चीन म्हणतो, भारत एक गलिच्छ देश!

Submitted by विजय आंग्रे on 24 July, 2012 - 04:18

भारतीय किती गलिच्छ आहेत हे सांगणारे फोटो आणि त्यावरील चीनमधील नेटीझनच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर प्रसिद्ध झाले आहेत. या लेखात एकीकडे भारताच्या धार्मिक मुद्द्यावर स्तुतीचे चार शब्द लिहिल्यानंतर येथील अस्वच्छतेबद्दल आणि गलिच्छपणाबद्दल मोठ्या प्रमाणावर राळ ओतली आहे. या लेखावर इंटरनेटकरांनी मोठ्या प्रमाणावर टीकाही केली आहे. काहींनी हे पक्षपाती, भारताबद्दल माहिती नसताना केलेले लेखन असे म्हटले आहे तर काहींनी हे फोटो खोटे असल्याचेही म्हटले आहे.

हे सर्व खरे आहे. एखाद्या परक्या देशाने 'माझ्या' देशाबद्दल असे काहीही म्हणणे, दाखवणे कोणालाही राग यावा असेच आहे. माझ्या निसर्गसौंदर्याने भरलेल्या आणि 'अतुलनीय' अशा देशाची फक्त वाईट बाजू दाखवणे हे वाईटच आहे. हा राग, चीड, उद्वेग सारेसारे मान्य केले आणि डोके थोडे शांतपणे ठेवून स्वतःला प्रश्न विचारला की, हे सारे खोटे आहे का? तर उत्तर नकारार्थी येत नाही. देशातील गलिच्छपणापुढे जर आरसा ठेवला तर त्यात याहून काही वेगळे प्रतिबिंब उमटणार आहे का?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या साईटची लिंक इथे देत आहे. पण ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर ते फोटो पहावेत.
---------------------------------------------------------------
तर यावर मायबोलीकरांच काय मत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजयजी,

भयंकर! खरंच!

चित्रे भयंकरच आहेत. (मी अलाहाबादला , काशीलाही, गंगाकाठी गेलो तेव्हा ही अशीच दृष्ये होती)

(माझ्यापुरते - चीनने हे असे म्हणणे, हे चूक नाही) Sad

हे फोटो बहुधा १०/१२ वर्षा पुर्वीचे असावेत आज काल प्रेत नदीत फेकायचे प्रमाण खुप कमी झाले आहे. बाकी जे घाण आहे ते आहे.

आपण घरी स्वच्छता पाळतो पण सार्वजनिक ठिकाणी अत्यंत घाण करतो. आजूबाजूचा परिसर अत्यंत घाणेरडा असतो. हे सत्य आहे. चित्रं अत्यंतच किळसवाणी आहेत.

विजय, जे सत्य आहे ते कुणीही दाखवले तरी सत्यच रहाणार आहे.
परक्या देशातल्या लोकांनी दाखवले तर 'परके असुन दाखवायचा काय अधिकार' असे म्हणणार. आपल्याच देशातल्या लोकांनी दाखवले तर 'भारतीय असुन आपल्याबद्दल असे वाईट बोलतात. भारतीय असण्याचा अभिमानच नाही ' इ. असे ऐकवले जाईल. शेवटी जे काही घाण / भयंकर आहे ते कुणी दाखावावेच लागतेय का? कुणी पॉइंट आउट केल्याशिवाय स्वतःहुन कधी आपल्याला ( एकुण भारतीयांना , अपवाद असतीलच) स्वच्छतेच्या सवयींबद्दल कळणारच नाही का?
असल्या पाण्यात जाऊन कसले पाप धुतले जाणार आहे? रोगराईच लागेल हे साधे सरळ दिसतेय पण तरी लोक थांबत नाहीत.
आपल्या देशात जे काही 'अतुलनिय' असेल ते तसे आहे याचा गौरव करत बसत वाईट गोष्टी बदलल्या नाहीत तर कोणी ना कोणी ते दाखवुन देतच रहाणार. त्यांचा निषेध वगैरे करायचा कि आपल्यात बदल करायचा हे आपण ठरवायचेय.

'गंगेत प्रेते का पडलेली असतात? लोकांना घाण वाटत नाही का? त्या तसल्याच पाण्यात लोक का जातात?' हे आणि असे अनेकानेक प्रश्न परदेशी लोकांना पडतात. ( आपल्या इथेच पडु नयेत हे वैषम्य) असल्या प्रश्नांना काय उत्तरे द्यायची आणि टाळंटाळ करत किती भारताचे गुणगान गात रहायचे हा ही प्रश्न आहे.

