पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३५. कटी पतंग (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 1 August, 2019 - 09:39

प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते म्हणतात. ‘कटी पतंग’ बघायचा आहे हा धोशा मी स्वत:शी ही मालिका लिहायला घेतल्या दिवसापासून लावलाय. तसं मातृकृपेने कथानक अथपासून इतिपर्यंत ठाऊक आहे. पण तरी हा चित्रपट पहायचा होताच. काही महिन्यांपूर्वी युट्युबवर उपलब्ध असलेली प्रत पाहिली तर त्यात कृष्णजन्माच्या रात्रीपेक्षा भयाण अंधार. तेव्हा तात्पुरता बेत स्थगित केला. दोन आठवड्यांपूर्वी राजेश खन्नाचा ‘आनंद’ पाहायचा ठरवलं पण सर्दी आणि तिची पाठ धरून नेमेचि येणारा खोकला मुक्कामाला आले. सगळाच ‘आनंदीआनंद’. तेव्हा तोही बेत बारगळला. पुन्हा माणसांत आल्यावर युट्युबवर ‘आनंद’ शोधायला गेले, सहज म्हणून ‘कटी पतंग’ शोधला आणि चक्क ५ महिन्यांपूर्वी अपलोड केलेली सुरेख प्रत मिळाली. जाते थे जापान पहुंच गये चीन. मग आज ह्या चित्रपटाची गोष्ट सांगते. ‘आनंद’ ला पुन्हा कधीतरी भेटू, चालेल ना?

kati1.jpg

सुरुवातीलाच एक वरात एका वाड्यात शिरताना दिसते. वाजंत्री, मुंडावळ्यानी तोंड झाकलेला नवरदेव, मुलीच्या घरात चाललेली लगबग, सगळीकडे सुरेख आरास, हसण्या-खिदळण्याला आलेला ऊत. पण हे काय? नवरीमुलगी माधवी उर्फ मधु मात्र खुश दिसत नाही. तिच्या खोलीत बसून ती तिच्या प्रियकराने, कैलाशने, तिला लिहिलेलं शेवटचं पत्र वाचते. त्यात नेहमीच्या ‘मला विसरून जा’ वगैरेसोबत ‘जालीम’ दुनियावाल्याच्या नावाने केलेला शंख असतो. मधु ते पत्र वाचून फार अस्वस्थ होते. पण हा कैलाश नीच माणूस आहे हे आपल्याला अगदी पुढच्याच शॉटमध्ये कळतं. तो आपल्या घरी आपल्या शबनम (उर्फ शब्बो) नामक आयटमसोबत दारू पीत बसलेला असतो. एव्हढ्यात दार वाजतं. आता एव्हढ्या रात्री कोण आलं म्हणून कैलाश दरवाजा उघडायला जातो आणि शब्बोबाई लपतात तिथल्या एका पडद्यामागे.

kati5.jpg

दारात मधूला पाहून कैलाश हैराण होतो. आपण लग्नघर सोडून पळून आल्याचं ती त्याला सांगते. अर्थात मधु अशी ऐन लग्नातून निघून आल्यामुळे तिचे मामा तिला ‘तमाम जायदादसे बेदखल’ करणार हे तो पुरेपूर जाणून असतो. आणि ‘मधु वजा पैसा’ हे समीकरण त्याला मानवणार नसतं. म्हणून तो तिला कसंबसं पटवून तिथून कटवायच्या मागे लागतो. पण हाय रे दैवा! शब्बो (तिच्या कपड्याहूनही!) तोकड्या पडद्यामागे लपल्यामुळे मधूला तिचे पाय दिसतात. ‘आपके पाव बहोत हसीन है’ वगैरे काही न बोलता ती फर्रकन तो पडदा सारते आणि शब्बोला तिथे पाहून तिच्या डोक्यात (एकदाचा!) प्रकाश पडतो. कैलाशला शिव्यांची लाखोली वाहात ती तिथून पळत सुटते ती थेट परत मामाच्या वाड्यावर येते. एव्हाना वरात परत गेलेली असते आणि रिकाम्या लग्नघरात लोक तिला दूषणं देत असतात. कशीतरी लपतछपत ती आपल्या खोलीत जाते तर तिथे खुर्चीत तिचे मामा बसलेले असतात. ती रडून रडून त्यांची माफी मागायला लागते तरी ते काहीच बोलत नाहीत - कारण मानसिक धक्क्याने त्यांचा मृत्यू झालेला असतो. ते दृश्य पाहून मनस्वी हबकलेली मधु तिथून निघते ती थेट गंगापूर रेल्वे स्टेशनवर पोचते. आता वाट फुटेल तिथे जाणं एव्हढा एकच पर्याय तिच्यासमोर असतो.

