पं मुकुल शिवपुत्र यांचा दक्षिण दौरा - आठवणी - भाग २

Submitted by आशयगुणे on 29 May, 2019 - 23:48

पुढची मैफल बुधवार, १८ एप्रिल रोजी बंगलोरच्या प्रतिष्ठित 'बंगलोर गायन सभा' या हॉल मध्ये पार पडली. या मैफलीचे वैशिष्ट्य असे की प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा यांची उपस्थिती. पुरिया धनश्री ने सुरु झालेल्या या मैफलीत पुढे अनेक रंग श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. 'प्रभू मेरे अवगुण चित ना धरो' हे काफी रागात प्रस्तुत केलेले भजन, 'होली खेलन कैसे जाऊ' ही पिलू रागातील होरी, 'आन बान जिया में लागी' हा दादरा, 'ब्रूही मुकुंदेथी' ही एम. एस सुब्बुलक्ष्मी यांनी प्रसिद्ध केलेली रचना आणि शेवट भैरवी! ही विविधता रसिकांना समृद्ध करणारी होती. गुहा यांना ही राहवलं नाही. May he be granted good health and great singing for many years to come. He is a jewel of India असे लगेचच त्यांनी ट्विटर या मध्यमावर लिहिले

एव्हाना आम्हाला भैरवी होऊन सुद्धा श्रोते खुर्चीवरून न उठता सामूहिक रित्या मैफल पुढे सुरु राहावी अशी शब्दाविना विनवणी करण्याची सवय झाली होती. आणि हेच पुढे मैसूरला देखील घडलेच. २१ एप्रिलच्या शनिवारी घडलेल्या या मैफलीत दाक्षिणात्य विद्वान टी. एम. कृष्णा उपस्थित राहणार हे आम्हाला ट्विटरमुळे कळले. या मैफलीची सुरुवात मारवा या रागाने झाली. माझ्यासाठी ही गोष्ट अत्यंत आनंददायी होती कारण हल्ली हा राग ऐकायला मिळतोच असं नाही. मुकुलजींनी मात्र त्यांचे बंगलोरच्या 'पुरिया धनश्री' द्वारे दाखवलेले कोमल रिशभावरचे प्रेम इथे देखील तसेच ठेवले. मारवा नंतर बसंत राग सुरु झाला आणि तोपर्यंत टी.एम येऊन आमच्या बाजूला येऊन बसले होते. पण मध्यंतरानंतर रंगलेला 'कौसी' राग हा त्या मैफलीचाच नव्हे तर माझ्यामते संपूर्ण दौऱ्यातील 'हॉलमार्क' ठरला! बडा ख्यालात अंतरेतून स्थयीत येताना मुकुलजींनी अशी काही जागा घेतली की 'सुगर बलमा' या समेवर कृष्णा यांच्यासकट आम्ही सर्वांनी दाद दिली. तो क्षण मला अजून स्वछ लक्षात आहे! 'रघुवीर की सूद आयी' हे भजन आणि नंतर 'होली खेलन कैसे जाऊ' या होरी ने मैफल संपली. मात्र नंतर एका शिष्या प्रमाणे कृष्ण मुकुलजींना भेटले आणि दुसऱ्या दिवशी तो फोटो तिथल्या वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर झळकला.

२२ एप्रिलच्या रविवारी बंगलोरच्या जे.एस.एस ऑडिटोरियम मध्ये शेवटची मैफल पार पडली. ह्यात देखील श्रोत्यांपुढे विविध रचना सादर झाल्या. सुरुवात मुलतानी रागाने झाली आणि त्यानंतर मधुवंती राग सादर झाला. त्यात विशेष म्हणजे 'मै आऊ तोरे मंदरवा' ही वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व यांच्या पत्रव्यवहारातून तयार झालेली बंदिश विशेष रंगली. त्यानंतर अचानक वातावरण बदललं कारण खमाज रागातील 'बाली उमर लरकैया' ही ठुमरी सादर झाली. मुकुलजी हे एका भावविश्वातून दुसऱ्या एकम वेगळ्या भावविश्वात कसे काय प्रवास करतात याचे आश्चर्य वाटावे तर मध्यंतरा नंतर हा सिलसिला सुरूच राहिला. अत्यंत अवघड 'श्री कल्याण' (कुमार गंधर्व यांनी रचना केलेला) राग सादर झाला आणि त्यानंतर एकदम वेगळ्या 'मूड' चा नट-कामोद! त्यानंतर निर्गुणी भजन आणि पुन्हा 'ननंदिया काहे म्हारे बोल' ही अत्यंत लडिवाळ ठुमरी आणि शेवट 'आन बान जिया में लागी' हा दादरा. पंडितजी हे 'अवस्थांतर' असे काही करतात की आपण अचंबित होतो. एखाद्या रागात रिषभ आणि धैवत कोमल असले आणि तो गाऊन झाला की ते वातावरणात रेंगाळतात. हा 'हँगओव्हर' काही क्षण काय पुढील १५ मिनिटे देखील टिकू शकतो. अशा वेळेस वेगळे स्वर असलेला राग सुरु करून त्याचा रंग भरणे हे कमालीचे कठीण असते. पण मुकुलजी हे श्रोत्यांना देखील पुढच्या मिनिटात त्या वेगळ्या भावविश्वात अलगदपणे घेऊन जातात. मात्र त्याने आपण आधीचे राग विसरून जातो असे नाही. हे सारं आपल्याला नंतर आठवतंच!

