अमिताभ ची गाणी...३

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

किशोरची गाणी गाजत असताना अमिताभला इतरही काही गायकांची तुरळक गाणी होती. एस डी बर्मनने 'अभिमान' मधे किशोर, रफ़ी बरोबरच मनहर उधासचा आवाज 'लूटे कोई मनका नगर' साठी वापरला.

येसूदासचा आवाज खय्यामने 'त्रिशूल' मधे 'किताबोंमे छपते है' साठी आणि जयदेव ने 'आलाप' मधल्या गाण्यांत दिला.

आर्डीने शोले मधे धर्मेन्द्रला किशोर वापरल्याने असेल, पण अमिताभला 'ये दोस्ती' मधे मन्ना डे चा आवाज दिला. तेव्हढे एकच गाणे मन्ना डेचे आहे त्याला.

'यम्मा यम्मा' साठी आर्डी स्वत्:च गायला. तेव्हा माझ्याआधी हे सिनेमे पाहून मला डीटेल कथा सांगणार्‍या मित्राने 'तो शाकाल कडे जावून आवाज बदलून गातो' असे सांगितले होते. पुढे 'पुकार' मधेही त्याची गाणी आहेत.

किशोर असताना अमीत कुमार चा आवाज अमिताभला वापरायची गरजच नव्हती, तरीही 'देशप्रेमी' मधे 'जा जल्दी भाग जा' या किशोर्-अमीत च्या गाण्यात अमिताभचा आवाज अमीत कुमार चा आहे. मात्र या जोडीचे सर्वात धमाल गाणे म्हणजे 'मखणां'.

'नसीब' मधे बरेच नायक आणि बरेच गायक आहेत, 'ज़िन्दगी इम्तिहान लेती है' मधे अमिताभसाठी अन्वर गायलाय.

'देश प्रेमी' मधे 'हम गोरे नही हम काले सही' साठी खुद्द लक्ष्मीकांतच गायलाय. म्हणजे या चित्रपटांत दोन अमिताभला एकूण चार गायक आहेत. 'मेरे देश प्रेमीयों (रफ़ी)','जा जल्दी भाग जा (अमीत कुमार)','ताने दिन तन्दाना (किशोर)'.

साधारण १९८२-८३ पर्यंत हे सर्व गायक अमिताभसाठी गायले. त्यानंतरचा साधारण २००० पर्यंत अमिताभचा काळ हा हिट कमी आणि फ्लॉप जास्त असा होता. तो त्याचा अपघात आणि खासदारकीचा प्रयत्न वगैरे मुळे म्हाताराही दिसू लागला. 'मर्द' आणि 'गिरफ़्तार' पासून मला त्याची त्यानंतरची गाणी फारशी आवडलीच नाहीत.

'कूली','मर्द' मधे शब्बीर कुमार ची गाणी होती. तशीच महमंद अज़ीज़ची पण होती. मला तर सुरुवातीला फरकच कळत नसे. पण महमंद अज़ीज़ हा जास्त चांगला गायक आहे असे वाटते. राजेश रोशन ने त्याच्याकडून एक सुंदर गज़ल 'एक अंधेरा लाख सितारे' ही गाऊन घेतली असली तरी अमिताभसाठीची त्याची गाणी काही खास नव्हती. तशी काही गाजली 'गोरी का साजन, साजन की गोरी' ई., पण मला आवडत नाहीत. शब्बीर चे ही फ़क्त 'सारी दुनिया क बोझ हम उठाते है' आवडते. त्याचे चित्रिकरणही छान आहे.

'मर्द' मधे 'सुन रुबिया तुमसे प्यार हो गया' साठी अन्नू मलीक स्वत्: गायला.

त्यानंतर 'गिरफ़्तार' मधे बप्पी लाहिरीने 'आना जाना लगा रहेगा' साठी स्वत्:चा आवाज वापरला. पण 'धूप मे निकला ना करो' वगैरे साठी किशोर.

'तूफ़ान' मधे चक्क सुरेश वाडकर त्या एका जादू करतानाच्या गाण्यात आला, नक्की गाणे आठवत नाही.

'जादूगर' मधे कुमार शानू आला, आणि आश्चर्य म्हणजे नंतर सुदेश भोसले च्या वेडामुळे फारसे कोणी त्याला अमिताभ साठी वापरले नाही. मला त्या टूकार 'इन्सानियत' मधले 'साथी तेरा प्यार पूजा है' बरे वाटते. 'सूर्यवंशम' मधेही कुमार शानू आहे.

