कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ

Submitted by विशाल कुलकर्णी on 3 February, 2026 - 02:15

मुळात सचिन भौमिक यांच्या कथेवर आधारित "अनुराधा" हृषिदाना बंगाली भाषेतच करायचा होता. पण बलराज सहानीने गळ घातली आणि हृषिदा चित्रपट हिंदीत करायला तयार झाले. हृषिदासारखा मनस्वी दिग्दर्शक, बलराज सहानी, लीला नायडू (लीलाबाईंचा हा पहिलाच चित्रपट) आणि अभिभट्टाचार्य असे उत्तुंग अभिनय आणि सौंदर्य यांचे समसमा मिश्रण असलेले कलाकार आणि पंडित रविशंकर यांचे दैवी संगीत या त्रिवेणी संगमाने सजलेला हा चित्रपट.

याच्या संगीताची सुद्धा एक कथाच आहे. हृषिदा उर्फ हृषिकेश मुखर्जी यांनी सुरुवातीला या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना संगीत दिग्दर्शन करण्यास तयार केले होते. मात्र नंतर लताबाईंनी माघार घेतली, कारण त्यांनी यापूर्वीच एका दुसऱ्या दिग्दर्शकाला असे आश्वासन दिले होते की कधी संगीत दिग्दर्शन करायचे झाले, तर ते फक्त त्याच्यासाठी करतील. त्यानंतर हृषिदानी उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्याकडे मोर्चा वळवला. मात्र बडे गुलाम अली खानसाहेबांनी एक विचित्र अट घातली. संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या त्या काळातील मानधनापेक्षा एक रुपया अधिक देण्याची मागणी खानसाहेबांनी केली आणि हृषिदा साशंक झाले. बड़े गुलाम अली खांसाहेब म्हणजे महान, पण मनस्वी कलावंत माणूस, त्यांच्या लहरी बदलत राहिल्या तर कसे व्हायचे? अखेरीस त्यांनी पंडित रवी शंकर यांना संगीत देण्याची विनंती केली आणि त्यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. हृषिदांच्या म्हणण्यानुसार, पंडित रवी शंकर यांनी संपूर्ण चित्रपटाचे संगीत केवळ दोन दिवसांत तयार केले. जवळपास दहा वर्षांहून अधिक काळानंतर पंडितजींचें हिंदी चित्रपटसंगीतात "अनुराधा" या चित्रपटातून पुनरागमन झाले. ख्यातनाम हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार आणि सतारवादक असलेल्या रवी शंकर यांनी यापूर्वी फक्त दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिले होते. धरती के लाल (१९४६) आणि नीचा नगर (१९४६). अर्थात १९५९ साली सत्यजित रें यांच्या सुप्रसिद्ध अपुर संसार या बंगाली चित्रपटाला रविशंकर यांनी संगीत दिले होते. पण त्यानंतर आलेला हिंदी चित्रपट अनुराधाच.

या चित्रपटातील प्रत्येक गाण्यात त्यांनी शास्त्रीय संगीताची अशी काही मोहक छटा पेरली आहे की प्रत्येक गीत लाजवाब, उत्कृष्ट झालेले आहे. राग जनसम्मोहिनीवर आधारित “हाय रे वो दिन क्यों ना आए” हे गीत यातलं एक गाजलेलं गीत. हे गाणं खरंतर हृषिदांना आवडलेलं नव्हतं, त्यांना हे गाणं नको होतं. पण लतादीदींनी हे गाणं चित्रपटात ठेवण्याचा हट्ट धरला आणि आपल्याला अजून एक अप्रतिम गाणं मिळालं. या चित्रपटात पंडितजीनी राग मांज खमाजचा आधार घेऊन दोन गाणी रचली आहेत. एक म्हणजे “जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ” आणि दुसरे “कैसे दिन बीते कैसे बीती रतिया". आज आपण “कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ” या गाण्याबद्दल बोलणार आहोत.

