कोकण यात्रा - १: केळशी - दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी

Submitted by मंदार-जोशी on 30 January, 2010 - 02:58

कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने
अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं
पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली
सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता
येणार्‍या या गावाला पर्याय नाही.

स्वतःचे वाहन घेऊन जायचे असल्यास छानच, पण घाटात वाहन चालवण्याचा
अनुभव असणारा चालक बरोबर असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम. पु.लंच्या 'म्हैस'
ह्या कथेत म्हटल्याप्रमाणे "गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं प्रवाशांना निराळ्या
अर्थाने लागायला लागली" असा प्रकार ज्या लोकांच्या बाबतीत होतो त्यांनी आधीच
औषधे घेतलेली बरी.

गावातल्या मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ठ्यपूर्ण रचना
आहे. रेल्वे फलाटासारख्या दिसणार्‍या वरच्या भागाला पाखाडी आणि खालच्या
भागाला बिदी असे म्हणतात. ह्या पाखाड्या जांभ्या दगडाचे चिरे वापरून केल्या
आहेत. इथे पडणार्‍या धो धो पावसामुळे ये-जा करायला त्रास होऊ नये म्हणून ह्या
पाखाड्या तयार केल्या आहेत. पवसाळ्यात बिदीवर असणार्‍या घरातील अंगणापासून
ते समोरच्या पाखाडीपर्यंत छोटे पूल बांधले जातात.

वरच्या अंगणाच्या कडेपर्यंत पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे हा भाग पावसाळ्यातल्या
व्हेनिस सारखा दिसू लागतो. असं असलं तरी बोटी वगैरे चालवण्याचा विचारही नको,
कारण पाऊस एकदा बदा बदा कोसळू लागला की घराबाहेरचं काहीही दिसत नाही.
त्यामुळे हे अतिरेकी हवामान सहन करण्याची ताकद आणि तयारी असेल तरच
पावसाळ्यात येण्याचे धाडस करा. नाहीतर घरात पत्ते कुटत बसण्याची वेळ यायची!

केळशी 'पर्यावरण जपणारे गाव' अशी आपली प्रतिमा बनवू पाहत आहे. गावात
काही घरात गावकर्‍यांनी गोबर गॅसची सोय करून घेतली आहे व इतरही अनेक
घरात तशी सोय करायचं घाटत आहे.

कोकणातील इतर अनेक गावांसारखाच केळशीलाही रम्य, शांत, नयनमनोहर
असा समुद्रकिनारा लाभला आहे, अगदी गोव्याच्या तोडीस तोड.

नियोजित मुंबई-गोवा सागरी महामार्गाच्या अर्धवट बांधकामामुळे ह्या सौंदर्याला
जरा डाग लागल्यासारखं झालं असलं, तरी अजूनही त्याने आपला देखणेपणा
टिकवून ठेवला आहे.

रामाचे देऊळ उजवीकडे टाकून साठे आळीतून सरळ उत्तरेकडे पुढे गेलं की आपण
एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो. एक नैसर्गिकरित्या तयार झालेली
वाळूची टेकडी आपल्याला पहायला मिळते. शासन दरबारी असलेल्या पुरातत्व
विभागाच्या दस्तैवजांनुसार ही वाळूची टेकडी साधारणपणे वास्को-दि-गामाच्या
भारत भेटीच्या आसपास पंधराव्या शतकात एका सुनामीमुळे तयार झाली आहे.

या टेकडीवर सरसर चढून जाणं आणि वेगाने घसरत खाली येणं हा येथे येणार्‍या
बाळगोपाळांचा आवडता उद्योग. या खेळात क्वचित मोठेही सहभागी होताना दिसतात.
टेकडीवर बसून दिसणार्‍या सूर्यास्ताची शोभा काही औरच, असा या ठिकाणाला भेट
दिलेल्या पर्यटकांचा अनुभव.