मग आला सुदेश भोसले. हा अमिताभच्या आवाजाची नक्कल करू शकतो म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल ने 'हम' मधे त्याला 'जुम्मा चुम्मा' म्हणायला लावले आणि मग अजून आत्तापर्यंत बर्‍याच गाण्यांना त्याचाच आवाज आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असेल, पण मला अजुनही असे वाटते की जर कोणाच्यातरी आवाजाची नक्कल करायची होती तर त्याने किशोरची करायची, म्हणजे अमिताभला किशोरचा आवाज असायचा तसे वाटले असते, आणि सुदेश भोसले किशोरसारखा आवाज सुद्धा चांगला काढतो. गाणीही कदाचित जास्त श्रवणीय झाली असती. या सगळ्या लोकांनी एक गैरसमज करून घेतला की अमिताभची गाणी त्याच्याच आवाजात ऐकायला लोकांना आवडतात. जर पूर्वी सुदेश भोसले असता तर काय 'डॉन' वगैरेची गाणी त्याच्या आवाजात एव्हढी लोकप्रिय झाली असती? फक्त आर्डीने 'इन्द्रजीत' साठी सुदेश भोसलेचा जो आवाज वापरलाय 'जब तक जां मे है जां तब तक रहे जवॉ' या गाण्यात, तो जरा किशोर सारखा वाटतो. पण आर्डीची शब्बीर कुमार ची गाणी सुद्धा कानाला गोड लागतात ('बेताब') तर बाकीच्यांची काय कथा! केवळ अमिताभ सारखा हूबेहूब आवाज काढू शकतो म्हणून अमिताभची गाणीही त्याच आवाजात गावीत हे कशाला?

नजीकच्या काळात अदनान सामी ('वक़्त'), जावेद अली ('कजरारे') आणि गुरुदास मान ('लो आ गयी लोडी वीर झारा') यांची पण गाणी आहेत.

असे हे एकूण १९ पार्श्वगायक अमिताभ साठी गायले, आणि खुद्द अमिताभ स्वत्: सुद्धा गायला. 'मेरे अंगने मे' वगैरे जास्त लोकप्रिय झाले असले तरी मला 'रंग बरसे' आणि त्याहीपेक्षा 'मेरे पास आओ मेरे दोस्तो' हेच जास्त आवडते.

हुश्श! बराच मोठा लेख झाला. वाचक अजून जागे असतील तर जरूर प्रतिक्रिया कळवा.
ही अशी गाणी शोधण्यात 'रार' चीही खूप मदत झाली आहे, त्याबद्दल धन्यवाद.

प्रकार: 

फारेंड
लइ भारी लेख. आता यात उल्लेख केलेल्या सर्व गाण्यांच्या एम पी थ्री फाइली लोड करा कुठे तरी. म्हणजे लेख वाचत वाचत ऐकायला मजा येइल.
अजून येवू द्यात.

छान लिहिले आहेस अमोल. आवडले.

अमिताभसाठी उदित नारायण ने आवाज दिलाय लाल बादशाह मध्ये...
'दिलकी धडकन बोले' या गाण्यात . अलका याज्ञिक व सपना अवस्थी बरोबर..

चीनी कम मध्ये विजय प्रकाशने अमिताभला आवाज दिलाय जाने दो ना...

अमिताभ साठी मुकेशने अदालतम्ध्ये गाणे दिलेय हमको ऐसा वैसा ना समझो हम बडी कामकी चीज...

रास्तेका पथ्थर या चित्रपटात नीता खयानी त्याची नायिका होती हे आता त्याला अन तिलाही आठवत नसेल . त्यात रास्तेका पथ्थर हूं हे गाणे मुकेशला आहे तसेच आशा भोसले बरोबर मुकेशचे गाणे आहे..
'एक तुम पास ना आना दूर दूर ही रहना
मोहे डर लागे, जागे नैना सारे नैना...'

आपला टोणगा..

शंकर महादेवनने आवाज दिलाय पण तो आगामी चित्रपटात !

'तो शाकाल कडे जावून आवाज बदलून गातो' <<<<<<< LOL....
तिन्ही भाग मस्त झालेयत.

मला हे पहिल्यांदाच कळतय एवढे गायक त्याच्यासाठी गायलेत ते, किशोर कुमार, सुदेश भोसले, अमित कुमार एवढेच माहीत होते.

Tonaga माहिती बद्दल धन्यवाद, जरा उशीरा बघितल्या प्रतिक्रिया.

आजच हा लेख बघितला.

अमिताभने किशोरच्या प्रॉडक्शनमध्ये काम करायाला नकार दिल्याने किशोरने त्याच्यासाठी गाणे बंद केले. त्यामुळे पुकार वगैरे मध्ये सर्व गाणी आर. डी.ची आहेत.

अमिताभने नाचलेले पहिलले गाणे "बाँबे टू गोवा" चे. पण जंजीरमधील Angry Young Manच्या भुमिकेपासुन त्याला गाणी नव्हतीच किंवा एखादे फार सिरीयस/ हिरोच्या जीवनाशी निगडीत असे गाणे अमिताभच्या वाट्याला यायचे. जमीरमध्ये परत जरा अंग हलवत त्याने "जिंदगी हसने गाने के लिए है..." हे गाणे केले. अमर अक्बर... पासुन त्याची गाणी खरी बदलली.

चौकशी: Angry तला An देव्नागरीत कसा लिहायचा.

