शोध : एका अदृश्य शहराचा ( भाग ५ )

Submitted by रानभुली on 18 May, 2022 - 13:09
shangila

कृपया मागच्या भागाकडे जाण्यासाठी इथे टिचकी मारा.

तिने सर्वांना सांगितले " मुद्दामून वळून पाहू नका. आपसातच बोला. आत्ता जिथे पाहताय तिथेच पहा "
" काय झाले ?"
" थोड्या वेळाने आपण वळू त्या वेळी मागच्या बाजूला रस्त्याला मोटेल लागून एक पिवळी स्विफ्ट कार आहे. तिचा नंबर बघून ठेवा "
तिने सांगितलेल्या सूचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन केले.
ती बाजूला झाली.
मग या सर्वांनी रस्त्यापर्यंत आपसात दंगा मस्ती करत , खेळण्याचे नाटक केले. रस्त्याला लागताना सहजच वळाल्याप्रमाणे ती गाडी पाहून घेतली. कुणालाही यांच्या लक्षात आल्याचे जाणवले नसते इतके छान सर्वांनी नाटक वठवले होते.

मागून झिलमिल आली.
"आपल्याला आज जंगलात जायचं आहे"
"ग्रेट ! समथिंग इज हॅपनिंग. कंटाळा आलेला "

रात्री झोपण्याआधी झिलमिलने तो नकाशा काढून टेबलवर ठेवला होता. खूप काळ अर्थबोध झाला नव्हता. मात्र सिद्धाश्रम ही जागा नक्की झाली होती. इथून पुढे काही तास ड्राईव्ह करत गेलं की नेपाळ सीमा लागत होती. गोरखपूरपासून थोड्याच अंतरावर कुश्मी जंगलाला लागून हा आश्रम होता.

नकाशाचा अर्थ आत्ता लागतोय, मग लागतोय असे वाटत असतानाच तो अर्थ सुटायचा.
मग तिने बाबाने दिलेला दुसरा लिफाफा उघडला.
अपेक्षेप्रमाणे त्यात सांकेतिक चिट्ठ्या होत्या. हा महत्वाचा होता.

चिठ्ठ्यांना नंबर मात्र इंग्रजीत होते.

पहिल्या चिट्ठीची अक्षरे तिने खरोष्टी आणि ब्राह्मी किंवा धम्मलिपी प्रमाणे असल्याची खात्री करून घेतली. आता डावीकडून कि उजवीकडून ?
कुराणाप्रमाणे उलटे वाचायचे झाले तर खारोष्टी आणि सुलटे वाचायचे झाल्यास ब्राह्मी / धम्म लिपी. ब्राह्मी आणि धम्मलिपी ही एकाच लिपीची दोन नावे संशोधकांमधे असलेल्या सांस्कृतिक वर्चस्वावरून पडली आहेत. काहींनी तीच लिपी मोहेंजोदरो मधे आढळली. तर काहींचे म्हणणे कि हरप्पा मधे चित्रलिपी आहे. त्यामुळे मोहेंजोदरोच्या काळात लिपी नसणार.

पण आता आहे ते आहे. लिपी सापडली तिथेही.

तिने बाबाच्या चिट्ठीतली वर्णमाला घेतली.
मग मोबाईलवर सेव्ह केलेले फोटो घेतले. त्यात तिने देवनागरी आणि काहीत इंग्रजी अक्षरेही टाईप केली होती.
प्रत्येक वर्णाच्या खाली देवनागरी अक्षर लिहील्यावर मजकूर तयार होऊ लागला.
Brahmi_script.png

हाय राम ! तो एक कोड्याच्या भाषेतला संदेश होता.
पासवर्डला लेयर्स असतात तसेच चालले होते.

जगज्जेत्याच्या मार्गात गूढ आलाप
वळशातल्या बेटाला अंधाराचा शाप

हा संदेश नक्कीच नकाशाशी संबंधित असणार.

दुसर्या चिठ्ठीत समजेल अशी स्केचेस होती. आश्रमाचे स्केच चार पाच रेषातच उभे केले होते. पुढे जंगलाचे दृश्य दिसत होते आणि तिथे एक गूढ चित्र काढले होते.
याच चिठ्ठीच्या मागे जाऊन आल्याशिवाय पुढच्या चिठ्ठ्या वाचू नये असा गुप्त संदेशही होता.

