उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग २ - वीरों का मठ मार्गे कुंभळगड़ ... !

Submitted by सेनापती... on 28 October, 2010 - 16:21

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

दुसऱ्या रात्रीचे 'घोराख्यान' ऐकून झाल्यावर सकाळी जागे झालो तेंव्हा चांगलेच उजाडले होते. पण जाग आली होती ती छपरावर नाचणाऱ्या माकडांमुळे. १-२ नाही तर अख्खी टोळी होती त्यांची. आम्ही सर्व सामान पटापट आवरून घेतले आणि त्यांचे फोटो काढायला लागलो. एकेकाची शेपटी ही........ मोठी. फोटो तर बघा काय सही आले आहेत त्यांचे.

नाश्ता हादडला आणि निघणार तितक्यात गावातला एकजण आख्खी टोपली भरून सिताफळ विकण्यासाठी घेउन आला होता. त्याने ती टोपली खाली ठेवल्या-ठेवल्या आम्ही बोललो. 'कैसे दिया?' त्याची भाषा जरा राजस्थानी असल्याने काही शब्द आम्हाला कळले नाहीत. मग शिवसिंग बोलला. '१५० रुपया'. आम्ही म्हटले 'काय? फ़क्त १५०?' त्या टोपलीमध्ये किमान ६०-७० सिताफळे होती. ती सुद्धा चांगली मोठी-मोठी. आम्ही सर्वांनी मिळून ती टोपली घ्यायची ठरवली.

पण बाकीचे ट्रेकर्स रडू लागले की 'इतना क्या करना है? कौन खायेगा?' मग आम्ही त्या सर्वांच्या हातावर ४-५ सिताफळे टेकवली आणि बाकी सर्व पैसे देऊन स्वतःच्या ताब्यात घेतली. हे असे घबाड हातात आल्यावर कोण सोडेल काय... Lol इतकी सारी घेतली खरी पण ती ठेवायची कुठे हा प्रश्न होतच. मग काही माझ्या सॅक्समध्ये काही दिपकने एका हातात पिशवीत घेतली. बाकी सर्व आम्ही तिथल्यातिथे फस्त केली. अखेर ती 'फळे रसाळ गोमटी' खाऊन झाल्यावर आम्ही ट्रेकरूट वर निघालो. आल्यामार्गे थोड़े मागे जाउन पुन्हा कालच्या त्या टेकडीला अर्धा वळसा मारत आता पलीकडच्या बाजुला पोचलो आणि मग तिकडून खालच्या बाजुला डावी मारत पुढे निघालो. आजच्या दिवसात फ़क्त १२ किमी. ट्रेककरून कुंभळगड़ येथे पोचायचे होते.पल्ला तसा लांबचा नव्हता. तेंव्हा पुन्हा एकदा आम्ही 'जाऊ दे सर्वांना पुढे' असे म्हणत फुरसत मध्ये होतो. काही अंतर पुढे जातो न जातो तोच सगळीकडे उशाची शेती दिसू लागली. मला तर एकदम कोल्हापुरला आल्यासारखे वाटले. ऊस पाहिल्या-पाहिल्या पुन्हा एकदा ऐश्वर्या उवाच - 'रोहन मला ऊस हवाय खायला' मग आम्ही सर्वच उसाच्या शेतात शिरलो. पण ऊस काही मिळाला नाही. कारण ज्याचे शेत होते तो काही तिकडे आसपास नव्हता. तोडून घ्यावा असे मनात आले होते एक वेळ पण म्हटले नको. पुढे मिळाला की घेउच.

तिकडे संजू उसाच्या शेता शेजारी असणाऱ्या रहाटावर जाउन बसला. राजस्थानात पाउस तसा कमीच. तेंव्हा जमीनीखालील पाणी सुद्धा कमीच. असते ते सुद्धा खोलवर. तेंव्हा इकडच्या विहिरी सरळसोट खोल आणि बांधीव असतात. त्यातून पाणी काढताना रहाट हाताने खेचायच्या ऐवजी बैलजोड़ी वापरून मोट लाउन खेचले जाते. यामुळे कमी वेळात जास्त पाणी निघते. हे यंत्र कसे असते ते फोटोमध्ये बघू शकता.

