माननीय श्री शरदराव पवारसाहेब यांस

Submitted by बेफ़िकीर on 19 October, 2014 - 14:03

माननीय श्री शरदराव पवारसाहेब यांस,

आदरपूर्वक नमस्कार!

आम्ही यंदाच्या राजकीय मोसमात पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतले आहे. पहिले पत्र आपल्याला लिहीत आहोत.

पत्र हे 'वन वे कम्युनिकेशन' असते. म्हणजे आमचे पत्र वाचत असताना तुम्ही प्रतिवाद करू शकणार नाही. हा मार्ग आम्हाला सर्वाधिक सोयीचा वाटला.

साहेब, आपला उल्लेख जेव्हा 'शरद पवार' असा एकेरी व्हायचा त्या युगात आमचे वय 'जोरात लागली की दिसेल त्या जागी मुतण्याचे' होते. तेव्हा पुण्यात धरणेही दोनच होती. तेव्हा आम्ही जे खेळ खेळत असू त्यात मुलांची एकमेकांशी खूप भांडणे होत. मग अबोले होत. सहा सहा महिने 'मी त्याच्याशी बोलत नाही' असे सांगून मिरवण्यात जात असत. 'तत्व ते तत्व' ह्या घोषणेबरहुकूम आम्ही मन फत्तर करून ग्राऊंडमध्ये वावरत असू. पुढे कधीतरी चालू मित्राशीही भांडण झाले की पुन्हा जुन्या मित्राशी बोलणे सुरू होत असे. त्यावेळी आम्हाला 'आता कसा आलास बोलायला' असे कोणी विचारत नसे. आम्हीही कोणाला असे विचारत नसू. गरज ही समीकरणांची जननी आहे हा विचार आमच्यात भिनलेला होता. समीकरणांची गरज आम्हाला आत्मोन्नतींसाठी पडत असे. फक्त आत्मोन्नतीच्या आमच्या आणि तुमच्या व्याख्यांमध्ये तफावत असायची. आमचे एक असो!

तर साहेब, त्या काळी चार थोर वयाची माणसे चकाट्या पिटायला एकत्र आली की कोणीतरी राष्ट्रपतीच्या आवेषात उद्गारायचा.

"पवारनी पुलोद काढलंय! सत्ता हवी म्हणून सांगा सरळ म्हणाव!"

मग तुमच्या पुलोद काढण्यावर जंगी चर्चा केली जायची. सरतेशेवटी आम्हाला इतकेच समजायचे की तुम्ही कोणत्यातरी मोठ्या पक्षातून फुटून बाहेर पडलात आणि त्यामार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केलात. फार राग यायचा तुमचा! असे वाटायचे की असेच असतात की काय राजकारणी?

आणीबाणीत धरपकड सुरू झाली आणि संघिष्ट लोक सैरावैरा पळालेले आम्ही पाहिले. ज्यांच्या घराच्या भिंतींवर गुरुजी विलसत असायचे तेथे एका रात्रीत बापूजी येऊन बसले. बाईंनी अख्खा देश तालावर नाचवला आणि मग बहुधा तुम्हालाही जाणवले की जुने समीकरण आवश्यक झालेले आहे.

तुमचे ते जुने समीकरण पुन्हा नूतनीकरण होऊन नेमके केव्हा व कसे अस्तित्वात आले हे आम्हाला स्मरत नाही कारण बहुधा तेव्हा आम्ही दहावीच्या जवळपास पोचलेलो असू!

पण साहेब, तिकडे तुमचा दबदबा दिल्लीचे राजकारण हादरवू लागला. यशवंतरावांनंतर बहुधा इतक्या धडाडीचा पहिलाच मराठी नेता दिल्लीत पोचला असावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद लीलया सांभाळून राष्ट्रीय राजकारणात झेप घेऊन तेथेही दिग्गज बनणे म्हणजे सामान्य काम नव्हे! तेही पुलोदचा इतिहास पाठीशी घेऊन!

एकीकडे गांधी घराण्यातील एकसे एक व्यक्तीमत्त्वे दुर्दैवी प्रकारे हरपत चालली होती आणि दुसरीकडे तुम्ही पी एम पदाकडे झेपावू लागला होतात.

