आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ओनामा

Submitted by वरदा on 3 February, 2014 - 02:32

ओनामा

शेवटी एकदाची आमची दुक्कल मुक्कामाच्या ठिकाणी पोचली. मी आणि माझी सखी. काम माझं. ती सोबतीला. कारण माझ्यापेक्षा ती अनुभवी म्हणून. सकाळी पाचची एस्टी पकडलेली. झोप काढावी असं खरंतर डोक्यात होतं पण दोघींच्या धावपळीच्या वेळापत्रकातून बरेच महिन्यांनी निवांत मोकळा वेळ मिळालेला तेव्हा प्रवासभर अखंड टकळी सुरू होती - इतके दिवसांच्या साठलेल्या गप्पा, गॉसिप, पुस्तकं अन् काय. शिवाय माझ्यासाठी सगळ्यात मोठ्ठी एक्साइटमेन्ट म्हणजे माझ्या संशोधनाच्या फील्डवर्कचा ओनामा.
पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थीदशेपासूनच फील्डवर्क काही नवं नाही. शिक्षकांबरोबर उत्खननात भाग घेतला आहे, सीनियर मित्र-मैत्रिणींच्या विविध विषयातल्या संशोधनात, त्यासंबंधीच्या भटकंतीत भाग घेतला आहे. पण तेव्हा उमेदवारीच्या रोलमधे असल्याने फक्त जमेल तितकं काम करायचं एवढंच शिकलेय. संकल्पना, आखणी, नियोजन आणि प्रत्यक्ष फील्डवरची भटकंती स्वतःने करायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे पहिलटकरणीच्या मनात असतं तसं एक्साईटमेन्ट, उत्सुकता, आपल्याला नक्की जमेल की नाही याची साशंकता, कामाच्या पसार्‍याचं दडपण असं बरंच काही आलटून पालटून वाटत होतं. सखी माझ्या आधी काही वर्षं मैदानात उतरल्याने हिंडण्याफिरण्यात अनुभवी. तिचा विषय वेगळा, शोधवाटा वेगळ्या, पण निदान पहिले काही दिवस तरी ती असणार आहे. एकदा सवय झाली, बावरलेपण गेलं की मग पुढची ४-५ वर्षं 'अ‍ॅकला चलो रे...' ची कास धरायची.

माझ्या संशोधनाचा हा अगदी प्राथमिक टप्पा आहे. महाराष्ट्रातल्या आद्य वसाहतींच्या मागावर मी आहे. सुमारे ४००० वर्षांपूर्वी उदयाला आलेली या ताम्रपाषाणयुगीन काळातली ही छोटी छोटी गावं दख्खनच्या पठारावर सर्वत्र पसरली होती. या अशा गावांची अनेक उत्खननं झालीयेत, त्यांचे अहवाल जगात नावजले गेलेत खरे, पण अजूनही दख्खनच्या पठारावरच्या अनेक भूभागांत संशोधन व्हायचं राहिलंय. या वसाहती तिथे होत्या का त्याचा शोध अजून अपूर्ण आहे. त्यातलाच एक भूभाग मी या प्रकल्पात पिंजून काढायचा ठरवलाय. हातात आहेत जवळजवळ ९५०० चौरस किमी, ९००च्या वरती गावं आणि ४-५ वर्षं. सगळी गावं पहाणं अर्थातच शक्य नसतं/ नाही. मग पुरातत्वशास्त्रातल्या नमुनाचाचणी आणि सर्वेक्षणाच्या पद्धतींमधे या विशिष्ट संशोधनाच्या गरजांप्रमाणे थोडाफार बदल करून सुमारे एक पंचमांश गावं पहायची ठरलीत. पण अजून तरी हे फक्त कागदावर नाचवलेले घोडे आहेत. अर्थात हे घोडे नाचवायलाही काही महिने खर्ची पडलेत. असंख्य वेळा असंख्य प्रकारचे नकाशे, गॅझेटीअर्स, सेन्सस, कलोनियल रेकॉर्ड्स, ग्रामसूची, गूगल अर्थ, या भागावर लिहिलं गेलेलं सर्व प्रकारचं लेखन, संशोधन, अगदी आधुनिक मराठी साहित्यही पालथं घातलंय. आणि मग काळजीपूर्वक गावांची एक संभाव्य यादी केलीये. त्यात प्रत्यक्ष काम करताना अनेक बदल होतील ही शक्यता लक्षात घेऊन लवचिकताही ठेवलीय. मग या भूभागाचे ३-४ भाग पाडून एकेका टप्प्यात त्या त्या भागातल्या मोठ्याशा गावात/ शहरात राहून आसपासचा प्रदेश तपासायचा असं ठरलंय. पण याही आधी एक टप्पा असतो तो म्हणजे आतापर्यंत पूर्वसूरींनी नोंदवून ठेवलेल्या पुरातत्वीय स्थळांना भेट देणे. आढावा सर्वेक्षण. आज त्या स्थळाची काय अवस्था आहे, तिथे नक्की काय अवशेष मिळतात, आधीच्या नोंदी कितपत बरोबर आहेत हे सगळं तपासून बघणे. यात महाराष्ट्रच नाही तर या भूभागाला लागून असलेल्या शेजारी राज्यातल्याही काही गावांना भेट द्यायचा बेत आहे. असो.

