जेथोनि सुरुवात होते...

Submitted by पाचपाटील on 10 October, 2021 - 11:13

तेव्हा शाळेला जावं लागायचं...
अभ्यास वगैरे पण असायचा, पण आम्हाला काही चिमणीच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची गरज पडली नाही, कारण गावात आधीच लाईट आली होती..!
त्यामुळे "आम्ही चिमणीच्या उजेडात अभ्यास करून
आयुष्यात असे असे झेंडे लावले!" ह्याप्रकारचे चमकदार डायलॉग वेळप्रसंगी मारता येत नाहीत, याची आज मोठीच हळहळ वाटते.

तर जन्मदाते म्हणाले की, ''सगळीच पोरं जातेत तर तू बी जात जा शाळेला. हितं बसून उगंच पांदीवगळीतनं खेकडी मारत फिरण्याबगर तरी दुसरं काय करनार हैस तू?''
ह्या बिनतोड सवालाला माझ्याकडे ठोस असं उत्तर नव्हतं त्यावेळी, म्हणून मग जावं लागलं.

शिवाय बारक्या गावात हे ही एक असतं की शाळा बुडवून बोंबलत फिरण्याचे कार्यक्रमही फार काळ लपवता येत नाही.
त्यामुळे मग नंतर जन्मदात्यांकडून, ''लगाssआसं करू नगू लगा ss..! पुना तूच आमाला म्हनशील की तवाच मला का लायनीवर आनलं नाय म्हनून..!''
हे असलं काहीतरी ऐकून घ्यावं लागायचं.
आणि त्यात एक दचक असायची की शाळेत न जाणाऱ्या
पोरांचं भविष्यात काहीतरी बेकार नुकसान होतं की काय वगैरे.

म्हणून मग जातच रहायला लागलं..

सकाळी सकाळी सगळ्यांनी पळत पळत जाऊन, रांगेत वगैरे उभं राहून 'तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना' यांसारख्या प्रार्थना खड्या सूरात म्हणण्याची पद्धत होती.

नंतर नंतर अर्थ कळला की, ती कुठल्यातरी देवाला विनंती
करायची असे की, ''बाबा रे, आम्ही असं असं ह्या ह्या
ठिकाणी अंधारात खितपत पडलो आहोत, तर तू आता
बिगीबिगी येऊन आम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाशील तर मोठी मेहेरबानी होईल.''

प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, आजचा सुविचार, दिनविशेष,
मूल्यशिक्षण वगैरे सगळा कार्यक्रम किमान अर्धा पाऊण तास तरी आरामात चालायचा.
त्यात पुन्हा नंतर कारगिल सीमेवर मोठ्या चकमकी सुरू झाल्यामुळे 'भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी' आणि 'ऐ मेरे वतन के लोगों' हे पण एक ॲड झालं..!

समजा रोज सकाळी सकाळी आमच्याकडून ते सगळं कबूल करून घेतलं नाही, तर भविष्यात आमचं देशबांधवांविषयीचं प्रेम कमकुवत वगैरे होवून जाईल, अशी रास्त धाकधूक असावी त्यापाठीमागे.
त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही.
पण ह्याबाबतीत आमच्यावर थोडा तरी विश्वास ठेवायला हरकत नव्हती ..! असो.

त्यानंतर भूगोलाचा तास, मराठीचा तास, गणिताचा तास असं काहीतरी.
खरंतर एकाच शिक्षकाला वेगवेगळ्या विषयांवर मुक्तपणे दळण दळायला तशी काहीच अडचण नव्हती..!
अडचणीचा काही सवालच नव्हता.
कारण विषय कुठलाही असला तरी शेवटी इमानदारीने दळण दळता आलं पाहिजे, हे एक पारंपरिक ज्ञान सर्वांमधी असतंच की..!

पण बहुदा फार पूर्वी कधीतरी अशा दळणांतून पीठ होऊन बाहेर पडलेल्या आणि पुढे अधिकारी, पुढारी, शिक्षणतज्ञ वगैरे होऊन बसलेल्यांनी, आपापल्या शालेय जीवनाचा धसका घेतलेला असावा.
आणि म्हणूनच प्रत्येक तासाला वेगवेगळे शिक्षक असावेत, हे धोरण आपल्याकडे आले असेल काय?