तुम्हाला पराभव ठाऊक नव्हता. बारामती हे तुमच्यामुळे भारताच्या राजकारणावर सर्वज्ञात झालेले उपनगर! खैरनारांचे ट्रक कधी आलेच नाहीत. भूखंड आणि श्रीखंड ह्यावर अनंत चारोळ्या रचल्या गेल्या.

एकदा आम्ही असेच विनावाहक विनाथांबा एस टी मधून बारामतीला निघालो. इसवीसन २००१ ची बात असावी. शेजारी एक अतिशय म्हातारा माणूस बसला होता. अशीच आपली काहीबाही चर्चा सुरू झाली तर म्हणाला कसा? पुण्यात एक तरुण म्हणे होस्टेलवर चार मुलांसोबत राहायचा आणि शिकायचा. चार आण्याची मिसळ खायला त्या मुलाकडे पैसे नसायचे. आता त्याच्या हजार पिढ्या बसून खातील. आणि मग तुमचे नांव घेतले त्या म्हातार्‍याने! तो जन्मापासून म्हणे बारामतीतच होता.

खरे सांगू का साहेब? असली फुटकळ, बिनबुडाची विधाने आणि माहिती ऐकून आम्हाला काहीच वाटायचे नाही. राजकारणी नेते ही अशी व्यक्तीमत्वे असतात ज्यांच्याबद्दल कोणीही जीभ उचलून टाळ्याला लावू शकतो अशी आपल्याकडे परिस्थिती आहे. त्या म्हातार्‍याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढचा प्रवास केला.

तुम्ही आणलेल्या ग्रीव्ह्जची वाहने सिक्स सीटर म्हणून कायदेशीररीत्या वापरण्यास सुरुवात झाल्यानंतर अचानक प्रदुषणाच्या नावाखाली कोणा नतद्रष्ट सरकारी संस्थेने त्यांचे परवाने रद्द केले तेव्हा एका रिक्षेवाल्याने त्याची सहा आसनी रिक्षा संगम पूलावरून फेकून दिली व रस्त्यावर रडत बसला. पेपरात फोटोसकट बातमी आली होती. पण ग्रीव्ह्जमुळे बारामतीचा नक्शाच बदलला. आता तर काय तुमच्या बालेकिल्ल्यात पाय टाकायचा तर टोल भरावा लागतो, त्यातून सहीसलामत बाहेर पडायचे तर टोल भरावा लागतो. छप्पन रिक्षेवाले बेकार झाले तरी बेहत्तर, पण कंपनी चालली पाहिजे.

दादा आणि ताईंचा राजकारणात झालेला उदय म्हणजे काही घराणेशाही नाही म्हणता येणार! तुमचे सर्वाधिक मार्गदर्शन त्यांनाच मिळालेले असणार! मग त्यांच्याइतके सुयोग्य दुसरे कोण असणार?

एकदा बारामतीच्या एका शेतात एक मजूर म्हातारा उघडाबंब उकिडवा बसून बिडी फुंकत असताना त्याला विचारले की काय, पाऊसपाणी आणि पवारसाहेब काय म्हणतायत?

तर म्हणतो कसा? पाऊस यायचा तेव्हा येईल. पण पवारांचं नांव काढू नका! ते ९६ कुळी आहेत, आम्ही साडे शहाण्णव आहोत. इतका मुरलेला जातीयवाद असलेल्या ठिकाणी इतके घट्ट बस्तान बसवणे म्हणजे गंमत नाही.

माळेगावपासून रस्त्याच्या दुतर्फा लागणार्‍या रग्गड शैक्षणिक संस्था तुमचे शिक्षणक्षेत्राबाबतचे औदार्य प्रकट करतात.

पण आम्हाला सर्वात जास्त आदर वाटतो तो आपला नेता देशाचा संरक्षण आणि कृषी मंत्री झाल्याचा! अहो काय पद का काय ते? सगळी सेना ज्याच्या सहीच्या प्रतीक्षेत असते तो देशाचा सेनापती केवढा मोठा असेल?

