राधा

Submitted by दिनेश. on 10 November, 2010 - 05:25

"कोण आहे गं तिकडे ? दिवसाचे ३ प्रहर उलटून गेले, तरी या महाली आगमन झाले नाही अजून.
विसरली कि काय स्वारी ? आम्हाला कळत का नाही ? या महाली येऊन म्हणायचे, रुक्मीणी, तू आमची पट्टराणी. तूझा मान मोठा, आणि त्या महाली जाऊन म्हणायचे, तू सत्य माझी भामा, सत्यभामा." रुक्मीणीचा नूसता संताप झाला होता. आज स्वारी या महाली येणार होती म्हणून तिने सर्व सिद्धता करुन ठेवली होती.

घृतपूर, मोदक, क्षिरी भोजनासाठी, संगीतजलसे मनोरंजनासाठी, पुष्पशय्या सर्व काही होते. स्वारी आता त्या महाली, जायचेच विसरायला हवी, अशी मनिषा होती तिला.

दिवसाचे प्रहर उलटू लागल्यावर, तिची बेचैनी वाढतच चालली. त्या महालातून काही निरोपही येत नव्हता.
स्वारींचे खास दूत तर नजरेसही पडत नव्हते. पण दासीला, त्या महाली पाठवायचे काही तिला पटत नव्हते.

पण शेवटी तिने धीर केलाच. दासीस कसले तरी निमित्त काढून तिने सत्यभामेच्या महाली पाठवलेच.

ती परत येईस्तो मात्र तिला प्रत्येक क्षण युगागुगासारखा वाटला. काय मेलं ते रमायचे, त्या ठिकाणी, असे
मनाशी म्हणत राहिली.

तेवढ्यात तिला सज्ज्यातून दासी लगबगीने येताना दिसली. तिचा चिंताक्रांत चेहरा, तर तिला दूरूनही
दिसला. "सांग झणी. काय करत्येय स्वारी, त्या महाली ? "

"महाराणी, क्षमा असावी. महाराज त्या महाली नाहीत. " दासी धापा टाकत म्हणाली.

"चांडाळणी, मग स्वारींच्या महाली नाही का जायचेस ? स्वारींचे सर्व क्षेमकुशल तर असेल ना ?"

रुक्मीणीला धीर धरवेना. तिने लगोलग मेणा मागवला व श्रीकृष्णमहाराजांच्या महाली निघाली.

****

"नारायण, नारायण" तिला प्रवेशद्वारीच नारदमुनी दिसले.

"वंदन करते, मुनीवर. स्वारींचे सर्व क्षेमकुशल आहे ना ?" तिने अधीरतेने विचारले.

"रुक्मीणी तूला माहित कसे नाही. महाराज आज अस्वस्थ आहेत." नारदमुनी उत्तरले.

"काय झालं स्वारींना ? त्या महाली तर काही झाले नाही ना ?" रुक्मीणीने विचारले.
नारदमुनी किंचीत हसले व म्हणाले, " आता नेमके कशाने ते माहीत नाही, पण महाराजांना
असह्य मस्तकशूळ उठला आहे."

"उन्हातान्हाचे फ़िरणे झाले असेल. तिथे कुणी आहे का, काळजी करणारं ? निदान मला तरी
निरोप पाठवायचा. छे मला पाहूदे आधी स्वारींना" असे म्हणत रुक्मीणी लगबगीने अंतपूरात
गेली.

श्रीकृष्ण महाराज शय्येवर पहुडले होते. चेहरा अगदी म्लान होता. राजवैद्य चितांग्रस्त बसले होते.

"महाराज, काय झाले ? मस्तकशूळ कशाने बरं उठला असेल. राजवैद्यानी काही लेप नाही का
लावला ? " रुक्मीणी विचारती झाली.

" अगं हो. आज तूझ्या महाली यायला निघालो आणि हा मस्तकशूळ उठला बघ. कशानेच
बरे वाटत नाही. " श्रीकृष्ण उत्तरले.

