इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला.
या चित्रपटाने उसूलांची सर्व रेकॉर्ड्स मोडली आहेत. पूर्वी ७० च्या दशकात एका चित्रपटात फार फार तर २-३ उसूल असत. इथे उसूलांमधून इतर संवाद शोधावे लागतात. यातले बरेचसे उसूल दिग्दर्शकाने शाहिदच्या कॅरेक्टरला वेळोवेळी वापरायला दिले आहेत. मधेअधे जर खिलजी हातात सापड्ला तर ते वापरायचे. व्हिडिओ गेम्स मधे लोक "लाइव्ह्ज" वापरतात तसे इथे उसूल कामी येतात.
पण त्याव्यतिरिक्त या पिक्चरमधल्या लोकांचा एक अंब्रेला उसूल असा आहे की कोणतीही गोष्ट करताना किंवा न करताना राजपूत लोक ती का करतात किंवा करत नाहीत हे करारी चेहर्याने सांगणे. ते ही मुळात आजूबाजूला सगळे राजपूतच असताना. त्यापेक्षा चितौडच्या गडावर राजपूत लोकांबद्दल चांगली माहिती असलेलेच लोक का नेमत नाहीत हे लोक? म्हणजे प्रत्येक वेळेला असले कॉमन नॉलेज एकमेकांना ऐकवायला नको.
एरव्ही सुद्धा हे लोक असेच बोलत असतील का? म्हणजे दासीने येउन सांगितले की "बडी राणीसा ने बैंगन खाने से मना कर दिया है", की लगेच "राजपूत रानीयाँ अपने चितौड के उगे हुए बैंगन खाने से कभी मना नही कर सकती". स्वतःबद्दल बोलतानाही अनेकदा हे लोक थर्ड पर्सन मधे बोलतात. तो त्यांच्या करारीपणाचा भाग आहे, की सीनमधे इतरांनी त्यांच्याबद्दल म्हणायचे संवादही हेच म्हणून टाकत आहेत कळत नाही. त्यांना अशी वाक्ये बोलता यावीत म्हणून आजूबाजूचे लोक अनेकदा प्लाण्ट केलेले प्रश्न विचारत असतात.
थोरल्या राणीचा एक मोत्यांचा हार रावळ रतन सिंग चुकून कोणालातरी देउन टाकतो.. तो म्हणे फक्त लंकेत मिळणार्या स्पेशल मोत्यांचा असतो. आता लंकेतून मोती आणायचे म्हणजे एखाद्या विश्वासू नोकराला किंवा मंत्र्याला पाठवणे शक्य नसल्याने रावळ स्वतःच जातो तेथे. ते ही राणीला म्हणेल चल जरा लगे हाथो बीच वर जाउन येउ वगैरे नाही. एकटाच जातो. तेथेही चितौडचा फेमस राजा आलेला आहे याचा पत्ता राजकन्येला नसतो. ती जंगलात डिजिटल हरणाची शिकार करण्यात मग्न असते. हाही मोती शोधायला घनदाट जंगलात फिरत असल्याने साहजिकच एक बाण चुकून याला लागतो. मग पुढे थोडा वेळ "शिकार" आणि "मोती" यावरच्या विविध उपमांचा मारा आपल्यावर होतो. तीर सही निशानेपर लगा, लंकेतील सर्वोत्तम मोती आता मी घेउन जाणार वगैरे वगैरे (तेथे दीपिकाचे सुसंस्कृत वागणे पाहून खरे म्हणजे तिला कल्चर्ड मोती म्हणावे लागेल). मग ते चितौडगडावर येतात. पूर्वी कोणी त्यांच्या गावाहून मुंबईत आलेले दाखवायला एक रॅण्डम रेल्वेगाडी दाखवायचे. तसे यात त्या चितौड च्या किल्याच्या तटबंदीवरून जाणारी किंवा येणारी एक वरात दाखवली की हे लोक किल्ल्यात आले किंवा तेथून गेले हे समजायचे.
