युगांतर - आरंभ अंताचा भाग 39

Submitted by मी मधुरा on 29 August, 2019 - 08:38

गडद निळ्या रंगाने सजून कृष्णमय झालेल्या पहाटेने सृष्टीला हलका दवांचा मारा करत जागे केले. पक्षांची किलबिल सुरू झाली तशी साऱ्या नगराला जाग आली. द्वारकेच्या महालातील कृष्णाचा कक्ष कर्णमधुर सुरांनी व्यापलेला होता.

पूर्वेचे सुर्यकिरण कक्षभर पसरतील अश्या विशाल खिडकीत निळा-जांभळा मयुर पिसारा फुलवून बासरी ऐकत होता. पहाटेच्या गारव्याने थरथरणारा फुललेला पिसारा ! कृष्ण डोळे मिटून बासरी वाजवण्यात मग्न होता. आज त्याचे सूर काही वेगळेच होते.

"अनुज!"
कृष्णाने डोळे उघडत बासरी बाजूला केली.

"दाऊ? काय झालं?" बलरामाच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत कृष्णाने विचारलं.

"वार्ता आहे...." दु:खी चेहऱ्याने बलराम म्हणाला, "कुंती आत्या.... आणि पांडव वारणावत मधल्या लाक्षागृहात होते.... आणि.... लाक्षागृहाला आग लागली अचानक. पंडू परिवाराचे देहावसान झाले."

त्याने वार्ता सांगून कृष्णाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित अजूनही अखंडित होते.

"अनुज? तू ऐकलंस ना मी काय सांगितले ते?"
"हो, दाऊ."
"मग? तुला दु: ख नाही झालं?"
"झालंय ना दाऊ!"
"तुझ्या चेहऱ्यावरून वाटतं नाही पण तसं! या वार्तेने अचंबाही जाणवला नाही तुझ्या चेहऱ्यावर!"

"दु:ख तर मला हस्तिनापुरबद्दल वाटतेच आहे, दाऊ. पण घृणाही वाटते आहे क्रूरतेची पातळी ओलांडणाऱ्यांबद्दल. आणि दाऊ, क्रूरता काही आपल्याकरता नवीन नाही. आमच्या कंस मामांच्या कृत्यांकडे पाहिल्यावर बाकी कुणाच्या कुठल्या कर्माचे नवल वाटेलच कसे?"

"तुला कळलंय ना की तू आत्ता जे बोल्लायंस ते मला अजिबात कळलेलं नाहीये?"

स्मित करत कृष्णाने होकारार्थी मान डोलावली, "दाऊ, मी खूप ऐकून आहे पांडवांबद्दल. त्यांच्या सामर्थ्याबद्दल, बुद्धी बद्दल आणि चांगल्या वृत्ती बद्दलही. मी तर ऐकलंय की ते देवपुत्र आहेत. तुम्हाला वाटत, की कोणी कट-कारस्थान करून अशी त्यांची हत्या करू शकेल?"

'कट-कारस्थान?' बलरामाने हाताची घडी घालून कृष्णाकडे नजर रोखली. कृष्णाच्या नजरेला नजर भिडवत त्याने शब्दांवर जोर देत विचारले, "अनुज, तुला नक्की काय काय माहित आहे?"
"हेच दाऊ, की ही आग आपोआप लागलेली नव्हती."
"काय? म्हणजे? म्हणजे..... ही हत्या होती?"
"नाही दाऊ."
"मग?" बलराम गोंधळला.
"हा हत्येचा प्रयत्न होता."
"अनुज, म्हणजे ते जिवंत आहेत?"
"हो दाऊ. मला खात्री आहे, की यमराजही त्यांना नियतीच्या परवानगी शिवाय घेऊन जाऊ शकणार नाहीत."
बलराम विचारात पडला.
कृष्ण काही बोलणार तितक्यात बलराम म्हणला, "हे बघ अनुज, तुझा जेष्ठ भ्राता आहे मी. सरळ सरळ उत्तर दे मला. फिरवत बसू नको मला शब्दांच्या जंगलात. मला सांग, तू गुप्तचर पाठवले होतेस कुरुसाम्राज्यात?"

