’नायिका महाभारताच्या’ व्याख्यानमाला

Submitted by वावे on 10 May, 2021 - 12:43

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या ’नायिका महाभारताच्या’ नावाच्या एका व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याची संधी मला नुकतीच मिळाली. ही व्याख्यानमाला अर्थातच ऑनलाईन होती. डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या तीन विदुषींची एकूण सहा व्याख्यानं या मालेत होती. तीन शनिवार-रविवारच्या सकाळी अशा प्रकारे सत्कारणी लागल्या. या व्याख्यानमालेविषयी थोडं लिहावंसं वाटलं.

महाभारत हा ग्रंथ आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. अभ्यासक, संशोधक, ललितलेखक, कादंबरीकार, नाटककार, वैचारिक लेखक, कवी, रसिक अशा विविध भूमिकांतील व्यक्तींकडून महाभारताचा अभ्यास आणि आस्वाद शेकडो-हजारो वर्षं सतत सुरू आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने अनेक संशोधकांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर महाभारताची ’चिकित्सक आवृत्ती’ म्हणजेच ’क्रिटिकल एडिशन’ सिद्ध केली. या चिकित्सक आवृत्तीला आधारभूत मानूनच या व्याख्यानमालेतली (डॉ. अरुणा ढेर्‍यांचं लोकदेवता द्रौपदी हे एक व्याख्यान सोडून) सर्व व्याख्यानं झाली.

सत्यवती, कुंती, गांधारी, गंगा, माद्री आणि द्रौपदी या महाभारताच्या सहा नायिकांवर ही व्याख्यानं होती. खरं म्हणजे या सगळ्या विविध कालखंडातल्या हस्तिनापूरच्या राण्या. पण प्रत्येकीची कहाणी विलक्षण. लग्नानंतर सुखासीन, सुरळीत आयुष्य यापैकी कुणाच्याच वाट्याला आलं नाही.
मत्स्यगंधा किंवा योजनगंधा सत्यवती ही खरं तर ’उपरिचर’ नावाच्या राजाची मुलगी. पांडव नंतर अज्ञातवासात ज्याच्या दरबारात राहिले, तो विराट हा तिचा जुळा भाऊ. एका कोळ्याला ही जुळी मुलं माशाच्या पोटात सापडली आणि त्याने ती उपरिचराला नेऊन दाखवली. राजाने ओळखलं, की ही आपलीच मुलं आहेत. पण त्याने मुलाला, म्हणजेच विराटाला ठेवून घेतलं आणि मुलीला मात्र त्या कोळ्याला दिलं. अशी ही मुळातली राजकन्या असलेली सत्यवती एका कोळ्याच्या घरी वाढली. महाभारतात सत्यवतीची अशी कथा सांगितलेली आहे. हा कथाभाग मला याआधी माहिती नव्हता. पुढे तिचा लहान वयात पराशर ऋषींशी आलेला संबंध, त्यातून जन्माला आलेला मुलगा कृष्णद्वैपायन, म्हणजेच महर्षी व्यास, नंतरच्या काळात तिच्यावर राजा शंतनु मोहित झाला वगैरे कथा आपल्याला माहिती असतेच. अतिशय चतुर अशी ही स्त्री. आपल्या फायद्याच्या अटींवर हस्तिनापूरची महाराणी बनली, पण नंतर तिच्या आयुष्यात कठीण प्रसंग ओढवले. त्या त्या परिस्थितीत तिने हुशारीने मार्ग काढला, भीष्माच्या मदतीने राज्यकारभार आणि कुरुवंश पुढे चालू ठेवला. डॉ. सुचेता परांजपे यांनी अतिशय ओघवत्या भाषेत सत्यवतीचं व्यक्तिमत्त्व उभं केलं.

