उर्वरित जीवनसत्वे व लेखमालेचा समारोप

Submitted by कुमार१ on 24 January, 2019 - 23:22

जीवनसत्वे : भाग ८ (अंतिम)

(भाग ७: https://www.maayboli.com/node/68838)
********************

या लेखमालेत आतापर्यंत आपण ६ जीवनसत्वांचा स्वतंत्र लेखांतून आढावा घेतला. उरलेल्यांपैकी काहींचा धावता आढावा या लेखात घेत आहे. या सर्वांना एका लेखात कोंबले आहे म्हणून त्यांना ‘चिल्लीपिल्ली’ समजू नये ! आरोग्यदृष्ट्या ती सर्वच महत्वाची आहेत. फक्त त्या प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहीण्याइतका मजकूर नाही.

K जीवनसत्व :
जीवनसत्वांची ऐतिहासिक नावे इंग्रजी वर्णमालेनुसार A ते E अशी दिलेली होती. जेव्हा या नव्या जीवनसत्वाचा शोध लागला, तेव्हा वर्णमालेचा क्रम बिघडवून संशोधकांनी एकदम Kवर का उडी मारली असावी याचे वाचकांस कुतूहल वाटेल. Kचे शरीरातील कार्य जखमेनंतर आपले रक्त गोठण्याच्या( coagulation) संदर्भात आहे. त्याचा जेव्हा शोध लागला तेव्हा तो प्रथम एका जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. त्या भाषेत coagulation हा शब्द Koagulations असा लिहीला जातो. त्यामुळे त्याला K हे लघुनाम मिळाले.
Quinone हे त्याचे अधिकृत नाव.

K आपल्याला पालेभाज्या आणि नेहमीच्या तेलांतून सहज मिळते. तसेच आपल्या मोठ्या आतड्यांतील उपयुक्त जीवाणूही ते तयार करतात. त्यामुळे सहसा त्याचा अभाव दिसून येत नाही. काही नवजात बालकांत अभाव होऊ शकतो आणि त्यांना रक्तस्त्राव होतो. प्रौढांमध्ये जर काही आजारांत काही antibiotics तोंडातून दीर्घकाळ दिली गेली तर त्यामुळे आपल्या आतड्यातले उपयुक्त जीवाणू मरतात. त्यातून K चे अंतर्गत उत्पादन कमी होते.

उर्वरित ‘ब’ जीवनसत्वे :
सर्व ‘ब’ जीवनसत्वांचा एक गट करण्यामागे कारण आहे. सहसा ती विविध आहारस्त्रोतांत एकत्रित आढळतात. साधारणपणे जेव्हा ‘ब’चा अभाव होतो तेव्हा तो एकापेक्षा जास्त जीवनसत्वांचा मिळून असतो. तरीसुद्धा या गटातील काही विशिष्ट घटकांच्या अभावाने स्वतंत्र आजार होऊ शकतात.
यांतील ब- २,३,६ व ९ यांचा थोडक्यात आढावा घेतो.

ब-२ (Riboflavin):
हे मुख्यतः पेशींत ऊर्जानिर्मितीचे गतिवर्धक म्हणून काम करते. त्याचा अभाव समाजात बऱ्यापैकी दिसतो.

Ariboflavinosis Institute of child health.jpeg

त्याने तोंडाचा दाह (“तोंड येणे”) होतो. हा दाह मुख्यतः ओठांच्या कोपऱ्यात (angles) दिसतो. तसेच त्वचेचाही दाह होतो.

ब-३ (Niacin):
याचे कार्यही ब-२ प्रमाणेच. ते आपल्या शरीरात एका अमिनो आम्लापासून तयार होते पण तेवढे पुरेसे नसल्याने आहारातूनही आवश्यक. त्याच्या अभावाचे तीन परिणाम असे:
१. त्वचेचा दाह : याचे वैशिष्ट्य म्हणजे तो शरीराच्या कपडे न घातलेल्या भागांवर होतो. साधारण तो दोन्ही हात व मानेचा उघडा भाग इथे दिसतो.
२. जुलाब होणे
३. मानसिक ऱ्हास

Pellagra2.jpg
या आजाराला Pellagra (= शुष्क त्वचा ) असे म्हणतात.

ब-६ (Pyridoxine)
: हे ऊर्जानिर्मिती आणि अमिनो आम्लांचा चयायपचय यांत महत्वाची भूमिका निभावते. निव्वळ त्याच्या एकट्याचा अभाव सहसा दिसत नाही.

