यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन (९)

Submitted by रानभुली on 21 February, 2021 - 06:22
bhutiya railway station

(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

पार्थो घोष खूप कमी बोलतो. इतक्या वेळात त्याने एखादेच वाक्य बोलले असेल.
त्याने गिटार आणले होते. विनाकारण बोलण्याने आवाज खराब होतो. त्यापेक्षा रियाज करावा, गुणगुणावं असं त्याचं मत होतं.
आत्ता पण त्याने मला उगीचच्या उगीच बडबड करणे कमी कर म्हणून दम दिला.
मी म्हणाले मग अशाने मी मरून जाईन.
"तुम नही सुधरेगा. तुम्हारी वजह से हमको भी बोलने का रोग लग जायेगा "

खरं तर त्याला इतका वेळ गप्प बसून कंटाळा आलेला असावा. त्याला पण आता गप्पा मारायच्याच होत्या. पण पावती माझ्या नावाने फाडून. बघ तुझ्यामुळे हं, नाहीतर मी गप्पच होतो.

" नॉयन मुखोर्जी को हम जॉनता है "
" कौन नयन मुखर्जी ?"
" नॉयन मुखोर्जी , पॅरानॉर्मल सॉयोन्टिस्ट "
" पॅरानॉर्मल सायंटिस्ट ? लेकीन ये क्युं बता रहे हो ?"
" बॉप रे बॉप ! कैसा लडकी हो तुम ? तुमको नही मालूम ?"
मग त्याच्या चेह-यावर आठ्या पडल्या. क्षणात नाहीशाही झाल्या.
त्याने मग नयन मुखर्जी कसे त्याच्या ओळखीचे. कोलकत्यात त्यांचे पॅरानॉर्मल सायन्स मधे कसे नाव आहे हे सगळं सांगितलं. त्यांचा इथे काय संबंध या माझ्या प्रश्नावर त्याने माझे अज्ञान दूर करायचे ठरवले.

रेल्वेमंत्र्यांच्या सूचना होत्या की सगळी खात्री करून घ्यावी.
रेल्वे प्रशासनाला हेच कळत नव्हते. भूत आहे किंवा नाही याची खात्री कशी करून घेतात याबद्दल सरकारी मार्गदर्शक तत्त्वे नाहीतच.
रेल्वे स्टेशन बंद करण्याचे कारण ते भूताळी आहे म्हणून नाही तर रेल्वे कर्मचा-यांमधे आणि अधिका-यांमधे असा समज पसरलेला असल्याने कुणीही तिथे काम करायला तयार होत नाही. काही जण आजारी पडले, काहींचा मृत्यू झाल्याने कुणी तिथे काम करत नाही. प्रसंगी राजीनामा द्यायलाही ते तयार होतात हे कारण दिले होते. तसेच प्रवासी, विक्रेते कुणीच रेल्वे स्टेशनचा वापर करायला इच्छुक नाही असेही नमूद केले होते.

आता पुन्हा भूत नाही म्हणून आमची खात्री झाली आहे हे कसे सांगायचे ?

रेल्वेने मग काही जण रेल्वे स्टेशनवर पाठवले. पण त्यांना रात्री थांबायची भीती वाटल्याने ते गावात गेले.
त्यानंतर रेल्वेने त्यांच्यासोबत ११ शास्त्रज्ञांची एक टीम पाठवली.
त्या टीमचे नेतृत्व नयन मुखर्जी करत होते.

--------------------------------------------------------------------
Picture11.jpg

आम्हाला पाहून काही गाववाले जवळ आले.
इथे थांबणार आहात का असा त्यांचा प्रश्न होता. तसे करण्यास ते परावृत्त करत होते.
तसेच थांबायचेच असेल तर किमान मुलींना थांबू देऊ नका. जवळचा आश्रम किंवा कुणाच्या घरी त्यांच्या थांबण्याची सोय होईल असे ते म्हणत होते.
आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता थांबायला.
पण तसा प्लानही नव्हता.
एक झालं. गावात जाण्याची गरज आहे हे लक्षात आलं.

