माणसं बदलत राहतात.. तुम्ही काय किती बदलला आहात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 November, 2019 - 06:21

कॉलेजातला जुना मित्र आपल्याला अचानक बाजारपेठेत दिसतो. शर्ट पॅन्ट ईन खोचून. बायकोचा हात धरून. कडेवर पोरगा. खांद्यावर पिशव्या. आणि आपल्याला प्रश्न पडतो सतरा पोरींच्या भानगडी करणारा आणि त्यातल्या चारचौघींच्या कानाखाली खाणारा परश्या हाच का? पण आता त्याचा परशुराम झाला असतो जे त्याला ईतक्या वर्षांनी पाहिलेल्या आपल्या पचनी पडत नाही.
असंच मग एखादा शिवीगाळ शिवाय एकही पुर्ण वाक्य न बोलणारा पक्या आता रोज टिळा लाऊन सत्संगच्या नादी लागलेला दिसतो. तर एखादा आधीचा गूडबॉय चंदन आता दारूशिवाय आपल्याला जमतच नाही असा झाला असतो.
शाळेतली एखादी काकूबाई नम्रता आता फेसबूक आणि ईन्स्टावर आपले जीव जळवणारे फोटो टाकत असते. तर एकेकाळची रोज क्वीन मात्र सुटलेल्या अंगाची पर्वा न करता आपल्या चिल्यापिल्यांसह मिरवत असते.

माणसाचा स्वभाव बदलत नाही असे म्हणतात. ते खरेही असेल. पण त्याचे विचार, त्याची जीवनशैली, त्याच्या सवयी, त्याच्या आवडीनिवडी. त्याचे बारीकसारीक छंद आमूलाग्र बदलू शकतात. नव्हे बदलतातच. तरच ते जिवंतपणाचे लक्षण समजावे.

आपल्या स्वत:मधील काळाच्या ओघात झालेले असेच बदल टिपूया आणि ईथे लिहून स्वत:लाच चकित करूया.

सुरुवात मी आठवेल तसे करतो...

एक चित्रपटांचे वेड होते. जेव्हा दक्षिण मुंबईत केबल टीव्हीची सुरुवात झाली, ३० रुपयात महिन्याला ४० चित्रपट बघा अशी जाहीरात असायची. तेव्हा आईच्या कुशीत लोळत चाळीसच्या चाळीस चित्रपट बघितले जायचे. शनिवारी आणि रविवारी नवीन प्रदर्शित चित्रपट लागायचे ते कोणते लावणार हे आधीच केबलवाल्याला विचारून त्यानुसार विकेंड प्लान केले जायचे. अमिताभचा हम चित्रपट बघायला अशीच एक फॅमिली पिकनिक ऐनवेळी कॅन्सल केल्याची आठवण अजूनही घरचे सांगतात. आणि मग तेव्हा तो अपेक्षेला उतरला नव्हता तरीही ती खंत कोणाच्या बोलण्यात जाणवत नाही यामागेही चित्रपटप्रेमच.

पुढे ईतके चॅनेल ईतके चित्रपट झाले की एकाच वेळी दहाबारा चॅनेलवर चित्रपट चालू असायचे. मी आणि आई रिमोटचा ताबा घ्यायचो. चॅनेल सर्फ करायचो आणि कोणता बघायचा हे ठरवायचो. वर्षाला साधारण ५०० चित्रपट बघितले जायचे. एक काळ मग असा आला की सगळे चॅनेल सर्फ करूनही हा पाहिलाय, हाही पाहिलाय, असा जप करून अखेर मग पाहिलेल्यांपैकीच एखादा पुन्हा बघितला जायचा.
आईच्या कृपेने देवानंद, शमी कपूर, ऐन तारुण्यातला देखणा धर्मेंद्र यांचे बरेच चित्रपट बघितले गेले. नाहीतर गाडी अमिताभपलीकडे हलली नसती.
पुढे सुदैवाने मी आणि आई दोघांनाही शाहरूख खान आवडू लागल्याने त्याच्या अश्लीलता वा वाह्यातपणा नसलेल्या कैक कौटुंबिक प्रेमपटांची पारायणे घडू लागली. त्याचा "कभी खुशी कभी गम" हा आमच्या घरातील सुर्यवंशम आहे. चॅनेल सर्फ करताना सापडतो तेव्हा किमान पाऊणेक तास बघूनच पुढच्या चॅनेलकडे वळले जाते.