" राजवैद्य, अहो कुठलीही मात्रा नाही का चालत ? असा कसा मस्तकशूळ उठला असेल हो ?"
तिने राजवैद्यांना विचारले.

"महाराणी माझ्या संग्रहातल्या सर्व औषधी वापरून बघितल्या. अजून उतार पडत नाही."
राजवैद्य हताश होऊन म्हणाले.

"अहो, मग काही दिव्यौषधी आणायला हवी का ? चहूदिशेने स्वार का नाही पाठवले,
अगदी हिमाचलात जरी काही औषधी असेल, तर .." रुक्मीणीला काहि सूचेनाच.

"महाराणी, एक उपचार आहे. परंतु..." राजवैद्य हळूच म्हणाले.

"अहो मग सांगा ना. द्रव्याची चिंता नका करू. तिन्हीलोकांत कुठेही औषधी उपलब्ध असली
तरी, सांगा. " रुक्मीणी म्हणाली.

"महाराणी, त्यासाठी दूर नको जायला. महाराजांवर प्रेम करणार्‍या स्त्रीच्या पायातळीची माती
घेऊन त्याचा लेप महाराजंच्या भाळावर लावल्यास, त्यांना आराम पडेल" राजवैद्य म्हणाले.

"हे काय ? असा काही उपाय असतो का ?" रुक्मीणीला पटले नव्हतेच.

"महाराणी, ग्रंथात नाही हे पण आमच्या गुरुवर्यांनी हे सांगितले होते. आता बाकि सगळेच उपाय
थकल्यावर....." राजवैद्य म्हणाले.

"काहीतरीच काय. कुठली स्त्री यासाठी तयार होईल ? यापेक्षा मोठे पातक ते काय असणार आहे.
आपल्या पायतळीची माती महारांज्याच्या भाळी ? सात जन्म नरकात खितपत पडेल ना ती स्त्री !
आणखी काही उपाय शोधा. नारदमुनी सर्वज्ञ आहेत. त्यांना नाही का विचारले ? " रुक्मीणी
म्हणाली.

" रुक्मीणी, नारदमुनी त्याच कार्यासाठी गेले आहेत." श्रीकृष्ण महाराज उत्तरले.

***

अजूनही राधेला यमुनातीरी बासुरीचे मंजुळ स्वर ऐकू येतात. अजूनही तिचा पाय, यमूनातीराहून
निघता निघत नाही. घरातील भरलेले हंडे ओतून टाकून ती उगाचच, एकटीच परत यमूनेवर जाते.
आता वयोमानाप्रमाणे ती थकलीय. हंड्याचा भार तिला सोसत नाही. पण कुठलीतरी अनामिक
ओढ तिला आजही यमूनातीरी नेते.

वेळूच्या बनातून बासरीचे सूर, तिला आजही ऐकू येतात. गायीगुरांच्या घोळक्यातील गुराख्याचे एखादे पोर, तिला कृष्णाची आठवण करुन देते. कधीकधी तर तिथे कुणीच नसताना, तो तिथे आहे, असे तिला भासत राहते. अगदी अंधार पडल्यावर, ती नाईलाजाने निघते.

आजही ती अशीच, उन्ह कलताना यमूनेवर आलेली आहे.आजही ती अशीच स्वत:ला हरवून कदंबातळी
टेकलेली आहे. हंडा तसाच पायाकडे कलंडलेला आहे.

आता ती मातीचे घडे आणतच नाही. ते फ़ोडायला आता कुणीही नाही, तरिही..

"नारायण, नारायण, राधा गौळण ना गं तू ? " अचानक तिच्या कानावर नारदमुनींचे शब्द पडले.

"हो मीच ती, पण आपण कोण ? आणि मला ओळखता कसे ? " राधेने विचारले.

"म्हणजे महाराजांनी वर्णन केले होते, तशीच आहेस तू. आणि तू यावेळी इथे असशील असेही म्हणाले होते" नारदमुनी म्हणाले.

राधाला काहीच समजले नाही.

"अगं तूझ्या कृष्णाने पाठवले आहे मला. विसरली तर नाहीस ना त्याला ?" ते पुढे म्हणाले.

