'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का?

Submitted by हरचंद पालव on 28 November, 2019 - 02:37

सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यामुळे महाराजांबद्दल आदर आहे हे सांगायला लागायची किंवा त्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज निदान मराठी माणसास नसावी.

आता हे सर्व असताना नुकत्याच काही घडामोडींमुळे त्यांच्या नावाचे संबोधन चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन काम करत असलेल्या कौन बनेगा करोडपती कर्यक्रमात एकीकडे 'मुघल-सम्राट औरंगजेब' असा उल्लेख असताना त्याच खाली केवळ 'शिवाजी' हा उल्लेख करणं हे अपमानास्पद वाटते हे खरेच! त्याबद्दल त्यांचा निषेध. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी स्टँड-अलोन उल्लेख असेल तर 'शिवाजी' म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? असेल तर पुढे काही प्रश्न निर्माण होतातः

१. भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? ते ठरवणे व्यक्तिसापेक्ष असायला हवे ना?
२. लहानपणी 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळायचो, त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी असला तरी कधी अनादर वाटला नाही, किंबहुना तसे कधी डोक्यातही आले नाही. त्याचे काय?
३. शिवाजी महाराजांचा आदर सर्वांनी ठेवावा - ही जबरदस्ती आहे का? एखाद्याला नसेल वाटत, तर आपण तो आदर त्या/तिच्यावर लादावा का?
४. वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.
५. अनेक इतिहासकार इतिहास लिहिताना प्रत्येक व्यक्तिबद्दल केवळ एक ऐतिहासिक व्यक्ति म्हणून भावनिक न होतासुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सरदेसाई काय, किंवा गोविंद पानसरे काय - त्यांनी 'शिवाजी कोण होता' - असे एकेरी उल्लेख केले असले तरी फक्त त्या संबोधनावर न जाता त्यांनी उलट त्यांच्याबद्दल काय मोठे संशोधन समोर आणले आहे - ते योगदान जास्त महत्त्वाचे नाही काय?
६. मला आठवते की लहानपणी एका इतिहासप्रेमी (परंतु कर्माने केवळ गुंडगिरी करणार्‍या) माणसाने दटावले होते की 'महाराज आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्यांसाठी आदरस्थानी आहेत. त्यांना नुसते शिवाजी काय म्हणता? घरी वडिलांना पण अरे-तुरे करता का?' आता आम्ही कुणी अरे-तुरे करत नव्हतो हे खरे; पण आज-कालची मुले वडिलांना अरे-तुरे खरोखरच करतात, पण त्यामुळे कुठेही आदर कमी झाला आहे असे वाटत नाही. फक्त 'अहो जाहो' म्हटल्याने आदर दाखवला जातो आणि 'अरे-तुरे' केल्याने आदर राहत नाही - हे सरसकटीकरण नाही काय?

तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

काही वाटत नाही .
तुम्ही तुमच्या जन्म दात्या ला शेजारी अरे तुरे करतो म्हणून तुम्ही पण करा.
पण शेजारी आदराने आरे तुरे करत नाही तर तुमच्या बापाला तो आदरणीय व्यक्ती समजतच नाही म्हणून करतो.
आणि तुम्ही चुकीच्या विचारानं बळी पडला म्हणून करता

भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? > तुम्हाला त्यांच्या बद्दल प्रेम आहे ना, मग झालं तर. आणि ते अर्थातच इतिहास वाचून आलेलं असणार. बाकी गोष्टी सोडून द्या.

