दशकपूर्तीच्या निमित्ताने - २ (पाऊलखुणा)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पाऊलखुणा

"जुन्या मायबोलीत शोधलं तर तुझ्या नावाने आलेली बहुतेक पाने रेसिप्या किंवा रेसिप्यांच्या धाग्यांचीच असतात!" असं एकजण मला म्हणाली होती. "आहारशास्त्र आणि पाककृती" हा नेहमीच माझा आवडता विभाग राहिला आहे. मध्यंतरी "थिन्क टँक" वरच्या चर्चेत वेबमास्तरांनी मायबोलीवरचा हा विभाग म्हणजे "थिन्क टँकच" आहे असे सांगितले होते.

पर्टू नंतर मायबोलीवर येईनासा झाला तेव्हा पीकेनेच (परागकण) पर्टुच्या रेसिपीज धाग्यावर त्याची आठवण काढली होती. "ह्यो पर्ट्या कुटं गेला रं? आणि ती लालूबी काय लिवते म्हणल्याली, तिनंबी काय लिवलं नाय.." मी काही पर्टुची जागा भरुन काढली नाही पण रेसिप्या लिहायला सुरुवात केली. नंतर कधीतरी वर्गीकरण झाले आणि 'पर्टुच्या रेसिपीज' फोल्डरमधल्या रेसिपीज नवीन वर्गवारीत विभागल्या गेल्या.

परदेशात आल्यावर इथे उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरुन आपले पदार्थ करणे, नवीन पदार्थ करणे हे प्रयोग आपसूकच सुरु होतात. हवामान, उपकरणे यांचं वेगळेपण हा अजून एक घटक. आत्ता जे मिळायला लागले आहेत तेवढ्या प्रकारचे भारतीय पदार्थ तेव्हा मिळत नसत, अगदी 'इन्स्टंट' वाले सुद्धा. "अमेरिकेत गुलाबजाम कसे करावे" या धाग्यावर तेव्हा व्हिप्पिन्ग क्रीम, मैदा,पॅनकेक मिक्स, मावा पावडर पासून रिकोटा चीजपर्यंत घटक वापरुन गुलाबजामच्या कृती होत्या/आहेत. त्यातच पुढे "खवा कसा करायचा?" इ. ओघाने आलेले प्रश्नही आहेत. Wink

मी आणि पर्टुने जुन्यात लिहीलेल्या काही रेसिपीज मी नवीन मायबोलीत आणल्या, काही अजून जुन्यातच आहेत.आता "रोगन जोश" आणायला हवा. "झणझणीत अस्सल कोल्हापुरी (गुळमट नसलेली) चवदार पुडाची वडी उर्फ बाकरवडी" असे लांबलचक नाव असलेली मी लिहिलेली एक रेसिपी अजून जुन्या मायबोलीत आहे. कंसातले शब्द फार महत्त्वाचे आहेत Happy त्यावेळी माझा "आम्ही कोल्हापुरी" शिवाय इतरत्रही संचार सुरु झाला होता. तेव्हा विशिष्ठ गावच्या धाग्यावर जाऊन त्यांच्याच सुप्रसिद्ध बाकरवडीबद्दल काहीतरी वाद झाला. चाफा आणि सँडीशी (sandy_g). मग मी आमच्या पद्धतीची बाकरवडी कशी मस्त असते त्याची असे लांबलचक नाव देऊन रेसिपी टाकली! तेव्हा दीपांजली माझ्या बाजूने होती (पण ती तेव्हापासून माझी मैत्रीण नाही, एका V and C पासून आहे, ते पुढे येईलच. Happy ) आता वादाचे तपशील आठवत नाहीत. बहुतेक वेळा असंच होतं, तपशील विसरतात, भांडण उरतं. पण या बाबतीत पुढे तेही उरलं नाही ही चांगली गोष्ट. Happy

त्यावेळी "रेसिपी हवी आहे, माहीत आहे का" हे विचारण्यासाठी 'Looking for' या इंग्रजी नावाचा धागा होता. त्याच्या डोक्यावर लाल अक्षरात इंग्रजीतच 'रेसिप्या या धाग्यावर टाकू नका!' या अर्थाची सूचना होती पण लोक तिथंच टाकायचे. तेव्हा तिथे मिलिंदा आणि मी लक्ष ठेवत असू. मिलिंदा 'गब्बर आ जायेगा' सारखा कुप्रसिद्ध होता. (तरी काही लोक ऐकायचे नाही ही गोष्ट वेगळी.)