तर गाव तालुक्याचं. बर्‍याशा म्हणाव्या असं देवस्थानचं. त्यामुळे रहाण्याची ठीकठाक सोय आहे. बादरायण ओळखीतून एका काकांशी संपर्क झाला होता. त्यांनी अतिशय आपुलकीने आमची जबाबदारी घेतली आहे. खात्रीच्या लॉजमधे आमच्यासाठी एक खोली राखून ठेवली आहे. आम्हाला पोचेपोचेतो ११-११|| झाले. हातपायतोंड धुवून जरा बसेपर्यंत काका आलेच. त्यांना वाटलं की आज आमचा विश्रांतीचा दिवस. देवळात दर्शन करवून घरी जाऊन जेवायला घालायचा बेत होता. पण आम्ही तो तातडीने हाणून पाडला. आम्हाला लगेचच काम सुरू करायचंय म्हणून. गर्दीने ओसंडणार्‍या देवळात चांगलं रांगेशिवाय निवांत दर्शन होत असतानाही या नतद्रष्ट पोरी नाही म्हणताहेत असंही कदाचित काकांना वाटलं असेल. पण आमचा नाईलाज होता. पैसा आणि वेळ याच्या काटेकोर मर्यादा आहेत. हातात असलेल्या प्रत्येक दिवसाचा बेत आधीच ठरला आहे. कुठल्या दिवशी कुठल्या गावांना जायचं, काय करायचं हे नक्की आहे. मनाने असंख्यवेळा या गावांमधे हिंडून आलेय. आता फक्त सदेह तिथे जाऊन पडणंच काय ते बाकी आहे!