ब-९ (Folic acid) :
हे जीवनसत्व ब-१२ च्या जोडीने DNAच्या निर्मितीत योगदान देते. किंबहुना ही दोन्ही जीवनसत्वे जोडीने काम करतात. हिरव्या पालेभाज्यांच्या मोठ्या पानांमध्ये (foliage) हे विपुल प्रमाणात आढळते. त्यामुळेच त्याला folic असे नाव मिळाले.
गर्भवती स्त्रियांत याची गरज नेहमीपेक्षा दुप्पट असते. या अवस्थेतील त्याच्या अभावाने गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून सर्व गर्भवतीना folic a च्या गोळ्या नियमित दिल्या जातात.
preg.jpg

ब-९ च्या अभावाने रक्तन्यूनता होते आणि ती ब-१२ च्या अभावासारखीच असते. त्याच्या अभावातून मोठ्या आतड्यांचा कर्करोग बळावू शकतो असे अलीकडील संशोधनातून वाटते आहे.

‘ब’ गटातील राहिलेली दोन जीवनसत्वे म्हणजे Biotin व Pantothenic acid. ऊर्जानिर्मितीत काम करणाऱ्या अन्य ‘ब’ ना ती साथ देतात एवढी माहिती पुरे.

‘ब’ कुटुंबात एकूण ८ घटक आहेत परंतु त्यांचे क्रमांक मात्र १ ते १२ असे दिलेले आहेत. या क्रमांकांपैकी ४,८,१० व ११ हे क्रमांक कोणालाच दिलेले नाहीत याची नोंद घ्यावी. किंबहुना अशा ऐतिहासिक आकडेवारीपेक्षा प्रत्येक जीवनसत्व हे त्याच्या अधिकृत रासायनिक नावाने ओळखले जावे.
* *

तर अशी ही १३ जीवनसत्वे. मुळात ती आपल्यासाठी आवश्यक अशी सूक्ष्म पोषणद्रव्ये आहेत. जरी ती आहारात खूप कमी प्रमाणात लागत असली तरी शरीरातील त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. मूलभूत चयापचय, शरीर-बळकटी, प्रतिकारशक्ती आणि काही महत्वाच्या इंद्रियांचे संरक्षण अशी अनेकविध कामे ती करतात. ही मूलभूत माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने ही लेखमाला आपल्यापुढे सादर केली. ती उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे.

सरतेशेवटी या लेखमालेतील वाचकांच्या सहभागाबद्दल थोडे विवेचन. नियमित वाचकांना ती आवडली आणि त्यांनी पूरक माहितीची भर घालून छान चर्चा केली .’अ’, ‘क’, ’ड’ आणि ब-१२ च्या चर्चा विशेष रंगल्या. ‘क’ च्या संदर्भात वाचकांचे विविध आंबट फळांबाबतचे कुतूहल दिसून आले. बऱ्याच जणांना ते सर्दीसाठी उपयुक्त वाटते. एकूणच फळांच्या राज्यातील ती सफर रंजक ठरली. तर ‘ड’च्या चर्चेत सूर्यप्रकाशाचे योगदान हा उत्सुकतेचा मुद्दा ठरला.
****************************
जाता जाता ... थोडा विरंगुळा ...

वैद्यकीय शिक्षणादरम्यान जेव्हा ही १३ जीवनसत्वे अगदी घासून अभ्यासावी लागतात तेव्हा डोके भंजाळून जाते ( कदाचित इथल्या वाचकांचेही आता तसे झाले असेल !). मग तो शिणवटा घालवण्यासाठी विद्यार्थी काही गमतीजमती शोधतात. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दोन नव्या जीवनसत्वांचा शोध लावला होता ! अधिकृत यादीतील “K’ च्या पुढे जाऊन ती आहेत L व M.
म्हणजे काय ते ओळखताय का?....
........
जाऊदे, सांगतोच.
L = Love आणि M = Money !!
ही दोन्ही आपल्या सर्वांना आयुष्यभर कमीअधिक प्रमाणात लागतातच ! ती तुम्हा सर्वांना इच्छित प्रमाणात कायम मिळोत, या सदिच्छेसह निरोप घेतो.
पुनश्च एकवार सर्व माबोकर आणि प्रशासक यांचे मनापासून आभार.
***********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली लेखमाला.
संपताना चेहर्‍यावर हलकेसे हसू आणलेत.
धन्यवाद डॉक्टर

लेखमाला खूप छान झाली, धन्यवाद डॉक्टर!

