दिल का रिश्ता.
इसवी सन- २००३
जय मेहता- अर्जुन रामपाल
टीया- ऐश्वर्या रॉय
जयचा बाप- परेश रावळ
अनिता- ईशा कोप्पीकर
टीयाची आई- राखी
सुरूवात.
जय आफ्रिकेतून आंघोळ वगैरे करून घाईगडबडीत त्याच्या मुंबईतल्या घरी येण्यासाठी निघतोय. आणि त्याचवेळी
रावळपापा लंडनहून घराकडे निघालेले असतात.
रावळपापा अत्यानंदाने घरात घुसून मीच आधी पोचलो अशी घोषणा करतात. परंतु जय त्यांच्याआधीच पोचलेला असतो.
दर वर्षी एका विशिष्ट दिवशी जयच बापाच्या आधी घरी पोचत असतो, हे आपल्याला त्यांच्या संवादातून कळतं.
दुर्दैवाने रावळपापांची फ्लाईट लंडनला वगैरे दोन तास लेट
झाल्यामुळे पापांचा चान्स याही वेळी हुकलाय..!
पण काय हरकत नाय बरं का पापा. पुढच्या वर्षी ट्राय करा. आम्हालाबी तसं काय काम नसतं. आम्ही अंपायर म्हणून बसतो इथं तुमच्यासाठी.
इकडे रावळपापा बेडरूममध्ये आपल्या मृत बायकोच्या
फोटोपुढे उभं राहून तिला बड्डे विश करतायत..!
तिकडे शेजारच्या रूममध्ये जय आईच्या पैंजणाशी पॅरानॉर्मल संवाद साधत तिला बड्डे विश करतोय..!
आईचा पूर्वीच कधीतरी विमान अपघातात वगैरे मृत्यू
झालाय..! परंतु जयला हे मान्य नाहीये..! त्याला वाटतंय की त्या पैंजणाच्या रूपात आई सदैव त्याच्याबरोबर आहे..!
असा निरागस भावनाशील जय..! तर जयचं काही होऊ शकत नाही..! आई बाकी फोटोतूनसुद्धा मंद मंद
मायाळू मायाळू हसत असते.
रावळपापा पोराला उद्देशून पूर्णवेळ 'अरे यार अरे यार' असेच म्हणतात.. पोराशी अत्यंत दाट मैत्रीचे संबंध आहेत त्यांचे..!
शिंगं मोडून वासरांमधी शिरण्याची बॉलिवूडच्या बापांची जी परंपरा असते; रावळपापा ती वाट मोडू इच्छित नाहीत..!
मैत्रिण अनिता थेट समाजसेविकाच आहे. समाजसेवेसाठी तिने एक विशिष्ट क्षेत्र निवडले आहे. त्यामुळे जयला घेऊन ती एका मूकबधिर मुलांच्या शाळेत जातेय.
आणि आश्चर्य म्हणजे टीया तिथेच शिक्षिका आहे.
तिथे ती शाळकरी मुलांबरोबर हसतहसत बास्केटबॉल खेळत असते. तर मग तिला बघून जय गार पडतो..!
ऐश्वर्याचं ते स्माईल पुढे १५-२० वेळा पहायला मिळतं..
म्हणजे कबूलाय की आहात तुम्ही अतिसुंदर..! आणि तुमचं ते
स्माईलही फारच जगप्रसिद्ध वगैरे..! परंतु म्हणून किती वेळा हसून दाखवणार ना..! म्हणजे त्यातून समजा नंतर जबड्याचे स्नायू आखडण्याचा वगैरेही त्रास होत असेल ना..! तर त्या त्रासाचं कसं काय करता? म्हणजे काळजीपोटी विचारलं.. सहजच.. बाकी तसं काय नाय.
बाकी त्या शाळेतल्या ओरिजनल शिक्षिकाही त्या सीनमध्ये दिसतात. ऐश्वर्याच्या उपस्थितीचा एक स्पष्ट दबाव त्यांच्या
पूर्ण व्यक्तिमत्त्वांवर दिसतो. त्यांनी हा दबाव घेण्याचं काहीच कारण नव्हतं खरं तर.. पण असो.
