पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३२. डॉ. विद्या (१९६२)

Submitted by स्वप्ना_राज on 9 April, 2019 - 12:28

vidya1.jpg

आईशी बोलताना गोल्डन एरातल्या चित्रपटांचा विषय निघाला (आणि तो हमखास निघतोच कारण हे चित्रपट तिच्या मर्मबंधातली ठेव आहेत) की बात त्या काळातल्या नट-नट्यांवर येते. मग तिच्या बोलण्यात प्रत्येक नट-नटीच्या काही चित्रपटांचा उल्लेख हटकून होतो उदा. सुनील दत्तचा हमराज, मनोजकुमार-माला सिन्हाचे हिमालय की गोदमें आणि हरियाली और रास्ता, राजेंद्रकुमारचा (ह्या विषयावर माझं आणि आईचं बरं नाही :-)) धूलका फूल, मीनाकुमारीचा दिल अपना और प्रीत परायी, नंदाचा उसने कहा था. हो, हो, आमच्या आईसाहेबांना रडके चित्रपट जरा जास्त आवडतात. Happy वैजयंतीमालाचं नाव निघालं की तिच्याकडून उल्लेख होतो तो डॉ. विद्याचा - आम्रपाली किंवा ज्वेल थीफचा नाही. मला ह्या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटायचं. त्यामुळे गोल्डन एरातले चित्रपट पाहायचं ठरवलं तेव्हा हा चित्रपट यादीत होताच. चला तर मग.....बघू यात तरी आहे कोण ही डॉ. विद्या....

चित्रपट सुरु होतो तेव्हा कॉलेजचा वर्ग सुरु असतो. शिक्षक सम्राट अशोकाबद्दल माहिती सांगत असतात. नेहमीप्रमाणे काही विद्यार्थ्याचं लक्ष असतं तर काहींचं नाही. गीता पहिल्या गटात मोडणारी तर शांता दुसर्या. शांता शिक्षकांचा डोळा चुकवून वर्गाच्या बाहेर पळायच्या बेतात असते. पण गीताच्या सावधानतेमुळे तिचा हा प्रयत्न तर फसतोच वर सगळ्या वर्गासमोर फजिती होते ती वेगळीच. एव्हाना चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात येतं की आज्ञाधारक गीता चित्रपटाची नायिका आहे. हं, पण ह्या दोघी मैत्रिणी असतात बरं का. कॉलेज सुटल्यावर गीता शांता, कुंदन आणि तिच्या बाकी मित्रमंडळीना परवा आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला यायचं आमंत्रण देते. शांता तिला सांगते की तिचा नवरा दोन वर्षांनंतर इंग्लंडवरून येणार असल्याने तिला यायला जमेल की नाही सांगता येत नाही. गीता म्हणते त्याला पण घेऊन ये.

पार्टीच्या दिवशी शांता आणि तिचा नवरा जगदीश गीताच्या घरी येतात. दोन वर्षं विलायतेत काढूनही जगदीश मनाने देसीच राहिलेला असतो. कोणी शेकहँडसाठी हात पुढे केला तर दोन्ही हात जोडून नमस्कार करत असतो. गीताच्या आई-वडिलांच्या पाया पडतो. मग त्यांच्याकडून ‘विलायतेत राहूनही कसा संस्कार विसरलेला नाहीये. विलायतेची हवा जराही लागलेली नाही’ वगैरे टिपिकल कौतुकसुमनं उधळली जातात. तो मद्यपान करत नाही म्हटल्यावर शांताचा वर्गमित्र कुंदन तर चाटच पडतो. शांता मात्र जगदीशच्या ह्या वागणुकीने पुरी कावलेली असते. कारण ती कधीही विलायतेत न जाता भारतात राहूनच पाश्चात्य जीवनशैलीने जगत असते. किंबहुना ह्यावरून तिचा आणि गीताचा बराच वादही होत असतो.

जगदीशसारखं गुणी बाळ आपल्यालाही जावई म्हणून मिळावं असं गीताची आई तिच्या वडिलांना म्हणते. तेव्हा ते तिला १० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण करून देतात. तेव्हा जिन्यावरून पडून झालेल्या एका अपघातात गीताचा एक पाय जवळपास कापावा लागण्याची वेळ आलेली असते. लेकीच्या भविष्याच्या काळजीने धास्तावलेल्या तिच्या वडिलांना, म्हणजे लाला हंसराज ह्यांना, त्यांचा एक मित्र हिरालाल धीर देतो. आपण गीताला आपली सूनच मानतो असं तो हंसराजना सांगतो. गीता आणि हिरालालचा मुलगा रतन ह्यांचा विवाह तेव्हाच ठरतो. अर्थात गीताचा पाय कापावा लागत नाही. पण आता रतन आणि गीता दोघांचा विवाह व्हायला हवा असं हंसराज बायकोला सांगतात. ह्यात ग्यानबाची मेख अशी असते की रतन फारसा शिकलेला नसतो. घरची जमीनदारकी मात्र उत्तमरीत्या चालवत असतो. आपल्या शिकल्या-सवरलेल्या लेकीला हा कमी शिकलेला मुलगा कितपत पसंत पडेल ह्याची गीताच्या आईला शंका असते. अर्थात गीताला ह्याबाबतीत काही आक्षेप नसतो. आई-वडील म्हणतील ती पूर्व दिशा असते तिच्यासाठी.