पुढच्या चिठ्ठ्या मग तिने ठेवून दिल्या.
सकाळी सकाळी आश्रमाचा फेरफटका मारून येताना तिला पुन्हा आश्रमाची रचना करणार्‍यांचे कौतुक वाटले. काही काही झोपड्या मात्र अगदीच देशी होत्या. काही बांबूच्याही होत्या. इथे आयुष्यभर सुद्धा आपण राहू शकतो. तिच्या मनात आले.
काय करायचेय कुठेतरी पगारी नोकरी करून ? किंवा व्यापार करून ?
हो पण काही दिवसांनी इथलाही कंटाळा येणार नाही याची काय खात्री ?
या विचारासरशी ती थबकली.
आजूबाजूचे फोटो घेत राहिली.

exterior.jpgHuts+copy.jpg

रमत गमत ती मग त्यांच्या शेजवळीजवळ आली. डॉर्मिटरीचे नामकरण राहुलने शेजवळ केले होते. अशा कोट्यांमुळे राहुल भास्करच्या ऐवजी त्याला कोटीभास्कर असे टोपणनाव ट्रेकच्या वेळीच मिळालेले होते.
images.jpg

आश्रमाच्या बाहेर पडण्याच्या आधी रसोईत ते डोकावले. सकाळीच तिने सांगितल्याप्रमाणे त्यांचे खाण्यापिण्याचे जिन्नस तयार होते. डब्याचे ओझे वागवण्यापेक्षा अ‍ॅल्युमिनियम फॉइल आणि चक्क फडके यातच ते बांधून घेतले. उगीच कोण जड ओझे बाळगणार ?
****************

आत्ता ते जंगलाकडे तोंड करून उभे होते.
आश्रम जितका सुंदर होता त्याच्या ही पेक्षा जंगलाचे दृश्य विहंगम होते.
jungle.jpg

बाबांच्या चिठ्ठ्या एकीकडे डोक्यात होत्या. जंगलाला रस्त्यापासून जी पायवाट फुटत होती तिच्या दुतर्फा मनोहर अशी उंच वृक्षाची दुतर्फा रांग होती. आजूबाजूला ऐसपैस पसरलेले जंगल होते. रस्ता जाईल तसे चालत रहायचे होते.
थंड वारे वाहत होते. मघाशी मोटेलवरून जाताना अगदी शिताफीने गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो मोबाईल मधे कैद केला होता. आजूबाजूला कुणी दिसले नाही. कदाचित यांना येताना पाहून लपले असतील.

जंगलात प्रवेश केल्यावर वेगळे वातावरण जाणवू लागले . तसे गावसुद्धा शांतच होते. पण तरीही माणसाच्या खाणा खुणा वातावरणात भरून राहिलेल्या असतात.
इथे सकाळी सकाळी चक्क रातकिड्यांचा आवाज येत होता. कच्ची पायवाट दोन गाड्या जाईल एव्हढी प्रशस्त होती. त्यामुळे या वाटेवर प्रकाश होता. दोन्ही बाजूला दाटीवाटीने झाडं असल्याने खालपर्यंत प्रकाश पोहोचत नव्हता.
मैलभर अंतरातच वेगळ्या जगात प्रवेश केल्यासारखे वाटू लागले.
मागे कुणी नाही ना हे सतत मोबाईलच्या सेल्फी कॅमेर्‍याने किंवा सहज वळून बघत चेक केले जात होते. पण आता मागावर कुणी नव्हते.

जवळ जवळ दीड तास चालल्यावर भुका लागल्या.
रसोईमधून बांधून अ‍ॅल्युमिनियम फॉईलमधे बांधून आणलेले पराठे अद्याप गरमच होते. चहाचा थर्मास घेतला ते बरं झालं असे वाटले.

एका झाडाखाली मोठे दगड पाहून त्यावर बसून पराठ्यांचा फडशा पाडण्यात आला.
चहा इतकाही गरम नव्हता. शिवाय त्याला थर्मासचा वास येत होता. पण मोकळ्या हवेत हे सगळे छानच वाटते. चहाने ऊब आली.
आता चालायला गती आली.