तुमच्या बिजागर्‍या परत गंजून खलास होणार इथे आता!!! >> हाहाहा! हो, म्हणजे मायबोलीवर इतर काही ठिकाणचे प्रतिसाद पाहिले तेव्हा मी जरा विचार करत होतो की हा विषय चर्चेला घेऊच नये. पण ह्यात निदान काही वैचारिक भूमिका घेऊन आलेले - दोन्ही बाजूचे प्रतिसाद माहीत व्हावेत म्हणून म्हटले की लिहूयात. त्यातून काही तरी चांगले मंथन होईल अशी अपेक्षा आहे. अगदी सुकृत सुतार नको भेटायला!! Happy

माझ्यासमोर कोणी एकेरी उल्लेख केला तर मी लगेच त्याला चुकीची जाणीव करून देते, त्याचा गळा मात्र पकडत नाही, तो माझा स्वभाव नाही, कोणी दुसर्यानेही असे करू नये असे मला वाटते. आणि मी बऱ्याच जणांचा आदराने उल्लेख करते, त्यात सावरकर, नेहरू, गांधीजीही येतात. ही सगळी माणसे खूप मोठी होती, विचारांनी, कर्मानी. त्यांचा एकेरी उल्लेख करण्याइतपत मोठे कर्तृत्व मी कमावू शकले नाही ही भावना यामागे आहे. पण आदराने उल्लेख कराच अशी जबरदस्ती करावी असे मला वाटत नाही, इथे प्रत्येकाची आदरस्थळे वेगळी असू शकतात.

पण जिथे औरंगजेबाचा मुघल सम्राट म्हणून उल्लेख होतो, जो तो होताच, त्याच जागी शिवाजीराजांचा उल्लेख फक्त शिवाजी म्हणून का केला जावा? तेही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व सम्राट होतेच. आणि केला तर तो (निदान) महाराष्ट्राने तरी का खपवून घ्यावा? मुद्दाम केला असे वाटायला नक्कीच वाव आहे. ज्याला औरंगाजेब माहीत आहे त्याला त्याचा प्रमुख शत्रू माहीत असणारच.

वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.>>>>>

चंद्रगुप्त, अशोक वगैरे मंडळी प्राचीन इतिहासाचा भाग आहेत, इतिहास शिकताना त्यांचा उल्लेख एकेरी केला गेला व तो तसाच डोक्यात राहिला. राजांचा इतिहास शिकताना त्यांचा उल्लेख आदरार्थी करून शिकवला गेला. राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, बाजीराव वगैरे एकेरी राहिले; टिळक, बोस, गांधी आदरार्थी राहिले. हे असे का झाले माहीत नाही.

शिवाजीराजांच्या आगेमागे महाराष्ट्राबाहेर अनेक वीर निर्माण झाले होते ज्यांचा इतिहास महाराष्ट्रात फारसा शिकवला गेलेला नाही, आज त्यांच्याबद्दल बोलताना मी एकेरी उल्लेख करेन जे त्या प्रांतातील माणसाला खटकेल. महाराष्ट्रातील इंग्रजीतून इतिहास शिकलेल्या मुलांना राजांचा उल्लेख एकेरी करताना पाहिलंय कारण ती तसेच शिकलीत.

एकेरी उल्लेख कोणीही , कधीही , कोणत्याही परिस्थितीत करू नये असा अट्टाहास ही बिनडोक जबरदस्ती आहे .

एकेरी उल्लेख कुठल्या परिस्थितीत म्हणजे साध्या संवादात की मोठ्या जनसमुदायासमोर चालू असलेल्या वीररसपूर्ण भाषणात की एखाद्या वृत्तपत्राच्या मथळ्यात / बातमीत की इतिहासाच्या पुस्तकात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती आहेत ... बोलणारे कोण आहेत , त्यांना काय भाव व्यक्त करायचा आहे , मुद्दाम अनादर व्यक्त करायचा आहे का की त्यांना शिवाजी महाराजांबद्दल - इतिहासाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने तसा उल्लेख होत आहे की महाराजांबद्दल आपल्यापेक्षा कितीतरी पट त्यांचं ज्ञान जास्त असून बोलण्याच्या भरात / त्यांच्या दृष्टीने दिसत असलेला इतिहास वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी तटस्थ एकेरी उल्लेख आहे .. अनेक गोष्टी ध्यानात घेऊन आदरार्थी उल्लेख करण्याचा आग्रह करायचा की नाही हे ठरवावं लागेल ...