गांधारी ही दूरच्या गांधार देशातली. म्हणजेच आजच्या अफगाणिस्तानातली. आपला नवरा अंध आहे हे कळल्यावर तिनेही डोळ्यांवर कायमची पट्टी बांधून घेतली आणि आपल्या या कृतीने ’साध्वी’ म्हणून प्रजेच्या मनात स्थान मिळवलं. परंतु तिच्या हातात सत्ता म्हणावी अशी काहीच नव्हती. नवर्‍याकडे तिच्या शब्दाला मान नव्हताच, पण दुर्योधनादि मुलांनाही ती आपल्या आज्ञेत ठेवू शकली नाही. सख्खा भाऊ शकुनी कपटाचे खेळ करतो आहे हे कळूनही ती ते थांबवू शकली नाही. कुंतीशी मात्र तिचे संबंध सौहार्दाचेच होते. कुंतीनेही गांधारीला मोठी जाऊ म्हणून, सासूच्या जागी समजून कायम मान दिला, तिला सांभाळून घेतलं. पुढे युद्धानंतर जेव्हा ते सगळे वानप्रस्थाश्रम स्वीकारून अरण्यात जाऊन राहिले तेव्हा कुंतीनेच गांधारीची सेवा केली.
डॉ. सुचेता परांजपे यांनी गांधारीविषयी बोलताना एक हृद्य मुद्दा मांडला. तो असा, की जेव्हा तिला मुलं झाली, तेव्हादेखील तिला एकदाही असं वाटलं नसेल का, की आपण आपल्या बाळांना तरी एकदा डोळे भरून पहावं? बाकी धृतराष्ट्राबद्दल आणि एकूणच वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल तिच्या मनात राग, उद्वेग असणं स्वाभाविक आहे, पण तिला आपल्या मुलांनाही बघावंसं वाटू नये? इतकी निरिच्छ ती कशी झाली असेल? दुसरं म्हणजे तिने डोळ्यांवर पट्टी बांधून घेण्याऐवजी जर तीच नवर्‍याचे डोळे होऊन राहिली असती, राज्यकारभारात लक्ष घालू लागली असती, तर कदाचित पुढे घडणार्‍या अनेक कटु घटना टळल्या असत्या. पण ती चिडून आयुष्यभर अंध होऊनच राहिली.

कुंतीबद्दल बोलताना डॉ. अरुणा ढेरे यांनी तिचं कर्णाच्या बाबतीतलं दुर्दैव सविस्तरपणे मांडलं. लहान वयात अजाणतेपणी झालेल्या मुलाला दूर करावं लागणं हे एक दु:ख आणि नंतर योगायोगाने तोच मुलगा कायम समोर असूनही हे सत्य कुणालाही सांगता न येणं, त्या मुलाचा स्वीकार न करता येणं हे अजून मोठं दु:ख दीर्घकाळ तिच्या वाट्याला आलं. पण ती नेहमी धीराने, हिमतीने वागली. पतीचा अकस्मात मृत्यू झाल्यावर आणि माद्री सती गेल्यावर पाची मुलांना घेऊन हस्तिनापुरात ती परत आली. तिने नकुल-सहदेवांनाही स्वतःचीच मुलं असल्यासारखं प्रेम दिलं. पुढे लाक्षागृहातून वाचल्यावर मुलांबरोबर जिवाच्या भीतीने वणवण भटकताना, अरण्यात राहताना, एकचक्रा नगरीत रहात असताना भीमाला बकासुराला मारण्यासाठी प्रवृत्त करताना तिने असामान्य धैर्य दाखवलं. शेवटपर्यंत ती खंबीर राहिली. धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर यांना ती कायम मान देत राहिली.

