निरोप सी हॅरियरला, स्वागत ‘मिग-२९ के’चे

Submitted by पराग१२२६३ on 11 May, 2016 - 08:27

seaharrier_380PIB.jpg

गोव्यामधल्या दाबोळीत असलेल्या नौदलाच्या हवाई शाखेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भा. नौ. पो. हंसा या तळावर ११ मेला सी हॅरियर या लढाऊ विमानांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. १६ डिसेंबर १९८३ पासून ११ मे २०१६ पर्यंत गेली ३३ वर्षे या विमानांनी ‘भा. नौ. पो. विक्रांत’ आणि ‘भा. नौ. पो. विराट’ या विमानवाहू जहाजांवरून या विमानांनी भारताच्या हिंदी महासागरातील सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण शीतयुद्धानंतरच्या कालखंडात बदललेल्या आंतरराष्ट्रीय भू-राजकीय समीकरणांनंतर या सबसॉनिक म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा किंचित कमी वेगाने उडणाऱ्या विमानांमुळे भारतीय नौदलाला हिंदी महासागरातील राष्ट्रहितांच्या सुरक्षेबरोबरच नवनवीन आव्हानांचा सामना करणे अवघड जात होते. त्यामुळे हिंदी महासागरावर आपला दरारा कायम ठेवण्यासाठी नौदलाला नव्या विमानवाहू जहाजांबरोबरच नव्या लढाऊ विमानांचीही आवश्यकता भासू लागली. पण कोणताही संरक्षण व्यवहार वेळेत पूर्ण न करण्याची, सैन्यदलांना आवश्यक असलेली शस्त्रसामग्री मागणीनंतर कित्येक वर्षांनी उपलब्ध करून देण्याची सत्तेत असलेल्या भारतीय राजकीय पक्षांची परंपरा आहे. परिणामी भारतीय सैन्यदलांना मिळणारी शस्त्रास्त्रे आणि त्याची खरी मागणी यामध्ये कायमच जमीन-आस्मानाचे अंतर राहते. गेल्या काही वर्षांपासून संरक्षण सामग्रीच्या खरेदीत वारंवार भ्रष्टाचार उघड होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अधिकच वेळखाऊ बनली आहे.

तरीही उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळाच्या मदतीने भारतीय सैन्यदलांनी आपल्या क्षमतेमध्ये बरीच वाढ केलेली आहे. भारतीय नौदलाचे कार्यक्षेत्र आज हिंदी महासागराच्याही पलीकडे विस्तारत आहे. ‘हिंदी महासागरातील सर्वांत मोठे आणि प्रबळ नौदल’ अशी ओळख भारतीय नौदलाला लाभलेली आहे. तसेच त्याला ‘निळ्या पाण्यावरील नौदल’ असेही म्हटले जात आहे. अन्य मागण्यांबरोबरच नव्या विमानवाहू जहाजाची आणि अत्याधुनिक लढाऊ विमानाची नौदलाची गरज पूर्ण करण्यासाठी अखेर भारताने रशियाकडून ‘भा. नौ. पो. विक्रमादित्य’ या विमानवाहू जहाजाच्या खरेदीचा आणि त्याच्याबरोबर ‘मिग-२९ के/केयूबी’ या अत्याधुनिक बहुपयोगी लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला होता. त्यानुसार १९ फेब्रुवारी (शिवजयंतीलाच, हा योगायोगच) २०१० रोजी ‘मिग-२९ के’ आणि ‘मिग-२९ केयूबी’ गोव्यातील नौदलाच्या भा. नौ. पो. हंसा या हवाई तळावर भारतीय नौदलात सामील झाली.