लग्न करून परत आल्या आल्या रावळ तिला राजगुरू कडे घेउन जातो. तो म्हणजे एक जीता जागता मल्लूअॅप्स असतो. म्हणजे फेबुवर जसे दहा प्रश्न विचारून तुम्ही कोणत्या जागतिक नेत्यासारखे आहात वगैरे निकाल येतो तसे तो राजगुरू त्या अॅप इतकेच काहीतरी तात्त्विक प्रश्न विचारतो, प्रेम म्हणजे काय आहे, सुख म्हणजे काय आहे वगैरे.
- "जीवन का वर्णन, तीन शब्दोंमे?"
- "अमृत, प्रेम और त्याग"
ते प्रश्न व त्याची उत्तरे म्हणजे लॅटिन चे भाषांतर पोर्तुगीजमधे केल्यासारखे आहे. एकतर राणी ला लागणार्या कौशल्याचा त्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही. दुसरे म्हणजे एकूणच त्या राजगुरू चे लॉजिक असे, की पहिले विचारायचे प्रेम म्हणजे काय. मग त्याच्या उत्तरातील एखादा शब्द घेउन मग ते म्हणजे काय. असे करत करत प्रत्येक उत्तर म्हणजे एक व्हॉट्सअॅप पोस्ट होईल अशा पद्धतीने हे चालते. काहीतरी प्रेम म्हणजे अश्रू. अश्रू म्हणजे सुख व दु:ख यांचे काहीतरी. मग सुख म्हणजे अमुक. एकूण तू जास्त अगम्य प्रश्न विचारतोयस की मी जास्त अगम्य उत्तर देते याची एक जुगलबंदी होते. यातून ती राणी हुशार आहे हे सिद्ध होते.
दीपिकाचे दागिने शब्दशः नाकापेक्षा मोती जड टाइपचे आहेत. तिचे डोळे पाणीदार दाखवायचे असल्याने पुलंच्या भाषेत ग्लिसरिनचा वायसर निघाल्यासारखे सतत दिसतात.. करारीपणा दाखवण्याकरता तिची मान पिक्चरभर कायम ताठ दाखवली आहे. जराही खालतीवरती होत नाही. म्हणजे तलवार भिंतीवरून काढायची असेल तर आधी ती वर उचलायची आणि मग पुन्हा सरळ होत रोबॉटिक स्टाइलने इतर एकही अवयव न हलवता पूर्ण वळून रावळकडे द्यायची असला प्रकार.
भाषेच्या बाबतीत भन्साळी येथे मनमोहन देसाई स्कूल मधून आलेला आहे. धरमवीर मधे जसे वेगवेगळ्या काळातील व वेगवेगळ्या प्रदेशांतील कपडे एकाच वेळी एकाच राज्यातील लोक वापरत होते, तसे इथे भाषेचे झाले आहे. कधी ते राजस्थानी, तर कधी इंदौर-लखनवी अदब दाखवतात ("आप है यहाँ के राजगुरू"), तर कधी उर्दू बोलतात, तर कधी शुद्ध हिंदी. तसेच यमकाच्या गरजेकरता भाषेच्या कन्सिस्टन्सीची पर्वा हे लोक करत नाहीत. चितौडच्या राजा व राणीतील प्रेमगीत हे सुफी स्टाइलने चालते. घूमर घूमे, प्रीत, मन भावे बरोबरच रूतबा, कुर्बान, रूह-ए-साज, नब्ज वगैरे मंडळी खेळीमेळीने नांदतात.
आम्हाला इतक्या वर्षांत इथे अजून स्केज्युल अचूक म्हणायला जमत नाही, आणि ही एका दिवसातच जन्मापासूनच चितौड मधे असल्यासारखी लहेजा, स्थानिक शब्द व उच्चार आत्मसात करते, ते ही दिवसभर त्या किल्ल्यात पडद्याआड बसून.
