पानिपत... एक सल...

Submitted by सेनापती... on 10 February, 2012 - 00:38

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

त्या भयंकर रणसंग्रामाला अडीचशेहून अधिक वर्षे होऊन गेली तरी पानिपतची जखम आजही मराठी मनावर कायम आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अटकेपार फडकवलेले भगवे झेंडे हा मराठी इतिहासाचा मानबिंदू असेल तर पानिपत हा एक सल आहे. तो कधीच पुसला जाणार नाही. आजही कुठल्याही गोष्टीत आपला पराजय झाला की त्याला पानिपतची उपमा दिली जाते तर विजयाला अटकेपार झेंडे रोवणे असेच म्हटले जाते ह्यातच सर्व काही आले. पण मुळात ही परिस्थिती त्याकाळी मराठ्यांवर का आली हे देखील जाणून घेणे गरजेचे ठरेल. संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या जोरानी मराठी साम्राज्याचा विस्तार(?) करता करता असे काय घडले की मराठ्यांचे अध:पतन झाले? मुळातच हे अचानक झाले नाही.

ह्यासाठी पानिपत समजून घेताना त्याआधीच्या काही वर्षांचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. मराठी किंवा हिंदू साम्राज्य स्थापण्यामागची शिवछत्रपतींची इतिकर्तव्यता नेमकी काय होती? त्यांना नेमका कुठला महाराष्ट्र धर्म अभिप्रेत होता? त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नीतीमूल्यांची किती जपणूक मराठ्यांच्या राज्यकर्त्यांना करता आली? खरेतर कितपत झेपली किंवा पेलली असेच म्हणावे लागेल. एका १६ वर्षाच्या पोट-मोकासेदाराने मुघल आणि आदिलशाहीविरुद्ध उभा केलेला हा महाराष्ट्र धर्म होता. त्यांची इतिकर्तव्यता हीच होती की मुसलमानी साम्राज्य उखडून फेकायचे. हा देश, ही भूमी पारतंत्र्यातून मुक्त करायची. फक्त महाराष्ट्र नाही तर सिंधू नदी ते कावेरी पावेतो... त्यासाठी त्यांनी अखंड श्रम सोसले. संपूर्ण दक्षिण भारत जवळ-जवळ ताब्यात आणला. आदिलशाही जवळ जवळ नामशेष झालेलीच होती. उरली सुरली कुतुबशाही मराठ्यांच्या जीवावर जगत होती. पण मग पुढे असे काय झाले की दिल्लीपतीला दख्खनेत दफन करणारे मराठे खुद्द दिल्ली राखू लागले? पेशवे काळात नेमके असे काय बदलले की पातशाही नामशेष करायची सोडून मराठे स्वतः: चक्क तिचे रक्षणकर्ते बनले?

सदर धाग्यावर पानीपत संदर्भातून मराठी साम्राज्यावर चर्चा अपेक्षित आहे. इथल्या अनेक जाणकारांकडून मला त्यांची मते जाणून घ्यायला आवडतील. मी देखील माझी मते वेळोवेळी मांडीन.. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी मला शिक्रापूरच्या लढाईचा तपशील थोडक्यात सान्गू शकेल का? हो, ही तीच उत्तरपेशवाईतील लढाई जिच्या विजयाप्रित्यर्थ इन्ग्रजान्नी भीमाकोरेगावजवळ विजयस्तंभ बान्धला हे!

लिंबुभाउ... तिला शिक्रापुरची लढाई म्हणतात का?

त्यालाच आंग्ल-मराठा युद्ध / बोरघाटाची मोहीम असे संबोधले जाते.

गुगलमध्ये एम.आर.कंटक असा सर्च मारा बरे.

लोकहो,

रोहन... यांनी इथे लिहिलंय त्यावरून दिसतं की रुस्तम आणि अस्फन्दियर म्हणजे भीमार्जुन होत. ही माहिती शेजवलकरांच्या पुस्तकात आलेली असावी.