‘मिग-२९ के’ आणि ‘मिग-२९ केयूबी’ ही विमाने सी हॅरियरची जागा घेण्यासाठी सामील होऊ लागली होती. ब्रिटनकडून भारताने ३० सी हॅरियर विकत घेतली होती. VTOL या तंत्राचा वापर करणारी ही जगातील एकमेव लढाऊ विमाने होती. या तंत्रामुळे या विमानांना विमानवाहू जहाजावच्या मर्यादित लांबीच्या धावपट्टीवरून हेलिकॉप्टर उड्डाण करणे किंवा उतरणे शक्य होते. मात्र ब्रिटन आणि भारताकडेच अशी विमाने होती. अमेरिकेने या तंत्राचा ब्रिटनकडून स्वीकार करून स्वतःची अशी मर्यादित संख्येने विमाने बनवली होती. पण या तंत्रामुळे ही विमाने जास्त शस्त्रास्त्रे स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हती. त्यातच यांचा पल्लाही मर्यादितच होता. त्यामुळे २००६ मध्ये ब्रिटनने आपल्या नौदलाच्या ताफ्यातून या विमानांना निवृत्त केले आणि त्यांचे उत्पादनही बंद झाले. भारतीय नौदलाच्यासुद्धा आवश्यकता बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत या विमानाकडून भागत नव्हत्या. ब्रिटनने ही विमाने निवृत्त केल्यावर अलीकडच्या काळात भारतीय नौदलाला सी हॅरियरच्या देखभालीत अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यांचे सुटे भाग मिळेनासे झाले होते. येत्या दोनेक महिन्यांमध्ये ‘भा. नौ. पो. विराट’ही सेवानिवृत्त होत आहे. अशा परिस्थितीत या विमानांना सेवानिवृत्त करणेच योग्य वाटत होते. मध्यंतरी नौदलाने सी हॅरियरमध्ये काही सुधारणा केल्या होत्या. पण त्यामुळे नौदलाच्या गरजांची पूर्तता होत नव्हती.

अखेर सी हॅरियर आज निवृत्त झाले आहे. त्याद्वारे VTOL वर आधारलेल्या सबसॉनिक लढाऊ विमानांचे युगही आता संपुष्टात आले आहे. अशा तंत्रावर आधारलेल्या एकमेव ‘एफ-३५ सी’ या पाचव्या पिढीच्या अत्याधुनिक विमानाच्या अमेरिकेत चाचण्या तिम टप्प्यात आल्या आहेत. ११ मेला नौदलाच्या आय. एन. ए. एस. ३०० या तुकडीतील (स्क्वाड्रन) सी हॅरियर सेवानिवृत्त झाली असून त्यांच्या जागी येत्या काळात ‘मिग-२९ के’ आणि ‘मिग-२९ केयूबी’ ही ४++ पिढीतील स्वनातीत (सुपरसॉनिक) लढाऊ विमाने सामील करण्यात येणार आहेत. तोपर्यंत सी हॅरियरच्या वैमानिकांना ‘मिग-२९ केयूबी’वर प्रशिक्षण दिले जाणार आहे. कशी आहेत ही अत्याधुनिक ‘मिग-२९ के’?

‘मिग-२९ के/केयूबी’ ही विमाने विमानवाहू जहाजावरून STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) या तंत्राद्वारे उड्डाण करतात आणि उतरतात. या तंत्रामुळे आधीच्या सी हॅरियरपेक्षा या विमानाची वहनक्षमता सुमारे दोन टनांनी जास्त आहे. ‘मिग-२९ के’ एक आसनी विमान आहे. या विमानाच्या शस्त्रसामग्रीमध्ये केएच-३१ ए, केएच-३१ पी, केएच-२९ टी आणि रडारनियंत्रित केएच-३५ ई ही क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत. ‘मिग-२९ के’वर ‘डागा आणि विसरा’ या तंत्रावर आधारित आर-६६ आरव्हीव्ही आणि आर-७३ ई ही हवेतून हवेतील लक्ष्यांवर मारा करणारी क्षेपणास्त्रेही बसविता येतात. त्याचबरोबर क्लस्टर बॉम्ब्स, रॉकेट्स यांच्यासह साडेपाच टन वजनाची शस्त्रसामग्री हे विमान वाहून नेऊ शकते. यावर जीएसएच-३०१ ही स्वयंचलित मशीनगनही आहे. तसेच उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणाही यावर बसविण्यात आलेली आहे. या सर्वांमुळे आपल्या विमानवाहू जहाजांच्या ताफ्याचे शत्रुच्या पाणबुड्या, युद्धनौका, विमानांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्याची क्षमता ‘मिग-२९ के’मध्ये आली आहे. याचा पल्ला सुमारे ७०० सागरी मैल (नॉट्स) असला तरी हवेत उडत असतानाच त्यात इंधन भरून तो आणखी वाढवता येतो.