रावळपापा हुबेहूब अब्जाधीश बिझिनेसमन. जय प्रेमात
पडल्याचं समजल्यावर पापाच एक्साईट होतायत..! टणाटण उड्या वगैरे मारतायत..!
हाच तर फरक असतो त्यांच्यात आणि आमच्यात..!
एकेकाळी आमच्या प्रेमविषयक हालचाली माझ्या वडीलांच्या कानावर गेल्या होत्या. त्याप्रसंगी वडीलांच्या आवाजात एक हिंस्र धग होती की, "का रं ss.? लव झालंय गा तुला ?
आं ss?.. लय लव करू वाटतंय गा ? व्हय रं ?? लय
माजल्यावानी हुतंय गा ??"
तर त्यांच्या सवालांमधली ती दहशत बघूनच आमी कायमचा हबका खाल्ला..! जाग्यावर गोठून गेलो..! आनी आमच्या लवचा आख्खा इशय तिथंच सपला..!
पण इथे हे बापलेक जरा काही झालं की एकमेकांना मिठ्या मारतात.. माराव्यात मिठ्या त्यांनी.. काय प्रॉब्लेम नाही.! परंतु अगदी गैरसमज होईल इतक्या वेळा नको..!
तर मग जयकडून मूकबधिर मुलांसाठी चॅरिटी शोचे
नियोजन..! शिक्षिकेलाही त्या शोमध्ये एक आयटेमसॉंग करावे लागते.. कारण ती शिक्षिका अर्थातच ऐश्वर्या रॉय आहे..!
दय्या दय्या दय्या रे..! हेच ते गाणं..! जे आमच्या रसिक ट्रॅक्टर ड्रायव्हरांनी आम्हाला बेसुमार वेळा ऐकवलं होतं..!
बाकी मग जय टीयाला प्रपोज करतो परंतु तिथेच चिमुटभर ट्विस्ट आहे..! टीयाच्या बॉयफ्रेंडची एंट्री होते. म्हणजे प्रियांशू चॅटर्जी..! ऊर्फ राज..!
तिकडे जयची अवस्था मोडलेल्या फांदीसारखी..! दर्देदिल जय आईचे पैंजण काढून पुन्हा एकदा पॅरानॉर्मल संवाद
साधायला लागतो की मी हार मानणार नाही वगैरे.!
आता मुलगी सरळसरळ नाही म्हणालीय..! ऑलरेडी तिचं जमलंय एकाबरोबर..! तर उगाच त्या मॅटरमध्ये खेटत
बसण्यात काही अर्थ है का.! पण पैंजण हे असलं काही सांगू शकत नाही..!
राज आणि टीयामध्ये घट्ट बॉंडींग आहे, हे सरळसरळ दिसतंच मग आपल्याला..! आणि त्यांना राखीमाँचा आशिर्वादपण आहे.! बास की मग.! सपला इशय..!
मग लग्न, माप ओलांडणे आणि हुंड्याच्या स्वरूपात राखीमाँ राजच्या घरी..! कारण राज अनाथ असतो..! आणि त्याला
राखीमाँ मध्ये आई सापडते..! तसा एका गाण्याच्या
माध्यमातून दोघांचा रोमान्स दाखवलाय.. त्यामुळे गाणं
संपल्यावर लगेच टीयाला मुलगा होतो..!
इकडे जय दारू पिवू पिवून टाईट..!
जगभरातले सगळे टॉपचे सीईओ, बिझनेसमेन वगैरे माझ्या भेटीसाठी तरसतायत आणि मी टीयासाठी तरसतोय, असा काहीतरी एक डायलॉग आहे जय मनुष्याचा ..!
असाच एकदा जय फुलटू फकाट होऊन ॲक्सिडेंट करतो. जयची गाडी आणि राजची गाडी यांच्यात धडाम्मधूम् ठोकर..! दोन्ही गाड्या स्लो मोशनमध्ये उलट्यापालट्या..! घोडे वगैरे सगळे बंधमुक्त..!
