अलीकडेच मी मुंबईहून पुण्याला येताना सिंहगड पकडण्यासाठी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) पोहचलो. आगाऊ आरक्षण केलेले होतेच. तिकडे 9 नंबरवर कल्याणच्या कार्यअश्वाची (लोको) दख्खनच्या राणीशी जोडणी सुरू झालेली होतीच, तोपर्यंत सिंहगड विशेष शेजारच्या 10 नंबर ढकलत आणली जात होती. सिंहगड विशेष फलाटावर येत असताना तिचे नवेकोरे आकाशी रंगाचे एलएचबी डबे नजर वेधून घेऊ लागले. मला वाटलं की, कल्याणचे WDS-6S कार्यअश्वच (लोको) त्याला ढकलत असेल. पण सिंहगडला गाडी समोर थांबत असताना कल्याणचाच डब्ल्यूएपी-7 कार्यअश्व दिसला. फलाटावर आल्यावर सिंहगडच्या लोको पायलटने पुढच्या केबिनमध्ये जाऊन लोको पुन्हा सुरू केले. आता लोकोमधली HOG यंत्रणा कार्यान्वित झाली आणि त्याचा विशिष्ट आवाजही ऐकू येऊ लागला होता. इकडे हे सगळं सुरू असतानाच आता घड्याळात ठीक 17:10 झालेले असल्याने दख्खनची राणी पुण्याच्या दिशेने निघून गेली.
आज सिंहगडने प्रवास करण्याचा निर्णय घेऊन तिचे आरक्षण केलेले असल्यामुळे शेजारच्या 9 क्रमांकाच्या फलाटावरून जाणाऱ्या दख्खनच्या राणीला बायबाय केले. सिंहगड सुटायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे फलाटाच्या शेवटीच अजून थोडा वेळ थांबलो होतो. आता आमच्या लोको पायलटकडे पॉईंस्टमनने ब्रेक पॉवर सर्टिफिकेट बुक आणले. लोको पायलटने त्यात ब्रेक पॉवरची नोंदणी करून सही केली आणि त्या पॉईंस्टमनने त्याची एक प्रत लोको पायलटकडे परत केली.
दरम्यान, दख्खनच्या राणीनं दिवा जंक्शन गाठलेलं होतं. आता सिंहगड विशेष सुटण्याची वेळ होत आली होती. मी आता माझ्या सीटवर जाऊन बसलो होतो. तोवर CSMT च्या असिस्टंट स्टेशन मास्टरने सेक्शन कंट्रोलरकडून सिंहगड विशेष सोडण्यासाठीची परवानगी घेतली होती. त्यामुळे घड्याळात 17:49 होऊन गेल्यावर फलाट क्रमांक 10 चा स्टार्टर सिग्नल पिवळा झाला. त्याचा संकेत मागे गार्डलाही मिळत होता. ठीक 17:50 वाजता सिंहगड विशेषने दीर्घ गर्जनेसह पुण्याच्या दिशेने कूच केले. पूर्वी यावेळी CSMT वरून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री सुटत होती. पण लॉकडाऊननंतर ती गाडी पुन्हा सुरू न करता तिच्या जागी सिंहगड एक्सप्रेस सोडली जात आहे.