चालत चालत आश्रमाकडे जाताना वाटेत चहा नाश्त्याची एक सोय पण दिसली.
आश्रमात अर्धा तास घालवून पुन्हा येताना गोस्वामी आडनावाची काही घरे लागली.
इथेच रीतेश गोस्वामीची भेट झाली.

रेल्वे स्टेशनपासून पाच सहा किमीवर घर आहे त्याचे.
महत्वाचे म्हणजे तो चांगल्या हिंदीत आणि इंग्रजीत बोलत होता.
इथे कित्येकांना हिंदी समजत नाही आणि त्यांचे उच्चारच आपल्याला कळत नाहीत.
कुणी नाव सांगितल्यावर काय म्हणून विचारणे माझ्या जिवावर येते.

त्यांचे उच्चार समजले नाहीत म्हणून त्यांना वाईट वाटतं आणि आपण परके आहोत अशी भावना निर्माण होते.
मी ग्रुप मधे असताना सहसा स्थानिकांशी संवाद साधत नाही.
पण दरवेळी बरोबर जो काही असेल त्याचा दुभाषा म्हणून वापर करताना , तो काय म्हणाला हे विचारावं लागतं.
यातलं कुणीही स्थानिकांशी बोलताना मला समजलं नसेल ही शक्यता गृहीत धरत नाही.

नावं समजतच नसल्याने ती लक्षात पण नाहीत. आमच्याच ग्रुपमधे पार्थो असल्याने ते ओळखीचं नाव होतं. पार्थो म्हणजे आपल्याकडे पार्थ. वंदना नाव असेल तर बॉंदना. उच्चारावरून छेडलं की बंदना. विलासचा बिलास. झॉरनॉ हे नाव नेमकं काय असावं याचा खूप विचार केल्यावर शेवटी विचारावंच लागलं. तर ते झरना होतं.

रीतेश ब्लॉग पण लिहीतो आणि युट्यूब चॅनेल पण चालवतो.

महिनाभरापूर्वी त्याने आणि त्याच्या मित्रांनी रेल्वे स्टेशनवर रात्र काढली होती. तो म्हणाला मी इतक्या जवळ राहतो पण इथे भूत असल्याचं मला सोशल मीडीयावरूनच समजलं. आम्हाला कसं माहीत नाही इथे भूत आहे ते ?

त्याने इथे रात्र काढली त्याच्या आधी कोलकात्यावरून आलेल्या एका ग्रुपने इथे रात्र घालवली होती. त्यांनी पांढ-या ड्रेसमधल्या एका संशयास्पद मुलीचं व्हिडीओ चित्रण करून ते फेसबुकवर टाकलं होतं. (कुणाला शोधता येत असेल तर प्लीज प्रतिसादात लिंक द्यावी).
त्यामुळे पुन्हा एकदा वादळ उठलं होतं.

त्यामुळे रीतेशने इथे भूत असल्याचं समजलं असं सांगितलं. पण त्यांनी रात्र घालवली तेव्हां काहीच दिसलं नाही असं त्याचं म्हणणं.
त्याच्या आधीच्याच रात्री काही जण पॅरानॉर्मल वाले त्या फेसबुक स्टोरीमुळे आले होते. तेव्हांही झरना, रीतेश आणि त्यांचे मित्र गेले होते. रात्रभर त्यांना काही आढळलं नाही पण दोन वाजता विहीरीतून आवाज आल्याचे त्यांनी सांगितलं.
त्या वेळी थोडा आरडा ओरडा झाला.

रीतेश आणि त्याचे मित्र पळत गेले. तर काही खराब लोक तिथे होते. ते या लोकांना पळवून लावण्यासाठी भीती घालणारे आवाज काढत होते.
दुसरी रात्र यांनी तिथे काढली पण काहीही दिसले नाही.
आता हे युट्य़ूबवर टाकणार आहे असे तो म्हणत होता.

