
यांनी घडवले माझे मराठी...
शिक्षक म्हटले की चटकन आपल्या नजरेसमोर शालेय शिक्षक येतात. पण आपले आद्य शिक्षक हे खरे तर आपले माता-पिता व कुटुंबीय असतात. मला माझ्या आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबांचा सहवास अधिक लाभला. आजी शालेय शिक्षिका होती. ती मराठी व हिंदी शिकवायची. त्यामुळे चांगले मराठी बोलायचे व लिहायचे संस्कार तिच्याकडून झाले. आजी-आजोबांमुळे त्यांच्या पिढीचे काही विशिष्ट शब्द वारंवार माझ्या कानावर पडायचे, जे माझ्या समवयस्क मुलांना माहीत नसायचे. त्यातला एक म्हणजे ‘तिगस साली’(तिगस << तिगस्ता = गेल्याच्या मागील वर्षी ). शेतीतील पिकांसंबंधी बोलताना हा शब्द शेतकऱ्यांच्या तोंडी पुढे मी बऱ्यापैकी ऐकला. आजी मराठी लेखनही करायची. तिच्या लेखनात ‘सांप्रत’ हा शब्द बऱ्यापैकी यायचा. तो माझ्या मनात रुजला. पुढे मी लेखन करू लागल्यावर तो माझ्या लेखनातही बर्यापैकी डोकावे. पुढे मी प्रयत्नांती त्याला काढून ‘सध्या/हल्ली’ असे लिहू लागलो. माझी आजी छोटी मोठी पुस्तके लिहून स्वतः प्रकाशित करायची. त्या काळची छपाई खिळे जुळवून असायची. त्यामुळे छपाईच्या पहिल्या खर्ड्यात प्रचंड चुका असायच्या. मग त्या सगळ्या प्रतीचे मुद्रितशोधन आम्ही कुटुंबीय घरी एकत्र करत असून. त्यातून ह्रस्व /दीर्घ आणि शुद्धलेखनाच्या इतर अनेक गोष्टींवरचे चांगले संस्कार माझ्यावर झाले.
मराठीच्या शालेय शिक्षकांमध्ये कायम लक्षात राहिलेले आहेत ते म्हणजे डॉ. वि. य. कुलकर्णी. आमचे शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांचे स्वतःचेही पीएचडीचे शिक्षण चालू होते. त्या काळी असे शिक्षक शाळांमध्ये दुर्मिळ असायचे. त्यांनी मराठी भाषेसंबंधी बरंच काही शिकवलं होतं. ते सर्व एकदम सांगता येणार नाही. परंतु कायम लक्षात असलेले उदाहरण लिहितो (हे यापूर्वी अन्य धाग्यावर लिहिलेले आहे). आम्ही नववीत असताना एके दिवशी चालू विषय बाजूला ठेवून त्यांनी संपूर्ण वर्गाला सांगितले,
“आता आज मी तुम्हाला जी गोष्ट शिकवणार आहे ती कायम लक्षात ठेवा. ह्या गोष्टीबाबत समाजात ९० टक्के लोक चुकीचे लिहिताना मला दिसतात. ही चूक तुमच्या हातून पुढे आयुष्यभर होऊ नये असे मला वाटते. तेव्हा लक्षपूर्वक ऐका”.
मग त्यांनी आम्हाला ‘द्ध’ हे जोडाक्षर नीट कसे लिहायचे ते शिकवले. आज आपण मराठीतील अनेक ठिकाणचे लेखन पाहिले असता आपल्याला हे जोडाक्षर ‘ध्द’ अशा चुकीच्या पद्धतीने लिहिलेले दिसते. इथे एक मूलभूत गोष्ट अशी आहे. या जोडाक्षरात अगोदर ‘द’ चा उच्चार होतो आणि मग ‘ध’ चा. म्हणून ते योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे. अनेक मराठीचे प्राध्यापक सुद्धा ही घोडचूक करताना दिसतात तेव्हा मला आमच्या वरील शिक्षकांची आठवण सातत्याने येत राहते. खुद्द स्वतःचे नाव ‘उद्धव’ असलेले किती जण आपले नाव शुद्ध लिहीत असतील हाही एक कुतूहलाचा विषय आहे !