केसगळती साठी बायोटिन च्या गोळ्या देतात व त्याने ती लगेच थांबतेही. तेव्हा केसगळती बायोटिन च्या अभावामुळे होते का?
काही औषधांमुळे (उदा. SSRI) केस गळतात तेव्हा सोबत बायोटिनच्या गोळ्या देतात.

पण एरव्ही केस गळत असतील तर या गोळ्या घेऊ शकतो का?

वरील सर्व नियमित वाचकांचे मनापासून आभार. तुम्ही दाखवत असलेल्या आपुलकीमुळेच लेखमाला रंजक झाली.

@ मानव,
‘केसगळती’ वरील उपचार हा एक चमत्कारिक विषय आहे ! अनेक शास्त्रीय तसेच अशास्त्रीय उपचारांची या क्षेत्रात रेलचेल आहे. जवळपास निम्मी जीवनसत्वे आणि काही खनिजे उपयुक्त असल्याचे दावे केले जातात. बायोटीनच्या अभावाने काही रुग्णांत केस गळतात हे खरे आहे. पण, तो या त्रासावरील उपचार होऊ शकतो का यासंदर्भात पुरेशा क्लिनिकल ट्रायल्स झालेल्या नाहीत. त्यामुळे ठाम मत देता येत नाही.

छान लेखमाला .
शेवटही तितकाच हलकेफुलका .

पुढच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत Happy

जाई व मंजुताई,
सातत्यपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार.
संदीप,
K
ला के च म्हणावे लागेल, कारण C ला आपण क म्हणतो.

ह्या संदर्भात एक whatsapp forward आलाय, तो इथे चिकटवत आहे नावासाहित आहे.. dr कुमार ह्यांना अयोग्य वाटल्यास उडवीन

साभार शौनक ताम्हाणे

मासिक पाळी - वेदनेतून सुटका

'व्हिटॅमिन बी वन'च्या माझ्यावरच्याच उपाचारामुळे त्याचं महत्त्व मला माहीत होतंच, या व्हिटॅमिनचा उपचार मी मासिक पाळीच्या दुखण्यावर करायला सुरुवात केली आणि मुलींचं दुखणं एकदम कमी झालं. त्यासाठी केलेल्या संशोधनाविषयी.. मासिक पाळीतील वेदना, या अतिशय त्रासदायक दुखण्यावर एक अचूक आणि सोपा उपाय कसा शोधून काढला त्याची ही गोष्ट. मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते. १९५६ चा मे किंवा जून महिना असावा. मी पुण्याला प्रॅक्टिस सुरू करून तीन वष्रे झाली होती. खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या केसेस मी आधीसुद्धा तपासलेल्या होत्या. पण या वेळेला कसे कोण जाणे काहीतरी वेगळे झाले हे मात्र खरे.

माझ्या मोठय़ा बहिणीची, मालूताईची मत्रीण तिच्या १८ वर्षांच्या मुलीसह माझ्याकडे आली. पाळी सुरू झाल्यापासून पाळी आली की, इतकं पोट दुखायचं, की तीन दिवस ती शाळेत जाऊच शकायची नाही. तिला मळमळायचं, उलटय़ा व्हयच्या, ताप यायचा. कॉलेजमध्येही तसंच होत होतं. पण आता डॉक्टर होण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता. आता दर महिन्याला तीन दिवस कॉलेज बुडवून कसे चालेल?यावर जे अनेक उपाय केले जातात, ते मला माहिती होतेच. पण ते तात्पुरतेच असतात. किंवा ऑपरेशन करून, गर्भाशयाचे मज्जातंतू मध्ये कापून, त्याचा तुकडा काढून टाकणे (Cottels Operation) हा उपाय पोटदुखी कायमची थांबवतो.