हिंदी चित्रपटात नेहमी आढळणाऱ्या योगायोगाच्या गोष्टी असतात ना त्यातली एक इथेही होते. सहलीच्या निमित्ताने शांता, कुंदन आणि त्यांचे काही मित्र-मैत्रिणी नेमके रतनच्या गावच्या शेतात जाऊन पोचतात. शहरातून आलेली काही तरुण मंडळी शेताची नासाडी करत आहेत हे ऐकल्यावर रतन तिथे येतो. तो त्यांना तिथून निघून जायला सांगतो. त्याची आणि कुंदन-शांताची बाचाबाची होते. शेवटी शांता आणि कुंदन तिथून निघून जातात. पण एकूणात झाल्या प्रकाराबद्दल एका शब्दाचीही दिलगिरी व्यक्त न करता नुकसानभरपाई म्हणून पैसे तोंडावर फेकू पाहणाऱ्या शहरी शिकलेल्या लोकांबद्दल रतनचं मत काही फारसं चांगलं होत नाही.

रतन घरी येतो तेव्हा गीताच्या वडिलांकडून लग्नाबद्दल पत्र आल्याचं त्याचे वडील हिरालाल त्याला सांगतात. पुढे एक वर्षभर लग्नाचा मुहूर्त नसल्याने पुढच्याच महिन्यात लग्न करायचं असतं. रतनही आई-वडिलांच्या इच्छेबाहेर नसल्याने लग्नाला होकार देतो. पण लग्नात शांता आणि गीताच्या इतर मैत्रिणी रतनसोबत वरातीत आलेल्या गावच्या लोकांची यथेच्छ टिंगल करतात. इतकंच काय तर गीता हुशार आहे, आपल्यापेक्षा कमी शिकलेला नवरा करून ती जन्मभर त्याला आपल्या तालावर नाचवणार आहे असंही शांता म्हणते. ही मुक्ताफळं कानी पडताच रतन बिथरतो. त्यात त्याच्या गावातली इतर मंडळीही ह्या शहरी बायका कश्या घरात येऊन घराची विभागणी करतात वगैरे ऐकवून त्याचं मन आणखी कलुषित करतात. सारासारविचार हरवून बसलेला रतन गीताचा चेहेराही बघायला नकार देतो. आईवडिलांनी समजावूनसुध्दा त्याच्या मतांत काही फरक पडत नाही. एक तर गीता ह्या घरात राहील नाहीतर मी असा अल्टीमेटम तो देतो तेव्हा त्याचे वडील त्याला संतापून घराबाहेर काढतात. वैतागलेला रतन गाव सोडून जायचं ठरवतो. पण आपल्यापायी त्याने घर सोडावं हे गीताला पटत नाही. ती तूर्तास माहेरी निघून जायचं ठरवते. रतनचा राग शांत झाला की ती परतणार असते. हिरालाल नाईलाजाने तिला माहेरी सोडायला जातात. अर्थात तिथे तिच्या वडिलांकडून त्यांना बरीच बोलणी खावी लागतात. एकंदर झाल्या प्रकाराने व्यथित झालेल्या हिरालालना ताप भरतो पण त्याही स्थितीत ते एकटेच गावी परत जायला निघतात. आणि गावी पोचल्यावर स्टेशनवरच त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच हंसराज लेकीला घेऊन सांत्वनासाठी रतनकडे येतात पण रतन गीताला नांदवायला ठाम नकार देतो.

गीताचे खमके वडील जावयाची चांगलीच कानउघाडणी करून त्याचे दात त्याच्या घशात घालतात आणि मुलीला घेऊन परत घरी येतात. आता मुलीचं कसं होणार म्हणून तिची आई काळजी करत बसते तेव्हा तिलाही सुनावतात की माझ्या मुलीला कोणाच्या आधाराची गरज पडता कामा नये, ती स्वत:च्या पायावर उभी राहायला हवी म्हणून तिने डॉक्टर व्हावं. गीता ह्यालाही राजी होते. यथावकाश ती डॉक्टर होतेही. दरम्यानच्या काळात तिने रतनला पाठवलेली सारी पत्रं त्याने न वाचताच परत पाठवून दिलेली असतात. आपण डॉक्टर झाल्याचं ती रतनला कळवते तेव्हाही तो ते पत्र तसंच परत करतो. आणि ते पत्र पैसे मागायला पाठवलं गेलंय अशी समजूत करून घेऊन ५००० रुपयेही पाठवतो. ते बघून गीताच्या वडिलांचा तिळपापड होतो तरी गीता मात्र ते माझ्या हक्काचे पैसे आहेत म्हणून ठेवून घेते. इतकंच काय तर डॉक्टर म्हणून रतनच्याच गावात प्रॅक्टीस करायला जायचा मनोदय व्यक्त करते.