मग एकदा हे दोघे एकत्र असताना तिला शंका येते की तेथे कोणीतरी लपून बघत आहे. “एकत्र असताना” हे त्या प्रसंगाचे पीजी-१३ वर्णन नव्हे. म्हणजे पुढे तसा काहीतरी प्लॅन असेल, पण कपडे आणि दागिने काढण्यातच सकाळ होईल असे कॉस्च्युम आहेत. त्यामुळे स्क्रीनवर फुलेही आपटायची गरज नाही.. कोणीतरी बघत आहे म्हंटल्यावर तेथे रावळ एकदम एक चाकू मारतो. पण कोणी दिसत नाही. वास्तविक ती भिंत किंवा पार्टीशन जे काही असेल तेथे त्या बाजूचा माणूस लख्ख दिसेल असा उजेड व मोकळा भाग असतो.
पण त्या चाकूला लागलेल्या रक्तातून तिला "चंदन की खूशबू" येते. और ऐसी खूशबू पूरे चित्तौड मे एकही आदमी लगाता है! राजगुरू राघव चेतन! आणि ही माहिती हजारो मैलांवरून नुकत्याच आलेल्या नवीन राणीला उपजत माहीत असल्यासारखी दाखवली आहे. तिला काय कोणत्या प्रजेच्या अंगाला कसले वास येत असतात याचे ओरिएण्टेशन दिले गेले होते का?
राजा व राणीचे जे अंतःपूर का काय असेल ती जागा जरा बंदिस्त, बाहेर पहारा असलेली हवी ना? कोणी तेथे रंगे हाथ दिसला नाही तरी वाटेत कोठेतरी शिपायांना कोणी येताना किंवा जाताना दिसला का विचारावे? पण हा प्रकार अनेकदा दिसतो. चितौडच काय पण दिल्लीची सुद्धा सगळी फौज रिस्ट्रेनिंग ऑर्डर असल्यासारखी कायम सीमेवरच असते. कोणाच्याही महालात कोणीही जाउ शकतो. रावळच्या बेडरूम मधे राजगुरू, खिलजीच्या महालात "किसी को आने न दिया जाय" ऑर्डर लागू असून सुद्धा शत्रूचा बंदी राजा रावळ. टोटल ओपन ऑफिस प्लॅन.
बरं तो राजगुरू आहे. त्याला अंतःपुर किंवा जे काही असेल तेथपर्यंत थेट प्रवेश आहे. तर तो आला तर किमान कशासाठी आला होता वगैरे काही विचारा? थेट शिक्षा. त्या अपमानाचे प्रतीक म्हणून तो बाजूच्या मशालीतील थोडी आग खाउन दाखवतो. म्हणजे रिव्हर्स द्रकारिस. आग खाण्यापेक्षा त्याच्या उलटे करून राज्ये बळकावता येतात हे त्याला माहीत नसते. त्याला तेथून हाकलले जाते. तो जातो थेट दिल्लीला.
अल्लाउद्दिन खिलजीला मुंडकी जमा करायचा शौक असतो (आणि सिंहासनावर बसून डुलक्या मारणे ही एक फॅमिली ट्रेट). चित्रपट ३डी असल्याने एका सीन मधे तो काही कारण नसताना एक शहामृग घेउन येतो. त्याची मुख्य कामगिरी म्हणजे मंगोल टोळ्यांविरूद्धच्या युद्धात सगळे सैनिक लढाईत गर्क असताना हा लांबवर उभा असतो त्या रणधुमाळीकडे पाहात. मग एकाच फटक्यात आत घुसतो ते एक मंगोल मुण्डके घेउनच परत. आपल्याला ते सगळे मंगोल सारखेच दिसतात पण याला त्या धुळीतूनही योग्य डोके बरोब्बर सापडते. मग पुढे काका जलालउद्दीन, मेवाडचा राजगुरू अशी अनेक मुंडकी त्याच्या संग्रही जमा होतात. गेम ऑफ थ्रोन्स मधल्या त्या हॉल ऑफ फेसेस मधे त्यातले काही अल्लाउद्दीनने दान केल्याचा उल्लेख नक्की असेल.
त्याची बेगम कधी मलिका-ए-जहाँ असते, तर कधी मलिका-ए-हिंद. बहुधा अधूनमधून मलिका-ए-आउटर जमना पार ही असेल. माहीत नाही.