पण यातले कोणतेही उपाय पोटदुखीचं मूळ कारण बरं करत नाहीत. मग दुसरं काही करता येईल का? मी विचार करू लागले. खरं तर या Primary Dysmenorrhe मध्ये मज्जातंतूंना सूज येते हे १९२५ सालीच 'अमेरिकन जर्नल ऑफ सर्जरी'मध्ये प्रसिद्ध झालेलं होतं. मग मज्जातंतूंच्या सुजेवरच का उपाय करून पाहू नये? त्या मज्जातंतूंना सूज असते, पण कुठलाही जंतुसंसर्ग झालेला नसतो. मज्जातंतूंना सूज येण्याचं एक कारण म्हणजे 'व्हिटॅमिन बी वन' कमी असणं असा शोध तर १९३२ साली लागला होता आणि त्याबद्दलचं नोबेल प्राइजही त्या शोधाला मिळालं होतं.आणि शिवाय मला स्वत:लाच 'व्हिटॅमिन बी वन'च्या उपचाराचा खूप फायदा झाला होता. १९३६ च्या जूनमध्ये मी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये गेले. गावदेवीला आर्य महिला समाजचं होस्टेल आहे, तिथे राहात होते.
मला तिथलं जेवण अजिबात आवडत नव्हतं. मी सारखी आजारी पडायला लागले. घसा धरायचा, ताप यायचा. उजवा पाय दुखायला लागला आणि त्याला सूज आली. अॅनॉटमीचे प्रोफेसर डॉ. मोटवानींना मी पाय दाखवला. त्यांनी मज्जातंतूंना सूज आली आहे त्यावर औषध घ्यायला पाहिजे, असं सांगितलं. माझी एक मावस बहीण मथुताई उकिडवे गिरगाव बॅकरोडला राहात होती. तिचे यजमान डॉक्टर होते आणि त्या काळात ते शिकायला अमेरिकेला जाऊन आले होते. त्यांनी मला तपासून कंपाउंडरकडून पुडय़ा घेऊन जायला सांगितलं.

रोज दोन्ही वेळा भातावर घालून खायला सांगितलं. पंधरा दिवसांत सूज जाऊन पाय दुखायचा थांबला. पुडय़ांमध्ये िपगट रंगाचं औषध होतं. ते काय होतं हे मी त्यांना विचारलं तर तो 'हातसडीच्या तांदळाचा कोंडा होता' असं त्यांनी मला सांगितलं-त्यात भरपूर 'व्हिटॅमिन बी वन' असतं असंही सांगितलं. त्यांच्याकडे उखळ, मुसळ आणि कांडणारा माणूस होता. ते नेहमी हातसडीचेच तांदूळ खायचे. गिरणीवर सडल्या गेलेल्या तांदळाला जास्त उष्णता लागून व्हिटॅमिन बी वन टिकत नाही हेही सांगितलं. ते कमी झालं की मज्जातंतूंना सूज येते असं सिद्ध झालेलं त्यांना माहीतच होतं. तेव्हापासून मलाही ते माहीत झालं. बेरीबेरी या रोगावर त्याचा उपयोगही सुरू झाला. मी तिला 'व्हिटॅमिन बी वन'ची १०० मिलीग्रॅमची एक गोळी रोज दुपारी जेवल्यावर घ्यायला सांगितलं आणि महिन्यानं परत भेटायला बोलावलं.

एक महिन्यानंतर ती आली आणि सांगितलं की पोट अजिबात दुखलं नाही, पण मळमळलं, उलटय़ा झाल्या आणि ताप आला. मग आणखी एक महिना तशाच गोळ्या घ्यायला सांगितल्या. दुसऱ्या महिन्यानंतर ती आली आणि काहीच तक्रार राहिली नाही असं सांगितलं. मग मी तिला आणखी एक महिना गोळ्या घ्यायला सांगितल्या. असा तो तीन महिन्यांचा कोर्स ठरला. यामुळेच मी अशा सगळ्या रुग्णांना 'व्हिटॅमिन बी वन'ची १०० मिलीग्रॅमची एक गोळी रोज अशा तीन महिने घ्यायला सांगायला लागले. गोळ्या मी लिहूनच देत होते, आणि जे डॉक्टर तिला माझ्याकडे पाठवत, त्यांना तशी चिठ्ठीही देत असे (म्हणजे त्यात काहीही गुप्तता नव्हती.)
१९९१ च्या नोव्हेंबरमधे पुण्याला एक 'ऑल इंडिया अॅडोलसंट ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉकॉलॉजीची कॉन्फरन्स' होती. त्यात एखादा पेपर वाचावा असं मी ठरवलं. 'पाळीच्या वेळची पोटदुखी' हा विषयही निवडला. मी १९८६ मध्येच हॉस्पिटल बंद केलं होतं. पण ३३ वष्रे केलेल्या प्रॅक्टिसमधले आउटडोअरचे आणि इनडोअरचे सगळे पेपर्स माझ्याजवळ होते. (अजूनही आहेत) माझ्या गुरू, कामा हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसर-इन-चार्ज, डॉ. जेरुशा झिराड, यांनीच मला रेकॉर्डस ठेवण्याचं महत्त्व शिकवलं होतं.माझ्या रेकॉर्डसमधून मी अशा केसेस शोधून काढल्या त्या २०८ निघाल्या.