येताना चंदन म्हणाला हा जरा जास्त वाटतो. हे स्टेशन ४२ वर्षे बंद होते तर ते का बंद आहे एव्हढे बेसिक तर त्याला माहीतच असेल ना ? भूत आहे कि नाही ही गोष्ट वेगळी ठेवा. सोशल मीडीयावरून समजले वगैरे असंबद्ध वाटत नाही का ? बाकी त्याला आलेले अनुभव खरे असतील.

पार्थो म्हणाला
नयन मुखर्जींची टीम सगळे एनर्जी मीटर आणि इतर काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आले होते. त्यांनीही रात्र काढली. पण मीटर मधे निगेटीव्ह एनर्जीची नोंद झाली नाही. त्यांनी रेल्वेला रिपोर्ट सादर केला म्हणून मग ऑक्टोबर २००९ ला इथे पहिल्यांदा बोकारो ला जाणारी गाडी सकाळी साडेदहा वाजता थांबली.

त्यानंतर मग गाड्या थांबू लागल्या. आता संध्याकाळी पाचपर्यंत स्टाफही असतो. दिवसभर गाड्या थांबतात. पण रात्रीची थांबत नाही.
पण मग जर रिपोर्ट निगेटीव्ह आलेत तर रात्रीच्या गाड्या का थांबत नाहीत ?

आम्ही आलो तेव्हांच एक गाडी थांबलेली होती. तिच्यातून लोक उतरलेले सुद्धा पाहीले होते.

येईपर्यंत पाच वाजत आले होते.
आपणही आता थोडा वेळ टाईमपास करून निघावे असा विचार होता.

थांबायचा विचार असेल तर रीतेशला फोन केला की डबा मिळणार होता. झरना ने रावस खाऊन जा म्हणून मघाशीच आग्रह पण केला होता.
रावस चा उल्लेख झाल्याने बंगाल्यांचा प्लान बदलत होता. मासे म्हटलं की बंगाली विरघळतात. कितीदा तरी अनुभव आलाय.
आता हेच रात्री थांबू म्हणणार याची ग्यारण्टी होती.

तसेच झाले.
आमच्या घरी फोन गेले. रीतेशने मस्त मोठा डबा आणून दिला.
भात आणि माशाचं कालवण.
मी मासा खात नाही याचं बंगाल्यांना आश्चर्य पण वाटायचं आणि त्यावरून ते बौद्धीकही घ्यायचे.
पण रस्सा खायला माझी ना नव्हती. नाहीतरी फक्त भात कसा खायचा ?
इथे चपाती बिपाती नाहीत बनवत.

रश्शात नारळ भरपूर होता. इकडे ओला नारळ किसून टाकतात. त्याने भन्नाट चव येते. कोकणसारखंच पण बंगाली मसाला थोडा वेगळा असतो. खूप तिखट नसतो. काही लोक तिखट खातात. गोस्वामींचा मसाला गोडाचा होता. नंतर पुन्हा भाऊ बहीण आले.
मी मासे खात नाही म्हटल्यावर घरी चल म्हणून आग्र्ह झाला. काही तरी बनवते म्हणाली.
पण असा त्रास देणं बरं वाटलं नाही. एक तर त्यांनी पैसे पण नाहीत घेतले.

------------------------------------------------------------------------------------------------------------

रीतेशने डबा आणून द्यायच्या आधी रेल्वेचा स्टाफ पाच वाजता निघाला होता. आम्हाला पाहून इथे थांबू नका म्हणून सांगण्याचे कर्तव्य त्यांनी केले.
आम्हीही लगेच निघू असे सांगितले.

इथे एक गंमत आहे. पहाटे चार वाजताच फटफटतं.
पाच वाजता सकाळी सात वाजल्यासारखं उजाडतं. त्यामुळे कोलकात्याला वेगळी टाईमलाईन असावी, भारतात दोन टाईमलाईन असाव्यात असा विचार पुढे आला होता. कोलकात्याचा घड्याळ एक तास पुढे असायला हवं.

