मला मुलगीच हवी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 06:24

मला मुलगीच हवी ..

......

सन २००८ !
एक काळ होता जेव्हा मला वाटायचे की मला मुलगाच झाला पाहिजे.
हो, त्याकाळी जेव्हा मला एक साधी गर्लफ्रेंडही नव्हती, (वा किमान होत्या त्या मैत्रीणींबाबत सिरीअस तरी नव्हतो) तेव्हाही कॉलेजमधील मित्रांशी चर्चा करताना, वा एकांतात बसून स्वत:च्या भविष्याचा विचार करताना मला असेच वाटायचे की येस्स, मला मुलगाच झाला पाहिजे.

......

एक काळ होता, (अर्थात आजही जिथे सुशिक्षितपणा किंबहुना त्यापेक्षाही सुसंस्कृतपणा आला नाही तिथे तो काळ अजूनही आहेच)

असो, तर एक काळ होता जेव्हा प्रत्येक मातापित्यांची अशी इच्छा असायची, आपले होणारे संतान, हि दुसर्‍याचे घर प्रकाशाने उजळवणारी ज्योती नसून एखादा आपल्याच अंगणात टिमटिमणारा दिपक असावा, आपल्या वंशाचा दिवा असावा. आणि या विचारामागे प्रामुख्याने आणि ढोबळमानाने खालील कारणे असायची :-

१) मुलगा म्हातारपणाची काठी असतो.

२) मुलगी लग्न करून सासरी जाते.

३) मुलगा हुंडा घेऊन येतो, तर मुलीला हुंडा द्यावा लागतो.

४) मुलगा घराण्याचा वारस असतो, तर आपला जमीन-जुमला जावयाला देण्याऐवजी मुलाकडेच जावा.

५) मुलगा आपला वंश आणि आपले नाव पुढच्या पिढीत नेतो.

६) मुलीची अब्रू जपणे हि एक जबाबदारी असते.

वगैरे वगैरे

.......

तर या कारणांची आजच्या जमान्यात साधारण अश्या प्रकारे वाट लागली आहे.

१) मुलगा म्हातारपणाची काठी मानले तरी तोच कधी लाठी मारून वृद्धाश्रमात हाकलवेल किंवा जबाबदारी घेण्यास नकार देईल हे सांगता येत नाही. जिथे दोन किंवा अधिक मुले असतात तिथे प्रॉपर्टीचे वाटे पडताना आपला हक्क कोणीही सोडत नाही, मात्र म्हातारपणी आईवडीलांचा सांभाळ करण्याचा कर्तव्य निभावायची वेळ आली की मात्र टाळाटाळ करण्याची शक्यता असते. (आठवा चित्रपट बागबान) किंवा हल्ली पेंन्शन प्लॅन आणि त्याच्या ‘ना सर झुका है कभी, ना सर झुकायेंगे कभी" वगैरे जाहीराती यामुळेच बघायला मिळतात. थोडक्यात आपल्या म्हातारपणाची सोय आपली आपणच करायची आहे हा विचार रुजतोय.

२) मुलगी लग्न करून सासरी गेली तरी हल्लीच्या काळात ती कमावती आणि स्वतंत्र विचारांची असल्याने लग्नानंतरही ती आपल्या मातापित्यांच्या प्रती आपली जबाबदारी उचलू शकते. एकवेळ तिचा नवरा त्याच्या आईवडिलांना म्हणजे तिच्या सासू-सासर्‍यांना सोडून स्वतंत्र राहत असेल, पण मुलगी मात्र माहेरच्यांशी असलेली आपली नाळ कधीच तोडत नाही.

३) हुंडा वगैरे प्रकार हल्ली फारसे उरले नाहीयेत. लग्नाचा खर्चही बरेच ठिकाणी अर्धा अर्धा उचलला जातो. प्रेमविवाहांचे वाढते प्रमाण हे याला पोषकच आहे.

४) आपल्यापाठी आपली प्रॉपर्टी मुलगा आणि सून उपभोगतेय की मुलगी आणि जावई याचा आता कोणी फारसा विचार करत नाही, कारण मुळात प्रॉपर्टी अशी काही सोडूनच जायची नसते. आपण उभारलेला उद्योगधंदा कोणाच्या हाती सोपवून जायचा असेल तर तो आजच्या जमान्यात मुलीही सुशिक्षित असल्याने त्यांच्याही हाती सोपवून जाता येतो. तसेच मुलगा नालायक निघाला तर नाईलाज होण्यापेक्षा कर्तबगार जावई शोधण्याचा पर्याय तरी आपल्या हातात उपलब्ध राहतो.