गंगा आणि माद्री या दोन स्त्रियांविषयी फार सविस्तरपणे कधी बोललं, लिहिलं जात नाही. डॉ. सुचेता परांजपे यांनी या दोघींवरही एक व्याख्यान दिलं. याही हस्तिनापूरच्या राण्याच. गंगा ही मुळातली स्वर्गातली अप्सरा. इंद्रसभेत सगळे देव, अप्सरा वगैरे असताना तिचं वस्त्र वार्‍यामुळे थोडं सरकल्यावर बाकी देवांनी तिच्याकडे पाहणं टाळलं, पण महाभिषव नावाचा ईक्ष्वाकु कुलातला राजा तेव्हा स्वर्गात होता, तो मात्र मोहित होऊन तिच्याकडे पहात राहिला. त्यामुळे ब्रह्मदेवाने त्या दोघांना शाप दिला की तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. त्यानुसार गंगेने पृथ्वीवर गंगा नदीकाठी जन्म घेतला आणि महाभिषव हा शंतनूच्या रूपात प्रतीपाच्या घरी जन्माला आला. पुढची सात मुलांना गंगा नदीत सोडण्याची आणि देवव्रत भीष्मांची कथा आपल्याला माहिती असते. नंतर शेवटी भीष्म शरपंजरी ( या शब्दाचा अर्थ बाणांची शय्या असा नसून शर नावाच्या मऊ गवताची शय्या असा आहे, असं डॉ. परांजप्यांनी सांगितलं) पडून मृत्यूची वाट पहात असताना गंगा तिथे परत आली आणि भीष्मांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने त्यांना सोबत केली.
माद्री ही मद्र देशाची, म्हणजे आजच्या पाकिस्तानातल्या सियालकोट भागातली राजकन्या. दिसायला नाजूक, सुंदर. तिने पंडूवर मनापासून प्रेम केलं. शेवटी आपल्याबद्दल मोह निर्माण झाल्यामुळे पतीचा मृत्यू झाला हे अपराधीपणाचं ओझं ती सहन करू शकली नाही आणि तिने पंडूबरोबर सहगमन केलं.

द्रौपदी ही खर्‍या अर्थाने महाभारताची महानायिका. अग्नीतून जन्मलेली, सावळ्या वर्णाची ही तेजस्वी, लावण्यवती राजकन्या. डॉ. गौरी मोघे यांनी चिकित्सक आवृत्तीच्या आधारे द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला. महाभारतात ’धर्म’ या संकल्पनेला प्रचंड महत्त्व आहे. किंबहुना धर्माला मध्यवर्ती ठेवूनच महाभारत रचलं गेलं आहे. या संदर्भात ’धर्म’ या शब्दाचा अर्थ जो आज आपण हिंदू, मुसलमान वगैरे, म्हणजे ’रिलीजन’ असा घेतो, तसा न घेता ’जगण्याचे नियम, पद्धती, कायदे’ असा घेतला पाहिजे हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. या धर्माचं सूक्ष्म स्वरूप, त्याचा अर्थ, आपला नक्की धर्म काय, याबद्दल महाभारतात वारंवार चर्चा आहे. अधर्माचा भार वाढल्यामुळेच महाभारत घडलं, त्यामुळे अधर्माचं ’भारावतरण’ हे महाभारताचं प्रयोजन आहे आणि या कथेची महानायिका द्रौपदी आहे. नायिका या शब्दाचा अर्थ ’नेणारी’ असा आहे. द्रौपदी खरोखरच आपल्या कृतींमधून, बोलण्यामधून महाभारताच्या कथेला तिच्या योजित शेवटाकडे नेते. द्रौपदीने पित्याच्या घरी असताना बृहस्पतीनीतीमधून धर्मशास्त्राचं शिक्षण घेतलेलं होतं. .