संध्याकाळी पाच वाजता साडेसहा सारखं वातावरण होतं.
सहा वाजता अंधारून आलं.

बोकारोकडे जाणारी एक गाडी आली आणी चक्क थांबली..
प्रवासी उतरले. काही चढले.
हे आमच्यासाठी नवीन होतं. पाच नंतर गाड्या थांबत नाहीत हे काही खरं नाही निघालं.
आता थांबून बघूयात काय काय होतं रात्री असं वाटलं.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

पावसाची चिन्हं होती.
थंडगार वारं सुटलं होतं. त्याबरोबर पालापाचोळा उडत होता. वा-याचा वेगही खूप होता.
स्वेटर्स नव्हते घेतले.

थंडी भरून यायला लागली होती.
आम्ही रेल्वे स्टेशन मधे जाऊन आडोशाला बसलो. त्याने वारं अंगावर यायचं बंद झालं.

आता अंधारून आलं होतं.
त्यातच गरमागरम डबा आला.
खरं सांगायचं तर खूप भूक लागली होती.
आम्ही थोड्याच वेळात डबा फस्त केला. काहीच शिल्लक नाही ठेवलं

तरी थोड्या वेळाने दोघे बहीण भाऊ दोन तीन थर्मास मधे चहा आणि बिस्कीटं घेऊन आले.
बिस्कीटं माझ्याकडेही होती. पण आत्ता जे मिळतंय ते ठेवून घ्या असं वाटलं.
सकाळी झरनाला एखादा छानसा ड्रेस घेऊन देऊ मगच जाऊ असं मी सुचवलं. त्याला लगेचच अनुमोदन पण आलं.

----------------------------------------------------------------------------------------
Picture1_8.jpg

दुपारी रेल्वे स्टेशनवर एक वयस्कर इसम भेटला होता. नाव अर्थातच मला कळलं नाही.
आपण त्याला रामलाल म्हणूयात. इथे ते नाव नसतं तरी.
हा मनुष्य तुम्हाला अनेकांच्या ब्लॉग वर पण दिसेल. कुणी इथे संशोधन करायला आलं की हा लगेच येतो.
अशा लोकांचं मानसशास्त्र काय असतं कुणास ठाऊक ?

त्याने आपण खूप महत्वाचे सांगतोय असा आव जो आणला होता त्यामुळं हसायला पण येत होतं आणि त्याच्या भाबडेपणाचं वाईटही वातत होतं. त्याचा कसला तरी स्टॉल (पथारी) होती. बहुतेक फळं विकत होता.

त्याने मग बरीच माहिती पुरवली.
अशा हॉण्टेड जागची एक कहाणी नक्कीच असते.
ज्या मुलीबद्दलची वदंता इथे होती तिचीही एक कहाणी असेलच.
मी त्याबद्दल विचारायला सांगितलं.
बंगाल्यांनी त्याला विचारलं आणि गप्पा मारत बसले. जसं काही मला समजलंच.
मग मी चिडून विचारलं कि जरा मला पण समजावून सांगत चला.

ती तेवीस चोवीस वर्षांची मुलगी होती.
तिला ट्रेन पकडून जायचं होतं. पण स्टेशनला पोहोचायला जरासा उशीर झाला.
संध्याकाळची वेळ होती. ट्रेन स्टेशनातून निघत होती.
तिच्यासोबत जो माणूस होता त्याने धावत जाऊन ट्रेन पकडली आणि तिला हात देत ये असं खुणावत होता.
ती जिवाच्या आकांताने तिच्या वडीलांचा (किंवा अन्य कुणी असेल) हात पकडायला धावली.
पण ती खाली पडली आणि रूळावर गेली.
तिच्या अंगावरून ट्रेन गेली.
तेव्हांपासून ती ट्रेन आली की पकडायला जाते.
ही आम्हाला माहीत असलेली गोष्ट त्या माणसाला विचारली.

त्याने दुसरीच गोष्ट सांगितली.
ती अशी.