'हम देखते है बारिश कैसे नही आती' असा शाब्दिक धीर भाषणांमधून देणार्‍या राजीवजींची आपण सोबत केलीत. त्यांच्या चिरंजिवांनी 'उमदे व्यक्तिमत्व' हा एक घटक सोडून दुसरे त्यांच्याकडून काय उचलले असेल तर हे असे तर्कसुसंगत, व्यवस्थित बोलणे! पूर्वी तानसेन दीपराग गाऊ लागला की दिवे लागत असत म्हणे! हे दोघे बोलले की पाऊस पडत असावा काही ठिकाणी!

मात्र साहेब, पंतप्रधानपद एक राहूदेत, पण उपपंतप्रधानपदीतरी नेमणूक होणार असे आम्हाला फार वाटत होते. पण दिल्लीचे सगळे निराळेच! त्यातच अधेमधे रथयात्रा, राममंदिर, गोध्रा, व्ही पी सिंग, वाजपेयी, अडवानी असल्या सूक्ष्म लहरी येऊन जात असत. माणसाने सहन तरी किती करायचे?

शेवटी तुमचा संयम सुटला.

सोनिया गांधींचे इटालीत्व काही तुमच्यातील सच्च्या भारतीयाला मंजूर होऊ शकले नाही. आता कोणी उगाच म्हणेल की पुलोदचीच पुनरावृत्ती झाली. पण ह्यावेळचा मुद्दाच निराळा होता. एकशे वीस कोटींच्या देशाचे नेतृत्व एका युरोपिअन बाईच्या हातात? का तर फक्त ती त्या घराण्याची स्नुषा आहे म्हणून? असह्य झाले हे तुम्हाला!

आणि तुमच्यातील धडाडीचा नेता, कुशल संघटक, आजवर भेटलेल्या प्रत्येक माणसाला नावानिशी ओळखणारा महान राजा, सर्व पक्षांना प्रिय असलेला म्होरक्या संतापला.

ही दुसरी वेळ होती फुटण्याची! पण तत्व ते तत्व! तुम्हाला प्रखर राष्ट्रवाद अभिप्रेत होता. जाज्वल्य परंपरा लाभलेली ही भारतभूमी कोणा फिरंग्याच्या हातात सोपवायची तुमची तयारीच नव्हती. तारीक अन्वर आणि संगमांना तुमचे विचार पटले आणि तुम्ही तिघे फुटलात. नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही सर्वेसर्वा बनलात. सोनिया गांधी आणि तुम्ही हे जणू विरुद्धार्थी शब्द भासू लागले.

महाराष्ट्रापासून सुरुवात करून हा राष्ट्रवाद भारतभर पसरवण्याच्या तुमच्या दिग्विजयी योजनांना दैवी शुभ संकेत मिळाले. निव्वळ आणि निव्वळ तुमच्यासाठी आयुष्य पणाला लावलेल्या लाखो अनुयायांनी हा नवा पक्ष उचलून धरला. काहीतरी वेगळे घडत होते. आजवर फक्त काँग्रेस आणि भाजप (व शिवसेना) असे दोनच प्रमुख पर्याय होते, पण राष्ट्रवादीच्या रुपाने काँग्रेसमध्ये नाराज असलेले पण वृत्ती काँग्रेसचीच असलेले अगणित कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झाले.

जुनी खोडे म्हणू लागली. पवार म्हणजे असेच करणार! पण तुमच्या सूर्यासारख्या तेजात आता काँग्रेस भाजून निघत होती. महाराष्ट्र अचंबीत झाला होता.

आणि निवडणूका झाल्या. निकाल लागले. आणि 'जातीयवादी' शक्तींना सत्तेपासून दूर ठेवणे वगैरे प्रकारच्या समान धोरणांवर तुम्ही सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केलीत. नुसता बाहेरून पाठिंबा नव्हे तर सत्तेत सहभाग!

साहेब, एवढे होईस्तोवर थोडेफार राजकारण आम्हालाही समजू लागले होते हो! खरे सांगतो, लाज वाटली लाज! तुमच्या त्या निर्णयाची लाज वाटली.

तुमचे फुटणे काय, नवा पक्ष काढणे काय, पुन्हा जुळणे काय, कोठूनही सत्तेत असणे काय! सारेच न्यारे!