तिकडच्यापैकी राज ऑन दी स्पॉट खलास..!
इकडच्यापैकी अनिता ऑन दी स्पॉट खलास..!
उरले दोघेच..!
जय आणि टीया..! ऐश्वर्या आणि रामपाल..!
जय होss!!
राज हा या पिच्चरमधला एकमेव सेन्सीबल माणूस..! त्याला डायरेक्टरनं हकनाक मारून टाकलं..! जयला काही झालं नाय. तो जसाच्या तसा फूल पीसमध्ये शिल्लक राह्यलाय. आपल्याला छळायला.
पुढचा सीन हॉस्पिटमधला.. बेडवर जखमी स्वरूपातली टीया.. शेजारी चिंताग्रस्त डॉक्टर्स...टीया हळूहळू
डोळे उघडतेय..! डॉक्टर्स एकमेकांकडे पाहून
आशादायकपणे बुगुबुगु मान हलवताय..!
परंतु हे काय होतंय.! टीयाबेटी राखीमाँलासुद्धा ओळखत
नाहीये..! ओह् शिट् ! अवघडच्चे हे तर.! आता डॉक्टर्स
एकमेकांच्या कानांत कुजबुजत मान हलवताय..! उगाचच कॉरीडॉरमधनं पळापळी वगैरे नेहमीसारखीच..!
राखीमाँ चिंताग्रस्त..! आता डॉक्टर म्हणतायत की अशा
क्रिटीकल केसेसमध्ये काहीही होऊ शकतं..! मी आता
ताबडतोब न्यूरोसर्जनला बोलावतो.. तुम्ही पैशाचा जुगाड करा..!
तिथेच रावळपापा दबा धरून उभे असतात.
ते म्हणतेत पैशांचा काईच विषय नाय. पयले टीयाला बरं करा.
बाकी मग डॉक्टरांचं म्हणणं असं पडतं की टीयाची याददाश्त मिटून गेलीय..कधी माघारी येईल काईच सांगता येत नाय..! आता तुम्ही तिला कसल्याच जुन्या आठवणी करून दिऊ नका.. नायतर तिच्या मेंदवावर दबाव येऊन ती पागलबिगल होईल..! आणि तिला जुनं काय सांगत बसू नका..! आता
निसर्गालाच स्वतःचा मार्ग निवडू द्या..!
मोठा बाका प्रसंग गुदरला आहे..! आता हितं भारतात राह्यले तर टियाला जुनं कायतरी आठवून तिच्या मेंदूच्या नाजूक नसा फाटणार..! मग ती येडी बिडी झाली तर कुठं बगत बसता.! म्हणून मग जय, रावळपापा, राखीमाँ, टीया आणि
टीयाचं बाळ, असा सगळा बारदाना आता विमान पकडून साऊथ आफ्रिकेला निघालाय..! आता तिकडं काय हुतंय ते बगाय पायजे.
-----------------------------------******---------------------------
तर रावळपापांनी राखीमाँला घोळात घेऊन पटवून
दिलंय की कार ॲक्सिडेंटमध्ये इतर लोक पैशे चारून
केस दाबून टाकतात... परंतु माझ्या निरागस पोरानं टियाची सगळी काळजी घेतली.. त्यामुळे आता तुमी त्येला माफ केलं
पायजेल.
राखीमाँ टियाला विमानातच ब्रीफींग देतायत की तुझ्या
बेस्टफ्रेंड अनिताचा कार अपघातात मृत्यू झालाय. अनिता ही जयची बायको होती.. आणि आता त्यांच्या मुलाला, अंशूला सांभाळणं हे तुझं कर्तव्यच आहे.. तर आता तू अंशूची मावशी हो...! बाय द वे, त्यासाठी आपण आता आफ्रिकेच्या दिशेने निघालोय.
जय-टिया केपटाऊन दर्शनास निघतात..! आणि त्यातून
समजा जाताजाता आफ्रिकन संस्कृतीच्या विविध पैलूंना
स्पर्श वगैरे..! बाकी आपल्याला तरी ते प्रत्यक्ष कधी
बघायला मिळणार ना..! त्यासाठी पैसा लागतो..!