की ही जागा इथल्या एका आदिवासी कबिल्याच्या राणीची (सरदारणीची) होती. रेल्वे स्टेशनसाठी तिने भरपूर जागा दिली होती.
तिचा हेतू चांगला होता.
तिचं निधन झालं. तेव्हां आजूबाजूच्या परीसरातून जमातीचे खूप लोक आले होते.
अशातच ती मुलगी आणि तिच्यासोबत एक इसम होता.
जाताना तो प्रकार घडला.
तेव्हांपासून त्या राणीचं भूत इथे वावरतं. तिने स्टेशनला जागा दिली पण तिच्या कबिल्यातल्या मुलीचा जीव गेला हा राग तिला होता.

आता आम्ही पण गोंधळात पडलो. यातली नेमकी गोष्ट कोणती ? खरी कि खोटी हा वेगळा प्रश्न.
पण अपघात झाल्याचं खरं होतं.
तसंच रोजच ती मुलगी धावत असल्याची गोष्ट बरोबर नाही असे त्या माणसाचे म्हणणे होते.
पण म्हणजे मग तिचं काही टाईमटेबल असेल ना ?
आम्हाला वाटलं की अमावस्या पौर्णिमा असे समज असतात. तसं उत्तर मिळेल.
पण तो म्हणाला असं काही सांगता येत नाही.
ती जेव्हां दिसायची तेव्हांच दिसते.
जेव्हां नाही दिसायची तेव्हां नाही दिसत.

थोडक्यात आपण जसे आलेला प्रत्येक चित्रपट बघत नाही ना , तसंच या बाईभूताचं होतं. त्या भूताला कंटाळा आला की ते दिवस दिवस येत नव्हतं. पण एखादी गाडी आवडली की मग रनिंग रेस खेळत होतं. रेसचा कंटाळा आली की झाडावर बसत होतं. स्टेशनवर नाचत होतं.
म्हणजे अवखळ भूत होतं. ते चावत बिवत नसेल तर चांगले जमेल आपल या भूताशी असं वाटून गेलं.

आज भेटलं तर मैत्रीचा विचार करू.
----------------------------------------------------------------------------------------------------

आता थंडी सुटली होती.
गरम गरम रस्सा भात खाल्ल्याने अंगात ऊब आली होती.
थोडंसं चालणं गरजेचं होतं.

वेळही गेला असता आणि चालणंही झालं असतं.
बाकीच्यांचंही सिगारेटी फुंकणं वगैरे तुंबलेलं होतं. तसे कुणी लाजत बिजत नव्हते.
ते एका दिशेला आणि आम्ही तिघे एका दिशेला.
पाऊण तास शतपावली चालू होती.
ट्रेन काही आली नाही.
इतक्यात पावसाच्या सरी आल्या. आमची पळापळ झाली.
पण स्टेशनात घुसेपर्यंत चांगलेच भिजवले पावसाने.

वा-याचा वेग तुफान वाढला होता.
जोरदार सरीने थंडीत कुडकुडायला लागले होते. तिकीट खिडकीचं ऑफीस लोटलेलं होतं.
आम्ही टॉर्च लावला. तर एक रॉकेलची बाटली होती. एक तुंभा होता.
तो तुंभा बाहेर आणला. वातीवर थोडं रॉकेल छिडकलं. आत तेल होतं.
तुंभा पेटवल्यावर चांगलाच उजेड झाला.

इकडे दोघा तिघांनी काटक्या आणि कुणीतरी अर्धवट जाळलेले लाकडाचे तुकडे आणले.
त्यावर पण रॉकेल शिंपडून शेकोटी बनवली.
मोठ्ठा जाळ झाल्यावर आम्ही त्याच्या बाजूने बसलो. थंडी पळून गेली. फक्त कधी चेहरा जाळाकडे करून कधी पाठ करून बसावं लागत होतं.
आता थंडी गेली. चटकेही बसत होते.