मध्यंतरी एका माथेफिरूने तुमच्यावर हाताने वार केल्याचा व्हिडिओ सगळीकडे फिरला तेव्हा आमचे रक्त उसळले होते. असे वाटले होते की सुरक्षा व्यवस्था नीट नसल्याबद्दल सरकारने तुमची माफी मागावी.

पण साहेब, जनतेला फसवून आपल्यावर विश्वास ठेवणार्‍या जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागायची वेळ आली तर तुम्हाला दुसरे कामच उरणार नाही हो?

तुमच्या आर आर पाटील साहेबांनी डान्स बार बंद करून सुसंस्कृत महाराष्ट्राची घोषणा अंमलात आणण्याचा नारळ फोडला. फार परखड व्यक्तिमत्व आहे बरे ते? जे आहे ते बोलणार! पोलिसांना पगार कमी आहे म्हणून पोलिस पैसे खातात हे त्यांच्यामुळे आम्हाला कळले. आम्हाला वाटायचे की पोलिस पैसे खातात हे अजून राष्ट्रवादी काँग्रेसला समजलेलेच नसेल. तर ह्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी परवा एक धोरणी सल्ला दिला कोणालातरी! काय बलात्कार वगैरे करायचे ते निवडणूकीनंतर करा म्हणाले. उगाच विरोधी मतदान व्हायला नको! हे बोलल्यानंतर त्यांनी जनतेची उगाचच माफीबिफीही मागीतली. आम्ही कुठे काय म्हणालो होतो त्यांना? पण साहेब, एक सांगू का? महाराष्ट्राच्या मायबहिणींची आबा पाटलांच्या वतीने तुम्ही समक्ष माफी मागायला हवी होतीत. नाही काय आहे, सगळ्यांच्याच घरी लेकी सुना असतात. आपली माणसे बाहेर जगासमोर असे बोलतात हे आपल्याच लेकीसुनांना कळल्यानंतर त्यांच्यासमोर आपली मान खाली जाईल ना? निदान नैतिक जबाबदारी म्हणून तरी? पण नाही! तुम्ही म्हणालात की आबा पाटील ह्यांच्या त्या विधानाबद्दल त्यांनी माफी मागीतलेली आहे, तेव्हा हा वाद आता संपवा! छत्रपतींच्या प्रशासनात असे बोलणार्‍या गृहमंत्र्याचे काय झाले असते नाही साहेब? पण आपल्याला कशाला नाही त्या काळज्या? छत्रपतींचे नांव मते मागण्यापुरते घेतले की झाले, नाही का?

परकीय नेतृत्वाच्या हाती देश दिला जाऊ नये म्हणून बाहेर पडणारे तुम्ही पंधरा वर्षे त्या नेतृत्वाशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात सत्तेत सहभागी राहिलात. तुमचे अन्य साथीदार एक तर निष्प्रभ तरी झाले किंवा सोनियांना तरी मिळाले. कुठे ऐकू येते हल्ली संगमा आणि अन्वरांचे नांव विशेष? तर ह्या पंधरा वर्षांत तुम्ही काँग्रेसच्या प्रशासनावर नेहमीच भडकलेले असायचात. पण भाजपमुक्त महाराष्ट्र ह्या धोरणाने टिकून राहिलात.

मध्यंतरी दादांनी 'सुप्रियाताईला निवडून दिले नाही तर पाणी बंद करेन' असा हळूवार सल्ला दिला काही नागरिकांना! त्यावर तुमचे स्टेटमेंट नाही. त्याआधी दादा म्हणाले की पाऊस पडत नसेल तर काय आम्ही धरणांत मुतू की काय? त्यावर तुमचे स्टेटमेंट नाही. माफी तर लांबचीच गोष्ट!

हे सगळे करत असताना प्रकृतीची हेळसांड झाली आणि शस्त्रक्रियाही झाली. तुमचा सक्रीय राजकारणापेक्षा मार्गदर्शकाची भूमिका घेण्यावर भर सुरू झाला. प्रेरनास्थान बनलात तुम्ही! तुम्ही इतके ज्येष्ठ व वरिष्ठ होऊन बसलात की दिग्गज, ज्येष्ठ, राष्ट्रीत नेते अश्या उपाध्या तुमच्यासमोर फिक्या पडू लागल्या. आता राजकारणातील तुमचे स्थान वाजपेयींसारखे झाले. ऋषीतूल्य!