आहे का तुमच्याकडे? पैसा वगैरे? नाही ना?
मग भागवा सध्या पिच्चरवरच..! कारण केपटाऊन तिकडं आहे..! आफ्रिकेत..! लय लांब है ते..!
मागे शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकातला
वास्को द गामा आला होता वळसा घालून..! आणि
त्यानंतर मग आपले जय-टिया तिथेच असतात सध्या..!
समुद्राच्या दिशेने कुठेतरी बोट दाखवत जय सांगतो की
तिथे अटलांटिक आणि हिंदी महासागर मैलोनमैल प्रवास करून एकत्र आलेत..!
यावर टिया विचारते की तुला पण या समुद्रांप्रमाणे मागचा सगळा भूतकाळ विसरून एक नवीन प्रवास सुरू
करण्याची इच्छा आहे का रे?
बाकी इथे कन्सेप्ट थोडासा चुकला आहे, असं वाटतं..!
कारण प्रवास तर नद्या करतात ना..! समुद्र तर फक्त जागच्या जागीच वरखाली डुचमळत उभा असतो ना..!! पण असो..! मायनर मिस्टेक आहे ही..! त्यामागची भावना महत्त्वाची.!
नवनवीन प्रवासाची ओढ तर त्याहून महत्वाची..!
बाकी मग टणाटण रावळपापांच्या अंगात आता लव्हगुरूचा संचार झाला आहे.. त्यामुळे ते जयला पटवण्यासंबंधी
टियाला दयनीय टिप्स वगैरे देतायत..!
परंतु आपला जय टियाला बिलकुल प्रतिसाद देत नाहीये..! त्याची मजबूरी आपण समजून घेतली पाहिजे..!
कारण जयच्या मनात एक प्रकारचा गिल्ट आहे की
आपण राजला अपघाती मारले..!
आता हे असं होतंच ना म्हणजे..! म्हणजे समजा तुम्ही फुल्टू फकाट होऊन गाड्या उडवता..! त्यात समजा चुकून माणसं वगैरे मारली जातात..! आणि त्याचा नंतर त्रास होतो
तुम्हाला..! तुमचं मन तुम्हाला खातं वगैरे..!
आणि मग तुम्ही समजा आजून तीन-चार वेळा पैंजण
घेऊन बडबडत बसता..! ते बघून तुम्ही पार सटकलाय
म्हणत प्रेक्षक जबडातोड जांभया द्यायला लागतेत समजा..! पण तरीही शेवटी तुम्ही एक भावनाशील सज्जन माणूस
असताच ना..! कारण तुम्ही या पिच्चरचे हिरोच
आहात ना..!
"बीता हुआ कल.. गुजरा हुआ कल..जिंदगी फिर से शुरू
करना..हादसें तो होतेईच रह्यते हय..झालं गेलं गंगेला
मिळालं. आनी जे गेलं ते कायमचंच गेलं..आता काय ते
म्हागारी येनार नाय..आणि शिवाय अपघात म्हणल्यावर त्यात माणसं मरणारच की..! त्येचं काय एवढं..! नवी सुरुवात
महत्वाची..!"
या प्रकारची वाक्यं मग उरलेला एक तास सगळेजण
एकमेकांना सांगत राहतात..!
कोणत्या क्षणी नेमकं कोण कुणाची समजूत घालतंय, हे समजून घेण्यात आपलाच गोंधळ उडायला लागतो..!
कारण सगळेच आळीपाळीने एकमेकांचे दणादण
काऊन्सेलिंग करत सुटतात..!
करारी बाणेदार राखीमाँचेसुद्धा मूड्स प्रचंड स्विंग व्हायला लागतात..! कारण शेवटी असं आहे की आसपास सदैव
सगळे मेंटल लोक वावरत असताना तुम्ही तरी किती काळ अलिप्त राहणार ना..!
ह्या डायरेक्टरची क्षमता बाकी असाधारण आहे..
तो काहीही करू शकतो.. म्हणजे जयच्या हातातून पैंजण खाली पाडून टियाला पटाकदिशी पाय पुढे करायला लावतो की घाल ना आता ते माझ्या पायात वगैरे..!