कृष्ण हसला. "तसंच समजा दाऊ."
"मग काय सांगितले तुला त्यांनी?"
"हेच की काही जणांना मुगुट आणि राजगादी, नात्यांपेक्षाही जास्त महत्वाची वाटते. अधिकार, जेष्ठत्व, स्नेह.... कशा-कशाची तमा न बाळगता अधर्म करायला भाग पाडणारा माणसाचा अहंकार एकदा का त्याच्यामाथी मुगुटासारखा बसला की अहंकारच त्या व्यक्तीला नियंत्रित करायला लागतो."
"हे तुझं सरळ सरळ उत्तर होत?" बलरामाचा तिखट चेहरा पाहून कृष्णाला हसू आले. कृष्णाने बासरी हातात घेतली. आणि पुन्हा त्या सुरांनी वातावरण धुंद झालं.
बलराम त्या सुरांनी शांत होत होता. पण प्रश्न अजूनही त्याला सतावत होते.
'नक्की काय म्हणाला हा? पांडवांच्या जीवावर कोणीतरी उठलंय? पण का? हस्तिनापुरनरेशचे पुत्र तर नसतील? मग तसचं असेल तर कुंती आत्याला मारण्याचा प्रयत्न का करतील? नाही, नाही ते नसतील. दुर्योधनाला आणि दु:शासनाला तितकी अक्कलच नाही. मग कोण? गांधार नरेश? तो करू शकेल असं? कदाचित हो, कदाचित नाही. त्यांची आजवर ऐकलेली ख्याती खरी असेल?
कान्हा म्हणाला तसे पांडव खरंच जिवंत असतील? तसा कान्हा आपल्याशी खोटं बोलणार नाही. मग जिवंत असतील तर पांडव अजून हस्तिनापुरास का परतले नाहीत? त्यांनाही ती आग कुणाचे कारस्थान असल्याचे कळले असेल? ते भूमिगत होऊन राहिले असतील का? कुठे असतील? सुरक्षित तर असतील ना? कान्हाचे गुप्तचर आहेत तिथे म्हटल्यावर ते ही काळजी घेतीलच पांडवांची ! '
कृष्णाची बासरी तारसप्तकातले सूर मनात भिनवत होती. खिडकीतल्या मोराने थोडा उडायचा प्रयत्न केला आणि स्वतः भोवती गिरकी घेतली. त्याचा फुललेला मनमोहक डोलारा पाहत डोळ्याचे पारणे फिटले आणि बलराम कृष्णाची बासरी ऐकण्यात तल्लीन झाला.
____________
भीष्मांनी बाण प्रत्यंचेवर ताणला आणि तो सोडणार इतक्यात तिथे विदूर, गुरुद्रोण आणि कृपाचार्य आले.
"थांबा महामहीम. काय करता आहात तुम्ही?"
"मी आज या संपूर्ण सृष्टीला संपवणार आहे, गुरु द्रोण."
मोठा भारदस्त आवाज, लाल झालेले डोळे, रागाने कापणारे बाहू आणि हातातल्या धनुष्याची मजबूत पकड पाहून कोणीही घाबरेल.
"गुरु द्रोण, त्यांच्या हातात ब्रह्मास्त्र आहे." कृपाचार्य द्रोणांना खुणवत दबक्या आवाजात म्हणाले.
द्रोणाचार्य बघत राहिले. इतके क्रोधित झालेले भीष्मांना त्यांनी या आधी कधी पाहिले नव्हते.

भीष्मांनी खुद्द सुर्यदेवांना बाणाचे लक्ष बनवले होते. आकाशमालेचे केंद्रस्थान रिक्त करून मनाची जखम भरून काढणार होते ते!

विचारानेच तिघांना घाम फुटला.
"महामहीम, थांबा. मी विनंती करतो तुम्हाला, असे करू नका." गुरु द्रोण म्हणाले.
"नाही आचार्य. आज मधे पडू नका. आज माझ्या सहनशक्तीच्या साऱ्या सीमारेषा ओलांडल्या आहेत दैवाने. बास झालं. यावर नाही सहन करू शकत. आता मी काहीच शिल्लक ठेवणार नाही ज्याच्याशी दैव खेळू शकेल." भीष्मांनी बाणावरचा ताण वाढवला.

"महामहीम, थांबा. पांडव आणि कुंती बद्दल आम्हालाही दु:ख आहे. पण त्याचा प्रतिशोध म्हणून संपूर्ण सृष्टीतील जीवांचे हाल करणार आहात तुम्ही?" कृपाचार्य म्हणाले तसा भीष्मांच्या चेहऱ्यावर श्वास कोंडल्याची वेदना पसरली.

"मग निदान मला इच्छामृत्यूची परवानगी मिळवून द्या कृपाचार्य. मला नाही जगायचं." भीष्मांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. धनुष्य खाली ठेवत त्यांनी खांबाचा आधार घेतला आणि पाठ टेकवून रागारागाने अश्रू गाळत राहिले.

