अस्तित्व

Submitted by सामो on 8 December, 2019 - 04:49

शर्वरीने स्वतः: अजून जवळून मृत्यू बघितला नसला, तरी अन्य जनांप्रमाणे, तिने दूरच्या नातलगांचे दूर जाणे जरूर अनुभवलेले होते. लहानपणापासूनच गूढांकडे ओढा असलेले तिचे मन, किती तरी वेळा विचार करत असे, माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते? आपण कुठे जातो, परत कसे येतो?

यावेळी मात्र ती फारच उद्विग्न झालेली होती. तिच्या बहिणीचा सानिकाचा नवरा अचानक अपघातात मृत्युमुखी पडला होता. सानिकाच्या तर दु:खायला पारावार नव्हता. अशा वेळी चौकशी करता करता शर्वरीला, मिसेस दलालांचा शोध, लागला होता. आतल्या एका विशिष्ठ गोटामध्ये या दलाला बाईंबद्दल बरीच कुजबुज होती. त्याना तंत्र-मंत्र येते, काही सिद्धी अवगत आहेत. त्या थोड्या विक्षिप्त आहेत, क्लायंट म्हणून तुम्हाला स्वीकारतील अथवा चेहरा पाहून, दारातूनच परत पाठवतील. फी अशी काही नाही, तुम्ही स्वेच्छेने द्यायला ते घेतील. एरवी शर्वरीने असल्या बातम्यांमकडे साफ दुर्लक्ष केले असते परंतु, नुकत्याच घडलेल्या या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे, शर्वरीचे मन अशा प्रकाराकडे साहजिकच ओढले गेले. आणि शर्वरीने फोन नंबर मिळवून, मिसेस दलालांची अपॉंटमेंट घेतली.

आज सकाळपासूनच तिचे मन हुरहुरत होते. दलाल तिच्या प्रशनांची उत्तरे देतील का, का दारातूनच परत पाठवतील, या गोष्टीचा विचार करकरून तिचे डोके दुखू लागले होते. जे होईल ते होईल, रामभरोसे म्हणून ती आवरू लागली. संध्याकाळी ५:३० ची भेटीची वेळा होती. बरोबर ५:३० च्या ठोक्याला, तिने दलालांच्या फ्लॅटची बेल वाजवली. दलालांनी दार उघडले व तिला आत यायची खुणा केली. पुढे, थोड्या औपचारिक गप्पा झाल्या. नक्की काय उद्देश्याने शर्वरी आलेली आहे, त्याची उत्तरे, एका प्रश्नावलीत भरून घेतली गेली. पुढे दलालांनी , शर्वरीला आतील एका बेडरूममध्ये येण्यास सांगितले.

जांभळ्या पातळ पडद्यामुळे, या खोलीत हवा तेवढा प्रकाश, व हवा तेवढा अंधार साधला गेलेला होता. आत भींतीला लागूनच एका देवघरात, दत्ताची शाडूची मूर्ती होती. पेण गावातील असावी, कारण अतिशय प्रसन्न मुद्रा, सुरेख केशरी वस्त्र, देखणी गाय, भोवती ४ कुत्रे अशी सुबक मूर्ती होती. समोर एक तेवणारी समई. एका मोठा सोफा व समोर एका खुर्ची-टेबल होते. दलाल, स्वतः: खुर्चीवर स्थानापन्न झाल्या व शर्वरी सोफ्यावरती. दलालांनी, शर्वरीला पुढे काय येणार आहे त्याची झलक सांगितली. तिने ३ प्रश्न विचारायचे होते.
प्र १ - मृत्युपरांत जागा आहे का? असल्यास कसे आहे?
दलाला बोलू लागल्या - माणूस जेवढे दिसते तेवढ्यावरती विश्वास ठेवतो. मृत्युपरांत काय होते याबद्दल अनभिज्ञ असतो. परंतु अनेक संतांच्या चरित्रात, या जगाची झलक, या जगाबद्दलचे अनुभव आढळतात. ते खोटे का? तर नाही. जशी ऊर्जा एका रूपांमधून अन्य रूपामध्ये रूपांतरित होते तद्वत माणूस हा एखाद्या खोलीमधून , दुसऱ्या खोलीत जावा, तसा सहज भूलोकातून पितृलोकात प्रवेश करतो.
पुढे दलालांनी खूप सविस्तर असे विवेचन केले. कि त्या जगात कोण भेटते, ती भेटलेली व्यक्ती/अनेक व्यक्ती कशाप्रकारे मृतात्म्याला मदत करते.