हे गाणे नीट ऐकलं असेल तर ऐकताना तुम्हालाही असं वाटलं असेल की आपण निव्वळ गाणं ऐकत नसून जणू काही अनुराधाच्या मनात हळूच डोकावत आहोत. गाण्याचे शब्द, सूर आणि दोन शब्दांतील (शांततेच्या) जागांमधल्या (पॉजेस) अवकाशातून जे काही व्यक्त होतं, ते निव्वळ शब्दातून किंवा गाण्यातून सांगितलेले नाहीये, तर श्वासातून रुजत, झिरपत गेलेलं आहे. १९६० सालच्या "अनुराधा" या हृषिदांच्या चित्रपटात हे गाणे येते, ते केवळ कथानकाचा भाग म्हणून नाही. ते त्या कथेच्या आत्म्यात खोलवर रुजलेल्या भावनांचा एक मंद, सातत्यपूर्ण प्रवाह बनून आलेले आहे. हृषिदा एका मुलाखतीत म्हणाले होते की "मैं फिल्म में गाना तभी लेता हूँ , जब वो जरुरी होता है, जब गाने के लिए फिल्म में सिचुएशन होती है, वर्ना नहीं लेता!" आणि हे गाणं तर अनुराधा या चित्रपटाचा आत्मा आहे. गाणं बघितलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल. अनुराधा अगदी व्याकुळ होऊन मनातली वेदना गाण्याच्या रूपात मांडतेय, दीपक (अभि भट्टाचार्य) , ज्याच्याशी तिचं आधी लग्न ठरलेलं असतं, तो व्याकुळ झालेला आहे ते ऐकताना. त्याला तिची घालमेल, तिचे दुःख जाणवतेय आणि त्याच वेळी ज्याच्यावर अनुराधाने जिवापाड प्रेम केलेलं आहे, वडिलांचा विरोध पत्करून ज्याच्याशी तिने लग्न केलेलं आहे तो डॉ. निर्मल, त्याचं मात्र तीच्या वेदनेकडे लक्षही नाहीये, तो कुठलातरी (कदाचित मेडिकल क्षेत्राशी कदाचित) लेख वाचण्यात तल्लीन झालेला आहे.

अनुराधाची गोष्ट ही अनुच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची नाही, तर वेगवेगळ्या अवस्थांची आहे. आदर्शवाद आणि प्रेम यांच्यात उभ्या राहिलेल्या तणावाची ही कथा आहे. बलराज सहानी यांनी साकारलेला नायक समाजसेवेच्या ध्यासात स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. त्याच्यासाठी जीवन म्हणजे एक तत्त्व, एक ध्येय, एक व्यापक जबाबदारी. त्या ध्यासात तो कुणालाही मुद्दाम दुखावत नाही, पण नकळत तो आपल्या जवळच्या माणसापासून दूर जातो. या दूर जाण्याच्या प्रक्रियेत अनुराधा मात्र मागे राहून जाते. लीला नायडूंचा हा पहिलाच चित्रपट होता. नुकताच मिस इंडिया खिताब मिळवलेल्या या सुंदर आणि बुद्धिमान अभिनेत्रीने आपल्या उत्कट अभिनयातून ही व्यक्तिरेखा अत्यंत शांत, संयतपणे आणि विलक्षण उत्कटतेने उभी केली आहे. हृषिदांची अनुराधा आयुष्याला कसलाही विरोध करत नाही, कुठलेही प्रश्न विचारत नाही, फक्त वाट पाहत राहते. पण हळूहळू हे वाट पाहणेच तिचे आयुष्य, तिचे प्राक्तन बनून जाते.

याच अस्वस्थ अवस्थेत “कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ” हे गाणे येते. हृषिदांच्या नेहमीचे सवयीप्रमाणेच हे गाणे जागा आहे म्हणून टाकलेले नाहीये. हे गाणे कुठल्याही नाट्यमय क्षणी न येता, दोन प्रेमिकामधल्या, नकळत लादल्या गेलेल्या मौनाच्या, न बोलल्या जाणाऱ्या अवकाशाच्या, न संपणाऱ्या प्रदीर्घ वाट पाहण्याच्या वेळेत येते. वरवर पाहता काहीच घडत नाही. दिवस येतात, जातात. रात्रीही सरतात. पण अनुराधाच्या मनात, आत काळ थांबलेला आहे. दिवस आणि रात्री या इथे घड्याळाच्या काट्यांपुरते उरत नाहीत. ते मनाच्या स्थितीचे प्रतीक बनतात. दिवस म्हणजे निभावलेली कर्तव्ये, समाजासमोर ठेवलेली शांत मुद्रा, आणि रात्री म्हणजे एकटेपणात उफाळून येणारे प्रश्न.