स्टेशनवर एक मवाली तिला ओळखून तिच्याशी लगट करायला लागतो तेव्हा ती वेटिंग रूममध्ये शिरते. तिथे एक गोंडस छोटा मुलगा खेळत असतो. त्या मुलाची आई आतल्या खोलीतून दुधाची बाटली घेऊन येते आणि मधूला पाहून थबकते. ती असते मधूची लहानपणापासूनची मैत्रीण पूनम. पूनमच्या नवर्याने त्याच्या आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी लग्न केलेलं असतं. सहा महिन्यांपूर्वी त्याचा एका जीप अपघातात मृत्यू झालेला असतो. तेव्हा सासर्यांनी तिला पत्र लिहून झालं-गेलं विसरून नातवाला घेऊन नैनितालला आमच्याकडे निघून ये असं कळवलेलं असतं. ते पत्र ती मधूला दाखवते. तिच्या नवर्याचा, शेखरचा, फोटो दाखवते. अर्थात तिच्या सासू-सासर्यांनी तिला कधी पाहिलेलं नसतं आणि तिच्याबद्दल त्यांना फारशी माहितीसुध्दा नसते. मधुची कर्मकहाणी ऐकून ती ‘तू माझी बहिण म्हणून माझ्यासोबत तिथे चल, आपण दोघी मिळून माझ्या मुलाचा सांभाळ करू’ अशी गळ घालते. मधूकडे दुसरा पर्याय नसल्याने तीही तयार होते.

पण मधुचं दुर्दैव पुन्हा एकदा आड येतं. त्यांच्या ट्रेनला अपघात होतो. त्यात पूनमचे दोन्ही पाय कापले जातात. एका अपंग स्त्रीला सासू-सासरे कधीच सून म्हणून स्वीकारणार नाहीत असंच ती मनाने घेते. ‘माझ्याऐवजी तू पूनम म्हणून जा आणि माझ्या मुलाचा सांभाळ कर’ असं वचन ती मधूकडे मागत राहते. मधूला अर्थातच असं वचन देणं शक्य नसतं. पण पूनम मरण पावल्यावर विधवेचा वेश धारण करून छोट्या मुलाला घेऊन पूनम म्हणून नैनितालला निघण्याशिवाय तिला आता गत्यंतर नसतं.

टॅक्सीत बसून नैनितालला जाताना वाटेत मुलाच्या दुधासाठी ड्रायव्हरला पैसे द्यायला मधु पर्स उघडते तेव्हा आतले पैसे पाहून त्या ड्रायव्हरची नियत फिरते. तो गाडी भलत्या मार्गाने नेऊ लागतो. त्या मुसळधार पावसात मधूने केलेला मदतीचा धावा ऐकून उलट दिशेने जाणारी एक जीप यु-टर्न घेऊन येते. आणि त्यातला तरुण त्या ड्रायव्हरशी झटापट करून तिची पर्स तिला परत मिळवून देतो. हा असतो कमल. तो एक फॉरेस्ट ऑफिसर असतो आणि तिथून जवळच त्याचं घर असतं. पावसामुळे रस्ते बंद असल्याने आजची रात्री माझ्याकडे रहा, उद्या सकाळी मी तुम्हाला जिथे जायचंय तिथे सोडतो असं तो म्हणतो तेव्हा मधु मुलासोबत त्याच्या घरी जाते.

तिथे गेल्यावर कमल तिला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं असं म्हणतो तेव्हा ती क्षणभर चरकते. मग तो तिला तुम्हाला कोणाकडे जायचं आहे हे विचारतो. जेव्हा ती दिवान दिनानाथचं नाव सांगते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मधु (उर्फ पूनम) आपल्या मित्राची, शेखरची, पत्नी आहे. कमल जर्मनीला ट्रेनिंगसाठी ५ वर्ष गेलेला असतो तेव्हढ्या काळात शेखरचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे त्यानेही पूनमला पाहिलेलं नाहीये हे लक्षात येताच मधूचा जीव भांड्यात पडतो. अर्थात कमलला ट्रेन अपघाताबद्दल माहित असल्याने तिला जिवंत पाहून त्याला आश्चर्य वाटतं. तिच्या जेवण्याची नीट सोय करायला तो आपल्या नोकराला, रघुकाकाला, सांगतो. त्याला एका पार्टीला क्लबात जायचं असतं. जेव्हा रघुकाका त्याला ‘रात्रीचा एव्हढ्या पावसात बाहेर जाऊ नकोस’ म्हणतात तेव्हा तो त्यांच्यावरच डाफरतो. तो गेल्यावर मधु रघुकाकाना ‘कमल रोज बाहेर जातो का’ म्हणून विचारते. ते म्हणतात तो रोज बाहेर तर जातोच पण विलायतेत राहूनसुध्दा ज्या दारूला कधी स्पर्श केला नाही ती रोज पितो. मधु अर्थातच ह्याचं कारण विचारते तेव्हा ते सांगतात की त्याच्या वडिलांनी त्याचं त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी लग्न ठरवलं होतं. न बघताच त्याने होकारही दिला होता पण ती मुलगी लग्नाच्या दिवशी पळून गेली. मधुला संशय येतो. ती कुठल्या गावात लग्न ठरलं होतं म्हणून विचारते. आणि जेव्हा रघुकाका ‘गंगापूर’ हे गावाचं नाव सांगतात तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. आपलं लग्न कमलशीच ठरलं होतं हे तिला कळून चुकतं. नियतीने फिरून पुन्हा तिला त्याच्याकडेच आणून सोडलेलं असतं. फक्त एका वेगळ्या रुपात.

