पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

http://72.78.249.125/esakal/20100106/4893480797968659175.htm

मला कधीच पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ टक्के मिळाले नाहीत. पण मला कधी त्याचे वाईटही वाटले नाही! मला नेहमीच साठ, सत्तत, आंशी असे कमीच मार्क मिळाले, पण माझ्या घरच्यांना देखील कधी वाईट वाटले नाही! माझे शिक्षक तर मी खुप हुशार होतो/आहे असे म्हणतात. मी माझ्या जुन्या शाळेत गेलो कि एक माजी विद्यार्थी म्हणुन मला हुषार, अभ्यासु असे सांगुन ओळख करुन देतात अन चांगला वगैरे म्हणतात...

माझे वडिल शिक्षक्-मुख्याध्यापक-प्राचार्य होते. अन मुख्य म्हंजे आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होतो. त्यामुळे आम्हाला परिक्षार्थी कधीच बनता आले नाही.

अन त्यामुळे काही अडलेही नाही. मु.पो.- कोरडगांव तालुका- पाथर्डी, च्या शाळेतुन शिकुन युरोप ऑस्ट्रेलियाच्या शाळेत शिकायला, नोकरीला जाणे म्हणजे यशस्वी होणे असे म्हणत असतील, तर मी ते पण झालो म्हणायचो!

पन हल्ली मुलांना पंच्याणाव पॉइंट सत्यान्नव मिळुन पण पालक खुष होत नाहीत. त्यांना नव्व्याण्णव पॉइंट शंभर च मार्क लागतात! Sad

प्रकार: 

स्पर्धेत टिकण्यासाठी सारी पळापळ असते.याला चांगलेही म्हणता येत नाही नि वाईटही म्हणता येत नाही.

....

"NEVER ALLOW YOUR SCHOOL TO INTERFERE IN YOUR EDUCATION!!!!"
- PLATO ( who else can???)

चंपक,

क्षमा करा. मी तुमच्याशी असहमत आहे.

तुम्ही सध्याच्या कॉलेजेसच्या अ‍ॅडमिशनच्या मेरिट लिस्ट्स पाहिल्यात का? आधीच सीट्स कमी असतात. त्यात एका एका मार्काने प्रवेश मिळणे मुश्कील असते. मग रॅट रेस मधे सहभागी होण्यावाचुन पालकांकडे पर्याय असतो का? सहजासहजी प्रवेश मिळाला असता तर कोणी लोटले असते का आपल्या मुलांना या शर्यतीत?
(गेल्या वर्षी मुंबईत कॉलेज प्रवेश बर्‍याच कॉलेजात ९०-९२% ला बंद झाले, ८०-८५% ला कोणी विचारत नव्हते).

तुम्हाला काही संघर्ष करावा न लागता सगळे मिळाले असेलही कदाचित्..तसेच सगळे इतके लकी नसतात.

आजकालच्या मुलाना पालक स्वत:च्या इच्छा मारुन, काटकसर करुन सगळे उपलब्ध करुन देतात, त्याबदल्यात थोड्या परिश्रमांची अपेक्षा त्यानी ठेवली तर काय चुकले?
आणि पालकाना या शर्यतीत लोटणार्‍या सामाजिक परिस्थितीला कोणी जबाबदार धरेल का?

असो.

<<थोड्या परिश्रमांची अपेक्षा त्यानी ठेवली तर काय चुकले?>> ९०- ९२ % हे थोडे परीश्रम नाहीएत हो.

<<पालकाना या शर्यतीत लोटणार्‍या सामाजिक परिस्थितीला कोणी जबाबदार धरेल का>> या शर्यतीत पालकांना कोणी समाज लोटत नाही. पालक स्वताच स्वताला लोटुन घेतात व मुलांनाही लोटतात.

