चविष्ट 'बर्फी' (Barfi - Review)

Submitted by रसप on 15 September, 2012 - 02:55

एक सरदारजीचा विनोद ऐकला होता.
युद्धात सरदारजीच्या युनिटला शत्रू चहूबाजूंनी घेरतो. हे समजल्यावर सरदारजी म्हणतो.. 'मस्तच की! आता आपण कुठल्याही दिशेने हल्ला करू शकतो!'
खरं तर हा मला कधीच विनोद वाटला नव्हता. प्रतिकूल परिस्थितीतही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवणे, काही तरी सकारात्मक शोधणे/ बोलणे; हे ज्याला जमलं तो खरा जिंकला, असंच मला नेहमी वाटत आलं आहे. आणि अश्या हारकर जितनेवाले को बाजीगर-फिजीगर म्हणत नसतात, त्याला 'बर्फी' म्हणत असतात..!

'बर्फी' चं कथानक साधारणत: तीन कालखंडात विभागलेलं आहे. १९७२, १९७८ व आसपासचा काही काळ आणि मग थेट आज.
१९७२. 'श्रुती घोष' (इलिएना डि'क्रुझ), तीन महिन्यांवर लग्न ठरलेलं असताना दार्जीलिंगला येते आणि इथे तिची ओळख होते 'बर्फी' (रणबीर कपूर) शी. नेहमीच हसतमुख असणारा चुलबुला बर्फी मूक-बधीर असतो. ह्या मैत्रीचं रुपांतर नकळतच प्रेमात होतं. श्रुतीचं ठरलेलं लग्नही 'प्रेमविवाह'च असतो पण तरीही 'बर्फी'कडे आकर्षित होण्यापासून ती स्वत:ला रोखू शकत नाही. दार्जिलिंगमधील एक प्रतिष्ठित श्रीमंत चटर्जी (आशिष विद्यार्थी) ह्यांच्या वाहनचालकाचा एकुलता मुलगा बर्फी अर्थातच आर्थिकदृष्ट्या हलाखीत असतो. श्रुती आणि स्वत:मधील हा जमीन-अस्मानाचा फरक ओळखून तो स्वत:च तिला तिचं ठरलेलं लग्न करून सुखी राहाण्याचे पटवतो आणि तिच्या आयुष्यातून दूर जातो.
दुसरीकडे, चटर्जीची ऑटिस्टिक मुलगी झिलमिल (प्रियांका चोप्रा) - जिला तिच्या घरजावई वडील व व्यसनाधीन आईच्या जाचापासून दूर एका रेस्टहोममध्ये तिच्यावर भरपूर माया करणाऱ्या तिच्या गर्भश्रीमंत आजोबांनी ठेवलेलं असतं - परत दार्जिलिंगला येते कारण आजोबा शेवटच्या घटका मोजत असतात. झिलमिल आणि बर्फी लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा बर्फी झिलमिललाही बाकी दुनियेपेक्षा जास्त 'विश्वासू' वाटत असतो. आजोबा मरण्यापूर्वी सर्व मालमत्ता झिलमिलच्या नावाने एका ट्रस्टमध्ये ठेवून, झिलमिलच्या वडिलांना पगारदार नोकर म्हणून नियुक्त करतात. चवताळून उठलेला चटर्जी सासऱ्याच्या मृत्यूनंतर सर्व नोकरांना हाकलून देतो. बर्फीच्या वडिलांचीही नोकरी जाते आणि परिस्थिती अजूनच हलाखीची होते. दुष्काळात तेरावा महिना यावा तसं ते गंभीर आजारी पडतात आणि उपचारासाठी बऱ्याच पैश्यांची ताबडतोब गरज निर्माण होते.
ह्यानंतर बर्फी जे काही करतो, त्यामुळे तो एका विचित्र कोंडीत फसतो. एकीकडे कायदा आणि दुसरीकडे एक भावनिक बंध.. अश्या द्विधेत तो असताना परत एकदा श्रुतीशी त्याची भेट होते. पुढे काय होतं, कसं होतं हे 'बरंच काही' आहे. त्यासाठी सिनेमाच पाहायला हवा.