अगदी आत्ताआत्तापर्यंत तुमही आणि काँग्रेसची युती होती. भाजप आणि सेनेची युती तुटल्यावर तासाभरात तुमचीही युती तुटली. राज्यातील अवघी जनता अवाक झाली. आपण स्वबळावर निवडून येणार नाही हे ह्या निवडणूकीत उतरलेल्या भाजप सोडून प्रत्येक पक्षाला नीट माहीत होते. तुम्हाला तर वर्षभर पुढचे राजकारण आत्ताच समजते इतके तुम्ही मुरलेले नेते आहात.

वजाबाकीचे राजकारण करू नका, बेरजेचे करा असा सल्ला कधीकाळी देणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आता राजकारणाचे पितामह भीष्म झालेले आहेत. कृषीक्षेत्रावर त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांचे संघटन कौशल्य, दुसरी फळी उभी करणे, सर्वांना बरोबर घेऊन चलणे ह्या तमाम वैशिष्ट्यांबरोबरच आजवर ते ओळखले गेले आहेत आणखीन एका अत्यंत महत्वाच्या बाबीसाठी!

ती बाब म्हणजे, राजकारणात ऐनवेळी धूर्त खेळी खेळणे! ऐनवेळी!

ह्यात तुमचा हात कोणी धरूच शकत नाही साहेब!

आजही तुम्ही एक धूर्त खेळी खेळलात.

कोणीही विचारले नसताना भाजपाला केवळ स्थिर सरकार यावे ह्यासाठी बाहेरून पाठिंबा देणार असा बार दिलात उडवून!

ह्यातून काय काय साधले ते आता अनुभवाने आम्हालाही समजते बरे साहेब?

भाजपला शिवसेनेशिवायही पर्याय आहे अशी परिस्थिती निर्माण केल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होणे!

भाजप आणि शिवसेनेमध्ये घासाघीस होईलच अशी परिस्थिती निर्माण करणे!

काँग्रेसपासून प्रदीर्घ कालावधीसाठी काडीमोड घेतल्याचे जाहीर न करूनही तो घेणे!

काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे!

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एक अटेंप्ट करून बघणे!

आपली गुपीते भाजपने बाहेर काढू नयेत ह्याची तजवीज करणे!

गोंधळ उडवून देणे किंवा संभ्रम निर्माण होईल अशी परिस्थिती बनवणे!

येनकेनप्रकारेण सत्तेच्या जवळपास राहणे!

वर्षभराने नवीन राजकारण करून नवीन समीकरण जुळवण्याचा वाव निर्माण करून ठेवणे!

बरं! हे सगळे करताना तुम्ही काँग्रेस सोडून वाईटपना कोणाचाच घेतला नाहीत. सेना तुम्हाला काहीच म्हणू शकत नाही. भाजपला तर काय सपोर्ट हवाच आहे. येऊन जाऊन बिचारी जनता आगपाखड करेल ती करूदेत! पाच वर्षांनी तेव्हाचे तेव्हा पाहू!

पण साहेब, एक शेवटचे सांगू का?

हे सगळे पाहिले ना? की असे वाटते की तुमच्या विचारसरणीला, कारकीर्दीला, पक्षनिर्मीती किंवा पक्षबांधणीला, राजकारणाला कधीच कोणतेही तात्विक अधिष्ठान नव्हतेच!

एक शेवटचे सांगू का? लाज वाटते साहेब, की तुमच्यासारखे नेते महाराष्ट्रात झाले, त्यामुळे कोठे अभिमानाने काही सांगण्यासारखेच नसते आम्हा गरीबांकडे!