गीता, तिच्या घरचा विश्वासू नोकर आणि त्याची बायको रतनच्या गावी पोचतात तेव्हा तो नोकर डॉक्टर असल्याची बतावणी करतो आणि गीता बनते त्याची अशिक्षित पुतणी विद्या. योगायोगाने रतनची जुनी हवेली त्यांना राहायला विनामोबदला मिळते. वडील गेल्यावर ह्या घरात मन रमत नाही म्हणून तो आणि त्याची आई दुसर्या हवेलीत राहत असतात. गीता त्या गावात आपलं काम सुरु करते. अर्थात रुग्णाच्या तक्रारी ऐकून औषधं तीच निवडत असते. नोकर फक्त ती द्यायचं काम करत असतो. हे करता करताच ‘गावकी गोरी’ बनून रतनला भेटायचं सुध्दा गीता विसरत नाही. तोही तिच्यात गुंतत जातो. पण गावात बनारसी म्हणून एक उनाड माणूस असतो त्याचं तिच्याकडे लक्ष जातं. रतनचं लग्न आधीच झालंय हे तो तिला सांगतो. अर्थात त्याने गीताला काही फरक पडणार नसतो म्हणा. पण आता गावकरीही रतनच्या आईकडे जाऊन तिला रतन आणि विद्याच्या वाढत्या जवळीकीबद्दल सांगतात. भडकलेली रतनची आई विद्याला जाब विचारायला येते आणि ती आपली सूनच आहे हे बघून हरखते. गीता तिलाही आपल्या कटात सामील करून घेते. पण रतनला मात्र ठणकावून सांगते की आता माझ्याशी लग्न कर नाहीतर मी गाव सोडून निघून जाईन.

vidya3.jpg

तर ही झाली चित्रपटाची कथा. हिंदी चित्रपटांच्या परंपरेला अनुसरून विद्या हीच गीता आहे हे शेवटी रतनला कळणार आणि तो तिचा स्वीकार करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. फक्त ही ओळख त्याला कशी पटणार आणि त्याचं मतपरिवर्तन कसं होणार एव्हढेच दोन प्रश्न राहतात. पैकी मतपरिवर्तन होण्याचा भाग तद्दन फिल्मी आहे. किमानपक्षी २०१९ सालात तरी तसा वाटतो. कदाचित ६२ साली अजून तेव्हढा झालेला नसावा. ओळख पटण्याचा भाग चित्रपटाच्या शेवटी पाच-एक मिनिटांत गुंडाळला आहे. All’s Well That Ends Well ह्या उक्तीला अनुसरून चित्रपट ठीकठाकच म्हणायचा. पण आजच्या काळात न पटण्याजोगाच आहे. मला असं का वाटलं ते लेखाच्या शेवटच्या भागात सांगेनच. पण त्याआधी चित्रपटातले कलाकार आणि गाणी ह्याबद्दल नेहमीप्रमाणेच थोडंसं.

१९५९ मध्ये आलेल्या ‘शिकलेली बायको’ वर हा चित्रपट बेतला असल्याचं विकी सांगतो. चित्रपटातली मध्यवर्ती भूमिका वैजयंतीमालाने केली आहे. शहरी सुशिक्षित गीता आणि खेडवळ अशिक्षित विद्या ह्या दोन्ही भूमिकांना तिने तिच्या परीने न्याय दिलाय. चित्रपटातली गाणीही तिच्या नृत्यकौशल्याला पुरेपूर वाव देणारीच ठरली आहेत. ‘ऐसीच बहु मंगती है’ असं कुठल्याही सासूला वाटावं अशीच गीता आहे. प्रत्यक्षात माणसं अशी पूर्ण चांगली कधीच नसतात. त्यांच्या स्वभावाला कंगोरे असतात, दुसर्याला टोचेल-बोचेल-खटकेल असं बरंच काही असतं. पण हिंदी चित्रपटातल्या व्यक्तिरेखा अश्या त्रिमितीय कधीच नसतात. तेव्हा भूमिकेच्या सपाटपणाचा दोष वैजयंतीमालाला नक्कीच देता येणार नाही. त्यामानाने चित्रपटाचा नायक मात्र, नायिकेला अधिक उजळ दाखवायच्या प्रयत्नात का होईना पण, सच्चा वाटतो. खरं तर एका अनुभवातून कडूपणा घेऊन वावरणाऱ्या, हलक्या कानाच्या, हट्टी, हेकेखोर रतनचा मला जाम राग आला होता आधी. पण मग माझ्या लक्षात आलं की अरे हा तर तुमच्या-आमच्यासारखाच आहे. आपण कुठे असतो समंजस? सारासार वगैरे विचार करणारे? आपलं मत चुकीचं असल्याचं प्रांजळपणे मान्य करणारे? Happy मनोजकुमार हा थोड्याश्या चाकोरीबाहेरचा नायक रंगवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालाय. चित्रपटाच्या उत्तरार्धात विद्याच्या प्रेमात पडलेला रतन साकारताना तो आपल्या नेहमीच्या रोमँटिक मोडमध्ये लीलया गेलाय. पण पूर्वार्धातला हेकेखोर, शिक्षित लोकांविषयी पूर्वग्रह घेऊन वावरणारा रतन म्हणून तो कधीकधी over-the-top होतो. तरी त्याची ती भयंकर डोक्यात जाणारी हाताने चेहेरा झाकायची लकब ह्या चित्रपटात कुठे दिसत नाही ही देवाजीची कृपाच म्हणायची.

