नम्रता बराच वेळ तशीच हात जोडून उभी होती. नजर देवघरातल्या देवांवर खिळली होती.... पण कुठेतरी शून्यात हरवल्यासारखी ! मनात वेगवेगळे विचार येत होते- युनिट चं फील्ड लोकेशन वर जाणं... खरं तर मागच्या काही महिन्यांपासून सगळेच या बातमीची वाट बघत होते. कारण गेली पाच एक वर्षं युनिट पीस लोकेशन मधे होती....आता फील्ड मधे जाऊन तिथे गेल्या दोन वर्षांपासून तैनात असलेल्या एका युनिटची जागा घ्यायची होती,
'यावेळी युनिट हार्ड फील्ड मधे जाणार' अशी कुणकुण होतीच सगळ्यांना. त्यामुळे ऑफिसर्स बरोबरच युनिट मधल्या ladies नी पण हळूहळू पुढची प्लॅंनिंग करायला , त्या दृष्टीनी विचार करायला सुरुवात केली होती. कारण नव्या जागी ऑफिसर्स बरोबर त्यांच्या परिवारांना राहायची परवानगी नव्हती. बरीच कारणं होती त्यामागे..आणि ती सगळी अगदी योग्यच होती....सगळ्यात मुख्य कारण म्हणजे परिवारातल्या सदस्यांची सुरक्षा ! त्याशिवाय म्हणाल तर शाळा, अद्ययावत वैद्यकीय सेवा या महत्वाच्या बाबींची उणीव !
त्यामुळे जेव्हा एखादी युनिट फील्ड लोकेशन वर जाते तेव्हा त्या युनिट मधल्या ऑफिसर्स आणि जवानांचे परिवार यांना त्यांच्याबरोबर जाणं शक्य नसतं.
अशा वेळी प्रत्येक परिवार आपापल्या दृष्टीनी जसं सोयीचं असेल त्याप्रमाणे ठरवतो. काही बायका आपल्या मुलांना घेऊन सासरी किंवा माहेरी जाऊन राहतात तर काही जणी आर्मी च्या Field Area Family Accommodation (FAFA) किंवा Separated Family Accommodation (SFA) मधे राहतात.
FAFA या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल..जेव्हा एखाद्या सैनिकाची फील्ड पोस्टींग येते, तेव्हा त्याच्या परिवारासाठी आर्मी तर्फे काही शहरांमधे अशी घरं उपलब्ध करून दिली जातात. ही घरंही इतर आर्मी च्या घरांसारखीच असतात आणि शक्यतो आर्मी कॅन्टोन्मेंट च्या परिसरातच असतात. जर एखाद्या ऑफिसर च्या परिवाराला या घरात राहायचं असेल तर त्यासाठी त्या शहरातल्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तसा अर्ज करावा लागतो. त्या ऑफिसर ची जी रँक असेल त्या पेक्षा एक रँक खालचं घर मिळतं… म्हणजे जर एखाद्या ‘मेजर’ च्या परिवाराला SF accommodation हवं असेल तर त्यांना कॅप्टन च्या रँक करता अधिकृत असलेलं घर मिळतं.
नम्रतासमोर देखील हे सगळे पर्याय होते आणि त्यातूनच तिला सध्याच्या परिस्थितीत योग्य असा पर्याय निवडायचा होता.
पण हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार होता. मुलींची शाळा हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता. चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत नम्रता आणि मुली याच घरात राहू शकणार होत्या, पण त्यानंतर मात्र त्यांना हे घर सोडून दुसरीकडे शिफ्ट करावं लागणार होतं. आणि - हे 'दुसरीकडे' म्हणजे नक्की कुठे - याबद्दलच विचार करायला सांगितलं होतं संग्रामनी तिला.
पहिला पर्याय होता- संग्रामच्या आईवडिलांकडे - गणपतीपुळ्याला जाऊन राहाणं. खरं म्हणजे नम्रताच्या दृष्टीनी हाच पर्याय सगळ्यात योग्य होता...आणि त्याचं कारणही तसंच होतं....ते म्हणजे तिचे सासू सासरे! दोन दिवसांपूर्वीच त्यांच्याशी फोन वर बोलताना संग्रामनी त्याच्या फील्ड पोस्टींगचं त्यांच्या कानावर घातलं होतं. 'संग्राम पुन्हा बॉर्डरवर जाणार आहे' या नुसत्या कल्पनेनीच तिचे सासू सासरे किती हवालदिल झाले होते. त्यांच्या बोलण्यातून, आवाजाच्या कंपनातून त्यांची काळजी, त्यांना वाटणारी भीती नम्रताला जाणवली होती.