माझ्या शालेय जीवनात मी सकाळ, केसरी आणि तरुण भारत ही वृत्तपत्रे वाचत लहानाचा मोठा झालो. त्या काळात या वृत्तपत्रांमधील मराठी लेखन हे आदर्शवत होते. कित्येकदा कुटुंबात चर्चा होत असताना जर आपल्याला मराठी शुद्धलेखन किंवा भाषेसंबंधी अन्य काही शंका आली तर घरातील एखादी व्यक्ती पटकन, “अरे कालच्या दैनिकात असे लिहीले आहे म्हणजे ते बरोबरच असलं पाहिजे”, असे म्हणायची. इतका विश्वास तेव्हा काही वृत्तपत्रांबाबत वाटत असे. (आजची परिस्थिती आपण जाणतोच. इ- वृत्तपत्रांमधील मराठी तर टिंगलीचा विषय व्हावा ही शोकांतिका आहे). तेव्हाच्या सकाळ मधील बातमीलेखन, केसरीचे अग्रलेख आणि तरुण भारतमधली विविध रंजक स्फुटे या सगळ्यांमधून मराठीचे चांगले शिक्षण होई.
अलीकडील वृत्तपत्रीय मराठी भाषा बरीच बिघडलेली असली तरी गेल्या ४-५ वर्षात मला काही चांगले मराठी शब्द वृत्तपत्रांमधून आलेले दिसले. सदनिका, निश्चलनीकरण, उत्परिवर्तन, अंतरभान, नाममुद्रा ही त्यापैकी पटकन आठवणारी काही नावे. आकाशवाणीवरील मराठी बातम्या हा चांगल्या मराठीचा एक स्त्रोत आहे हे मी आवर्जून नमूद करतो. माझ्या लहानपणापासून मी त्या ऐकत आलो आहे आणि आजही (अन्य माध्यमांच्या तुलनेत पाहता) तो एक चांगला स्रोत आहे, हे मला सांगावेसे वाटते.
मी पदवीधर झाल्यानंतर वृत्तपत्रातून मराठी लेखन करत होतो. एके दिवशी सकाळमध्ये संपादकीय पानावर अगदी मधोमध एक भला मोठा लेख आलेला होता. त्याचे शीर्षक ‘इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषेत प्रचंड भेसळ’ या आशयाचे होते आणि लेखक होते आचार्य केळकर. मग त्यांनी नेहमीची अनेक उदाहरणे देऊन आपण मराठी माणसे कसे गरज नसताना अनेक इंग्रजी शब्द वारंवार लेखनात आणि बोलण्यात वापरतो याची उदाहरणे दिली होती ( सॉरी, प्लीज, थँक्यूपासून ते हॅपी दिवाली वगैरे पर्यंत सर्व). पुढे त्यांनी म्हटले होते की, आता निव्वळ हा लेख लिहिण्याचा किंवा मराठी भाषा दिनानिमित्त चर्चा करण्याचा विषय नाही. आपल्याला याविषयी जर खरंच काही भरीव करावेसे वाटत असेल तर आपण एकत्र जमून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. त्यानुसार त्यांनी त्यांच्या घरी एक बैठक बोलावली होती. मी मोठ्या उत्साहाने त्या बैठकीला गेलो. बैठकीपूर्वी जे लोक जमले होते त्यात आमचे एक संस्कृतचे शिक्षकही होते. गप्पांच्या नादात त्यांनी असा विचार मांडला की हे इंग्रजीचे आक्रमण वगैरे लेख लिहायला ठीक आहे. परंतु शेवटी भाषा ही नदीसारखी प्रवाही असली पाहिजे. नंतर बैठक सुरू झाली. त्यात आचार्यांनी प्रास्ताविक केले आणि परभाषांमधील शब्द आपल्या भाषेत येणार हे अटळ आहे हे मान्य केले. परंतु त्यांनी लगेच लोकमान्य टिळक यासंदर्भात काय म्हणत असत याचे उदाहरण दिले. टिळक म्हणायचे,
“परभाषेतील शब्द हे आपल्या भाषेत पीठात मीठ इतक्याच अल्प प्रमाणात असावेत. मीठ जर फारच जास्त होऊ लागले तर संपूर्ण भाकरीच खारट होते”.
तेव्हा केळकरांनी आम्हाला या वाक्याला आदर्श मानायला सांगितले आणि विनाकारण आपण जे इंग्रजी/हिंदी शब्द संभाषणात व लेखनात घुसडत राहतो ते टाळावेत असे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी एक सोपा घरगुती उपाय करायला सांगितला. ते म्हणाले, “आपल्या नोकरी-व्यवसायाच्या दिवशी आपल्या शुद्ध मराठी बोलू वगैरे प्रकार करून चालणार नाही. परंतु सप्ताहातील जो आपला सुट्टीचा दिवस असेल त्यादिवशी आपण स्वतःपुरता मराठी शुद्धीकरण दिवस मानायचा”. मग करायचे काय त्या दिवशी ते त्यांनी अगदी रंजकपणे सांगितले. “सकाळी आवरून झाल्यानंतर छानपैकी झब्बा घाला. त्याला दोन्ही बाजूला खिसे असतील. मग एका बाजूच्या खिशामध्ये ३०-४० पंचवीस पैशांची नाणी ठेवा” (होय, तेव्हा २५ पैशांना ‘किंमत’ होती). हे ऐकल्यावर आमचे कुतुहल वाढले.