बाकी हा दौरा माझ्यासाठी संगीत या व्यतिरिक्त अन्य बऱ्याच गोष्टी शिकविणारा होता. मला पं मुकुल शिवपुत्र या गायकाला अगदी जवळून पाहता आले. पु. लं देशपांडे मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याबद्दल 'गाण्यात राहणारा माणूस' असं म्हणाले होते. ते मला मुकुलजींबद्दल तंतोतंत पटले. कलाकार जेव्हा एखादी रचना सादर करतो तेव्हा त्याचा विचार किमान चोवीस तास आधी हॉटेलच्या खोलीत सुरु झालेला असतो हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. मात्र मुकुलजी इतर घडामोडींबाबत तितकेच उत्सुक असतात. चेन्नईला चार तासाची मैफल आणि नांतर जवळ-जवळ दोन तास बाहेर घालवल्या नंतर सध्याच्या घडामोडींवर त्यांनी पुढे दोन तास चर्चा केली आणि एवढं करून सकाळी उठलो तेव्हा ते माझ्यासमोर तयार बसले होते! सोमवार २३ एप्रिलला सकाळी आमच्या गाड्या बंगलोरहून निघाल्या. सकाळी ९ वाजता सुरु झालेला प्रवास दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता पुण्याला संपला. पण संपूर्ण प्रवासात पंडितजींच्या गप्पा सुरु होत्या. आणि फक्त संगीत या विषयावरच नाही तर इतर विषय देखील त्यात समाविष्ट होते. मी काय करतो, माझ्या कामाचे स्वरूप काय याबाद्दल विचारले. मी शिक्षण क्षेत्रात काम करतो हे कळल्यावर त्याबद्दल प्रश्न विचारले, त्यांची मतं देखील सांगितली. दौऱ्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला दिसले. सतार वाजविणारे मुकुलजी, मैसूरला उपास होता म्हणून स्वतः खिचडी बनविणारे मुकुलजी, अनेक घडामोडींवर चर्चा करणारे मुकुलजी आणि तेवढ्यात काहीतरी सुचले की थोडं थांबून स्वर लावून ती स्वर-संगती गाऊन पुन्हा आमच्यात परत येणारे मुकुलजी! हेच ते अवस्थांतर.

इथे विशेष नमूद केले पाहिजे की या संपूर्ण दौऱ्यात हार्मोनियम आणि तबला वादकांची मुकुलजींना उत्कृष्ट साथ लाभली. त्याच बरोबर टाटा कॅपिटल, झी-२४ तास, सारस्वत बँक आणि 'विजय कर्नाटक' यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. 'द हिंदू', 'टाईम्स ऑफ इंडिया' आणि 'बेळगाव तरुण भारत' यांनी देखील मुकुलजींबद्दल लिहिले आणि दक्षिणेत अनेक लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. तिकिटांसाठी 'बुक माय शो' ने देखील मोलाचे सहकार्य दिले.

कलाकार हे 'moody' असतात असा आरोप त्यांच्यावर केला जातो. मात्र मनात काहीतरी सतत भावनात्मक 'घडत' असताना माणूस moody का होणार नाही? आपल्याला वेगळ्या भावविश्वात नेणारी ही मंडळी स्वतः सतत चिंतन आणि मनन करत असतात. हे फार कष्टाचे काम आहे. मैफलीत कलाकाराला खुलू द्यायची जबाबदारी श्रोत्यांची आणि साऊंड-सिस्टीम वाल्या लोकांची असते. कलाकारांवर पटकन टीका करणाऱ्या लोकांनी ही गोष्ट जरूर ध्यानात ठेवावी.

मी लहानाचा मोठा होताना दहावी, बारावी आणि अशा अनेक कारणांमुळे बऱ्याच दिग्ग्ज कलाकारांची कला प्रत्यक्ष अनुभवता नाही आली. भीमसेन जोशी, गंगुबाई हंगल, रवी शंकर, विलायत खान हे कलाकार मी दहावी-बारावीत असताना कला सादर करत होते. मात्र अभ्यास या क्षुल्लक कारणामुळे मला त्यांना प्रत्यक्ष अनुभवता नाही आले. त्यावेळेस त्रस्त अवस्थेत मी स्वतःलाच विचारायचो - "उत्कृष्ट संगीत मी मुकतो आहे आणि हे सारे कलाकार तर मी नाही ऐकू शकलो. पण असा आनंद मला प्रत्यक्षात कधी मिळेल? कोण देईल मला हा आनंद?" कदाचित नियती ने माझे हे बोलणे ऐकले असणार. कारण काही वर्षातच त्या पार्ल्याच्या मैफलीच्या निमित्ताने उत्तर मिळाले, "पं. मुकुल शिवपुत्र!"

- आशय गुणे Happy

भाग १ इथे आहे: https://www.maayboli.com/node/70091

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ आशय गुणे,

दोन्ही भाग वाचले, सुंदर अनुभव देणारे लेखन.

कुमारांचा मुलगा असणे हे भाग्य आहेच पण संगीत प्रेमींच्या अपेक्षांचे खुणावणारे ओझे समर्थपणे पेलणे हे शिवधनुष्य हाताळण्या इतकेच कठीण ! मुकूलजी हे ओझे पठीवर घेत नाहीत .. ते त्याच्या बरोबर चालतात. या संगीत विश्वाचा वेध ते घेत असतात आणि आपण स्तीमित होउन ऐकत असतो.
वारशात मिळालेली संगीताची जाण , आवाज आणि सर्जनशीलता याचा गोतावळा घेउन ते पूजा मांडतात !
तुम्ही हा सोहळा जवळून अनुभवत आहात ! खरेच गत जन्मीचे पुण्य आहे हे तुमचे !

हे तुमचे लेख म्हणजे त्या पूजेचा तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवलेला प्रसाद आहे. धन्यवाद !