आज सिंहगड विशेष सुटली, तेव्हा बऱ्यापैकी मोकळी होती. हळुहळू वेग घेत सिंहगड 18:04 ला दादरमध्ये पोहोचली. गाडी थांबल्याबरोबर थोडीफार गर्दी आत चढली. सगळे आपापल्या जागेवर विसावत असतानाच तिथला दोन मिनिटांचा मुक्काम आवरून सिंहगड पुढे निघाली. सिंहगड अत्याधुनिक एलएचबी डब्यांची झालेली असली तरी या डब्यांमधील एक दोष जाणवू लागला होता. तो म्हणजे jerks! गाडीचा वेग कमी होताना हे jerks विशेषकरून जाणवत होते. आता देशातील कोविड-19 ची परिस्थिती सुधारू लागली होती. त्यामुळे मुंबईत रेल्वेगाड्यांची वाहतूक वाढू लागली होती. कुर्ल्यानंतर 28 किलोमीटरपासून ठाण्यापर्यंतच्या फास्ट मार्गावर वेगमर्यादा असल्यामुळे सिंहगड हळुहळू धावत गेली आणि 18:33 ला ठाण्यात जाऊन उभी राहिली. त्याआधी आठ मिनिटांपूर्वी पुण्याहून आलेली 01008 डेक्कन विशेष अप फास्टवरून दादरकडे निघून गेली होती. ठाण्यातही गाडीत थोडी गर्दी चढली.
Link
https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/1.html
(क्रमश:)
(ठाण्यापासून पुढचा प्रवास पुढच्या भागात)
मस्त सुरूवात! सिंहगड सध्या
मस्त सुरूवात! सिंहगड सध्या डेक्कनच्या नंतर निघत आहे हे माहीत नव्हते. कल्याण व जवळच्या उपनगरांतून दुपारनंतर पुण्याला जायला सोयीची गाडी नव्हती इतके दिवस.
तुमचा हा लेख वेळेत आला आहे. नुकतेच असे वाचले (मिपावर) की भारतीय रेल्वेने अनेक वर्षांपूर्वी साधारण याच काळात "जनता एक्स्प्रेस" सुरू केल्या. सिंहगड सुद्धा मूळची जनता एक्स्प्रेस. दोन्ही वेळेस डेक्कनच्या आधी निघणारी. नंतर मग ती डबल डेकर झाली. तरी अनेक वर्षे पूर्ण अनारक्षित असे. पण मध्यंतरी एक दोन आरक्षित डबे वाढवले होते. पण डबल डेकर असताना एक पर्सनॅलिटी होती तिला. आता इतर गाड्या आणि तिच्यात फरक दिसत नाही. या एलएचबी डब्यांनी काही फरक पडला असेल तर माहीत नाही.
पावसाळ्यात मुंबईहून पुण्याला येताना सिंहगड सर्वात बेस्ट. नेरळ सोडले की पार लोणावळा पार करेपर्यंत बाहेर भन्नाट सीनरी असते.
<<पावसाळ्यात मुंबईहून
<<पावसाळ्यात मुंबईहून पुण्याला येताना सिंहगड सर्वात बेस्ट. नेरळ सोडले की पार लोणावळा पार करेपर्यंत बाहेर भन्नाट सीनरी असते.>>
पण आता सिंहगड मुंबईहून उशिरा निघत असल्यामुळे या पट्ट्यात अंधार असणार आहे.
मस्त सुरूवात!
मस्त सुरूवात!
सिंहगड परत जाणारी - वेळ बदलली
सिंहगड परत जाणारी - वेळ बदलली!
बाय द वे, "सिंहगड" मधे पूर्वी
बाय द वे, "सिंहगड" मधे पूर्वी सिंहगडाची, तेथील लढाईची चित्रे होती. ती अजून आहेत का माहीत नाही. बरीच वर्षे झाले सिंहगडने प्रवास करून.
हीच वेळ पुढे ठेवली, तर यापुढे घाटातील पावसाळ्यातील दृश्ये दुपारी पाहायला पुण्याहून निघणारी डेक्कन एक्सप्रेस किंवा कोल्हापूरहून येणारी कोयना - हे दोनच पर्याय राहतील असे दिसते (किंवा सकाळच्या गाड्या). घाट रेल्वेतून जितका सुंदर दिसतो तितका हायवेवरून दिसत नाही. रेल्वेने जाताना आपण त्या सगळ्या सीनरीच्या मधूनच जात आहोत असे वाटते आपल्याला. तसा फील बसने जाताना येत नाही.
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे फारएण्ड.