ते पुढे म्हणाले, “आता करायचं एवढंच. दिवसभर तुम्ही घरच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात याल. जेव्हा तुम्ही मराठी माणसाशीच बोलत आहात तेव्हा तुमचे वाक्य बोलून झाल्यानंतर जर तुमच्या लक्षात आले की, आपण गरज नसताना उगाच इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यात घुसडले होते, तर मग त्या प्रत्येक इंग्रजी शब्दामागे स्वतःला २५ पैशांचा दंड करायचा ! मग डाव्या खिशात हात घालून एक नाणे बाहेर काढून ते उजव्या खिशात टाकायचे. असे करत करत शेवटी तो दिवस संपेल. दिवसाखेर स्वतःला केलेल्या दंडाची रक्कम किती जमा झाली ते बघा. ती रक्कम कोणाला तरी दान करून टाका. असे नियमित करत राहा आणि मग हळूहळू दंडाची रक्कम कमी कशी होईल याचे तुम्हालाच भान येईल”.
नंतर हा प्रयोग मी एक दोनदा केला व त्याची मजा घेतली. पण नंतर असे ठरवले की यातला मथितार्थ आपण लक्षात घ्यायचा. मग घरी आणि मित्रांमध्ये बोलताना आणि लिहिताना जाणीपूर्वक मराठी शब्दांचा वापर वाढवू लागलो तांत्रिक शब्द वगळता विनाकारणच आपण फॅशन म्हणून जे इंग्रजी शब्द घुसडत असतो त्यांचा वापर कमी केला. सुरुवातीला असे प्रयत्नपूर्वक बोलताना अडखळायला होते. ते कदाचित समोरच्याच्याही लक्षात येत असते. पण एकदा जिभेला आपण वळण लावू लागलो की मग ते आपसूक घडू लागते.
पुढे काही वर्षांनी मला माझ्यात काय बदल झाला आहे याची पावती चक्क माझ्या मुलाकडूनच मिळाली. तो आठवीत शिकत होता. आम्ही सहज हिंडायला बाहेर पडलो होतो तेव्हा तो एकदम म्हणाला, “बाबा मला एक जाणवलं आहे. तू जेव्हा मराठी बोलत असतोस तेव्हा तुझे बोलणे हे चांगल्यापैकी मराठी शब्दांनीच युक्त असते आणि जेव्हा तू आम्हाला इंग्रजीचे काही सांगतोस तेव्हा तू ते इंग्रजीतच व्यवस्थित सांगतोस”. त्याच्या अनुभवविश्वात त्याने माझी इतरांशी तुलना केली असावी आणि त्यातून त्याचा अभिप्राय त्याने मला दिला. माझ्यात हा जो काही बदल घडला त्याचे श्रेय मी आचार्य केळकर यांनाच देईन .
या निमित्ताने आमच्या त्या बैठकांमध्ये घडलेला अन्य एक उपक्रम सांगतो. जेव्हा आपण म्हणतो की मराठी भाषेचा अभिमानाने वापर होत राहिलाच पाहिजे, तेव्हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपली भाषा ही अर्थकारणाची भाषा झाल्याशिवाय त्याला योग्य ती प्रतिष्ठा मिळत नाही. हा मुद्दा लक्षात घेऊन तत्कालीन मराठी उद्योगपतींना आम्ही काही पत्रे लिहिली होती. त्या काळी किर्लोस्कर, गरवारे हे जोरात होते. पत्रांमध्ये आम्ही असे म्हटले होते,
“महोदय, आपण आपापल्या कार्यालयांमध्ये नोकरीचे अर्ज स्वीकारण्यापासून ते इतर अनेक गोष्टी लिहिताना मराठीच्या वापराला उत्तेजन द्यावे. संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेल्या उमेदवारास नोकरी देताना निव्वळ त्या मुद्द्यावरून डावलले जाऊ नये”.