एक ट्रेन धडधडत गेली. नाही थांबली.
तिला स्टॉप पण नसेल. साडे नऊ झाले होते.

अजून बरीचशी रात्र बाकी होती.

-----------------------------------------------------------------------------------------

अंधार !!
इतका काळामिट्ट अंधार शहरात कधीच पाहिला नव्हता.
अंधाराला पण शेडस असतात.

दूर गावाकडे जिथे दिवे आहेत तिथे किंचित करड्या छटा .
दूरवर कुणी बिडी पेटवली तरी दिसेल इतकं मोकळं रान.

त्या अंधाराच्या लाटांना आलेला एक फुगवटा असावं तसं दिसणारं स्टेशनचं बांधकाम.
त्याला इमारत म्हणवत नव्हतं. खंडहरच.

Picture13.jpg

मघाशी मोबाईल करून घेतले होते आश्रमात.
जवळपास सर्वांचेच मोबाईल एका गोल एक्स्टेन्शवर ब-यापैकी चार्ज झाले होते.
पॉवर बॅंकचा रिजर्व्ह सप्लाय अजून काढलेला नव्हता.
मोबाईलचा टॉर्च गरज पडेल तितकाच आम्ही वापरत होतो.
शेकोटी केव्हांच विझली होती. आता ऊबेसाठी काहीच नव्हतं.

Picture7.png

मुलांनी बॅगेतून पातळ चादरी काढल्या आणि त्या फलाटावर अंथरल्या.
बॅगा अस्तावस्त ठेवून त्याला टेकून सगळे पसरले होते.
आम्ही पण एकेका बॅगवर बसलो होतो.

guitar2.jpg
रात्र कशी घालवायची ?
दहा वाजून गेले होते. म्हणजे आपल्याकडे अकरा.

फक्त सामसूम होती चहूबाजूला.
वा-याबरोबर उडणारा पालापाचोळा आवाज करत होता. त्याचा वेग थोडा मंदावला होता.

Picture15.jpg

"अंताक्षरी खेळायची का ?"
" तुम्ही खेळा. मला बोअर होतं "
" एक मिनिट. पार्थो गिटार वाजवेल. आपण ऐकू" ही माझी सूचना होती.
" असं मला बोअर होईल. कुणीतरी सोबत गायला पाहीजे "
" आत्ता या वेळी मला नाही जमणार गायला "
" कुणीही गा "

ऋतुपर्ण म्हणाला "मी एक गेम देतो "
" काय ?"
" आधी एक गाणं मी सांगतो. पार्थो बीट्स दे."

guitar1.jpg

इकडे किशोर कुमार आणि आरडी बर्मन ही जवळपास सर्वांची दैवतं आहेत. मन्ना डे, हेमंतकुमार यांनाही तितकाच मान आहे. पण किशोर आरडी साठी हे सगळे हळवे आहेत. जेव्हढे मेल गायक आहेत त्यांचा डिफॉल्ट गायक किशोर. सगळेच त्याच्यासारखं गायला बघतात. आवाज पण सर्वांचे तसेच.
पार्थोचा मूळचा आवाज छान आहे. पण तो किशोरची गाणी किशोरचा आवाज काढून म्हणतो. त्याला खूपदा सुचवलं की तुझ्या आवाजात गा. पण त्यांना पटत नाही ते.
कधी कधी असं व्हायचं की सगळेच किशोर गाताहेत असं वाटायचं.
मला इरीटेट झालं की मग मी बोलून दाखवायचे.
इथे सगळेच फटकळ असल्याने माझं वेगळेपण असं काही नव्हतं.

ऋतुपर्ण एकटा वेगळा निघाला. त्याने कधी आवाज कॉपी करायचा प्रयत्न नाही केला.

त्याने गाणं दिलं .
" ठंडी हवाएं लहराएं की आई "
माझ्याकडे वळून म्हणाला "ऐकलंयस का ?"
मी फक्त मानेनेच हो म्हणून खूण केली.