गावांना भेट देऊन संशोधन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? हा प्रश्न मला घरीदारी कायमच विचारला जातो. तर मुळात मी शोधतेय पांढरीची टेकाडं. पांढरीचं टेकाड म्हणजे जुन्या वस्तींचे अवशेष एकावर एक साचून तयार झालेली उंचवट्याची जागा. अशा जागेत खापरं, हाडं, विटा, दगडाची/ गारगोटीची हत्यारं, मणी असं बरंच काय काय मिळतं. साधारणपणे इ.स. ९व्या - १०व्या शतकांनंतरचे अवशेष तर वीरगळ, शिल्पं, मंदिरं अशा वेगवेगळ्या स्वरूपात बहुसंख्य गावात आढळतात. पांढरी म्हणजे वसाहत आणि काळी म्हणजे शिवार-शेतजमीन अशी बहुतेक मराठी गावांमधे विभागणी असतेच. पण गावपांढरी म्हणजे आजची वस्ती आणि जुनी पांढरी, पांढरीचं टेकाड म्हणजे सहसा ऐतिहासिक-पुरातत्त्वीय अवशेषस्थळ असतं. मी या पांढरीच्या जागा तपासते. तिथे मिळणार्‍या अवशेषांवरून त्या पांढरीचं वय ठरवते. यात सगळ्यात महत्वाची ठरतात ती खापरं - मातीच्या फुटक्या भांड्यांचे तुकडे. पूर्वीच्या काळी धातूच्या भांड्यांपेक्षा मातीच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात होता. ही भांडी करायला सोपी, धातूपेक्षा कमी मूल्यवान आणि भंगुर असल्याने कुठल्याही पुरावशेषांमधे खापरांचं संख्यात्मक प्रमाण सर्वात जास्त असतं. शिवाय जगभर प्रत्येक संस्कृतीत, कालखंडात आणि प्रदेशात वेगवेगळी खापरे वापरली जात. एकासारखे दुसरे मिळत नाही. ती खापरे त्या त्या काळाची आणि संस्कृतीची निदर्शक असतात. इतक्या दशकांच्या संशोधनानंतर भारतातल्या सर्व भागांत कुठल्या काळात कुठली खापरं बनत असत याचं ज्ञान संकलित झालेलं आहे. मी ज्या वसाहती शोधतेय त्यांच्याकडे फक्त मातीची भांडी असत. लाल गेरु रंगावर काळ्या रंगाची सुंदर नक्षी काढलेली. तशी भांडी परत काही कधी महाराष्ट्रात बनली नाहीत. त्यामुळे माझं काम सोपं असणार आहे. रंगीत नक्षीदार खापरं शोधायचं.

तर निघाले गाव क्र. १ ला. गाव तसं तालुक्याच्या जवळच. जिल्ह्याकडे जाणार्‍या मोठ्या रस्त्यावर. थोडी पोटपूजा करून एस्टीस्टॅण्डवर येऊन टमटम पकडली आणि १५-२० मिनिटांत गावात पोचलो. १९६०च्या दशकात अभ्यासकांना इथून ताम्रपाषाणयुगीन खापरं मिळाली होती. तेव्हा आज तिथे कायकाय मिळतंय पहायला निघालो होतो. एका बर्‍याश्या ओढ्याच्या काठावर माळरान-मुरमाड जमिनीवर गाव. तो ओढा पुढे जाऊन तालुक्यापासून वहाणार्‍या मोठ्या नदीला मिळतो. गावात एक छोटंसं देवस्थान नुकतंच उदयाला यायला लागलंय.
जडशीळ पाठपिशवी घेऊन गावाच्या थांब्यावर उतरलो तेव्हा टळटळीत दुपार झालेली. पाठपिशवीत नोंदणीवही-पेन, मार्कर, मोजपट्टी, होकायंत्र, कॅमेरा, खापरं गोळा करायला मांजरपाटाच्या पिशव्या, नकाशे आणि थोडे तहानलाडू भूकलाडू. नवशिकी असल्याने फसफसून उतू जाणार्‍या उत्साहात आधी कुणाची तरी ओळख काढून मग जावं हे लक्षात आलं नव्हतंच. हमरस्त्यावर असल्याने थांब्यापाशी काही पान-विडीकाडीची दुकानं, चहाच्या टपर्‍या वगैरे. डिसेंबर असला तरी उकाडा आणि ऊन जाणवत होतं. त्यामुळे ही दुकानंसुद्धा पेंगुळलेली होती. शिवाय इथे वाटसरू, ट्रक-टेम्पो ड्रायव्हर यांचा राबता जास्त. तेव्हा तिथे न रेंगाळता चटचट पाय उचलून गावात शिरलो.
गावात एकदम सामसूम. शाळा, पंचायत कुठेशी आहे सांगायलाही कुणी नाही. काही पोरंटोरं लांबूनच टकमक बघत होती, कोण पाहुण्या आल्यात म्हणून. पण काही विचारायला गेलं की लांब पळत होती. थोड्या शोधाशोधीनंतर शाळा आणि पंचायत सापडल्या. दोन्हीला मोठ्ठं टाळं. एका पोराने शिक्षक बाहेरगावचे असल्याने सकाळच्या शाळेनंतर परत गेलेत अशी ज्ञानात भर टाकली आणि परत एकदा लंगडी घालत सायकलचं चाक फिरवत कोपर्‍यावरून वळून निघून गेला. एक दोन माणसं दिसली पण पंचायतीतल कुणी भेटेल का विचारल्यावर आम्हाला वरपासून खालपर्यंत न्याहाळत निघूनच गेली. अशीच ५-१० मिनिटं गेल्यावर २-३ बायका दिसल्या. आम्ही कोण याचीच चौकशी करायला तावातावाने आल्या होत्या. त्यांना जरा तपशीलात सांगितलं. इतिहाससंशोधक आहोत. जिल्ह्याचा इतिहास लिहितेय. तेव्हा गावाची माहिती घ्यायला आलीये.