कालांतराने आमचा तो गट काही सक्रिय राहिला नाही. पण माझ्या मनाशी मी एक गोष्ट ठरवून ठेवली की, सभा, आंदोलने, चळवळी, शासनाकडे मागण्या या सगळ्यांपेक्षा सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे, आपण स्वतःला सुधारत जाणे. मी जेव्हा मराठी बोलेन किवा लिहीन, तेव्हा जाणीवपूर्वक मराठी शब्द नीट वापरेन; उगाचच होणारा इंग्रजी/हिंदी शब्दांचा मोह टाळेन. हा प्रयत्न मी माझ्यापुरता सातत्याने करत राहतो.
आपण जेव्हा ‘माझे गुरु’ असे म्हणतो तेव्हा सर्वप्रथम प्रत्यक्ष एखादी व्यक्ती ही तर सर्वात महत्त्वाची. पण त्याचबरोबर विविध माध्यमे ही देखील आपली अप्रत्यक्ष गुरूच असतात. थोडे पुढे जाऊन असे म्हणतो की, एखादा प्रसंग सुद्धा आपला गुरु होऊ शकतो. हा प्रसंग घडला साधारण भारतामध्ये संगणक येऊन थोडासा कालावधी लोटला होता तेव्हा. नुकतीच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ही नावे सामान्यांच्या कानांवर वारंवार पडू लागली होती. त्या दरम्यान महाराष्ट्रात एक अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्यामध्ये एका गृहस्थांनी (आता नाव विसरलो) या दोन नव्या तांत्रिक इंग्लिश शब्दांसाठी अनुक्रमे यंत्रणा आणि मंत्रणा हे शब्द सुचविले होते. ते संमेलनामध्ये त्यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. ही वाचलेली बातमी सुद्धा माझ्यासाठी एक शिक्षकच ठरली.
आयुष्याच्या त्या पुढील कालखंडात ‘मराठीचे शिक्षक’ असे बिरूद मी ज्याला लावू शकतो ते म्हणजे एक मासिक आहे आणि ते म्हणजे ‘अंतर्नाद’. मराठीच्या विकासाचे ध्येय ठेवून हे मासिक सुरू झाले होते. अन्य कुठल्याही मासिकामध्ये नसलेली एक विशेष गोष्ट इथे होती. ते म्हणजे मासिकाच्या पहिल्या पानावरील श्रेयनामावलीत “व्याकरण सल्लागार : यास्मीन शेख’ हे नाव ठळकपणे छापलेले असायचे. व्याकरण सल्लागार नेमलेले कदाचित हे मराठीतील एकमेव मासिक असावे. तेवीस वर्ष हे मासिक चालले आणि नंतर बंद पडले. या काळात मी तिथे दीर्घकाळ लेखन केले. मासिकातील अन्य लेखनातून आणि विविध सूचनांमधून मला मराठी लेखन सुधारत राहण्याची चांगली प्रेरणा मिळाली. सामाजिक वापरातील काही रूढ इंग्लीश किंवा तांत्रिक शब्दांना प्रयत्नपूर्वक चांगले मराठी प्रतिशब्द शोधणे हा भागही त्या मासिकात चांगल्या प्रकारे चर्चिला जायचा. नमुन्यादाखल दोन उदाहरणे देतो. फोनच्या दोन प्रकारांसाठी स्थिरभाष आणि चलभाष हे सुंदर शब्द मला तिथे शिकायला मिळाले. ‘शेअर करणे’ असले भ्रष्ट रूप वापरण्याऐवजी “तुम्हा सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी” असे म्हणणे अधिक चांगले. यावरही तिथे छान चर्चा झाली होती. म्हणून हे मासिक माझ्या आयुष्याच्या मध्य टप्प्यावरील माझे मराठीचे शिक्षकच म्हटले पाहिजे.
मराठी भाषेच्या विकास आणि प्रचारासाठी पोटतिडकीने काम करणारे गोरे नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांचे काही लेख नंतर वाचनात आले. त्यांची एक दोन भाषणेही ऐकली त्यातूनही माझे मराठीचे शिक्षण होत राहिले. तसेच अन्य मराठी माणसे वापरत नसलेले काही मराठी शब्द आपण जाणीवपूर्वक वापरताना त्याबद्दल लाज किंवा दडपण वाटेनासे झाले.
२००५ पासून मी आपल्या संस्थळावर वावरत आहे. इथे मराठी भाषाविषयक अनेक धागे आतापर्यंत निघालेले आहेत. गेल्या दोन वर्षातील कोविडमय काळात मी काही शब्दखेळ नावाचे धागे काढले. तिथे नियमित येणाऱ्या सभासदांनी मराठी शब्द, वाक्यरचना इत्यादी संबंधी अनेक चांगल्या आणि मौलिक सूचना केलेल्या आहेत. त्यातून माझ्या मराठीचा चांगला विकास झाला. त्यादृष्टीने माझे हे सर्व सहकारीही या टप्प्यातील माझे मराठीचे शिक्षकच म्हणता येतील.
