(अंध)श्रद्धेची ऐसी की तैसी

Submitted by स्वीट टॉकर on 19 December, 2014 - 02:47

लहान असताना गणपतीचे दिवस अगदी खास असायचे. (आता देखील असतातच, पण त्या वयातली मजा आगळी.) टीव्ही अजून भारतात आलेला नव्हता. आणि आपलं मूल प्रत्येक activity मध्ये एक नंबरी असलं पाहिजे अशी पालकांची मानसिकता नव्हती. त्यामुळे शाळा सुटली की हुंदडायला पोरं चिकार असायची.

गणपतीच्या आधी टोळक्याटोळक्यानी सर्व मित्र मैत्रिणींच्या घरी जाऊन आरास करायची, गणपती यायया दिवशी घसा फुटेस्तोवर ‘गणपतीबाप्पा मोरया’ चा गजर करायचा आणि रोज संध्याकाळी जास्तीत जास्त घरांमध्ये आरतीला जाऊन प्रसाद चापायचा - हे नॉर्मल. सोसायटीअचं गॅदरिंग असायचं त्यासाठी नाटकं, नाच, नकला वगैरे बसवायचे. सगळ्यांच्या घरी जाम धमाल यायची.

हे ही म्हणणं तितकसं खरं नाही. एक असं घर होतं की तिथे धमाल नव्हती. आपला समाज पुरुषप्रधान आहेच, पण एका मित्राच्या घरी अतीच होतं. त्याचे वडील सोडून इतर कोणच्याही मताला आणि आवडीनिवडींना काहीही किंमत नव्हती. त्यातून ते महा गणेशभक्त होते. गणपतीसाठी काहीही केलं तरी त्यांना ते अपुरच वाटायचं. त्यांच्या दृष्टीनी आरास बरोबर काटकोनात नसायची, नैवेद्याच्या ताटातले पदार्थ पुरेसे चविष्ट नसायचे, घरातल्या स्वच्छतेत काहीतरी कमतरता असायची, मंत्रपुष्पांजलीतले उच्चार स्पष्ट नसायचे. एक ना एक.

आम्ही आरास करायला आणि आरती करायला जायचो खरे, पण आमचं मन त्यात नसायचं. मित्राची, त्याच्या बहिणीची आणि आईची आम्हाला कीव यायची.

त्या दिवसात गणेशमूर्ती दुकानातून घरी आणणं, आणि नंतर विसर्जनासाठी समुद्रावर नेणं पायीच असायचं. एका वर्षी विसर्जनाला जाताना मित्राचे वडील दुर्दैवानी ठेचकाळले, हातातली मूर्ती घसरून जमिनीवर पडली आणि फुटली!

झालं ! आकाश कोसळलं ! भगवंताचा कोप झाला होता ! जाणता अजाणता काहीतरी घोडचूक झाली होती आणि गणेशानी नापसंती दाखवली होती. गेल्या पूर्ण वर्षाच्या सर्व खर्‍या आणि कल्पित चुकांची उजळणी झाली. तज्ञ आणले गेले. विविध शांत आणि पूजा केल्या गेल्या.

त्यांचे नातेवाइक, मित्रमंडळी, त्यांचे फॅमिली डॉक्टर वगैरे सगळ्यांनी आपापल्या परीने बाबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

आपण उत्तरपूजा केलेली होती. म्हणजे त्यातलं देवत्व नाहिसं झालेलं होतं. उरली होती फक्त मूर्ती. ती तुटणं म्हणजे काही देवाचा कोप नाही –
किंवा
आपण विसर्जन करतो म्हणजे मूर्ती विरघळवतोच ना? मग त्या आधी जर ती तुटली तर तो काय महाकोप आहे का?
किंवा
खरी श्रद्धा तुझ्या मनात आहेच, मुर्तीपूजा हे त्याचं फक्त प्रतीक असतं - वगैरे.