ही नावे इराणमध्ये केव्हा पोहोचली, किती जुनी आहेत, इत्यादि माहिती जाणून घ्यायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

आण्णा, अहो भाषांतर करताना उपमा ज्या त्या प्रांतातील, भाषेतील वापरल्या जातात... मराठीत लिहिले असेल, तू पुरणपोळीसारखी गोड आहेस...... तर बंगालीत त्याचे भाष्हांतर तू रसगुल्ल्यासारखी गोड आहेस, असे करावे लागेल, असे केले जाते.

ते रुस्तम आणि एस्फंदियार हे इराणी/ इराकी मायथॉलॉजीतील आहेत.

आणि ते भीम अर्जुन होऊ शकत नाहीत.

कारण ते एकमेकांच्या विरोधात लढले होते. Proud

http://en.wikipedia.org/wiki/Esfandiar

http://en.wikipedia.org/wiki/Rostam

Biggrin

तुमचा भारताचा इतिहास कच्चा आहे.. इराणात कशाला कडमडताय? Biggrin

आंबा४,

>> तुमचा भारताचा इतिहास कच्चा आहे.. इराणात कशाला कडमडताय?

बादरायण संबंध!

असो.

शेजवलकरांनी त्यांना भीम आणि अर्जुनाची उपमा का दिली हे जाणून घ्यायचं होतं. कर्णार्जुन वा भीम-दुर्योधन या उपमा अधिक समर्पक ठरल्या असत्या.

आ.न.,
-गा.पै.

लोकहो,

रोहन... यांनी इथे लिहिलंय त्यावरून दिसतं की रुस्तम आणि अस्फन्दियर म्हणजे भीमार्जुन होत. ही माहिती शेजवलकरांच्या पुस्तकात आलेली असावी.

सुता वरून स्वर्ग गाठणे म्हणजे काय, याचा मनोरंजक पुरावा Happy

फारसीत लिहिलेला खलिता मराठी वाचकांसाठी मराठीत भाषांतरीत करताना जर त्यात त्यांना माहित नसलेली नावे आली तर समजणार कसे? म्हणून त्याचे साधारण रुपांतर शेजवलकरांनी केले.

बाकी, Esfaniyar बद्दल इथे माहिती आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Esfandiy%C4%81r

त्यात म्हटल्याप्रमाणे - Esfandyar, Isfandiar, Isfandiyar or Esfandiar, is a legendary Iranian hero.

याउप्परही तुम्हाला ही नावे इराणमध्ये केव्हा पोहोचली, किती जुनी आहेत, इत्यादि माहिती जाणून घ्यायला आवडेल असे म्हणायचेच असेल, तर खुशाल!!!;)

टीप - शेजवलकर म्हणजे पुना ओक नव्हेत Wink

sunilt,

>> याउप्परही तुम्हाला ही नावे इराणमध्ये केव्हा पोहोचली, किती जुनी आहेत, इत्यादि माहिती जाणून
>> घ्यायला आवडेल असे म्हणायचेच असेल, तर खुशाल!!!

अहमदशहा अब्दाली अफगाण होता. त्याला इराणी नावं का बरं वापरावीशी वाटली? शिवाय शेजवलकरांनी त्यांचे भीमार्जुन असे बारसे केले आहे. म्हणून म्हंटलं की भारतातून ही नावे अफगाणिस्थानमार्गे इराणात पोहोचली की काय! अफगाण महाभारत संबंधांवर इथे एक लेख आहे : Afghan region was scene of Mahabharata battle

आ.न.,
-गा.पै.

त्यावेळी ही चर्चा मिस झाल्याने मागच्या दोन चार दिवसात हा धागा पूर्ण वाचला... मस्त चर्चा झाली होती.
सेनापती, अशोक काका, केदार आणिस ईतर सगळेच ... मजा आली मतमतांतरे वाचून.. तेव्हा चर्चा मिस झाल्याने हूरहूर वाटली.