रतनच्या आईच्या भूमिकेत लीला चिटणीस असल्या तरी नवरा गेल्यानंतरचा प्रसंग सोडल्यास त्यांना अश्रुपात करायची फारशी संधी आपल्या सुदैवाने मिळालेली नाहीये. त्याची कसर रतनचे वडील झालेल्या नझीर हुसेन ह्यांनी भरून काढली आहे. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात मुलाचे वडील क्कचित इतका रडका चेहेरा घेऊन वावरले असतील. त्यामानाने गीताचे वडील खमके दाखवलेले पाहून मेरे कलेजेमें तो ठंडक पड गयी. जावयाला आणि व्याह्याला खडे बोल सुनावण्याबरोबरच आपल्या मुलीने आणखी शिकून स्वावलंबी व्हावं असा आग्रह धरणारा, तिच्या मागे ठाम उभा असलेला हा बाप काळाच्या बराच पुढे वाटतो. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव विकीवर नाही आणि त्याला अनेक चित्रपटांतून पाहूनही ते मला माहित नाही. (@Srd ह्या आयडींनी ह्याचं नाव 'शिवराज' असं सांगितलं आहे. मी श्रेयनामावली पाहिली त्यात हे नाव येतं). गीताच्या आईचं काम मुमताझ बेगम नावाच्या अभिनेत्रीने केलंय. ('काला बझार' मधल्या देवच्या 'अपनी तो हर आह इक तुफान है' वर डोलणारी वहिदाची आई हीच)

शांता आणि कुंदनच्या भूमिकेत हेलन आणि प्रेम चोप्रा दिसतात. प्रेम चोप्रा नेहमीप्रमाणेच dapper दिसतो. पण त्याला फारशी व्हिलनगिरी करायची संधी मिळालेली नाहीये. हां, त्याच्या वाट्याला पडद्यावर एक गाणं मात्र आलंय. गीता गावात आल्याबरोबर तिच्या आणि रतनच्या वाटेत काटा बनून उभा ठाकतो तो मदन पुरीने साकारलेला बनारसी. सुंदर ह्या नटाने गीताच्या नाटकात तिची साथ देणाऱ्या घरच्या विश्वासू नोकराची भूमिका छान केली आहे.

चित्रपटातल्या गाण्यांना स्वरसाज चढवलाय एस. डी. बर्मन ह्यांनी. तर शब्द मजरूह सुलतानपुरी आणि राजा मेहदी अली खान ह्या दोघांचे. 'खनके कंगना बिंदिया हसे' आणि 'पवन दिवानी' ही आधी ऐकलेली आणि आवडीची. 'जानी तुम तो डोले दगा देके' हे पहिल्यांदाच ऐकलं पण आवडलं. मुकेशने गायलेल्या 'ऐ-दिल-ए आवारा चल' चा उल्लेख विकीवर आहे पण हे गाणं मला तरी चित्रपटात कुठे दिसलं नाही. तेही मला खूप आवडतं. बाकीची गाणी मला खास वाटली नाहीत. आणि हो, श्रेयनामावलीत costume designing साठी श्रीमती यदुगिरी देवी हे नाव दिसतं. मला वाटतं ह्या वैजयंतीमालेच्या आजी – तिच्या आईच्या आई.