Barfi-watch-online.jpg

ही कथा मांडताना अनेक आव्हानं होती, असं मला जाणवलं -
१. गुंतागुंतीचं कथानक.
२. बऱ्याच मोठ्या कालखंडातील घटनाक्रम
आणि सगळ्यात महत्त्वाचं -
३. दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा संवादरहित.
पैकी आठवणींतून उलगडत जाणाऱ्या (Flashback) मांडणीमुळे पहिल्या दोन आव्हानांना दिग्दर्शक अनुराग बसूने आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तिसरं आव्हान अनुराग, रणबीर आणि प्रियांकाने मिळून व्यवस्थित पेललं.
ऑटिस्टिक व्यक्तीचं काम म्हणजे फक्त चेहरा मख्ख ठेवून, कबुतरासारखी मान हलवून आणि लाकडासारखं कडक होऊन चालून वावरणं नाही हे प्रियांकाचा अभिनय पाहिल्यावर शाहरुखला कळावं. (संदर्भ - माय नेम इज खान)
आत्तापर्यंतच्या मोजक्याच सिनेमांतून रणबीरने जी परिपक्वता दाखवली आहे, त्याला तोड नाही. एकाही, अगदी एकाही दृश्यात तो 'रणबीर' वाटत नाही. तो फक्त आणि फक्त 'बर्फी'च वाटतो. दु:ख, हताशा, विनोद, निरागसता अश्या वेगवेगळ्या छटांनी सजवून तो बर्फी असा काही आकर्षक रंगवतो की शारीरिक अपंगत्व, आर्थिक डबघाई, गुन्हेगारी बट्टा असं सगळं असतानाही एखाद्या सुशिक्षित सुसंस्कृत लग्न ठरलेल्या/ झालेल्या स्त्रीने त्याच्यात गुंतणं अजिबातच आश्चर्यकारक वाटत नाही.
नवा चेहरा 'इलिएना डि'क्रुझ', खूपच आशादायक आहे. तिचाही वावर अगदी सहज आहे आणि चेहऱ्यात एक मिश्कील गोडवा आहे.
इतर अभिनेत्यांमध्ये सौरभ शुक्लाचा पोलीस उपनिरीक्षक 'दत्ता' खूप प्रभावशाली. त्याची आणि बर्फीची काही दृष्यं खसखस पिकवतात, काही खळखळून हसवतात आणि उरलेली मनाला स्पर्श करून जातात. अनेक ठिकाणी चार्ली चाप्लीन व मि. बीन छाप धमाल आहे.
'प्रीतम'चं संगीत अतिशय म्हणजे अतिशय कर्णमधूर आहे. 'इतनीसी हसी, इतनीसी खुशी..' हे गाणं तर मनात घर करतं.

जराशी धीमी गती, जी बहुतकरून भारतीय सिनेमांची असतेच, वगळता 'बर्फी' अगदी बरोब्बर गोडीचा आहे. दातात कळ येईल इतकी जास्त गोडही नाही आणि प्युवर साजूक तुपातली जिभेवर ठेवताच विरघळणारी बर्फी जर तुम्हाला आवडत असेल, तर 'बर्फी'ही आवडेलच.

रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/barfi-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रसप !!!!!
सिनेमातील प्रमुख दोन पात्रे , एक मूक-बधीर तर दुसरी ऑटिस्टिक असे असुन सुद्धा ३ तास लोकांना खिळवून ठेवले आहे.
रणबीर कपूर ला तर --^-- खुपच सुंदर अभिनय... मूक अभिनय सुद्धा किती बोलका केलाय..

रणजित - तुझ्या लेखामुळे उत्सुकता खूपच वाढलीये - प्रत्यक्षात पाहताना कळेलच - टिपिकल बॉलीवूड का खरंच काही आगळावेगळं आहे यात.....

लेखनशैली सुपर्ब....