एका रात्री खिलजी बेगमबरोबर असताना सर्वत्र शांतता असते. त्यामुळे खिलजी ला दूरवर बासरी ऐकू येते. खेडेगावात एखाद्या लग्नातील लाउडस्पीकर ची गाणी जशी मधूनच अगदी मैलभर लांब ऐकू येतात तशी. मग ती वाजवणार्याला म्हणजे त्या राजगुरूला बोलावले जाते. तो याला सांगतो की तू सिकंदराप्रमाणे जग जिंकणार आहेस (सिकंदरला अर्धा भारत सुद्धा न जिंकता परत जावे लागले होते हे दोघांच्याही लक्षात येत नाही), पण त्या करता तुला "ती" ची गरज आहे. ती कोण? तर ती म्हणे साक्षात माया आहे. खिलजी हा वेदांचा प्रकांडपंडित असल्याने "माया" चा कन्सेप्ट त्याला लगेच समजतो.
तो रावळला दिल्लीला यायचे आमंत्रण देतो. पण रावळ ते धुडकावतो. त्यामुळे खिलजी जंग का ऐलान करून चितौडवर हमला करायला येतो. मग तो व त्याची फौज किल्ल्यासमोर तळ ठोकून बसतात. बरेच दिवस होतात. राणीच्या म्हणण्यानुसार तो म्हणे "तपते रण मे" सहा महिने थांबलेला असतो. दिवाळी ते होळी हा काळ. चितौड त्याकाळात बहुधा दक्षिण गोलार्धात असावे.
मग बराच काळ तिढा सुटत नाही म्हणून मग खिलजी रावळला भेटायला येतो तह करायला. पण तेथे तो पद्मावतीला भेटायची मागणी करतो तहाची अट म्हणून. या भेटीपर्यंत तो फक्त युद्ध किंवा तह करायला आलेला दुसरा एक राजा असतो. त्याने राणीला भेटायची इच्छा व्यक्त केल्यावर रावळ प्रचंड संतापणे व बाजूच्या शिपायांनी खिलजीच्या गळ्यापर्यंत भाले आणण्याइतके काय होते माहीत नाही. तेव्हा काय राजे व राण्या इतर राजे व राण्यांना भेटत नव्हते? राजनैतिक प्रोटोकॉल वापरून, घूँंघट, पडदा जे काय असेल त्याच्यासकट भेटत असतीलच की. हा जणू काही पुढच्या गोष्टी आधीच माहीत असल्यासारखा त्याला दुश्मन म्हणूनच वागणूक देतो. पण राणीने आग्रह केल्यामुळे कोठूनतरी राणीचे प्रतिबिंब दाखवले जाते.
मग खिलजी याला बोलावतो. त्याची फौज सगळी म्हणे परत गेलेली असते. त्यावर रावळही विश्वास ठेवतो. इतकेच नव्हे तर वाळवंटाच्या मध्यभागी असलेल्या तंबूत त्याला भेटायला जाताना यांचे लोक एकाच बाजूला पहारा देत उभे राहतात. तेथून त्याला खिलजी कैद करून दिल्लीला घेउन जातो. आता पेच उभा राहतो. राजपुतांबद्दलची माहिती राजपुतांना कोण सांगणार, समोर शत्रू तळ ठोकून बसल्यावर युद्धाची तयारी करा हे सेनापतीला कोण सांगणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे खिलजीने बोलावल्याप्रमाणे राणी दिल्लीला जाणार असे ती स्वतः ठरवते.
मग राणी तिकडे जाते व त्याला खिलजीच्या बेगमच्या मदतीने सोडवते. त्याची बेगम जेव्हा पद्मावती व रावळ ला पळून जायला मदत करते तेव्हा खिलजी तिच्याकडे बघून मोठ्ठा डॉयलॉग मारतो "हमारे अपनोंनेही हमे जख्मी कर दिया"! त्याआधी त्याने स्वतःच्या काकाला व पुतण्याला -म्हणजे तिच्या वडलांना व भाच्याला त्या आधी मारलेले असते. मग तिलाही बंदी करून टाकतात व दुप्पट फौज घेउन व रोमन साम्राज्यातील उखळी तोफांसारखी काही शस्त्रे घेउन खिलजी पुन्हा चितौडवर चालून येतो. तेथेही एकदा खिलजीच्या बाजूने उसूल ऑलरेडी तोडलेला असताना यांचे सैनिक त्याला मारण्याची संधी सोडून देतात. आणि मग पुढची कथा आपल्याला माहीत आहे.