आधी म्हटल्याप्रमाणे आजच्या काळात हा चित्रपट पटत नाही. ह्याचं मुख्य कारण हे की लग्न झालेलं असूनही चित्रपटाच्या उत्तरार्धात रतन विद्याच्या प्रेमात पडतो, तिला माझं लग्न झालंय हे सांगत नाही आणि तरी ह्या असल्या माणसाला शेवटी नवरा म्हणून गीता सहज स्वीकारते. कबूल आहे की ह्या असल्या वागणुकीमुळे रतनची व्यक्तिरेखा real life झालेय पण त्यामुळे ह्याबाबतची गीताने घेतलेली भूमिका अनाकलनीय होते त्याचं काय. दुसरं हे की शिकलेले लोक आपली संस्कृती विसरत नाहीत हे दाखवण्याच्या नादात गीताची व्यक्तिरेखा अति-परंपरावादी झालेय. उदा. एक वेळ गीताच्या आईच्या तोंडचा ‘पत्नी दुखमे पतीको भूल सकती है लेकीन सुखमे उसे जरूर याद कर लेती है और पती चाहे पत्नीको सुखके दिनमें भूल जाये लेकीन दुखमे जरूर याद करता है’ हा डायलॉग सहन करता येईल. पण गीताच्या तोंडचा ‘पती तो परमेश्वर होता है और परमेश्वरको बदला नही जाता’ हा डायलॉग असह्य होतो. ‘पतीका दामन छोडनेवाली औरतको जमाना क्या समझता है ये मै अच्छी तरहसे जान गयी हूं’ हा असाच एक वैतागवाडी डायलॉग शांताच्या तोंडीही आहे. तिला आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर ती लगेच साडी नेसलेली आणि कुंकू लावलेली दाखवलेय.

आणखीही काही त्रुटी चित्रपटात जाणवतात. डॉक्टरकी करायला जाणारी गीता आधी कॉलेजात सम्राट अशोकाबद्दल का शिकत असते बरं? तेव्हाच्या काळात डॉक्टर व्हायला विज्ञान शाखेत असायची गरज नव्हती का? विज्ञान शाखेत आम्हांला तरी इतिहास हा विषय नव्हता. गीता कसली डॉक्टर असते ते काही शेवटपर्यंत कळत नाही कारण जखमी रतनवर ती सहजगत्या ऑपरेशन करते. शांताही तिला अगदी सहजपणे प्रशिक्षित नर्सप्रमाणे स्काल्पेल वगैरे देते. रतनला रक्ताची गरज पडेल हे ऐकल्यावर शांता लगेच ‘मै खून दूंगी’ म्हणते तेव्हा म्हटलं गीता म्हणेल की बयो, रक्त जुळायला लागतं गं. पण कसचं काय! डॉ. विद्या आपल्या गप्प. म्हटलं रतनभाऊ न जुळणार्‍या गटाचं रक्त दिलं गेल्यामुळे स्वर्गवासी होणार बहुतेक Happy

तर एकूणात हे असं आहे बघा ह्या चित्रपटाचं. तो पहा असंही सांगणार नाही. आणि पाहू नका असंही नाही. एक मात्र खरं की हा चित्रपट पाहून डॉ. विद्यापेक्षा ‘औरतको किसीभी मर्दके सहारेकी जरुरत नही होती’ म्हणणारे गीताचे वडील जास्त शहाणे वाटतात आणि लक्षात राहतात. असे बाप मिळाले असते तर त्या (आणि आजच्याही!) काळातल्या किती स्त्रियांचं आयुष्य अधिक सुखकर झालं असतं असं वाटल्यावाचून रहात नाही.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम! आजच आठवण करून देणार होतो बरेच दिवस झाले नवा लेख नाही.

शांता, कुंदन बनारसी वगैरे मराठीत नाहीत. निदान मला तरी आठवत नाहीत. त्यामुळे शिकलेली बायको सुटसुटीत झालाय.

वडीलांच्या तुलनेत माझी आई जास्त शिकलेली होती म्हणून या चित्रपटावरून तिला चिडवायचे आणि ते दोघांनाही आवडत असे. म्हणून ह्याची मराठी आवृत्ती मासाहेबांना आवडायची

लेख वाचता वाचताच वाटायला लागलं की अरे ही तर शिकलेली बायको ची कथाच आहे..पुढे तुम्ही तो उल्लेखही केला आहेच. मराठी चित्रपटात तो डबल रोल चा फंडा नव्हता बहुतेक.हेरोईन फक्त चष्मा लावते डॉक्टर झाल्यावर बस..झाला मकेओवर..हीरो नाही ओळखत तिला.. पण गाणी सुंदर..."आली हासत पहिली रात" हे त्यातलच..बाकी तुमचं लिखाण हे नेहेमीप्रमाणे सुरेख.. Happy

छान लिहलंय. या सिनेमाचं नावपण ऐकलं नव्हतं मी.
शिकलेली बायकोबद्दलदेखील काही माहित नव्हतं.

पण कथा वाचताना याच्या उलटे कथानक असलेले (म्हणजे नायक शिकलेला, शहरी असतो आणि त्याचं अशिक्षित, गावाकडच्या मुलीशी लग्न लावून देतात. मग ती शिकून, मेकअप बदलून नायकाचे मन जिंकून घेते) दोन सिनेमा आठवले. त्यांची नावं आठवत नाहीत पण हिंदीत माला सिन्हा होती, आणि मराठीत रंजना, रवींद्र महाजनी, प्रिया तेंडुलकर होते.