अकरा साडेअकराच्या सुमारास पुढे पहाडी दिसू लागली आणि सगळेच थबकले.
समोरचं दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते.

forest_1.jpg

आता तिला जंगलाचे स्केच नीट समजले. समोर धरून ती कच्च्या रस्त्याला मिळणार्‍या डावीकडच्या पायवाटेला वळाली. ही वाट सुद्धा एका टेकडीला घासून जात होती. समोर उंच पहाडी , डावीकडे वळाल्यावर या वाटेच्या डाव्या हातालाही उंच होत जाणारा डोंगर , टेकडी काहीतरी होतं. गर्द हिरवाईत त्याचा अंदाज येत नव्हता.

आता लक्षात आले की वाटेच्या उजवीकडे तीव्र उतार आहे. खोल आहे.
त्यामुळे डोंगराच्या भिंतीला चिकटून, प्रसंगी पाठ टेकवून चालावे लागत होते.

तासभर चालल्यावर उजव्या बाजूला उंचवटा लागू लागला. इथे एव्हढ्या भागातच एक समतल असा जमिनीचा तुकडा उजव्या बाजूला होता. तो कठीण कातळाचा होता. डावीकडे उंचच उंच कातळ होता तोच वाटेला भेदून पलिकडे गेला होता.

आणि त्यावर एक देखणी वास्तु होती.
मंदीर असावे कसले तरी.

या वास्तुला प्रवेशद्वारच नव्हते.
मागच्या कातळाकडे पाठ करून उभे राहिल्यावर मंदीर दिसत होते.

थोड्या अंतरावर नंदी पाठ करून उभा होता. म्हणजे समोर गाभारा होता.
तिथे जावे लागणार होते.

पण एक काळ्या रंगातली धातूची पट्टी पांढरी अक्षरे मिरवत होती.
"प्रवेश निषिद्ध "

मंदीर अगदी विचित्र होते.
असे मंदीर कुठेच नाही भारतात. शैली तर चौल्य काळाशी मिळती जुळती होती.
कातळ कोरून चौक केला होता. त्यात दगडांमधे कोरीव काम करून मंदीर उभारले होते.

कातळानेच कुंपणभिंत तयार झाली होती. त्यावर काही काही चित्रं होती.
एक चित्रं उभ्या कातळावर होते.

तळाशी दहा तोंडाचा रावण होता. अगदी वरच्या बाजूला महादेव होता. त्याच्या डोईवर अर्धचंद्र आणि गंगा होती.
तर बाजूला पर्वत शिखर दाखवले होते.

तिथून जवळच काही अंतरावर किंचित झाली दोन शिखरे चिकटून काढली होती.
डाव्या बाजूला लांब अंतरावर वरून खाली येणार्या नद्या होत्या. त्या पलिकडे एक खिंडीसारखे काही काढलेले होते.

तर महादेवाच्या चित्राच्या उजव्या हाताला कोपर्‍यात सूर्यासारखे काही होते.
सूर्य आणि महादेवाच्या चित्राच्या मधे रेषाच रेषा होत्या.

अधून मधून काही पौराणिक चित्रे होती.

उन्मेषने विचारले " दिदी, काल कोणत्या नकाशाबद्दल बोललेलीस तू झोपायला जाण्याच्या आधी ?"
ती त्याच्याकडे बोलून गेली होती.
आता खरे तर खूप काळ गुप्तता पाळून चालण्यासारखे नव्हते. टीम बनवलीय तर माहिती शेअर करावी लागणार होती.

तो नकाशा असलेला फोटो तिने शोधून काढला.
उन्मेषच्या डोक्यातही रात्री किडे चाललेच होते.

"दिदी, हा नकाशा आहे भारताचा. रावण म्हणजे लंका. इथपासून कैलासपर्यंतच्या रस्त्यावर आपण आहोत. बरोबर ?"
हा शोध अफलातून होता. आता तिच्या डोक्यात हजार वॅटचा दिवा लागला.
" हा कैलास म्हणजे हिमालय. डाव्या बाजूला म्हणजे शिवालिक रांगा. सतलजचे खोरे "
" दिदी , डॉन गॅटिंग हा भटक्या आहे. त्याचा ब्लॉग पाहतेस का ?"
" हो. कधी कधी "
" हा सतलच्या खोर्‍यात पण आला होता. मी तो एपिसोड स्किप केलेला. त्याचा संबंध आहे का इथे ?