‘मिग-२९ के’वरील झुक-एमई या रडारच्या सहाय्याने विमानाच्या भोवतीच्या १२० कि.मी. परिघाच्या प्रदेशातील १० लक्ष्यांचा एकाचवेळी शोध घेता येतो आणि त्यातील सर्वाधिक धोकादायक ४ लक्ष्यांवर एकाचवेळी हल्लाही चढवता येतो. कॉकपीटमधील बहुआयामी कलर डिस्प्ले अँड कंट्रोल सिस्टीमच्या मदतीने वैमानिकाला युद्धप्रसंगी हल्ल्यांचे नियोजन करणे सोपे जाते. वैमानिकाला हेल्मेट माऊंटेड साईटच्या मदतीने लक्ष्य निश्चित करून त्या दिशेने क्षेपणास्त्र डागून त्वरित शत्रुपासून दूर जाता येते. कारण त्यानंतर संबंधित क्षेपणास्त्र लक्ष्य स्वतःहून भेदते.

‘मिग-२९ के/केयूबी’ जरी रशियन विमान असले तरी त्याच्या विकासात भारतानेही काही प्रमाणात योगदान दिलेले आहे. यावरील वॉर्नंग सिस्टीम, रडार आणि मिशन संगणक आणि काही संवेदकही भारतीय बनावटीचे आहेत. त्याबरोबरच रशियन, फ्रेंच, इस्रायली यंत्रणाही यात बसविलेल्या आहेत. उंचावरून उडत असताना याचा वेग ताशी २४०० कि.मी./तास असतो. सी हॅरियरपेक्षा हा वेग दुपटीपेक्षा जास्त आहे. हिंदी महासागरावरील उष्ण, खाऱ्या आणि दमट हवामानाबरोबर शत्रुच्या रडारच्या नजरेपासून विमानाचे संरक्षण करण्यासाठी ‘मिग-२९ के/केयूबी’वर रासायनिक लेप लावण्यात आलेला आहे.

या विमानावर ९ शस्त्रास्त्रे ठेवण्याच्या जागा (हार्ड पॉईंट्स) आहेत. त्यातल्या एकावर (मध्य भागी असलेल्या) हार्ड पॉईंटवर अतिरिक्त इंधनटाकी (ड्रॉप टँक) बसवला जातो, तर अन्य हार्ड पॉईट्सवर माहिमेच्या स्वरुपानुसार आणखी ड्रॉप टँक आणि शस्त्रास्त्रे कमी-जास्त प्रमाणात बसवली जातात. हे हार्ड पॉईट्स आवश्यकतेनुसार १३ पर्यंत वाढवता येतात. काही वेळा एकाचवेळी चार ड्रॉप टँक बसवून टँकर विमानाप्रमाणेही याचा उपयोग करता येतो. सी हॅरियरसारखे हेलिकॉप्टरप्रमाणे हे विमान विमानवाहू जहाजावर उतरणार नाही, तर सामान्य विमानाप्रमाणेच ते उतरेल. पण विमानवाहू जहाजावरील जेमजेम २०० मी. लांबीच्या धावपट्टीवर या स्वनातीत विमानाला उतरणे शक्य व्हावे यासाठी त्याच्या मागे एक हूक बसविलेले आहे. विमानवाहू जहाजाच्या धावपट्टीवरील अरेस्टेड वायरमध्ये हे हूक अडकले की तात्काळ विमानाचा वेग शून्यावर येतो.