या गाण्याला पंडितजींनी (रविशंकर) दिलेलं संगीत या गाण्याच्या भावविश्वाशी विलक्षण सुसंगत आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील त्यांची खोल रुजलेली जाण इथे कोणत्याही प्रदर्शनाविना प्रकट होते. शैलेन्द्र यांचे सोज्वळ, अर्थवाही आणि भावपूर्ण शब्द, लतादीदींचा शांत, मधुर, सुरेल स्वर आणि पंडितजींनी मांज खमाजच्या शांत, मंद धुनीमध्ये दिलेली चाल यांची सांगड या गाण्यात इतकी सुंदर बसली आहे की ते ऐकताना ऐकणाऱ्याचे चित्त नकळत अनुराधाच्या मनात शिरते, तिथेच थांबून जाते. अनुराधाच्या मनोवस्थेशी एकरूप होते.

लतादीदींच्या गायकीचे खरे सामर्थ्य या गाण्यातील थांबे, अल्पविराम आणि उच्चारही ना करता आपोआप ठळक होणारे भाव यात दडलेले आहे. सुरांचे उच्चार, मींड अत्यंत संयत आणि अर्थवाही आहेत. ज्या सहजतेने दीदी एका भावनेतून दुसऱ्या भावनेत शिरतात ते खरोखर नव्या गायकांनी लक्ष देऊन शिकण्यासारखे आहे. दीदींचे सूर गायकी दाखवण्यासाठी न येता, भाव अधिक खोलवर पोहोचवण्यासाठी येतात. त्यामुळेच हे गाणे ऐकताना अनुराधाची घुसमट, तिचे एकाकीपण आणि तिच्या मनातली अबोल हुरहूर अगदी स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचते. हे गाणे म्हणजे केवळ लतादीदींचा आवाज किंवा पंडितजींचे संगीत नाही, तर एका स्त्रीच्या आयुष्यातल्या न दिसणाऱ्या, पण सतत वाहणाऱ्या वेदनेचा सूर आहे. प्रेमासाठी तिने आयुष्यभर केलेल्या त्यागाचा तो अबोल स्वर आहे.

सूर मोजके आहेत, थांबे अर्थपूर्ण आहेत. संगीत जितके कानावर येते, तितकेच ते मौनातूनही बोलते. या गाण्याला चाल देताना पंडितजींनी अनेक रिकाम्या जागांचा वापर केलेला आहे. त्या रिकाम्या जागांमध्ये अनुराधाचे न बोललेले दुःख साठलेले आहे. या सुरांवर लतादीदीचा स्वर अलगद उतरतो. अनुराधा इथे दुःख व्यक्त करत नाही,तिने ते शांतपणे स्वीकारलेले आहे. आवाजात आक्रोश नाही, तक्रार नाही. उलट, थोडीशी थकलेली पण विलक्षण मृदुता आहे, दीर्घ प्रतीक्षेची सावली आहे. प्रत्येक ओळ जणू मनातच उमटते आणि मग हळूच विरते. शब्द संपल्यावर उरलेला शांत अवकाश अधिक बोलका वाटतो. जणू त्या शांततेतच गाण्याचा खरा अर्थ दडलेला आहे.

शैलेंद्रचे शब्द या गाण्यात अत्यंत संयत आणि प्रामाणिक रूप धारण करून येतात. शब्द साधे आहेत, कसली अलंकारिकता नाही, उगाच रुपकांची, प्रतिमांची भरमार नाही. “कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ” हा एक प्रश्न आहे, पण तो कुणाला विचारलेला नाही. तो स्वतःशीच चाललेला एक निरंतर संवाद आहे. या प्रश्नात उत्तराची अपेक्षा नाही. तो प्रश्न विचारण्यातच त्याचे उत्तर सामावलेले आहे. दिवस आणि रात्री कशा गेल्या हे कळले नाही, कारण त्या काळात जगणे थांबून फक्त प्रतीक्षा सुरू आहे.

पंडितजींनी राग मांज खमाजचा आधार घेत त्याच्या सुरांवर या गाण्याच्या संगीताची रचना केलेली आहे. राग मांज खमाज पंडितजींचे गुरू आणि महान सरोदवादक उस्ताद बाबा अलाउद्दीन खान यांनी विकसित व लोकप्रिय केला असल्याचे मानले जाते. हा राग साधारणपणे संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गायला जातो आणि तो स्वतंत्र स्वरांपेक्षा स्वरसमूहातून तयार होणाऱ्या वाक्यांशांवर (नोटेशन) अधिक आधारलेला असतो, त्यामुळे सादरीकरणात अचूकता अत्यंत महत्त्वाची ठरते. मांज खमाज हा मांज रागाचाच एक प्रकार असून त्यात शुद्ध ‘म’ हा वैशिष्ट्यपूर्ण स्वर आहे, तर ‘सा’ स्थिर राहतो. या रागात तानपुरा अनेकदा ‘सा,पा’ ऐवजी ‘सा,शुद्ध म’ या स्वरांवर लावला जातो. कोमल, मधुर आणि रोमँटिक स्वभावाचा हा राग सामान्य श्रोत्यांनाही सहज भावतो आणि ठुमरी, धनश्री ठुमरी, दादरा, कजरी, चैती अशा अर्धशास्त्रीय गायनप्रकारांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर आढळतो.