kati3.jpg

सकाळी कमलला यायला उशीर झाल्याने मधुच्या विनंतीवरून रघुकाका तिला एका ट्रकमध्ये बसवून तिच्या सासरी रवाना करतात. ती घरी पोचते तेव्हा तिचे सासू-सासरे तिला पाहून अवाक् होतात कारण त्यांनीही त्या ट्रेन अपघाताबद्दल ऐकलेलं असतं आणि त्यात आपली सून आणि नातू दोघे दगावले अशी त्यांचीही समजूत झालेली असते. पण ती जेव्हा सासर्यांनी लिहिलेली चिट्ठी दाखवते तेव्हा ते तिचं आनंदाने स्वागत करतात. हळूहळू मधु तिथे रुळू लागते. तिच्या नवर्याचा मित्र असल्याने कमलचं तिथे येणं-जाणं असतंच.

अशीच एक दिवस काही सामान आणायला मधु तिथल्या किराणा मालाच्या दुकानात जाते तेव्हा तिथला एक नोकर तिला ‘मधु’ अशी हाक मारतो. ती ओळख दाखवत नाही तेव्हा तो तिला आपण एकाच कॉलेजात होतो असं सांगतो. तेव्हढ्यात तिथे कमल येतो आणि तो 'एकासारखी एक दिसणारी माणसं असतात' असं म्हणतो तेव्हा मधूला हायसं वाटतं. ती तिथून सटकते. एव्हाना ती आणि कमल एकमेकांकडे आकर्षित होऊ लागलेले असतात. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तर त्यावर जणू न बोलता शिक्कामोर्तबच होतं.

पण सरळ वाटेने जाईल ते नशीब कुठलं? कमलच्या वडिलांनी ‘लग्न कर’ म्हणून त्याच्यामागे टुमणं लावलेलं असतं. ते कमलला एक पत्र पाठवतात ज्यात 'एक मुलगी आपल्या आईसोबत नैनितालला येतेय तिला कमलने भेटावं' असं सुचवलेलं असतं. ‘मला लग्न करायचं नाही’ हा कमलचा हट्ट असतो. तेव्हा मधुचे सासूसासरे तिला कमलसोबत त्या मुलीला आणि तिच्या आईला भेटायला एका हॉटेलात पाठवतात. तिथे डान्सचा कार्यक्रम चालू असतो आणि तो डान्स करत असते शब्बो. ती गाण्याच्या माध्यमातून आपण मधूला ओळखल्याचं सूचित करते. शब्बोचं वागणं पाहून कमललाही संशय येतो आणि तो खोदूनखोदून मधूला उर्फ पूनमला विचारतो की तुझ्यासारखी दिसणारी आणखी कोणी आहे का.

kati4.jpg

शब्बोला मधूचा सुगावा लागलाय म्हटल्यावर कैलाश नैनितालमध्ये दाखल व्हायला फारसा वेळ लागत नाही. पुनमचा दुरचा नातेवाईक म्हणून तो तिच्या घरी भेटायला येतो, तिच्या सासरयांशी आणि कमलशी ओळख करून घेतो आणि मधूला ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैसे उकळायला सुरुवात करतो. इथे मधु आणि कमल एकमेकांत गुंतत चाललेले असतात. पण आपल्यामागे सुनेचं काय होणार ह्याची काळजी लागलेल्या तिच्या सासऱ्यांना जेव्हा त्यांचे डॉक्टर मित्र ‘तिचं दुसरं लग्न करून द्या’ असं सांगतात तेव्हा ते जाम खवळतात. तर कमल ‘पूनम हीच आपली पसंती’ असल्याचं आपल्या धाकट्या बहिणीला सांगतो तेव्हा तीही पूनम तुला आपल्या जाळ्यात ओढतेय असा आरोप करते. तेव्हढ्यात पूनमच्या नवऱ्याच्या इन्शुरन्स पॉलिसीचे पेपर्स नैनितालच्या पत्त्यावर येतात आणि तिचे सासरे मधूला त्यावर सही करायला सांगतात. आता आपलं बिंग फुटणार अशी भीती मधूला वाटू लागते. शेवटी कमलला सारं सांगून टाकावं म्हणून ती एक पत्र लिहून इन्शुरन्स पॉलिसीच्या पेपर्ससोबत त्याच्याकडे पाठवते पण ते पत्र नेमकं तिच्या सासऱ्यांच्या हातात पडतं आणि......