त्यावेळी प्रमाण मराठी भाषेत शिक्षकांनाच गुरूजन वगैरेही म्हणण्याची पद्धत होती..! अगदी खांडेकरांच्या उपमा उसन्या घेऊन बोलायचं झालं तर 'गुरूजन हे आपल्यावर
ज्ञानकणरूपी मोती उधळतात वगैरे' किंवा 'ज्ञानगंगेत
आपणांस चिंब भिजवून टाकतात वगैरे वगैरे' म्हणत बसावे लागेल..!

शिवाय गुरूजनांनी आमच्या आयुष्याला आकार वगैरेही द्यावा, अशीही तेव्हाच्या लोकांची अपेक्षा होती म्हणे.
पण आम्ही कधीच तशा भलत्या अपेक्षा बाळगल्या नाहीत..!
एवढुशा पगारात बाकी हजार सरकारी कामं सांभाळून, वर पुन्हा आमच्यासारख्या सोट पोरांना आकार-बिकार द्यायचा म्हणजे जरा हॅ हॅ हू हू..!

''आम्हाला आदर द्या. आम्ही वर्गावर आल्यावर तरी शांत व्हा आणि आम्ही सांगतोय ते अधूनमधून ऐकून घ्या,लिहून घ्या.'' एवढीच माफक आणि रास्त मागणी असायची आमच्या गुरूजनांची.

म्हणूनच उदाहरणार्थ इतिहासाचे गुरूवर्य पाच ओळी वाचून दाखवल्या की पॉज घेऊन म्हणायचे की, ''एवढाच मुद्दा
लिहून घ्या..!''
पण 'एवढाच मुद्दा' 'एवढाच मुद्दा' करत करत सबंध धडा आणि वर्ष संपता संपता शेवटी संपूर्ण पुस्तक लिहून काढावं लागायचं..!

आख्खं पुस्तकच जर वहीत लिहून काढायचं असेल तर शासन उगाचच दरवर्षी एवढी पुस्तकं कशासाठी छापत होतं, असा मूर्ख प्रश्न कुणाला तरी पडेल.
पण इतिहासाच्या गुरूवर्यांची, "पोरांना लिहून देण्याच्या
प्रक्रियेमध्ये तासाचा वेळही मस्तपैकी निघून जातो आणि
हाताला काम दिल्यामुळे वर्गातली खुसफुसणारी तोंडंही काही काळासाठी बंद होतात.!" ही चतुर व्यावहारिक
आयडीया शासनातल्या शिक्षणतज्ञांना कुठून कळणार..!

भूगोलाचे गुरूवर्य शाळाभर तसे विनोदी म्हणून प्रसिद्ध होते, पण आमच्या मते ते एक थोर धोरणी मनुष्य होते.
त्यांनी तासाचा वेळ घालवण्याची भानगड मिटवण्यासाठी स्वतःच एक पद्धत डेव्हलप केलेली होती.
म्हणजे तास चाललेला असताना ते अधूनमधून एखादा चावट विनोद करायचे आणि मग सगळा वर्ग पाचेक मिनिटं खिदळत खिंकाळत रहायचा..!
तो मौका अचूक साधून गुरूवर्य सिलॅबसमधली एक-दोन पानं गपकन् खाऊन टाकायचे आणि डायरेक्ट पुढच्याच धड्यावर जंप मारायचे...! झंझटच खतम..!!

पार्श्वभूमी सांगायची झाली तर तेव्हा आमचा युनिफॉर्म म्हणजे खाकी हाफचड्डी, पांढरा शर्ट आणि गांधी टोपी..! अगदी
दहावीपर्यंत हेच..!
आता समजा आम्ही सगळे असे तरणेबांड लोक हाफचड्डी घालून फिरत असताना भलतेच असामाजिक दिसायचो..
आणि त्यातही समजा वर्गात बेंचवर बसलो असताना जरा जास्तच कठीण परिस्थिती..!
कारण खालच्या दिशेने मोकळं मोकळं, हवाहवाई आणि
बेचैन अशा मिश्र स्वरूपाचं फिलींग यायचं.
आणि त्यात हे भूगोलाचे गुरूवर्य मधूनच म्हणणार की,
"पाटील, नीट बसाss ! सामान दिसून राह्यलं तुमचं..!"

झाssलं..! फाफलला मग सगळा वर्ग हसण्याच्या नादात..! आणि गुरूवर्यांनी मारलीच हनुमानउडी पुढच्या पानावर..!