५) आपले नाव पुढच्या पिढीत जावे, आणि आपला वंश वाढावा या मरणोत्तर खुळचट आणि मनाला खोटा खोटा दिलासा देणार्‍या कल्पनांमधून बहुतांश समाज बाहेर आलाय. आपण मेल्यानंतरही आपले फेसबूक अकाऊंट या जगात तसेच राहणार आणि आपले नाव गूगलसर्च केल्यास ते सापडणार हे आजच्या पिढीला पुरेसे आहे.

६) या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाच्या जोडीनेच, याच समाजाच्या एका हिश्श्यात वाढीस लागलेली विकृत मानसिकता पाहता दुर्दैवाने शिशू वयात मुलांचा सांभाळ हे सुद्धा मुलींइतकेच जबाबदारीचे काम झाले आहे.

वगैरे वगैरे

.......

असो, तर मी देखील या बदललेल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाचा भाग आणि तश्याच आधुनिक विचारांचा असलो, तरीही मला मात्र मुलगाच हवा होता. यामागे कुठलेही संकुचित विचार नसून मला माझ्या मुलामध्ये स्वत:ला बघायचे होते. आयुष्यात मला जे आजवर बनता आले नाही, वा पुढेही बनता येणार नाही, ते माझ्या मुलाने बनावे अशी माझी सुप्त इच्छा होती. अर्थात, कोणतीही जबरदस्ती नाही, तर त्याच्या मर्जीनेच. मला आयुष्यात जी मौजमजा करता आली नाही ती त्याने करावी आणि मी त्यात मला बघावे. अगदी डिडीएलजेमधील अनुपम खेर सारखे मला माझ्या मुलाला सांगायचे होते, "मैने तो अपनी सारी जिंदगी ऐसेही यहा वहा टुक्कार पोस्ट डालने मे बिता दी बेटा, लेकीन तू जी ले अपने मर्जी की झिंदगी, मै समझूंगा मैने अपनी जिंदगी जी ली" .. आणि एवढेच नव्हे तर मला माझ्या मुलाचे नाव ‘आर्यन’ ठेवायचे आहे, असेही मी त्यावेळीच फायनल केले होते. मला माझा मुलगा माझा बेस्ट बडी म्हणून तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला होता..

वगैरे वगैरे

.......

पण आज ३० ऑक्टोबर २०१४ उजाडता उजाडता ... मला पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे.. ते सुद्धा एक नाही तर दोन-दोन मुलीच!
आता याची कारणे काही अश्याप्रकारे,

१) आजवर मला माझ्या आईने मोठ्या लाडात वाढवले. मला काहीही काम करू न देता सारे काही आयते दिले. अगदी च् म्हटले की चहाचा कप हातात. जिथे आई कमी पडली तिथे ती कसर ताई माई अक्कांनी पुर्ण केली. बाहेर आता माझे हे आरामाचे लाड माझी गर्लफ्रेंड पुरवते. पुढे जाऊन बायको हे करेन. अर्थात याच कारणासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडशी कधीही ब्रेकअप होऊ न देता तिच्याशीच लग्न करणार. मॉरल ऑफ द स्टोरी - ज्या घरात स्त्रियांची संख्या जास्त असते त्या घराला घरपण येते आणि पुरुषांची ऐश मौज मजा सारे काही होते. खास करून माझ्यासारख्या आळशी पुरुषांची जरा जास्तच.

२) स्वत: मुलगा असल्याने आणि आसपासचे मुलांचे जग पाहिल्याच्या अनुभवावरून सांगू शकतो, मुलगा एका ठराविक वयाचा झाला की तो त्याच्या समवयीन मित्रमंडळींमध्येच जास्त रमतो आणि एका वयानंतर तर जेवायला आणि झोपायलाच घरी येतो. मुलीसाठी मात्र तिचे कुटुंब हे सुद्धा तिचे एक मित्रमंडळच असते, किंबहुना सर्वात आवडीचे असे. साधी पिकनिक काढायची म्हटले तरी मुलगा आपल्या मित्रांबरोबर जाणे पसंद करेन, पण मुलगी मात्र फॅमिली पिकनिकलाच पहिले प्राधान्य देईल. फेसबूकावरही मुलांपेक्षा मुलींचेच सहकुटुंब पिकनिकला गेलेल्याचे फोटो जास्त अपलोड होताना दिसतात हा याचा पुरावाही म्हणू शकता.