‘मिग-२९ केयूबी’ दोन आसनी विमान आहे. ‘मिग-२९ के’च्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची प्रमुख भूमिका हे विमान बजावत असले तरी ते प्रत्यक्ष युद्धासाठीही वापरता येते. हे इंटरसेप्टर विमान असल्याने युद्धाच्या काळात शत्रुच्या संदेशवहनात अडथळे आणण्यासाठी आणि जॅमर म्हणूनही हे विमान वापरता येते.

असे ‘मिग-२९ के’ आणि ‘मिग-२९ केयूबी’ सी हॅरियरपेक्षा अधिक सक्षम आहे. सी हॅरियर भारतीय नौदलात सामील झाले होते, त्या काळात अलिप्ततावाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य सूत्र होते. त्यामुळे इतर देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याची भारताची भूमिका होती. परिणामी भारताच्या नौदलाचे कार्यक्षेत्रही भारताच्या सागरी सीमांच्या आतच होते. म्हणून सी हॅरियरच्या मदतीने भारताच्या सागरी प्रदेशांचे संरक्षण करणे शक्य होत होते. पण आर्थिक उदारीकरणानंतर भारताच्या राष्ट्रहितांचा विस्तार जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये झाला आहे. त्यामुळे भारतीय नौदलालाही अधिक सक्षम, अत्याधुनिक लढाऊ विमानांची आवश्यकता भासत होती. ती गरज ‘मिग-२९ के’ पूर्ण करत आहे.

तरीही सी हॅरियरच्या योगदानाला कमी मानता येणार नाही. सी हॅरियरने देशाच्या सागरी सीमांच्या सुरक्षेत बजावलेल्या आजपर्यंतच्या कामगिरीला सलाम.
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती. त्या 'निळ्या पाण्यावरील नौदल" शब्दांवरून मधे ब्रिटिश साम्राज्याबद्दल वाचलेल्या एका पुस्तकातील माहिती आठवली. पूर्वी ब्रिटिश आरमार जेव्हा समुद्रात लांबवर जाउ लागले - समुद्रावरून अनेक दिवस प्रवास करता येउ लागला तेव्हा त्याकरता वापरलेले ते शब्द होते. सोळाव्या शतकात स्पॅनिश आरमाराचा पराभव करण्यात त्यांना यश आले तेथून ब्रिटिश साम्राज्य विस्तारू लागले - वगैरे माहिती त्यात वाचली होती व त्याचा या शब्दांना संदर्भ असावा असे वाटते.

त्या काळात अलिप्ततावाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य सूत्र होते. त्यामुळे इतर देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याची भारताची भूमिका होती. >>> हे समजले नाही. ती भूमिका अलिप्ततावादाशी थेट संबंधित नसावी, आणि ती अजूनही तशीच असेल असे वाटते. मात्र अमेरिकेत जगात इतरत्र असलेले "अमेरिकन इंटरेस्ट्स" ही टर्म कायम ऐकू येते तसे आता भारताचेही असावे. त्याकरता या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग होत असेल.

छानच माहिती पराग. मिग २९ बरोबर नौदल तेजस ची नौदल आवृत्ती सुद्धा वापरणार आहे (कधी माहिती नाही). त्या निमित्ताने भारतीय बनावटीच्या "विक्रांत" बद्दल माहिती काल वाचत होतो. त्या नौकेची बांधणी करताना मिग २९ डोळ्यासमोर ठेवून त्याची लांबी डीझाईन फेज मधेच वाढविण्यात आली. २०१८ ते २०२० पर्यंत ती विमानवाहू नौकासुद्धा ताफ्यात सामील झाल्यास नौदलाला खुपच बळकटी मिळेल.

ह्या विषयावर अजून लेख वाचायला आवडतील. पु. ले.शु.

फारएण्ड
दुसऱ्या देशाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याचे आपल्या परराष्ट्र धोरणाचे तत्त्व कायम असले तरी आपले परराष्ट्र धोरण आता अधिक वास्तववादी झाले आहे.