यंदाच्या मराठी भाषा दिनानिमित्त संयोजकांनी हा विषय लेखनासाठी ठेवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. एरवी या विषयावरील आपले मनोगत सांगायचे तरी कोणाला आणि ऐकणार तरी कोण, अशी एकंदरीत कौटुंबिक-सामाजिक परिस्थिती आहे. त्या रुक्ष पार्श्वभूमीवर हा उपक्रम एक सुखद गारवा आहे. या निमित्ताने गतायुष्यात डोकावता आले आणि स्मरणरंजन झाले.
धन्यवाद !
.................................................................................................................................................
आस्थेने प्रतिसाद दिलेल्या
आस्थेने प्रतिसाद दिलेल्या वरील सर्वांचे आभार !
दोन प्रतिसादांत दखल घेतो.
आज मराठी भाषा दिन नाही. तो १ मे रोजी असतो.
>>>
अगदी योग्य सूचना. 1 मे आणि 27 फेब्रुवारी या दोन मराठी दिनांचे प्रयोजन वेगळे आहे. त्यामुळे त्यात गल्लत होऊ नये हे बरोबर. मी असे आवाहन करतो की पुढच्या वर्षीपासून सत्तावीस फेब्रुवारीचा उल्लेख ‘मभागौदि’ असा करण्यात यावा.
अस्मिता
अस्मिता
तुमची मराठीसाठीची धडपड आणि मुलांवर केलेले भाषिक संस्कार याबद्दल कौतुक. भाषाविषयक धाग्यांवर नित्यनेमाने जमणारे आपण सर्वचजण एकमेकांचे शिक्षक आहोत.
…
तुमच्या आजींचेही कौतुक वाटले ! >>
हा मुद्दा तुम्ही काढलाच आहे तर थोडे अवांतर लिहितो. माझ्या आजीचे शैक्षणिक टप्पे स्तिमित करणारे आहेत. तिचे लग्न झाले तेव्हा ती फक्त सातवी उत्तीर्ण होती. पुढे लग्न झाल्यावर दर दोन वर्षांनी नियमित पाळणा या गणितानुसार पाच मुले झाली. तिची शैक्षणिक जिद्द तिला अस्वस्थ करत होती. मग तिने बहिस्थ विद्यार्थी म्हणून शिक्षणाला सुरुवात केली (नोकरी करता करता). पुढे ती आणि माझे काका दोघेही बरोबर मॅट्रिक झाले. पुढचा योगायोग बघा. तिचे बीए आणि माझ्या काकांचे एमबीबीएस एकाच वर्षी पूर्ण झाले.
पुढे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ती गप्प बसली नाही. माझे वैद्यकीय शिक्षण चालू असतानाच तिने पीएचडीसाठी नावनोंदणी केली. आणि या सर्वांचा कळसबिंदू म्हणजे तिचे पीएचडी आणि माझे एमडी एकाच वर्षी पूर्ण झाले ! तेव्हा तिचे वय होते ७५ .
तिच्या आयुष्यातील हे विलक्षण शैक्षणिक योगायोग आमच्यासाठी अभिमानाचे आहेत.
तिचे पीएचडी आणि माझे एमडी
तिचे पीएचडी आणि माझे एमडी एकाच वर्षी पूर्ण झाले ! तेव्हा तिचे वय होते ७५ .>>>अगदी प्रेरणादायी व्यक्तीमत्व, त्या काळात हे एक दुर्मिळ उदाहरण असेल. /\
बरे केलेत लिहिलेत. छान वाटले वाचून
आजींची जिद्द आणि चिकाटी
आजींची जिद्द आणि चिकाटी प्रेरणादायी आहेत.
बाप रे केवढा समृद्ध वारसा
बाप रे केवढा समृद्ध वारसा आहे आपल्या कडे
कमाल आहे तुमच्या आजीची!!
कमाल आहे तुमच्या आजीची!!
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
आजीच्या एमए च्या शिक्षणाचा किस्सा तर भलताच रोचक आहे. तो तत्कालीन शासकीय धोरणावर प्रकाश टाकणारा असल्याने लिहितो. बीए झाल्यानंतर माझी आजी मनपाच्या शाळेत नोकरीस होती. आता तिला डोहाळे लागले होते एमए करायचे. पण तेव्हा एक विचित्र शासकीय नियम होता. या नोकरीतील शिक्षकांना एमए ला बसण्यास परवानगी नव्हती. आजीच्या मनात द्वंद्व झाले. पण शेवटी तिला शैक्षणिक उन्नती महत्त्वाची वाटली. तिने चोरून एमए साठी अर्ज भरला आणि एमए झाली.
