पाठ्यपुस्तकातील कविता

Submitted by रायगड on 17 March, 2011 - 02:16

शाळेत मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कित्येक कविता आपल्या आठवणीत दरवळत रहातात. काही अजूनेही पूर्ण आठवतात तर काही थोड्या-फार! पण त्या कविता आठवून त्या जुन्या शाळेतल्या आठवणींना उजाळा देण्याची मजा काही औरच!
तुम्हाला कोणत्या कविता आवडायच्या? कोणत्या अजूनही आठवतात? कोणत्या पूर्ण आठवायला आवडेल?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन चौथीला एक होती

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी तर कधी नदीच्याकाठी
राईत कधी अन पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत यावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
गाण्याची चुकली मुकली गोड लकेर
झुळ्झुळ झर्‍यांची पसरावी चौफेर
लावुनी अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलुन बघेतो व्हावे पार पसार
परी जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशा-दिशातुन फिरता उधळुन द्यावा

किती छान धागा......

"गाई पाण्यावर ..." माझी आई खूपदा हि कविता चालीत म्हणून दाखवत असे. निदान एकदा तरी डोळ्यांत पाणी हमखास Sad

"एका तळ्यात होती..." (गदिम() ही पण मूळ कविताच आहे ना?

सकाळी उठवताना आई "उठा उठा चिऊताई..." ऐकवत असे. आता अस्मादिक ती कविता आमच्या चिरंजीवासाठी म्हणतो. (चिऊताईचे चिमणदादा करावे लागते Wink )

आणखी आठवणीतल्या कविता :
१) "रंग कोणता पुसू नका
जात कोणती पुसू नका..."

२) मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर
किती हाकलं हाकलं फिरी येतं पीकावर - बहिणाबाई

३) फ.मुं. शिंदेंची "आई"

जत्रा पांगते पालं उठतात...

४) कुशवसुतांची "एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन मी जी स्वप्राणाने..."

५) आणि कवींवर आधारीत एक कविता होती
"आम्ही कोण म्हणूनी काय पुसता
आम्ही असू लाडके..."
(कुणाची होती आठवत नाही."

६) ए.पां. रेंदाळकरांची
अजुनि चालतोचि वाट माळ हा सरेना...

७) कोलंबसाचे गर्व गीत असेही काहीसे होते. शेवटची ओळ फक्त आठवतेय
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला!"

आम्ही कोण म्हणूनी काय पुसता
आम्ही असू लाडके..."

ही केशवसुतांची कविता. तिचे विडंबन केशवकुमारांनी केले.

छान धागा..

ही मला आवडायची.. अजूनही आवडते

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधुन मेघ हे नभास ग्रासती
मध्येच या वीजा भयाण हासती
दहा दिशांतुनी तुफान व्हायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे

...पुढे एक कडवं होतं बहुतेक
माहिती आहे का कोणास??

माझ्या मावस बहिणीमुळे मला एक मराठी कविता माहित आहे, तिच्या शाळेतल्या टीचरनी इतकी सुरेख भावगीतासारखी चाल लावली होती कि ती सारखी कविता गुणगुणत रहायची. तिचं ऐकुन ऐकुन मलाही काही ओळी पाठ झाल्या होत्या. फार छान कविता होती ती. कवियत्री माहित नाहीत.

मी एक पक्षिण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी
श्वासात माझ्या असे एक आकाश
देहात (?) आकाश प्राणांतळी

मधल्या खुप ओळी आठवत नाहीत, मग पुढे ....

ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखुन घ्यावेत पंखांवरी.....

मग बरंच काही आठवत नाही, पण एक अस्पष्ट ओळ आठवते कि काहीतरी नभांना कि ढगांना -----भेदुन जावे बाणांपरी.

अर्थ इतका सोपा होता कि ती लहान वयातही न शिकता कळली होती.

सातवीत एक पोवाडा होता संताजी-धनाजीचा आठवत असल्यास प्लिज लिहा .. मला खूप आवडायची ही कविता
काही ओ़ळी अशा होत्या

नावाचा होता संत, जातीचा होता शूर
हृदयाचा सज्जन होता, रणक्रंदनी होता क्रूर
शीलाचा होता साधू, संग्रामी होता धीर
दुर्गती ती संभाजीची, दैना राजारामाची
अंतरी सर्वदा ज्याची, उसळे रण शार्दुलाची घोडदौड संताजीची!!

१) निळ्या खाडीच्या काठाला, माझा हिरवाच गाव

२) हिरवे तांबूस ऊन कोवळे, पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे, वाहुनिया दूर
मधले आठवत नाही - शेवटी
कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा

३) सुरुवात आठवत नाही - मधे काहीतरी
गरिब बिचार्या चिमणीला, सगळे टपले छळण्याला

@ के.अंजली

"सदैव सैनिका...." ही वसंत बापटांची एक गाजलेली कविता. मी खुद्द त्यांच्याच उपस्थितीत त्यानाच म्हणताना ऐकली आहे. शाळकरी मुलांच्यासमोर ते आणि विंदा करंदीकार अशा धाटणीच्या कविता साभिनय म्हणायचे. खूप लोकप्रिय होती ही त्रयी [तिसरे पाडगांवकर] कविता लोकप्रिय करण्यामध्ये.

पूर्ण कविता :

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे
सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे
प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे

~ फार चांगला आणि मोहक धागा आहे हा.

अशोक पाटील

@ मनिमाऊ ~

"मी एक पक्षिणवेडी आकाशवेडी दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश श्वासात आकाश प्राणांतळी."

~ अशी सुरुवात आहे त्या कवितेची.
पद्मा गोळे यांची ती कविता

नाही गीता, ती पद्मा गोळेंचीच कविता आहे. नववीला होती बहुदा.

नताशा,
पिवळे तांबुस उन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
.. अशा ओळी आहेत त्या. भा. रा. तांब्यांची कविता आहे - एडिट करून पुस्तकात टाकली होती Happy

निंबुडा, कोलंबसाचे गर्व गीत - सुरुवात अशी आहे :

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा डळमळू दे तारे
विशाल वादळ, हेलकावू दे पर्वत पाण्याने, ढळू दे दिशा कोन सारे

कोणला पैठणी कविता माहिती आहे का ?
मला नववीला होती.

फडताळात एक गाठोडे आहे, ज्याच्या तळाशी अगदी खाली
जेथे आहेत जूने कपडे,कुंच्या, टोपडे, शेले, शाली

त्यातच आहे घडी करून, जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये, ही पैठणी नेसली होती
पडली होती सगळ्यांच्या पाया,हाच पदर धरूनी हाती

खस-हिन्यांत माखली बोटे, पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची आरास, पदराआडून हसली

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत, एक मऊपणा ल्याला

(मधलं आठवत नाहीये, रादर, मध्ये काही आहे की नाही हेच आठवत नाहीये. Proud )

कधीतरी ही पैठणी, धरते उरी मी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये, आजी भेटते मला जवळून

मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा

जुना धागा वर काढतेय...
"कोकण दरिद्री बोलते कोण, छे छे ती सुंदर सोन्याची खाण..."
माझ्या वडिलांना ही कविता ५-६ वी त अभ्यासाला होती. (साधारण १९६६-६७ चा काळ)
माझे वडील माझ्या मुलासाठी ही कविता चालीत म्हणतात. छान वाटते ऐकायला आणि माझा मुलगा सुद्धा आवडीने ऐकतो. पण त्यांना संपूर्ण कविता आठवत नाही. कोणाला माहित असेल किंवा कोणाच्या आई वडिलांना आठवत असेल तर कृपया मिळेल का?

Pages