"कृपाचार्य, आजवर मी खूप काही सहन केलय. पिताश्रींचा मृत्यू, पुत्रसमान असलेल्या बंधु चित्रसेन आणि विचित्रवीर्याचा मृत्यू, माताश्रींचा विरह, पंडुचा मृत्यू.... मी किती जणांना गमावलंय आचार्य! एकाकी पणा सहन केलाय. कुणाचे शाप, कुणाचे कडवे बोल, कुणाचा रुष्टपणा....सारं सहन केलयं! पंडुच्या मृत्यूनंतर राजमाता सत्यवती अंबिका-अंबालिकेसोबत वानप्रस्थाश्रमाला निघून गेल्या हस्तिनापुर सोडून आणि परत त्यांच्या मृत्यूची वार्ता आली केवळ! हे ही सहन केलयं मी, कुलगुरू. पण आता माझ्या नातवांनाही तोडून काढले माझ्यापासून? किती सहन करायचं आचार्य? कुठे कमी पडलो मी पुण्यसंचय करायला?
काही झालं की 'पितामहं-पितामहं' करत कक्षात धावत येणारा अर्जुन आता हयातच नाही, हे कसं मान्य करू मी? नाही.... नाही.... तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि इच्छा मृत्यूची परवानगी घेऊन या! नाहीतर मी सर्वकाही संपवेन."

द्रोणाचार्य आणि कृपाचार्य घाबरून तसेच उभे राहिले. भीष्म काहीही समजवण्याच्या अवस्थेत नव्हते. विदूर ने दोघांना कुजबुजत्या आवाजात सांगितले, "आचार्य, कुलगुरू, तुम्ही दोघे जाऊन विश्राम करा. मी समजावतो त्यांना."

"पण काळजी घे विदुर. ते आत्ता भावविवष आहेत. या अवस्थेत त्यांच्या हातून खरेचं काही अघटित घडायला नको." कृपाचार्य म्हणाले आणि दोघे निघून गेले.

"महामहीम, शांत व्हा." विदूर शांतपणे म्हणाला तसे भीष्म त्याच्याकडे बघू लागले, "बसा तुम्ही. मला बोलायचे आहे तुमच्याशी."
"काय बोलायचे आहे आता, विदुर? काय उरले आहे ज्यावर बोलायचे आहे? सगळच तर संपलय."
त्याने भीष्मांना आसनावर बसवले.

"तेच सांगायचे आहे महामहीम. काहीच संपलेले नाहीये."
"म्हणजे?"

"म्हणजे पांडव सुरक्षित आहेत."
"काय?" भीष्मांचा चेहरा आनंदला, "कुठे आहेत? कसे आहेत? कसं.... काय....विदुर...?"

"हो.... सांगतो. महामहिम, लाक्षागृहाला आग लागणार हे मला आधीच कळालं होतं."
"काय? कसं? कोणाकडून? आणि मला आत्ता सांगतो आहेस तू हे?" भीष्मांच्या चेहऱ्यावर असलेले मोठे प्रश्नचिंन्ह विदुराने पाहिले.
"तुम्ही सहजासहजी विश्वास ठेवाल असं नव्हत ते वृत्त!"
"म्हणजे?"
"महामहीम, गांधारनरेशच्या माणसांनीच लाक्षागृह पेटवले होते."
"काय बोलतो आहेस तू विदुर?"
"सत्य आहे तेच सांगतो आहे. शकुनी आणि दुर्योधनाचे लाक्षागृहाला आग लावण्याबद्दलचे संवाद स्वतःच्या कानांनी ऐकले आहेत माझ्या गुप्तचराने. आणि महामहीम, तुमच्या चेहऱ्यावर हा जो अविश्वास आहे, तोच कारण आहे मी तुम्हाला आधी हे न सांगण्याचे."
"हे शकुनीने केलं? माझ्या पांडवांना आणि कुंतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला? मी सोडणार नाही त्याला." भीष्म रागाने उठणार तितक्यात विदुर ने त्यांना आडवले.
"पुरावा कुठंय महामहीम?"
"काय?"
"तुम्ही शकुनीला ज्या गुन्ह्याचा दंड देणार आहात, त्याचा काय पुरावा देणार आपण महाराजांना?"
"अरे विदुर, आपल्याकडे पुरावा आहे ना..... तुझे गुप्तचर!"
"माझे गुप्तचर? शब्द फिरवत त्यांना खोट पाडून शकुनी वर महाराजांकडे कांगावा करेल, की आपण त्याच्यावर कुठलेही आरोप लावतो आहोत. सगळी सहानभूती मिळवेल तो."
भीष्म पुन्हा बसले.
"मग काय करायचे विदुर? सहन करायचे नुसते?"
"नाही. त्यावर आपण उपाय काढू पण तूर्तास शांत रहायला हवे."
"मला सांग विदुर, पांडव कसे आहेत? अर्जुन नीट आहे ना?"
"हो महामहीम. त्यानेच मला सांगितले होते तुम्हाला कळवायला की, 'पितामहं ना सांगा की आमची चिंता करू नका. आम्ही नीट आहोत.'"
भीष्मांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
"कसं सोडवलस विदुर त्यांना?"