माझे तिथले अजून आवडते ठिकाण म्हणजे Nandita ने सुचवल्याप्रमाणे मी आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी हा धागा उघडला होता. त्याच्या डोक्यावरची सूचना मी लिहिलेली आहे. शेवटचे वाक्य तेव्हा महत्त्वाचे होते कारण तसे वाद होत असत. हा सुद्धा माझ्या आवडीचा धागा होता. तिथे एकदा psg(की q? पूनम, पौर्णिमा) ने चकलीच्या सोर्‍याबद्दल विचारले होते. बरेच सल्ले आले, मी तिला मारुतीचा मेटलचा घ्यायला सांगितला. कधीकधी इथल्या चर्चा इतक्या परिणाम करतात की नंतर मला स्वप्न पडले, मी आणि पूनम चालत कुठेतरी फिरायला चाललो आहोत आणि मी तिला चकलीच्या सोर्‍याबद्दल सांगत आहे! Lol हे मी तिला कळवलंसुद्धा होतं. (एवढं होऊन तिने शेवटी मी सांगितलेला नाहीच घेतला वाटतं.)

मी मायबोलीवर आल्यावर सुरुवातीच्या काळातच 'कभी खुशी कभी गम' रिलीज झाला होता. तेव्हा "'कभी खुशी कभी गम' कसा वाटला?" असा धागा मी सुरु केला. तिथे लोकांनी आपापली मते, परीक्षण इ. लिहीले आणि मग यथावकाश तिथे इतर चित्रपटांची चर्चा सुरु झाली. कोणत्याही विषयाचा आवाका वाढवणे हे काम मायबोलीकर पूर्वीपासूनच करत आले आहेत. मग त्या धाग्याचे नाव बदलले गेले आणि 'चित्रपट कसा वाटला?' धागा अस्तित्वात आला.

'परदेशात रहाताना' हा एक विभाग मी नेहमी वाचायचे आणि तिथं लिहायचेही. २००३ च्या सुरुवातीला भारताने परदेशी भारतीयांना दुहेरी नागरिकत्व देण्याबद्दल प्रसारमाध्यमात चर्चा सुरु झाली. त्यासाठी मी दुहेरी नागरिकत्व हा धागा उघडला होता. Happy माहिती मिळाली पण तिथे नंतर 'दुहेरी कशाला हवे?' मग 'भारत-अमेरिका युद्ध झाले तर..?' इत्यादी फाटे फुटले आणि वाद झाला. तरी मी एकदा तिथे संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन 'तिळगूळ घ्या गोड बोला' असंही म्हटलं आणि झक्की तिथे अजिबात फिरकलेले नव्हते! vinaydesai (परदेसाई) होतेच पण ते वादात नव्हते. त्या वर्षाच्या शेवटी ते विधेयक पास झाले.

परदेशात आपल्या 'बबल' मध्ये रहाणार्‍यांबद्दल 'समांतर'वर मी चर्चा सुरु केली होती. तिकडे मात्र झक्की आहेत. keya (Anjali_28, अंजली) आहे आणि Abedekar ('लाल्वाक्का' नाव येण्यापूर्वी याने पहिल्यांदा मला 'लालूकाकू' केले होते.) 'अबे' आहे. अबे नेहमी इंग्रजीत लिहायचा. त्याच्याही मागे मराठी लिहिण्याबद्दल कटकट केली पण मिंग्रजीपेक्षा ते परवडले असे माझे मत होते. अंजली, बेटीने देवनागरीत चांगली मते मांडली आहेत. तिथे नंतर सगळे रोमन मराठी आणि इंग्रजी सुरु झाल्याने मी फिरकलेले दिसत नाही. Wink