पाच पांडवांशी लग्न करून द्रौपदीने जगावेगळा संसार केला. इंद्रप्रस्थातली सुरुवातीची वर्षं सोडली, तर नंतर तिच्या वाट्याला सुख असं आलंच नाही. भर राजसभेत वस्त्रहरणासारखा, कुणावरही येऊ नये असा प्रसंग या महाराणीच्या आयुष्यात आला. तेव्हा तिने भीष्मद्रोणादि दिग्गज धर्मज्ञांसमोर, ’युधिष्ठिराने स्वतःला पणाला लावून हरल्यावर त्याला पत्नीला पणाला लावण्याचा अधिकार आहे का?’ असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला. स्वतःच्या बाबतीत होत असलेला अन्याय अजिबात मुकाट्याने सहन केला नाही. ती अजिबात दुर्योधनाला किंवा दुःशासनाला शरण गेली नाही. तिच्या त्यांच्या बाबतीतल्या संतापाची धार कधीच बोथट झाली नाही. आपला हा भरसभेतला अपमान पाहणार्‍या पतींबद्दलही काही तिला कमी संताप आला नसणार, पण तिने त्यांची साथ मात्र सोडली नाही. पांडव वनवासात जायला निघाले, तेव्हा सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी माहेरी, द्वारकेला निघून गेली. उलूपी आणि चित्रांगदा या अर्जुनाच्या इतर दोन पत्नींचा तर प्रश्नच नव्हता. द्रौपदीने मात्र वनवासातल्या सगळ्या हालअपेष्टा नवर्‍यांच्या बरोबरीने भोगल्या. अज्ञातवासात ती दासी म्हणून वावरली.
विराटनगरीत असताना ती कीचकालाही शरण गेली नाही. आपण अज्ञातवासात आहोत याचं भान ठेवूनही तिने भीमाकरवी कीचकाचा वध करवला. युद्धाच्या शेवटी अश्वत्थाम्याने तिच्या पाचही मुलांना अधर्माने मारल्यावर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असा आग्रह तिने धरला. अखेर पाची पांडवांबरोबरच ती स्वर्गाकडे गेली.

नरहर कुरुंदकरांचं सगळंच लेखन आपल्याला वैचारिकदृष्ट्या बर्‍याच वरच्या पातळीवर घेऊन जाऊन तिथून त्या त्या विषयाचं दर्शन घडवणारं असतं हा माझा अनुभव असला, तरी त्यातल्या त्यातसुद्धा त्यांचे जे काही लेख या बाबतीत अगदी स्तिमित करून टाकणारे वाटतात, त्यातला एक लेख म्हणजे त्यांनी शकुंतलेच्या कथेकडे तीन वेगवेगळ्या दृष्टींनी (महाभारत, पुराण आणि कालिदासाचं शाकुंतल) पाहून लिहिलेला ’ शकुंतला : इतिहास, पुराण आणि काव्य’ हा लेख. एकाच कथेकडे तीन बाजूंनी तितक्याच समर्थपणे कसं बघता येतं, एक बाजू अभ्यासलेली असताना दुसर्‍या, तिसर्‍या बाजूंचाही मनापासून आस्वाद कसा घेता येतो, पुन्हा पहिल्या बाजूकडे येताना इतर दोन बाजूंमुळे कसं प्रभावित होऊ नये, हे त्या लेखनात दिसतं. हा एक अतिशय मोलाचा गुण आहे. अशा प्रकारे एकाच घटनेकडे, व्यक्तीकडे, कथेकडे वेगवेगळ्या दृष्टींनी पाहण्यासाठी केवळ तीक्ष्ण बुद्धिमत्ता पुरेशी नसते, तर विचारांचा खुलेपणाही आवश्यक असतो. या व्याख्यानमालेत महाभारताची चिकित्सक आवृत्ती ही प्रमाण मानली गेली असली, तरी या तिन्ही विदुषींचाही दृष्टिकोन अर्थातच या आवृत्तीपुरता मर्यादित अजिबातच नव्हता. नंतरच्या प्रश्नोत्तरांच्या सत्रांमध्येही याचा प्रत्यय येत होता. उदा. डॉ. भैरप्पांचं ’पर्व’ हे महाभारतावरचं माझं अतिशय आवडतं पुस्तक. सर्व व्यक्तिरेखांकडे ’माणूस’ म्हणून पाहून, शाप, वर, चमत्कार यांना अजिबात स्थान न देता, महाभारतातल्या घटनांची वास्तववादी मांडणी या पुस्तकात आहे. जरी या पुस्तकातली अनेक घटनांची मांडणी चिकित्सक आवृत्तीपेक्षा वेगळी असली, तरी ’पर्व’ चा संदर्भ देऊन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना डॉ. मोघे आणि डॉ. परांजपे यांनी महाभारताचं एक समर्थ आकलन म्हणून ’पर्व’बद्दल आदराचेच उद्गार काढले.
वेगळ्या बाजूनेही तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने महाभारताकडे पाहण्याचा अजून एक आविष्कार म्हणजे डॉ. अरुणा ढेरे यांचं ’लोकदेवता द्रौपदी’ हे या व्याख्यानमालेतलं शेवटचं व्याख्यान. शतकानुशतके चालत आलेल्या लोककथा, लोकपरंपरा, देवतांची उपासना हेही संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे. सर्वसामान्यांमध्ये प्रचलित असलेल्या समजुती, त्यांना महत्त्वाची असणारी मूल्यं, त्यांची श्रद्धास्थानं यांचं प्रतिबिंब या परंपरांमध्ये पडलेलं असतं. द्रौपदीला या लोककथांमधून काली देवीचं, पार्वतीचं रूप मानलं गेलं आहे. तिची मंदिरंही दक्षिण भारतात कांचीपुरम, कोलार अशा काही ठिकाणी आहेत. तिचं पाच पांडवांशी झालेलं लग्न हा एक विलक्षण असा कथाभाग. त्याचं कारण म्हणजे कामधेनूने पार्वतीला दिलेला, तुला पाच पतींशी लग्न करावं लागेल असा शाप आणि त्यावर महादेवाने, मीच पाच रूपांमध्ये तुझ्याशी लग्न करीन असा पार्वतीला दिलेला दिलासा असं या घटनेचं स्पष्टीकरण लोककथांमधून येतं. पाच पती असणं ही काही रूढ पद्धत नाही. पण ती देवीचा अवतार असल्यामुळे तिला सर्वसामान्यांचे नियम लागू पडत नाहीत. त्याचप्रमाणे तिच्या बाबतीत घडलेल्या घटना या भारतीय युद्धाला कारक ठरल्या, त्यामुळे ती संहारक कालीचा अवतार आहे, अशीही कल्पना रूढ झाली. लोककथांमध्ये कृष्ण हा कधी द्रौपदीचा कैवारी बंधुराया असतो, तर कधी जिवलग सखा असतो. कृष्णाच्या कापलेल्या करंगळीला आपल्या भरजरी वस्त्राची चिंधी सहज फाडून बांधणारी प्रेमळ बहीण द्रौपदी ही लोककथेतच दिसते. वस्त्रहरणाच्या प्रसंगी कृष्ण तिला वस्त्रं पुरवतो, ही कथा तर प्रसिद्धच आहे. तर वनवासात असताना द्रौपदीच्या मनात कर्णाबद्दल क्षणभर अभिलाषा निर्माण झाल्याचं जाणून कृष्ण तिला याची कबुली द्यायला लावतो, अशी कथा जांभूळ आख्यानात येते. अशी द्रौपदीची विविध रूपं लोकपरंपरांमधून पहायला मिळतात.