तिकडे मोहब्बतें रिलीज व्हायचा आणि इकडे आमच्या
तारूण्याला कोवळे कोवळे धुमारे फुटायचा काळ साधारण एकच..!
अर्थात चोप्रांच्या फॅक्टरीतल्या गुलाबी प्रेमासंबंधी ट्रेनिंग
देण्यासाठी कुणी शारूक गिटार वाजवत आमच्या गावात
येणार नव्हता.
पण शेवटी आयुष्यात कुणावाचून कुणाचं काही अडत नाही..! माणूस शिकतो आपोआप..! बघत बघत..!
नजर खुली ठेवली की काहीच अडचण रहात नाही..!

म्हणजे समजा ते एक साखरकारखानदारीवालं गाव असेल..! त्यामुळे समजा बघावे तिकडे दाट हिरव्यागार
ऊसबागायतीचे दाबजोर पट्टेच्या पट्टे पसरलेले दिसत
असतील..!
आणि समजा सगळं शांत असतानाही रोज दुपारी ठराविक वेळी ठराविक जागेवरचाच ऊस कसा काय हलताना
दिसतोय रे ?? उभा ऊस असा कशामुळे थरथरत असेल? कुणी शारूक तिथं ऊसात गिटार वाजवत असेल काय? एकटाच तर नक्कीच नसणार..! आपण ह्याच्यात जरा लक्ष
घातलं पायजेल सरकार, तपास करायला पायजेल काय
भानगड है ही नेमकी?? अशा अर्थाची रंगतदार खुसफुस
वर्गबंधू, बेंचबंधू शिंदेसरकारांसोबत करण्याचा काळ..!

त्याचवेळी दूरवर कुठेतरी नांगरट चाललेली आहे आणि तो ट्रॅक्टर ड्रायव्हर हा रसिक मनुष्य आहे..!
कारण ट्रॅक्टरमधून ''कारभारी दमानंss होऊ द्या दमानंss" या सुरेखाबाईंच्या बहारदार लावणीची घायाळ लकेर लेहरत
लेहरत खिडकीतून वर्गात प्रवेश करतेय, बहुतेकांच्या
कानांच्या आत शिरून मेंदूला भलतीच बेफाम करतेय..!
काहींना माफक अस्वस्थही करतेय...!
मग शब्दांमागचा अचूक अर्थ पकडून मागच्या बेंचपासून बहुदा खुसखुस सुरू झालीय..! आणि एकडाव असली चेन रिॲक्शन सुरू झाली की ती थांबायचं नाव घेत नसतेय..!

त्या उगमस्थानापासून निघालेली खुसुखुसुची लाट
सगळ्यांना संसर्ग करत वर्गभर पसरत जातेय..!
हसण्याची वाफ पोटातल्या पोटात दाबण्याच्या प्रयत्नात आमचं सगळं शरीरच आता गदागदा हलायला लागलंय..! सर बघतायत..! आम्ही बेंचमधी मान घालून कशीबशी गदगद थांबवतोय..!
दुर्लक्ष करावं की आता नेमकं काय करावं, हे सरांचं अजून नक्की धोरण ठरत नाहीय..!!
पण सुरेखाबाईंची अदाकारी आणखीनच अस्सल सूर
लावतेय..! आता मी पेन खाली पाडून उचलण्याचं ढोंग करत आतल्या आत हसण्याची वाफ जिरवतोय..!

"काय चाललंय रे तुमचं तिकडे??शिंदेss उभा रहाss"

"काय नाय सर." --शिंदेसरकार.

"काय नाय कसं? तुझ्या मनात कायतरी काळं आलंय.!"
(सर अशक्य आहेत..!)

"नाय सर..! माजं काय नाय, ह्या पाटलाच्याच मनात पयलांदा काळं आलं आणि त्येनंच मला डिवचलं सर.''
(शिंदेसरकार अगदीच अशक्य आहेत..!)

हे ऐकून खुसखुसीच्या चेन रिॲक्शनचं रूपांतर आखिरीच्या तडाखेबंद ब्लास्टमधी होतंय.
ह्या दगाबाज शिंदे वर्गबंधूचं काय करावं, ह्या विचारात मी खजिल होत उभा राहतोय..
"चला व्हा बाहेर दोघंबीss बेशरम कुठले..!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुमासदार लेख!
>>तुम्ही एखाद्या पाक्षिकात अथवा साप्ताहिकात एक सदर सुरू करा. लोकप्रभा, सकाळ वगैरे.>> +1