सर्वप्रथम १९९० साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयातील अभ्यासक प्राध्यापक
डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी ह्या टेकडीबद्दल काही शास्त्रीय निरिक्षणे नोंदवली होती.
तसेच डॉ. अशोक मराठे या पुरातत्व शास्त्रज्ञाने डेक्कन महाविद्यालयतील काही
सहकार्‍यांसह या वाळूच्या टेकडी संबंधात संशोधन केले. त्यात काही महत्त्वाच्या
गोष्टी समोर आल्या:

किनार्‍यावरील इतर टेकड्यांपेक्षा ही टेकडी वेगळी आहे. केळशी परिसरात
जास्तीत जास्त ८ मीटर हून अधिक उंचीची टेकडी आढळत नसताना ही टेकडी
मात्र तब्बल २८ मीटर उंच आहे. इथे सापडलेली खापरे, माशांची हाडे यांचा
काळ तेराव्या शतकाचा असल्याचे संशोधनाअंती समजले.

या टेकडीत काळे-पांढरे वाळूचे थर स्पष्टपणे आढळून येतात. काही ठिकाणी राखेचे
थर, कोळसायुक्त वाळू, सागरी माशांची हाडे, खापरे व मडक्यांचे तुकडे, शंख-शिंपले
आणि क्वचित नाणीही आढळतात. टेकडीच्या माथ्याकडील भागत गाडल्या गेलेल्या
दोन मानवी कवट्यांच्या जवळ चांगल्या अवस्थेत असलेली तांब्याची सहा नाणी आढळली
होती. त्यांच्यावर "अल् सुलतान अहमदशहा बिन अहमद बिन अल् हसन अल् बहामनी ८३७"
असा मजकूर दिसतो. याचाच अर्थ ही नाणी बहामनी सुलतान अहमदशहा पहिला याने
हिजरी सन ८३७ म्हणजे इ.स. १४३३ मध्ये वापरात आणली हे उघड होतं. टेकडीच्या पायथ्याशी
सध्या ज्या भागापर्यंत भरतीचे पाणी येते, तेथे एक जांभ्या दगडाच्या चिर्‍यांनी बांधकाम केलेली
शिलाहारकालीन जुनी पक्की विहीर आहे.

पुढे सागरी महामार्गाच्या निर्मितीसाठी आपल्या अचाट सार्वजनि़क बांधकाम विभागाने जे.सी.बी.
यंत्राच्या सहाय्याने टेकडीच्या मध्यापासून काही भाग खणून काढला. परंतु पुरातत्वीय संशोधन
पूर्ण झालेले नसल्याने आणि हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा कायमचा जतन व्हावा ह्यासाठी ह्या
वाळूच्या टेकडीचा विनाश थांबावा हा अर्ज न्यायालयात ग्राह्य धरला जाऊन सागरी महामार्गाच्या
कामावर न्यायालयाने बंदी आणली.

गावात अनेक देवळे आहेत, पण त्यातली प्रमुख दोन – एक रामाचे देऊळ
आणि दुसरे महालक्ष्मीचे.

याच दोन देवळांशी गावातले दोन प्रमुख उत्सव निगडीत आहेत – रामनवमी
आणि महालक्ष्मीची यात्रा. असे म्हणतात की लागू घराण्यातील एका गृहस्थांच्या
स्वप्नात देवी आली व तिने आपण नक्की कुठे आहोत ते सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी
खणले असता देवी सापडली व त्यावर देऊळ बांधण्यात आले. असेही म्हटले जाते की
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला केलेला नवस इथे फेडता येतो. ह्या दोन देवळांची माहिती
एकत्रित देण्यामागचा हेतू हा, की रामनवमीचा उत्सव आणि महालक्ष्मीचा उत्सव हे
दोन जवळ जवळ जोडूनच येतात. कोकणच्या उत्सवांची खरी मजा लुटायची असेल
तर मुक्काम ठोकून हे दोन्ही उत्सव पहावेत. महालक्ष्मीच्या उत्सवाचे वर्णन एका कवीने
पुढीलप्रमाणे केले आहे, त्यातूनच आपल्याला कल्पना येईल.