सगळे कोरस मधे गाणं म्हणाले. फार तालासुरात म्हणण्याच्या मूड मधे कुणी नव्हतं.
मग ऋतुने विचारलं
"कुणाची रचना आहे ?"
"बर्मनदा " एका सूरात उत्तर.
बर्मनदांबद्दल काहीही विचारा. एक वेळ स्वत:च्या घरातलं माहीत नसेल पण बर्मनदांचं बारीक सारीक माहीत असतं.

ऋतू म्हणाला
" आता ही धून कोणकोणत्या गाण्यात वापरलीय ते एका एकाने गाऊन दाखवायचं. नो गूगल प्लीज "

मला मघापासून ही धून खूप जास्त ओळखीची वाटत होती.
चंदनने बिडी पेटवली. एक कश घेतला आणि म्हणाला

"मेरा दिल कहां है, सबकुछ यहां है - रोशन साहब"
"करेक्ट, आता गाऊन दाखव "
" नाही यार हे नको "
"ओके पुढचं "
" रहे ना रहे हम, महका करेंगे - पुन्हा रोशन "
" आता गाऊन दाखव "
चंदनने मुखडा गायला. पार्थो मस्त गिटार वाजवत होता.

रात्रीच्या नीरव शांततेत गिटार काय घुमत होतं भन्नाट.

"अजून ?"
" गाणं आहे का काय ? एका गाण्यातून इतके ?"

पार्थोच गाऊ लागला.
" यही है तमन्ना, तेरे घर के सामने, मेरी जान जाये, मेरी जान जाये"
अगदी हुबेबूब चाल. किंचितसा फरक.

त्याने पूर्ण गाणं म्हटलं.
संगीतकाराचं नाव सांगितलं - मदनमोहन.

मग एकेकाने गाणं सांगायला सुरूवात केली.

"हमे रास्तों कि जरूरत नही है - आर डी बर्मन "
अमोल पालेकर उत्पल दत्तचा कुठलातरी चित्रपट.

पुन्हा

"हमे और जीने की चाहत नही है " पुन्हा आरडी.
आणि
सागर किनारे दिल ये पुकारे हे पण आरडीच.

मला वाटलं संपले.

पण ऋतूने एक गाणं म्हणून दाखवलं

"नगमा हमारा गायेगा ये जमाना"

अजून एक नर्गिस नावाचा चित्रपट. रिलीज नाही झालेला.
"दोनों के दिल है, मजबूर प्यार के"

अजून एक
"कहा था जो तू ने, क्युं मैने ना माना "

बाप रे !
शिवाय ऋतूने एक तमिळ आणि एक मल्याळी गाणं पण आहे असं सांगितलं.

मस्त वेळ गेला.
चंदनने मग
"जाने कहा गये वो दिन" आणि " मेरे नैना सावन भादो "
या गाण्यात काय साम्य आहे असं विचारलं. कारण हार्मोनियम वर दोन्ही त्याला सारखेच वाटत.

ऋतूने सांगितलं की
"या दोन्ही धून वेगवेगळ्या आहेत. पण राग एकच आहे. शिवरंजनी. हा बॉलिवूडचा फेव्हरीट राग आहे. अक्षरश: हजारो गाणी आहेत शिवरंजनीत"

मला थोडं थोडं कळायला लागलंय असं वाटू लागलं. नाहीतर शास्त्रीय हा अगम्य प्रांत.
हे असंच चालू राहीलं असतं.

पण वीज चमकली.

Picture17.jpg
केव्हढातरी लख्ख प्रकाश क्षितिजावर चमकला. निळा पांढरा आसमंत दिसला क्षणात.
त्याने डोळे दिपले आणि काहीच दिसेनासे झाले.
पाठोपाठ गडगडाट झाला,

या अशा सुनसान आणि भूताळी रेल्वेस्टेशनवर बस हेच राहीलं होतं.
आम्ही भिंतीला टेकलो.