" कृष्णाने ? माझ्या कृष्णाने पाठवलेय. कसा आहे तो ? आता मोठा महाराज झालाय म्हणे. तोच विसरला असेल आम्हाला." राधा म्हणाली.

"नाही बरं विसरले. सदोदीत इथल्या सवंगड्यांच्या, गौळणीच्या आठवणी काढत असतात. परत इथे येऊन सर्वांना भेटावे, असे वाटत असते, त्यांना." नारदमुनी म्हणाले.

"पण सवड मिळत नसेल. हो ना ? दोन दोन बायका केल्यात म्हणे. तूम्हाला सांगते, लहानपणी इतक्या खोड्या काढायचा ना आमच्या. बाराजणी होतो, पण रोज रोज आम्हाला त्रास द्यायला. कधीकधी खोड्या अश्या काढायचा, कि पोरं म्हणून दुर्लक्ष करणे कठीण व्हायचे. पण त्याचे ते रुप बघितले, तो पावा ऐकला कि आम्ही सर्व विसरायचो. तरी आमच्यापैकी काही म्हणायच्या देखील, याला खाष्ट बायको मिळू दे म्हणून." राधा हसत म्हणाली.

"राधे, आज तूझ्याकडे खास मागणी करण्यासाठी आलोय, " असे म्हणत, नारदमुनींनी सर्व कथन केले.

***
महाराज अजून म्लान चेहयांने शय्येवर पहुडले होते. रुक्मीणी त्यांच्या भाळावर शीतजलात भिजवलेल्या
वस्त्राने हळुवार मर्दन करत होती.
प्रतिहारी तितक्यात नारदमुनी आल्याची वार्ता घेऊन आला.

"नारायण, नारायण" नारदमुनी म्हणाले, "महाराज आपले औषध आणले आहे बरं"

त्यांनी एक पुरचुंडी राजवैद्यांच्या पुढे धरली. श्रीकृष्णाने ती त्यांच्या हातातून ओढून घेतली आणि स्वत:च्या
भाळावर लावली. क्षणार्धात त्यांचा मस्तकशूळ दूर झाला.

रुक्मीणीच्या चेहर्‍यावरचे भाव बघून, महाराज म्हणाले, "राधेची पायधूळ आहे ही. बघ क्षणात माझा मस्तकशूळ दूर झाला. "

रुक्मीणी फ़णकार्‍याने म्हणाली, "आधी खरा होता का ते सांगा. असा कधी कुणाच्या पायधूळीने कुणाचा
मस्तकशूळ बरा होतो का ? आणि मला खात्री आहे, कि नारदमुनीनी तिला सत्य सांगितलेच नसेल. महाराजांवर जीव असणारी, कुणीही स्त्री असे पातक करणार नाही."

"महाराणी, राधेला सर्व सत्य कथून, तिच्या संमतीनेच तर ही माती मी आणली आहे." नारदमुनी म्हणाले.

"मग काय म्हणाली राधा ?" श्रीकृष्णाने अधीरतेने विचारले.

"राधा म्हणाली, माझ्या कृष्णासाठी सात जन्म काय, यापुढचे सर्वच जन्म मी नरकवास भोगायला तयार आहे." नारदमुनी म्हणाले.

श्रीकृष्णाच्या डोळ्य़ांच्या कडा ओलावल्या.

खजील झालेली रुक्मीणी म्हणाली, "बरं बरं, आम्हाला कळतात बरं अशी नाटकं. आता यावे आमच्या महाली, त्वरीत, मी सिद्धतेला निघतेच."

रुक्मीणी गेल्यावर, नारदमुनी म्हणाले, "महाराज खरे प्रेम आहे राधेचे आपल्यावर."

"म्हणजे माझा कयास खरा ठरला तर." श्रीकृष्ण म्हणाले.

"नाही महाराज." नारदमुनी म्हणाले.

"म्हणजे काय ? राधेने नकार दिला का ? हि माती तिच्या पायतळीची नाही का ?"श्रीकृष्णाने विचारले.