एकुणात दोन्ही बाजूंनी प्राथमिक बोलणी झाल्यावर मी मुद्याला हात घातला. मी ज्या काळची पांढरीची टेकाडं शोधतेय ती सहसा गावाबाहेरच मिळाल्याचं आधीचे अहवाल सांगतात. त्यातली काही स्थळं पाहिली आहेतच. हे पाठ्यपुस्तकी ज्ञान डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे जेव्हा त्या बायकांनी असं कुठलंही टेकाड गावाच्या आसपास पंचक्रोशीत नाही असं सांगितल्यावर एकदम गडबडायलाच झालं. मग वर्गातल्या नोट्समधला प्रश्न क्र.२ - घरं सारवायला माती कुठून आणता? (पांढरीची माती जशी खत म्हणून उत्तम, तशीच ती उपयोगी पडते मातीची घरं सारवायला. गावोगाव सिमेंटची घरं सर्रास बांधायला सुरवात झाली त्याच्या आधी हीच माती सारवण म्हणून, डागडुजी करायला म्हणून वापरली जात असे! कारण या मातीत एक चिकटपणा असतो आणि त्याने मातीच्या घराच्या भिंती जास्त टिकतात..) त्या म्हणल्या - ही काय गावातनंच की. रस्ता उकरून नाहीतर पलिकडच्या बखळीतून. आधी वाटलं थट्टा करतायत की काय. कारण अजूनही मी वर्गातल्या शिकवण्यात, आधीच्या संशोधकांच्या अहवालात आणि मी पाहिलेल्या इतर ताम्रपाषाणयुगीन स्थळांच्या अनुभवांत अडकले होते. पाठ्यपुस्तकं, वर्गातलं शिक्षण, इतरांचे अनुभव याचा आणि प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर दिसणार्‍या वास्तवाचा काही संबंध असलाच पाहिजे असं नाही. खरंतर बरेच वेळा तो नसतोच. अगदी एकाच भूभागातली एकाच काळातली पुरातत्वीय स्थळं वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात हे पुस्तकातच शिकलेलं पण नंतर सोयीस्कररीत्या विसरलेलं तत्व आठवलं. स्वतःच्या संशोधनाची कार्यपद्धती स्वतःलाच नव्याने बसवायला लागते. इतरांच्या पद्धती जशाच्यातशा लागू पडत नाहीत. हे नीटच उमगलं. डोक्यातली ही चक्रं फिरेपर्यंत काही क्षण गेले. तोपर्यंत अनुभवी सखीने 'अगं पांढर गावाखालीच असणार गं. असतं असं पण.' असं ज्ञानदान केलंच होतं. मग जरा आसपास परत नीट निरखून पाहिलं. खरंच की! गावाखालचा पांढरीचा उंचवटा, मातीचा फिकट पांढुरका रंग, जुन्या बखळीत उकरलं होतं तिथून डोकावणारे विटांच्या भिंतींचे मध्ययुगीन अवशेष असं सगळं दिसायला लागलं. आत्तापर्यंत पाहिलेल्या पांढरींवर वस्त्या नव्हत्या, त्यामुळे हा अनुभव नवाच आहे. जुन्या पांढरीवर गाव असलं की फार अडचणीचं असतं. कारण खाली काय आहे याचा पत्ता लावणं अवघड होतं. कुठेतरी गावात खोदकाम चाललं असेल तर थोडासा अंदाज येतो, पण असं खोदकाम करताना आपण तिथे हजर असणं हा एक दुर्मिळ योग असतो. नाहीतर मग कुठेतरी थोडीशी मोकळी जागा असेल तर खापरं दिसतात, पांढरीत काय दडलंय त्याचा अंदाज येतो. त्या बायका म्हणल्या एका ठिकाणी अशी खापरंबिपरं दिसतात पण तिथे तुम्ही कशा जाणार?' 