'तुम्हाला काय वाटतं?' उर्फ ' 'V and C' दोन मोठ्या वादांत मी भाग घेतला होता ते धागे आता तिथे नाहीतच. (कारण माहीत नाही) पहिला म्हणजे 'सौंदर्यस्पर्धांच्या अनुषंगाने..' (म्हणजे थोडक्यात 'निमित्ताने' च की! असली नावे देताना आता सावध राहिले पाहिजे.) या चर्चेमध्ये पहिल्यांदा 'स्त्रिया, कमी कपडे, सौंदर्याची मोजमापे, पुरुष, स्पर्धा कशाला?' इ. चा उहापोह झाला. तिथे Shrini च्या मुद्द्यांना खोडायला मी लिहायला गेले आणि मग 'लगे रहो!' म्हणत डीजे (दीपांजली) आली. (तेव्हा 'गो!' ही टर्म नव्हती.) तेव्हापासून डीजे माझे मैत्रीण आहे. Happy तिथे मध्येच लिंबूटिंबू पण जोरात लढत होता असा त्याचा दावा आहे, पण मला हे नेमके आठवत नाही.

दुसरा वाद होता 'एम. एफ. हुसेन' आणि त्यांनी काढलेली हिंदू देवदेवतांची चित्रे. तेव्हापासून Gs1(जीएस) माझा मित्र आहे. Lol

हळदी-कुंकू सारखा "वाचनीय" तसंच, देव म्हणजे काय? या हजारांवर पोस्ट्सचा धागा अजून आहे. 'देव' वरच्या झक्कींच्या लेखनाबद्दल मी त्यांना त्यांची "इतर" पोस्ट्स माफ केली आहेत. Happy आणि Multiple IDs हा खरंतर वेगळ्या लेखाचा विषय वाटला होता, पण तिथे जे आहे त्याचीच पुनरावृत्ती होईल.

जुन्या मायबोलीत असेपर्यंत माझी 'अंताक्षरी' फेरी कधी चुकली नाही. मायबोलीवर आल्यानंतर प्रथम तिथंच जाणं व्हायचं. साध्या मराठी अंताक्षरीत सारखं सारखं 'ल' यायचं म्हणून नंतर त्याऐवजी 'अ, आ, इ, ई...." घेता येईल अशी सूट मिळाली मग पुन्हा कधी 'लिंबोणीच्या' लिहिलं नाही.

मराठी लॉजिकल अंताक्षरीवर 'भक्तिगीते', 'नाट्यगीते', 'पाऊस', 'सण', एखाद्या गायक-गायिकेची गाणी असे ठराविक विषय दर थोडे दिवसांनी येत. त्यात नाविन्य म्हणून एकदा 'आयडींची नावे असलेली गाणी' असे लॉजिक निघाले होते. हिंदी लॉजिकलमध्ये बरेच विषय असायचे. अनोखे बोल, अंगप्रदर्शन असलेली गाणी, नायक-नायिका पावसात भिजतात ती गाणी, वाहनात बसून म्हटलेली गाणी, वाद्य वाजवत म्हटलेली गाणी. लॉजिकल मराठी-हिंदी दोन्हीकडे अधूनमधून चालणारी 'कडव्यांची अंताक्षरी' माझी आवडती होती. कडव्याची सुरुवात शेवटच्या अक्षराने हवी, गाण्याची नाही. यामुळे पूर्ण गाणी आठवली जात.

नवीन मायबोलीत आल्यावर मात्र अंताक्षरी सुटली. आता ती 'अनंताक्षरी' झाली आहे. मुद्दाम धागा शोधून आता तिथे जाणे होत नाही. कधी डोकावले तर गाणं लिहीत नाही. पण ललितांसारखे जुने मेंबर अजूनही तिथे जातात ते पाहून मजा वाटली.