अशा या महाभारताच्या नायिका. त्या जरी राजकन्या असल्या, राण्या असल्या, तरी त्यांच्या कहाण्या "आणि ते सुखाने नांदू लागले" असा शेवट असणार्‍या नाहीत. संकटांनी, दुःखांनी व्यापलेली आयुष्यं त्यांच्या वाट्याला आली. कुढत बसण्याऐवजी आपापल्या परीने त्या या संकटांना सामोर्‍या गेल्या. डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या विदुषींच्या तोंडून महाभारताच्या या नायिकांबद्दल ऐकायला मिळणं हा खरंच एक मोठा योग जुळून आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विराट हा तिचा जुळा भाऊ.>>>
असे असेल तर राजकन्या उत्तरा सत्यवतीची भाची, भीष्माची बहिण आणि अर्जुनाची आजी बनेल. अभिमन्यु ची तर पणजी

वावे लेख छानच. या व्याख्यानमालेविषयी वाचलं होतं पण attend करणं झालं नाही. तुमच्या लेखातून त्याचा सारांश छान समजला.
खरंतर महाभारत हा विषय निघाला की आधी आठवतं ते इरावती कर्वेंचं युगांत. खूपच सुंदर आणि शास्त्रीय विश्लेषण आहे त्यात.