९०- ९२ % हे थोडे परीश्रम नाहीएत हो.
-----------------------------------
अच्छा म्हणजे परिश्रम केल्याशिवाय सेलफोनवर दिवसभर बकबक करुन, मॉलमधे फेरफटका मारुन, टीव्हीवरील बकवास कार्यक्रम बघुन वेळ फुकट घालवल्यावर उरलेल्या वेळात जमेल तसा अभ्यास करुन त्याना त्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होउ नये म्हणुन मार्क खिरापती सारखे वाटावे अशी अपेक्षा आहे की काय?

या शर्यतीत पालकांना कोणी समाज लोटत नाही. पालक स्वताच स्वताला लोटुन घेतात व मुलांनाही लोटतात.
------------------------------------------------------------------------------
मी भारतातील (मध्यमवर्गीय)पालकांबद्दल लिहित आहे..अमेरिकेतील नाही. इथल्याइतकी चैन भारतीय पालकाना उपलब्ध नाही.

मनस्मी, मला काय वाटते , जर पाल्याची क्षमता नसेल ९०-९५ मिळवण्याची तर अभ्यासाचे अतीश्रम ही त्या पाल्यावर ताण येणारीच गोष्ट असावी. आत्ता या वयात मला सोपे वाटते, पण त्या वयात हे सर्व अवघड वाटु शकते. म्हणुन मुलांकडुन अपेक्षा ठेवताना त्या ते पुरे करु शकते का हे पण तपासावे आणि ते अवघड नाही. आपल्या पाल्याच्या ऐपतीवर पालकालाच माहीत असते जास्त. त्यामुळे प्रयत्न जरूर करावे पण ते त्याला सोसतय ना हे पण पहावे.

सुनिधी,

अगदी अगदी. तुम्ही अगदी बरोबर लिहिले आहे.

ज्यांना ६०-६५ मिळतात त्यांच्याकडुन ९०-९५ ची अपेक्षा ठेवणे ही अनाठायी गोष्ट आहे यात वादच नाही. आणि असे करणे हा त्या विद्यार्थ्यावर अन्याय आहे. आणि त्याचे समर्थेन मी मुळीच करत नाही.
पण जर पाल्यात कुवत असेल तर त्याच्याकडुन अपेक्षा ठेवण्यात काही चुक आहे असे मला नाही वाटत.
मुलांशी नीट चर्चा करुन आणि त्याना त्यांचे पर्याय समजावुन देउन हे सहज शक्य आहे. आणि मुलाना नीट समजावुन देता येते.

मनस्मी, वरील धागा सार्वजनीक नाहिये. कुठे सभासद व्हावे? आणि हायजॅक चे समजले नाही.

मुलांशी नीट चर्चा करुन आणि त्याना त्यांचे पर्याय समजावुन देउन हे सहज शक्य आहे >> हो.

माझ्या मते "पीअर प्रेशर" ह्या प्रकाराने माणसाचे आयुष्यात फार नुकसान होते. पालकांचे पण हेच होते. बाकीची आजूबाजूची सगळी मुले, त्यांचे पालक धावतांना दिसतात. कश्यासाठी धावताहेत, कुठे पोचणार ह्याची बरीचशी छापील उत्तरासारखी उत्तरे त्यांच्याकडे तयार असतात.
आपण सगळे आजुबाजुचे पळताहेत तसे नाही पळालो तर - असा विचार करायचे धाडस कमी लोकांकडे असते आणि कृती करायची हिंंमत तर त्याहूनही कमी लोकांकडे असते. मुलांच्याच नाही तर सगळ्याच बाबतीत बरेच लोक असे वागतात. पीएर प्रेशर मुळे, माझ्या बरोबरीच्या लोकांकडे आहे म्हणून - स्वतःचे घर झालचे पाहिजे, गाडी घेतलीच पाहीजे, नोकरीत ह्या-ह्या पदापर्यंत पोचलच पाहीजे इ.इ. ते स्वतःवर लादून घेवुन त्याला स्वतःच्या इच्छा आकांक्षांचे स्वरूप कधी दिले जाते याचा पत्ता पण लागत नाही.
हे माझे निरीक्षण सगळ्यांच्या बाबतीत खरे असेल असे नाही.