पण व्यर्थ. पालथ्या घड्यावर पाणी. फॅमिली डॉक्टरांनी आपल्या सायकिऍट्रिस्ट मित्राला बोलवून घेतलं पण पेशंटनी सहकार्य केल्याशिवाय ते तरी काय करणार?

त्यांनी जेवणखाण जवळजवळ सोडलं, अंथरूण धरलं, कामावर जाणं देखील बंद झालं. आता मात्र सगळ्यांचच धाबं दणाणलं. पण ओढवून घेतलेला आजार. नातेवाईक आणि मित्रमंडळी किती दिवस साथ देणार? कुटुंबाची दयनीय अवस्था. व्हरांड्यात त्याची आई बसायची, डोळ्यातून घळाघळा पाणी. बाजूला मित्र आणि त्याची बहीण, केविलवाण्या चेहर्‍यानी तिच्याकडे पहात असायचे ! ते वय असं असतं की आईवडील सर्वेसर्वा असतात. तेच अगतिक झाल्यावर मुलं सैरभैर झाली.

कठिण समय येता, कोण कामास येतो ?

त्याच्या आईला एक भन्नाट आयडिया सुचली ! जर एखाद्याला झोपेचं औषध दिलं अन् त्याला झोपू दिलं नाही की त्याची भ्रमिष्टासारखी अवस्था होते. खरं आणि स्वप्न ह्याची सरमिसळ व्हायला लागते.

तिचा प्लॅन असा. आमचा एक मित्र गुटगुटीत होता. त्याला गणपतीचा मेकअप करायचा. गजवदनासकट. वर म्हटल्याप्रमाणे बाबांची अवस्था करून गणपतीला त्यांच्या खोलीत पाठवायचं.

खोलीत जाऊन गणपतीनी म्हणायचं, “वत्सा, मी तुझी सत्वपरीक्षा पहात होतो. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. ही वेळ गृह्स्थश्रमाची कर्तव्ये करण्याची आहे. हीच माझी खरी आराधना. जा ! परत पूर्ववत् आपल्या कुटुंबाची काळजी घे. आता डोळे मीट. मी अंतर्धान पावलो की तुला माझी आरती ऐकू येईल. मगच डोळे उघड.” बाबांनी जर डोळे मिटले नाहीत तर गणपतीनेच हाताने ते मिटायचे.

आमच्या जाड्या मित्राची हे नाटक करण्याची कुवत नव्हती आणि इच्छा तर त्याहून नव्हती. पण त्या काळात त्या वयोगटात गुटगुटीत मुलं क्वचितच दिसायची. त्यामुळे choice नव्हता. त्याला बळेबळेच तयार केलं. भरपूर प्रॅक्टीस करून घेतली.

सगळी तयारी झाली. डॉक्टरांनीच झोपेच्या औषधाचा योग्य तो डोस तीर्थाच्या नावाखाली पाजला आणि ते बाबांशी गप्पा मारत राहिले. झोपू दिलं नाही. (आज कोणीही डॉक्टर असा धोका पत्करेल असं काही मला वाटत नाही.) योग्य गुंगी दिसल्यावर बेडरूममधून बाहेर पडले.

गणपतीला तयार ठेवलंच होतं. त्याला बेडरूममध्ये पाठवलं. दिवाणखान्यात आई आणि डॉक्टर. आम्ही मुलं आणि तीनचार काकू दाराबाहेर उभे. आम्हाला आतलं ऐकू येत होतं पण दिसत काही नव्हतं. हळूहळू चालत तो बिछान्याकडे गेला.

गणपतीला बघताक्षणी बाबांनी बिछान्यावरून ताडकन् उठण्याचा प्रयत्न केला पण ते उभं राहाण्याच्या अवस्थेत नव्हते. क्षीण आवाजात “गणराया ऽऽऽ” अशी आरोळी ठोकून ते धाडकन् जमिनीवर कोसळले ! शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या ठण्ठणत खाली पडला अन् घरंगळत गेला. फरशीवर पाणीच पाणी.