पण सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून म्हणजे मालिका / बातमी / वर्तमानपत्र अशा सोर्सेस मधून अपमानाचा अनादराचा सूर जाणवला तर निषेध करणं मला बरोबर वाटतं . फक्त निषेधापूर्वी आपल्यापेक्षा अधिक जाणत्या - बुद्धिमान - लेव्हल हेडेड अशा 5 - 50 व्यक्तींची त्या उल्लेखाबाबतची मतं जाणून घ्यावीत की तुम्हाला हा उल्लेख अनादराचा वाटतो की नाही .. कारण एकट्याच्या नजरेतून गैरसमज होण्याची बऱ्याच वेळा शक्यता असते .... एकेरी - आदरार्थी ह्या एकाच विषयाच्या बाबतीत असं नाही ... अनेक घटनांच्या बाबतीत आपल्याला वाटतं तेच खरं हा अट्टाहास हानीकारक .. आपल्यापेक्षा जास्त कळत्या अशा चार लोकांची मतं घेणं केव्हाही फायद्याचंच ठरेल असं वाटतं ... निदान त्या गोष्टीचे वेगवेगळे पैलू लक्षात येऊन आपली मतं - ज्ञान - दृष्टिकोन पारखून घ्यायला मदत होते . मला सगळ्यातलं सगळं कळतं , मी म्हणतो तेच फक्त बरोबर आणि आणखी कोणाची मतं जाणून घेण्याची मला काही गरज नाही , माझी मतं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ अशा रिजीड स्वभावाच्या माणसांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार संकुचित राहतो .

राजा आई मित्र व देव यांचा उल्लेख हा साहित्य व व्याकरणानुसार एकेरीच असतो. यातील कोणीही अनादर असणारी व्यक्ती नाही. आमचे गावी रामाचे देउळ आहे. प्रभुरामचंद्रांचे मंदिर असे कुणी म्हणत नाहि.

एसवी रोड म्हणजे स्वामी विवेकानंद रोड.
सीएसएमटी किंवा सीएसटी म्हणजे तोच सिवाजी ज्याच्या नावे लेख पडलाय.
जिटीबी म्हणजे आपले गुरू तेग बहाद्दूर.
म्हणजे मान दिला जात नाहीच.

परिस्थितीत म्हणजे साध्या संवादात की मोठ्या जनसमुदायासमोर चालू असलेल्या वीररसपूर्ण भाषणात की एखाद्या वृत्तपत्राच्या मथळ्यात / बातमीत की इतिहासाच्या पुस्तकात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती आहेत ... बोलणारे कोण आहेत , त्यांना काय भाव व्यक्त करायचा आहे , मुद्दाम अनादर व्यक्त करायचा आहे का की त्यांना शिवाजी महाराजांबद्दल - इतिहासाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने तसा उल्लेख होत आहे की महाराजांबद्दल

हे एकदम बरोबर आहे.
काही लोक जाणूनबुजून एकेरी उल्लेख करतात त्यांचे थोपाड त्याच ठिकाणी फोडणे गरजेचं आहे

विनायक, केशव, माधव आणि नरू ही सुद्धा प्रेमाची नावे आहेत. मी तर प्रेमाने अटल्या म्हणतो. प्रेम महत्वाचे.
विन्याच्या चारीत्र्याने मी भारावून जातो..

माझ्या तोंडात शिवाजी महाराज असंच असतं नाव लहानपणापासून. छत्रपती लावलं जात नाही मात्र म्हणताना, लावायला हवं खरंतर.

भोंडल्याचं गाणं म्हणताना मात्र 'शिवाजी आमुचा राणा, किल्ला तो त्याचा तोरणा' असं म्हणते.

शरद केळकरने मागे एका पत्रकाराना दुरुस्त केलं होतं एकेरी उल्लेख केला हे बघितल्यावर, ते आवडलं होतं, योग्य वाटलं होतं.

नारायण ठोसराचा देखील मला प्रचंड अभिमान आहे. त्याने गोसावड्या बनल्यानंतर देवळं बांधली. मी तरी एकेरीच उल्लेख करतो बाबा. कुणी जबरदस्ती करत असेल तर !
सदाशिव वर सिनेमा निघतोय. त्यात पेशविणी चालवल्या तरी मला चालते. कारण माझे पेशव्यांवर मनापासून प्रेम आहे. काशीबाई नाचवली तरी मला चालले. जिथे प्रेम असतो तिथे एकेरी की आदरार्थी याचा प्रश्नच येत नाही.