मला वाटतं "पीअर प्रेशर" किंवा "keeping up with the Joneses" या ऐवजी वेगळे कारण असु शकतं. प्रत्येक पालकाची आपला मुल्गा/मुल्गी आयुष्यात आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावा अशी सुप्त इच्छा असते. आणि त्यात काहीही अयोग्य नाही. दुर्दैवाने, चांगले गुण मिळवून पास होणे हीच एक यशाची पायरी समजली जाते; आणि मग सुरु होतो पुढचा संघर्ष.

आपल्यातील गुणांचे योग्यते मुल्यमापन करुन त्यास दिशा देण्यारे पालक लाभण्याचे भाग्य एखाद्-दुसर्‍या सचीन तेंडुलकरच्याच नशीबी असते...

"पीअर प्रेशर" ला अनुमोदन. यशाचं सोडा, वीक एंडला पोरा सोरांना घेऊन "कुठेतरी" जायचं पण "पीअर प्रेशर" असतय लोकांना Uhoh

रुनी, पीअर प्रेशर चं पटलं. पण हे पीअर प्रेशर फक्त पालकांनाच असतं का? ते मुलांनाही खूप असतं. मला वाटतं दर वेळेला पालकांची चूक नसते, मुलांची तर नसतेच, पण मानसीकतेची असते. जी मुलं आत्महत्येचा मार्ग निवडतात, त्यांचे सगळ्यांचेच आई वडील काही कडक नसतात. पण मुलांची मनं फार संवेदनाशील असतात, अपमान, पराभव, नैराश्य हे सगळेच जण पचवू शकत नाहीत आणि त्यातून ह्या भयंकर गोष्टी होतात.
पुस्तकात शिकवतात की मुलांचे मन खूप संवेदनाशील आहे, पण प्रत्यक्षात त्याबद्दल वेळ आलयावर शाळांमध्ये तरी काय करतात. कौंसिलींग वगैरे तर फार दुरची गोष्ट आहे आपल्याकडे. मुलांना शाळेत मारणे, सगळ्यांसमोर अपमान करणे, शिक्षा करणे हे कितीतरी शाळांमध्ये अजूनही घडते. मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन बोलण्याचा किती शिक्षक प्रयत्न करतात! माझ्या शाळेत काही काही टिचर्स तपासलेले पेपर्स देताना मार्क्स मोठ्याने वाचून दाखवायचे, जास्त मार्क्स वाल्या मुलांना कधी ह्याच्या प्रॉब्लेम नसायचा, पण काठावर पास होणार्‍या, नापास होणार्‍या मुलांना मेल्याहून मेल्यासारखे व्ह्यायचे. शिक्षक मुलांकडून चांगल्याच मार्कांची आपेक्षा करतात, पण त्यांची शिकवण्याची पद्धत आणि गुणवत्ता ह्यांच्याबद्दल किती पालक त्यांना जाऊन विचारतात. काही केसेसमध्ये दोष पालकांचा मध्ये, पण काहींमध्ये शिक्षकांचा पण. दिवसातली ८ तास मुलं त्यांच्याबरोबर असतात.
काही मुलं फक्त प्रेशरला बळी जाऊन टोकाचे निर्णय घेतात. १२ ला माझ्या वर्गातल्या हुषार मुलाने, असेच टेन्शन पायी ड्रॉप घेतला होता.
सगळ्यात जास्त मी दोष देईन तो आपल्या शिक्षणपद्धतीला, आरक्षणाच्या राजकारणाला (इथे वाद सुरु करण्याकरता हा मुद्दा मांडला नाही आहे). ह्या सगळ्यांमुळेच आज कॉलेजेसचा दर्जा खालावत चालला आहे पण अ‍ॅडमिशन कटऑफ वाढतच चालला आहे.