तटी. माझा हा प्रतिसाद इथे काही लोकांना आवडणारही नाहीये. पण हेच माझे मत आहे . ते कुणाला आवडावे यासाठी मी वाद घालणार नाही.

सावली, हि कळकळ अगदी पोहोचली.
आता आपली मानसिकता अशी झालीय कि एखादी स्वच्छ जागा बघितली (देऊळ, रस्ता, घर, नदी) तरच आपल्याला नवल वाटते !

चीन म्हणतो कारण ते त्याना दिसलय.
आपली सुधारण्याची इच्छा नाहिये. Sad
अजुनही काही खेड्यात सकाळचे विधी खुले आसमान के नीचेच..
सरकारी योजनेचा फायदा पोचला नाही की घेतला नाही देवच जाणे...

या धाग्यात जोरदार वाद निर्माण करायच Potential आहे Happy
थोड्याफार प्रमाणात दोन्ही बाजू बरोबर आहेत ,
आपण गलिच्छ आहोत यात कोणाच दुमत असण्याच कारण नाही . आणी ते दूर करण्याची इच्छशक्तिही नाहिये हेही .
पण म्हणून दुसर्या देशानी (त्यातील मीडीया वा लोकानी) हे लिहिल तर त्याच समर्थन करण्याच ही कारण मला दिसत नाही .
कारण यामागचा हेतू नक्कीच शुद्ध असेल याची खात्री नसते .
मी चीन पाहिला नाही पण तिथल्या व्यक्तिस्वातंत्र्याबद्दलच्या (?) बर्याच कहाण्या वाचल्या आहेत . लहानपणी तर असही ऐकल होत की त्यानी विद्यार्थ्यावर रणगाडे चालवले होते . भलेही तस नसेलही आणी तो फार चांगला देश असेलही , पण आपल्या ताटातल बघा ना ..
हेही वाचा. आसाम मधला प्रकार निंद्यच पण यावरून हे भारतात सर्रास घड्त असच वाटेल ना , काय सिद्ध करायचय यातून ?
http://www.guardian.co.uk/world/2012/jul/23/why-india-bad-for-women

अशावेळी मला युधिष्ठीराची १०५ ची गोष्ट आठवते . कौरवांकडे दुर्लक्ष करा कुणीच म्हणत नाहिये ,

सावली +१

भयानक परिस्थीती आहे. सिविक सेन्स नावाची गोष्टच नाहिये. टू व्हीलरवर एखाद्या बसला ओवरटेक करून जाताना कोण कधी पचकन गुटखा किंवा पानाने रंगवेल सांगता येत नाही..

वाईट अवस्था आहे. Sad मागे "स्लम डॉग मिलेनियम" ह्या सिनेमा निमित्ताने पाश्चिमात्यानी दाखविलेल्या, भारतीय "गलिच्छपणा" बाबतची चर्चा खुपच रंगली होती. त्याची आठवण झाली.

>> भयानक परिस्थीती आहे. सिविक सेन्स नावाची गोष्टच नाहिये. टू व्हीलरवर एखाद्या बसला ओवरटेक करून जाताना कोण कधी पचकन गुटखा किंवा पानाने रंगवेल सांगता येत नाही..

<< Angry
----------------------------------------------------------------
(गुटखा पानाच्या पिचकारीने रंगलेला) - वेताळ

सुन्न झाले विजय आंग्रे व केदार जाधव यांनी दिलेल्या लिंकस बघुन...... गंगेच्या किनारी इतकी वाईट अवस्था आहे तरी लोक एवढे बिनधास्तपणे त्यात दात घासणे,आंघोळ करणे,कपडे धुणे हे प्रकार करत आहेत..... कदाचित हे चित्र सुशिक्षीत भारतीयांच्या मनाला पटणारच नाही...... या गोष्टींसाठी परदेशी लोक आपल्याला हसतात हे ऐकुन माहीत होते, आता तर प्रत्यक्ष पाहीले, खुप वाईट वाटले, किती वाईट प्रतिमा आहे आपली जगासमोर...... सार्वजनिक अस्वच्छता, गरीबी, स्त्रियांवरील अत्याचार, जातपात, भ्रष्टाचार ..... यादी न संपणारी आहे Sad , त्या लिंक्सवर चायनीज व युरोपीय लोकांनी दिलेल्या प्रतिक्रीयादेखील वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, कोणाला खुप आश्चर्य वाटत आहे, कोणी भारतीयांना त्यांच्या अस्वच्छतेबद्दल, आळशीपणाबद्द्ल, गरीबीबद्द्ल हसत आहे तर कोणी आपल्या देशात देखील काही भाग असेच घाणेरडे आहेत असे सांगत आहेत. पण शेवटी काय आपण कितीही झाकायचा प्रयत्न्न केला तरी जग भारतीयांना अपमानीत करण्यासाठी या गोष्टी त्यांच्या लोकांबरोबर चवीने उघड करणारच व जोपर्यंत आपण सुधारत नाही तो पर्यंत आपल्या अश्या अपमानाबद्द्ल आपण काहीही बोलु शकत नाही Sad