अशा परिस्थितीत जर ती मुलींना घेऊन त्यांच्याबरोबर राहिली असती तर त्यांना खूप मोठा मानसिक आधार मिळाला असता. आणि दोन्ही नातींबरोबर त्यांचा वेळही चांगला गेला असता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे- 'त्यांना धीर द्यायला,त्यांची काळजी घ्यायला नम्रता आहे'- या एका जाणिवेमुळे संग्राम पण त्या बाबतीत निर्धास्त झाला असता.
पण या सगळया आयडियल situation मधे एक मोटठी अडचण होती आणि ती म्हणजे तिथे मुलींसाठी योग्य शाळा नव्हती. तसं पाहता आत्ता मुली लहान वर्गात होत्या- नंदिनी तिसरीत आणि अनुजा नर्सरी मधे, त्यामुळे पुढची एक दोन वर्षं एखाद्या छोट्या शाळेत गेल्या असत्या तरी फारसा फरक नसता पडला.. पण प्रश्न होता त्यानंतरच्या शिक्षणाचा. कारण अजून दोन अडीच वर्षांनी संग्राम फील्ड मधून परत आल्यानंतर जेव्हा ते सगळे एकत्र राहणार तेव्हा तिथल्या एखाद्या चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळणं हेही आवश्यक होतं.
दुसरा पर्याय होता- पुण्याला नम्रताच्या माहेरी राहायचा. पण तो पर्याय स्वतः नम्रतालाच मान्य नव्हता. याबाबतीत तिचे विचार अगदी स्पष्ट होते... माहेरपणाला म्हणून थोडे दिवस तिकडे जाऊन राहाणं वेगळं आणि सलग दोन अडीच वर्षं राहाणं वेगळं!
तसं पाहता नम्रताचा मोठा भाऊ आणि भावजय खूपच प्रेमळ होते. तिची श्रेयावहिनी तर तिच्यासाठी मोठ्या बहिणीच्या जागी होती. जेव्हा जेव्हा नम्रता मुलींना घेऊन माहेरी जायची तेव्हा प्रत्येक वेळी वहिनी आणि दादा अगदी उत्साहानी, आपलेपणानी त्यांचं आदरातिथ्य करायचे. नंदिनी आणि अनुजाला पण खूप आवडायचं पुण्याला मामाच्या घरी जायला! दादाचा मुलगा अथर्व पण त्या दोघींचा फेव्हरिट भाऊ होता.
नंदिनी तीन चार वर्षांची असताना एकदा नम्रता तिला घेऊन माहेरी आली होती, त्यावेळी अथर्वनी नंदिनी ला 'झुकझुक झुकझुक अगीनगाडी' हे गाणं शिकवलं होतं.. तेव्हापासून प्रत्येक वेळी पुण्याला जाताना नंदिनी तेच गाणं म्हणत राहायची. आणि आता तिचं ऐकून अनुजा पण तिच्या सूरात आपला सूर मिसळायची !
एकदा तर अनुजा तिच्या मामीला म्हणाली होती," तू खरंच आमची मामी आहेस का?" तिच्या या प्रश्नाचा रोख कोणाच्याच लक्षात नाही आला, पण तिच्या पुढच्या प्रश्नानी मात्र सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली होती. अनुजानी विचारलं," मग त्या गाण्यातल्या सारखी तू आम्हांला रोज रोज पोळी आणि शिकरण का नाही देत?आणि गुलाबजाम सुद्धा ?" आणि गंमत म्हणजे, आपलं 'मामीपण' सिद्ध करण्यासाठी म्हणून आता प्रत्येकवेळी श्रेया अगदी प्रेमानी मुलींकरता शिकरण आणि गुलाबजाम करायची....अगदी आठवणीनी !
पण तरीही 'माहेरी राहाणं' हा पर्याय नम्रताला मान्य नव्हता. 'ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये' हे नात्यांबद्दलचं सत्य ती जाणून होती.
या अशा पार्श्वभूमीवर नम्रताकडे एकच पर्याय होता...SF ऍकोमोडेशन घेऊन राहाणं !
क्रमशः
खूप छान चालू आहे.
खूप छान चालू आहे. मिलिटरीवाल्यांच्या कुटुंबियांच्या भावना खूप छान मांडल्या आहेत. पण शीर्षक जितकं मला समजलं असं वाटतंय काळजाचा ठोका चुकवणारं आहे.
मेघना, प्रतिक्रियेबद्दल
मेघना, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्हाला कथा आवडेल अशी आशा आहे.