पण जर पाल्यात कुवत असेल तर त्याच्याकडुन अपेक्षा ठेवण्यात काही चुक आहे असे मला नाही वाटत.
>> ती दिवसभर धावून जमीन मिळवणार्‍या माणसाची गोष्ट ऐकली आहे? त्याच दिवसाच्या शेवटी काय होतं माहितेय ना? उगाच पळतंय बिचारं म्हणून पळवण्यात काय अर्थ आहे?
आमचे एक नातेवाईक नुकतेच पुणे सोडून गोव्यात शिफ्ट झाले. कारण काय माहितेय? पुण्यातल्या अमानुष स्पर्धेत त्यांचा मुलगा मागे पडत होता- आणि त्यामुळे शाळेतली कंपॅरिझन - फ्रस्टेशन्स असं काहीतरी व्हायला लागलं.
हा मुलगा पायथॉन वापरून सही गेमस वगैरे तयार करतो - शाळेतच आहे तरीही.
मला त्याच्या आईबाबांचं इतकं कौतुक वाटलं!
प्रत्येकाला हे करणं शक्य असेल असं नाही - पण ह्या मागचं स्पिरीट अंगी बानवण्याचा प्रयत्न तर करूच शकतो आपण!

मला वाटतं "पीअर प्रेशर" किंवा "keeping up with the Joneses" या ऐवजी वेगळे कारण असु शकतं. प्रत्येक पालकाची आपला मुल्गा/मुल्गी आयुष्यात आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावा अशी सुप्त इच्छा असते.आणि त्यात काहीही अयोग्य नाही >>>

निकोप स्पर्धेसाठी, चांगल्या पर्फोरमन्स साठी पीअर प्रेशर असायलाच हवे इ. मला मान्य आहे, पण आपण त्याच्या पुढच्या केसेस बद्दल बोलतोय जिथे लहान मुले आत्महत्या करतात.

राज, "आपल्यापेक्षा जास्त यशस्वी" याच्या कक्षा फार वेगवेगळ्या आहेत प्रत्येक पालकाच्या आणि त्यासाठीच तर सगळे झगडणे चालू आहे/असते सगळीकडे. "आपल्यापेक्षा" यशस्वी कशासाठी, नुसता यशस्वी का नाही.

माझ्या स्वतःच्या गावातली कितीतरी उदाहरणे मी बघीतलीत यशस्वी डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरच झाल पाहिजे, मग त्याला १०-१२ वर्ष लागली, पेमेंट सीट द्यावी लागली तरीपण. यात तो पाल्य आणि पालक दोघेही भरडून निघाले. वकीलाच्या मुलाने वकीलच झाले पाहिजे, वारसा कोण चालवणार इ.इ. यालाच मी पालकांनी स्वतःचे स्वतःवर आणलेले प्रेशर म्हणेन. दुसरे लोक त्याला अजून काही नाव देतील. तसेच मुलांचे पण, माझा सगळा वर्ग करतोय मग मला पण केलेच पाहीजे ही कळपातली वृत्ती. आपल्यावेळी पण होतीच की ही वृत्ती, फक्त तेव्हाच्या गोष्टी लहानसहान होत्या आजच्या मानाने आणि एवढी टोकाची भुमिका घेतली जात नव्हती.

मी डॉक्टर असलो तरी माझा मुलगा डॉक्टर होण्याइतका हुषार नाही, दुसरे काही (इंजिनिअर नाही) झाला तरी आम्हाला चालेल हे किती पालक स्विकारू शकतात, तसच माझे आई वडील डॉक्टर आहेत तर मला पण डॉक्टरच व्हायला हवे असेही स्वतःवरच बंधन घालून घेणारे मुलं आहेतच की. अगदी बोटावर मोजण्या इतके पालक, मुले असा विचार करत नाहीत. (डॉक्टर ही पदवी मी उदाहरणादाखल दिली आहे).

