कर दे मुझे मुझसेही रिहा, मारा आणि कोहंसोहं

Submitted by अस्मिता. on 12 April, 2020 - 18:01

20200405_164113.jpgकुन फाया कुन हे सूफी गाणे मला आवडते. ह्या तथाकथित बंड लोकांबद्दल त्यांच्या झपाटलेपणामुळे एक गूढ आकर्षण वाटते. खासकरुन या गाण्यातील त्या ओळी ज्यात "अब मुझकोभी हो दिदार मेरा , कर दे मुझे मुझसेही रिहा" अशी आर्त आळवणी आहे.
माझ्यापासून मला रिहा /मुक्त / स्वतंत्र कर म्हणजे नक्की काय असेल ? नेमक्या कोणत्या
अदृश्य तुरुंगात आहोत आपण जो दिसत नाही, जाणवत नाही. मग त्यातून बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न तरी का करणार आणि कसा करणार !
मला नेहमीच वाटते की मी या ग्रहावरची नाही, या जगातलीच नाही . कुठल्यातरी अधिक चांगल्या ग्रहावरून झालेल्या चुकांमुळे पतन होऊन मी इथे आले आहे. प्रत्येकाला असा अनुभव आयुष्यात कधी न कधी आलाच असेल. या चाकोरीचा या साचेबद्धतेचा कंटाळा येऊन एक प्रकारची बधीरता येते. मगं आपण अस काही तरी ऐकतो, बघतो, वाचतो किंवा अनुभवतो की एक क्षण स्वतःच्या स्व-स्वरूपाशी जोडल्या जातो. तो आनंदाचा क्षण जो खरे तर क्षणीक वैराग्यामुळे अनुभवला आहे तो आपल्या मनाला पुन्हा त्या संसारचक्राला जुंपतो. आणि आपण नात्यांच्या आभासी बंधनांशी पुन्हा एकदा आवळल्या जातो. मगं घरची सात-आठ आणि बाहेरची सात-आठ नाती सांभाळण्यात आयुष्य निघून जाते. पण साचेबद्धता तीच !! प्रत्येक नात आपल्याला एका साच्यात टाकत. सोप्या शब्दांत सांगायचे तर 'कस्टमाईज' करतं . हा साचा परिस्थिती प्रमाणे व अपेक्षांप्रमाणे बदलत रहातो. त्यामुळे स्थैर्य कधीच मिळत नाही. बहुतांश नात्यांत निखळ आनंद रहात नाही कारण ते प्रेम निस्वार्थ व विनाअट केलेले नसते. कुठल्यानाकुठल्या अपेक्षांचे आणि अपेक्षाभंगांचे ओझे ते वहात असते. हा ' नाच गं घुमा, कशी मी नाचू ' प्रकार इतका अंगवळणी पडतो की या कस्टमाईज नाचालाच आपण नात्यातील एकनिष्ठता समजायला लागतो.
soul_0.jpg
आपल्याकडे काही संतमंडळी आणि भगवद्गीता सुद्धा सांगून गेली आहे की, मुक्तीची संधी हे सुद्धा आत्मा वारंवार जन्माला येण्याचे एक कारण आहे.
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्न्यस्य मत्पर: |अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते || 6||तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् |भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् || 7||ण बहुतांश लोक प्रयत्नच करत नाही. रोज ध्यान केल्यावर हे खरतरं अगदी अशक्य रहात नाही. मुक्तीच्या मार्गावर रोज एकतरी पाऊल टाकावे. जे काळातीत आहे त्याला दिवसातला थोडा तरी काळ द्यावा. परमात्मा इतका उदार आणि क्षमाशील आहे की आपण एक पाऊल उचलले तर पुढची दहा तो आपल्याला कडेवर नेईल !!
हा गुणत्रयरहितु । व्यक्तिसि अतीतु ।
अनादि अविकृतु । सर्वरूपु ॥ ४९ ॥
अर्जुना हा नित्यु । अचलु हा शाश्वतु ।
सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥ १५० ॥
( ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा )
मला प्रामाणिकपणे वाटते की हे तिन्ही गुणांनी रहीत, अनादी, अनंत, अविकृत आणि अचल असणारे परमानंदाचे शाश्वत स्वरूप, जे सर्वव्यापी आणि परिपूर्ण आहे ते सर्वांना मिळावे. सर्वांचा त्यावर अधिकार आहे . एक आत्मा म्हणून मुक्तीच्या प्रयत्नासाठी आणि एक सजीव म्हणून सच्चिदानंदाच्या एकात्मतेसाठी.
d4a03b4eca9d466a83e9451853337ee6_1.jpg
