ट.
मिरिंडा, थोडी विस्कळीत वाटतेय
मिरिंडा, थोडी विस्कळीत वाटतेय हं कथा. म्हणजे बघा, रेखाला जर का ती अगदी लहान असल्यापासून ती स्वप्न पडत असतील तर कमळी खूप आधीपासूनच मृत असायला हवी.
किंवा तिला पडणारी स्वप्नं वेगळी आहेत असं तरी स्पष्ट व्हायला हवं असं मला वाटतं.
भानुप्रिया +१ आणि रेखा
भानुप्रिया +१
आणि रेखा कॉलेजात असताना की शाळा झाल्यावर लग्न झालंय ना? तर मग तिच वय १९-२० नसणार. कारण नैना आता ४-५ वर्षांची असेल ना शाळेत घालयचं आहे म्हणजे.
लवकर लवकर भाग टाका.
लवकर लवकर भाग टाका.
भानुप्रिया, सस्मित, कथेचे
भानुप्रिया, सस्मित, कथेचे नाव (स्वप्नातलं भविष्य) मला वाट्त कमळीशि काहीतरि रिलेट करत असावे म्ह्णून एक दिड वर्श म्हट्ल असेल
कथा मस्त चाललिये...!!! पण जरा
कथा मस्त चाललिये...!!! पण जरा मोठे मोठे भाग टाका....!!!
भानुप्रिया +१ एक दीड
भानुप्रिया +१
एक दीड वर्षापूर्वी कमळी जिवंत असेल तर रेखाला लहानपणापासून तिची स्वप्न कशी पडतील?