गुलमोहरावरही नेहमी फिरकत असे. क्वचित काही फुटकळ लिहिलंही होतं. त्याचा पसारा कमी होता तेव्हा बरचसं वाचलं जायचं. लोक तिथे लिहिताना नंतर आवर्जून देवनागरी वापरु लागले होते. 'निर्णय' हे शीर्षक असलेल्या डझनभर गोष्टी वाचल्या तश्याच सगळ्या कविता, गझल, ललितं आणि विनोदी साहित्य वाचलं. देवनागरी झाल्यापासून 'कुजबूज' वाचली. तेव्हा मायबोलीवरचा वावर वाढल्याने ती बरीचशी कळूही लागली होती. वळायला थोडा वेळ लागला. आधी कळत नसल्यामुळे ते 'जुन्या' लोकांसाठी केलेले 'कंपूलेखन' वाटायचे. Happy नंतरच्या काही अंकांत मग माझं नावही 'झळकलं'. 'कुजबूज' मध्ये तुमचा उल्लेख झाला म्हणजे तुम्ही 'लक्षवेधी' (कोणत्यातरी अॅन्गलने) आहात एवढे नक्की!

काही वर्षं जाऊनही कोल्हापूरच्या मायबोलीकरांची संख्या मात्र फारशी वाढली नव्हती. सीमा बर्‍यापैकी नियमितपणे येऊ लागली. बिट्टू, मनीष, झकासराव, अनामिक, स्वरुप, ऋतु_हिरवा हे अधूनमधून यायचे. मग दक्षिणा आली. (Dineshvs) दिनेशदा होतेच. (यांना कोणत्याही गावात टाकले तरी चालेल मी कोल्हापुरात टाकले.) सध्या मनकवडा, निवांत पाटील, kop असे काही नवे कोल्हापूरकर दिसतात.

हीच गत माझ्या आत्ताच्या गावाची. तिथे तर चिटपाखरु नसायचे. पूर्वी Virginia,Maryland,DC साठी एकच धागा होता. नंतर त्यातून MD बाजूला काढले. तसे तेव्हा sami, Dswati(स्वाती_दांडेकर), zakkas, kaarta हे मायबोलीकर होते. समि पूर्वी पार्ल्यात असायची. नंतर ती गायब झाली. बाकीचे अजूनही अधूनमधून येतात. पण माझ्याइतके पडीक माझ्या गावचे कोणी मायबोलीवर यायला मला २००७ (रुनी) पर्यंत वाट बघावी लागली.

इथे वावर वाढला तसे संवाद वाढले, वाद झाले. पण "भांडण झाले घोर तरीही, येत रहावे जात रहावे" म्हणून आणि "परस्परांना त्रास तरीही, परस्परांविण ना गत्यंतर" (पुढची ओळ हृद्य असल्याने लिहीत नाही) ओळखून आजतागायत येणं होतंच आहे.

या मायबोलीवरच्या ओळखीने झालेल्या मित्र मैत्रिणींना मग प्रत्यक्षात भेटण्याचीही संधी मिळाली. त्याबद्दल पुढल्या भागात.. "गटग/जीटीजी, एवेएठी आणि कल्लोळ - वृत्तांतापलिकडचे"

दशकपूर्ती -१

विषय: 
प्रकार: 

mee_naa चा बीबी जास्त जुना नाहीये. इथेच आहे नविन मायबोलीत "आजकी नारी" ५९७०

आणि वाकून नमस्कार इथे आहेत Happy http://www.maayboli.com/hitguj/messages/46/60279.html

टिकल्या कुठे सापडल्यास द्या.

मी_ना चा ४८१२ बघ. माझ्या डोक्यात तो संदर्भ होता.
वाकून नमस्कार माझ्यामुळे नव्हता सुरू झालेला...

परत एकदा स्वरालीच्या पोस्ट वाचून त्यावेळेला मजाच वाटलेली तिच्या म्हणण्याची ते आठवलं. आधी वाटलेलं ती उपहासात लिहितेय. आता विचारायला हवं तिला की तुझ्याकडे सखूबाई आणि रामागडी आहेत का ते. (पक्षी: सासूसासरे )

लालु, मस्तच!