छान महिती. धन्यवाद.
हजारों कि.मीचा किनारा लाभलेल्या आपल्या देशात नौसेनेबद्दल मात्र अज्ञानच खूप. 'नेव्ही डे'ला मुंबईत लोक ज्या संख्येने मुलाना घेवून तिथें येतात त्यावरून हें अज्ञान कुतूहलाअभावीं नसून त्याबाबत नेमके प्रयत्नच झाले नसावेत हेंच कारण अधिक योग्य असावं. नौकानयन व सागरी जीवन यावर एक कायमस्वरूपी प्रदर्शन 'विक्रांत' या निवॄत्त आरमारी बोटीवर करावं या प्रस्तावाला भरघोंस शासकीय पाठींबा न मिळणं व 'विक्रांत' भंगारात काढली जाणं हेंही त्याचंच द्योतक असावं. या पार्श्वभूमिवर आपला लेख अधिकच कौतुकास्पद.
योगायोगाने, आजच 'गजाली' या 'कोकणी' धाग्यावर पोस्ट केलेलं हें व्यंगचित्र -

<< माथेरानला जाण्याची खरी मजा टॉयट्रेनची .. >> जुन्यातलो 'रोमान्स' जिवंत ठेवंक आपल्या स्वतःच्या आंतलां ल्हान मूल जपांक होयां, कान देवन त्येचां ऐकांक होयां. तसां आतां होणां नाय, ही काळजीची बाब आसा ! Sad

'विक्रांत' बोट भंगारात काढतत म्हटल्यार तिकां घरीं आणूया म्हणान उच्छाद मांडलेल्यान आणि
आज माथेरानची 'टॉय-ट्रेन' घेवन येवया ह्या हट्टाक बसलोहा !!

bhamDan.JPG

४.५ जनरेशन? मला वाटल फ़क्त युरोपियन सध्याची आणि मिग ३५ असेल. वाह आपल्या कडे आधुनिक विमाने आली हे उत्तम. आता वायुदला कडे लवकरात लवकर नविन विमाने येवोत.

हवाई दलामधल्या सुखोई-३० एमकेआयलाही ४+ मधून ४++ मध्ये परावर्तित करण्याची योजना आहे. पण संरक्षणविषयक कोणत्याही योजना/प्रकल्पाकडे वेळेवर लक्ष न देण्याची वृत्ती कायम असल्यामुळे सुखोईचे अपग्रेडेशनही रेंगाळले आहे. अशा गोष्टींचा परिणाम आपल्या लष्करी तयारीबरोबरच परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीवरही होत आहे.

युरो, १९८० नंतर डीझाईन व तयार केली गेलेली बरीचशी विमाने ४ श्रेणी (खरतर जनरेशन म्हणजे पिढी म्हणणे जास्त सयुक्तिक आहे) मधे मोडतात. त्या पैकी काही विमानांमधे असे काही बदल केले आहेत ज्यामुळे त्यांची संहारकता आणि क्षमता प्रचंड वाढल्या आहेत त्यांना ४+ किंवा ४++ पिढीतील म्हणतात. ४+ हे खरतर अमेरिकेने ठेवलेले नाव आहे कारण एफ २२ किंवा एक ३५ ह्यांना ५ व्या पिढीची विमाने म्हणले जाते. त्या विमानांची मुळ एअर फ्रेम वेगळी आहे, विमानाच्या टर्बाईन (इंजिन) मधुन निघणारा धुर व उष्णता वेगळ्याप्रकारे बाहेर पडण्याची व्यवस्था (ज्यामुळे विमान काही उष्णतावेधी क्षेपणास्त्रांपासुन वाचु शकते) आणि रडार लहरी शोषून घेणार्‍या पदार्थाचा थर ही ५ व्या पिढीच्या विमानांची खासीयत मानली जाते. ४++ पिढीची विमाने, त्याच्या एक स्तर कमी पण इतर काही खूप चांगले बदल केलेली असतात.