किंवा समजा केपटाऊनच्या मार्केटमध्ये एखाद्या तंतोतंत
भारतीय ज्योतिषाला स्टॉल लावून बसवू शकतो..!
किंवा समजा जयला परराष्ट्रमंत्र्यांची अपॉइंटमेंट धुडकावून लावायला सांगू शकतो..!
किंवा समजा टणाटण रावळपापांना बेंटेक्स हर्ट ॲटॅक
आणून त्यात पंधरा मिनिटं शुद्ध टाईमपास करू शकतो..!
कारण शेवटी असाय की पिच्चरची लांबी वगैरे भानगडी
असतात.. त्येच्यासाठी मोकळ्या जागा जमेल तशा भराव्या
लागतात.. सगळ्या वयाच्या प्रेक्षकांचं मन सांभाळावं
लागतं..! काय एक ताप है का?
मी पहिली..आता वाचते!
मी पहिली..आता वाचते!
भारी लिहिलेय हे सुद्धा
भारी लिहिलेय हे सुद्धा

आई ग्ग... मी पाहिलाय हा चित्रपट
ते ॲक्सिडेंट वगैरे वाचून एकदम
ते ॲक्सिडेंट वगैरे वाचून एकदम 'तुम बिन' आठवला. फक्त त्या पिक्चरात प्रियांशूला जिवंत ठेवलाय आणि बापटकाकांना मारलंय (त्यामुळे ते नंतर पूर्ण पिक्चरभर कुठेही 'होऽऽ हो हो हो हो होऽऽऽ' वाली तान घेताना दिसतात
हो हो. तो तुम बिन सुद्धा
हो हो. तो तुम बिन सुद्धा बहुधा असाच आहे. नवरा मारा. बायको पटवा. अंजामही तसलाच. पण तो प्रॅक्टीकल असल्याने शेवट वेगळा होता.
आर्र कसले खतरनाक पिक्चर बघता
आर्र कसले खतरनाक पिक्चर बघता तुम्ही राव... आणि आम्हाला पण बघायला भाग पाडता
भारीच लिहिलंय... पॅरानॉर्मल संवाद :हहपुवा:
आता तिकडं काय हुतंय ते बगाय
आता तिकडं काय हुतंय ते बगाय पायजे. >> लवक्र बघा. मला फार उत्सुकता आहे आता काय होणार याची
परीक्षण नेहमीप्रमाणे मस्तच!
परीक्षण नेहमीप्रमाणे मस्तच!
पाहिलाय चित्रपट. ऐश्वर्या सुन्दर दिसलीये. गाणी छान होती.
सुरुवातीच जयच टियासाठी ऑब्सेसिव होण बघून हा पिक्चर 'डर' किव्वा "अंजाम" च्या वळणाने जातो की काय अस वाटल. पण अपघातानन्तर भलतच वळण आल.
अर्जुन रामपालपेक्षा प्रियान्शू बॅनर्जीच काम आवडल होत. तुम बिन मध्येही चान्गल काम केल होत. पण खुप कमी काम केलय त्याने.
फक्त त्या पिक्चरात हिमांशूला जिवंत ठेवलाय आणि बापटकाकांना मारलं >>>>>>> हिमांशू कुठे होता त्या गाडीत? प्रियान्शू होता.
हा हा भारी लिहीलय ... बघायला
हा हा भारी लिहीलय ... बघायला पाहिजे चित्रपट....
हिमांशू कुठे होता त्या गाडीत?
हिमांशू कुठे होता त्या गाडीत? प्रियान्शू होता. >>>> नावात गडबड झाली
पण माणूस तोच होता
तिकडच्यापैकी राज ऑन दी स्पॉट
तिकडच्यापैकी राज ऑन दी स्पॉट खलास..!
इकडच्यापैकी अनिता ऑन दी स्पॉट खलास..!
उरले दोघेच..!
जय आणि टीया..! ऐश्वर्या आणि रामपाल..!
जय होss!!
>>> lol
मस्त!
मस्त!