=====================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच लॉजिकने मग गुजरातचा विकास मोदींनी केलेला नाही, मोदींनी तिकडे लक्ष घातले नाही ,त्यामुळे उद्योगजगाचा विकास झाला Proud

आयटी सेक्टरचा विकास बिझनेसमन्सने केला ,मंजै त्यांनीच रस्ते बांधले, शिक्षणसंस्था काढल्या, त्यांनी वीज तयार केली, त्यांनीच पोलिस आणले, त्यांनीच विमानतळं वगैरे बांधले. छान, मग या आयटीवाल्यांनी बिहार वगैरेचा का विकास केला नाही हो! गेला बाजार UP MP का बिमारु राहिले.

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेसाठी शिवसैनिकांनी ह्याच 'शेती'तज्ञांच्या पुढे लोटांगण घातले होते असे पुसटसे आठवत आहे..
रच्याकने साहेब सगळ्यातच तज्ञ हायेत कोणतही क्षेत्र त्यांना वावगं नाही, शेती च्या जागेवर क्रिकेट,स्थावर जंगम मालमत्ता, रस्ते/टोल विकास, राजकारण काहीही टाका.

कुमार केतकरांनी एका वाक्यात पवारांचे अत्यंत चपखल वर्णन केलय."प्रचंड मोठे कर्त्रुत्व पण विश्वासार्हता अगदीच कमी". फक्त त्यांना एकट्यालाच का झोडपले जाते हे मला न उलगदलेले कोदे आहे.कारण भारतीय राजकारणाचा गेल्या काही दशकांचा इतिहास पहिला तर कोलांट्या उड्य सगळ्यांनीच मारल्यात्.कदाचित त्याची सुररवात महाराष्तट्रात पवारांनी केली असावी म्हणुन.
प्रताप आसबेंचा काही दिवस्संपुर्वी लोकरंगमधे आलेला लेख पवार द्वेष्ट्यांनी नक्की वाचावा.

<< जर कुठलाही नेता आठवत नसेल तर शरद पवारांचीच लाज का वाटते ?>> << फक्त त्यांना एकट्यालाच का झोडपले जाते हे मला न उलगदलेले कोदे आहे.>> मला वाटतं यशवंतराव चव्हाणांनंतर पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील योग्य नेता म्हणून सारा महाराष्ट्र आशेने व अभिमानाने पवारांकडेच बघत होता. त्यासाठी आवश्यक असलेले हुशारी, अभ्यासू वृत्ती, दूरदृष्टी, कार्यक्षमता, संघटनाचातुर्य, राजकारणातला व प्रशासनातला गाढा अनुभव इ.इ. सर्व गुण पवारांकडे असूनही कुठं तरी माशी शिंकली हें निर्विवाद; त्यांची आजची प्रतिमा खास नाही हें त्यांचे चाहतेही नाकारणार नाहीत व त्याला पवारसाहेब अजिबात जबाबदार नाहीत असंही ते छातीठोकपणे म्हणतील असं वाटत नाही. तथाकथित इतर नेत्यांबाबत फार मोठ्या अपेक्षाच नव्हत्या त्यामुळे त्यांच्यावर विशेष टीका झाली/होत नाही. पण पवारानी फार मोठा अपेक्षाभंग केला म्हणून त्यांच्यावरच अधिक टीका होणं - विशेषतः महाराष्ट्रात - स्वाभाविक असावं. सिंहच जर अचानक उंदरांच्या शिकारीतच रमताना दिसला, तर सर्वत्र बेचैनी निर्माण होणारच ना !

शरद पवारांच्या मनातले ओळखणारयाला १ कोटी च बक्षिस जाहीर करण्यात आले आहे .पण ते अजुन कुणालाही मिळालेले नाही . Happy Happy

सिनि,
हळू बोला. पवारसाहेब स्वतःच ते बक्षिस क्लेम करतील तुमच्याकडून Lol
*
रॉहू, प्रताप आसबे यांचा इतिहास इथे लिहूनच टाका की!