जोरदार वा-यासोबत पाऊस सुरू झाला,
विजा सतत चमकत होत्या. त्यामागे गडगडाट झाला कि आम्ही दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारून उभ्या राहत होतो.

मुलं प्लॅटफॉर्मवर फिरत होती. कुणी खांबाला टेकून मजा घेत होतं. त्यांना मजा वाटत होती. आमचा जीव वरखाली होत होता.
ते बघूनही त्यांना हसू येत होतं.

वादळी वातावरण होतं.
पावसापासून बचाव होत नव्हता. पाण्याचे सपकारे वा-याबरोबर आतपर्यंत घुसत होते.
झोपायला आता जमीन शिल्लक नाही राहिली.

ड्रायव्हर तिकडे गाडीत डाराडूर झोपला होता. गाडीपर्यंत जायची हिंमत नव्हती.

वीज चमकली पुन्हा.
त्या दिशेनेच मी बघत होते.

झाडाची आकृती अगदी स्पष्ट दिसली.
खूपच स्वच्छ आणि कदाचित

माझ्याआधीच बंदना ओरडली.

मला खात्री नव्हती.
पण तिलाही काहीतरी दिसलं ?

कदाचित अंगभर फाटके कपडे घातलेले कुणी दोन्ही हात पसरून झाडावर उभे असावे तसे दिसले होते.
सगळी मुलं धावत आली.

"काय झालं ?"

आम्ही दोघी झाडाकडे बोट दाखवू लागलो.

हे धाडस नव्हतं करायला पाहीजे असं आम्ही दोघींनी एकमेकींना न बोलता बोलून दाखवलं.
आता सकाळ होईपर्यंत गप्प बसावं किंवा आताच गाडीकडे चालायला लागावं असा विचार होता.

पण कुठलीही हालचाल करायचं धैर्य राहीलं नव्हतं.
आयुष्यात खूप खूप मोठी चूक केली असं वाटू लागलं.

डोळ्य़ासमोर आई आली. लहान भाऊ आला.
वडलांच्या पश्चात त्यांची उणीव भासू न देणारा काका आला.
मी कुठेतरी बाबांची माफी मागू लागले.
माझ्या दृष्टीने तेच माझे देव होते.

क्रमश:

(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे!
पुढचा भाग लवकर टाक !...

स्वान्तसुखाय (किती सुंदर आयडी), कुमार सर,
रूपाली, अनु, धनवन्ती,
मृणाली, देवकी, लावण्या, मानव सर
आपणा सर्वांचे मनापासून आभार. माझ्यासारख्या नवख्या मुलीला प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे यामुळे भारावून गेले आहे. धन्यवाद.

आजच वाचायला सुरुवात केली आणि सगळे भाग वाचून काढले! छान चालू आहे स्टोरी. लिहिण्याची शैली आवडली!
पुभाप्र!

वर्णिता - क्षमा करा. नाव दिसले नाही हो. सॉरी.
मनःपूर्वक धन्यवाद प्रोत्साहनाबद्दल !!

अथेना, वावे, वावे, जिज्ञासा सर्वांचे आभार.

एसएसजे - तयार आहे. फक्त खरडायचंय. काळ्याचं पांढरं करायचंय. जरासा वेळ मिळाला की करते लगोलग. मलाही नाही आवडत ताटकळत ठेवायला. आता एकाच भागात समारोप व्हावा ही माझीही इच्छा आहे.

रानभुली, खूपच उत्कंठावर्धक चालू आहे लेखमालिका. मस्त. असे आणखी छान छान लिहित रहा. तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन.

कडक !

नयन मुखर्जींची टीम सगळे एनर्जी मीटर आणि इतर काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आले होते. त्यांनीही रात्र काढली. पण मीटर मधे निगेटीव्ह एनर्जीची नोंद झाली नाही.
>>>>
हे असे भूत निगेटीव्ह एनर्जीत मोजले जाते?

लावण्या
लगेचच पोस्ट करतेय. बस पाच मिनिट.

ऋन्मेष - मला यातलं काही कळत नाही.

Pages