'भूत' सिनेमात सुरुवातीसुरुवातीला उर्मिला मातोंडकर आणि अजय देवगणचा एक संवाद आहे. तिला 'दिल का रिश्ता' नावाचा पिक्चर बघायचा असतो आणि त्याला कुठलातरी इंग्लिश/action movie. तर अजय देवगण तिला म्हणतो की आत्ता आपण हा बघू. फिर कभी मैं तुम्हारे साथ दो दिल के रिश्ते देख लूंगा! ती म्हणते म्हणजे काय? तर तो म्हणतो की असले सिनेमे सगळे एकसारखेच तर असतात!
जय प्रेमात
पडल्याचं समजल्यावर पापाच एक्साईट होतायत..! टणाटण उड्या वगैरे मारतायत..!
हे एक अनाकलनीय असतं खरोखरच. डीडीएलजेमधला अनुपम खेर पण तसाच. त्याहून म्हणजे 'फना' मधली किरण खेर. काजोल काश्मीरहून दिल्लीला गाणं म्हणण्यासाठी येत असते, तर त्या दोघी अशा प्रकारे बोलत असतात की या ट्रिपमध्ये तिला तिच्या स्वप्नांचा राजकुमार शंभर टक्के मिळणारच आहे! आणि अशी खात्री असल्यामुळे ती आमीर खानच्या प्रेमात पडायचं अशा निर्धारानेच पडते.
किरण खेर भयानक ओव्हरऍक्टर आहे
किरण खेर भयानक ओव्हरऍक्टर आहे... त्याहून भयंकर जज आहे igt ...
पॅरानॉर्मल संवाद
पॅरानॉर्मल संवाद
उगाच त्या मॅटरमध्ये खेटत बसण्यात काही अर्थ है का.! पण पैंजण हे असलं काही सांगू शकत नाही..!>>>
कॉमेंट्स पण एकाहुन एक आहेत. अजुन येउंद्यात!
>>> "का रं ss.? लव झालंय गा
>>> "का रं ss.? लव झालंय गा तुला ?
आं ss?.. लय लव करू वाटतंय गा ? व्हय रं ?? लय
माजल्यावानी हुतंय गा तुला??">>> हेहेहे
आणखी एक भन्नाट रिव्यु .
आणखी एक भन्नाट रिव्यु .
मी पण पाहिला आहे हा चित्रपट . प्रियांशु आणि अर्जुनसाठी .
तेन्व्हाच टिया नाव पहिल्यांदा ऐकल
तसा एका गाण्याच्या माध्यमातून दोघांचा रोमान्स दाखवलाय.. त्यामुळे गाणं संपल्यावर लगेच टीयाला मुलगा होतो..!>>>>>>
दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है
कितना पागल ये दिल हमारा है
हम तो एक दुसरे पे मरते है
जानता ये जहां सारा है
आमच्या ग्रुपमध्ये एक ऐश्वर्या
आमच्या ग्रुपमध्ये एक ऐश्वर्या चाहती होती, तीच्या साठी म्हणून थेटरात सहन केलेला सिनेमा.
ऐश्वर्या हास्याबद्दल लिहिलेले एकदम बरोबरे
मला गाणं आवडतं हे
मला गाणं आवडतं हे
पण त्या साठी चित्रपट बघायचे धाडस केले नव्हते कधी
आता बघाया पाहिजे
सिनेमा चांगला होता.. ऊगाच
सिनेमा चांगला होता.. ऊगाच चिरफाड केलेली पटली नाही
मी त्याला तुम बिन वाला हीरो
मी त्याला तुम बिन वाला हीरो म्हणूनच ओळखते. ( त्यात तीन तीन हीरो होते, नाव गाव फळ फूल जाऊद्या, पण सगळे लय झ्याक होते, हीरवीणीची मजा होती थोडक्यात
)
ऐश्वर्या छान दिसलीये खुपच, पण मुकबधीरांच्या शाळेत थेट दैय्या दैय्या रे,,,, हाय माझ्या दैवा रे, डोहामा. बाकी तिचं याददाश्त जाणं, आणि नेमकं जय च्याच प्रेमात पडणं अचाटच आहे.