सर्व प्रतिसाददात्यांना मनापासून धन्यवाद!
@मनिम्याऊ, हो, नात्यांचा गडबडगुंडा आहे हे खरं आहे! Happy
@सांज, नक्कीच. युगांत, व्यासपर्व दोन्ही सुंदर आहेत. नरहर कुरुंदकरांचं 'व्यासांचे शिल्प' ही नक्की वाचावं असं आहे.

सुंदर सारांश मांडला आहे.

मनिम्याऊ, उत्तरा ही अभिमन्यूची पणजी असेल तर अर्जुन हा अभिमन्यूच्या बायकोचा नातू (म्हणजे स्वतःचाही नातू), आणि अभिमन्यू हा त्या नातवाचा मुलगा, म्हणजे अभिमन्यू स्वतःचाच पणतू लागतो. ह्या स्वतःशीच असलेल्या दोन नात्यांमुळे तो स्वतःचा उल्लेख लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या स्मिगल प्रमाणे 'आम्ही/us' असा करू शकेल.

मनिम्याऊ, उत्तरा ही अभिमन्यूची पणजी असेल तर अर्जुन हा अभिमन्यूच्या बायकोचा नातू (म्हणजे स्वतःचाही नातू), आणि अभिमन्यू हा त्या नातवाचा मुलगा, म्हणजे अभिमन्यू स्वतःचाच पणतू लागतो. ह्या स्वतःशीच असलेल्या दोन नात्यांमुळे तो स्वतःचा उल्लेख लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या स्मिगल प्रमाणे 'आम्ही/us' असा करू शकेल.>>>

खरंच !
किंवा उत्तरेचे वडील विराट हे कदाचित सत्यवतीच्या भावाचा नातू असू शकतो. म्हणजे ध्रृतराष्ट्र (बापरे काय कठीण आहे टायपायला) आणि पंडू यांचा समकालीन. aanni आजोबाचे नाव नातवाला या न्यायाने त्याचेही नाव विराटच. असे असेल तर वयाचा हिशेब बर्यापैकी लागतो.
तसेच विराट मत्स्य देशाचा राजा होता आणि सत्यवती मत्स्यगंधा म्हणजे नक्कीच काहीतरी सम्बन्ध आहे

लेख सुंदरच आहे. अतिशय आवडला.
महाभारतात नात्याचे अनेक ठळक प्रवाह आहेत .खरे तर महाभारत ही एका अतिविस्तारित नातेसंबंधातल्या ताण तणावांची कथा आहे.
कृष्ण हा कुंतीचा भाचा. पांडव आणि कृष्ण ही आते मामे भावंडे. शिशुपाल हा सुद्धा कृष्णाचा आतेभाऊ. कुंतीच्या बहिणीचा मुलगा. कुंती ही कृष्णाची जैविक आते. तिचा सांभाळ अपत्यहीन कुंतिभोजाने केला. तो तिचा काका. हरिवंश आणि पुराणांनुसार नंद हासुद्धा वसुदेवाचा चुलत भाऊ.
विराट हा सत्यवतीचा भाऊ म्हणजे विराटाची मुलगी उत्तरा ही आत्येच्या वंशात गेली. आत्तेभावाशी लग्न ही निदान महाराष्ट्रात सर्वसाधारण गोष्ट आहे. त्यामुळे आत्तेच्या नातवापणतवंडाशी लग्न हेसुद्धा कॉमन.
मला एकच गोष्ट समजत नाही की उत्तरा अभिमन्यूचे वयांचे हिशोब कसे जुळले असतील?