<< पवारसाहेब स्वतःच ते बक्षिस क्लेम करतील तुमच्याकडून >> निदान त्याकरतां तरी त्यानी शोधावंच त्यांच्याच मनात खरं काय आहे तें ! Wink

इब्लिस जी नाही करणार क्लेम ते कारण त्यांच्या मनातील विचार हे कुणालाच कळु नयेत म्हणुन स्वतःच्या मनातही आणत नसतील. Happy . ही दोन्ही पवारसाहेब विषयीचं वरील वाक्य विनोदाने लिहिलय हे सर्वांना जसे आता कळले आहेच .पण शरद पवार यांच्या विषयी व एकुणच मला जे माहीत आहे ते माझ्या वडिलांमुळे आणि जे अगदिच थोडंफार राजकारंणाविषयी वाचन आहे त्यामुळे मी यातली जाणकार वगैरे नाही.
मी इथे लिहीण्याचे कारण एवढचं होतं की माबो वर नवीन(जुन्या ,सर्वांनाच) लोकांना न घाबरता सगळीकडे चुकत माकत का होईना लिहीण्याची मुभा आहे . कोणिही त्यांना अ‍ॅड्मीन शिवाय अडवू शकत नाही.मी वर्षभरापासुन माबो वाचत असल्यामुळे मला हे समजलं, पण सगळेच नवीन असे नसतील तर ज्यांना राजकारण या विषयाबाबत लिहावेसे वाट्ते आहे पण समोरील व्यक्ती कोणत्या अर्थाने लिहीते आहे .हे आधीपासुन न वाचल्यामुळे न कळुन इथे येण्याचे टाळेल .जे मला चुकीचं वाट्लं .असो.
रॉहु बाबत तुम्ही ऋन्मेऽऽष च्या धाग्याबाबत जर बोलत असाल तर तो प्रश्न सुट्ला आहे.प्रताब आसबे यांच्याबाबद तुम्ही काय म्हणत आहात ते नाही कळले.त्यांचा इतिहास मला खरच माहीत नाही.मला जे प्रताब आसबे टी व्ही वर येतात ते माहीत आहेत बस.इथे आहेत का कींवा त्यांच्याशी माझं कुठलच बोलणं माझ्यामाहीती प्रमाणे झालेलं नाही.मग त्यांचा इतिहास मला कसा माहीत असेल.जरा स्पष्ट्च सांगाल का?
शेवटी एकच -तुम्हा सर्व जाणकारा कडुन मिळणारी माहीती आम्हा नवीन कच्चा लिंबुना मह्त्वाची आहे.

माननीय साहेब,

कट्टर हिंदूत्ववादी, धार्मिक तेढ वाढवणारे, अर्धी चड्डी घालणारे, तळागाळापर्यंत न पोचलेले, जानव्याच्या गाठीत अडकलेले भाजपीय महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यास समर्थ ठरावेत म्हणून विश्वास ठरावाच्या वेळी तटस्थ राहण्यापेक्षा निवडणूकीतच तटस्थ राहिला असतात तर?

पवार पाठिंबा देत आहे ठिक,पण भाजप्ये पाठिंबा नाकरत नाहीएत ,कालपर्यंत धरणात मुतर्यांची निर्भत्सना करणारे भाजप्ये हे 'धरणीतीर्थ' प्यायला लगेच हात पुढे करत आहेत..

धिरज किती द्वेष कराल ? काही लिमिट ? वरचे हे वाक्य म्हणजे जरा अतीच आहे. Sad
बोलणारा चुकीचे बोलून गेला, पण म्हणुन पुन्हा त्यावर अशा असभ्य भाषेत कोट्या केल्याच पाहिजेत असे नाही.

आणि हो, हे सर्वांना उद्देशून आहे अगदी या आधी ज्या कोणी धरणाच्या विधानावर राकॉ विरूद्ध कोट्या केल्या असतील आणि माझ्या पहाण्यात आल्या नसतील त्यांना सुद्धा.

बाकी बेफिंचे पत्र ठीक आहे. पवारांमुळे पश्चिम महाराष्ट्राचा बराच विकास झाला हे खरेच आहे, पण त्याबरोबर बर्‍याच अपप्रवृत्ती पण आल्या हे नजरेआड करून चालणार नाही.