त्यामुळे त्यापेक्षा दिग्दर्शकाचे डीटेलिंग बघू.
यांची हेरयंत्रणा इतकी भारी असते की इकडे खिलजीच्या फौजा दिल्लीहून निघाल्या आहेत ही खबर सेनापतीला मिळते तोवर तिकडे अंतःपुरात सगळे हादरू लागते टी-रेक्स येत असल्यासारखे. लगेच उठून राणी व राजा तटाकडे जातात तर तिकडून धुळीचे लोळ दिसतात लगेच एक दोन मैलावर. राजाला गडावरून जे सहज दिसेल ते किमान एखादा दिवस आधी हेराने सांगणे आवश्यक आहे वगैरे नाही. सगळे झटपट.
गडाच्या तटावरून बाण मारणार्यांचे कौशल्य मात्र जबरी आहे. खिलजीच्या सेनेच्या दिशेने आडव्या रेषेत मारलेले बाण मधेच कोणीतरी एक्सेल मधे पिव्हट केल्यासारखे तेथे जाउन उभ्या रेषेत पडतात. तसेच त्यांच्या तटावरून थेट खिलजी झोपला आहे त्या जागेवर बाण मारता येउ शकतो. पण ८-१० महिन्यांच्या काळात ते तो मारत नाहीत. का ते विचारू नका, कारण काहीतरी "राजपूत अपने दुश्मनको..." चालू होईल. आणि त्याचे आधीचे आवाहन नाकारल्यावरही यांची युद्धाकरता सगळी तयारी खिलजी चितौडच्या दारात आल्यावर सुरू होते. लोकांना किल्ल्यात बोलवा, धान्य वगैरे भरून ठेवा ई.ई.
बाकी हे चितौड चे महाराज असोत किंवा सल्तनत-ए-हिंद चे सुल्तान. त्यांचे सरसेनापती अगदीच कामचलाऊ असावेत. त्यांच्याकडे कोणी शत्रूचे लोक येउ लागले की राजाला विचारायचे "इसे काट दूँ बॉस?" मग राजाने काहीतरी युद्धनीती ऐकवत त्याला थांबवायचे. अरे इतकी बेसिक माहिती जर राजाने सांगावी लागत असेल तर तुझे काय काम. एकूणच राजनैतिक प्रोटोकॉल वगैरे कोणी काही पाळताना दिसत नाही. खिलजी रावळला भेटायला येताना जुन्या गावातील बोळकांडीतून फिरवून आणल्यासारखा त्याला आणतात. नंतर रावळ त्याच्याकडे जातो तेव्हा व्हिलनच्या अड्ड्यात हीरो घुसतो तसा पडदे झटकत जातो त्याच्या शामियान्यात.
त्या दिल्लीहून सुटकेच्या सीनचे असेच. तेथून पळून यायच्या आधी हा तेथून एकटाच घुसतो खिलजीच्या महालात. सगळे सैनिक नमाज अदा करत असतात, पण ते याला माहीत नसते. तेथेही खिलजी त्याला तलवार देतो मला मार म्हणून. पण तेथे तो "घायल आदमी पर" उसूल वापरून त्याला सोडून देतो.