> प्रत्यक्षात माणसं अशी पूर्ण चांगली कधीच नसतात. त्यांच्या स्वभावाला कंगोरे असतात, दुसर्याला टोचेल-बोचेल-खटकेल असं बरंच काही असतं. पण हिंदी चित्रपटातल्या व्यक्तिरेखा अश्या त्रिमितीय कधीच नसतात. > हा हा Lol अवांतर आहे पण तरी रहावलं नाही म्हणून लिहते. या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक इ जुन्या काळातले, काल्पनिक कथाकार होते म्हणून सोडूनतरी देता येईल. पण इथे आजच्या काळातल्या नाती आपल्या खऱ्या आज्यांबद्दल जे निबंध लिहतात ते वाचून 'ऑ' होतं Lol

> त्यामानाने गीताचे वडील खमके दाखवलेले पाहून मेरे कलेजेमें तो ठंडक पड गयी. जावयाला आणि व्याह्याला खडे बोल सुनावण्याबरोबरच आपल्या मुलीने आणखी शिकून स्वावलंबी व्हावं असा आग्रह धरणारा, तिच्या मागे ठाम उभा असलेला हा बाप काळाच्या बराच पुढे वाटतो. > हे फार छान.

> ‘औरतको किसीभी मर्दके सहारेकी जरुरत नही होती’ म्हणणारे गीताचे वडील जास्त शहाणे वाटतात आणि लक्षात राहतात. असे बाप मिळाले असते तर त्या (आणि आजच्याही!) काळातल्या किती स्त्रियांचं आयुष्य अधिक सुखकर झालं असतं असं वाटल्यावाचून रहात नाही. > असे बाप आणि आईदेखील मिळायला हवी.

> ह्याचं मुख्य कारण हे की लग्न झालेलं असूनही चित्रपटाच्या उत्तरार्धात रतन विद्याच्या प्रेमात पडतो, तिला आपलं लग्न झालंय हे सांगत नाही आणि तरी ह्या असल्या माणसाला शेवटी नवरा म्हणून गीता सहज स्वीकारते. कबूल आहे की ह्या असल्या वागणुकीमुळे रतनची व्यक्तिरेखा real life झालेय पण त्यामुळे ह्याबाबतची गीताने घेतलेली भूमिका अनाकलनीय होते त्याचं काय. > 'तिला 'माझं' लग्न झालंय हे सांगत नाही'असा बदल करणार का?
लग्न झालंय हे सांगायला हवं बरोबरए. पण लग्न झाले असलेतरी इतर कोणाच्या प्रेमात पडण्यावर कोणाचाच कंट्रोल नसतो हा तसा पुरोगामीच स्टँड आहे. फक्त तो पर्याय स्त्रीपुरुष दोघांना उपलब्ध हवा.

> तिला आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर ती लगेच साडी नेसलेली आणि कुंकू लावलेली दाखवलेय. > नव्या काळातला कॉकटेल सिनेमा आठवला Uhoh

'डॉ विद्या = पवन दिवानी' हे माझ्याकरता असलेले समीकरण. लताने अफाट गायलंय ते आणि तितक्याच ताकदीने वैमाने ते सादर केलंय. तिच्या इतकं सुंदर नृत्य सादर करू शकणारी नायिका हिंदी सिनेमात अभावानेच असेल. डान्समध्ये तिच्याइतकी ग्रेस क्वचीत कुणाला दाखवता आली असेल. त्यात कोरीओग्राफर, कॅमेरामन यांचाही सहभाग असणारच पण तिचे श्रेय सगळ्यात जास्त. ती असलेली गोल्डन एरातली गाणी पडद्यावर पहायलाही तितकीच सुंदर असतात जेवढी ऐकायला सुंदर असतात.

रतन साकारताना तो आपल्या नेहमीच्या रोमँटिक मोडमध्ये लीलया गेलाय. >>> तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम Wink मकुशी कंटाळवाणा सोडून दुसरा कुठलाही मोड मला असोशिएट करता आलेला नाहीये Happy

असा मी असामी style सांगायचे तर लिहिलंय एकदम टॉप्स स्वप्ना ! शिकलेली बायको आवडायचे अजून एक कारण म्हणजे देखणा सूर्यकांत. ​आणि दळवी आणि इंदिरा चिटणीस ह्यांची हातखंडा भूमिका. btw लीला आणि इंदिरा चिटणीस ह्यांचे काही नाते वगैरे होते का ?