आणि पुढे काय होतं ते प्रत्यक्ष तुम्हीच पहा. बरेचसे हिंदी चित्रपट ‘सुखांत’ ह्या सदरात मोडतात त्यापैकी हा आहे. त्यामुळे शेवट काय होणार ह्याची नव्हे तर कथा तिथवर कशी पोचते ह्याची उत्सुकता प्रेक्षकांना जास्त असते. फारसं पाल्हाळ न लावता, अधिक रडारडी न करता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदी चित्रपटातल्या रस्ता किंवा रेल्वे रुळावरच्या प्रसिद्ध मॅरेथॉनला फाटा देऊन हा चित्रपट संपतो. आधी म्हटल्याप्रमाणे युट्युबवर सध्या उपलब्ध असलेली प्रतही उत्तम आहे. त्यामुळे जुन्या हिंदी चित्रपटांची आवड असल्यास नैनितालच्या निसर्गरम्य परिसराची झलक दाखवणारया शक्ती सामंताच्या ह्या चित्रपटात अडीच-पावणेतीन तासांची गुंतवणूक करण्यास हरकत नसावी.

kati2.jpg

चित्रपटातली गाणी प्रसिद्ध असल्याने नायक आणि नायिका कोण हे जवळपास सार्यांनाच माहित असणार. माधवी उर्फ मधु झालेय आशा पारेख. हिच्या आवाजाचं आणि माझं कधी जमलं नाही. तेव्हढा भाग सोडला तर ही भूमिका तिने ठीकठाक वठवली आहे. पण कमल झालेल्या राजेश खन्नाच्या मानाने ती बरीच थोराड वाटते. गंमत म्हणून दोघांचा जन्म कधी झाला ते गुगलून पाहिलं तर ती दोन महिने मोठी आहे फक्त. राजेश नेहमीप्रमाणेच क्युट दिसलाय पण तो अजिबात फॉरेस्ट ऑफिसर वाटत नाही. त्याचे ‘महबुबा’ आणि ‘राज’ पाहिले असल्याने त्याचा अभिनय एकाच साच्याचा वाटला. एखाद्या भूमिकेला एखादी वेगळी लकब द्यावी असा विचार त्याकाळी नायकांपैकी कोणी केला होता का? नायिकाप्रधान चित्रपट फारसे नसल्याने नायिकांना हा वाव क्कचितच मिळत असावा नाही? तसं बघायला गेलं तर हा चित्रपट बराचसा नायिकाप्रधानच म्हणता येईल. पण निदान मी तरी आशाला गतधवेच्या भूमिकेत प्रथमच पाहिली. त्यामुळे तोही अभिनय साचेबध्द असू शकतो. असो. व्हिलनगिरीचं डिपार्टमेंट प्रेम चोप्रा (कैलाश) आणि बिंदू (शब्बो) दोघांनी यथास्थित सांभाळलं आहे.

इतर कलाकारांत नझीर हुसेन (पूनमचे सासरे), सुलोचना (पूनमची सासू), नाझ (पूनम), सत्येन कप्पू (पूनमच्या सासऱ्यांचे डॉक्टर मित्र), मदन पुरी (कमलचे वडिल), डेझी इराणी (नोकराणी रमय्या), ज्युनियर महमूद (रमय्याचा धाकटा भाऊ) आणि हनी इराणी (कमलला दाखवायला आणलेली मुलगी) दिसतात. हनी आणि डेझी ह्या दोन्ही बहिणींना तरुण रुपात मी प्रथमच पाहिलं. विकीपिडियावर पूनमच्या छोट्या मुलाचं काम ऋषी कपूरने केलंय असं म्हटलं आहे. ते चुकीचं आहे कारण ऋषी १९७१ मध्ये एव्हढा लहान नक्कीच नव्हता. आणि हो, चित्रपटात नैनितालच्या घरात पूनमच्या नवऱ्याचा फोटो ठेवलेला असतो तो सुजितकुमारचा दाखवलाय. बाकी मला तरी चित्रपटात सुजितकुमारचा एकही सीन दिसला नाही. विकिवरही त्याचं नाव नाहीये. मी कुठेतरी वाचलं होतं की तो राजेश खन्नाचा मित्र होता आणि त्यामुळे राजेशच्या अनेक चित्रपटांत दिसत असे. तरी फोटोपुरता एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपटात असल्याची आणखी उदाहरणं असतील काय हा प्रश्न मनात आलाच.

गाण्यांबद्दल वेगळं काय लिहू? ये श्याम मस्तानी, प्यार दिवाना होता है, ये जो मोहब्बत है (ह्यातल्या बंगल्याच्या तर मी आजन्म प्रेमात आहे), जिस गलीमें तेरा घर आणि टायटल सॉंग ना कोई उमंग है असंख्य भारतीयांच्या ऑल-टाईम favorite list मध्ये असतील. अर्थात आर.डी, किशोरकुमार, मुकेश, लता आणि आशा असल्यावर दुसरं आणखी काय होणार म्हणा. बिंदू मधूला पुन्हा बघते त्यावेळचं ‘मेरा नाम है शबनम’ चित्रपटातला turning point आहे. ती ‘तुम्हारा नाम क्या है’ म्हणते तेव्हा मधुसोबत आपल्यालाही घाम फुटतो. ‘आज ना छोडेंगे’ गाणं दर होळीला वाजतंच Happy

खरं विचाराल तर ह्यातली मधूची predicament मला पटली नाही. पूनमच्या मृत्यूनंतर तिच्या सासरी गेल्यावर तिने आपली खरी ओळख तिच्या सासू-सासर्यांना द्यायला हवी होती. त्यांनी काही लगेच तिला घराबाहेर काढली नसती. तसंच कैलाश नैनितालमध्ये आलाय म्हटल्यावरच तिने कमलला प्रत्यक्ष भेटून सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं होतं. आपण माधवीला माफ केलंय असं कमलने तिला सांगितलेलं असतंच की. अर्थात मग पुढचा चित्रपट कसा झाला असता, नाही का? Happy