इथे सिंगापुरात सार्वजनिक स्वच्छता, उत्तम रहदारीचे नियम, नीटनेटका ट्रेन्-बस प्रवास, सगळीकडे काळजीपुर्वक जोपासलेली मोठाली झाडे, हिरवळ..... बारा महिने कमी-अधिक प्रमाणात पाउस चालु असला तरी सर्व बिल्डिंग्स, घरांची राखलेली चकचकीत रंगरंगोटी हे सर्व बघितले की आपल्या देशास अजुन किती पल्ला गाठायचा आहे ते कळते..... Sad

पण म्हणून दुसर्या देशानी (त्यातील मीडीया वा लोकानी) हे लिहिल तर त्याच समर्थन करण्याच ही कारण मला दिसत नाही .
कारण यामागचा हेतू नक्कीच शुद्ध असेल याची खात्री नसते .
केदारच्या पोस्टशी सहमत !
विशेषतः त्या पोस्टवरूनतर असेच वाटतेय.

<<लहानपणी तर असही ऐकल होत की त्यानी विद्यार्थ्यावर रणगाडे चालवले होते . भलेही तस नसेलही आणी तो फार चांगला देश असेलही , पण आपल्या ताटातल बघा ना ..>>>
अगदीच काही चुकीचं नाहीये ते केदार. ती घटना June Fourth Incident म्हणुन ओळखली जाते. तियानमेन चौकात घडलेल्या त्या घटनेने चीनची जगभर नाचक्की झाली होती. विकीवर बरीच माहिती मिळेल.

http://en.wikipedia.org/wiki/Tiananmen_Square_protests_of_1989

आणि महत्वाचे म्हणजे त्या एका शहराच्या एका हरिश्चंद्र घाटावर घेतलेल्या फोटोवरुन संपुर्ण भारताची परीक्षा केली जातेय हे तेथील प्रतिसादांवरुन स्पष्ट होतेय. ती पोस्ट जरुर खरीच आहे पण त्याच्यामागचे कारण मात्र तेवढे प्रामाणिक वाटत नाहीये. हे फोटो पोस्ट करताना चीनमध्ये अजुनही काही ठिकाणी (मे बी अतिशय मागास भागात वापरले जात असेल) सर्रास वापरल्या जाणार्‍या 'फेटस सुप' बद्दल त्यांना काय म्हणायचे आहे? Sad

देशात काय गल्लीत काय, भारतीय सुधारणार नाहीत हे खरे. पण त्या आधी आपली मानसीकता बदलणे जरुरी आहे. अर्थात चीन सारख्या खालमुंडी देशांचा हेतू तेवढाच गलिच्छ आहे यात संशय नाही.

भारताची विकासाकडे होणारी वाटचाल, अनेक क्षेत्रात भारतीयांचे वर्चस्व( विशेषतः आयटी वगैरे ) त्यांना खुपतेय. मनुष्यबळ अधिक त्यामुळे सर्व जगावर राज्य ( इकॉनॉमिकली ) करण्याची सुप्त ईच्छा, त्यामुळे चीन असे अश्लाघ्य प्रयत्न करीत असेल.

अर्थात, त्यांच्याकडे काय चाललेय? ( देश,रस्ते,विमानतळे स्वच्छ असुन काय उपयोग? ) भारतात आलेले चीनी( कामगार चायनीज हॉटेल्समधले ) तेवढी स्वच्छता पाळतात का इकडे?

माझा भारत महान असे म्हणण्याची आता (हे फोटो पाहील्यावर) हिंमत उरलेली नाही. यातले वरचे काही
फोटो नवीन नसले तरीही गंगातटा वरचे गंगा घाटावरचे फोटो मला नविनच !!

भारत गलिच्छच आहे म्ह्णून आता भागणार नाही आणि सर्व कार्यभाग भारत सरकारच्या माथीही मारता
यायचा नाही.

मग भारताचा नागरीक या नात्याने आपण अश्या परीस्थीतीत काय केले पाहीजे ह्या वर मबोकरांनी
प्रतीक्रीया दिल्या तर ह्या धागा काढल्याच सार्थक होईल.