ऑटिस्टिक व्यक्तीचं काम म्हणजे फक्त चेहरा मख्ख ठेवून, कबुतरासारखी मान हलवून आणि लाकडासारखं कडक होऊन चालून वावरणं नाही हे प्रियांकाचा अभिनय पाहिल्यावर शाहरुखला कळावं. (संदर्भ - माय नेम इज खान)

+ १००००००००

बंगाली गेट अपने मज्जा आणल्ये. इलिएन पण( अन् यमी गौतम - विकी डोनर) छान दिसते पण म्हातारपणीचा गेटअप विचित्र आहे ! चित्रपट बराच स्लो वाटला मधे. फिर ले आया दिल हे गाणं नाहीये का चित्रपटात? प्रियांकाने सुंदर अभिनय केलाय. रणबीर अन् प्रियांकाचा Vs रणबीर अन् इलिएनचा लॅप्म पोस्टचा टेस्ट सीन नीट पहा. फार बोअर झालं आणि भर पिक्चर मधून उठून जाणार होतो पण फिर ले आया दिल हे गाणं ऐकावं म्हणून थांबलो... अन् पुढच्या दहा मिनिटात पिक्चर संपला. गाणं नाहीच Sad

रणबीर , प्रियांका , इलिएन नी काम चांगलं केलयं तरी पण बर्‍याचवेळा सिनेमा बोर वाटतो, एवढा काही खास नाही.- इति मित्र.

आवडला Happy
पण कोणास ठाऊक का मी पुन्हा नाही पहाणार हा सिनेमा
म्हणजे कहानी, जिंनामिदो वैगेरे ५-५ वेळा पाहिलेले, तसा नाही वाटला....सिनेमा संपल्यावर काही तरी खुपत होतं मनात.
बाकी आईने मुलीला तिचा प्रियकर दाखवायला घेऊन जाणं ही कल्पना जशीच्या तशी "द नोटबूक" मधून उचलली असावी

बर्फी बघितला आणि खूप आवडला .. वर लेखात लिहीलेल्या सगळ्या बाबींनां पूर्ण अनुमोदन ..

आणखी एक गोष्ट म्हणजे आर्ट डायरेक्शन आणि सिनेंमॅटोग्राफीचंही विशेष कौतुक .. Happy

रणबिरसाठी पहायचाच होता... काल पाहीला...
रणबिर तर आवडलाच... पण जास्त लक्षात राहीला तो प्रियंकाचा अभिनय... सुपर्ब... ज्यांनी ज्यांनी नाही पाहिलाय त्यांनी प्रियंकासाठी नक्कीच पहा...
ईलिआनाही छान वाटली स्पेशली बंगाली गेट-अपमधे खासच...
मुव्ही पाहुन आल्यावर असं हावं होतं तसं हव होतं असं अजिबातच वाटत नाही... लक्षात राहतात फक्त प्रियंका नि रणबीर...

मी शनिवारीच पाहिला...खूपच सुंदर पिक्चर आहे.
रणबिर , प्रियांका च्या अभिनयाबद्द्ल ज्यांना शंका आहे त्यांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा!
संवादाशिवाय रणबिरचा शब्द न शब्द आपल्या पर्यंत पोहोचतो. रॉकस्टार मुळे रणबिर ला अभिनय जमतो हे कळाल तर बर्फी मुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं!
मस्त..! मला खूपच आवडला!

काल पाहिला.

रणबीर कपूर बघताना राज कपूर आणि चार्लि चाप्लिनची आठवण येत होती. Happy प्रियांकाने लूक्स आणि ग्लॅमर गोष्टी बाजूला ठेवून जे काही काम केलय त्याला तोड नाही. नविन एलीएना पण आवडली. दार्जिलिंगचा माहौल मात्र एकदम सही घेतलाय.

मला तरी चित्रपट खूपच आवडला. माझ्यातर्फे बर्फीला दहापैकी दहा मार्क्स.

खूऊऊप आवडला हा चित्रपट!
अफ्टर लाँग सम सेंसिबल मूव्ही हॅस कम..
छछोरपणा नाही, फालतू टिपी नाही, निष्पाप प्रेम खुलत जाणारी कथा... मस्त ट्रीट आहे
सेकंड हाफ मधे, फ्लॅशबॅक आणि प्रेझेंट ह्याचा मेळ घालताना दमछाक होते नक्की, पण य्स्स, दी ट्रायो रॉक्ड!
उत्तम अभिनय पहायला मिळाला म्हणून मी दिलखूष...