मूळ कथेचा अंत ठरलेला आहे. पण मधे नाट्यमय प्रसंग तर व्हायला हवेत. अडीच तीन तासांचा चित्रपट बनवताना जे युद्धप्रसंग लिहीले जातात त्यात मधेच जर रावळ च्या हातात खिलजी सापड्ला तर तो मरेल. अशा वेळेस ते नाट्यपूर्ण प्रसंग बदलण्याऐवजी एखादा उसूल वापरायचा आणि खिलजीला सोडून द्यायचे. कधी तो याच्याकडे "घर आये मेहमान पर" सिच्युएशन मधे, तर कधी हा त्याच्याकडे. कधी तो निहत्ता असतो म्हणून, तर कधी घायल असतो म्हणून. कधी त्याच्या तंबूवर जळते बाण टाकले जातात पण खिलजीला मारले जात नाही. तेव्हा आपल्या लक्षात येते की या सगळ्याचा संबंध खर्या उसूलांशी नसून चित्रपट अजून बाकी असण्याशी आहे.
भारी लेख वाचायला मिळाला सकाळी
मस्त लेख वाचायला मिळाला सकाळी सकाळी
ते GOT चे रेफरन्स रिवर्स ड्रकेरीयस
कपडे आणि दागिने काढण्यातच
कपडे आणि दागिने काढण्यातच सकाळ होईल असे कॉस्च्युम आहेत. त्यामुळे स्क्रीनवर फुलेही आपटायची गरज नाही
या वाक्यावर प्रचंड हसले.पिक्चर अजून पाहिला नाही.ट्रेलर बघून मूर्तिमंत एथनिक ब्रायडल कलेक्शन चा फॅशन शो वाटतो.
मला खलीबली गाणे फार आवडते.यावर एक स्वतंत्र लेख/प्रतिसाद यावा
झकास रे फा!! फारा दिवसांनी
झकास रे फा!! फारा दिवसांनी चित्रपटाचा अर्क काढ्ण्यास सवड झाली म्हणायची. वा वा वा!!!
अम्ब्रेला उसूल बेष्ट होता
भारीच... मी अजूनही हा सिनेमा
भारीच... मी अजूनही हा सिनेमा पाहिला नाही पण आता बघावाच लागेल
काही वाक्ये फारच भारी आहेत -
खिलजी हा वेदांचा प्रकांडपंडित असल्याने "माया" चा कन्सेप्ट त्याला लगेच समजतो.
तिला काय कोणत्या प्रजेच्या अंगाला कसले वास येत असतात याचे ओरिएण्टेशन दिले गेले होते का?
पुढे तसा काहीतरी प्लॅन असेल, पण कपडे आणि दागिने काढण्यातच सकाळ होईल असे कॉस्च्युम आहेत. त्यामुळे स्क्रीनवर फुलेही आपटायची गरज नाही
नाही आवडला. डिजिटल हरिणाला
नाही आवडला. डिजिटल हरिणाला फूटेज दिलं लेखात आणि ते नायाब शतुर्मुगला अनुल्लेख...
आपल्याला ते सगळे मंगोल सारखेच
आपल्याला ते सगळे मंगोल सारखेच दिसतात पण याला त्या धुळीतूनही योग्य डोके बरोब्बर सापडते.>>> लय भारी.
वा वा वा.. भारी सुरुवात झाली
वा वा वा.. भारी सुरुवात झाली दिवसाची. कल्चर्ड मोती फार आवडला.
मस्तच लिहिले आहे. वाचताना मजा
मस्तच लिहिले आहे. वाचताना मजा आली. चित्रपट पाहिला होता त्यामुळे वाचताना प्रत्येक दृश्य समोर येत होते. थोडे त्या शेवटच्या जोहार बद्दल पण लिहा. मिर्च मसाला चा शेवट वापरला आहे.
मस्त लिहिले आहे. क्लचर्ड मोती
मस्त लिहिले आहे. क्लचर्ड मोती, रिव्हर्स द्रकारिस भारीच.
भारीच!
भारीच!
कपडे आणि दागिने काढण्यातच सकाळ होईल असे कॉस्च्युम आहेत.>>
मस्त लिहिलंय,
मस्त लिहिलंय,
सगळ्यात विक स्क्रिप्ट आहे,
राणी दिल्ली ला जाते तेव्हा,
रत्नसिंग ला पळवून , दिल्ली ते चितोड येण्याची त्यांची काही exit स्त्रतेजीच नसते, ऐनवेळेला ती बेगम भुयारी रस्ता दाखवते आणि त्यातून ते किल्ल्याबाहेर पडतात.