गणपती बिचारा इतका गांगरला, सगळं पाठांतर विसरला ! आता मात्र त्याचा धीर सुटला. तो आल्या पावली उलटा वळला आणि धावतंच दारातून बाहेर पडला! इतक्या मेहनतीनं रचलेलं नाटक या घाबरट पोरामुळे जर का पडलं तर आपल्या उर्वरित आयुष्याचं कसं खरोखर नाटक होईल हे आईनी क्षणार्धात ओळखलं असणार. तिनी पळणार्‍या गणपतीला घट्ट पकडलं. डॉक्टरही मदतीला आले. गणपती जेरबंद झाला.

त्याची रडक्या सुरात भुणभुण सुरू झाली. डॉक्टर आपल्या मृदु पद्धतीत त्याला समजावायला, धीर द्यायला लागले. पण गणपतीचा रडका सूर काही बदलेना. नाजुक तंत्रानी हा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून आईनी त्याला खसकन् ओढलं आणि एक धपाटा त्याच्या पाठीत घातला !

“अगं लले, काय करतियेस तू हे?” मित्राच्या बाबांचा आर्त स्वर ! सगळे जागच्या जागी थिजले !

हॉलमधल्या कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं की बाबा रांगत रांगत गणपतीच्या मागोमाग बेडरूमच्या दारापर्यंत आले होते आणि धपाटा पाहिला होता! This was a complete disaster!

प्रसंगावधान, प्रसंगावधान म्हणतात ते काय असतं त्याचं अफलातून प्रात्यक्षिक पुढच्या क्षणी डॉक्टरांनी दाखवलं.
त्यांनी जमिनीवर लोळण घेतली अन् आईचे पाय धरले. “पार्वतीमाते, तुझ्या आणि गजाननाच्या दर्शनानी मी धन्य झालो !”

बस्स. पार्वतीला एक हिंट पुरेशी होती ! तिनी पटकन् गणपतीला आपल्या पाठीशी घातलं, बाबांसमोर उभी राहिली अन् करड्या आवाजात म्हणाली, “मी स्वतः या घरात राहाते आहे. असं असताना गणपतीनी तुझी परीक्षा घेणं अयोग्य होतं. वत्सा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले आहे. जा. तुझ्या गृहस्थश्रमाच्या जबाबदार्‍या व्यवस्थित उचल. त्यात हयगय करू नकोस. आज तू जे पाहिलं आहेस त्याची वाच्यता कुठेही करायची नाही.”

अंतर्धान पावणं शक्य नसल्यामुळे तिनी त्यांना तशाच परिस्थितीत बाबांना परत बेडरूममध्ये ढकललं आणि दार लावून घेतलं !

प्रसंग तिथेच संपला. काकूंनी आम्हा सगळ्यांना तिथून पिटाळून लावलं. ज्या जाड्या मित्राची आम्ही चेष्टा करायचो तो आता आमचा हीरो झाला कारण त्या एकट्यानीच सगळं पाहिलं होतं आणि आंखो देखा हाल चं रसभरित वर्णन आम्हाला पुनःपुन्हा ऐकवलं.

या प्रसंगानंतर एक विचित्र परिणाम झाला जो आमच्या बालमनाला पूर्णपणे अगम्य होता. आमचा मित्र आणि त्याची बहीण घरातून बाहेर येण्याचे अजिबात बंद झाले. दुसर्‍याच दिवशी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे रहायला आले. आमच्या बिल्डिंगमधले सीनियर लोक त्यांच्याकडे जायचे, खलबतं चालायची पण त्याची अजिबात कुठेही चर्चा होऊ द्यायचे नाहीत. इतका मजेदार किस्सा पण सगळे सुतकात असल्यासारखे !