आता मलाही लिहावं की काय असं वाटायला लागलंय .. Lol

पण माझा हत्ती काही फार मोठा आणि लक्षवेधीही नाही त्यामुळे मनातल्या मनातच करते उजळणी आणि त्या वेळचे कोणी भेटले की "आहें" .. :p

त्यावेळी अनंताक्षरी वाहती नसायची. एखाद्या अक्षरावरुन गाणे आठवले नाही तर मगे जाऊन बघायची सोय होती. पण त्यावरुन वादही व्हायचे. म्हणजे त्यावेळी चाललं होतं मग आता का नाही वगैरे.
झुळुक तिथे नसावी म्हणून मी बॉम्बे व्हायकिंगशी भांडलो होतो. (आम्ही अजून चांगले मित्र आहोत.)
तिथ एखादे गाणे चुकले, तर पुढची सगळी गाणी बाद व्हायची.
पण आताच्या अनंताक्षरीवरच्या डूईवरच्या सूचना, कालबाह्य होऊनही तशाच राहिल्यात.

पण त्यावेळी वाद असला तरी जिव्हाळा पण होता. भारतात आलेले मायबोलीकर इथल्या मायबोलीकरांना आवर्जून भेटायचा प्रयत्न करायचे. एकदा तर माझी आणि लालूची, एअरपोर्ट वरच भेट झाली होती.

ते स्वप्न Lol आठवतंय मला. मी (तू सांगूनही) पितळीच घेतला, मैत्रिणीने 'अंजली'चा दिलाच नाही ट्रायलसाठी!

ट्री व्ह्यू बेस्ट होता.. त्यात प्रत्येक बाफवरच्या लेटेस्ट चार-पाच प्रतिक्रिया आणि देणारे आयडी दिसायचे, त्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेला आयडी आला, की लगेच तिकडे उडी! Proud

प्रत्येक मराठी महिन्यानुसार गुलमोहराचे आर्कायव्हिंग होत होते, त्यामुळे नवीन महिना सुरू झाला, की अ‍ॅडमिनना आठवण करून द्यायची, की ते त्या महिन्याचा फोल्डर तयार करायचे. मग त्यात कविता, कथा, ललितं यायची. संपूर्ण महिन्याचा कविता, एका खाली एक वाचायला मिळायच्या, आयडीनुसार लेखन नसून, विभागवार लेखन असायचे. त्यामुळे आपण इन्डिव्हिजुअल एक नसून, एका मोठ्या गटाचा भाग आहोत असे वाटायचे. कवी एकमेकांचा आदर करत. एखादी सुंदर कविता आली, की तिचा मान राखण्यासाठी शक्यतो ते पान आर्काईव्ह झालं, कीच दुसरा कवी आपली कविता देत असे. दर ३० प्रतिसादांची एक अर्काईव्ह होती.

प्रतिसाद संपादनाचा काळही सहा तासांचाच होता, त्यामुळे काही बदलायचे असेल, तर सहा तासात बदलावे लागायचे. आतासारखं दोन महिन्यानी जाऊन राजिनाम्याची टिकली चिकटवायची सोय नव्हती, त्यामुळे लोक सटासटा लिहायचे आणि नंतर सहा तासाची लिमिट गाठण्यासाठी आटापिटा करायचे! Lol ट्री व्ह्यू आणि रंगीत शाई, पांढरी शाई हे जुन्या माबोचे हायलाईट!

मिन्ग्लिशनंतर देवनागरीची \dev वापरून मराठी लिहायची सोय बेस्ट होती. बरहा वगैरे नव्हते, तेव्हा ही सोय वापरूनच अनेक लोक लिहायचे ऑफलाईनही.

व्ही अ‍ॅन्ड सी आणि माय एक्स्पिरियन्स हे दोन विभाग सगळ्यांनी वाचले, तर नवीन धागे काढायचीच वेळ येणार नाही बहुदा! Happy

बापरे! केवढे लिहिले!

पूनम : १०० मोदक ........ Happy
ट्री व्ह्यू खुपच मिस केला गेलाय. \dev ची पण खुप सवय झाली होती.

लाल्वाक्का : पुढचा भाग कधी येतोय ?????? Happy

मस्त लिहिलेस लालू!
त्यामुळे आपण इन्डिव्हिजुअल एक नसून, एका मोठ्या गटाचा भाग आहोत असे वाटायचे>>>>> हेही तितकेच खरे!

मस्तच एकदम.. जुन्या आठवणी ताज्या झाल्या...

मलाही ती जुनी मायबोली आठवतेय. आणि तो ट्री व्ह्यूही.