याचा सुगावा अधिकाऱ्यांना लागलाच. नियमानुसार कारवाई झाली आणि तिला राजीनामा द्यावा लागला. मग तिने तिच्या कारकीर्दीची उरलेली वर्षे एका खेड्यात जाऊन खाजगी शाळेमध्ये नोकरी केली. शिक्षणाच्या जिद्दीपुढे तिने सरकारी नोकरी जाण्याचा धोका सुद्धा पत्करला हे विशेष.
आजी ____/\____
आजी ____/\____
आजीला दंडवत. फोटो द्याल का
आजीला दंडवत. फोटो द्याल का एखादा असेल तर?
पीएचडी चा विषय काय होता? त्यांचे मार्गदर्शकही किती वेगळ्या विचाराचे असतील. त्या काळात इतकी मोठी विद्यार्थिनी असून नाउमेद नाही केले.
(चर्चा व्यक्तीगत होत
(चर्चा व्यक्तीगत होत असल्याबद्दल क्षमस्व)
**पीएचडी चा विषय काय होता? >>
विषय "तीन प्रमुख रामायण ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास" होता. त्यांचे मार्गदर्शक अर्थातच त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते. कडकही होते. यांनी ७ वर्षे तिला अगदी पिदवून घेतले !
त्याकाळी संपूर्ण प्रबंध प्रथम हस्तलेखनातच लिहावा लागे.
_/\_
_/\_
तिचे पीएचडी आणि माझे एमडी
तिचे पीएचडी आणि माझे एमडी एकाच वर्षी पूर्ण झाले ! तेव्हा तिचे वय होते ७५ . >>> नतमस्तक.
शिक्षणाच्या जिद्दीपुढे तिने सरकारी नोकरी जाण्याचा धोका सुद्धा पत्करला हे विशेष. >>> नि:शब्द. घरच्यांनी पण मान राखला ह्या निर्णयाचा हे ही कौतुकास्पद.
बी एम सी त मात्र असा नियम नसावा, शिकू द्यायचे बहुतेक.
बी एम सी त मात्र असा नियम
बी एम सी त मात्र असा नियम नसावा, शिकू द्यायचे बहुतेक.
>> शक्य आहे. आमच्या इथे तो नियम कालांतराने उडवला गेला त्यापुढच्या पिढीतील शिक्षकांचे कल्याण झाले.
तोपर्यंत, ज्यांनी कोणी नियमभंग केला असेल त्यांना किंमत चुकवावी लागली.
मलाही नीट सांगता येणार नाही
मलाही नीट सांगता येणार नाही पण आत्ता 95 वर्षाची असणारी माझी बाबांपेक्षा मोठी आते, फायनल झाल्यावर बी एम सी त शिक्षिका म्हणून लागली आणि नंतर तीने मॅट्रिक, बी.ए. , बी. एड. , एम. ए. , एम. एड. केलं आणि त्याबरोबर हिन्दीची पंडित, उर्दूची काबिलही झाली आणि शेवटी बीट ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झाली. तुमच्या आज्जीचे वाचल्यावर मला तीच आठवली. अजूनही फिट आहे आणि सार्वजनिक वाहनातून कोकण, गुजरातेत एकटी जाते, फक्त काठी बरोबर. थोडं अवांतर लिहिलं पण मला खरंच ती आठवली. मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व आणि कविताही करते.
शिक्षक असणाऱ्या माझ्या आतोबांनी तिला शिकू दिलं त्याकाळी हे फार महत्वाचे वाटायचं तिला. ते मॅट्रिक होते पण बायकोची हुशारी बघून तिला शिकू दिलं.
आजी ____/\____
आजी ____/\____
>>>बी एम सी त मात्र असा नियम नसावा, शिकू द्यायचे बहुतेक.>>>
>>>>आमच्या इथे तो नियम कालांतराने उडवला गेला >>>
पुढे शिकून आपली प्रगती करायची नाही असले नियम असतील तर ते अन्यायकारकच होते.
अन्जू _/\_ काय थोर आहेत गं
अन्जू _/\_ काय थोर आहेत गं आत्या व आतोबाही.
अन्जूमराठी भाषेवर प्रचंड
अन्जू
मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व आणि कविताही करते. >>> वंदन आणि कौतुक!
.........