शिकलेली बायको आवडायचे अजून एक कारण म्हणजे देखणा सूर्यकांत. ​आणि दळवी आणि इंदिरा चिटणीस ह्यांची हातखंडा भूमिका+1 .. मी हा चित्रपट आत्ता आत्ताच बघीतला..त्यामुळे त्यातले विचार संवाद..काही झाल कितिही अन्याय झाला तरी नवरा आहे माझा..माझा संसार वगैरे गोष्टी outdated वाटतात.same point आन्धी बद्दल वाटला होता जेव्हा ती संजीव कूमार च्या पाया बिया पडते..

गुगु, अरे मागच्या आठवड्यातच तर टाकला होता की लेख Happy
तुरू, "आली हासत पहिली रात" चा काऊंटरपार्ट आहे ना इथे 'खनके कंगना बिंदिया हसे' Happy
@Srd, त्या अभिनेत्याचं नाव सांगितल्याबद्द्ल धन्यवाद!

अ‍ॅमी, माला सिन्हाचा चित्रपट बहुतेक अनपढ असावा. 'तिला 'माझं' लग्न झालंय हे सांगत नाही' हा बदल केलाय.

>>पण इथे आजच्या काळातल्या नाती आपल्या खऱ्या आज्यांबद्दल जे निबंध लिहतात ते वाचून 'ऑ' होतं
हा रेफरन्स कळला नाही अजिबात Uhoh

>>लग्न झालंय हे सांगायला हवं बरोबरए. पण लग्न झाले असलेतरी इतर कोणाच्या प्रेमात पडण्यावर कोणाचाच कंट्रोल नसतो हा तसा पुरोगामीच स्टँड आहे. फक्त तो पर्याय स्त्रीपुरुष दोघांना उपलब्ध हवा.
हो हेही आहेच म्हणा

>>मकुशी कंटाळवाणा सोडून दुसरा कुठलाही मोड मला असोशिएट करता आलेला नाहीये
अरे तुला तो कसा रोमँटिक वाटेल? तसं एखाद्या बाईलाच वाटणार Wink

>>btw लीला आणि इंदिरा चिटणीस ह्यांचे काही नाते वगैरे होते का ?
मी लीला चिटणीसचं आत्मचरित्र वाचलंय. त्यात असं काही वाचल्याचं आठवत नाही.

अज्ञातवासी, च्रप्स, साद, सरि सगळ्यांना धन्यवाद!

शिकलेली बायको सिनेमा बघितला होता. गाणी आवडली होती पण सिनेमाची कथा नाही आवडली. हा चित्रपट पाहिला नाही. पवन दीवानी गाणं आणि वैजयंतीमालाचा नाच अतिशय आवडतो.

अ‍ॅमी, माला सिन्हाचा चित्रपट बहुतेक अनपढ असावा>>>
नाही त्या चित्रपटात माला सिन्हा आणि विश्वजित आहेत. ती अनपढ गाव की गोरी असते. तो नाईलाजाने तिच्याशी लग्न करतो, घरच्यांच्या आग्रहामुळे. पण लग्न झाल्याझाल्या परदेशी पळतो. अशोककुमार तिला मॉड बनवतो, इंग्लिश शिकवतो आणि परदेशी पाठवतो. मग तो तिच्या प्रेमात पडतो, ती खरी ओळख लपवून ठेवते. पण शेवटी आपलं लग्न झालंय हे लक्षात ठेवून भारतात बायकोकडे परत येतो आणि मग गोड शेवट होतो.
साधारण असाच 'नसीब अपना अपना' असा एक अतिशय भयंकर चित्रपट होता. ऋषी कपूर, फराह आणि अजून एक कोणीतरी साउथची नटी होती. भयानक डोक्यात गेला होता.

स्वप्ना, छान लिहलय

दोन वर्षं विलायतेत काढूनही जगदीश मनाने देसीच राहिलेला असतो. कोणी शेकहँडसाठी हात पुढे केला तर दोन्ही हात जोडून नमस्कार करत असतो. गीताच्या आई-वडिलांच्या पाया पडतो. मग त्यांच्याकडून ‘विलायतेत राहूनही कसा संस्कार विसरलेला नाहीये. विलायतेची हवा जराही लागलेली नाही’ वगैरे टिपिकल कौतुकसुमनं उधळली जातात >>>>>> जगदीशच वर्णन वाचून हा नक्कीच मनोजकुमारने केला असणार अस वाटल होत. Proud

मराठीत रंजना, रवींद्र महाजनी, प्रिया तेंडुलकर होते. >>>>>>> मुम्बईचा फौजदार. याबद्दल माझ कन्फ्यूजन आहे. चित्रपटाच्या शेवटी रन्जना आपण अशिक्षित असल्याच नाटक केल होत अस रवीन्द्र महाजनीला सान्गते. खखोदेजा. चित्रपट बघितलेल्यान्नी हयावर प्रकाश टाकावा.

मुंबईचा फौजदार,

हा सागरी किनारा , हे गाणे आहे.