प्र २ - मृत्युपरांत आत्मा त्याच्या भूलोकातील आप्तेष्टाना मदत करू शकतो का? हानी पोचवू शकतो का?
यावरचे दलालांचे उत्तर मोठे रोचक होते. सहसा प्रेतात्मे, पितृलोकातून, मदत करू शकतातही आणि नाहीही. ते हानी पोचवू शकतात आणि नाहीही. ते संपूर्ण तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे वर्षश्राद्धाच्या (मृत्यूच्या महिना/तिथीनुसार) सुमारास तसेच पितृपक्षात, हे आत्मे आपल्या निकट येऊ शकतात. या आत्म्यांना तहान असते ती अन्न-पाण्याची. जरा श्राद्ध केले नाही तर ते उपद्रव देऊ शकतात पण तो उपद्रव कसा, तर annoying , फुटकळ आणि चिडचिड, कटकट स्वरूपाचा. या साऱ्या आत्म्यांना मानवाचे प्राण शरीर , सूक्ष्म शरीर दिसू शकते. ज्याला इंग्रजीत ऑरा म्हणतात. आणि जरा एखादा आत्मा क्षुद्रात्मा असेल, अथवा आपल्यावरती क्षुब्ध असेल, तर तो बरोबर या सूक्ष्म शरीरातील, काळज्या, चिंता , भीती हेरून आपल्याला फुटकळ धोका पोचवू शकतो. उदा आपण एकटे झोपलेले असतो आणि अचानकच भूतकाळातील, वाईट घटना आठवणे सुरु होते, कितीही झटका, मन शांत होता नाही. ती/त्या घटना मेंदू पोखरत राहातात, काळजी लागते. क्वचित भविष्यकाळाची अनाठायी काळजी वाटू लागते. जरी आधुनिक विज्ञान, सांगता असलं की मेंदूतील रासायनिक बदल हेच excessive काळजी-चिंता उत्पन्न करतात तरी काही विशिष्ठ काळातच या घटनांचा रेटा वाढलेला दिसतो. मग विज्ञान, सिझनला चेंजेस अर्थात ऋतूबदलामुळे मेंदूतील रसायनात होणारे बदल, असे कारण सांगते.
शर्वरी हे ऐकून सटपटल्यासारखी झाली .

प्र ३ - मग या साऱ्याचा प्रतिबंध कसा करायचा?
दलाल सांगू लागल्या - विज्ञानाचे जरूर एका. डॉक्टरला कन्सल्ट करा, त्याने सुचविलेली औषधे, व्हायटेमीन्स घ्या, पण मनाची कवाडे बंद करू नका. तुम्हाला येते आहे ती प्रचिती असू शकते. परलोकाची प्रचिती. आता हे त्रास थांबविण्याचे देखील काही फुलप्रूफ तोडगे आहेत, उपाय आहेत. (१) विष्णुसहस्रनाम (२) दत्तोपासना.
रामरक्षा, नामस्मरण, हे देखील जोडउपाय. दत्तोपासना हा कडक उपाय झाला, सर्वाना तो जमेलच याची शाश्वती नाही परंतु, मुख्य विष्णुसहस्रनामावर श्रद्धा ठेवा अथवा ठेऊ नका, तुम्ही जर विष्णुसहस्रनाम, म्हटलेत तर हमखास हे विचित्र त्रास थांबण्याचा अनुभव येतो. कारण औषधावरती श्रद्धा ठेवा अथवा ठेऊ नका, जसे औषध बरे करतेच अगदी तसेच.

थोड्या वेळाने असेच विवेचन सांगून झाल्यानंतर, मिसेस दलालानी शर्वरीचा निरोप घेतला. शर्वरीही मिळालेल्या या नवीनच अद्भुत माहितीचा उपयोग कसा करून घेता येईल, या विचारात, घराकडे परत निघाली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढे आहे का?
सानिकाच्या नवर्याचं काही विचारेल असं वाटलं होतं.
काही सांगायचं आहे तोडगा वैगेरे म्हणुन कथा रचल्यासारखी वाटतेय.

प्रवचन टाइप वाटले. असे आफ्टर लाइफ वगैरे नसते काही. पण असतो विश्वास लोकांचा. मेव्हणा गेला तर हिला का इतका सोस असा मला भोचक प्रश्न पडला. त्याची बायको बघेल ना काय ते.

जमली नाहीये. प्रवचनात्मक/तोडगा अशीच झालेली आहे.