माझ्या आजीने सांगितल्यानुसार सुमारे ६० वर्षांपूर्वी शिक्षकी पेशात अशी परिस्थिती होती:
सुरुवातीस फक्त प्राथमिक शिक्षकांनाच निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत होता; माध्यमिक शिक्षकांना नव्हता. त्यामुळे नोकरी करता करता पुढे शिकू इच्छिणारे कितीतरी शिक्षक मानसिक कात्रीत सापडले जात. पदव्युत्तर शिकून माध्यमिक शिक्षक व्हावेसे त्यांना नक्कीच वाटे. पण तिकडे गेल्यास पुढे निवृत्तीवेतन नाही ही टांगती तलवार. अशा परिस्थितीत कित्येकांनी उच्चशिक्षणाचा नाद सोडला होता.
कालांतराने माध्यमिकलाही निवृत्तीवेतन लागू झाले ते चांगलेच झाले.
अन्जूमराठी भाषेवर प्रचंड
दु प्र
कुमार सर, तुम्हाला लाभलेले
कुमार सर, तुम्हाला लाभलेले सर्वच शिक्षक, आजी , त्यांची शिकवण सगळेच प्रेरणादायी आहे. आज इतक्या वर्षांनीही तुमचे भाषेवरचे प्रभुत्व, तुमचे या विषयीचे लेख याचं मूळ इथे आहे तर. आवडला लेख.
छान आहे लेख. आजींबद्दल खूप
छान आहे लेख. आजींबद्दल खूप कौतुक वाटले.
मनापासून आणि सविस्तर लिहिलं
मनापासून आणि सविस्तर लिहिलं आहे, खूप आवडलं.
तुमच्या आजींबद्दल अतिशय आदर वाटतो.
आस्थेने प्रतिसाद दिल्याबद्दल
आस्थेने प्रतिसाद दिल्याबद्दल वरील सर्वांचे मनापासून आभार !
....
या निमित्ताने कुसुमाग्रजांचे एक अवतरण उद्धृत करतो :
“माध्यमिक शाळेत विद्यार्थी जेवढा घडतो तेवढा प्राथमिक शाळेत घडत नाही, अथवा कॉलेजमध्येही नाही. पहिल्या ठिकाणी माती फारच ओली असते आणि दुसऱ्या ठिकाणी ती फारच घट्ट झालेली असते”.
माध्यमिक शाळेत असताना आपल्या मराठी भाषेची जडण-घडण करणाऱ्या सर्व शिक्षकवर्गाला मनापासून वंदन !
लेख सुंदर व प्रेरणादायी आहेच.
लेख सुंदर व प्रेरणादायी आहेच. आजींची कमाल आहे तुमच्या. दंडवंत
कुमारजी तुम्ही , तुमची आजी,
कुमारजी तुम्ही , तुमची आजी, तुमचा लेख सर्वच स्पूर्तिदायक .
मधे एका आकाशवाणी वरील एका वाहिनीने एक मिनिट एकही इंग्रजी शब्द न वापरता संभाषण करायचं तर बक्षीस असा प्रयोग केला होता . बहुतेक सगळे नापास व्हायचे .
परदेशात आमचे कर्मचारी एकमेकात मराठी बोलताना इतके ईंग्रजी शब्द वापरायचे की मराठी इंग्रजीची बोली भाषा आहे का असा प्रश्न विचारून आम्हाला मान खाली घालायला लावली होती .
मीपण नेहमी फक्त मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करतो .
अरेच्चा ! हा लेख कसा काय मिस
अरेच्चा ! हा लेख कसा काय मिस झाला ? काय सुंदर लिहीलेय !!!!
>>>एक मिनिट एकही इंग्रजी शब्द
>>>एक मिनिट एकही इंग्रजी शब्द न वापरता संभाषण करायचं तर बक्षीस असा प्रयोग>>> भारीच.
मराठी लेखनाचा असा प्रयोग मायबोलीवर पण करायला हरकत नाही
उत्तीर्ण लोकांचे प्रमाण किती असेल याची उत्सुकता आहे ..... ???
लेख आवडला. पण आपण स्रोत ऐवजी
लेख आवडला. पण आपण स्रोत ऐवजी स्त्रोत लिहीलेले वाचून आश्चर्य वाटले.
डॉक्टर , लेख आवडला. तुमचे
डॉक्टर , लेख आवडला. तुमचे विज्ञानवर सोप्या मराठीत लिहिलेलं लेख आवर्जून वाचतेच पण ललित लेखही आवडतात
तुमच्या आजींनाही दंडवत आणि प्रणाम _/\_
जिद्द आणि चिकाटीला सलाम
कुमार सर,
कुमार सर,
लेख अतिशय आवडला. तुमच्या आजींच्या कष्टाचे आणि चिकाटीचे कौतुक, त्यातून खूप शिकण्यासारखे आहे.