" नाही राधेने ही माती त्वरीत दिली. पण देताना म्हणाली, त्या कृष्णाला सांगा, माझ्या प्रेमाची अशी परिक्षा बघू नकोस. खरे प्रेम करायला, स्त्रीचा जन्मच घ्यावा लागतो. त्याला किंचीतही मस्तकशूळ उठावा आणि मी जिवंत असावे, हे कालत्रयी शक्य नाही." नारदमुनी म्हणाले.

***

(या कथेचा अगदी थोडासा भाग, एका बिहारी लोककथेतून.. )

गुलमोहर: 

निव्वळ सुरेख.... राधा कृष्णाच्या बर्‍याच कथा ऐकलेल्या... आज संग्रहात एका सुंदर कथेची भर पडली...

छान लिहीले आहे.

खूप छान वाटलं वाचून ! बर्‍याच दिवसांनी राधेबद्दल काहीतरी गद्य वाचलं.
" कृष्णकिनारा " वाचलंय का ? अप्रतिम आहे. त्यातली राधा वाचून काहीतरी हलतं आत.

" अबोल प्रिती, मुक्या भावना
तव चरणांची नित्य अर्चना
या देहाच्या निरांजनातील ज्योत तेवती झाले
.......रे कान्हा तुजसाठी मी वेडी राधा झाले ! "

खुप सुंदर.................
शेवटचे वाक्य एकदम खास.............

अ प्र ती म!!! निशःब्द!! खरंच असं निर्व्याज प्रेम करावं ते राधेनेच आणि करवून घ्यावं ते कृष्णानेच!! Happy

आहा! राधाकृष्णाच्या कथा सदोदित ताज्या वाटतात. हीपण तशीच वाटली.

कृष्णकिनारा " वाचलंय का ? अप्रतिम आहे. त्यातली राधा वाचून काहीतरी हलतं आत>>>> अगदीअगदी

चला! मामाठाकूरांनी मनावर घेतले तर! Happy

त्याला किंचीतही मस्तकशूळ उठावा आणि मी जिवंत असावे, हे कालत्रयी शक्य नाही. >>> क्लास!!!! दिनेशदा!!!! खरंच किती मस्त लिहिलेय हो... अतिशय गोड... खुप खुप आवडले. धन्य ती राधा आणि धन्य ते प्रेम... Happy

सुंदर कथा.

शाळेत असताना एक "श्री कृष्ण" म्हणुन कादंबरि वाचलेली त्याची आठवण झाली. त्यात अतिशय सुंदर वर्णने आणि कथा होत्या. दुर्देवाने लेखकाचे नाव आठवत नाहीए. कोणाला माहिती असेल तर सांगा.

राधेची ही कथा माहीत होती.... हे प्रेम, ही भक्ती, हे समर्पण निव्वळ अद्वितीय!! दुर्दैवाने बर्‍याच चॅनेल्समध्ये या भक्तीप्रेमाला प्रियकर्-प्रेयसीचे रूप दिले गेलेय.... इंग्रजाळलेल्या पिढीला राधा कृष्ण म्हणजे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड वाटतात... अरेरे... पण त्यांचीही खरं तर चूक नाहीये... इमोशनल अत्याचरच्या जमान्यात ही भक्ती हे डिव्होशन कोणाला समजेल की नाही कोणास ठाऊक!'

दिनेशदा अत्युत्तम कथा... खुप खुप आवडली Happy पुलेशु
आणि मी सुचविल्याप्रमाणे बाकीच्या चिरंजीवींवर ही लिहा कथा....

दिनेशदा अप्रतिम मांडणी. आधी ऐकली होती पण तुमच्या शैलीत पुन्हा एकदा आवडली.
रच्याकने, बासुरीची तीव्रतेने आठवण झाली मला.

रच्याकने, बासुरीची तीव्रतेने आठवण झाली मला.
=====
मला पण बासुरीची आठवण झाली. मला तिच्या पौराणिक कथा खूप आवडायच्या.

