उड जायेगा हंस अकेला

Submitted by शरी on 11 May, 2015 - 07:45

संत कबीराची ओळख पुस्तकांमधूनच झाली फक्त! त्यांचा वेगळेपण, त्यांचा कर्मठपणाला नकार, त्यांच्या धर्माबद्दल कुणालाच काही माहित नसणं आणि सर्व धर्मांमधले लोक त्यांचे अनुयायी असणं हे सगळं जरी भारावून टाकणारं असलं, तरी ते पुस्तकी माहिती पुरतंच मर्यादित होतं; म्हणजे अजूनही ते तसंच आहे. कारण जसे ज्ञानोबा-तुकोबा आपल्याला त्यांच्या अभंगांमधून, गोष्टींमधून, आषाढी-कार्तिकी वारी मधून भेटले, तसे कबीर कधीच नाही भेटले! त्यांच्या भाषेशी, म्हणजे हिंदीशी पण जुजबीच ओळख! हिंदी सिनेमे पाहणे आणि कामचलाऊ हिंदी बोलणे ह्या पलिकडे ती ओळख गेलेली नाही. साहजिकच कबीराच्या दोह्यांचा जो अमूल्य साठा आहे, तो आपल्याला अनोळखीच आहे. जगातल्या अशा किती भाषांमधलं केवढं भांडार आपल्याला अनोळखी असतं नाही? आणि अशातच कधीतरी अचानकच आपली त्याच्याशी भेट होते आणि आपण म्हणतो अरेच्या! हे कसं सुटलं?

माझ्यासोबत एकदा असंच झालं. एक दिवस तुकारामांचा "लहानपण देगा देवा " हा अभंग ऐकत होते. इतका सुंदर अभंग, त्यातून तो कुमार गंधर्वांनी गायलेला! लहानपणा पासून आवडता! ह्याची मला कधीही आठवण येते. हल्ली एक बरं आहे, एखाद्या गाण्याची आठवण आली, की कधीही युट्युब वर सर्च करून ऐकता येतं. युट्युब ची आणखी एक गम्मत म्हणजे 'रिलेटेड व्हिडीओ'. ह्या रिलेटेड व्हिडीओ फिचरमुळे कधी कधी आपण जिलेबी शोधायला जातो आणि जिलेबी सोबत रबडी ही मिळते. तसंच झालं! लहानपण देगा देवा सोबत मला सापडला "उड जायेगा हंस अकेला". दिसलं, ऐकलं आणि म्हंटलं अरेच्या! हे कसं सुटलं? संत कबीरांच्या ह्या रचनेचं कुमार गंधर्वांनी सोनं केलंय अगदी.

अतृप्त यांचा "त्या फुलांच्या गंधकोशी" हा लेख वाचला, आणि तेव्हाच मनावर गारुड केलेलं हे गाणं आठवलं! त्याच जातकुळीतलं नाही अगदी, पण काहीतरी नक्की आहे त्यांच्यामध्ये समान, म्हणून आठवलं आणि स्वरांमुळे शब्द आपल्या अगदी जवळ पोहोचतात हा भाव सुद्धा तोच जाणवला. मग मायबोली वर केवळ वाचन मात्र असलेल्या मलाही वाटलं की ह्यावर आपण लिहायलाच हवं !

गाण्यात ऐकताना आधी आपण कुमारांच्या गोड, तरल आवाजात आणि तितक्याच मधुर संगीतात, आळवणी मध्ये अडकून जातो. शब्द मागाहून भेटतात, आणि जुन्या हिंदी मुळे त्याहूनही नंतर समजतात. कुमारांनी स्वर दिले नसते, तर कदाचित माझ्यासारख्या सामान्य श्रोत्या पर्यंत कबीराचे हे शब्द पोहोचलेच नसते! त्यांचे शब्द आपल्या पर्यंत इतक्या सुंदर प्रकारे आपल्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल कुमारांचे शतश: आभार!

उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला ।।धृ.।।

जैसे पात गिरे तरुवर के, मिलना बहुत दुहेला
न जानु किधर गिरेगा, लगया पवन का रेला।।

जब होवे उमर पूरी, जब छुटेगा हुकम हुजूरी
जम के दूत बडे मजबूत, जम से पडा झमेला ।।

दास कबीर हर के गुण गावे, वा हर को परन पावे
गुरु की करनी गुरु जायेगा, चेले की करनी चेला ।।

ह्याचा अनुवाद करायचे धाडस करते आहे.

उडून जाईल हंस एकला, जग दर्शनी मेळा
(चकचकीत मेळ्यात जरी असलास, तरी हंसा, जायचे तुला एकट्यालाच आहे!)

गळालेले पान वटवृक्षाचे जरी असले, एकदा हवेच्या झोतात सापडले,
की कुठे जाईल कोण जाणे ? पुन्हा सापडणे कठीण आहे

आयुष्याचे दिवस भरले आणि तुझ्या नावाचे फर्मान निघाले,
तुझी इच्छा असो वा नसो यमदूतांसोबत सामना अटळ आहे

दास कबीर हरीचे गुण गातो, हरी दर्शनाची इच्छा ठेवतो
जो तो आपापल्या करणी ची फळे भोगेल, गुरु असो वा चेला

चूक भूल द्यावी घ्यावी! हा गेय अनुवाद नाही, फ़क्त भावार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही निर्गुणी भजने ऐकताना, खूप कसंतरी होतं मला. बालाजी तांब्यांच्या 'हार्मनी' सीडीमधील 'साधू!! अपना देस पराया... https://www.youtube.com/watch?v=06Ok6HINoEg किंवा 'भजन ना करना जाने रे मनवा'.... https://www.youtube.com/watch?v=29mGHlZK6ME किंवा 'गुरु घर आव्या.... https://www.youtube.com/watch?v=Wuy7Oz1VIjw एका सुन्न पोकळीत नेतात मला. अधांतरी वाट्तं.

अगदी सामो! माझ्या मनातलं बोललीस !
उड जायेगा ...........ऐकून तर मन सुन्न होतं अगदी अन डोळ्यातून पाणी येतं आपोआप.
नश्वरतेची खात्रीच पटते.

कुमार गंधर्वांचा दैवी स्वर आणि कबीराचे आत्मिक प्रत्यय देणारे शब्द...!!
क्या कहने!

आंबट्गोड तुम्ही हार्मनी मधील ती भजने ऐका. ते संगीत आणि बालाजी तांबे यांचा खर्जातील आवाज इतकं गंभीर मिश्रण आहे ना. मी एखादच भजन ऐकू शकते.

Pages