\

काटकोनात असलेली २ चाके एकमेकात गुंतवली असतात. बैल जसे-जसे गोल-गोल फिरत लाकडाला बांधलेले वरचे आडवे चाक फिरवतात तसे खालचे चाक उभे फिरू लागते. ह्या चाकाला समांतर असे दुसरे चाक विहिरीवर बसवलेले असते. त्यावर बसवलेल्या असतात लोखंडी पटया आणि पाणीवर भरून आणणारे लोखंडी डबे. ही खालची चाके फिरून-फिरून पाणी वर काढत राहतात. ह्यात २ पद्धती असतात. आपण आधी पाहिली ती एक आणि दुसरी म्हणजे विहिरीच्या थेट वरती बसवलेले रहाट.

ह्यात समांतर असे दुसरे चाक बसवायची गरज नसते. जिथे थेट विहिरीच्या एकदम बाजुला बैल फिरवायला जागा नसते तिकडे पहिली पद्धत वापरून पाणी उपसा केला जातो. तिकडे १०-१५ मिनिट्स आम्ही 'पाणी उपसा' पद्धत बघत उभे होतो. बाकी बरेच ट्रेकर्स पुढे चालू पडले होते. आमच्यात बरेच अंतर सुद्धा पडले होते. सर्वात शेवटी आम्ही तिकडून निघालो आणि मग पक्क्या डांबरी रस्त्यावरुन 'वीरों का मठ' या गावाकडे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला आता ऊसच-उस होता. पण एक मिळेल तर शप्पथ. ऐश्वर्याचे 'मला ऊस.. मला ऊस..' सुरूच होते. शेवटी म्हटले 'आता त्या शेतात घुस.' जागोजागी ऊस आणि त्याच्या बाजुला बैलजोड़ीचे रहाट. दूरच्या शेतात एक मस्त दृश्य टिपायला मिळाले.

आपल्या बैलजोड़ी सोबत शेतकरी रहाटावर पाणी उपसत होता आणि ते पाणी पाटातून वाहत शेताकडे जात होते. ते दृश्य टिपायला मी एकटाच मागे थांबलो होतो. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. काही वेळात मी पुढे जाउन पोचलो तर सर्वजण रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसले होते आणि उरलेली सिताफळे आणि मोसंबी खात होते. कितीही खाल्ली तरी मन भरेना अशी गोड गोड सिताफळे होती ती. बाजुच्या एका गावातली शाळात सुटली होती आणि लहान लहान मूले सर्वांकडे पेन मागत होती. लडाखमध्ये सुद्धा आम्हाला हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला की मूले खाऊ किंवा पैसे ऐवजी पेन मागत आहेत आमच्याकडे मात्र त्यांना द्यायला पेन काही नव्हते... Sad

तेंव्हा तिकडून पुढे निघालो. इतक्यात एक पोलिस जीप आमच्या शेजारी येउन थांबली आणि त्यांनी आम्ही कुठून आलोय, कुठे जातोय हे सर्व विचारले. मुंबईहून आलोय असे सांगितल्यावर तर काय गप्पाच मारायला लागले. आम्ही अजून मागे-मागे राहू म्हणुन कसे बसे त्यांना सांगून पुढे सटकलो. ५ मिनिट्स वरतीच वीरों का मठ होता.

हे एक शंकर मंदीर आहे. शिवाय आतमध्ये एक गणेशमंदिर सुद्धा आहे. आम्ही दर्शन घेउन ज़रावेळ आत विसावलो. मंदिरात वापरलेला दगड आसपास इतके ऊन असुनही कमालीचा थंड होता. शिवाय मंदिरात एक छोटीशी विहीर होती त्यातले पाणी तर एकदमच गारेगार. मस्तपैकी फ्रेश झालो आणि पुढे निघालो. दुपारचे २ वाजून गेले होते आणि जवळचे पाणी पुन्हा संपत येत होते. पण पाणी किती ते प्यायचे... राजस्थानला आल्यापासून दूध-दही-ताक असे काहीच चाखले नव्हते. ते कुठे मिळेल का ते आम्ही बघत होतो. नशिबाने पुढच्या गावातच एका घरात आम्हाला दही - ताक प्यायला मिळाले. झाले असे की आम्ही गावात गेल्या-गेल्या ऐश्वर्याने एका बाईला विचारले की कुठे ताक-दही मिळेल का. तर ती म्हणाली,"आप यहाँ बैठिये, मै लेके आती हू." आणि त्या बाईने चांगले हंडा भरून ताक आणि वाडगा भरून दही समोर आणून ठेवले. अहाहा.. जो काही थकवा होता ते ताक प्यायल्यावर असा पळून गेला. भूका सुद्धा लागल्या होत्या मग सोबत ड्रायफ्रूट कचोरी असा कोंम्बी जमला. इतके सर्व होईपर्यंत ती बाई शेतात जाउन नवरयाला जेवण देऊन आली होती. तिला पैसे द्यायला गेलो तर ती घेईना. 'नहीं नहीं. इसके कैसे पैसे' ऐकेच ना. मग शेवटी तिच्या पोराला आम्ही खाऊ दिला. तृप्त होउन 'अन्नदाता सुखी भव' असे म्हणत आम्ही तिकडून निघणार तितक्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या उवाच - 'यहा गन्ना मिलेगा?' त्या बाईने हिला शेतातून ऊस सुद्धा आणून दिला. अखेरची शांत झाली एकदाची ती.