चित्रपटातल्या काही गोष्टी पटत नाहीत. ज्या ट्रेनने पूनम आणि तिचं बाळ येणार असतात तिला झालेल्या अपघाताबद्दल पूनमचे सासू-सासरे आणि कमल तिघांनाही माहित असतं. मग तिचा आणि बाळाचा शोध घ्यायला त्यांच्यापैकी एकही जण जात नाही? कमल आपल्या जीवलग मित्राच्या बायकोला आणायला जाणार नसतो? इतकंच काय तर मधु बाळाला घेऊन सासरी पोचते तेव्हा पूनमची सासू चक्क देवासमोर बसलेली दाखवलेय. सून आणि नातू अपघातात गेलेत म्हटल्यावर सुतक नको लागायला? एका चिठ्ठीच्या भरवश्यावर ते मधूचा पूनम म्हणून स्वीकार करतात. दुसर्या कोणीही लग्नाचा किंवा आणखी फोटो पुरावा म्हणून मागितले असते, नाही का? दुकानातल्या माणसापाठोपाठ शब्बो पूनमच्या रूपातल्या मधूला ‘मधू’ म्हणून हाक मारते तेव्हा कमल तिला विचारतो की तुझ्यासारखी दिसणारी आणखी कोणी होती का कारण माझं लग्न ठरलं त्या मुलीचं नावही मधूच होतं. आता एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असतात. त्यामुळे हा प्रश्न हास्यास्पद वाटतो. त्याने मुलीला न बघता लग्नाला होकार दिलेला असतो मग मधूला बघताच मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय असं तो का म्हणतो? प्रेम चोप्राच्या एका चित्रपटातला डायलॉग वापरायचा झाला तर ‘वगैरा, वगैरा, वगैरा’ Happy

सौ बातकी एक बात काय तर बंगाली मिठाईप्रमाणे गोड दिसणार्या राजेशसाठी बघा, उत्तम संगीत-मिठ्ठास स्वरसाज-अर्थपूर्ण शब्द-सुरेख चित्रीकरण असा दुग्धशर्करा योग जुळून आलेल्या अर्धा डझनभर गाण्यांसाठी बघा नाहीतर नैनितालच्या वेड लावणाऱ्या ‘कालप्रवाही वाहून गेलेल्या’ अनुपम निसर्गसौंदर्यासाठी बघा. पर दोस्त, एक बार ये पिक्चर देखना जरूर.
---

*** Spoiler Alert *** (चित्रपटाचा शेवट)

मधूने कमलला लिहिलेल्या पत्रात ती पूनम नसून त्याचं जिच्याशी लग्न ठरलं होतं ती माधवी आहे हे वाचताच पूनमच्या सासर्यांना धक्का बसतो. कमलशी तिची वाढती सलगी त्यांना आवडत नसते. ते पत्र दाखवून ते तिला जाब विचारतात की पैश्याच्या मोहाने तू इथे आली होतीस का? तेव्हा ती म्हणते की मला पैश्याचा मोह नाही पण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता आणि पूनम माझी मैत्रीण होती. ती घर सोडून जायला निघते पण ते म्हणतात की आम्ही किती जीव तोडून सांगितलं की ती आमची सून नव्हती तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. आमची बदनामी होईल. तेव्हा तुला इथेच राहायला हवं. नंतर ते कमलच्या वडिलांना कमल आणि मधुचं लग्न लावून द्यायची विनंती करतात. एक मूल असलेल्या विधवेशी आपल्या मुलाचं लग्न लावून द्यायला अर्थातच कमलचे वडील तयार होत नाहीत तेव्हा पूनमचे सासरे त्यांना मधूने लिहिलेलं पत्र दाखवतात. ते वाचल्यावर कमलचे वडीलहे लग्न लावून द्यायला आनंदाने तयार होतात.

पण तेव्हढ्यात कैलाश पूनमच्या सासर्यांच्या दुधात विष मिसळतो. त्यांच्या खुनाचा आळ मधुवर येतो आणि तिला पोलीस अटक करतात. शब्बो आपणच पूनम असल्याचा दावा पोलिसांकडे करते. सुदैवाने शब्बो आपलं अ‍ॅबॉर्शन करून द्यायची विनंती करायला ज्या डॉक्टरांकडे गेलेली असते ते पूनमच्या सासर्यांचे मित्र असतात. ते तिला पूनमच्या घरी आलेली पाहतात आणि ती एक खोटारडी बाई आहे असा निर्वाळा देतात. कमलचे वडील त्याला मधूने लिहिलेलं पत्र दाखवतात. तेव्हा कमल घरातल्या काम करणाऱ्या मुलीला, रमैय्याला खडसावून विचारतो. ती कबूल करते की त्या रात्री ती पूनमच्या सासर्यांसाठी दूध तयार करत असताना तिथे कैलाश आला होता. कमल एक नाटक करून पोलिसांसमोर शब्बो आणि कैलाश कडून सत्य वदवून घेतो. त्यांना अटक होते. मग ‘अग अग म्हशी’ सारखी मधु निघून जायचं नाटक करते. आता मॅरेथॉन सुरु होणार म्हणून आपण वैतागतो पण १-२ मिनिटांतच कमल तिला गाठतो. गाण्याच्या दोनेक ओळी म्हणतो. ती पाघळते आणि चित्रपट संपतो Happy