दोनेक गोष्टी ज्या चर्चेत आल्या नाहीत त्या लिहितो...
मान्य आहे ईतिहास जर-तर च्या भाषेत सांगता/लिहिता येत नाही पण ह्या जर-तरच्या गोष्टी पानिपत घडण्यास थेट वा दुरान्वये कारणीभूत ठरल्या आहेत म्हणून त्या

राघोबादादा अब्दालीच्या मुलाचा तैमूरचा पाठलाग करीत अटकेपर्यंत पोहोचले असतांना आणि ईराणच्या शहाने पेशव्यांना तुम्ही तिकडून कंदहारला या आम्ही ईकडून पर्शियातून येतो आणि आपण ह्या अफगाण अब्दालीचा कायमचा बंदोबस्त करून टाकू म्हणून पत्र पाठवले होते त्यावर नानासाहेबांनी अंमल करून राघोबादादांच्या मोहिमा आणि त्यामुळे येणारा कर्जाचा बोजा थोडावेळ नजरांदाज करून अफगाण पर्यंत धडक मारण्याची परवानगी दिली असती तर?

कुंजपुर्‍याहून रसद लुटून आणि दत्ताजींच्या हत्येचा बदला घेत कुतुबशहाला मारून दिल्लीला न येता कुरूक्ष्रेत्राच्या दर्शनाचा मोह/ आग्रह भाऊंनी टाळला असता तर? दिल्लीच्या किल्ल्यात ते अब्दालीशी जास्त चांगले लढू शकले असते.

बळवंत मेहेंदळे पानिपताच्या आधीच पडले नसते तर प्रत्यक्ष पानिपताच्या युद्धात विश्वासरावांच्याजागी त्यांनी मोर्चा सांभाळला असता.

त्याही आधी मला वाटते १७३९ मध्ये मोठे सैन्य घेऊन नादिरशहा आणि त्याचा सेनापती अब्दाली दिल्ली आणि मुघलांना लुटण्यासाठी आला होता तेव्हा लाखभर सैन्य बाळगून असलेले आणि दिल्लीला धडक मारून आलेले बाजीराव त्याला अडवण्यासाठी दिल्लीला का गेले नाहीत?
म्हणजे बाजीरावांनी नादिरशहाला रोखण्यासाठी न जाण्याचे आणि वीस वर्षांनी भाऊसाहेबांनी अब्दालीला रोखण्यासाठी जाण्यामागे दत्ताजी शिंदेंची निर्घूण हत्या एवढेच कारण होते?

काही योगायोग
दत्ताजी शिंदे १७६० मध्ये बरोबर संक्रांतींच्या दिवशीच पडले आणि त्या घटनेमुळे सुरू झालेली भाऊंची मोहीम पुढच्या संक्रांतीलाच १७६१ पानिपतावर संपली.

पानिपताच्या दुसर्‍या लढाईत जी हिंदू राजा हेमू आणि मुघल अकबरामध्ये झाली... तीमध्ये अकबराच्या पाचपट सैन्य असून आणि लढाई जिंकत असूनही केवळ एक भरकटलेला बाण डोळ्यात लागल्याने हेमू पडला आणि भारताचा ईतिहास बदलला.

त्याच पानिपतावर दोनशे वर्षानंतर भरकटलेली गोळी की गोळा लागून विश्वासराव पडले आणि जिंकत असलेले युद्ध मराठे हरले आणि भारताचा ईतिहास पुन्हा बदलला.

खरे तर पानिपताच्या पहिल्या युद्धाचा सुद्धा असाच किस्सा आहे.. लोदी आणि बाबर.. तेव्हाही लोदीला हटवण्यासाठी बाबरला बोलावले गेले होते जसे अब्दालीला बोलावले होते. बाबर जिंकला आणि मुघल साम्राज्याने त्यानंतर चांगली तीनशे-साडेतीनशे वर्षे दिल्लीची सत्ता भोगली.

जगाच्या पाठीवर दिल्लीएवढा रक्तरंजित ईतिहास दुसर्‍या कुठल्याच राजधानीचा नसेल.

मित्रांनो मनोज दाणी यांनी पानिपत वर चित्रमय प्रकाश टाकला आहे त्या पुस्तकाचा परिचय निखिल बेल्लारीकर यांनी करून दिला आहे तो सादर. https://www.loksatta.com/athour-mapia-news/battle-of-panipat-in-light-of...

Pages