आता कुंभळगड़ अगदीच जवळ आले होते. आम्ही आता 'आरेठ की भागल' या गावातून पुढे निघालो. गावातल्या शाळेसमोर एका पिंपळाच्या झाडावर चिक्कार वटवाघुळे लटकली होती. चक्क दुपार असून सुद्धा. थोड़े पुढे जातो तोच आमचा गाईड शिवसिंग म्हणाला,"यहाँसे आगे जा रहे हे; तो मेरे घर भी चलिए". अरेच्या हे तर त्याचेच गाव होते. तो आम्हाला त्याच्या घरी घेउन गेला. काहीजण मात्र 'नही-नही हम आगे जायेंगे' करत पुढे निघून गेले. कसे असतात ना काही लोक. तो इतका घरी बोलावतोय आणि हे आपले सुटले आहेत. आम्ही मात्र त्याच्या घरी गेलो. चांगले १ मजली घर होते. खालची खोली बंद होती. बहुदा सामानाची असावी. बाहेर छोटासा गोठा होता. त्यात एक गाय आणि तिचे वासरू होते. आम्ही जीने चढून वर गेलो. छोटीशी गच्ची होती आणि मागे खोल्या. आम्ही गच्चीवर विसावलो. शिवसिंगने आतून २-३ कटोरी भरून दही आणले. ऐश्वर्याला देत म्हणाला,"ये भी चख के देखिये." मग त्याने बाकीच्यांना सुद्धा दही दिले. इतके गोड दही नाही बा मी चाखले कधी. काही वेळात आम्ही तिकडून निघालो आणि पुढच्या मार्गाला लागलो. आता उसाची शेती संपली होती आणि रस्त्याच्या बाजुला झाडांवर सिताफळे दिसत होती. गावानंतर कच्चा रस्ता संपला आणि आम्ही पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. कुंभळगड़चा बोर्ड सुद्धा दिसला. थोडेसे पुढे लगेच रस्त्याच्या बाजुला 'लकी होटेल' लागले. आमचा आजचा ठिकाणा हाच होता.

तिकडे एकुण ३ खोल्या होत्या. २ पुरुषांसाठी तर १ स्त्रीयांसाठी. शिवाय बाहेर काही खाटा टाकल्या होत्या. पण त्या आम्ही येईपर्यंत आधी पोचलेल्या काही जणांनी पटकावल्या होत्या. आम्ही मग एका खोलीत आमचे सामान ठेवले आणि आसपास चक्कर मारायला बाहेर पडलो. राजस्थानमध्ये आल्यापासून म्हणजेच ३ दिवस झाले होते तरी काहीही मांसाहांरी जेवण झाले नव्हते. तेंव्हा इकडे तरी काही मिळते का ते बघायला खरे तर आम्ही निघालो होतो. जवळच एक छोटेसे दुकान सदृश्य होटेल दिसले. त्याला विचारले तर मॅगी मिळेल असे म्हणाला. आम्ही आत जाउन बसलो तर आम्हाला येउन विचारतो कसा. 'कैसे मांगता है? वेज या ......' त्याचे बोलणे देखील पूर्ण न होऊ देता मी त्याच्या छोट्याश्या किचनमध्ये डोकावलो. 'नॉन-व्हेज भी है?' तो उत्तरला,"नही नही. मी पूछ रहा हू व्हेज चाहिए या प्लेन चाहिए.' हात्तीच्या.. आज सुद्धा काही नॉन-व्हेज मिळायचे नव्हते. थोडीशी खादाडी करून होटेलवर परत आलो. ७ वाजत आले होते. चहा घेतला आणि कुंभळगड़च्या दिशेने निघालो.