आमच्या घरातलं वातावरण अगदी मोकळं असायचं. सर्व विषयांवर आईवडिलांबरोबर मोकळेपणानी चर्चा चालायची. मात्र या प्रसंगाबाबत ते ही बोलेनात. आठवड्याभरानी मित्राची संपूर्ण फॅमिली अचानक घर सोडून गेली ! का, कुठे, कधी येणार वगैरे कितीही खोदून विचारलं तरी आमच्या आईवडिलांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन आमची बोळवण केली.

सगळ्यांच्या पालकांनी “या बाबतीत एकही अवाक्षर बाहेर बोलायचं नाही” अशी तंबी दिली असल्यामुळे अर्थातच आम्हाला तेच बोलण्यात प्रचंड रस होता. मात्र त्या वयात प्रत्येक दिवस एक नवनवीन adventure घेऊन येत असतो. हळुहळू आम्ही हा प्रसंग विसरलो.

या गोष्टीला पंचेचाळीस वर्षं झाली. गेल्या वर्षी मी दुबईला एका सेमिनारला गेलो होतो तेव्हां नाव परिचित वाटल्यामुळे अधिक चौकशी केली. तर तोच मित्र होता ! खूप गप्पा झाल्या. त्याच्याकडून पुढची हकीकत समजली.
त्याचे बाबा हयात नाहीत. आता ही हकीकत सांगायला हरकत नाही.

त्या दिवशीच्या नाटकानंतर बाबांची तब्येत सटासट सुधारायला लागली हे सांगायलाच नको. पण आसपासच्या सर्व लोकांना आणि मुख्यत्वेकरून मुलांना प्रत्यक्षात काय झालं ते माहीत असल्यामुळे सत्य कुठल्याही क्षणी आणि कोठल्याही कारणाने बाहेत पडण्याची शक्यता डॅमोक्लिसच्या तलवारीप्रमाणे त्यांच्या डोक्यावर लटकत राहिली असती. सत्य जर का बाबांना कळलं असतं तर त्याच्या परिणामांची कल्पना देखील करणं अवघड आहे. त्यामुळे आईनी तडकाफडकी घर बदलण्याचा निर्णय घेतला आणि अंमलातही आणला. मुलांच्या शाळा देखील बदलल्या. मित्र आणि त्याची बहीण हैराण झाले. काहीही पूर्वसूचना नसताना सगळे मित्र तोडून टाकणं हे बालमनाला शक्य होईल काय?

पण फारच थोडेच दिवसात नवीन ठिकाणी रुळले याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या घरातल्या वातावरणात झालेला प्रचंड बदल !

आता बाबा हे आईचे भक्त झाल्यामुळे सगळंच सुरळित आणि सोपं झालं. योग्य निर्णय आई बेधडकपणे घेऊ शकत होती. मुळातच आई हुषार आणि well organised होती. बाबांच्या अवास्तव अपेक्षांचं लोढणं दूर झाल्याबरोबर सार्‍या कुटुंबाची सर्व बाबतीत प्रगती सुरू झाली आणि वातावरणही wonderful !

त.टी.
ही हकीकत जरी unique असली तरी समाजातली एक वस्तुस्थिती बोचणारी आहे. ती अशी की आज खूपच अशी कुटुंबं दिसतात की ज्यात खरं तर स्त्री जास्त हुषार आणि practical असते. मात्र पुरुषी अहंकारामुळे बहुतेक निर्णय नवरे एकांगी घेतात. कुवत आणि अहंकार यांचं प्रमाण नेहमीच व्यस्त असतं. त्यामुळे अशा लोकांची कुवत मर्यादितच असते. त्यांच्या हे लक्षात येत नाही (किंवा येत असेल तर मान्य करण्याचं धारिष्ट नसतं) की जर निर्णयप्रक्रियेत घरच्या सगळ्यांचा वाटा असला तर निर्णय अचूक तर होतोच, शिवाय घर आनंदी राहातं आणि प्रगतीही सहजगत्या होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला किस्सा. Lol

अंधश्रद्धेचं कातडं डोळ्यांवर ओढलेल्यांसाठी असे काही चलाख उपाय वापरावे लागले तर त्यात काहीही गैर नाही.