रसम, तुझा वृ नेहमीसार्खाच मस्ताय..
तो फक्त आणि फक्त 'बर्फी'च वाटतो. दु:ख, हताशा, विनोद, निरागसता अश्या वेगवेगळ्या छटांनी सजवून तो बर्फी असा काही आकर्षक रंगवतो>>> इथे आणि इथून पुढे सगळ्या वाक्यांना अनुमोदनच अनुमोदन, रणजित Happy

अंतर्मुख करणारा चित्रपट!
१०० मार्क अनुराग बसूला!
रणबीरपेक्षा एक मार्क जास्त प्रियांकाला!! Happy

अतिशय आवडला. चुकवू नये असाच चित्रपट.

लाईफ इन मेट्रोनंतर अनुराग बसूचा आवडलेला दुसरा सिनेमा.
मी रणबीरप्रेमी नाही, पण हा चित्रपट पाहील्यावर त्याचा फ्यान झालोय.
खरतर बर्फीच्या सगळ्याच टीमचं कौतूक.

'प्रीतम'चं संगीत अतिशय म्हणजे अतिशय कर्णमधूर आहे. 'इतनीसी हसी, इतनीसी खुशी..' हे गाणं तर मनात घर करतं.
<< अगदी अगदी.

चित्रपट पाहीलेल्या प्रत्येकाला 'बर्फी' व्हावसं वाटतं, हेच सिनेमाचं यश आहे.

मी पण रणबीर फ्यॅन नाही पण आता झालेय. Happy
प्रियांका उत्तम आहेत. ती नवीन हिरवीण पण खूप छान.

रणबीर बर्‍याच सीन्स मधे राजकपूरचा मेरा नाम जोकर सारखा वाटतो. पण भूमिका पूर्ण जगलाय.

काल बघितला. रणबीर कपूर रॉक्स.
वेक अप सिद पासून तो खूप आवडायला लागला. रॉकेटसिंग, रॉक्स्टार तसेच बर्फीतही खूप आवडला. सिनेमा मला मध्यंतरानंतर जरा सावकाश तिथल्या तिथेच फिरत राहीलेला वाटला. अजून अर्धा तास कमी करता आला असता.
प्रियंका आणि ती दुसरी मुलगी पण छान आहेत.

सर्व प्रतिसादकांचे आभार....
सिनेमा काही ठिकाणी खूप धीमा झाला आहे, हेही मान्य.. त्यामुळे काही लोकांना न आवडल्यास त्यात आश्चर्यकारक खरंच काहीच नाही.

रणबीर कपूर नक्कीच अतिशय चांगला अभिनेता आहे. वडिलांचे गुण त्याच्यात उतरले आहेत. आणि महत्त्वाचं हे की वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता त्याने आधीपासूनच विविध प्रकारच्या भूमिका करून प्रयोगशीलता जपली आहे म्हणूनच त्याच्यातील 'अभिनेता' इतक्या लौकर समोर आला आहे.

सिनेमा धीमा नाही. बर्फीच्या भावविश्वातले, आपण कधीही न ऐकलेले आवाज आणि झिलमिलचं एकूणच मूक आणि निष्पाप लहान मुलागतचं जगणं, जीव लावणं हे एखाद्या अ‍ॅक्शन किंवा नर्मविनोदी फिल्मच्या वेगाने मांडता येणे शक्य नाही. मांडलं तरी त्याचा तसा परिणाम होणार नाही.
सिनेम्याला एकूणच 'रेट्रो' लुक आणि फील असल्याने तो वेग न्याय्यही आहे.

रणबीर आणि प्रियंका ची acting मस्त.
पण फार स्लो आहे सिनेमा..
( संवादाशिवाय रणबिरचा शब्द न शब्द आपल्या पर्यंत पोहोचतो )+१

रणबीर कपूर नक्कीच अतिशय चांगला अभिनेता आहे. वडिलांचे गुण त्याच्यात उतरले आहेत >>>> तुम्हाल आजोबांचे म्हणायचे आहे का ?

Pages