मी फक्त गुलमोहर आणि भटकंतीवर जायचे. गुलमोहरातही कवितेच्या वाटेला कधी गेले नाही. सदानकदा कथा आणि इतर कला इथेच लोळत राहिले. मला तेव्हाचे फोटो आणि चित्रे खुप आवडायची. मायबोली उघडली की मी आधी नविन चित्रे पाहायचे आणि मग कथा. तेव्हा फोटोंपेक्षा चित्रे जास्त येत. आता फोटोंचेच पिक अमाप आहे, चित्रे कधीतरी चुकूनमापून.

बाकी इतरत्र गेलेच नाही. कधीतरी चुकुन दिनेशच्या रंगीबेरंगीवर गेले, जुन्या दुरदर्शनबद्दल वाचले आणि अरे, आपल्यासारखेच इतरांनाही जुने अजुनही आठवतेय असे वाटुन वाचत सुटले. इथे असले लेखनही लिहितात हे आधी माहितच नव्हते. त्यांनी झाडांवर लिहायला सुरवात केल्यावर मी इथे हळूहळू लिहायला लागले. आधी फक्त वाचायचे, आपणही लिहावे हे कधी सुचले नाही आणि तेवढा वेळही नव्हता.

तेव्हा क्रमशः लेख १, २ असे लिहायची सोय नसल्याने एकाच पानावर सुरवातीला कथेचा एक भाग, मग भरपुर प्रतिक्रिया, मग त्याखाली दुसरा असे असायचे. मायबोलीवरच्या काही आयडीज एक २० ओळींचा भाग लिहुन झाला की महिनाभर गायबायचे. कथा भागावर 'नविन' असे लेबल दिसले की 'आला बाबा एकदाचा पुढचा भाग' असा विचार करत पान उघडावे तर कोणीतरी आपल्यासारखेच वाटपाहू माबोकर 'आता तरी पुढचा भाग टाका' अशा विनंतीचा प्रतिसाद टाकुन गेलेले आढळायचे. काहीजण कादंब-या लिहायला घेऊन २-४ भागांनंतर आपण असा काही उपक्रम हाती घेतलेला हेही विसरुन जायचे. आम्ही आपले वाट पाहतोय पुढचा भाग कधी येईल याची आणि तिकडे कादंबरीकार नवी कथा टाकताहेत. कादंबरी गेली उडत.... Sad

तेव्हा आतासारखा वेळ नव्हता त्यामुळे इतरत्र जायला मिळायचे नाही. प्रतिसादात 'हे V and C वर जाऊन करा' असले काही वाचले की काय बडबडताहेत हे कळायचे नाही. आहारशास्त्र आणि पाकृ पण खुप आवडायचे. पण त्यात फोटो द्यायची सोय आणि पद्धत दोन्ही नव्हते. Happy

आताचे मायबोलीही आवडते पण मिनिटामिनिटाला प्रसिद्ध होणा-या भरमसाठ साहित्यामुळे खाली गेलेला आपल्याला हवा तो बीबी शोधण्यासाठी पाने उपशित बसावे लागले की ते जुने ट्रीवाले मायबोली चांगले होते असे वाटायला लागते.

आयडीनुसार लेखन नसून, विभागवार लेखन असायचे. त्यामुळे आपण इन्डिव्हिजुअल एक नसून, एका मोठ्या गटाचा भाग आहोत असे वाटायचे
अगदी अगदी.....

मेमरी का मस्करी! Happy
मला यातलं फारसं काही आठवत नाही. 'देवा'वरचा बाफ आठवतो आहे.
तसंही माझं सुरुवातीचा बराच काळ मु.पो. कविता, तालुका गुलमोहर असायचं. Proud

लालू कसली मेमरी आहे तुझी. सगळ्या गोष्टी इतक्या डिटेल मधे आठवताहेत!!
जुन्या माबोवर मी पण काही काळ होते. पण माझा काही वावर नव्हता इतका. मी फक्त जपान बिबि आणि गुलमोहोर कधी मधी वाचायचे. तो आय्डी न वापरल्याने बंद झाला.