व्याख्यानाचा विषय खूपच ईंट्रेस्टींग वाटला.
लेखही छान ऊतरला आहे.
मला अंबाही एखाद्या महानायिकेवढेच एवढेच प्रभावी व्यक्तीमत्व वाटते... आपला स्वाभिमान जपण्यासाठी तिने एकटीने किती घनघोर प्रयत्न केले. आपण मनाने वरलेल्या व आपल्याला सामर्थ्याने जिंकलेल्या राजकुमारांपैकी एकाने धर्म आणि कर्तव्य म्हणून आपल्याशी लग्न करावे, लग्न नाकारून आपली अवहेलना करू नये ह्यासाठी ती एकटीने झटत राहिली. भीष्मासारख्या पराक्रमी पुरूषाने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी तिने साक्षात परशूरामाला आपलाच शिष्य भीष्मासमोर युद्ध्साठी ऊभे करण्याचा मुत्सद्दी विचार सत्यात ऊतरवून दाखवला. भीष्म अजिंक्य आहे समजल्यानंतर आपल्याच प्राणाची आहुती देऊन भीष्माच्या नाशास आपणच कारण होणार ह्यासाठी आपले सतीत्वही पणाला लावले.
राजवाडा सोडल्यानंतर ती सतत अन्याय, अवहेलना आणि प्रतिशोधाच्या आगीत होरपळत राहिली. खरे तर आपल्या दोन्ही बहिणींसारखी गप्प राहून ती आधी शाल्वाची किंवा नंतर हस्तिनापूरची राणी होऊ शकली असती पण ह्या स्वाभिमानी स्त्रीने हे सर्व लाथाडले.

खूप छान माहितीपूर्ण आणि रंजक लेख, महाभारत हे अगदी गुंतागुंतीचं काव्य आहे, खूप दिवसांनी वाचलं त्याबद्दल,धन्यवाद!

छान लेख.
दरवेळी महाभारताबद्द्ल काही तरी नवी दृष्टी मिळतेच. ही व्याख्यानं कुठे रेकॉर्ड केलेली असतील तर ऐकायला नक्की आवडतील.

वावे, लेख आवडला. संपूर्ण व्याख्यानमालेचं सुंदर रसग्रहण केले आहे. बाकी प्रतिसाद देखील वाचनीय आहेत.

वावे, लेख आवडला. व्याख्यानमालेचा सारांश वाचता वाचता पुन्हा महाभारतातील प्रसंग वाचायला मिळाले. मला महाभारत मृत्युंजय, युगांतर आणि छोट्यामोठ्या स्वतंत्र कथा वाचुन आता पुर्ण माहीत झालं आहे, तरी परत परत कथा वाचनात आल्या तरीही तेवढ्याच कुतूहलाने वाचल्या जातात. फारच रोचक आहे.

वरील लेखातील फक्त विराट सत्यवती नातेसंबंध सोडता बाकी सगळी माहिती आधी होती, पण तरीही लेख वाचायला आवडला.

महाभारतातील सर्वच नायिकांवर अन्यायच झाला म्हणून
मला त्यांचं फार आकर्षण वाटतं. जे जेते होते तेही खूप काही गमावून बसले !!!
कुंतीने तर मुलगी व्हावी ही इच्छाही व्यक्त केली नाही. निदान गांधारीने एक कन्या व्हावी हा वर तरी मागितला. बाकी एकाही नायिकेला कन्या नाही. (गंगा, सत्यवती, द्रौपदी, कुंती, माद्री) बहुतेक जणी त्यांच्या कुटुंबाला /पित्याला नकोशा होत्या. कुंती (दत्तक) काय द्रौपदी(फक्त दृष्टद्युम्न हवा होता) काय सत्यवती(कोळ्याला दिली) काय , का !!! जर सत्यवतीचं विवाहापूर्वीचं मूल असणं चाललं तर कुंतीला का लपवावं लागलं. सत्यवती महत्त्वाकांक्षी होती यात काही चुकीचे वाटत नाही , पूर्वानुभवाने तिचा विश्वास बसला नसेल. भीष्माने अडून बसायला नको होते. Happy तोच शेवटचा कुरूवंशीय आहे खरेतर !! महाभारत फार गुंतागुंतीचं आहे , रामायणासारखं स्ट्रेट फॉरवर्ड नाही.
युगांत मलाही आठवले.
छान लेख.

लेख आवडला
महाभारत खूप गुंतागुंतीचं कॉर्पोरेट पॉलिटिक्स आहे.

@सामो

लिंकसाठी धन्यवाद.फारच वाचनीय लेख आहे.

@अश्विनी, अस्मिता

तुमच्या प्रतिक्रिया आवडल्या. निरीक्षणं आणि मतंही छान आहेत

Pages