मग प्रथमच त्यांचं विश्लेषण केलं. त्यात ८७ टक्केपूर्ण बऱ्या झालेल्या, ८ टक्के मुलींची तक्रार कमी झाली होती आणि ५ टक्के मुलींवर काहीच परिणाम झाला नाही, असे निष्कर्ष निघाले. इतरांचे निष्कर्ष काय आहेत हे पाहायला मी 'ब्रिटिश लायब्ररीत' गेले. पण तेथे या उपचाराचा उल्लेखही सापडला नाही. लंडन येथून निघणाऱ्या 'लॅन्सेट' या मासिकामध्ये या विषयावर 'बोर्डिग द ट्रेन' असा मथळा असलेला एक लेख आढळला. त्यात त्यांनी 'तुम्ही आगगाडीत बसलात की, ती नेईल तिकडे जावेच लागते. त्याचप्रमाणे तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलात, तर अशा यातना सोसाव्याच लागतात, त्याला काही इलाज नाही' असा निष्कर्ष काढला होता.
मी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन, तिथली सगळी पुस्तकं आणि जर्नल्स शोधली, पण तिथेही या उपचाराचा उल्लेखही सापडला नाही. त्यामुळे माझ्याशिवाय कोणीही हा उपचार करत नाही, असं लक्षात आलं. ठरल्याप्रमाणे मी परिषदेत माझा निबंध वाचला. तिथे उपस्थित असलेलं कोणीही असा उपचार करत नव्हतं. मग त्यावर बरीच चर्चा आणि ऊहापोह झाला. मग माझ्या उपचारावर एक लेख लिहून तो छापून आणावा, असं मी ठरवलं.

'लॅन्सेट' हे जवळजवळ दीडशे वष्रे लंडनहून निघणारं मासिक आहे त्यातच तो छापून आणावा असा विचार करून मी माझा लेख 'लॅन्सेट'ला पाठवला. त्यांचं मत असं पडलं की शास्त्रोक्त पद्धतीने इंग्रजीत ज्याला 'डबल ब्लाइंड प्लॅसिबो कंट्रोल स्टडी' म्हणतात तसा करायला पाहिजे. मग लेख छापण्याबद्दल विचार केला जाईल.
'लॅन्सेट'चा सल्ला मी मानला आणि 'डबल ब्लाइंड प्लॅसिबो कंट्रोल स्टडी' करण्याच्या तयारीला लागले.मुली मिळणे सगळ्यात महत्त्वाचे. अशा मुली एके ठिकाणी मिळाल्या तर बरं पडेल, म्हणून मी िहगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या बोìडगमध्ये गेले. तिथल्या सुपरवायझर सुषमा देशपांडे यांना भेटले. त्यांना मी माझा प्रकल्प समजावून सांगितला. पाळीच्या वेळेच्या पोटदुखीवर मी एक औषध देणार आहे. त्यात रोज एक गोळी अशा पाच महिने द्यायच्या आहेत. त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही, याची मी लेखी खात्री देते. असं सांगितल्यावर त्यांनी मुली बोलावल्या. त्यांचा प्रत्येकीचा मी वय, वजन, उंची व पाळीचा इतिहास असं सगळं लिहिलेले कागद तयार केले. त्या एकूण ४४ मुली होत्या. त्यांचे मी दोन गट केले. सारख्या दिसणाऱ्या लहान लहान कॅप्सूल्स आणल्या.

तशा ३० कॅप्सूल्स मावतील अशा सारख्या दिसणाऱ्या लहान डब्या आणल्या, २२ डब्यात व्हिटॅमिन बी वनच्या गोळ्या तुकडे करून कॅप्सूलमधे भरून तशा ३० कॅप्सूल्स एका डबीत भरल्या. आणखी २२ डब्यांत साखर (प्लॅसिबो) भरून, एकेका डबीत ३० कॅप्सूल्स भरल्या.