जगज्जेत्याचा मार्ग !
अलेक्झांडर द ग्रेट !!
खैबर खिंडीतून आला होता. तिथून तो भारतात आला.
आल्यावर सतलज नदीच्या किनारी राहिला होता.

या दरम्यान त्याने एका अदृश्य आणि रहस्यमय शहराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याने अनेक पथकं बनवली होती.
अलेक्झांडरला तर ते शहर दिसले नाही. पण त्याच्या सैनिकांना दिसले होते.
पण त्यांना पुन्हा त्याचा रस्ता सांगता आला नाही.

कुठल्यातरी डोंगरकड्यावरून ते घसरले आणि एका नदीच्या विस्तीर्ण पात्रात येऊन पडले.
तिथे नदीने यू आकाराचे वळण घेतले होते.
आणि मधल्या बेटावर त्यांना रहस्यमय शहर दिसले होते.
त्यांनी केलेल्या वर्णनांनाच आता अधिकृत समजले जाते.

तिथे त्यांच्यावर अज्ञात अशा लोकांनी हल्ला केला. त्यांच्या हल्ल्यात ते मूर्छित झाले. शुद्ध आली तेव्हां ते एका मठात होते. तिथल्या भिक्खूंनी त्यांना गरमागरम पेज देऊन शुध्दीवर आणले. आणि नंतर खेचरांची व्यवस्था करून त्यांच्या मुक्कामी पोहोचवले होते.

हे चित्र इथे का असेल ?
मंदीराच्या चार कोपर्‍यात चार विचित्र बांधकामे होती. अजून एक पाचवे बांधकाम मुख्य मंदीराच्या मागे होते.
या पाचही वास्तूंची तोंड वेगवेगळ्या दिशांना होती. त्यात कसलीही संगती लागत नव्हती.

झिलमिलने आता राजला फोटो घेण्याचे काम दिले. त्याने समोरच्या कातळावर चढून जवळपास एरीयल व्ह्यू सुद्धा घेतला. बारीक सारीक गोष्टींचे फोटो घेतले गेले.

या मंदीरात येण्यासाठी सुचवण्यामागे मोठा संकेत होता.

एकच गोष्ट खटकत होती.
ती म्हणजे चीन मधे ड्रॅगन महोत्सवाच्या वेळी सिंहाचे जे मुखवटे वापरतात तत्सम प्राण्याची शिल्पं इथे होती. सिंहाचा मुखवटा कार्टूनप्रमाणेच असतो. दोन प्रकारचे मुखवटे असतात. एक सिंह प्रसन्न वाटतो तर एक रागीट.
इथे रागीट सिंह होता. तो ही चायनीज.

पण असा सिंह तर आपण बदीनाथला जातानाही पाहिला होता.
कुठे बरं ?
नेपाळच्या पाशुपतीनाथ मंदीराच्या परीसरात पण आहेच की.
आणि लेह ?
आणि दार्जिलिंग ?

इथे एक प्राचीन साम्राज्य असेल का ?
प्रवेश निषिद्ध का लिहीले असावे ?
असे म्हणतच त्यांनी गाभार्‍यात प्रवेश केला आणि तिच्या तोंडून किंकाळी फुटायचीच राहिली होती.

गाभार पूर्ण मोकळा होता. जणू तिथे कधीही काहीही नव्हते.
ती अंधश्रद्धाळू नसली तरी सवयीपेक्षा वेगळे काही तरी, मान्यतांना धक्का देणारे दृश्य पाहून चांगलाच धक्का बसला होता. नंदी आहे पण शिवलिंग नाही. हे कसले मंदीर ?

गाभार्‍यात खालून हवा येत होती.
खाली भुयार होतं. कदाचित भुयारी रस्ता.
उतरायची इच्छा होती. पण मागे फिरायची वेळ झाली होती.