रेल्वे तिकिट सिएसटी तीन मागताना कुणी कानाला हात लावत नाही. त्याच्या डोक्यात अमुक एक स्टेशन एवढेच असते.

>>सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे.
झालं तर मग... पुढे एव्हडे अख्खे पान कशाला खर्च घातले? फुकट आहे म्हणून किती ओरबाडायचं .. Proud

शिवबा हे संबोधन महाराष्ट्र पिढ्यानपिढ्या वापरत आलाच आहे की. कोणाला हे अपमानास्पद वाटते? त्यातून आपुलकीच दिसतेना. ग्यानबा-तुका असं म्हणतातच की लोक. आजकाल हे "एकेरी उल्लेख नको" वाले लईच डोक्यात जातात. शिवाजी विद्यापीठाचे नाव छ. शिवाजी महाराज विद्यापीठ असते तर ते कधीच सीएसेम विद्यापीठ झाले असते. एकेरी नावामुळेच ते शिवाजी विद्यापीठ आहे. पुणे विद्यापीठाचे नाव सावित्री विद्यापीठ ठेवलं असतं तरच ते नाव जिवंत राहिलं असतं.

गेल्या सत्तर ऐशी वर्षांत ही आदरार्थी संबोधने सुरू झाली. त्या आधी पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवा, माधवराव पेशवा,त्रिंबकजी डेंगळा, निझाम, अदिलशहा, कुतुबशहा, संताजी, धनाजी, महादजी, मल्हारराव, अहिल्याबाई असेच उल्लेख असत.
महाराणी ल. चौक, वीरमाता जिजाबाईसाठी वी जिजाबाई वगैरे लघुरूपे करावी लागतात त्याऐवजी सुटसुटीत नावे असावी असे वाटते. लोकल रेलगाड्यांच्या फलकावर छ शि ट असे बरे वाटत नाही. त्याऐवजी शिवाजी टर्मिनस सुटसुटीत वाटते..

गेल्या सत्तर ऐशी वर्षांत ही आदरार्थी संबोधने सुरू झाली. त्या आधी पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवा, माधवराव पेशवा,त्रिंबकजी डेंगळा, निझाम, अदिलशहा, कुतुबशहा, संताजी, धनाजी, महादजी, मल्हारराव, अहिल्याबाई असेच उल्लेख असत.
महाराणी ल. चौक, वीरमाता जिजाबाईसाठी वी जिजाबाई वगैरे लघुरूपे करावी लागतात त्याऐवजी सुटसुटीत नावे असावी असे वाटते. लोकल रेलगाड्यांच्या फलकावर छ शि ट असे बरे वाटत नाही. त्याऐवजी शिवाजी टर्मिनस सुटसुटीत वाटते..

माझ्या तोंडात शिवाजी महाराज असंच असतं नाव लहानपणापासून. छत्रपती लावलं जात नाही मात्र म्हणताना, >>>अगदी अगदी,माझ्या सुद्धा,माझी मोठी मुलगी सुद्धा त्यामुळे शिवाजी महाराज असेच म्हणते आणि हे माझ्या परवा लक्षात आले जेव्हा ती माझ्या छोटया 2yrs च्या मुलाला त्यांचा पुतळा दाखवत होती,कोणी काही म्हणो पण त्या दोघांचे ते शिवाजी महाराज असाच उल्लेख करणे कुठेतरी स्पर्शून गेले मला आणि खूप छान वाटले

'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का?
अजिबात नाही.
पण केबीसी मधे जो प्रश्न होता त्यात प्रताप च्या पुढे महाराणा, रणजित सिंह च्या पुढे महाराज, संगच्या पुढे राणा लिहिले होते, शिवाजी च्या मागेपुढे काहीच नाही. यातून काय अर्थबोध होतो ? की महाराणा, महाराज, राणा ही त्यांच्या आईवडीलांनी ठेवलेले पहिले नाव होते ? कोणी मार्गदर्शन करेल काय ?
वरील सगळी मंडळी मला वंदनीय आहेत आणी म्हणूनच मी त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे याची कृपया नोंद घेणे

पण त्या दोघांचे ते शिवाजी महाराज असाच उल्लेख करणे कुठेतरी स्पर्शून गेले मला आणि खूप छान वाटले >>> मस्त.