पण आपण हे विसरून गेलो आहोत की आपण या संसाराच्या अदृश्य तुरुंगात आहोत. हॅमस्टरव्हीलवर अविरतपणे पणे धावणाऱ्या हॅमस्टर सारखी आपली अवस्था आहे. पुन्हा पुन्हा जन्म घेण्याने आपण हळूहळू हेही विसरून गेलोय की आपण नक्की काय विसरलो. म्हणूनच की काय खुद्द परमात्म्याला 'संभवामि युगे युगे' करावे लागले. कधी ईश्वरी अवतारात तर कधी अवतारी स्त्री-पुरुषांत ! पण आपण त्यांचे गोडवे गाण्यात धन्यता मानतो. कदाचित त्यांना ईश्वरी अवताराचे लेबल लावले की आपल्याला आत्मा म्हणून येणाऱ्या जबाबदारीतून स्वतःला अलगद मोकळे करता येते.
fa22910c4672c6b7c1d408adb7831945_0.jpg
हे जे आपण आपली सुटका बघत असतो. त्याला कारण असू शकतो हा
मारा. हा मारा म्हणजे तोच दानव राक्षस ज्याने सिद्धार्थाला निर्वाणाच्या प्रयत्नांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आत्मबोधात बाधा उत्पन्न केल्या. हा मारा बौद्ध धर्मात राक्षसरूपात पाहिल्या जातो. पण मला तो आपल्याच वासना-विकार याने आलेल्या अज्ञानाचे प्रतिक वाटतो. असा बाह्य राक्षस कुणी नाहीच मुळी. हा इंद्रियजन्य सुखाच्या लालसेने आलेल्या षड्रिपूंचे आपल्या अंतरातलेच रूप आहे. सिद्धार्थ त्याला बधला नाही म्हणून बुद्ध अवतरला. आपण त्याचे पालनपोषण करून त्याची गुलामगिरी पत्करली. आपल्यातही बुद्ध अवतरु शकतो, निदान आत्मा म्हणून परमात्म्याने ही क्षमता देऊनच अवनीतलावर पाठवले आहे. आपणमात्र दुर्दैवाने ह्याच एका बाबतीत स्वार्थी न होता, कूटस्थ चैतन्याचा खजिना सोडून या "मारा"ची चाकरी करतो.
5c4b27262d7f564fdbde362ea78cab55_0.jpg
याकरिता मन निर्विचार करून स्वतःला कोहंसोहं हा प्रश्न विचारला पाहिजे. मी तर म्हणेन तो पडला पाहिजे नाहीतर चिकीत्सक वृत्तीने त्याचा ध्यास घेतला पाहिजे. धर्मातला ईश्वर सापडणे महाकठीण पण अध्यात्मात तो कोहंसोहं विचारले की आलाच समजा! तुम्ही धार्मिक असलात तर तुम्हाला तात्पुरती प्रसन्नता आणि समाधान मिळेल पण अध्यात्मिक असलात तर तुम्हाला कूटस्थ चैतन्याची अंतरात जाणीव होईल. आणि ही जाणीव मुक्तीचे एक पाऊल उचलेल. कदाचित ह्या कारणासाठी सुद्धा तुम्हाला हे जीवन मिळालेले असेल.
मला जाणीव आहे की सद्ध्याचा काळ माहितीच्या , ज्ञानाच्या, वेगवेगळ्या भयाच्या भडीमाराचा काळ आहे. त्यामुळे आपल्याला विचारांचा अक्षरशः ' मेन्टल डायरीया' होतो. तिथे निर्विचार होणे अशक्य होऊन बसते. पण आपण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. स्वतःच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराकडे पहात रहायचे व हळूहळू मनाला निर्विचार अवस्था प्राप्त करून द्य्यायची. निर्विचार अवस्थेत रहाणे म्हणजेच निर्गुणाचे ध्यान करणे. चला तर मगं ध्यानाला लागू या !!
( हा लेख मी माऊलींच्या कृपेने लाभलेल्या अंतःप्रेरणेने व ऊर्मी ने लिहिला आहे. यात फक्त पुस्तकी माहिती नसून स्वानुभवाचा आविष्कार सुद्धा आहे. )
चित्रे आंतरजालावरून साभार. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख. रिलिजन आणि स्पिरिचुअलिटी एक नव्हेतच. रिलिजन म्हणजे मर्यादित अर्थाने बंदिश तर स्पिरिचुअलिटी रिहाईकडे नेणारी. रिलिजन जिस्मानी तर स्पिरिचुअलिटी रूहानी.
" माझ्याभोवती सागर l त्यासी आकाश टेकले l जाऊ पाहावे पोहून l माझे घर आड आले! " आत्म्याला ही देहकुटी धारण करणे भाग आहे. मग देहबुद्धी वरचष्मा गाजवते. मायेत गुंतवते. षड्रिपू गनिमी काव्याने मित्र होऊ पाहातात. स्वरूपापासून दूर नेतात. कळत असते पण वळत नाही. सुटावेसे वाटते. ही मुमुक्षा, ही कळणीव हळूहळू वाढवीत नेल्यावर एका टप्प्यावर वळण येतेच. दूर जाण्याचे वळण. चाकोरीतून सुटण्याचे वळण. मुमुक्षुपासून मुक्त पर्यंतचे वळण. रूढापासून, रुजल्या- रुजवल्या गेलेल्यापासून मुक्तता. रिहाई.
अंत:स्फूर्तीतून आलेल्या आपल्या लिखाणावर काही लिहायचे म्हणजे धाडसच. पण लेख वाचल्यावर लिहावेसे वाटते.