द्रौपदीची कृष्णप्रेमाची पीतांबराची कथा पण छान आहे.
द्रौपदीने केवळ कृष्णाच्या सांगण्यावरुन ५ भावांत भांडणे होउ नये म्हणुन ५ ही जणांशी लग्न केले.

> द्रौपदीने केवळ कृष्णाच्या सांगण्यावरुन ५ भावांत भांडणे होउ नये म्हणुन ५ ही जणांशी लग्न केले.

हे काही पटले नाही.

पाचही पांडव कुंतीच्या आज्ञेत होते. तसेच चार लहान भाउ युधीष्ठीराच्या आज्ञेत होते. त्यांच्यात ईतर कोणात्याही गोष्टीवरुन कधीही भांडणे झाली नाहीत.

तसेच लग्नाआधी द्रौपदीचा कृष्णाशी परीचय असल्याचा उल्लेख महाभारतात नाही.

असे असता केवळ त्यांच्यात भांडणे होतील या (व्यर्थ) भीतीपाई (आपल्या मनाविरुद्ध) द्रौपदी सारखी स्त्री (अनोळखी कृष्णाच्या सांगण्यावरुन) ५ ही जणांशी लग्न करेल असे वाटत नाही.

असो. कथा उत्तम. अतिशय आवडली.

>>द्रौपदीने केवळ कृष्णाच्या सांगण्यावरुन ५ भावांत भांडणे होउ नये म्हणुन ५ ही जणांशी लग्न केले.>>
पाची भावांत एवढे प्रेम असताना एका स्त्री पोटी भांडणे व्हावीत हे पटत नाही. तसेच असे म्हणतात द्रोपदी स्वयंवर जिंकल्यानंतर पाची भाऊ जेव्हा घरी आले तेव्हा कुंती कुटी मधे होती. आणि कोणीतरी एकाने(बहुतेक युधिष्ठर) हाक दिली, "माते भिक्षा आणली आहे ".
तेव्हा कुंतीने आतूनच सांगितले कि पाची भावात वाटून घ्या. आता हि पण गोष्ट पटण्यासारखी वाटत नाही. स्वयंवरामध्ये जिंकलेली द्रोपदी हि भिक्षा कशी होऊ शकते? आणि जेव्हा कुंतीला सत्य समजले तरीसुद्द्धा तिने पाचही भावांशी लग्न करायची परवानगी कशी दिली ?

शिवाय आणखी एक प्रश्न युधिष्ठर जेव्हा सदेह स्वर्गाच्या दाराशी पोहचला तेव्हा त्याने विचारले कि त्याचे बंधू आणि द्रोपदी सदेह का येऊ शकत नाहीत? तेव्हा द्वारपालाने (कि यमाने, कि इंद्राने??) कारणे सांगितली. त्यात द्रोपदिबद्दल सांगितले होते कि, जरी तिचे पाच पती होते तरी अर्जुनावर जास्त प्रेम होते. म्हणून तिला थोडा काळ नरकात राहावे लागेल. जर असे असेल तर "नरो वा कुंजरोवा" म्हणणारा आणि गुरुवधाला कारणीभूत ठरणारा युधिष्ठर सदेह कसा स्वर्गी जाऊ शकतो? आणि जर द्रोपदीच अर्जुनावर प्रेम होत तर तिला पाच पुरुषांशी लग्न का कराव लागल?

कोठेतरी द्रोपदीच्या पूर्वजन्माची आणि तिला मिळालेल्या शापाची कहाणी वाचली होती, पण आता आठवत नाही आणि कोठे लिंक देखील सापडत नाही. मी ह्या कथा फार लहानपणी वाचल्या आहेत. त्यामुळे संदर्भ लागत नाहीत. कोणाला माहित असल्यास सांगाव्यात.

>>द्रौपदीची कृष्णप्रेमाची पीतांबराची कथा पण छान आहे.>>
ह्या कथेवरून मला शामची आई चित्रपटातील "भरजरी ग पितांबर" गाणे आठवल. माझ फार आवडीच गाणे आहे.

Pages