*** Spoiler Alert ***

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने, वरचे प्रतिसाद वाचताना लक्षात आले की अंदाजची नायिका वर वर्णन केलेल्या टिपिकल नायिकांसारखी अजिबात नाही. तिचे विचार स्पष्ट आहेत, आपल्या विचारांप्रमाणे वागायचे धाडस तिच्यात आहे आणि त्याचे परिणामही ती स्वीकारते. अंदाजमध्ये 2 नायक असले आणि त्या भूमिका तेव्हा खूप लोकप्रिय असलेल्या नटानी केल्या असल्या तरी त्यांच्या तुलनेत नायिका जास्त सामर्थ्यशाली चितारलीय.

Andaaz super terrific songs. This is one of those albums where all songs are great.

सचिन व सुप्रियाचा कटी पतंग पिक्चरवर एक विनोदी मराठी पिक्चर आहे, त्यात कटी पतंग हे हिंदी गाणेही आहे, कोणता तो सिनेमा?

आवडतो हा चित्रपट. खूपवेळा पाहिलाय. आशा पारेख भाग्यवान होती. तिला चांगली गाणी मिळायची. तसेच ती फार जास्त स्टायलीश , कृत्रीम नव्हती व त्याचवेळेस बावळटपण नव्हती म्हणुन ती कधी चित्रपटात त्रासदायक वाटली नाही.

आवडतो हा चित्रपट. खूपवेळा पाहिलाय. आशा पारेख भाग्यवान होती. तिला चांगली गाणी मिळायची. तसेच ती फार जास्त स्टायलीश , कृत्रीम नव्हती व त्याचवेळेस बावळटपण नव्हती म्हणुन ती कधी चित्रपटात त्रासदायक वाटली नाही.
हम तुम्हारे सनम मधे खरंच माधुरीचे पात्र कपाळाला हात मारण्यासारखे दाखवले आहे. त्यात आवडलेल्या दोनच गोष्टी, शारुकचा घोड्याशी बोलताना विनोदी प्रसंग व सपना अवस्थीचे ‘कभी बंधन भूला दिया‘ गाणे.

रेल्वे स्टेशनच्या बुक स्टॉलवर शोधा. मुंबईतील स्टॉल चालणार नाही. निर्जन, एकाकी एकच प्लॅटफॉर्म, कोपऱ्यात वाकडे झाड उभे, दिवसाला एकच गाडी, तिही रात्री दोन अडीजच्या सुमारास थांबणार, तोंड न दिसणारी टोपी व ओव्हरसाईज ओव्हरकोट घालून, हातात कंदील घेऊन फिरणारा स्टेशनमास्टर असा सेट जिथे जमून येईल, त्या स्टेशनात काळपट पडलेल्या, हात लागला तर फाटेल असे वाटणाऱ्या कागदावर हिंदीत छापलेल्या गुलशन नंदाच्या कादंबऱ्या नक्की मिळतील.

छान झालाय हाही लेख!
कटीपतंग आवडतो. गाणी तर खूपच आवडतात. विशेषतः ये है शाम मस्तानी आणि ये जो मोहब्बत है Happy

@स्वप्ना_राज तुमचे सर्व लेख वाचलेत. कधी प्रतिक्रिया दिलेली नाही पण आज देतोय. तुम्ही छान लिहीता. तुमच्या ह्या "पिक्चर अभी बाकी..." सिरीज मुळे मी बरेचसे चित्रपट पाहीलेत. तुमचे आभार.

"कटी पतंग" वर सुद्दा छान लिहीले आहे. त्यातील गाणी पाहिली होती. एका विधवेच्या जीवनावर चित्रपट असावा व खूप रडारड असेल म्हणून पाहीला नव्हता. (त्यात फार पुर्वी "माझा पती करोडपती" मध्ये सुप्रियाने या चित्रपटातील गाण्यावर विधवा असल्याचे भासवून अभिनय केला होता त्यामुळे तसे वाटले होते). तुमचे परीक्षण वाचून हा चित्रपट पाहीला. बरा वाटला. Continuity च्या काही चूका सोडल्या तर तसे वाईट म्हणावे असे काही नव्हते. जेव्हा आशा पारेख पहिल्यांदा तिच्या मैत्रीणीच्या सासरी येते तेव्हा दाराबाहेर मुलाला तिच्या उजव्या कडेवर व बॅग डाव्या हातात असे आहे आणि जेव्हा दारातून आत शिरते तर एकदम मुलगा डाव्या कडेवर व बॅग उजव्या हातात असे आहे. बाकी तो मुलगा एकदम गोड आहे. जेव्हा आधीच्या प्रसंगात टॅक्सीवाला आणि आशा पारेख यांच्यात झटापट चालू असते तेव्हा तो मुलगा ही दोन चार रट्टे त्या टॅक्सीवाल्याला देतो. ते पाहून जरा हसू आले. तसेच जेव्हा राजेश खन्ना आणि आशा पारेख क्लबमध्ये जातात तेव्हा हनी इराणीची आई आशा पारेखची ओळख "शीतल" अशी करून देते. तेथे "पुनम" असे हवे होते. ह्या अशा छोट्या छोट्या चूका सोडल्यातर तसे वाईट काही नव्हते. अर्थात रडारड मात्र खूप होती. नासीर हुसेनला उगाचच मारले चित्रपटात...