प्रत्येक डबीवर रुग्णाच्या नावाचं लेबल चिकटवलं. असे दोन गट केले आहेत, आणि अशा दोन प्रकारच्या कॅप्सूल्स आहेत हे माझ्याशिवाय देशपांडे यांनाही माहीत नव्हतं. (ब्लाइंड ऑब्झर्वर)अशा पाच महिने (३ महिने व्हिटॅमिन बी वन आणि २ महिने साखर) कॅप्सूल्स घेऊन झाल्यावर मी सुषमा देशपांडय़ांना मुलींच्या दुखण्यात काही फरक झाला आहे का? असे विचारले. त्यांनी त्या मुलींची सभा घेऊन, औषध घेऊन ज्यांना बरं वाटलं आहे, त्यांनी हात वर करा असं सांगितलं. जवळजवळ सर्वच मुलींनी आनंदानं हात वर केले. मग एकेकीला बोलवून परिणाम विचारून, त्यांचं विश्लेषण केलं तर ते माझ्या रेकॉर्डमधल्या २०८ केसेसच्या परिणामांच्या प्रमाणाप्रमाणेच निघालं.

मग परत त्यावर लेख लिहून तो 'लॅन्सेट'ला पाठवला. तो त्यांनी परत पाठवला, कारण ४४ हा आकडा पुण्याच्या लोकसंखेच्या मानाने फारच लहान आहे म्हणून हे निष्कर्ष ग्राह्य धरता येत नाहीत, असे सांगितले. नाउमेद न होता, मी पुण्याच्या 'हिंदुस्थान अँटीबायोटिक्स'च्या संख्याशास्त्र विभागात चौकशी केली. त्यांनी ५३० हा आकडा या वयोगटासाठी, पुण्यासाठी प्रातिनिधिक ठरेल असे सांगितले. आता प्रश्न आला पशाचा. माझं वय तेव्हा ७६ वर्षांचं होतं. मी इंडियन इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चला अर्ज केला असता तर त्यांनी मला लागणारे एक लाख रुपये नक्की दिले असते. पण माझा अर्ज आणि मी करणार असलेलं संशोधन, त्यांच्या निरनिराळ्या विभागांमध्ये जाऊन, ते पास होऊन मला चेक मिळेपर्यंत मी असेन की नसेन आणि असले तरी मला तितकी शारीरिक क्षमता असेलच असं सांगता येत नाही, या विचारात मी द्विधा मन:स्थितीत होते, पण माझा हा प्रश्न गोखले यांनी सोडवला.

ते मला म्हणाले 'तुझ्याकडे एक लाख रुपये आहेत का नाहीत?'मी म्हटलं,'आहेत'.'मग ते कशासाठी ठेवले आहेस?' मला नवीन मोटार घ्यायची आहे.' - मी. तू ते खर्च कर, मी तुझी मोटार नव्यासारखी करून देतो'. असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याप्रमाणे ४०-४२ हजार रुपये खर्चून मोटार नव्यासारखी केली आणि मी मुली शोधण्याच्या उद्योगाला लागले. मी पुण्यातल्या नऊ शाळा आणि चार बोìडग्जशी संपर्क साधला.

शाळांच्या मुख्याध्यापिकांना भेटून त्यांना मी माझा संशोधनाचा विषय समजावून सांगून, मला मुलींशी का बोलायचे आहे ते सांगितलं. सर्व शाळांनी सहकार्य करून संपर्काकरता एक एक अध्यापिका नेमली. त्यांनी नववी आणि दहावीच्या मुलीकरता माझी व्याख्यानं ठेवली. विषय अर्थातच 'पाळीच्या वेळची पोटदुखी' मी प्रथम शास्त्रीय माहिती सांगून, त्या वेळी कोणाकोणाचं पोट का दुखतं तेही सांगायची. तो विषय त्यांच्या फारच जिव्हाळ्याचा होता, कारण आदल्या दिवशी भावाबरोबर हिरिरीनं बॅडिमटन खेळणारी मुलगी दुसऱ्या दिवशी पोटदुखीनं बेजार होते.

खेळणं काय, शाळेत जाणंही अशक्य होतं. वेगवेगळी औषधं घेऊन, दुखणं तात्पुरतं आटोक्यात आलं, तरी दर महिन्याला धास्तीच असते. असा निष्कारण आजार आल्यामुळे चडफडण्याखेरीज काहीही करणं हातात नसतं. असं वर्णन केलं की, ते त्या मुलींना लगेच पटायचं. मग त्यावर मी एक औषध देणार आहे, ते पाच महिने घ्यायचं आहे. ज्यांना अशी तक्रार असेल, त्यांनी मला भेटा असं सांगितलं की, त्या उत्साहानं थांबायच्या. काही काही शाळेत तर माझी दोन-दोन व्याख्याने झाली.मी मदतीला नर्सला बरोबर नेत असे. तिच्याजवळ कागद असत. त्यावर ती मुलीचं नाव, पत्ता, इयत्ता, तुकडी लिहून मुलीच्या पाळीची सर्व माहिती लिहीत असे व मुलीला तिच्या पालकांना द्यायला माझ्या प्रकल्पाची माहिती आणि त्यांच्या पाल्ल्याला असं औषध घ्यायला संमतीपत्र, असं देत असे.