छान लिहीताय,, येऊद्या अजून.
त.टी - ही जी याददाश्त आहे ना , तिला लय फुटेज ए यात,असे याददाश्त चा मेन रोल असलेले मूवी फारच मनोरंजक असतात हा..
अथेना, rmd, ऋन्मेष, अंजली,
अथेना, rmd, ऋन्मेष, अंजली, धनि,सुलू,अदिति, च्रप्स, वावे, मी अमि, aashu, स्वस्ति,mrunali.samad, आशुचॅंप, भाग्यश्री..
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.. !
प्राजक्ता कागदे,
सिनेमा चांगला होता.. ऊगाच चिरफाड केलेली पटली नाही>>
स्पष्ट अभिप्रायाबद्दल धन्यवाद..!
पुढचा भागही मस्त झालाय!
पुढचा भागही मस्त झालाय!
म्हणजे समजा तुम्ही फुल्टू
म्हणजे समजा तुम्ही फुल्टू फकाट होऊन गाड्या उडवता..! त्यात समजा चुकून माणसं वगैरे मारली जातात..!
>>>
ऐश्वर्यालाच का अशी लोकं मिळतात
सर तुम्ही लै भावनिक होऊन
सर तुम्ही लै भावनिक होऊन राहिले
ते पिच्चर बद्दल बोलत आहेत
तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल नाही
अरे देवा ईथेही सर सर..
अरे देवा ईथेही सर सर..
मी सोडून जातो मायबोली आता...
चला शुभरात्री !
उद्याच येतो आता परत..
अवांतर - @ आशूचँप, मी सुद्धा पिक्चरबद्दलच बोलत होतो. ऐश्वर्यासोबत हे अजून एका पिक्चरमध्ये झाले आहे. गूगल न करता ओळखा. न ओळखल्यास उद्या उत्तर देतो
ओह मला वाटलं गाड्या उडवणे
ओह मला वाटलं गाड्या उडवणे माणसे मारणे म्हणजे त्योच
बाकी गुगल न करता ओळ्खण्याएव्हढे मी काही ऐश्वर्या चे चित्रपट पाहिले नाहीत
हम दे दिलं का चुके पासून तिची जी धास्ती घेतली ती अद्याप आहे
मला फक्त गाणी अवडतात तीही ऐकायला
बॉबी देओल वाला एक होता त्यातली
आणि चंद्रचूड वाला शक्ती का अशाच नावाचा होता तो
आणि डोला रे वाला डान्स
बस, यासगल्यार कुणीच कुणाला गाडीने उडवत नाही त्यामुळे माझा पास
याददाश्त गेल्यानन्तर टिया
याददाश्त गेल्यानन्तर टिया आईला हॉस्पिटलमध्ये ओळखत नाही तिथे ऐश्वर्याने सरप्र्राईजिन्गली चान्गला अभिनय केला आहे.
आणि चंद्रचूड वाला शक्ती का अशाच नावाचा होता तो >>>>>> जोश म्हणायच असेल तुम्हाला.
जोश चंद्रचूडवाला हे ऐकून
जोश चंद्रचूडवाला हे ऐकून एक शाहरूख फॅन.......... उठाले रे बाबा
हो मला सगळा मुव्ही बघवला नाही
हो मला सगळा मुव्ही बघवला नाही पण जो पहिला त्यात तोच एकटा सुसह्य होता
बाकीचे ते चमत्कारिक येडे चाळे वाले कोण कोण होते गर्दी करून एक मराठी कलाकार पण होता बहुदा
एकदम संयत आणि छान काम करायचा चंद्रचूड, दुर्दैवाने त्याला चांगले चित्रपट मिळाले नाहीत
तर मग तिला बघून जय गार पडतो..
तर मग तिला बघून जय गार पडतो..!
त्याकाळच्या ऐश्वर्याला पाहून नॉर्मल तरुण गरम होत असत, हा गार का बरं पडला असावा?
Aishwarya's mother is writer
Aishwarya's mother is writer and her brother is producer of this movie.
Pages