'का बरं?' अवो, गावचा उकीरडा-हागंदारी हाय थितं... म्हटलं असूद्यात. बघू तर खरं. मग आमचा मोर्चा तिकडे वळला. हळूहळू गावात आम्ही आल्याची बातमी पसरायला लागली होती. लोकांची दुपारची विश्रांती संपल्यामुळे आयत्या करमणुकीसाठी सगळे जमायला लागले. प्रत्येक जण गटागटाने येऊन तेचतेच प्रश्न विचारत होते. प्रत्येक वेळा तीच उत्तरं देऊन अक्षरशः फेस आला. कितीही वैताग आला तरी चिडून बोलायची सोय नव्हती. आमचा वैताग त्यांना स्पष्ट दिसत होता आणि त्यामुळे तमाम जनतेची आणखीच करमणूक होत होती. उकिरडा गावाच्या एका कडेला, ओढ्याला लागून. सगळ्या कुजलेल्या कचर्‍याचा, घाणीचा वास भरून राहिला होता. पुढे पुढे या उकिरडे फुंकण्याला मी कितीही निर्ढावले असले तरी पहिल्या वेळेला कसंतरीच वाटत होतं. डोकं भणाणलं होतं. हातात झाडाची एक बरीशी काटकी. पायाखालच्या गोष्टी चिवडून खापरं शोधायला.
एक पाच मिनिटात हे सगळं विसरायला झालं कारण पायाखाली भरपूर खापरं दिसायला लागली होती. बहुतेक सगळी मध्ययुगीनच होती. पण स्वतःला काहीतरी मिळतंय याचा थरार केवळ अफलातून होता. जवळ जवळ अर्धा तास तिथे हिंडून खापरं वेचली. हे सगळं बघायला ही गर्दी जमलेली. अजून प्रश्नोत्तरांचं सत्र संपलं नव्हतंच. आम्ही आता एकीकडे यांत्रिकपणे उत्तरं देत होतो. तरण्या पोरांनी अगदी उघड टिंगलटवाळी करायला मनसोक्त सुरुवात केली होती. म्हातार्‍याकोतार्‍या आम्हाला 'चांगल्या घरातल्या सवाष्ण पोरीबाळींनी अशी घाणीत उतरण्याची कामं करू नयेत. चांगल्या नोकर्‍या कराव्या' असे सल्ले देत होत्या. तेवढ्यात तिथे एक म्हातारबाबा पोचले. त्यांनी एकूण रागरंग पाहिला आणि सगळ्यांना एका फटक्यात गप्प केलं. आमची (परत एकदा) विचारपूस झाली. एका शाळकरी पोराला ग्रामपंचायतीच्या शिपायाला असेल तिथून शोधून आणायचं फर्मान सुटलं. त्यांच्या शेतातही पांढरीचा काही भाग पसरलाय. तो दाखवायला म्हणून ते आम्हाला घेऊन गेले. आजच्यापेक्षा पूर्वी गावाचा विस्तार मोठा होता असं दिसलं. त्यामुळे पांढरीच्या एका टोकावर गावालगत शेती आहे. इतके वर्षं शेती करूनही अजून तिथे थोडीफार खापरं सापडतात. पुढचा तासभर उभ्या पिकाला सांभाळत दीड एकराचा प्रत्येक इंच आणि इंच पालथा घातला. १५-२० खापरं मिळाली. त्यातली दोन सातवाहनकालीन होती - म्हणजे सुमारे २००० वर्षांपूर्वीची. पण त्याआधीचे अवशेष मात्र हाती आले नाहीत. ज्यांनी प्रथम नमूद केले त्यांची नोंद विश्वासार्ह होती पण चाळीस वर्षांनंतर तिथे इतका जुना पुरावा मिळत नाहीये हेच खरं. मनातल्या मनात गावाच्या नावावर फुली पडली. इतकं हिंडून जीव तहानला होता. म्हातारबाबांनी भावजयीला सांगून चहा पाजला. हे सगळं चालू असताना पंचायतीचा शिपाई पण आमच्यात सामील झाला होता. अत्यंत भला माणूस होता. त्याने गावाची सगळी व्यवस्थेशीर माहिती दिली. आमच्या तांत्रिक मोजमापांमधे पण मदत केली.