"युधिष्ठिराला निरोप पाठवला मी. 'अमावास्येला चंद्र दिसणार नाही. त्यामुळे प्रकाशाची वाट आत्तापासूनच धरं.' सोबत खोदकाम करणाऱ्याला पाठवलं. महालासोबत पंडुपरिवारही जळून खाक झाला असं वाटून काही काळ शकुनी गप्प बसेल आणि पांडवांनाही शांततेत वेळ घालवता येईल, म्हणून हा खटाटोप. महामहीम, महालातून बनवलेल्या भूयाराने आग लागण्याआधीच पंडुपरिवार महालापासून थोडे लांब असलेल्या भुयाराच्या दुसऱ्या टोकाच्या सुरक्षित ठिकाणी पोचला होता."
"अद्भुत! तुला खूप खूप आशीर्वाद आहेत माझे, विदुर." भीष्मांचा चेहरा फुलला होता. विदुरने नमस्कार केला तसे भीष्म विदुरच्या डोक्यावर हात ठेवत 'आयुष्यमान भवं' म्हणले.
"ते परत कधी येतील विदुर?"
"बघू, महामहिम. सध्या तरी त्यांनी इथे येऊ नये असे माझे मत आहे. वन त्यांच्याकरता अधिक सुरक्षित आहे महालापेक्षा."
"ही माझी असफलता आहे की दुर्भाग्य, विदुर? माझ्या प्रिय नातवांना एक सुरक्षित निवासस्थान नाही देऊ शकत मी! त्यांना मी काही देऊ शकलो नाही, विदुर. साधे संरक्षणही नाही." पुन्हा दु:खी होत भीष्म म्हणाले.
"महामहीम, त्यांच्या नशिबातली ही लहान सहान युद्धे लढू द्यात त्यांना. ती त्यांच्या भाग्यातली आहेत. जेव्हडी गरज होती तितकी साहाय्यता त्यांना मिळालेली आहे."
भीष्म विदुराच्या या कठोर शब्दांमुळे दुखावले.

विदुराने बाजू सांभाळून घेत म्हटले, "तुम्ही जसे तुमच्या भाग्यातले दु:ख त्यांना देणार नाही ना, तसेच पांडव आणि विशेषत: तुमचा अर्जुनही त्यांच्या भाग्यातली दु:ख तुमच्या खात्यात टाकायला कदापि तयार होणार नाही. त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका. पांडव समर्थ आहेत त्यांची लढाई लढायला. विश्वास ठेवा त्यांच्यावर." भीष्म शांत झाले.
______________

© मधुरा

______________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरातै छान झालाय हा भाग पण. लिहीत रहा.

मुगुट- मुकुट
स्पेसिफिकली राजमुकुट...
बाकी भाग छान झालाय!

धन्यवाद अक्कु Happy

धन्यवाद अज्ञातवासी. माझ्या माहिती नुसार दोन्हीही उच्चार ग्राह्य आहेत.

धन्यवाद यशदा Happy अजून सगळे लिहून झालेले नाहीत. मी भाग लिहून पोस्टत असते.

सगळे झाले की एकतत्ररित्या उपलब्ध करून देता येतील. Happy

महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले ! याचा द्रौपदीला खूप त्रास झाला ! शरीराने व मनाने ती खूप खंगली होती ! वयस्कर दिसत होती ! हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या ! अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती ! एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती. तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले ! त्याला पाहून तिला रहावलं नाही ! धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली ! ती म्हणते, " सख्या असा तर मी विचारच नव्हता केला ! असं कसं झालं ???"

कृष्ण म्हणाले, "पांचाली नियती खूप निष्ठुर असते ! ती आपल्या मनाप्रमाणे चालते ! द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना ? तू यशस्वी झालीस ! फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता !"

द्रौपदी म्हणते, " कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ???"

योगेश्वर म्हणतात " नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे ! " आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही. द्रौपदी विचारते, " कृष्णा मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का ???"

कृष्ण म्हणतात, "नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता !"

द्रौपदी विचारते कृष्णा, "मी काय करू शकत होते ???"

कृष्ण म्हणतो, "तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू त्याचा अपमान करायला नको होतास !" त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात त्याचा अपमान केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं ! कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती."

*आपले शब्दच आपले कर्म बनवतात ! आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा ! नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात ! जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही, तर जीभेत विष आहे !*

Pages