केबीसी च्या बाबतीत प्रश्नावर आक्षेप घेणं योग्य होतं, वर राजधर्म यांनी लिहीलं तसंच झालेलं. तिथे शिवाजी महाराज तरी हवं होतं. मी केबीसी बघत नाही पण ती बातमी टीव्हीवर बघितली तेव्हा मला खटकलं होतं नुसतं शिवाजी लिहीण. बाकीच्यांच्या नावांना योग्य आदर देताना शिवाजी महाराजांना पण द्यायला हवा होता. नाहीतर सगळ्यांचीच नुसती नावं हवी होती, पुढे मागे पदवी नको होती.

अधिकृत उल्लेखात आदराथीच असायला हवे. सोनीचा तो उल्लेख ही चूकच होती. त्या उत्तराकरता जे चार पर्याय होते त्यातील बाकी शासकांची नावे राणा/महाराणा अशा उपाध्यांनी लिहीताना चौथ्या पर्यायात फक्त "शिवाजी" हा उल्लेख खटकतो. ते चुकीचेच होते.

बाय द वे तो उल्लेख "एकेरी" नव्हता. मीडियामधे सर्वत्र तसे का आले माहीत नाही. एकेरी म्हणजे शिवाजीने, शिवाजीला वगैरे वापरणे. तो उल्लेख चुकीचा होता कारण इतर तिघांच्या उपाध्या - राणा, महाराणा- वापरलेल्या असताना शिवाजी नावामागे उपाधी वापरली नव्हती, म्हणून.

पण आम्ही लहानपाणापासून शिवाजी जे म्हणत आलो त्यात जी आपुलकी आहे ती प्रत्येक वेळेस फॉर्मल उल्लेखात हरवून जाते. तेव्हा उठ सूठ ज्याला त्या हे दटावणे माझ्याही डोक्यात जाते. उल्लेख आपुलकीने आहे की अपमानाच्या हेतूने वाक्यावरून, टोनवरून कळते. आपल्याकडे आजकाल एक "बघतोस काय मुजरा कर" छाप पब्लिक खूप जोरात आहे. नावापुढे राजे वगैरे लावणे असले प्रकार नव्याने खूप दिसू लागले आहेत. हे त्यातूनच निघाले असावे. हा ही एक फॅसिझमच आहे.

सर्वानी छत्रपती शिवाजी महाराज वगैरे म्हणावे असे वाटत नाही.पण शिवाजी, गांधी,तो मोदी,तो वाजपेयी, बाल ठाकरे,तो पवार असे कोणी उल्लेख केले तर ती व्यक्ती मनापासून डोक्यात जाते.
काही नावं,त्यांची कर्तृत्व,वयं अशी असतात की एकटं असलं, आजूबाजूला हटकायला कोणी नसलं तरी मनातही आदरार्थीच उल्लेख होतो.तसं न होणाऱ्यांचं, न्यूज चॅनल वर स्वतः एक फुटकळ निर्बुद्ध फटाकडी असताना इतक्या मोठ्या माणसांचा एकेरी उल्लेख करणं आश्चर्यकारक वाटतं.अश्या माणसांचे मनात दात पाडावे वाटतात.उद्या कोणी ते प्रत्यक्ष पाडले तर समर्थन नसले तरी विरोध नसेल.

काय माहीत पण मला लहानपणापासुन महाराजच म्हणावेसे वाटले, वाटते आणी मी म्हणते. आई वडिलांच्या बरोबरीने ज्यांच्या विषयी मनात अतोनात प्रेम आहे ते श्री स्वामी समर्थ, महाराज, अंबाबाई, श्रीराम आणी महादेव ( शिवशंकर ) यांना मग मी मनात येईल तसे संबोधते.

राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, बाजीराव वगैरे एकेरी राहिले; टिळक, बोस, गांधी आदरार्थी राहिले. हे असे का झाले माहीत नाही. >> मला वाटतं इतिहास लिहिला जाताना लेखकाशी समकालीन, किंवा एखाद-दोन पिढ्या जुनी, ऐतिहासिक व्यक्ती असेल तर तिला लेखक ढोबळ मानाने 'अहो जाहो' करत असावेत. आपण हयात असताना व्यक्ति हयात असेल तर ती वयाने मोठी असल्याचा हा परिणाम. पण ज्या व्यक्ती अनेक पिढ्यांपूर्वी होऊन गेल्या, त्यांच्या वयाशी तुलना आपसूक होत नाही. कारण केवळ भूतकाळ या न्यायाने त्या वयाने(?) मोठ्या मानू शकतो, पण त्यांच्या आयुष्याच्या ज्या भागांविषयी बोलत आहोत, त्यामध्ये त्यावेळी त्या लेखकाच्या सद्य वयापेक्षा लहान असू शकतील. म्हणजे 'फडताळ उघडलं, तर आत नारायण बसलेला' - हा रामदास स्वामींच्या लहानपणीचा किस्सा एकेरीच येतो आणि त्यात काही वावगे वाटत नाही. संतांचे उल्लेख मात्र सहसा आदरार्थी अनेकवचनात दिसतात. 'ज्ञानोबा माऊली' - सारखा अपवाद असेल, परंतु भक्तिमार्गात गुरूविषयी प्रेम हे अविभाज्य भाग असल्यामुळे तो एक वेगळाच विषय आहे.

कदाचित ज्या व्यक्तिंविषयी इतिहासलेखक तटस्थपणे लिहितो आणि आपण ते तसेच वाचतो, त्यातील सर्व ऐतिहासिक व्यक्ति केवळ 'व्यक्ति' म्हणून येतात, तिथे ओढून ताणून आदरार्थी उपाधी लावली जात नाही.

शिवबा हे संबोधन महाराष्ट्र पिढ्यानपिढ्या वापरत आलाच आहे की. कोणाला हे अपमानास्पद वाटते? त्यातून आपुलकीच दिसतेना. ग्यानबा-तुका असं म्हणतातच की लोक. >> हे पटलं.

की शासकांची नावे राणा/महाराणा अशा उपाध्यांनी लिहीताना चौथ्या पर्यायात फक्त "शिवाजी" हा उल्लेख खटकतो. ते चुकीचेच होते. >> हो, माझाही तोच मुद्दा आहे. माझ्या मते 'इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे'.

तेव्हा उठ सूठ ज्याला त्या हे दटावणे माझ्याही डोक्यात जाते. उल्लेख आपुलकीने आहे की अपमानाच्या हेतूने वाक्यावरून, टोनवरून कळते. आपल्याकडे आजकाल एक "बघतोस काय मुजरा कर" छाप पब्लिक खूप जोरात आहे. >> अगदी अगदी!

पण शिवाजी, गांधी,तो मोदी,तो वाजपेयी, बाल ठाकरे,तो पवार असे कोणी उल्लेख केले तर ती व्यक्ती मनापासून डोक्यात जाते. >> हे उल्लेख हेटाळणीच्या उद्देशाने नसतील तरीसुद्धा डोक्यात जातात का? मग माझा मुद्दा पुन्हा लागू होतो, की असे फक्त ह्या ठराविकच लोकांच्या बाबतीत का व्हावे? तो चंद्रगुप्त, तो अशोक - हे का चालते? (माझ्या मते ते चालायला हरकत नाही, पण मग हे ही चालायला हरकत नसावी - जर मुद्दाम अपमान करण्यासाठी कुणी तसे करत नसेल तर. आता हेतू काय हे शोधून काढणारे पोलिस लोक स्वतःच बनू नयेत म्हणजे झालं).

Pages