३) मला स्वत:ला नटण्याची, नीटनेटके राहण्याची आणि छान छान फोटो काढण्याची, काढून घेण्याची जरा जास्तच आवड आहे. हि आवड मुलापेक्षा मुलीबरोबर जास्त चांगल्या प्रकारे जपता येईल असे मला वाटते कारण मुलांच्या तुलनेत मुलीला विविध प्रकारचे ड्रेसेस आणि अलंकारांनी छानपैकी नटवता येते.

४) वडील आणि मुलाचे नाते हे जरासे कॉम्प्लिकेटेड असते. ते योग्य प्रकारे जमले तर ठिक अन्यथा समजे उलगडेपर्यंय आयुष्यातील एक काळ निघून जातो. पण मुलगी हि लहानपणापासूनच अगदी शेवटपर्यंत, सहजगत्या आणि नैसर्गिकरीत्या, वडिलांशी भावनिकरीत्या खूप चांगली जोडली जाते, वडिलांची लाडकी लेक होते.

वगैरे वगैरे

.........

अर्थात हि माझे मते आहेत. माझ्या अनुभवांवरून आणि त्या अनुभवांच्या आकलनावरून बनवली आहे. बहुतांश बाबतीत, बहुतांश जणांनी, एकमत व्हायला हरकत नसावी. तरीही न पटल्यास, धागा चर्चेला खुला आहे. चॉईस इझ युअर्स, पण मला मात्र बाबा मुलगीच हवी Happy

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टायटल मध्ये 'अपत्य म्हणून' हे घालणे गरजेचे.>>> Lol

नाहीतर दोन महिन्यातच "मला मुलगी झाली हो " म्हणून पुढचा लेख हजर होईल>> त्यांना ऑल्रेडी मुलगी आहे.

(मला पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे)

सुजा.:हाहा:

बहुतांश प्रतिसाद आटोपले, आता जिथे गरज आहे तिथे प्रत्युत्तरे देतो. अध्येमध्ये दिली नाहीत कारण रिया मॅडम यांच्यामते ते धागा वर राहण्याच्या प्रयत्नात मोडते. असो, उशीराबद्दल दिलगीर आहे.

...

सीमा (२७६),
मी आळशी आहे हे कबूल आणि माझ्या आईने मला स्वत:ला फारसे कष्ट न पडणार नाहीत हे बघून मला फार लाडात वाढवले आहे हे हि कबूल. पण माझे माझ्या आईवरचे प्रेम या एकाच कारणास्तव नाही, किंबहुना ते कोणत्याही मुलाचे तसे नसते. कामांचे म्हणाल तर त्याला नोकरचाकरही ठेवता येतात. पण जगातला कोणताही स्वयंपाकी आईच्या हातच्या जेवणाची सर देऊ शकत नाही. तर मूळ मुद्दा त्याच क्रंमाक १ मध्ये लिहिला आहे - "ज्या घरात स्त्रियांची संख्या जास्त असते त्या घराला घरपण येते." Happy
...

सामी,
मी गांधीवादी विचारांचा आहे. अजूनही कोण गांधीवादी विचारांचा असेल तर त्याचे आणि माझे विचार जुळू शकतात. Happy
...

अग्निपंख,
मला माझ्या बरेच लेखात वा प्रतिसादात माझ्या ग’फ्रेंड चा उल्लेख करावा लागतो याला कारणही माझी ग’फ्रेंड च आहे. तिनेच मला तशी सक्त ताकीद दिली आहे की सोशल नेटवर्कींग साईटवर उंदडायचे असल्यास तू एन्गेजड / कमिटेड आहेस हे एकूण एकाला माहीत पाहिजे. म्हणूनच मायबोलीवर मला पहिल्या धाग्यातच हे डिक्लेअर करावे लागले होते. - गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?
अवांतर - त्या धाग्याबद्दल काही बोलायचे असल्यास तिथेच प्रतिसाद द्या जेणेकरून तो वर येईल Wink

सीमंतिनी
Proud
हो, हे शीर्षक लिहिताना माझ्याही ध्यानात आले होते.. म्हणून लेखात ध्यानात ठेऊन मुलगाच हवा ऐवजी मुलगाच झाला पाहिजे असे लिहिले होते.
...

पियू,
माझ्या बायकोला काय हवेय याच्याशी काही घेणेदेणे नाही असे म्हणता येणार नाही, मी फक्त मला काय हवेय ते सांगितलेय आणि हे तिलाही माहीत आहे आणि कारणांसह. बाकी जे नशीबात व्हायचेच ते होणारच होणार त्यामुळे माझे मत लादण्याचा प्रश्नच येत नाही.
...