देवीचे गाणे - श्री महालक्ष्मी केळशी
उत्सवाचा काल सत्वरी जवळी तो आला
प्रेमभराने ग्रामस्थांसी मोद बहु झाला || धृ ||
चैत्रमासी आनंद होतो मातेच्या सदनी
पाडव्याच्या दिनी जातसे ढोल गृहवरुनी
जमती सारे मानकरी नी ग्रामस्थ दोन्ही
श्रावण करिती वर्षफळाचे अनन्य चित्तानी
नूतन वर्षी समाराधना घालीतसे कोणी
वारी नेमुनी चूर्ण सेविती गंधाची वाटणी
ऐशी रिती उत्सावासी प्रारंभ केला || प्रेमभराने _ _ _ १ ||

दुसरे दिवशी जमती सारे वारी एकत्र
गृहागृहांतून पट्टी गोळा करण्याचे सत्र
तक्रारीला जागा नाही ऐसे ते तंत्र
नियमबद्ध तो केला ऐसा उत्सव सुयंत्र
साक्ष देतसे शिक्षा करुनी त्यासी अपवित्र
सरसावे जो फुट पाडण्या देऊनी कानमंत्र
ऐशा रीती सहा दिवस तो काळ त्वरे गेला || प्रेमभराने _ _ _ २ ||

अंगणात तयार केला मंडप भोजना
सप्तमीच्या दिवशी कामे असती ती नाना
आकडी घेउनी फिरती वारी केळीच्या पाना
दोन डांगा ओढा ऐशी आज्ञा हो त्यांना
हक्काचा तो फणस द्यावा त्वरित महाजना
सायंकाळी भाजी चिरण्या भगतांच्या ललना
पातवड्याचे खोरे झाले तयार सेवेला || प्रेमभराने _ _ _ ३ ||

अष्टमीच्या दिवशी चाले भोजन जोरात
प्रसाद भक्षण करा यथास्थित गोडी बहु त्यात
साठे-आखवे-परांजपे हे वाढती पंक्तीत
प्रसादाचे खोरे जाती इतर ज्ञातीत
फणस भाजी, वांगी हरभरे पातळ भाजीत
पुरण लोणचे यांची गोडी नाही वर्णवत
सारच तो दिमाख चाखुनी जीव बहु धाला || प्रेमभराने _ _ _ ४ ||

कलमदानी मंडपात सहा बैठका
हरिदासाची मध्ये आणि समोर बैदिका
उजवी बाजू असे राखिली ग्रामस्थ लोकां
डावे बाजूस मानकर्‍यांची बसते मालिका
लामणदीप आणि समया तेवती चंद्रिका
दोन बैठका वाढून दिधल्या इतर त्या लोकां
कीर्तनासी प्रारंभला रंग बहु आला || प्रेमभराने _ _ _ ५ ||

गोंधळाची वेळ जाहली ऐका वृतांत
मधे गोंधळी वामभागी पुजारी तिष्ठत
चांदीची ती दिवटी बुधली विलसे हस्तात
सभोवताली साथ चालते इतर चौघांत
गोंधळगीत चालले ते ऐसे रंगात
पूजा जाहली तेव्हा केले दीप प्रज्वलीत
गीत संपले दीप समूह तो पारावर गेला || प्रेमभराने _ _ _ ६ ||

एकदिशी उत्सवात दिवस भाग्याचा
कामे असती बहु त्या दिनी वेळ महत्वाचा
दागदागिने घातलेला नवीन झिलईचा
मुखवास तो नेऊन ठेविती पेटीत अंबेचा
अबदागीर वाजंत्री नी डंका बाराचा
वारा चवर्‍या उष्मा होतो प्रवास लांबीचा
वार्षिक राज्या पाहुनी भाविक मानस गहिवरला || प्रेमभराने _ _ _ ७ ||

हंड्या ग्लासे छते लावुनी करिती तो छान
कलमदानी मंडप होतो शोभायमान
मखरताटी रथपुतळीची मूर्ती ठेऊन
आत राणी राज्या करीतसे जणू संस्थान
श्री निसबत कारभारी सही संपूर्ण
रुप्या ताटी चांदीची ती समई ठेऊन
धामधुमीचा दिवस ऐसा वेगे तो गेला || प्रेमभराने _ _ _ ८ ||

द्वादशीला लिखिते जाती तेरा ग्रामात
अजरालय मुळवट वेळवट यांत
त्रयोदशीला अमुची यात्रा त्वरे पार पडत
भालदार विडेवाटणी सेवक लोकांत
प्रातःकाली बहिरी दर्शन जन संघ निघत
चांदीचा मुखवास लागला मूर्तींना आत
पावलीची ओढ लागली ढोल्या गुरवाला || प्रेमभराने _ _ _ ९ ||