असो, तर एकेकाळी जेव्हा आजूबाजूचे जग एकता कपूरच्या डेलीसोपमध्ये रममाण होते, वा गेला बाजार खिचडी, साराभाई बघत होते तेव्हाही आमच्याकडे चित्रपट एके चित्रपटच चालायचे.
पण मग पुढे आईने सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली. मराठी मालिका बघायला सुरुवात केली. मी सुद्धा ईंजिनिअरींग आणि जॉबमध्ये रममाण झालो ते चित्रपट बघायचे बंद झाले ते झालेच.
एकेकाळी वर्षाला ५०० चित्रपट बघणारी आम्हा मायलेकरांची जोडी. गेल्या सात वर्षात मी मोजून पंधरा चित्रपट बघितले असावेत. आईने कदाचित पाचही नाहीत.
चित्रपट बघायला जो सलग अडीच तासांचा वेळ द्यावा लागतो तो आता नकोसा वाटतो. त्यामुळे या पंधरातील बहुतेक चित्रपट थिएटरातच जाऊन बघायचा योग आला. मराठी प्रेमामुळे दुनियादारी, मुंबईपुणेमुंबई, सैराट, फास्टर फेणे बघितले गेले. तर शाहरूखप्रेमामुळे चेन्नई एक्स्प्रेस, फॅन, रईस, डिअर जिंदगी बघितले गेले.
आज हाताशी यूट्यूब आहे, मायबोलीसारख्या संकेतस्थळावर अकाऊंट आहे त्यामुळे ट्रेलर बघणे, परीक्षणे वाचने, न पाहिलेल्या चित्रपटांवरही जीव तोडून चर्चा करणे हे प्रकार सुटले नाहीत हेच काय ते माझे उरलेसुरले शिल्लक चित्रपटप्रेम Happy

२) एक चित्रपटप्रेम असते तर दुसरे क्रिकेटप्रेम. दोन्ही सिद्ध केलेत तर तुम्हाला भारतीय असल्याचे सिद्ध करायला वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही असे म्हणतात.
जेव्हा मी वर्षाला पाचशे चित्रपट बघायचो तेव्हाही क्रिकेट मॅचचा एकही चेंडू मिस करायचो नाही. तो अपराध समजला जायचा. मग त्यासाठी ऑस्ट्रेलियन वेळेनुसार सकाळी साडेपाचला उठले जायचे किंवा वेस्ट ईंडिज हा आपल्या शेजारचाच देश असल्यासारखे रात्री ३ वाजेपर्यंत जागले जायचे. सामन्यांचे वेळापत्रक हाती लागताच कालनिर्णय भरून जायचे. मला तर क्रिकेटच्या आकड्यांचे वेड ईतके होते की आवडते खेळाडू सचिन दादा द्रविड यांची वैयक्तिक आकडेवारी माझ्या वहीत लिहिलेली असायची आणि प्रत्येक सामन्यानंतर मी ते आकडे अपडेट करायचो. आता जे नेटवर चुटकीसरशी मिळते ते तेव्हा माझ्या वहीत सापडायचे.

ते निवृत्त व्हायची वेळ आली आणि फार टेंशन येऊ लागले. यांच्यानंतर क्रिकेट बघावेसे वाटेल का हा प्रश्न पडू लागला. क्रिकेट बघणेच नाही तर पुढे आपल्या आयुष्यात छंद काय उरणार याची चिंता भेडसावू लागली. माझे आजोबा होते क्रिकेटवेडे. नव्वदीतही दिसायचे स्पष्ट पण ऐकू कमी यायचे. आजी मोठ्याने टीव्ही लाऊ द्यायची नाही. मग मी कॉमेण्टरी सांगायचो अधूनमधून. मी स्वत:चेही म्हातारपण आजोबांसारखेच बघत होतो. पण आता नाही. काळ बदलला, क्रिकेट बदलले, आवड बदलली. एकेकाळी झिम्बाब्वे केनिया सामनाही मी सोडायचो नाही पण आज फक्त भारताच्याच महत्वाच्या मॅचेस देखील एवढ्यासाठीच बघितल्या जातात की व्हॉट्सपग्रूपवर तावातावाने वाद घालता येईल. पण त्या मॅचेस बघायला आपले ईतर रुटीन बदलायचा विचार मनालाही शिवत नाही.