छान लेख. अजून लिहीत जा. मला पण कुन फाया कुन मधले ते कडवे आवडते. खुदसे हि रिहा होणे शक्य आहे. पण त्यासाठी गत आयुष्यातील चुकांची सर्व जबाबदारी घेउन . लौकिक नात्यांम ध्ये आवश्यक तिथे माफी मागून, संबंध संपवून निर्धाराने पुढे जावे लागते. स्वतःच कोणत्याही वैचारिक कुबड्या वापरायच्या नाहीत. जसे आहे तसे घडले तसे, केले तसे स्वीकारून पण मग ते ओझे डोक्यातून काढून कालौघाच्या किनारी ठेवून
पुढे मार्गक्रमण करायचे. एखादा मोठा हिमखंड कसा आपोआप तुटून विलग होतो तसे. संपूर्ण मुक्ती पण स्वीकारायला बरेच सोडून द्यावे लागते पण मग त्रास संपतोच.

छान लेख. अजून लिहीत जा. मला पण कुन फाया कुन मधले ते कडवे आवडते. खुदसे हि रिहा होणे शक्य आहे. पण त्यासाठी गत आयुष्यातील चुकांची सर्व जबाबदारी घेउन . लौकिक नात्यांम ध्ये आवश्यक तिथे माफी मागून, संबंध संपवून निर्धाराने पुढे जावे लागते. स्वतःच कोणत्याही वैचारिक कुबड्या वापरायच्या नाहीत. जसे आहे तसे घडले तसे, केले तसे स्वीकारून पण मग ते ओझे डोक्यातून काढून कालौघाच्या किनारी ठेवून
पुढे मार्गक्रमण करायचे. एखादा मोठा हिमखंड कसा आपोआप तुटून विलग होतो तसे. संपूर्ण मुक्ती पण स्वीकारायला बरेच सोडून द्यावे लागते पण मग त्रास संपतोच.

अमा, मस्त प्रतिसाद. हिमनगाची उपमा बेहद्द आवडली. Smooth silent separation. No pains of austerity, self torture. शमनदमनाचे आत्मक्लेश नाहीत. And then cruizing along till annihilation of self identity. स्वत्वाचा लय आणि विशाल, सर्वव्यापी परतत्त्वात विलीन होणे.
जितका सुंदर लेख तितकाच प्रतिसाद सुंदर

आदिश्री, खूप छान लेख. अन स्वानुभवातून असेल तर प्रणामच. हीरा, अमा प्रतिसाद ही सुरेख.
करणे अवघड, बोलणे सोपे. फिरून यत्न करून पाहा, हेच चालू राहाते माझ्या बाबतीत.

कदाचित अद्वैतामधुन आपण द्वैतात आलोही असू. अद्वैत म्हणजे काय याचा आपल्याला पुरेसा अनुभव नाही क्वचित आपण ग्लिम्प्स जरुर पाहीलेलआगेहे.असताना,अपरिमित तहान लागलेली असताना,जर थंडगार पाणी मिळाले तर जी शांती मिळते, सर्व चित्तवृत्ती त्या क्षणापुरता, अंतर्मुख होउन जातात, मन निर्विचार होते. पण हवे असलेले गवसल्याचा आनंद, क्षणभरच अनुभवता येतो. मग परत हे हवे, ते नको सुरु होते.

लेख फार आवडला. छानच लिहीला आहे.

हीरा, अमा, अवल ताई, मऊमाऊ, झम्पू दामले, वेडोबा, सामो, स्वाती2 खूप खूप आभार.
@हीरा लिहायचे म्हणजे धाडसच >>>कसले धाडस , मोकळेपणाने लिहा काय लिहायचे ते Happy . तुमचे प्रतिसाद नेहमीच सुंदर असतात.
@अमा हिमनगाची उपमा आवडली. माझ्यासाठी क्षमा मागणे सोपे क्षमा करण्यापेक्षा.... रागाचे baggage घेऊन ऐवरेस्ट चढण्याइतके अवघड आहे. पण प्रयत्न करीत आहे.
@मऊमाऊ प्रणाम काय, लाजवू नका Happy . अध्यात्मात कुणी लहान नाही कुणी मोठे नाही, सगळे सारखेच.
हा लेख मी वाचणारी व्यक्ती जर थोडी जरी अध्यात्मिक असेल तर तिला ध्यानाची प्रेरणा मिळावी, ऐवढ्याच कारणासाठी लिहीला आहे.
धन्यवाद पुन्हा एकदा Happy .