पाहिला एकदाचा हा चित्रपट, विशेष आवडला नाही, पण गाणी अप्रतिम आहेत.. तुझ्या लेखामुळे किमान एक पाहू शकले Happy

मी काल बघायला सुरुवात केली. वेळ होईल तसा बघणार आहे.
अगदी सुरवातीच्या सीनमधे बॅंडवर आराधनातल्या गाण्याची धून ऐकून गंमत वाटली!

काही गाणी पाहिली. ये शाम मस्तानी....
फारेंड सारखा छिद्रान्वेषी समीक्षक असता तर जरूर म्हणाला असता की "टळटळीत उन्ह पडलय, आणी ये शाम मसतानी काय ? "
असो त्यावेळी राजेश खन्ना होताच सुपर स्टार. त्याचे वाढलेले पोट, त्याच्या पेक्षा मोठी दिसणारी आशा पारेख यासारखेच हेही गोड मानून घेतले असावे.

रेल्वे स्टेशनच्या बुक स्टॉलवर शोधा. मुंबईतील स्टॉल चालणार नाही. निर्जन, एकाकी एकच प्लॅटफॉर्म, कोपऱ्यात वाकडे झाड उभे, दिवसाला एकच गाडी, तिही रात्री दोन अडीजच्या सुमारास थांबणार, तोंड न दिसणारी टोपी व ओव्हरसाईज ओव्हरकोट घालून, हातात कंदील घेऊन फिरणारा स्टेशनमास्टर असा सेट जिथे जमून येईल, त्या स्टेशनात काळपट पडलेल्या, हात लागला तर फाटेल असे वाटणाऱ्या कागदावर हिंदीत छापलेल्या गुलशन नंदाच्या कादंबऱ्या नक्की मिळतील.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> Lol

रेल्वे स्टेशनच्या बुक स्टॉलवर शोधा. मुंबईतील स्टॉल चालणार नाही. निर्जन, एकाकी एकच प्लॅटफॉर्म, कोपऱ्यात वाकडे झाड उभे, दिवसाला एकच गाडी, तिही रात्री दोन अडीजच्या सुमारास थांबणार, तोंड न दिसणारी टोपी व ओव्हरसाईज ओव्हरकोट घालून, हातात कंदील घेऊन फिरणारा स्टेशनमास्टर असा सेट जिथे जमून येईल, त्या स्टेशनात काळपट पडलेल्या, हात लागला तर फाटेल असे वाटणाऱ्या कागदावर हिंदीत छापलेल्या गुलशन नंदाच्या कादंबऱ्या नक्की मिळतील>>. हे खूप मस्त. समोरच्या प्लॅट फॉरम च्या पुढे गवत व उंचव ट्यावर झाड असेल तर प्रीती झांगियानी दुल्हनच्या गेटप मध्ये करवा चौथ ची पूजा करून चांद बघायला आलेली दिसेल.

रेल्वे स्टेशनच्या बुक स्टॉलवर शोधा. मुंबईतील स्टॉल चालणार नाही. निर्जन, एकाकी एकच प्लॅटफॉर्म, कोपऱ्यात वाकडे झाड उभे, दिवसाला एकच गाडी, तिही रात्री दोन अडीजच्या सुमारास थांबणार, तोंड न दिसणारी टोपी व ओव्हरसाईज ओव्हरकोट घालून, हातात कंदील घेऊन फिरणारा स्टेशनमास्टर असा सेट जिथे जमून येईल, त्या स्टेशनात काळपट पडलेल्या, हात लागला तर फाटेल असे वाटणाऱ्या कागदावर हिंदीत छापलेल्या गुलशन नंदाच्या कादंबऱ्या नक्की मिळतील>> अर्र! सहजासहजी नाहीच का मिळणार? Sad

ननि, सूलू_८२, सुजा, Manaskanya, झंपी, सस्मित, जिज्ञासा,साधना, BLACKCAT, सुनिधी,अस्मानी, वावे, अनया, vijaykulkarni धन्यवाद Happy

>>अस म्हणतात की तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर अख्खी 'कायनात' तुम्हाला ती मिळवून देते.
नोप, बर्‍याचा वेळा ही थिअरी ट्राय करून पाहिली आहे. काहीही उपयोग नाही. कायनात मी बोलायला लागले की बहिरी होते Proud

>>यावेळी स्पॉयलर अलर्ट देऊन शेवट लिहीला नाहीस का!
लिहिते आता.