चतुर्दशीला जेवणवाडी तयार ती केली
रथ स्थापना करुनी मंडळी सत्वर परतली
भोई जेवणकीस तयारी देवळात गेली
उभाघर, तिठ्ठे आळी वाढू लागली
त्रयोदशी नी चतुर्दशी या दोन्ही दिनकाळी
चीरकदान दिवल्याचे ते मंडप भवताली
चांदीचा मुखवास लागला मंडप स्वमिनीला || प्रेमभराने _ _ _ १० ||

आज बलुते जाति सर्वही सेवक लोकांत
जोशी, खरवळे, शिधये, गद्रे ब्राह्मण ते त्यांत
क्षेत्रपाल नी रथपुतळीला केळवण होत
वेळातटीचे लोक उतरती गद्रे गृहात
चतुर्दशीचे शुभ्र चांदणे पडले प्रशांत
आजारालययिचे लोक तळ्यावर बसुनी हवा खात
डोळांभरुनी पाहुनी घ्याहो सत्वर मूर्तीला || प्रेमभराने _ _ _ ११ ||

वेळ जाहली मंडपी आले परके ग्रामस्थ
आदर सत्कारांची त्यांच्या धावपळ ती होत
ठायी ठायी उभे राहुनी वृद्ध जाणिस्त
गुलाब अत्तर वार्‍यांकरवी त्यांस देववीत
हजार त्यांचे मानकरी जे विडा उचलीत
भालदार हो प्रवेश करिती वाजत गाजत
चकित व्हावे पाहुनी ऐशा कडक शिस्तीला || प्रेमभराने _ _ _ १२ ||

पहाटेची वेळ जाहली गोंधळ उतरला
सोनियाचा कळस, आरसा, रथ सज्ज झाला
चांदीचा तो दीप लागे आज आरतीला
मंडपात ताटामधुनी गुलाल उधळीला
"आई जगदंबे अंबाबाई" भजन घोष झाला
रथाभोवती चंद्रज्योती पुष्पनळा फुलला
रथयात्रेचा पौर्णिमेचा दिवस उजाडला || प्रेमभराने _ _ _ १३ ||

पौर्णिमेच्या मंगल आणि रम्य प्रातःकाळी
रथाभोवती जमते ब्राह्मण तरुणांची टोळी
"दुर्गे दुर्गट वारी" ऐशी आरती ती सगळी
घाईघाईने खांदी घेती तेव्हा रथपुतळी
रेटारेटी कौतुक पाहे जनता ती भोळी
"हर हर महादेव" ऐशी उठे आरोळी
हौस फिटली ह्या वर्षीची रथ पुढे गेला || प्रेमभराने _ _ _ १४ ||

पाखाडीशी भोई ज्यात तयार ते असती
ब्राह्मण जाऊनी डुंगवाले रथ पुढे नेती
मिरवत मिरवत आठ वाजता गद्र्यांच्या पुढती
डेल्यावरती घेत बसला तेव्हा विश्रांती
पीठाचे ते दिवे लाउनी स्त्रिया पूजा करिती
दही पोहे थंडगारसे भोई सेविती
प्रसाद खाता "भले ग भोई" शब्द तदा स्फुरला || प्रेमभराने _ _ _ १५ ||

महाजन सदनी प्रसाद आज पुरणपोळीचा
वारी त्यांना लाभ देती आपल्या पंक्तीचा
वेळ असतो तब्बल तेथे तीन तासांचा
उपाध्याय पूजा सांगण्या हक्क स्त्रियांचा
प्रवास संपे ऐशा रीती सर्व उभागराचा
साठे आळी फिरुनी आला उलटा रथ साचा
नवागरसि भोई आले आता सेवेला || प्रेमभराने _ _ _ १६ ||

नापित पूजा घेउनी फिरला परांजपे वाडी
हक्क पुजेचा जुना स्त्रियांच्या फडक्यांच्या फेडी
होळी बहिरी पेठ आणि पिंपळ पिछाडी
दोन भाया तेकुनी तेथे कुंभार वाडी
त्वरे घेउनी इतर स्थळे आला आघाडी
शेतामध्ये पुतळादेवी त्वरे रथ सोडी
इकडे म्हणती आता रथ जड आला || प्रेमभराने _ _ _ १७ ||

गावाच्या दक्षिणेस व देवीच्या देवळाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी
सोळाव्या शतकात बांधलेला याकुब बाबांचा दर्गा आहे. महाराजांनी यांना
गुरुस्थानी मानले होते व आपल्या कोकण दौर्‍या दरम्यान केळशीस येऊन
त्यांचे आशीर्वादही घेतले होते अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.