यानंतर कूच केलं गावातल्या मंदिराकडे. दोन देवळं आहेत. एक पडकं. यादवकालीन. छत आणि बहुतेक भिंती गायब आहेत. लोकांनी दगड काढून घराच्या बांधकामात वापरले हे स्पष्टच दिसत होतं. आत कुठलीही मूर्ती नाही. याला लागूनच उलट्या दिशेला तोंड करून एक उत्तर पेशवाई कालीन देऊळ. आत विष्णुची यादवकालीन अतिसुबक आणि देखणी मूर्ती. पाहिल्यापाहिल्या मन प्रसन्न करणारी. देवळासमोर एका कडेला जुन्या मंदिराचे अवशेष, कळसाचा आमलक असं काहीबाही रचून ठेवलेलं. शेजारी २-३ वीरगळ आणि विष्णुच्या देवळाला टेकून ठेवलेला एक झिलई येईपर्यंत घासून गुळगुळीत केलेला आयताकार पंचकोनी दगड. त्याच्या डोक्यावर चंद्र-सूर्य, सवत्स धेनू आणि शिवलिंग अगदी सुबकपणे कोरलेलं. पण बाकी काही नाही. सपाट. कुठल्यातरी दानाची नोंद करायला शिलालेख कोरायची तयारी केली होती. काहीतरी अघटित घडलं म्हणा, राजाची/अधिकार्‍याची मर्जी फिरली म्हणा, यावच्चंद्रदिवाकरौ राहील असं दान द्यायचा बेतच रद्द झाला. पण असं काही होणार होतं हे सांगणारा हा मूक साक्षीदार दगड.
F1220025_0.JPG