तिन्हि लेख उत्त्म, मजा आलि वाचायला.
फक्त एक वेगळा लेख अमीताभने स्वत: गाय्लेल्या गाण्यावर होउ शकतो
*****************************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

तुम्हा लोकांचे काय जबरी ज्ञान आहे! मला तर सगळे गायक सारखेच(ऐकू) वाटतात; किशोर, मुकेश, रफी, हेमंतकुमार असे वैशिष्ट्यपूर्ण आवाज सोडून! धन्य आहे तुमची.

आजच हा लेख बघितला. मस्त झाला आहे.

मस्त .. तिनही लेख वाचायला मजा आली .. Happy

मर्द, कुली नंतर बहुतेक मी रिलीजीयसली अमिताभ ला फॉलो करण सोडलं असावं .. त्यामुळे नंतरची काहीच गाणी मला माहित आहेत पण तीही टीव्हीवर सारखी लागायची म्हणून, अमिताभ ची जादू त्यात नव्हती ..

तीनही लेख मस्त!

आर्डीची शब्बीर कुमार ची गाणी सुद्धा कानाला गोड लागतात ('बेताब') तर बाकीच्यांची काय कथा! >> Lol

आज हा पिक्चर पाहिल्याने हा धागा व सिरीज आठवली. हा पिक्चर तेव्हाच्या इतर पिक्चर्सच्या मानाने कमी पाहिला गेलेला आहे (बच्चन मस्त आहे यातला) व हे गाणे तर पूर्ण दुर्लक्षित आहे. पण यात अमिताभला कोणा "आनंद कुमार" चा आवाज आहे. आणखी माहिती काढली तर हा तोच आवाज आहे जो "हम तुम्हे चाहते है ऐसे" गाण्यात सुरूवातीला "नसीब इन्सान का...." वगैरे म्हणतो. बाकी हा आवाज ओळखीचा नाही. नाहीतर रेखा नाचत आहे व मधे अमिताभ गात आहे याचे हे तिसरे उदाहरण आहे - सलाम-ए-इश्क व अठरा बरसकी तू नंतर.

हे लेख जुन्या माबोवर २००५ मधे लिहीले होते त्यामुळे त्याच्यानंतरच्या "आवाजांचे" उल्लेख लेखांत नाहीत. फक्त प्रतिक्रियांमधे आहेत.

चांगला आणि वेगळा आढावा घेतला आहे. माहिती नव्हता हा लेख. बरे केले वर काढला ते.
किशोर कुमार नंतर रफीचा आवाज अमिताभला सूट व्हायचा. पत्ता पत्ता हे रफीच्या आवाजात आहे. देशप्रेमीचे लेखात आलेच आहे. अन्वरला थोडा प्रयत्न करून अमिताभचा आवाज बनता आले असते. पण नसीबच्या वेळी त्याने मानधन ५००० रूपये मागितले. तेव्हांच मनमोहन देसाईंचे मत त्याच्याबद्दल वाईट झाले. कारण रफी ४००० रू घेत.
अमिताभने किशोरकुमारच्या एका चित्रपटात तारखांमुळे काम करण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून किशोरकुमारने नंतर अमिताभला आपला आवाज द्यायला नकार दिला होता. त्या वेळी मनमोहन देसाईंनी अनवर बहोत सरचढा है असे म्हणत गुजरातवरून ऑर्केस्ट्रात गाणार्‍या शब्बीरला आणले. हे अन्वरच्या मुलाखतीत आहे. तो म्हणतो कि किती पैसे मागावेत हे मला कळलेच नाही. आणि त्यावरून असे काही होईल याचा जराही अंदाज आला नाही.

चांगला आणि वेगळा आढावा घेतला आहे. माहिती नव्हता हा लेख. बरे केले वर काढला ते.
किशोर कुमार नंतर रफीचा आवाज अमिताभला सूट व्हायचा. 
>>>+1
किशोरकुमारची रेंज अफाट व अमिताभचीही. त्यामुळे पूर्णपणे वेगळी अशी 'देखा एक ख्वाब किंवा रिमझिम गिरे सावन' ते 'पग घुंगरू बांध मीरा किंवा अपनी तो जैसे तैसे' ही गाणी व या आणि अशा सर्वच गाण्यांतला दोघांचाही परफॉर्मन्स जबरदस्त आहे . दोघांनाही आपापली एनर्जी हवी तशी सटल, हवी तशी मोठी करता यायची व पुन्हा ती जुळूनही यायची. हे 'अणूपासोनी ब्रह्मांडा' जुळणे म्हणजे फारच जबरदस्त !!!
मला पल दो पल का शायर व कभी कभी देखील आवडते. मुकेशची आहेत तरीही.

धन्यवाद शां.मा., अस्मिता.

शां.मा - तुमच्या इतर एक दोन पोस्टींमधेही अशी बरीच इंटरेस्टिंग माहिती वाचल्याचे आठवते. जरूर लिहा अजून - स्वतंत्र लेख लिहीलात तरी आवडेल वाचायला.