त्यात ती अशिक्षित असते, नन्तर काय तरी शिकून हवालदार होते.

मुंबईचा फौजदार,

हा सागरी किनारा , हे गाणे आहे.>> खूप मस्त चित्रपट आहे.. रंजना ची acting बेश्ट... शरद तळवळकर आणि त्यांच्या बायकोची केमेस्ट्री पण खूप गोड.. प्रिया तेन्डूलकर आणि रविंद्रा मन्कणी चा वावर नयनसूख देतात

चीकू,
हां तोच सिनेमा! खूप वर्षांपूर्वी पाहिल्याने मला फारसा नीट आठवत नव्हता. तुम्ही दिलेल्या माहितीवरून गुगलून पाहिलं तर प्यार का सपना हे नाव मिळालं.
===

सूलू, BLACKCAT,
हो मुंबईचा फौजदार. फार पूर्वी पाहिलाय...

मी तर या चित्रपटा बद्दल ऐकलं किंवा वाचलं पण नव्हते. काल च बघितला डाऊनलोड करून. ठिकठाक वाटला.
मुंबई चा फौजदार, बहूराणी, नसिब अपना अपना, बघितले होते.

सस्मित, सूलू_८२,सनव, चिन्नु, अमा, pravintherider धन्यवाद! Happy

>>साधारण असाच 'नसीब अपना अपना' असा एक अतिशय भयंकर चित्रपट होता.

अरे बापरे, 'भला है बुरा है जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है' नामक भयानक गाणं आणि त्या दाक्षिणात्य नटीच्या डोक्यामागे काटकोनात असलेली तिची वेणी आठवली Uhoh

>>स्वप्ना जी ,चित्रपट विषयी छान लिहितात तुम्ही पण ते आधे अधुरे पन्न कधी पुढे नेणार

स्वप्नाजी म्हणू नका हो, उगाच राजकारणात गेल्यासारखं वाटतं. Happy नुस्तं स्वप्ना म्हणा. आणि हो, मला उद्देशून लिहिताना 'तुम्ही' शब्द वापरना मना है Proud पुढला पन्ना लिहायची चालढकल करत होते. कारण विकांताला एक तरी जुना चित्रपट बघते आणि मग त्यावर लिहिते. पन्न्याला वेळ उरत नाही सलग बसून लिहायला. पण आता 'दिसामाजी काहीतरी लिहावे' तसं रोज थोडं थोडं लिहेन. पराणी टोचल्याबद्दल धन्यवाद Happy

' प्यार का सपना' पाहून इथे लिहावं का त्याबद्दल?? Proud

' प्यार का सपना' पाहून इथे लिहावं का त्याबद्दल?? >>> गप गुमान 'पन्ने' लिही असं काही करण्यापेक्षा Happy

गप गुमान 'पन्ने' लिही असं काही करण्यापेक्षा+११११११

‘औरतको किसीभी मर्दके सहारेकी जरुरत नही होती’ म्हणणारे गीताचे वडील जास्त शहाणे वाटतात आणि लक्षात राहतात. असे बाप मिळाले असते तर त्या (आणि आजच्याही!) काळातल्या किती स्त्रियांचं आयुष्य अधिक सुखकर झालं असतं असं वाटल्यावाचून रहात नाही.+११११११

नेहमीप्रमाणे छान लेख Happy

त्यात ती अशिक्षित असते, नन्तर काय तरी शिकून हवालदार होते. >>>>>> अच्छा अस आहे, तर धन्स BLACKCAT Happy

आ, 'प्यार का सपना' हर्षिकेश मुखर्जीन्चा आहे? Uhoh

पन्ना लिहायचा कि नाही, कधी लिहायचा ते तुझी तू ठरव. पण ही मालिकादेखील लिहित रहा. मला आवडतात या काळातले सिनेमा. मी ते पाहिले असण्याची शक्यतादेखील असते आणि प्रतिसादातील चर्चेतून काही नवीननवीन माहिती कळते.
तेचजर ७०-८० नंतरचे चित्रपट असतील तर मी बऱ्याचदा ते धागे वाचतदेखील नाही...

नाही त्या चित्रपटात माला सिन्हा आणि विश्वजित आहेत. ती अनपढ गाव की गोरी असते. तो नाईलाजाने तिच्याशी लग्न करतो, घरच्यांच्या आग्रहामुळे. पण लग्न झाल्याझाल्या परदेशी पळतो. अशोककुमार तिला मॉड बनवतो, इंग्लिश शिकवतो आणि परदेशी पाठवतो. मग तो तिच्या प्रेमात पडतो, ती खरी ओळख लपवून ठेवते. पण शेवटी आपलं लग्न झालंय हे लक्षात ठेवून भारतात बायकोकडे परत येतो आणि मग गोड शेवट होतो.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
चित्रपट आहे प्यार का सपना.

Pages