केळशीला कधी जावे: अक्षरशः वर्षातून कधीही जावे. तरीही सांगायचे
झाल्यास महालक्ष्मीच्या यात्रेदरम्यान व डिसेंबर-जानेवारी ह्या थंडीच्या
महिन्यांत जाणे सगळ्यात चांगले.

जवळची गावे: आंजर्ले - इथलीही यात्रा पाहण्यासारखी असते;
आडे, उटंबर, दापोली, करडे, आसूद, हर्णै, मंडणगड, वेळास,
बाणकोट, श्रीवर्धन.

प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि केळशी:

  • कॅम्लिनचे संस्थापक श्री. नानासाहेब दांडेकर हे केळशीचे.
  • लोकमान्य टिळक यांचे आजोळ.
  • आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा-पणजोबा केळशीचे.
  • मध्यप्रदेशात मराठी झेंडा फडकत ठेवणार्‍या माजी मंत्री व खासदार
    सुमित्रा महाजन यांचं सासरघरचं गाव हे केळशी.

राहण्याची सोयः
केळशीमध्ये मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
पुढील सर्व ठिकाणी मद्यपान, धूम्रपान व मांसाहार निषिद्ध आहे.

१) श्री. गिरीश बिवलकर (विष्णू): ०२३५८-२८७३१२.
इथे मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
कुटुंब असल्यास प्राधान्य.
श्री. बिवलकर हे देवीचे पु़जारी आहेत.

२) त्यांचे शेजारी श्री. वसंत गोखले (फक्त राहणे): ०२३५८-२८७२६९; ९४२००४०९६९.

३) श्री. वर्तक संचालित 'पुण्याई' हॉटेल: संपर्क श्री. वर्तक ०२३५८-२८७२१७.
इथेही मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.

४) श्री. बगाराम महाजन, श्रीराम मंदिराजवळ यांचेकडे फक्त भोजनाची सोय
होऊ शकते.

५) कोकणातही आपल्या शहरातल्या चकाचक सदनिकेत राहण्याचा अनुभव हवा
असल्यास श्री. यनगुल यांच्या मालकीचे व श्री. विजय जोशी यांचे व्यवस्थापन असलेले
एन्-गुलमोहर. संपर्क ०२३५८-२८७३७१.

पुण्याई व एन्-गुलमोहर समोरासमोर आहेत.

तर मग, येताय नं आमच्या केळशीला ?

संपूर्ण पिकासा अल्बम पहायला पुढील चित्रावर टिचकी मारा:

आभार प्रदर्शन:
(१) दक्षिणा: नुसतीच प्रकाशचित्रे न टाकता मला संपूर्ण लेख लिहिण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल. खरं तर "प्रोत्साहित करणे" हे फारच मिळमिळीत बोलणं झालं. माझ्या डोक्यावर बसून लिहून घेतला असं म्हणणं जास्त संयुत्तिक ठरेल Happy
(२) माझी आजी (बाबांची काकू) श्रीमती कल्पना जोशी, जिच्या संग्रहात देवीच्या उत्सवाची ती कविता सापडली.

संदर्भ: टेकडीबद्दल काही माहिती व संशोधकांची नावे यासाठी: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्ग:

पुणे > पौड मार्गे मुळशी > सरळ विळे फाटा > ताम्हणी घाट >
माणगाव लागले की (मुंबई-गोवा महामार्गावर) डावीकडे वळावे (मुंबई-गोवा महामार्गावर) > उजवीकडे लक्ष ठेवावे > उजवीकडे टोळ अशी पाटी दिसली की उजवीकडे पुलावर वळावे > पूल ओलांडून डावीकडे वळावे व सरळ जात रहावे >
घाटात एके ठिकाणी रस्त्याला फाटे फुटतील तेव्हा उजवीकडे खाली जाणार्‍या रस्त्याने पुढे जावे > आणखी एका ठिकाणी रस्त्याला फाटे फुटतील तेव्हा > डावीकडच्या रस्त्याने > केळशी

अंतर: अंदाजे १८८ किलोमिटर.

