जीव भांड्यात पडला
छोट्याशा गाडीतून एकदा
भाज्या निघाल्या फिरायला,
बसायच्या आधीच गाडीत
लागल्या कि त्या भांडायला !
हिरमुसलेली कोथिंबीर मग
लागली मुसमुसत रडायला,
पाहताना तिच्याकडे कांदा
लागला ना डोळे पुसायला !
वांग्याने उंच उडी मारताना
टमाटरला काढला चिमटा,
लाल लाल टमाटरने लगेच
दिला त्याच्या पाठी धपाटा !
मिरचीच्या वाटे मात्र तेव्हा
नेमकं कुणीही नाही गेलं,
शेजारी फक्त तिच्या तेवढे
निवांत बसूनच होतं आलं !
कोबीने गच्च धरला होता
जाड्या फ्लाँवरचाच हात,
धरून हात म्हणे सारखी
सोडू नकोस माझी साथ !
गाजर मुळ्याच्या शेजारी
बसले नाहीच कुणी खरे,
सोबतीला तीथेच शेजारी
त्यांच्या होते पालक बरे !
मजा करीत होत्या तिघीं
चवळी, भेंडी अन् गवार,
पाहताना बाहेरची गम्मत
होऊन दारा जवळ सवार !
बसताच भलीमोठी जागा
जाडू भोपळ्याने व्यापली,
गरीब बिचारी दुधी छोटी
कोपऱ्यात एकटी फसली !
कारलं होतं भेंडी जवळ
चोरून चिडीचुप बसलेलं,
आवडेच ना कुणी त्याला
फिदीफिदी उगा हसलेलं !
करून प्रवास येवढा, गाडी
पोहचली स्वयंपाकघरात,
नको म्हणत असता तरी
जीव पडलाच कि भांड्यात !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
खूपच छान लिहिले आहे. आज
खूपच छान लिहिले आहे. आज माझ्या लेकीला सांगेन ..खूप आवडेल तीला ... असेच लिहीत रहा !
मनस्वी धन्यवाद समृद्धी मँडम .
मनस्वी धन्यवाद समृद्धी मँडम ...
छान आहे कविता!
छान आहे कविता!
शाकाहारी शाकाहारी जेवण म्हणत
शाकाहारी शाकाहारी जेवण म्हणत जीव भाज्यांचा का होईना जातोच तर!!!
मनस्वी धन्यवाद मानव पृथ्वीकर
मनस्वी धन्यवाद मानव पृथ्वीकर व पाटील जी