३) थंडा बोले तो कोकाकोला च्या जमान्यात मी कोक, पेप्सी आणि थम्स अप हे पाण्याच्या समप्रमाणात प्यायचो. रोज दिवसातून किमान दोन वेळा साधारण वा किमान ३०० मिली प्रत्येक वेळी. म्हणजे एवरेज काढायचा झाल्यास दिवसाला पाऊण लीटर वा महिन्याला २० ते २५ लीटर फसफसणारे पेय माझ्या शरीरात फेरफटका मारून बाहेर पडायचे.
शाळेला दहावीत छान पॉकेटमनी मिळू लागला. कॉलेजातही कंटिन्यू राहिला. त्यात हे रोजच्या रोज परवडायचे. तसेच घरीही दोन दोन लीटरच्या बाटल्या फ्रिजमध्ये पडून असायच्या.
रोज संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर हातात प्रेयसीचा हात पकडावे तसे पेप्सीचा ग्लास पकडून घराकडे निघायचो. रोज रात्री दारू प्यावे तसे कोकसोबत चकली फरसाण सोबत घेऊन बसायचो. या फिक्स रुटीनच्या अध्येमध्ये व्हायचे ते वेगळेच.

आणि मग क्धीतरी हे सारे मोहमाया असल्याचा साक्षात्कार झाला. आणि प्रमाण कमी झाले. ते कमी झालेले प्रमाण वर्षाला २५०-३०० लीटरवरून एक लीटरला आले. एखाद्या ओल्या पार्टीत अगदीच राहावले नाही तर एखादा ग्लास हातात. त्यातही आनंदाने सांगावेसे वाटते की गेल्या दिड दोन वर्षात हा मोह एकदाही झाला नाही. थोडक्यात ही आवड हे व्यसन सुटल्यातच जमा आहे.

४) शिवीगाळ हिच आपली संस्कृती, शिव्या हिच कुठल्याही भाषेची खरी संपत्ती, शिव्या दिल्याने मनाच्या आत साचलेल्या घाणीचा निचरा होतो आणि हलके वाटते. ईत्यादी गोष्टींवर माझा एकेकाळी फार विश्वास होता. वाक्यात किमान एक वा अनेक विरामचिन्हे असावीतच त्या शिवाय वाक्य अर्थपुर्ण होत नाही वा आपल्याला काय म्हणायचे आहे ते समोरच्यापर्यंत परीणामकारक पोहोचवता येत नाही हे मी शिव्यांबाबतही समजायचो.
पण जॉबला लागलो म्हणा, मॅच्युरटी आली म्हणा, गर्लफ्रेण्डला चालणारे नव्हते की आणखी काही, पण शिवी सुटली ती सुटलीच. आज लंचटेबलवर दहा बायकांत एकटा पोरगा असून सहजपणे गप्पा मारत बसू शकतो. कारण तोंडातून अपशब्दाचा भ बाहेर पडणार नाही याची असलेली खात्री. गंमत म्हणजे मी एकेकाळी भ चे भंडार होतो हे त्यांना मी स्वत: सांगूनही पटत नाही ईतकी ईमेज पालटली आहे.

५) ..... आठवेल तशी भर टाकली जाईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी फारच वाचन करायचे काहीही चालायचं पेपर, मासिके अन् पुस्तक तर संपल्याशिवाय सोडायचं नाही. आता इतका वेळ मिळत नाही पण मिळाला तरी वाचायची इच्छा होत नाही.
तसेच खूप विचार करायचे पूर्वी इतरां बद्दल आणि चिडचिड करायचे पण आता जजमेंटल होणं बंद केले आणि शांत वाटतं आता खरंच.

Men marry women with the hope they will never change. Women marry men with the hope they will change. Invariably they are both disappointed.

मला कॉलेज जमान्यापासून कपड्यांची फार आवड. जॉबला लागल्यावर तर पहिले काही वर्षे नुसते कपडे कपडे आणि कपडेच घ्यायचो. घरचे म्हणायचे तुझा पगार हवा तसा खर्च कर.
पण पुढे आवडी वा प्रायोरीटी बदलल्या म्हणा किंवा कमावलेल्या पैश्याची जाण आली म्हणा किंवा आणखी काही. आता वर्षाला फक्त दोन जोडी कपडे घेणे होतात. एक वाढदिवसाला, एक दिवाळीला.

Pages