वेळ: चालकावर अवलंबून. कोथरूड ते केळशी हे अंतर आम्ही साडेचार तासात कापले.

केळशीला जाण्यासाठी अजून एक मार्ग जो थोडासाच जवळचा आहे पण कठीण पण आहे.. कारण वरंधा घाट...
पुणे > भोर > वरंध घाटातून महाड > लाटवण मार्गे > मंडणगड > पुढे वेळासला जाणार्‍या रस्त्यावरुन देव्हारे गाव संपल्यावर डावीकडे जाणारा फाटा पकडून केळशी.. ह्या मार्गावर वरंधा घाटात काही ठिकाणी तसेच शेवटचा फाटा लागल्यावर रस्ता अशक्य खराब आहे... शेवटच्या फाट्यावरुन पुढे तर आपण उंटाच्या पाठीवर आहोत की काय असे वाटते इतका खराब रस्ता होता... आता सुधारला असेल तर चांगलेच आहे.. पण सुधारण्याची शक्यता फारच कमी आहे...

अजून एक थोडासा लांबचा मार्ग म्हणजे महाबळेश्वर करुन
पुणे > वाई > पाचगणी > महाबळेश्वर > अंबेनळी घाट उतरून पोलादपूर > कशेडी घाटातून खेड > दापोली > आणि आंजर्ले गावातून केळशी... ह्या मार्गाने जाताना साधारण ४० किमी जास्त अंतर आहे.. पण बराचसा मार्ग हा महामर्गाचा भाग असल्यामुळे रस्ता चांगला आहे..

लेखातील कविता कुणी केली आहे याची माहीती मिळाल्यास संबंधितांनी जरुर इथे द्यावी.
मी बरेच दिवस ह्या माहितीच्या शोधात आहे.

अरे व्वा! Happy छान माहिती व फोटो (पिकासावरचे नाही बघितले)

माझ्या जन्माच्या वेळेस लौकर जन्म होत नव्हता म्हणून व जन्मल्या जन्मल्या रडलोच नाही म्हणून याच केळशीच्या देवीला आईने नवस बोलला होता, तो मी अन लिम्बीने तब्बल ३३ वर्षान्नी फेडला! Happy
आमचे गाव आन्जर्ले. व कुलस्वामी तुरवडे येथिल केशवलक्ष्मी!
तिकडे जाताना वेगवेगळ्यामार्गाने - वाहनान्नी गेलो आहे.
वरन्ध देखिल हरकत नाही. सध्या रस्ता सुधारला आहे असे ऐकण्यात आहे. ताम्हीणी मार्गे लाम्ब पडते, शिवाय तो मार्ग निर्मनुष्य आहे.
महाबळेश्वरमार्गे जायचे तर ड्रायव्हरची कसोटी लागते, लाम्बही आहे.
जमले तर यन्दा मी टू व्हिलरवरुन, वेल्ह्याहून पुढे "मढे घाट" आहे जो शिवथरघळीच्या आसपास जाऊन मिळतो, त्याने प्रयत्न करणार आहे. मात्र तो सिन्गल रोड आहे. मढे घाटाबद्दल मायबोलीवरच कुणीतरी माहिती टाकली आहे.
पावसाळ्यातील तिकडच्या जीटीजीची कल्पना चान्गली असली तरी अनेक कारणान्मुळे प्रत्यक्षात तशी अवघडच आहे. पण अगदी जुन जुलै न पकडता ऑगस्ट सप्टेम्बर धरला तर सृष्टीसौन्दर्य अफाट बघायला मिळेल असे वाटते.
अन्यथा, हिवाळी सहल म्हणून डिसेम्बर्/जानेवारीत जाणे अतिउत्तम! Happy

(सध्या मी "असे आहे अजरालयग्राम (आंजर्ले)" या १९५५ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे स्कॅन करतो आहे! कधी जमल्यास वरील लेखाप्रमाणेच माझ्या गावावरती लेख लिहायला हवा!)