राणी - रतन इतस्ततः फिरत असतात तरी सैनिकांचा नमाज पढणेच चालू असते.
होळीचा रंग खेळताना सेनापती casually आता धान्य संपत आलंय बरं असा रिपोर्ट देतो, आणि तो रिपोर्ट घेऊन रतनसिंग खाजगीत रंग खेळायला जातो,
वगैरे फुल्ल गमतीजमती आहेत पिक्चर मध्ये
नहि ज्म्या.
नहि ज्म्या.
राणी - रतन इतस्ततः फिरत असतात
राणी - रतन इतस्ततः फिरत असतात तरी सैनिकांचा नमाज पढणेच चालू असते. >>>>> ते सिरिअसली पढत असतील.
किती पीसफुल कोंबड्या माराव्या
किती पीसफुल कोंबड्या माराव्या लागल्या असतील हो? इतकी पिसे काढताना?
नेहमीप्रमाणेच मस्त लेख.....
नेहमीप्रमाणेच मस्त लेख..... मजा आली
भारी आहे हे !
भारी आहे हे !
भारी लेख ।
भारी लेख ।
काही काही पंचेस तर जबरी
जबरा... हा चित्रपट दोनदा
जबरा... हा चित्रपट दोनदा बघितला पण हे लक्षात आले नव्हते..
ते राजगुरू व दिपिकाचे इन्ट्रोला संवाद, जास्त अगम्य कोण बोलतंय याची चिरफाड मस्त केलीत. चित्रपट पहाताना हाच एक प्रसंग मला खटकला होता. तेवढ्या चार प्रश्नावरून ती एक असामान्य बाई आहे हे कसे काय कळते राजगुरूला कोणास ठावूक?...बाकी तो राजगुरू एकदम ठरकी आहे हे त्याच्या चेहर्यावरूनच जाणवत होते तरी रावळ का बरे त्याच्या नव्या राणीला त्याच्यासमोर घेऊन जात होता ?
बाकी एक गोष्ट जाणवली की पद्मवती झालेल्या दिपिकेपेक्षा खिलजीची बेगम जास्त सुंदर दिसते. जर खरोखर असे असते आणि खिलजीने जर पद्मावतीला पाहिले असते तर खिलजीने "याच साठी केला का हा अट्टाहास" असे बोलून स्वतःचेच डोळे फोडले असते.
बाकी हे उसूल मात्र जाम डोक्यात जातात. हे असले सगळे हिंदू राजे असल्या नतद्रष्ट उसूलांमुळेच संपले.
>> तो म्हणजे एक जीता जागता
>> तो म्हणजे एक जीता जागता मल्लूअॅप्स असतो.
लै हसलो..
लय भारी खूप हसले .. :हहगलो
लय भारी खूप हसले .. मज्जा आली वाचायला
चित्रपट पहिला नाही तरी इतर चित्रपटांच्या दृश्यांच्या अंदाजाने बऱ्याच ठिकाणी अगदी अगदी झाले !!
अंब्रेला उसूल>>
अंब्रेला उसूल>>
प्रजेच्या अंगाला कसले वास येत असतात याचे ओरिएण्टेशन >>
ही खबर सेनापतीला मिळते तोवर तिकडे अंतःपुरात सगळे हादरू लागते टी-रेक्स येत असल्यासारखे.>>
चितौड त्याकाळात बहुधा दक्षिण गोलार्धात>>>
भार्री अॅज युज्वल!!