काव्यशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर या गाण्यात करुण रस प्रधान आहे. पण हा करुण रस अश्रूंनी ओथंबलेला नाही. तो संयत आहे, अंतर्मुख आहे. विरह हा त्याचा स्थायीभाव आहे, पण त्यात राग नाही, निषेध नाही, दोषारोप नाही. फक्त स्वीकार आहे. आणि हा स्वीकारच वेदनेला अधिक खोल बनवतो. कारण न बोललेले दुःख, व्यक्त न झालेली हुरहूर नेहमीच अधिक तीव्र असते.

या गाण्याचा अर्थ शेवटी एका साध्या, पण खोल अनुभूतीवर येऊन थांबतो. प्रेमात बुडालेल्या अवस्थेत वेळ कसा अगदी अलगद निघून जातो आणि एकटेपणात तीच वेळ कशी लांबत जाते, संपता संपत नाही, जड होऊन जाते, याची एकप्रकारे ही कबुली आहे. दिवस गेले, रात्रीही गेल्या, पण त्या ओघात तेव्हा प्रेमात बुडालेले मन कुठेतरी मागेच राहून गेलेले आहे. आता फक्त त्याची म्हणजे प्रियाची वाट पाहात राहणे हेच प्राक्तन बनून गेलेले आहे. ते सुद्धा ज्याची वाट पाहायची ते अगदी समोर असताना, त्याच्याच समवेत सगळा दिवस जात असताना देखील वाट पाहावी लागणे यासारखी वेदना नाही. म्हणूनच “कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ” हे गाणे फक्त अनुराधाचे राहत नाही. ते प्रत्येक अशा माणसाचे होते, ज्याने आयुष्यात कधी तरी शांतपणे विरह अनुभवला आहे. आजही हे गाणे ऐकताना, पाहताना, आपण केवळ एक जुना चित्रपट पाहत नसतो, निव्वळ एक गाणे ऐकत नसतो, तर स्वतःच्या आयुष्यातील एखाद्या न बोललेल्या, विसरायला न जमलेल्या काळाशी हळूवारपणे पुन्हा गळाभेट घेत असतो.

या लेखात शेवटी मी आंतरजालावर उपलब्ध असलेले तीन दुवे देतोय. पहिला दुवा अर्थातच गाण्याचा आहे. गाणे या आधी पाहिले नसेल नक्की पाहा कारण त्या शिवाय त्या शब्दातली वेदना जाणवणार नाही. पुढचा दुवा आहे पंडितजींनी जागवलेल्या राग मांज खमाजचा. आणि तिसरा दुवा आहे एका मुलाखतीचा. यात हृषिदा त्यांच्या चित्रपट, गाणी याबद्दलच्या आपल्या भूमिकेबद्दल बोलताहेत.

गाणे
https://youtu.be/yPMF_vNlnVw?si=4qfMyATF6iV_QnS8

राग मांज खमाज
https://youtu.be/aER1V1bbo-I?si=mken5p09GTK15sc1

ऋषीदांची मुलाखत
https://youtu.be/qrrDMYMTJuM?si=5nu_iyDD9h7znk0-

धन्यवाद.

©विशाल कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे विकु, तुला पुन्हा लिहीतं झालेलं पाहून आनंद झाला आहे

- (विकुपंखा) सोकाजी

विशाल, मस्तच रसग्रहण!

गाणे कित्येकदा ऐकलयं पण आता पोहोचले असे खरोखर वाटतयं! Happy

काय सुरेख लिहिलंयस विशाल. चारच दिवसांपूर्वी हे गाणं ऐकलं. माझा भाचा आवडीनं ऐकत होता आणि आम्हाला ऐकवत होता. आज पुन्हा एकदा ऐकलं.

फारच सुरेख लेख.
अभ्यासपूर्ण. मला संगीतातील रागांची, सुरांची इतकी माहिती नाही पण काहीतरी विलक्षण वाचल्याचा आनंद झाला. हे गाणं ऐकलय पण आता लेख वाचून समजून घेण्यासाठी पुन्हा ऐकावं लागेल.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत

Pages