>> सध्या मी "असे आहे अजरालयग्राम (आंजर्ले)" या १९५५ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे स्कॅन करतो आहे!

अप्रतीम! स्कॅनचं काम झालं की मला मेल करशील का?

मन्दार, माझ्याकडचे ते पूस्तक जीर्णशीर्ण रुपात आहे, वाचता येतय, पण लौकरच नाहीसे होईल. म्हणून स्कॅन करुन ठेवतो आहे.
स्कॅनचे तुकडे तुला नक्की पाठवीन.
[पण कॉपीराईटचा अधिक्षेप नको म्हणून आत्ताच सान्गतोय की मी ते पुस्तक माझ्याकरता स्कॅन करतोय, जे माझ्या वडीलान्नी रुपये तीन मोजुन विकत घेतले होते! होऽऽ, उद्या कुणी कायद्यावर बोट ठेऊन आक्षेप घ्यायला नको की का स्कॅन केल! Wink म्हणुन आधीच सान्गुन ठेवल बर का! तुला देखिल पाठविन ते "तुकडे" पाठविन! Proud नो हार्ड फिलिन्ग्ज प्लिज! ]

लिंब्या, लेखक किंवा 'सर्व हक्क स्वाधीन' Light 1 असलेल्या त्यांच्या सौ. हयात आहेत का?
नसल्यास काही चिंता नाही.

काही समस्या निर्माण झाली तर तुला वट्ट तीन रुपये अधिक व्याज इतकी रक्कम मोजायला मी तयार आहे Proud

शिवाय, केळशीवर एखादे पुस्तक असेल तर तेही जरुर सांग Happy

>>>> केळशीवर एखादे पुस्तक असेल तर तेही जरुर सांग
तेव्हान्ची लोक खरोखरच महाउपद्व्यापी होती! Happy त्यामुळे केळशीवर देखिल नक्कीच असेल, माहिति मिळाली की सान्गतो. शिवाय, जर मूळ गाव केळशी असणार्‍यान्चे कुलवृत्तान्त मिळाले तर बघायला लागतील. भरतनाट्यमन्दिर जवळच्या इतिहास सन्शोधक मन्डळात वट असेल, तर तिथे ही असली सगळी पुस्तके बघायला मिळू शकतील (माझा वट नाही तिथे, अन ज्यान्च्या थ्रु होता, ती व्यक्तिच वारली, सबब तो मार्ग बन्द)

>> भरतनाट्यमन्दिर जवळच्या इतिहास सन्शोधक मन्डळात वट असेल

वट नाही पण डेअरिंग करुन घुसतो आणि विचारतो एकदा!

अम्या Rofl

दुष्ट माणसा, काहीही काय रे!
काही माहिती (पर्यायी मार्ग, केळशी विषयी एखादे जुने-नवे पुस्तक, इत्यादी) असेल तर दे की Happy

राहण्याची सोय काय असं मला अनेकांनी विचारलं.
लेखात पिकासा अ‍ॅल्बमची लिंक दिली आहे त्यात एक-दोन फोटोंमधे माहीती आहे.

कोकणातल्या घरात राहण्याचा अनुभव हवा असल्यासः

पुण्याई हॉटेलः

http://picasaweb.google.com/kelshikarmandar/Kelshi_Paryatan?feat=embedwe...

कोकणात राहूनही शहरातल्या आपल्या चकाचक सदनिकेत राहण्याचा अनुभव हवा असल्यासः
होटेल एन्-गुल्मोहर

http://picasaweb.google.com/kelshikarmandar/Kelshi_Paryatan?feat=embedwe...

कोकण यात्रा: केळशी - दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी
याबद्दल काही:

मागे एकदा कुणीतरी मला "तू केळशीच्या लेखात राहण्याची सोय वगैरे दिलं नाहीयेस" असं म्हटलं होतं.
वास्तविक लेखात मी ज्या पिकासा अल्बममधे काही चित्रांत ती माहिती दिली होती, पण वास्तविक वाचणारे
आधी लेख वाचतात आणि सगळ्यांनाच पिकासा अल्बम पाहण्याचा वेळ मिळेलच असं नाही याची जाणीव असल्याने
ती माहिती टाकली आहे.