दिनेशदा,
मुलगीच होण्यासाठी काय करायचे याचे शास्त्रीय आणि कायदेशीर उपाय >>>>>> असे काही उपाय असतात, ते सुद्धा कायदेशीर Uhoh
...

सिनि,
खेळण्याबागडण्याचे वय माझे २००८ सालीच नव्हे तर आजही आहेच. मरेपर्यंत राहील. Happy
...

सीमा (२७६),
माझ्या ग’फ्रेंड ला माझे हेच नाही तर सारे विचार माहीत आहेत. आमच्या दोघांमध्ये एकवेळ प्रेम नसेल पण विश्वास आणि प्रामाणिकपणा पुरेपूर आहे. Happy

कुमार ऋन्मेष , आता स्पष्ट सांगायचा मोह होतो आहे - हे अतिशय उथळ विचार आहेत . तुला खरंच जरा अजून खोलात विचार करण्याची गरज आहे!
जगातला कोणताही स्वयंपाकी आईच्या हातच्या जेवणाची सर देऊ शकत नाही. >>>>>
>> अत्यन्त घातक विचारसरणी . आईनेच कायम स्वयंपाकघरात(च) राबले पाहिजे याचे हे ग्लोरिफिकेशन. इथे आईला चॉइसच नाही ! तिला स्वयंपाकी ठेवायचाय का? तिला आयते खायला का नाही आवडणार ? हा काही विचार मनाला शिवलेला दिसत नाही तुमच्या !! तुम्हाला बॉ तिच्याच्च हातचे आवडते यालाच काय ते महत्त्व !! स्वयंपाक तिनेच्च करावा हे तुम्ही ठरवणार ??

"ज्या घरात स्त्रियांची संख्या जास्त असते त्या घराला घरपण येते."
>>> असं का ? त्या "लाड करण्यासाठी " राबणार्‍या असतील तरच ना ? आणि समजा त्या स्त्रिया सकाळी ८ ते रात्री ८ काम करणार्‍या , स्वयपाकी ठेवून आयते खाणार्‍या असतील तर मग येइल का हो घरपण ? स्वतःलाच विचारा हे !!

ऋन्मेष, तुम्ही ना एकदम गप्प करता हे असे काही लिहून. Proud
पण तरी तुम्हाला पुलेशु.
लिखेगा तो पढेगाच (पब्लिक) किंवा लिहाल तर वाचाल.. Happy

maitreyee,

>> आईनेच कायम स्वयंपाकघरात(च) राबले पाहिजे याचे हे ग्लोरिफिकेशन

असहमत. आई बेचव बनवणारी असली तरी काही पदार्थ तिचे खास असतात. त्यांची सर बाकी कोणाला येत नाही. तुम्ही जे उदात्तीकरण म्हणताहात ते या पुरुषी वक्तव्यातून दिसतं :

मी ना जेवायचं सोडल्यास स्वयंपाकघरात शिरत देखील नाही.

आ.न.,
-गा.पै.

ग्लोरिफिकेशन... खरय.

माझ्या हातचं/चवीचं खायला आवडतं तर तसं बनवायला शीक ही माझी लेकाला तंबी आहे. बायको कडून असल्या अपेक्षा ठेवल्यास तर माझ्याशी गाठ आहे.

आमच्या घरातलंच एक उदाहरण सांगते. सासूबाई उत्तम स्वयंपाक करतात आणि मी खूप्स त्यांच्याकडेच शिकले. ... एकदाच नवरा... 'आईसारखं नाही' असं त्यांच्यासमोर बोलल्यावर... त्यांनीच '.. तू करूच नकोस काही. त्यालाच करून घेऊदे. हवं असेल तर शिकेल माझ्याकडे. मग बघतेच मी... माझ्यासारखं त्याला जमतय का ते' Happy '
असली तोफ डागली होती.
(त्या मस्तं डेंजरस आहेत).

असो... पण ह्या लेखातली घरात बायका असण्याची कारणं मात्रं खरच डेंजरस आहेत... वाईट डेंजरस.

ऐकूणातच महान आहे हे. Lol

सीमंतिनी Biggrin

>>>> मी गांधीवादी विचारांचा आहे. अजूनही कोण गांधीवादी विचारांचा असेल तर त्याचे आणि माझे विचार जुळू शकतात.

>>> राहूल गांधींशी जुळताहेत का ते ताडून बघा. त्यांच्या आईनी पण त्यांचे खूप लाड केलेत.