मस्त गं.. त्यावेळी (बहुतेक) सांगलीचा वेगळा बीबी नव्हताच.. म्हणून मग कोल्हापूरलाच आपला म्हणायचो.. Happy

हा भाग पण चांगला झालाय. ह्यातले काहीच माहीत नव्हते.
जुना गुलमोहोर ट्री व्हियु हा माझा फारच आवडता प्रकार होता.

मस्त! सगळ्यांच्याकडून आठवणी वाचताना आपल्या घराण्याचा इतिहास ऐकल्यासारखं महत्त्वाचं आणि कौतुकाचं वाटतंय. या 'निमित्ताने' लालूसह सर्व जुन्या आयडींना धन्यवाद. Happy

खुप धमाल आली हा भाग आणि त्यातले प्रतिसाद वाचतांना... मी काही वर्षांपूर्वी मायबोलीवर येऊन गेले होते, तेंव्हाचे ते मराठी महिन्यांनुसार केलेले साहित्याचे फोल्डर्स व्यवस्थित आठवतायत... पण हा ट्री व्ह्यु कसा होता, ते मात्र नाही माहिती... इतकी छान सोय का बंद झाली असेल बरं? Uhoh

V & C हा बाफ आता का नाहीये इथे? की सगळ्याच धाग्यांवर V & C असते हल्ली म्हणून असेल??? Proud

दिनेशदांना लालू एअरपोर्टवर भेटल्या? सही ना!!! परवा आम्ही एका ठिकाणी ट्रिपला गेलो होतो, तिथे मराठी बोलतांना ऐकायला आले, वळून पाहिले तर एक जोडपे होते. त्यांना स्माईल दिली तर तिकडून नो रिस्पॉन्स.... माझी प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, नक्कीच जुने मायबोलीकर असतील.... Proud आमच्या 'ग्रुपमध्ये प्रचंड हशा पिकला... रच्याकने, माझ्या सगळ्या अमराठी मित्र-मैत्रिणींना आता मायबोली आणि इथे काय काय घडते हे माझ्याकडून समजले आहे, त्यामुळे मला वेगळा संदर्भ द्यायची वेळ येत नाही... (बाकी दिनेशदांसारखे सर्व नव्या लोकांशीपण तितक्याच आत्मीयतेने बोलणारे जुने माबोकर हे नियमाचे काही सुखद अपवाद... )

मी बरेच दिवस मायबोलीविषयी बोलले नाही तर माझे दोस्तगण आवर्जून मला तिकडचे हालहवाल विचारतात. भेटले की आधी मायबोलीविषयीच विचारतात. कालच माझ्या एका मित्राने मायबोली हे नाव विसरल्याने इंग्रजीत मला "तुझे ते बोलीपापा काय म्हणते?" असे विचारले होते. Lol आमच्या ग्रुपमध्ये त्यानंतर इतका जोरात हशा पिकला, की विचारता सोय नाही. कालपासून माबोचे नामकरण बोलीपापा झालेले आहे आमच्या ग्रुपमध्ये... Rofl

बाकी मला पण मायबोलीची स्वप्नं नेहमी पडत असतात. त्यातले समंजस, भांडखोर असे सगळे आयडी ज्यांचे ज्यांचे प्रोफाईल फोटोज आहेत, ते कधी ना कधी माझ्या स्वप्नात येऊन गेले आहेत, येत असतात नेहमीच.... Happy

मी वर्गवार्‍यांचा लेख लिहिल्यावर इथे फारशी अ‍ॅक्टिव्ह नसलेल्या माझ्या माबोकर मैत्रिणीचा मला फोनही आला होता. हळूहळू इथून ऋणानुबंध जुळतायत...हे पाहून मस्त वाटते आहे. Happy

मायबोलीवरील गप्पागोष्टी ह्या गप्पांच्या पानावरचे मित्र-मैत्रिणी तर जसे पहिल्यापासूनचे मित्र.मैत्रिणी आहेत, असे वाटते, इतके त्यांच्यासोबत कम्फर्टेबल वाटते...

हे असे सगळे मला मायबोलीवर १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहायचे होते, पण मनातल्या कटूतेमुळे कुठेतरी हात आखडता घेतला गेला होता... आता मात्र बरेचसे मळभ दूर झाले आहे. Happy

Pages