<< विमानाच्या टर्बाईन (इंजिन) मधुन निघणारा धुर व उष्णता वेगळ्याप्रकारे बाहेर पडण्याची व्यवस्था (ज्यामुळे विमान काही उष्णतावेधी क्षेपणास्त्रांपासुन वाचु शकते) आणि रडार लहरी शोषून घेणार्‍या पदार्थाचा थर ही ५ व्या पिढीच्या विमानांची खासीयत मानली जाते. >> हें असं सांगा ना माझ्यासारख्या अन्नाड्याला समजेल असं ! Wink धन्यवाद.

नाशिकची 'मिग' फॅक्टरी फार पूर्वीं पाहीली होती. अर्थात तीं फारच प्राथमिक दर्जाचीं विमानं असावीत. अजून ती फॅक्टरी सुरूं आहे का व असल्यास तिथं कसलं प्रॉडक्शन वा दुरूस्तीचं काम चालतं ?

भाऊ नमसकर
नाशिकची मिगची फॅक्टरी अजून सुरू आहे. सध्या तिथं सुखोई-३० एमकेआयची रशियाच्या सहकार्यानं परवाना उत्पादन सुरू आहे. ते २०१७-१८ पर्यंत चालू राहील. तोपर्यंत भारतीय हवाई दलात २७२ सुखोई-३० एमकेआय आलेली असतील.

पराग मिग २५ निवृत्त केल्या नंतर त्या जागी कोणती विमाने वापरतात?

पाक ला मिळणारी नविन एफ़ १६ पण नविन ४ ++ असतिल. ती आपल्या अत्ताच्या सुखोई ला भारी पडु शकतिल अशी चर्चा होती.

आणखी एक बाळबोध शंका -
समजा शत्रूकडचीं विमानं कांहींशीं सरस असलीं तर ती तफावत आपल्या पायलटसच्या सरस कौशल्याने भरून काढतां येते का ? कीं, सरस टेक्नॉलॉजीपुढे पायलटच्या कौशल्याचं कांहींच चालत नाहीं ?

भाउ मला वाटत पायलट्च कौशल्य हे डॉगफ़ाईट मधे जास्त महत्वाच ठरत असाव अशा तंत्रज्ञानाच्या तफ़ावती मघे. हल्ली सगळ बी व्ही आर असत.

अमेरिकन एफ़ १४ वर एक हवेतल्या हवेत मारा करणार फ़िनीक्स मिसाईल होते. त्याची मारक क्षमता १४० किलोमीटर एवढी होती.

पराग तुम्ही एकदम हटके हटके विषय शोधून काढता.. >>>>> +१११११

खूपच माहितीपूर्ण आणि सुंदर लेख .... कृपया असेच अजून लेख येऊदेत .... Happy

<< पायलट्च कौशल्य हे डॉगफ़ाईट मधे जास्त महत्वाच ठरत असाव >> सिनेमातही त्या 'डॉगफाईटस' बघून चक्कर येतेसं वाटतं !
<< रडार लहरी शोषून घेणार्‍या पदार्थाचा थर ही ५ व्या पिढीच्या विमानांची खासीयत मानली जाते. >> लढाऊ विमानांचं पुढचं नाक सर्वांत मजबूत पत्र्याचं असावं, ही माझी खुळी समजूत नाशिक 'मिग' फॅक्टरीत दूर झाली होती. 'कोनिकल' आकाराच्या पुठ्य्यासारख्या साहित्यावर रसायन लावलेल्या पातळ पट्ट्यांचे अनेक थर गूंडाळून तें नाक बनवलेलं होतं . नो मेटल अ‍ॅट ऑल ! " हें मेटलसारखं मजबूत तर आहेच पण रडार लहरी शोषून घेणारंही आहे !", आम्हाला सांगण्यात आलं होतं. आतां सर्व विमानालाच अशा रसायनाचा थर लावला जातो तर !!!

