'एका मुलीची' गंमत

Submitted by Cuty on 19 December, 2019 - 08:25

छोटंसं टुमदार गाव ! अगदी खेडं नाही आणि शहर नाही. वेळ सायंकाळची. सोनेरीकेशरी प्रकाश सर्वत्र पसरलेला. गावातून जाणारा एकमेव मध्यवर्ती डांबरी रस्ता. लहान मुले शाळेतून उड्या मारत,पाठी दप्तर टाकून किलबिलत घरी जात आहेत. वर आकाशात कावळ्यांची देखील शाळा सुटली आहे. त्यांची विजेच्या तारेवर कावकाव चालली आहे. बगळ्यांच्या माळा शांतपणे उडत आहेत. रस्त्याच्या कडेने छोट्या झुडुपांवर चिमण्यांची चिवचिव सुरू आहे. एका कडेने शिस्तीत गायवासरे लगबगीने शेतातून घरी जात आहेत. त्यांच्या गळ्यातील घंटा वाजत आहेत. त्याचवेळी दूरवर देवळात घंटानाद होत आहे. कुठेतरी एखाद्या दुकानात रेडिओवर गाणे वाजत आहे, 'सांज ये गोकुळी .....'

वय वर्षे दहा :
आपण शहरात मामाच्या घरी रहायला जायचे का? कित्ती कित्ती मज्जा येईल! मी रोज मामाबरोबर गाडीवर बसून बाजारपेठेत फिरायला जाईन. मोठ्ठ्या ईमारती, मोठी दुकाने पाहीन.खेळणी घेईन.खूप धमाल येईल!

वय वर्षे तेरा :
आपले वडिल व्यवसायाऐवजी नोकरी करत असते तर! त्यांच्या मागे लागून शहरात बदली करायला लावली असती.मग एखादे मोठे घर,मोठी शाळा आणि नविन मैत्रिणी! वा! खरेच असे झाले तर?

वय वर्षे सोळा :
काय पण पुस्तकात अगदी छान वर्णन करतात गावाचे! वास्तव जीवनाचा अन त्याचा काही संबंध आहे का? ना कसल्या सुखसोयी ना संधी. कसली आली आहे डोंबलाची शांतता अन कसले समाधान!

वय वर्षे वीस :
जीव गुदमरतोय ईथे! एकदा डिग्री मिळाली की शहरातच नोकरी करायची. मग घरी सांगता येईल, 'शहरातलाच बघा म्हणून'! मग छान फॅशनेबल कपडे, चपला, मेकअप आणि नविन संसार! नविन जीवन!

वय वर्षे चोवीस :
आता कुठे जरा मोकळा श्वास घ्यायला मिळाला! बरे झाले, डिग्री मिळाल्याबरोबर शहरात येऊन, प्रसंगी पार्टटाईम जाॅब करत नविन, चांगला फुलटाईम जाॅब शोधला. आणि घरी स्पष्टच सांगितले, 'शहरातलाच हवा'.
खरेच, किती छान झाले. आता काय, छान माॅडर्न रहाणीमान आणि नविन संसार! नविन जीवन!

वय वर्षे अठ्ठावीस :
काय पण पेपरमध्ये वर्णन करतात अगदी शहराचे! वास्तव जीवनाचा अन त्याचा काही संबंध आहे का? ना कसली शांतता ना समाधान. कसल्या आल्या आहेत डोंबलाच्या सुखसोयी अन कसल्या संधी!

वय वर्षे बत्तीस :
आपला नवरा नोकरीऐवजी एखादा व्यवसाय करत असता तर! त्याच्या मागे लागून त्याला आपल्या गावीच व्यवसाय थाटायला लावला असता. मग एखादे छोटेसे घर, पुढे छोटीशी बाग आणि आपल्या सर्व जुन्या मैत्रिणी ! वा ! खरेच असे झाले तर?

वय वर्षे अडतीस :
एक मोठे शहर ! एक मोठी ईमारत ! वेळ सायंकाळची.सोनेरीकेशरी प्रकाश सर्वत्र पसरलेला. त्या ईमारतीच्या पेंटहाऊसच्या प्रशस्त बाल्कनीत ती काॅफीचे घुटके घेत उभी आहे. खाली रस्त्यावर वाहनांची वर्दळ, हाॅर्नचे आवाज, कामावरून घाईघाईत घरी चाललेलल्या दुचाकीस्वारांची गडबड!
अचानक तिच्या कमरेला दोन छोट्या हातांची मिठी पडते. ती दचकते तसा तो खिदळतो. तिचा मुलगा. वय वर्षे दहा ! तिला लाडाने बिलगतो, 'मम्मी... आपण गावी मामाच्या घरी रहायला जायचे का? कित्ती कित्ती मज्जा येईल! मी रोज मामाबरोबर गाडीवर बसून शेतात फिरायला जाईन. मोठ्ठा डोंगर, मोठे शेत पाहीन. फुलपाखरांना पकडेन. खूप धमाल येईल! ती पाहतच राहते! मग लगेच सावरून म्हणते, 'चल वेडा कुठला!' अन ती त्याला घेऊन घरात जाते. आत रेडिओवर गाण्याचे सूर ऐकू येतात, 'सांज ये गोकुळी ......'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन पण मुलीचं काय ;मुलं सुध्दा असाच विचार करत असतील रादर करतात माणूस कायम असमाधानी राहणार हेच खरं!

छान वर्णन पण मुलीचं काय ;मुलं सुध्दा असाच विचार करत >>> मला वाटतंय त्यांना देखील हेकच सांगायचं असावं..म्हणून तर शेवटी ते म्हणता त्यांचा मुलगा असतो....खरंच खूप छान आणि वास्तववादी लिहलय.

छान.

वय २८ आणि ३२ खरोखरच मनाच्या तळापासून कोणाला वाटत असेल का शंका आहे.
तसे बोलत असतात काहीजण. पण संधी मिळाली तर (किंवा मुद्दाम ठरवून) ते गावी परत जातीलच असं काही सांगता येत नाही.

छान लिहिलं आहे.
असं वाटतं खरं.
गावाकडे निसर्ग असेल, थोडे सुधारलेले गाव असेल, तरीदेखील शहरी माणूस किती रमेल ...शंकाच आहे

शहराला कंटाळून गावाकडे आपले जीवन आनंदमय आणि सुखमय करणारे देखील काहीजण पाहण्यात येतात. ती कला आणि मानसिकता मात्र जमायला हवी.

धन्यवाद, Diyu, दिपा अन जाई!
बर्याचदा, आपणाला नेमके काय हवे आहे, हेच लवकर लक्षात येत नाही. काय हवे आणि त्यासाठी काय तडजोड करावी लागेल हे ज्यांना समजते, ते आयुष्यभर तळमळत नाहीत. तर काहीजण 'समयके रहते ' चूक सुधारून योग्य निर्णय घेतातही!

छान लिहिलयं.
शहराला कंटाळून गावाकडे आपले जीवन आनंदमय आणि सुखमय करणारे देखील काहीजण पाहण्यात येतात. ती कला आणि मानसिकता मात्र जमायला हवी. >=+ ११

Pages