या सगळ्याची तपशीलवार छायाचित्रं काढली. आलेच आहे तर सगळ्याच अवशेषांची नोंदणी करून घेतली. एकतर इथे परत यायची शक्यता कमी आणि इतरांनी कुणी या नोंदी अजून केलेल्या नाहीत. देवळाच्या पायर्‍यांवर निवांतपणे बसून महत्वाच्या मुद्यांची टिपणं लिहिली. तांत्रिक नोंदी संगतवार लिहिल्या. पूर्ण तपशीलवार अहवाल रात्री लिहिला जाईलच पण इथे पण ही टिपणं करून घेणं आवश्यक आहे. ताम्रपाषाणयुगीन अवशेष मिळाले नाहीत तरी बाकीच्या अवशेषांनी गावाचा इतिहास सांगितलाच होता. किमान २००० वर्षांपासून वसलेलं हे गाव पिढ्यानुपिढ्या शतकानुशतकं इथेच असंच उभं आहे. यादवकाळात बर्‍यापैकी भरभराटीला आलेलं हे गाव आज मात्र आसपासच्या इतर गावांसारखंच एक अनाम खेडं होऊन राहिलंय. इतिहासाच्या विस्मृतीची चादर पांघरून.

इतकं सगळं होईपर्यंत चारसाडेचार वाजले होते. दिवसाउजेडी मुक्कामाच्या ठिकाणी पोचणं कधीही चांगलं. तेव्हा परतीची वाट धरणं भाग होतं. म्हातारबाबांचा निरोप घेतला. पंचायतीचा शिपाई थोडा वेळ आधीच सरपंचाचं काहीतरी काम होतं म्हणून निघून गेलेला. म्हातारबाबा घराकडे निघून गेल्यागेल्या तरण्यापोरांची टवाळकी परत चालू झाली. बाकी सगळे त्यांच्याकडे निर्लेपपणे दुर्लक्ष करत होते. आम्हीही तितक्याच निर्लेपपणे दुर्लक्ष करून हमरस्ता गाठला. तेवढ्यात एस्टी आलीच आणि अर्ध्या तासात मुक्कामाला खोलीत परतलो.
हवं ते गवसलं नाही हे ठीक आहे पण स्वतंत्र संशोधनाचा ओनामा अगदीच काही वाईट झाला नाही. निदान जे मिळालं त्याचा संगतवार अर्थ लावू शकले याचा अपार आनंद झाला होता. पहाटेपासून असलेला अ‍ॅड्रेनेलिन रश आता संपला होता. त्यामुळे एकदमच शिणवटा आला होता. कसाबसा अहवाल लिहून संपवला. जेवण केलं. उद्याची तयारी केली. आणि आज नाही तरी उद्या नक्की यश मिळेल अशी स्वप्नं पहात झोपेच्या आधीन झाले.

(हा लेख माहेर दिवाळी अंक २०१२ मधे प्रकाशित झालेल्या लेखाचा पूर्वार्ध आहे. इथे त्याची 'अनकट व्हर्शन' देत आहे. उत्तरार्धासाठी दैनंदिनीचा भाग ४ बघा. पुनर्प्रकाशित करायची परवानगी दिल्याबद्दल माहेर संपादक मंडळाची आभारी आहे. हा लेख नंतर लिहिला गेल्याने आधीच्या तीन भागांमधल्या काही मजकुराची पुनरावृत्ती झाली आहे. ती दूर करायचा शक्यतोवर प्रयत्न केला आहे. तरी काही राहून गेले असल्यास 'अधिक ते सरते' करून घ्या ही विनंती)

पुढील भागः
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी १
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी २
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी ३
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

किती? २००० वर्षं?? वॉव! भरूनच आलं एकदम! इतक्या वर्षांचा मानव जातीचा जीवनसंघर्ष आपल्या पायाखाली घेऊन वावरतोय असं वाटलं! And still going strong! Hats off to my beloved motherland!
वरदा, खूप खूप धन्यवाद! आज काही कारणांमुळे खूप लो वाटत होतं! हा लेख वाचून मनाला खूप उभारी आली आहे! लगे रहो! तुझ्या संशोधनाला भरपूर आणि मनाजोगं यश लाभू दे!

वरदा, वाचायला घेतल्यावर लक्षात आले, आधी हे वाचले आहे. माहेरमधेच वाचला होता, परत वाचायलाही आवडला, खूप सुंदर.

मी पण वाचला होता, तरी परत वाचावासा वाटला.
तूमच्या संशोधनात लोकांच्या मुलाखती नसतात का ? एखादे घराणे पिढ्या न पिढ्या तिथेच राहिले असे कधी आढळले का ? मराठी लोकांत आमचे मूळ गाव अमूकतमूक असे फार वेळा ऐकण्यात येते पण आम्ही इथलेच असे सांगणारे फार थोडे.

अतीशय सुंदर लेख.

फील्डवर्क करतानाची तळमळ, कष्ट, येणार्‍या समस्या आणि त्या सोडवून आपलं साध्य साधण्याची धडपड, सगळं पोचलं.

सुंदर लेख!!
फील्डवर्क करतानाची तळमळ, कष्ट, येणार्‍या समस्या आणि त्या सोडवून आपलं साध्य साधण्याची धडपड, सगळं पोचलं. >> +१
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी १ खूप आवडला होता. निवडक १० मध्ये पण होता :).