माझे बालपण जन्मापासूनच मोठ्या शहरात गेल्यामुळे मी नेहमीच प्रमाण भाषा शिकलो, त्यामुळे ग्रामीण भाषेशी कधीच संबंध आला नाही. गोविंदराव तळवलकर हे संपादक असताना महाराष्ट्र टाइम्स आवडत असे. घरी मटा. आणि टाइम्स ऑफ इंडिया अशी दोन्ही वृत्तपत्रे येत असत, वडिलांनी इंग्रजी शिकायला प्रोत्साहन दिले. माध्यमिक शाळेत इंग्रजी वाचन वाढले आणि ते अधिक आवडू लागले, त्यामुळे मराठी वाचन जरा मागे पडले पण त्याची खंत नाही. माझ्या दृष्टीने भाषा हे निव्वळ संवाद साधण्याचे आणि ज्ञान ग्रहण करण्याचे साधन आहे. भाषेबद्दल ओढ हा प्रकार मला समजत नाही किंवा आपलासा वाटत नाही. मराठी शुद्धीकरण करण्याच्या फंदात मी पडत नाही, पण शक्यतो साधी-सरळ-सोपी भाषा (जी सर्वाँना सहज समजेल अशी) वापरण्याकडे माझा जास्त कल असतो, उगीच क्लिष्ट केलेली भाषा मला व्यक्तिशः आवडत नाही. (मग ती कुठलीही भाषा असो).
आपली भाषा ही अर्थकारणाची भाषा झाल्याशिवाय त्याला योग्य ती प्रतिष्ठा मिळत नाही. या तुमच्या मताशी मी १०० न्हवे तर २०० टक्के सहमत आहे. या संबंधात श्री. दीपक घैसास यांचा हा व्हिडीओ बघावा, अशी शिफारस करीन.
<< मराठी लेखनाचा असा प्रयोग मायबोलीवर पण करायला हरकत नाही. उत्तीर्ण लोकांचे प्रमाण किती असेल याची उत्सुकता आहे. >>
नको. एखादा मराठी शब्द 'निव्वळ सुचवला' तर काहींना फणकारा येतो आणि उगीच तिरकस प्रतिसाद येऊ लागतात. त्यापेक्षा नकोच.
आस्थेने प्रतिसाद दिल्याबद्दल
आस्थेने प्रतिसाद दिल्याबद्दल वरील सर्वांचे मनापासून आभार !
या प्रतिसादांमधून काही विशेष मुद्दे पुढे आलेले असल्यामुळे स्वतंत्रपणे दखल घेतो.
१. स्रोत ऐवजी स्त्रोत लिहीलेले वाचून आश्चर्य >>
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. ! संपादन केले आहे.
या निमित्ताने माझ्या संगणक टंकनाच्या काही मर्यादा स्पष्ट करतो. जेव्हा मी हस्तलेखन करतो तेव्हा मी शुद्धलेखनाबाबत जास्तीत जास्त काटेकोर राहू शकतो. संगणकावर मात्र मर्यादा येत आहेत.
गेली दोन वर्षे मी बोलून टंकनाची सुविधा वापरत आहे. नंतर त्याचे संपादन करावेच लागते. ते करताना काही वेळेस आळस तर काही वेळेस दुर्लक्ष होत आहे हे बरोबर.
या निमित्ताने अजून काही मुद्दे. हस्तलेखना इतकी शुद्धता संगणकावर सर्वांनाच जमत नाही याचे कारण म्हणजे टंकनासाठी वापरात असलेल्या विविध मंत्रणा. माझी काही निरीक्षणे लिहितो.
१. अगदी अचूक लेखन करायचे असल्यास काही जोडाक्षरे मायबोलीच्या चौकटीतच व्यवस्थित टंकता येतात.
२. मी माझा मोठा लेख ऑफलाइन पद्धतीने लिहिताना गूगल इनपुट टूल्सचा वापर करतो. त्यात सुद्धा 100% शुद्धलेखन होऊ शकत नाही असे लक्षात आले आहे.
३. अलिकडे काही पूर्ण मराठी पद्धतीच्या टंकनसुविधा आलेल्या आहेत. परंतु आता त्या नव्याने शिकण्याइतका वेळ आणि ताकद माझ्याजवळ नाही. त्यामुळे शुद्धलेखनाला काही मर्यादा राहतीलच.
मनापासून आभारी आहे !
Pages