मागे आपला परीसर कसा स्वच्छ ठेवता येईल या वर धागा मी पाहीला होता, या धर्तीवर काय उपाय योजना
करता येईल हे पहाणे गरजेच आहे. .

बद्रीनाथ ते हरिद्वार या प्रवासात गंगेची विटंबना पाहील्यानंतर हरिद्वारलाच गंगेत आंघोळ करण्याची इच्छाच राहिली नाही. संवेदनशील लोकांनी यापुढची वर्णनं वाचू नयेत..

बद्रीनाथ येथे अलकनंदेचं शुभ्र पात्र अवखळपणे उड्या मारत येते. नदीची धार खूप खोलवर आणि दोन्ही बाजूला उंचच उंच कडे. त्या कड्यांवर वसलंय बद्रीनाथ शहर. देवळापर्यंत जायला एक अरुंदसा रस्ता आणि बाजूला लॉजेस. लॉजेसचं ड्रेनेज प्रत्येक मजल्यावरून थेट नदीत पडत असतं. तुम्ही नशीबवान असाल तर ते पिवळंधम्मक पाणी पडतानाच तुम्ही काहीतरी खात असाल खालच्या हॉटेलात. बद्रीनाथ नंतर जोशीमठ, हनुमानचट्टी, श्रीनगर, देवप्रयाग या प्रत्येक ठिकाणी हाच प्रकार. शहरातला सगळा कचराही थेट नदीत टाकण्यात येतो.

हाच प्रकार यमुनेच्याही बाबतीत. हरियाणाहून दिल्लीत शिरताना यमुनेचं पात्र संपूर्ण काळं दिसतं. त्यातलं पाणी हे पाणी राहीलेलंच नसतं. एक उग्र दर्प नाकात शिरतो.

कानपूरला चामडं कमावल्यानंतर उरलेलं रासायनिक पाणी गंगेत सोडलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाण्याकडे पाहू शकत नाही. वाराणसीचं वर्णन करायला मलाही शक्य नाही.

खुद्द पुण्यात मुळा मुठेची काय अवस्था केलीय ?
लहान असताना कल्याणीनगरला मुळा मुठा पात्रात खेळायला जायचो तेव्हां कधी कधी उग्र वास यायचा. त्यावेळी माहीत नव्हतं कारण. नदीच्या खालच्या पात्रात देखील माणसंच राहतात ही जाणिवच नाही. त्यांना पुण्याचं प्रचंड ड्रेनेजयुक्त पाणी सोडणं माणुसकीच्या कुठल्या तत्वात बसतं कुणास ठाऊक ? अर्थात याचा दोष कुणाला द्यायचा हा एक प्रश्न आहेच.

उदाहरणादाखल इतकंच बास. शि(टा)तावरून भा(र)ताची परीक्षा !

चीन मधे राहणार्या मायबोली करांनी चीन ची अशी गलिच्छ फोटो काढुन द्यावे.....आपण सुद्ध आपण वेबसाईट वर टाकुन चीन ची नाचक्की करायची .. Happy

सावलीशी सहमत.

आपण गलिच्छ आहोतच पण ते परदेशातल्या लोकांनी असं दाखवून दिलं की फार वाईट वाटतं आपल्याला. पण सुधारायची अजिबात इच्छा नाहीये कोणालाच.

सावलीशी सहमत.

फोटो बघवत नाहीत हे खरे, पण "चीन म्हणतो" हे बरोबर नाही. हे काही चीनचे मत नाही. तेथील काही लोकांनी टाकलेली पोस्ट. आपण नाही का चीन मधे कुत्रे काय काहीही खातात म्हणतो, ते "भारत" म्हणत नाही Happy ("भारत" काहीच म्हणत नाही ही गोष्ट वेगळी)!

यावरून आठवले, साधारण ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात राजीव गांधी सरकारने गंगा शुद्धीकरणाचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. बराच गवगवा झाला होता त्याचा. नंतर काय झाले कोणास ठाऊक!

अमोलशी सहमत.

मूळात जी गोष्ट चूक आहे ती सुधारल्याशिवाय तिचा "इतर कोण कसा नि काय उद्देशाने उल्लेख करतात" ह्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

जे पाहिले ते गलिच्छ आहे ! भारतातला हा गलिच्छ पणा थोडा का होईना या फोटोज मुळे कमी होईल अशी अपेक्षा. धन्यवाद चीन! तेवढे कम्युनिजम च्या नावाखाली कित्येक दशके कित्येक करोडो लोकांची कत्तल केलीत त्याची छायाचित्रे पोस्ट केलीत तर कदाचित तुम्ही ही सुधाराल..

Pages