याबरोबरच वाळूची टेकडी वगैरे बद्दल अन्य माहिती, तसेच आभारप्रदर्शनासह लेख अद्ययावत केला आहे.

मस्त झाला आहे लेख. ठरल तर पुढ्ची ट्रीप केळशीला. ( माझ ठरल बायडीक विचाराया हवा. आमच्याकडे कथा कशावर लिहायची सोडुन बाकी निर्णय आमचा बायडीच घेताव )
माझे मुळ गाव दापोली. आता तिकडे आपल काय नाय हा भाग वेगळा. आंब्याच्या वाड्या आणि भुत फक्त कथेत. कसा ???

पुण्याहून केळशीला जायचा मार्ग अंतरा आणि खाणाखुणांसहीत...
पुणे ते भोर - नसरापूर फाट्यावरुन उजवीकडे वळून. - ५५ किमी..
भोर ते महाड - वरंध घाटातून - ७० किमी.. (प्रत्यक्ष महाड शहरात जावे लागत नाही... )
महाड ते मंडणगड - म्हाप्रळ मार्गे - ४५ किमी.. किंवा महाड ते मंडणगड - (लाटवण - कुंबळे मार्गे) - ४९ किमी..
मंडणगड ते केळशी - देव्हारे, मांदिवली मार्गे - ३२ किमी.(देव्हारे गाव संपल्यावर साधारण १ किमी अंतर गेल्यावर डावीकडे वळणे)
पुणे ते केळशी एकूण अंतर २०२ किमी.. प्रवासाचा अंदाजे वेळ ५ ते ५:३० तास (हा वेळ कार साठी आहे तसेच चालविणार्‍याच्या कौशल्यावर अधारित आहे. भोर पर्यंतचा रस्ता सोडल्यास पुढे केळशी येई पर्यंत सरळ रस्ता दुर्मिळ आहे... फक्त उजवीकडे आणि डावीकडे स्टीयरिंग वळवतच गाडी चालवावी लागते.. पॉवर स्टीयरिंग असलेली गाडी चालविण्यास कमीतकमी कष्ट पडतात असे वाटत असल्यास ह्या रस्त्यावर त्या भ्रमाचा भोपळा नक्कीच फुटेल..
ह्यामार्गावरुन जाण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे संपूर्ण मार्गावर भोर सोडल्यानंतर योग्य असे एकही हॉटेल नाही.. परंतू महाड शहराच्या जवळ कामत तसेच विसावा अशी दोन हॉटेल्स आहेत जी थोडीशी आडवळणावर आहेत.. तसेच हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे..
सध्या ह्या मार्गावर मधे मधे खराब रस्ता आहे परंतु काम चालू आहे तेव्हा पावसाळ्याच्या सुरुवाती पर्यंत नक्कीच चांगला रस्ता झालेला असेल..

मंद्या, फोटोतली उटंबर बस पाह्यली. रस्ता चांगला नसला तर त्या बसच नाव उंटावर बस असं बदलतात का रे ?

हिम्या, खरं म्हणजे तुम्ही पुण्यात कुठे राहता यावर जवळचा मार्ग अवलंबून आहे. माझ्या एका प्रतिसाद-पोष्टीत मी कोथरूड > मुळशी > ताम्हणी घाट मार्गे गेलो असे लिहिले आहे.
हे अंतर जवळ जवळ १८८ कि.मी. आहे.

म्हणजेच तुम्ही साधारण डेक्कन परिसरात किंवा जे.एम. मार्गाच्या आसपास राहत असाल तर वरील मार्ग सोयीचा पडतो.
पण त्यापलीकडे किंवा साधारणपणे पुणे रेल्वे स्थानक/स्वारगेट/हडपसर यांच्या परिसरात राहत असल्यास भोर किंवा इतर मार्ग सोईचे पडतील.

अप्रतीम लिखाण अन मांडणी ... मला कोकण खुप कमी माहीतय हे पुन्हा जाणवल ...
लिखते रहो..
वरच्या अंगणाच्या कडेपर्यंत पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे हा भाग पावसाळ्यातल्या
व्हेनिस सारखा दिसू लागतो...---------- Happy

Pages