युद्धात विजयी होण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्रांबरोबरच त्यांचा वापर करणाऱ्या मनुष्याचे कौशल्य अधिक महत्त्वाचं ठरतं. भारतीय जवानांचे युद्धकौशल्य वादातील राहिले आहे. म्हणूनच अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वेळेवर उपलब्ध होत नसतानाही जुन्याच शस्त्रास्त्रांचा ते प्रभावीपणे वापर करताना दिसतात. १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धापासून याची उदाहरणे पाहायला मिळतात. १९६५ च्या युद्धात आपल्यापेक्षा सरस पाकिस्तानी सेबर जेटचा खातमा आप ्या नॅट विमानांनी केला होता. कारगिलच्यावेळी उंचावरच्या बंकर्समध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर मिराज-२००० विमानांच्या मदतीने यशस्वी हल्ले चढविण्यात आले होते. भारतीय हवाईदलाच्या त्या कामगिरीने मिराज-२००० तयार करणाऱ्या दासू कंपनीलाही प्रश्न पडला होता, इतक्या उंचावर आणि खडतर प्रदेशात भारतीय हवाईदलाने आपली विमाने इतक्या प्रभावीपणे वापरलीच कशी?

<< उच्च तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्रांबरोबरच त्यांचा वापर करणाऱ्या मनुष्याचे कौशल्य अधिक महत्त्वाचं ठरतं. >> लढाऊ विमानांचे पायलट हें एक अजब रसायनच असावं. आतां तर स्त्रियाही त्या क्षेत्रात उतरत आहेत. मानलं !!!

ह्या विषयावर पहिल्यांदाच काहीतरी वाचले.
छान लिहिले आहे. अजून अशाच प्रकारचे लेख तुमच्याकडून मला वाचायला आवडतील.

युरो
एफ-१४ बद्दलची माहिती खरी आहे. मिग२५ च्या जागी तिच भूमिका (टेहळणी) करणारे समर्पित लढाऊ विमान आपण घेतलेले नाही. हवाईदलात 'सुखोई', 'जग्वार', 'मिराज' यासारखी बहुउद्देशीय लढाऊ विमाने ती भूमिका बजावत आहेत. नौदलात त्यासाठी 'मिग-२९के/केयूबी' आहेतच.

भाऊ, लढाऊ विमाने दोन प्रकारची असतात. ग्राऊंड अ‍ॅटॅक आणि एअर कॉम्बॅट. भारताकडील जग्वार आणि मिराज ही ग्राऊंड अ‍ॅटॅक प्रकराची आहेत. त्यांची घडण वेगळी असते (बहुतांशी वेळा) उदाहरणार्थ, एक टेल फिन आणि डेल्टा विंग (अगदी ढोबळ मानाने बघितल्यास). मिग २९ आणि सुखोई ३० ही दोन्ही एअर कॉम्बॅट प्रकारा साठी आहेत. त्यांची एव्हिऑनिक्स त्यासाठी असतात (दोन टेल फिन आणि नोज कोन - खाली झुकणारे). ह्याचा अर्थ असा नाही कि एक प्रकारा तील विमाने दुसर्‍या कामासाठी वापरता येत नाहीत पण त्यांची खासीयत बघता किंवा उद्देश बघता हे वर्गीकरण आहे आणि त्यासाठी ती वापरणे अपेक्षित आहे. त्यांच्यावर चढवली जाणारी क्षेपणास्त्रे सुद्धा त्यानुसार बदलतात. त्यामुळे बर्‍याच वेळा एक १६ वि. सुखोई अशी तुलना ज्याला अ‍ॅपल्स टू अ‍ॅपल्स म्हणतात अशी नसते. कारण, पायलट चे कौशल्य सुद्धा त्यानुसार बदलते. ह्या आधीच्या युद्धांमधे आपल्या पायलटस नी दाखविलेली कौशल्ये अप्रतिम आहेतच आणि भारतील पायलट त्यासाठी जगात प्रसिद्ध आहेत.

Pages