>>ती जात असताना तिच्याकडे बघत असतानाच्या दृश्यात तो पोट सुटलेला जाडजूड फद्या दिसतो.
हायला, मला राजेश खन्नाचं पोट कसं दिसलं नाही. तेरे चेहरेसे नजर नही हटती तश्यातला प्रकार असावा बहुतेक Happy

साधना, रेल्वे स्टेशनच्या बुक स्टॉलचं वर्णन भारी आहे
योगी९००, बाप रे! केव्हढ्या बारकाईने पहाता तुम्ही चित्रपट. प्रतिक्रियेबद्दल आभार!

>>बाकी तो मुलगा एकदम गोड आहे. जेव्हा आधीच्या प्रसंगात टॅक्सीवाला आणि आशा पारेख यांच्यात झटापट चालू असते तेव्हा तो मुलगा ही दोन चार रट्टे त्या टॅक्सीवाल्याला देतो.

हो मजा वाटते ते पाहून

>>फारेंड सारखा छिद्रान्वेषी समीक्षक असता तर जरूर म्हणाला असता की "टळटळीत उन्ह पडलय, आणी ये शाम मसतानी काय ? "
तेव्हाच्या काळात काही टेक्निकल अडचणी असतील म्हणून असं चित्रीकरण करावं लागत असेल. पूर्वी मलाही विचित्र वाटायचं. 'खोया खोया चांद' म्हणजे आकाशात चंद्र नाहिये अशी माझी ते गाणं पाहून समजूत ह्याच कारणामुळे झाली होती Proud

कायनात मी बोलायला लागले की बहिरी होते >>>>>>> Rofl

तो मुलगा ही दोन चार रट्टे त्या टॅक्सीवाल्याला देतो.>>>>>>>> नॅचुरल एक्टिन्ग केली त्या पोराने.

फारेंड सारखा छिद्रान्वेषी समीक्षक असता तर जरूर म्हणाला असता की "टळटळीत उन्ह पडलय, आणी ये शाम मसतानी काय >>>>>>> सन्ध्याकाळच्या ४- ५ वाजता टळटळीत उन असत की.

'खोया खोया चांद' >>>>>>> ते गाण तर चक्क दिवसा शूट केल. Lol

सुप्रियाचे कटी पतंग गाणे, >>>>>>> हे बघितलय. मस्त होत. Biggrin

‘अग अग म्हशी’ सारखी मधु निघून जायचं नाटक करते. >>>>>>>> Rofl

बाकी मला एक कळल नाही की मधू आणि कमलच लग्न एकमेकान्ची तोण्डे न बघता कस काय ठरु शकत?

आनंद माझा सर्वांत आवडता चित्रपट....
तुमच्या नजरेने परत पाहायला आवडेल...
प्यासा वर पण काही लिहिलेय का? नसेल तर लिहा प्लीज...

बाकी मला एक कळल नाही की मधू आणि कमलच लग्न एकमेकान्ची तोण्डे न बघता कस काय ठरु शकत?>>>>>>>> ये उन दिनोंकी बात है!

बाकी मला एक कळल नाही की मधू आणि कमलच लग्न एकमेकान्ची तोण्डे न बघता कस काय ठरु शकत?>>>>>>>> ये उन दिनोंकी बात है! >>>>>>> खरे आहे हे . Lol

पूर्वी होते,

व्ही शांताराम अन संध्याचा एक सिनेमा होता ना? त्यातही तोंड न बघता लग्न , रेल्वे अपघात, अदलाबदली , व्हिलन ब्लॅक मेल वगैरे भानगडी होत्या, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, असे नाव होते बहुतेक

तुझ्या या मालिकेतला मी पाहिलेला तेंव्हा आवडलेला आणि आजही आवडणारा असा हा बहुदा पहिलाच सिनेमा आहे.

जुन्या हिंदी सिनेमात काही सिनेमे असे असायचे की ते काही तरी सांगायचा आव आणायचे. आणि त्या काही तरी सांगण्याच्या हव्यासापायी बर्‍याचवेळा रटाळ व्हायचे (अनेक अपवाद आहेतच). पण या सिनेमांबरोबर रोमँटीक फँटसी हा एक प्रमुख जॉनर होता. नायक, नायिका, त्यांच्या प्रेमात विघ्न आणणारा खलनायक / परीस्थीती आणि त्यावर मात करून त्यांच्या प्रेमाचे सफल होणे. फँटसी असल्यामुळे प्रेमात येणारी संकटे आणि ती पार करणारे मार्ग हे बर्‍याचवेळा अतर्क्य आणि हास्यास्पदच असायचे. पण अशा चित्रपटांमुळेच 'डोकं बाजूला ठेऊन चित्रपट बघण्याची' कला अवगत झाली. आणि त्या कलेमुळेच भट्टी मस्त जमली तर 'कटी पतंग' सारखे चित्रपट मस्त एन्जॉय करता येतात हे पण समजले.

यातले 'मेरा नाम हे शबनम' आणि कारवा मधले 'दय्या रे मै कहा आ फसी' ही गाणी आरडी आणि आशा द्वयीची अफाट कॉम्पोझीशन्स आहेत.

तुझा लेख नेहमीप्रमाणेच 'इति श्री स्वप्नाकृतम्' आहेच.

Pages