बोìडगमधल्या मुलींना मी रात्री आठ-साडेआठला भेटत असे. बोìडग सुपरिंटेंडन्ट स्वत:च परवानगी देत असल्यामुळे त्यांचा काही प्रश्न नव्हता. अशा एकूण ७५० मुली मिळाल्या. त्यातल्या ५५७ पालकांचीच परवानगी मिळाली.आता 'जीवनसत्त्व बी वन'च्या गोळ्यांचा प्रश्न आला. इतक्या गोळ्या पुण्यात मिळणे कठीण होते. ग्लॅक्सो कंपनी 'बेरिन' नावानं व्हिटॅमिन बी वनच्या १०० मि. ग्रॅ. गोळ्या करत असे. म्हणून मी मुंबईला जाऊन त्यांच्या अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून घाऊक दरात त्या मिळवल्या. त्यांनी बाटलीमागे १८ रुपये कमी घेऊन गोळ्या विकल्या आणि वर ६००० गोळ्या देणगी म्हणून दिल्या. (दुर्दैवानं त्यांनी आता या गोळ्यांचं उत्पादन थांबवलं आहे.)मुलींची शाळावार विभागणी केली. मग त्यांचे दोन गट करून पाच महिने गोळ्या दिल्या. दर महिन्याला पाळीची आणि पोटदुखीची नोंद केली.

पाच महिने संपेपर्यंत दोन महिने उन्हाळ्याची सुट्टी लागली त्यामुळे औषध संपवून दोन महिने झाल्यावरच औषधांचा काय परिणाम झाला, ते समजू शकले. दहावीचा निकाल शाळेतच लागल्यामुळे त्याच दिवशी त्या मुलींना विचारता आले. बोìडगमधल्या काही मुली परत आल्या नव्हत्या. त्यांचे पत्ते मिळवून, पत्राने त्यांची माहिती मिळवली. 'महासंकटातून तुम्ही मला सोडवलंत.' या दुखण्यातून तुम्हीं माझी मुक्तता केलीत.' अशा आशयाची अनेक पत्रं आली!याचं संकलन केल्यावर, परत ८७ टक्के पूर्ण बऱ्या, ८ टक्के दुखणे कमी, आणि ५ टक्के फरक नाही, असलाच निष्कर्ष हाती आला. आता हे सांगूनही खरं वाटणार नाही, पण मी जेव्हा या सगळ्या नवीन अभ्यासावर आधारित लेख लिहून परत 'लॅन्सेट'ला पाठवला तेव्हा त्यांचं उत्तर आलं की 'व्हिटॅमिन बी वन' हे औषध नाही डाएटरी सप्लीमेंट आहे, सबब लेख प्रसिद्ध करू शकत नाही. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना मी ही हकिगत सांगितली.

सर्वाचं मत असं पडलं की शक्य तितक्या लवकर मी हा लेख प्रसिद्ध करावा.
मी तो लेख 'इंडियन जर्नल फॉर मेडिकल रिसर्च'कडे पाठवला. त्यात त्यांनी फेरबदल, काटछाट असे करून घेतले आणि ६ एप्रिल १९९६ च्या अंकात तो प्रसिद्ध केला. आता जेव्हा केव्हा इतर शास्त्रज्ञ, डॉक्टर्स या विषयावर लेख लिहितात तेव्हा माझा हा लेख प्राथमिक संदर्भ लेख म्हणून वापरतात. या उपचाराचं वैशिष्टय़ असं आहे की, त्याला डॉक्टरची चिठ्ठीही लागत नाही. ते औषधाच्या दुकानातून कोणीही आणू शकतं. त्याची मात्रा जास्त होऊ शकत नाही. आपलं शरीर ते जरुरीपुरतं घेऊन, जास्तीचं बाहेर टाकतं. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होऊ शकत नाहीत. तेव्हा 'आजीबाईच्या बटव्यातल्या' औषधाप्रमाणे हा घरगुती उपचार होऊ शकतो आणि मुलींची या नसत्या दुखण्यातून सुटका होऊ शकते.