मी पालकांना संपूर्ण दोष देतेय असा जर या पोस्ट वरून गैरसमज होत असेल तर तो तसा करून घेवु नका. सगळेच जण पालक, पाल्य, शिक्षक, शिक्षणपद्धत, जीवनशैली, मेडीया या समीकरणाचा भाग आहेत. फक्त इथे माझा पालकांबद्दलचा मुद्दा मांडलाय.

रुनी चे पीयर प्रेशर अन नानबा ची टॉलस्टोय ची गोष्ट...ला अनुमोदन.

रेस मध्ये धावताना किमान फिनिश लाईन दिसत असते, हल्ली जी रेस चाललीय त्याचा एन्ड काय आहे कुणालाच माहित नाही. परिक्षेत पास होणे अन गुण मिळवणे हे यश नाही असे नाही पण फक्त तेच म्हणजे यश नाही हे लक्षात घ्यायला हवे. चौथी-पाचवी ते पदवी पर्यंत च्या परिक्षेत नापास होणारे आत्महत्या करतात.. परिक्षेत नापास होण्याच्या क्षुल्लक कारणावरुन आत्महत्या?.. जीवन एवढे स्वस्त कधी झाले? मुलांच्या मनात असे विचार आणायला पालक अन सभोवतालची परिस्थिती नक्कीच कारणीभुत असते. अन म्हणुनच पालकांनी शहाणे व्हावे अशी अपेक्षा आहे.

माझा एक पुतण्या इंग्रजी माध्यमात होता, तिथे त्याचे अभ्यासात आजिबात लक्ष नसे कारण ते त्याला झेपत नव्हते. पण तोच पुतण्या मग तिथुन काढुन मराठी माध्यमात टाकला तर तो आता वर्गात अभ्यासात पहिला येतो..... हा बदल स्विकारणे पालकांनी अपेक्षित आहे! केवळ इतरांची पोरे इंग्रजी माध्यमात जातात म्हणुन ह्याला ही जबरदस्तीने तिथे बसवा ह्या कृतीला विरोध करणे गरजेचे आहे.

(युपीएस्सी च्या भुगोल विषयासाठी नीतु सिंग नावाचे एक नामवंत प्राध्यापक दिल्ली मध्ये क्लास घेतात. त्यांच्या क्लास मध्ये एकदा एका विद्यार्थ्याने ने परिक्षेत नापास झालो तर आत्महत्येचा विचार मांडला... त्यावर ते बोलले..... आज तक किसी ने युपीएस्सी फेल होणे से जान नही दी है, तु पहला होगा.. लेकीन अगर ऐसा होणे लगा तो, बच्चे, तु अकेला नही होगा. पुरा कारवां निकलेगा जमुना कि तरफ!
अविनाश धर्माधिकारींच्या शब्दात सांगायचे तर.. परीक्षेनंतर देखील जीवन असते, अन तेच खरे जीवन असते!)
****
मानसमी, संघर्ष केल्याशिवाय कुणालाच काहीही मिळत नसते. दे रे हरी खाटल्यावरी हे अशक्य असते. हे स्फुट लिहिताना माझी कहाणी लिहिण्याचा विचार नव्हता, तर विद्यार्थी अन परिक्षार्थी यावर चर्चा व्हावी असा हेतु होता. परिक्षेत नापास झाल्याचे दु:ख मी ही युपीएस्स्सी फेल झाल्यावर सोसले होते, पण तोवर आयुष्यात याहुनही मोठी दु:खं असतात हे जाणले होते! असो.

चंपक, सही धागा आहे हा.
रुनीशी पीअर प्रेशर बद्दल सहमत.

सफल माणसांकडे बघितले तर त्यातले सगळेच काही या जीवघेण्या स्पर्धांतून गेले नव्हते.

Pages