सेनापती +१

झंपी,

>>>+१
अन्याय करण्यार्‍यावर चिडण्यात अर्थच नसतो. जोपर्यंत बायका अन्याय सहन करताहेत तोप र्यंत अन्याय करणारे असणारच. त्या काय घाबरट आहेत म्हणून सहन करतात का? नाही. त्या सहन करतात त्यात त्यांच्या आई वडिलांचा दोष असतो.

आपल्याकडे एक अतिशय चुकीची शिकवण मुलींना दिली जाते. लग्न करताना त्यांच्या मनावर बिंबवलं जातं की आता तू आणि तुझं नशीब. काहीही करून तू सासरी जमवून घ्यायचंस. काहीही झालं तरी लग्न टिकवून ठेवता आलं पाहिजे. बहुतांशी सासरचे लोक चांगले असतात. मात्र चांगले नसतील तर मग त्या बिचारीला choice नसतोच. तेवढी धमक असली तर ती सासरच्या लोकांना तोंड देवून आपली जागा तिथे भक्कम करते. पण हे rare. बहुतांशी बायका suffer होतात.

आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे. आपण आपल्या मुलींना अशीच शिकवण दिली पाहिजे की तुला वाईट वागणूक देण्याचा कोणालाही हक्क नाही. लग्न सफल करण्याची जबाबदारी जितकी तुझी आहे तितकीच तुझ्या नवर्‍याची देखील. जर तो चांगला नसेल तर लग्न मोडून परत घरी येण्यात काहीही लाजिरवाणं नाही. या घरांत तुझं स्थान पक्कं आहे. याचा दुसरा पैलू म्हणजे असं म्हणायला या घरातलं आपलं स्थान आधी पक्क हवं. म्हातारपणी कोणीतरी काळजी घ्यायला हवं असं म्हणंत मुलाच्या अन् सुनेच्या मागोमाग जाऊ नये. नातवंड सांभाळण्याची जबाबदारी जरूर घ्यावी. मात्र स्वतःच्या घरी.

. . . . . अतिशयच सुंदर गोष्ट आहे ही. आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधेसुद्धा तुमच्या मित्राच्या वडिलांसारखे गृहस्थ रहातात. आपल्या तर्कटी स्वभावामुळे त्यांनीही सगळ्या घराला कंटाळा आणला होता. एक महिन्यापूर्वी त्यांना तुमची ही गोष्ट मुद्दाम वाचायला दिली होती. गोष्ट वाचून त्यांचे डोळे खाडकन् उघडले Sad . आता तेही तुमच्या मित्राच्या बाबांसारखे स्वतःच्या सुविद्य, शालीन, सर्वगुणसंपन्न अशा प्रेमळ पत्नीचे निस्सीम भक्त झाले आहेत. हल्ली तर स्वतःसाठी नवीन बनियनसुद्धा पत्नीबरोबर चर्चा केल्याशिवाय ते घेत नाहीत, "असं गं काय कुमुद Blush , फाटका बनियन घालून बसलो तर वाईट नाही का दिसत ? घेऊदे की मला नवा बनियन !" अशा लडिवाळ संवादांनीच ते घर भारलेलं असतं ! Wink
अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा विजय असो... Biggrin

Nice

तुम्ही भयंकर लिहीता.
हे वाचायचं कसं राहून गेलं होतं माहिती नाही Happy सगळं डोळ्यासमोर आणून पाहिलं.

समीरभाऊ,

तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यावी हे मला ठरवता येत नाहिये कारण तुम्ही भंकस करता आहात अशी शंका डोकावत आहे Wink

Pages