भूकही प्रचंड लागली होती. पाणी थोडेच होते. कुठे झरा पाहून बाटल्या भरून घ्याव्या लागणार होत्या.
आता इथेच जेवण करावे या विचाराने सगळे बसले.
मक्याच्या रोट्या असलेले फडके सुटले. सोबत गाडग्यात सरसों का साग दिलेलं होतं.
एरव्ही मुद्दामून कुणी सरसों खाल्लं नसतं.

पण भूक इतकी होती कि दुष्काळातून आल्याप्रमाणे सर्वांनी अन्नावर हल्ला चढवला.
सरसों का साग आणि मक्के की रोटी हा काँबो जबरदस्त पदार्थ आहे यावर सर्वांचे एकमत झाले.
आता माघारी निघणे गरजेचे होते.

***********************************************

पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचा अहवाल वाचून कर्नल मुजीर रेहमान काळजीत पडले होते.
एक सीक्रेट फाईलच गायब झाली होती.

भारताने १९९८ ला अणुस्फोट केल्यानंतर इस्त्राएल पाकिस्तानच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यांच्या भारतीय अधिकार्‍यांसोबत बैठका चालू होत्या. त्याचे वृत्तांत आय एस आय ला मिळत होते.

इस्त्राएल हल्ला करण्यासाठी भारताला कागदावर सह्या करायला प्रवृत्त करत होते.
पंतप्रधान वाजपेयी असमंजस अशा अवस्थेत होते. सही करून त्यांना अडकायचे नव्हते. इस्त्राएलही अस्वस्थता इस्लामिक बाँब हमास च्या हाती पडेल म्हणून होती. वाजपेयींनी इस्त्राएलही ही अवस्था ओळखली होती.

पाच एफ सोळा विमाने मुंबईत दाखल झाली होती. त्यावर डागण्यासाठी क्षेपणास्त्रे समुद्री मार्गाने येत होती.
त्यात न्युक्लीअर डिव्हाईस असू शकते हा अहवाल रॉ ने दिला होता.

मिलिटरी एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची अणुभट्टी नष्ट केली तरीही वाहणार्‍या वार्‍यांनी भारतालाही मोठा फटका बसणार होता. आणि जर अणूहल्लाच झाला तर भारत पाकिस्तान युद्ध पेट घेऊ शकत होतं.
या युद्धाचे निमित्त करून अमेरिका आणि रशिया हे नेहमीचे खेळाडू या क्षेत्रात एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता होती.

रशियाची सज्जता अफगाण, चीन, पाकिस्तान आणि सोव्हिएत महासंघ मिळतात त्या क्षेत्रात होती.

आणि इस्त्राएलचा कंटेनर आला.
पण तो पूर्ण रिकामा होता. त्यातली क्षेपणास्त्रे गायब होती.

या प्रकरणाची फाईल गायब झाली होती.

ती लेफ्टनंट कर्नल खान यांच्या कस्टडीत येत होती. खान यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती बनवण्यासाठी पत्र लिहीण्याचे विचार कर्नलच्या मनात घोळत होते.
अनर्थ होणार होता.

त्यांनी फोन लावला.
" नवी दिल्ली ?"
" येस. एक्स हिअर "
" एक्स ! फाईल मिसिंग "
तिकडून एक सुस्कारा ऐकू आला.
आणि मग आवाज आला.
" दक्ष प्रजापती, रॉ "

कर्नल टेबलावर बोटांनी तबला वाजवत राहीले.
दक्ष प्रजापती !
कितव्यांदा हे नाव आडवे आले होते.

( नकाशा योग्य वेळी दिला जाईल )
सर्व चित्रे आंतरजालावरून साभार.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झालेले सगळे भाग एकदमच वाचले. मस्तच चालू आहे.

भरपूर कष्ट अन अभ्यास दिसतोय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत >>> + 1

रानभुली, अत्यंत रोमांचक, उत्कंठावर्धक आणि पकड घेणारी कथा आहे. आज बऱ्याच दिवसांनी माबोवर आले आणि हा खजिना मिळाला. सगळे भाग एकामागे एक वाचले. पुढचे भाग देखील असेच भराभर यावेत अशी विनंती! आणि त्यासाठी शुभेच्छा..