लेखिका : डॉ. लीला गोखले
स्त्रोत : लोकसत्ता, चतुरंग, १७ जानेवारी २०१५

>>>
छान झाली लेखमाला.
धन्यवाद या माहितीपूर्ण लेखांसाठी.
<<<
+१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

@ किल्ली,
तो मजकूर मी २० वर्षांपूर्वीच ‘सकाळ’ मध्ये वाचला होता. मी तेव्हा त्या 100 mg च्या गोळ्या मिळवण्यासाठी पुण्यातील अनेक दुकाने पालथी घातली होती.
त्यांचे उत्पादन थांबले याचा खेद वाटतो.

>>पुनश्च एकवार सर्व माबोकर आणि प्रशासक यांचे मनापासून आभार.<<
डॉक्टरसाहेब, तुमच्या पुनरागमनाबद्दल धन्यवाद आम्हि द्यायला हवेत. पुढिल लेखनासाठी शुभेच्छा!!

राज ,
धन्यवाद! पुनरागमन तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांमुळे आनंददायी झाले आहे, हे वे सां न ल ☺️

लेख आवडलाच्,पण ही मालिका संपली त्याचं वाईट वाटलं.>>>> +१११

डॉक्टर, खूप उपयुक्त लेखमाला होती. तुमचे लेख वाचून खात्रीशीर माहिती मिळते. 'ब' गटात १२ क्रमांक असले तरी आठच जीवनसत्वे आहेत, हे नव्याने कळाले.
एक शंका आहे.
"ब-१७” असे काही जीवनसत्व आहे का? कुठेतरी वाचनात आले होते.

सर्व नवीन प्रतीसादकांचे आभार.
@ साद,
“ब-१७” हे अजिबात अधिकृत जीवनसत्व नाही. त्याचे रासायनिक नाव Amygdalin असून ते काही वनस्पतींत असते. त्याच्या कर्करोगातील उपयुक्ततेबाबत अशास्त्रीय दावे केले गेले आहेत. एका जागतिक आहार संघटनेने तर ते धुडकावून लावले आहे.

१९४८ नंतर कुठल्याही नव्या पदार्थाला जीवनसत्वाचा दर्जा दिलेला नाही. काही पदार्थ प्रतीक्षा यादीत आहेत हे खरे.

उत्तम लेखमाला
शास्त्रीय माहितीच्या बरोबरच तदानुषंगिक माहिती रोचक होती.
असेच उत्तमोत्तम लेख लिहीत रहा आम्ही वाचत राहु.
खूप धन्यवाद....

डॉक्टरसाहेब, खूप छान लेखमाला. तुमच्या या कष्टांबद्दल खूप आभारी आहे.
कृपया "लसीकरण (Vaccines & Immunizations) आणि त्याबद्दलचे गैरसमज" याविषयी पण एखादा लेख लिहावा, ही विनंती.

या लेखमालेत बेरीबेरी आणि पेलाग्रा या अनुक्रमे ब-१ आणि ब-३ यांच्या अभावाने होणाऱ्या रोगांचा उल्लेख आलेला आहे. भारतात आदिवासी भागांत या रोगांचे उच्चाटन करण्यात डॉ. के. गोपालन यांच्या संशोधनाचा वाटा महत्वाचा होता. त्यांच्या याबाबतीतील अतुलनीय कामांमुळे लोक त्यांना ‘न्यूट्रिशन गोपालन’ याच नावाने ओळखत असत. नुकतेच त्यांचे वयाच्या शंभरीत असताना निधन झाले.

त्यांना भावपूर्ण आदरांजली !

ही माध्यमे काहीही फेकाफेकी करतात आणि गैरसमज पसरवतात. त्याचे हे एक उदाहरण :
https://marathi.abplive.com/lifestyle/health/immunity-booster-not-only-v...

"व्हिटॅमिन के : प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन के देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन के शरीराला शक्ती देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते"

के जीवनसत्वाचा रक्त गोठण्याशी (आणि फार तर हाडांच्या बळकटीसाठी अप्रत्यक्ष) संबंध आहे.
.... यावरून अभ्यास न केलेला विद्यार्थी लेखी परीक्षेत जशी फेकाफेकी करतो त्याची आठवण होते Happy

Pages