राजकारणात, समाजकारणात केवळ साध्यच चांगले असुन चालत नाही तर साधनशुचिता पण महत्वाची असते.
अन्यथा ती समाजाच्या नैतिकतेला रसातळाला नेल्याशिवाय रहात नाही. Sad

पवार पाठिंबा देत आहे ठिक,पण भाजप्ये पाठिंबा नाकरत नाहीएत ,कालपर्यंत धरणात मुतर्यांची निर्भत्सना करणारे भाजप्ये हे 'धरणीतीर्थ' प्यायला लगेच हात पुढे करत आहेत.. +१

भाषा कठोर वाटत असेल पण मुद्दा योग्य आहे. प्रचारात महाभ्रष्टाचारवादी, न्याचुरली करप्ट पार्टी वगैरे बोलणारे प्रधानसेवक आणि भाजप आता राष्ट्रवादीचा आतून/बाहेरून पाठींबा घ्यायला धावतच आहेत.' आम्ही न मागता त्यांनी पाठींबा दिलाय, बाहेरून पाठींबा दिला आहे' वगैरे शेंड्या लोकांना लावू नका. लोकांना माहित असत असा बाहेरून पाठींबा म्हणजे आतून काय काय सेटिंग असते ते.

मराठी माणसाची एक गंमत आहे. त्याला शरद पवारांना महा बिलंदर, कपटी, धूर्त असे म्हणण्यात काय आनंद मिळतो कुणास ठाऊक! त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात केलेले विकासाचे राजकारण लोक सोयीस्कररीत्या विसरून बोलत का असतात हे समजत नाही. राष्ट्रीय राजकारणात शरद पवारांविषयी सापत्नभाव निर्माण करावयाला आपण मराठेच(म्हणजे मराठी भाषिक बरे का! नाहीतर लगेच शहाण्णव कुळ्यांवर संक्रांत यायची) जबाबदार आहोत असे मला स्पष्टपणे वाटते.

मराठी माणसाच्या अनेक गंमती आहेत. अर्धी चड्डी घालण्यावरून सुमार दर्जाचे विनोद करून घरातल्या सभा गाजवायच्या आणि पडले की कोणी विचारण्याआधीच बाहेरून पाठिंबा द्यायचा आणि म्हणायचे राज्याला स्थिर सरकार हवे म्हणून दिला. अजूनही उद्धव ठाकरे भाजपला सामील झाले तरी ह्यांची अवस्था बिकट होईल हे सांगायला तज्ञांची आवश्यकता नाही. Proud

ह्म्म्म तुम्ही म्हणता त्याप्रमाणे साकल्याने विचार करू पहाता मुद्दा बरोबर आहे,
जे चालले आहे ते पाहून मनाला यातना होत आहेत, Sad

मराठी माणसाची एक गंमत आहे. त्याला शरद पवारांना महा बिलंदर, कपटी, धूर्त असे म्हणण्यात काय आनंद मिळतो कुणास ठाऊक! त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात केलेले विकासाचे राजकारण लोक सोयीस्कररीत्या विसरून बोलत का असतात हे समजत नाही. राष्ट्रीय राजकारणात शरद पवारांविषयी सापत्नभाव निर्माण करावयाला आपण मराठेच(म्हणजे मराठी भाषिक बरे का! नाहीतर लगेच शहाण्णव कुळ्यांवर संक्रांत यायची) जबाबदार आहोत असे मला स्पष्टपणे वाटते > +१००

कालच झालेल्या चर्चेत Wink काही लोक अडानीच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करा आणि त्याने दिलेल्या परताव्यावर बोला म्हणत होते . पवारांनी आडनाव बदलुन अंबानी अडानी घ्यावे Biggrin

राजकारण करताना त्यांनी खेळ्या करू नयेत अशी अपेक्षा आजचा माणूस करत आहे हे बघून मला हसू येत आहे. निदान काय करायचे ह्या संभ्रमात तरी निवडणुक निकालानंतरचा एक महिना त्यांनी घालवलेला नाही. काही म्हणा, बाळासाहेबांच्या नंतर कुठलीच सेना लढाईची नुसती तयारीसुद्धा करू शकणार नाही... प्रत्यक्ष लढायचे बाजूला राहू द्या.

दिदे,

अदाणींच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करा असं कुठेही म्हंटलं नाहीये मी. तो सिद्ध करा एव्हढीच भूमिका आहे माझी. मग खुशाल बडवा त्यांना.

आ.न.,
-गा.पै.

Pages