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
तुमचे सर्वांचे प्रतिसाद मोलाचे आहेत. कथाबीज आवडतेय कि नाही याच्या पसंतीच्या पावतीमुळे लिहायचा हुरूप वाढतो. त्यामुळे कसे आभार मानावेत हेच समजत नाही.
@अस्मिता - जसे जमेल तसे वाच.
@ सर्व वाचकांसाठी : वाचकांचा खोळंबा होतो याचे खूप दडपण आहे. पण दडपणाखाली पूर्ण करू नये असे वाटतेय. या मालिकेची रूपरेषा गेल्या वर्षांपासून घोळतेय पण प्रत्यक्ष लिखाणाला मुहूर्त लागत नव्हता. त्यामुळे त्याला आकारही येत नव्हता. ऑफलाईन पूर्ण करून मग पोस्ट करण्याचे विचार मनात आले पण चांगला एडीटर मिळत नाही. मायबोलीवर लिखाण अप्रकाशित ठेवण्याची चांगली सोय होती. ती आता नाही. तसे असते तर संपूर्ण मालिका पूर्ण करून तपासून देणे खूप सोयीचे झाले असते.

प्रत्यक्ष लिहायला घेताना अनेक गोष्टी वगळाव्या लागल्या काही नव्याने आल्या. वाचकांना नवीन भाग देताना त्यामुळे उशीर होतोय. घाईत पूर्ण केली तर विचका होईल ही भीती पण आहे. आपल्या सहकार्यासाठी आभार.

काल रात्री सगळे प्रकाशित भाग एकदम वाचलेत. मस्त सुरु आहे कथानक, एकदम बांधिव, आणि उत्कंठावर्धक. तुमच्या पेस ने लिहा पण कथानक नक्की पुर्ण करा.

ज्खूप सुंदर लिहिताय, हवा तेव्ढा वेळ घ्या आणि मालिका पूर्ण करा.
दर भागाला प्रतिसाद दिला नसला तरी तो गृहीत धरा. आम्ही वाचत आहोत आणि आवडतही आहे. पुभाप्र

माबोकर वाचकांना एक वाचक म्हणून विनंती - या आणि इतर अशाच अनेक लेखनाला एखादा तरी प्रतिसाद द्या.
हे लेखक स्वतःचा वेळ देऊन लिहीतात. त्यांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचा हुरूप वाढवला पाहिजे.

इतर काही कल्पकताशून्य धाग्यांवर 200-300 प्रतिसाद येतात आणि या कथांवर तुरळक ... यामुळे अनेक लेखक माबो सोडून गेले आहेत.

त. टी. - मी कोणाचाही ड्यु आय डी नाही.

माफ करा मला पुढचा भाग टाकता आला नाही. बरं नसल्याने आणि त्यातच सगळी कामं, जुनी अडलेली सुद्धा, दत्त म्हणून पुढ्यात ठाकल्याने पुढचा भाग जमला नाही द्यायला. लक्षात आहे... पण हा निपटारा होईपर्यंत लक्ष लागत नाहीये. नाईलाज आहे. समजून घेतलंत याबद्दल आभार आणि पुन्हा एकदा क्षमा मागते.

माबोकर वाचकांना एक वाचक म्हणून विनंती - या आणि इतर अशाच अनेक लेखनाला एखादा तरी प्रतिसाद द्या.
हे लेखक स्वतःचा वेळ देऊन लिहीतात. त्यांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचा हुरूप वाढवला पाहिजे.

इतर काही कल्पकताशून्य धाग्यांवर 200-300 प्रतिसाद येतात आणि या कथांवर तुरळक
>> तुमच्या या प्रतिसादातल्या भावनेचा मनापासून आदर आणि आभार. पण जसे लेखक वेळ देत आहेत तसेच वाचक सुद्धा वेळ देतात. प्रतिसादाने हुरूप येतो हे सत्य आहे पण आवाहन करण्याची गरज आहे असे वाटत नाही. बरेचदा कथा पूर्ण झाल्यावर लोक वाचतात. जर आवडली तर प्रतिसादही देतात. प्रतिसाद नाही म्हणून कथा पूर्ण न करणे योग्य नाही असे मला वाटते.

हा भागही मस्त झालायं...
फोटो सुंदर आहेत..

तब्येतीची काळजी घे रानभुली..!

Pages