आदिश्री - https://wikischool.org/start
ओशोंची पुस्तके वाच. मस्त साईट आहे ही. खूप पुस्तके सापडतील.

The unreal beauty is imposed from outside, the real beauty arises from inside.
The name of real beauty is grace. When one is silent one starts radiating bliss.
Silence, bliss, freedom, truth, awareness -- all these are the dimensions of
inner beauty. And when they all explode you are transported into another
world, into something which you have never conceived before, into something
which you have never dreamt of before. Because we dream only about that
which we know, we cannot dream about the unknown. In fact the unknowable
is impossible to imagine and the inner world is absolutely unknown to us. And
the innermost core of it is unknowable too.
So start moving inwards. There is no need to go to Kaaba, no need to go to
Kailash, no need to visit Jerusalem; the only place worth visiting is your won
inner centre because it is there w

@Samo do you check the copyright demands of all the text and visual content before posting? There is a policy in place. Pl check with admin for more details.

सूफी रचना खरच सुरेख असतात.
अगदी सुफी पंथापासुन, ज्ञानेश्वरी ते बौद्ध धर्मातील निर्वाना पर्यंत फार अभ्यासपूर्वक लेख आहे हा.

पुन्हा पुन्हा जन्म घेण्याने आपण हळूहळू हेही विसरून गेलोय की आपण नक्की काय विसरलो.
- सुरेख वाक्य आहे, आणि अर्थ सुद्धा.

हिरा आणि अमा यांचे प्रतिसाद देखिल मार्मिक आहेत.

धन्यवाद सिद्धी आणि मन्या S....
@सिद्धी <<अगदी सुफी पंथापासुन, ज्ञानेश्वरी ते बौद्ध धर्मातील निर्वाना पर्यंत फार अभ्यासपूर्वक लेख आहे हा.>>हे असे काही ठरले नव्हते. आधी 'मारा' लेखाचा भाग नव्हता. बुद्धाचा आत्मबोधाचा भाग नेटफ्लिक्स वर पुन्हा पाहिला आणि मारा शिवाय हे अपूर्ण आहे असे वाटल्यामुळे "मारा"ला या लेखाचा भाग बनवले. धन्यवाद Happy .
@सामो ...चित्र optical illusion type super cool.
For me it means "you are a part of the universe and the universe is a part of you " . आभार Happy .

>>>>For me it means "you are a part of the universe and the universe is a part of you " . आभार Happy .>>>> अरे वा! मस्त अर्थ सांगीतलास.
मला जो अर्थ लागला तो - अनंत जन्म मरणांमधुन/योनींमधुन मिळालेला मानव जन्म व तोही आपण आपल्यातला गुंता सोडवु शकलो तर उपयोगाचा.

आदिश्री खूप छान शब्दबद्ध केलंय. पतंजली योगसूत्रात म्हणतात योग: चित्तवृत्ती निरोध: तदा द्रष्टास्वरूपेनवस्थानम | मनातील चित्तवृत्तींचा निरोध झाल्यावर तो द्रष्टा किंवा परमात्मा आपल्या स्वरूपात स्थित होतो. इतर वेळी मात्र वृत्तींसारूप्यम इतरत्र म्हणजेच मनात उठणाऱ्या चित्तवृतींमध्ये एकरूप होऊन जातो. ज्ञानेश्वर माउली म्हणतात मन नुरे जे का उरे ते तू का रे सेविसी ना. पण रोजच्या संसाराच्या रहाटगाड्यात मन न उरणे (मन निर्विचार होणे) अवघडच. खरं तर मी आहे ही जाणीव आपल्याला असते परंतु वृत्तींसारूप्यम इतरत्र प्रमाणे आपले मन सतत भटकत असते. प्रत्येकाला दिवसात असा एखादा क्षण येतो जेंव्हा मी आहे ही जाणीव स्थिर होते पण तो क्षण अगदी क्षणात विरून जातो त्यामुळे मनाचे अ-मन झाल्यावर जे उरते त्याचे सेवन काही होत नाही. ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी आपण पण माउलींप्रमाणे म्हणू शकू - आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनु | हरी पाहिला रे हरी पाहिला

खूप सुंदर प्रतिक्रिया कोहंसोहं, आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनु | हरी पाहिला रे हरी पाहिला >>> तो दिवस यावा यासाठी रोज प्रयत्नशील रहावे ऐवढे आपल्या हातात .
धन्यवाद Happy .