लेखक हा देवपूरकरांचा गद्यावतार आहे असं कोणाकोणाला वाटतं?
>>>
मी आधीच्या पोस्टीतच ऊल्लेख केलाय... Lol

एकंदर एवढे सगळे लेख पाहता ह्या लेखकांचे विचार हे त्यांचे कधिच वाटत नाहि मला. एखादे पुस्तक वाचल्यावर,सिनेमा पाहिल्यावर किंवा काहि घटना घड्ल्यावर त्यावेळेपुरते भारावुन जावुन लिहील्यासारखे वाटते..एकदम वरवरचे
लेखक जे रिप्लाय देत आहेत ते हास्यास्पद आहेत...

ऋन्मेऽऽष

मानलं बुवा तुम्हाला, तुम्ही काहीही लिहिलं तरी किमान ५० प्रतिसाद तर येतातच .

>>बाहेर आता माझे हे आरामाचे लाड माझी गर्लफ्रेंड पुरवते. पुढे जाऊन बायको हे करेन. अर्थात याच कारणासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडशी कधीही ब्रेकअप
स्वाती हे प्रकरण तोंडदेखलं मॉर्डन दिसतंञ. सगळॅ स्पेक जुने बाबा आदमच्या काळातलं दिसतं. नुस्ताच पालथा, वाजणारा घडा.
कुणी याच्या गर्लफ्रेंडला हे उदात्त विचार वाचायला द्या सुंठेवाचून खोकला जाईल (किंवा ब्रेकअपनंतर नवी गर्लफ्रेंड मिळ्वायबद्दलचे नवे धागे गुंफले जातील)

कविता१९७८ >>>> +१ Happy आता तुला ते त्याचं आवडतं वाक्य प्रतिक्रीया म्हणुन लिहीतील .>>>> लव यु ,हेट यू बट कान्ट इग्नोर .... Lol .
ऋन्मेऽऽष यांच्या धाग्यांवर लिहुनच माझी लिहायची प्रॅक्टीस जास्त झाली . Happy आणि शुदध्लेखनही सुधारलं आहे. Proud Proud
हे देवपूरकर कोण आहेत?

हे देवपूरकर कोण आहे>>>>>>

जुने गझलकार आहेत.२-३ महिन्यांपुर्वी दिवसाला ४-५ गझल तरी पाडायचेच ते...

मागच्या पानांवर गेले की पहा जरा लोकांनी त्यांना दिलेल्या प्रतिक्रिया वाचनीय आहेत.

काही मुद्दे पटले नसले तरी एकंदरीत लेख आवडला. सध्याच्या स्त्रीभ्रूण हत्या होण्याच्या काळात एखादी व्यक्ती मुलगी व्हावी अशी आशा करते हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

देवपुरकर नाही हो
ते बिचारे खरच वैतागवाणे होते Wink
हा प्रकार वेगळा आहे Wink

मामी, स्वाती, रूनी Rofl

ऋन्मेष ने माझा चांगलाच धसका घेतलेला दिसतोय Uhoh
आता हा वविला आला तर मला त्याच्या सोबत जेवायला बसू देणार नाही Sad

<< कुणी याच्या गर्लफ्रेंडला हे उदात्त विचार वाचायला द्या सुंठेवाचून खोकला जाईल (किंवा ब्रेकअपनंतर नवी गर्लफ्रेंड मिळ्वायबद्दलचे नवे धागे गुंफले जातील) >>

हे कसे काय घडवणार? हे ऋन्मेऽऽष कोण हे ठाऊक आहे का कुणाला? फेसबुकवर पाहिले तर ऋन्मेष चिल्लाळ नावाचे ४, ऋन्मेष कुडतरकर नावाचे २ आणि ऋन्मेष आराध्ये नावाचे २ प्रोफाईल आहेत.

त्यापैकी ऋन्मेष चिल्लाळ आणि ऋन्मेष कुडतरकर हे छायाचित्रावरून शालेय विद्यार्थी असल्याचे लक्षात येते मग उरतंय कोण तर ऋन्मेष आराध्ये. हे तेच असतील का? खात्रीने सांगता येत नाही.

तरी तज्ज्ञ मंडळी अधिक प्रकाश टाकु शकतील.

सीमा - मी फक्त एकाच माझ्या आवडत्या लेखकाच्या गजल वाचते गजल जास्त कळत नसतानाही त्यामुळे माहीत नव्ह्ते कोण ते ?त्यांना दिलेल्या प्रतिक्रियांसाठी तरी वाचायला हवं आता . Happy

Pages