बाकी एक गोष्ट जाणवली की
बाकी एक गोष्ट जाणवली की पद्मवती झालेल्या दिपिकेपेक्षा खिलजीची बेगम जास्त सुंदर दिसते. जर खरोखर असे असते आणि खिलजीने जर पद्मावतीला पाहिले असते तर खिलजीने "याच साठी केला का हा अट्टाहास" असे बोलून स्वतःचेच डोळे फोडले असते.>>
अगदी अगदी! ती खरोखर खूप सुंदर दिसते. even खिलजी ज्या मराठी राजकन्येला आधी धरून आणतो तीही दिपीकेपेक्षा जास्त सुंदर आहे. फार काय पण रावळची प्रथम पत्नी नागमतीही पद्मावतीपेक्षा जास्त सुंदर आहे असे आमच्या काही मित्रमंडळींचे मत पडले
बाकी हे उसूल मात्र जाम डोक्यात जातात. हे असले सगळे हिंदू राजे असल्या नतद्रष्ट उसूलांमुळेच संपले.> +१११११
त्यात सुटका होत असताना गुपचूपपणे पळून जायच्या ऐवजी रावळ खिलजीचा निरोप घेतल्या शिवाय जाणार नाही कारण त्याशिवाय जाण्याची राजपूतांची परंपरा नाही हे म्हणतो ते जाम विनोदी वाटले होते!! म्हणजे शिवाजीमहाराजांनी पेटार्यात बसण्याआधी 'थांबा हं, जरा औरंगजेबाला सांगून येतो मी निघतोय म्हणून' असे म्हणण्यासारखे आहे
कहर लिहिलेय... हा आचरट
कहर लिहिलेय... हा आचरट सिनेमा बघायची अजिबात इच्छा नव्हती पण आता पुनप्रत्ययाच्या आनंदासाठी बघावासा वाटायला लागला.
ह्या धाग्यावर एखादा राजपूत
ह्या धाग्यावर एखादा राजपूत येउन "राजपूत उस टाइमपे ऐसे येडे उसूल नहि बनाते और बनाये तो ऐसे नहि वागा करते" म्हणून एखादा उसूल सुनाऊन जाईल
चांगली पिसे काढली आहेत!
चांगली पिसे काढली आहेत! डोक्याला ताप झाला ते बिनडोक ऊसूल ऐकून. यावर त्या करणी सेनेनं objection का नाही घेतलं देव जाणे!
म्हणजे पुढे तसा काहीतरी प्लॅन
म्हणजे पुढे तसा काहीतरी प्लॅन असेल, पण कपडे आणि दागिने काढण्यातच सकाळ होईल असे कॉस्च्युम आहेत. >>
भारी लिहीलंय
त्यात अजून एक शंका म्हणजे
त्यात अजून एक शंका म्हणजे पद्मावती बौध्द दाखवली आहे मग हरणाची शिकार वगैरे कसं चालतं त्यांच्यात?
आणि शिकार करायला जाताना केस मो़कळे सोडून कोण जातं?
त्या आधीच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातही भर लढाईत मस्तानी मोकळे केस सोडून लढत असते!
मणिकर्णिकाही सुरवातीला मोकळे केस सोडून घोडदौड, शिकार करत असते. सुदैवाने लढाईच्या प्रसंगात साजेसा पेहराव आहे. त्याबद्दल कंगनाला थोडे अधिक गुण
भारीच .
भारीच .
राजगुरू: तीन शब्दो मे बताओ राजपूत क्या है?
राणी: उसूल उसूल उसूल ...हा ही डायलॉग पळला असता.
बाकी एक गोष्ट जाणवली की
बाकी एक गोष्ट जाणवली की पद्मवती झालेल्या दिपिकेपेक्षा खिलजीची बेगम जास्त सुंदर दिसते>>> हो हे खरंय. मला वाटतं तिलाच मेन रोल द्याला हवा होता. कमी दागिन्यांत पण सुंदर दिसली असती. दीपिका ला भडिमार केलाय नुसता दागिन्यांचा तेव्हा बरी दिसते.
खतरनाक रिव्ह्यू... 'कल्चर्ड
खतरनाक रिव्ह्यू... 'कल्चर्ड मोती', टी रेक्स, खिलजी वेदांचा प्रकांडपंडित एकदम तुफान!
त्याची बेगम कधी मलिका-ए-जहाँ असते, तर कधी मलिका-ए-हिंद. बहुधा अधूनमधून मलिका-ए-आउटर जमना पार ही असेल. <<<<<<<
Pages