दररोज रात्री ८ ते ८:३० ह्या अर्ध्या तासात इकडे 'लाईट शो' असतो. पहिल्या रामपोल दरवाजा ते वरच्या बदाम महालापर्यंत सर्वत्र यल्लो लाइट्स लावलेले आहेत. अत्यंत सुंदर दिसतो कुंभळगड़. आपल्याकडे कधी करणार असे टुरिझम देवजाणे. तिकडे अर्धातास थांबुन आम्ही काही फोटो घेतले आणि मग जेवणासाठी होटेलवर परतलो. जेवल्यानंतर सुद्धा आम्ही बराच वेळ गप्पा मारत होटेल बाहेर रस्त्यावर बसलो होतो. झोपायला म्हणून आत गेलो तेंव्हा त्या छोट्याश्या खोलीत घोरण्याचा इतका आवाज येत होता की असह्य झाले होते. शेवटी सामान उचलले आणि बाहेर येउन झोपलो. आत्ता कुठे ९:३० होत होते आणि ह्यांचे फुल ऑन 'घोरायण' सुरू झाले होते. ऐश्वर्या, मनाली आणि अनुजा सुद्धा त्यांच्या खोलीमधून बाहेर येउन आमच्या बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. अचानक माझ्या अंगात काय आले माहीत नाही पण मी 'राजू श्रीवास्तव'ची एक्टिंग सुरू केली. त्यानंतर जे काही घडले ते अवर्णनीय आहे. राजूने लाफ्टर चाल्लेंज मध्ये जे-जे एपिसोड करून दाखवले ते-ते सर्व मी तसेच्या तसे डायलोंग आणि एक्टिंग सकट प्रेझेंट केले. खरंतरं हां कैंपफायर आयटम होता. संजू, अनुजा आणि ऐश्वर्या इतके जोरात हसत होते की झोपलेले जागे झाले आणि घोरणारे सुद्धा उठले. सत्संग प्रवचन पासून शोलेवाला, आणि डिनर पासून ते न्यूज़ रीडर पर्यंत असे सर्वच्यासर्व आयटम मी १ तास करून दाखवले. संजू पाय वर घेउन आणि लोळून-लोळून राक्षसी हास्यासकट फुटला होता. अखेर १०:३० वाजता मुलींच्या खोलीमधून एक बाई बाहेर आली आणि तिने कैंपलिडरकडे तक्रार केली. आम्ही म्हटले १०:३० तक तो कैंपफायर का टाइम होता हे सर. पण मग आम्ही झोपून गेलो. त्या एकतासात जी काही मज्जा आली ती पुन्हा नाही आली कधी. Lol

गेले २ दिवस आम्हाला जागे ठेवून स्वतः घोरायण करणारया घोरटयान्ना आज आम्ही जागे ठेवले होते. थोड्या वेगळ्या स्टाइलने. शेवटी ११ वाजता आम्ही गुडुप झालो. सकाळी लवकरच निघायचे होते... कुंभळगड़ बघायला...

क्रमश: ... पुढील भाग - 'कुंभळगड़' मार्गे 'ठंडीबैरी' ... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच! ट्रेक म्हणायचा का खाउगिरी! येवढं सगळं खाउन चालताना काही त्रास नाही झाला?!
मागच्या भागातली खाण्याची नोटिस इथही दे.

ण मी 'राजू श्रीवास्तव'ची एक्टिंग सुरू केली. त्यानंतर जे काही घडले ते अवर्णनीय आहे. राजूने लाफ्टर चाल्लेंज मध्ये जे-जे एपिसोड करून दाखवले ते-ते सर्व मी तसेच्या तसे डायलोंग आणि एक्टिंग सकट प्रेझेंट केले. >> हे सांगितलेस ते बरे केलेस... Proud

बाकी मस्त वर्णन Happy

दिनेशदा.. असे रहात पूर्वी वसई, विरार आणि पालघर भागात सहज दिसायचे. पाण्याची कमी नसायची तरी.
बरोबर बैल किंवा रेडे वापरून पाणी काढले जायचे..

माझ्या लहानपणी आमच्या गावाला मोठ्या विहिरीवर अशीच पद्धत होती.

सुन्दर!